१९८९ मध्ये चीनी लेखिका झिन रान ही शान्डोंग भागातील एका गावाच्या मुख्याच्या घरी रात्रीचे भोजन घेत होती.
त्याची सूनबाई शेजारच्याच खोलीत वेणा देत होती एका नव्या जीवाला जगात आणण्या साठी. तितक्यात त्या शेजारच्या खोलीत रडारड झाली.
थोड्यावेळाने सुईण बाई कामाचे पैसे घेण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांच्या जवळच्या टोपली मध्ये अचानक एक हालचाल दिसली. नीट पाहिले असता त्यातून एक इवलासा पाय डोकावत होता.
त्या खोलीत ती एकटीच होती जिचा थरकाप झाला होता. मुख्याच्या पत्नीने सहजपणे सांगितले की " ते मूल नाहीये. जर असते तर आम्ही त्याला आत्ता सांभाळताना दिसलो असतो. पण ती एक मुलगी आहे आणि आम्ही तिला ठेवू शकत नाही. "
झिन रान सांगते , " चीनी प्रथेनुसार तुम्हाला मुलगा नसेल तर तुम्हाला माणूस म्हणून गणले जात नाही.(प्रतिष्ठा मिळत नाही.) ".
"सांस्कृतिक क्रांती " यशस्वी केल्यानंतर कम्युनिस्ट सरकारने वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा म्हणून १९७९ पासून ' एक कुटुंब एक मूल ' योजना सक्तीने राबावावायास सुरुवात केली. त्यामुळे एका पेक्षा जास्त असणारी बालके बेकायदेशीर ठरत असल्यामुळे लोकांनी मुलगा होइपर्यन्तच्या सर्व बालिकांना टाकून देणेच पसंत केले.
असेच एकदा रेल्वे प्रवासात तिच्या सोबत एक नवरा बायको आणि त्यांची छोटुकली होती. आई-बापाला घेऊन गाडी सुटली पण ती छोटुकली मुलगी मात्र स्टेशनच्या प्लाटफॉर्मवरच बसलेली होती. त्या बिचार्या मुलीला आधी ३ बहिणी होत्या.
पुन्हाच्या खेपेला मुलगाच होईल या आशेने त्या आई-बापानी ही चौथी मुलगी टाकून दिली होती. अश्या कुटुंबांना " जास्तीच्या(नको असलेल्या) जीवां विरुद्ध लढणारे " असेच चीनी लोक म्हणतात. हे योद्धे अश्या भागान मध्ये आसरा घेतात जिथे त्यांच्या कुटुंबाचा पटकन मागोवा घेता येत नाही की मागच्या पोराबाळाचा थांग लागत नाही.
चीनी बाळतिनीच्या खोलीत सुईण एक गरमा पाण्याने भरलेला टब घेऊन जात असते. जर मुलगा झाला तर त्याला आंघोळ घालण्यासाठी आणि मुलगी झाली तर तिला त्याच पाण्यात जलसमाधी देण्यासाठी.
झिन रानने बरीच अनाथालये पालथी घातली तेंव्हा त्यात जवळपास मुलीच आढळल्या, काही काही मातांनी त्याना सोडताना काही खुणा सोडल्या होत्या ज्यायोगे मोठेपणी त्या आई बापांचा मागोवा घेऊ शकतील. पण अनाथालये अश्या खुणा फेकून देते.
झिन रान च्या पुस्तकामुळे चीन मधील अश्या अनेक दुर्दैवी कन्या आणि माता आणि कुटुंबांची व्यथा जगासमोर येऊ शकली.
भारतातील मुलींच्या जन्माच्या आणि जन्मदराच्या पार्श्वभूमीवर "सांस्कृतिक क्रांती " झालेल्या चीन मध्येही अश्या प्रथा जिवंत असतील याचा धक्का बसल्यावाचून राहात नाही.
(इंडियन एक्स्प्रेस मधील एका लेखावर आधारित )
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 9:43 pm | गणपा
भयंकर रानटी प्रकार.
मग ते चीन मध्ये असो वा जगाच्या पाठीवर अजुन कुठे.
7 Apr 2011 - 9:53 pm | असुर
चीन कशाला, भारतातदेखील या प्रथा सर्रास आहेत की!
'मातृभूमी - अ लँड विदाउट वुमेन' नावाचा एक ट्युलिप जोशीचा चित्रपट पहा. काल्पनिक परंतु भीषण आहे हा चित्रपट!!
मुलगा असो वा मुलगी, लहानग्या जीवाला जाणूनबुजून अनाथ करणारे आईवडील असल्यावर ते पोर जन्मत:च अनाथ हो. असल्या पालकांनी ही मुले सांभाळूनदेखील काय, स्वत:च्याच घरी अनाथालयात राहील्यासारखे जीणे त्यांच्या वाट्याला येणार!
--असुर
8 Apr 2011 - 8:57 am | विनायक बेलापुरे
भारतात ही अश्या प्रथा आहेत. किम्बहुना घटलेला पुरुष : स्री रेशो आणि बोकाळलेली सोनोग्राफी केंद्रे त्याचेच प्रतिक आहेत. पण बूर्झ्वांच्या नावाने शिमगा करत , डंका पिटत समाजवादी-साम्यवादी व्यवस्था स्विकारलेल्या चीन मध्येही अशी प्रथा असावी याचे नुसते आश्चर्य वाटत नाही तर शोर गोर करुन उभ्या केलेल्या अश्या व्यवस्थांचे अपयश जास्तच बोचून जाते. (तसे ते जुन्या सोविएट रशियात ही दिसून आले आहेच.)
अनेक प्रथा काळाला किंवा ओढवलेल्या परिस्थितीला उत्तर म्हणून त्य त्या कालखंडात उभ्या राहतात आणि त्या समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग बनून जातात. बहुपत्नीत्व किंवा बहुपतित्व, इस्लाम मधील ४ विवाह, सतीप्रथा याही अश्या समस्यांचेच त्या कालखंडापुरते काढलेले उत्तर आहे. काळ अनुकूल झाला की या प्रथा आपोआप नष्ट होतात आणि त्यांची जागा नव्या प्रथा घेतात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
9 Apr 2011 - 3:11 pm | चिंतामणी
स्त्री-भ्रूण हत्येत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर
मध्यंतरी एक बातमी आली होती. या चर्चेच्या संदर्भात त्या बातमीची आठवण झाली.
.
स्त्री-भ्रूण हत्येत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर
सामाजिक सुधारणांचा आदर्श घालून देणारा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा कोल्हापूर आता आणखी एका कारणाने गाजतोय... ते म्हणजे जन्माला येण्याआधीच मुलीचा गर्भ नाकारला जाणं. राज्यात सर्वाधिक स्त्री-भ्रूण हत्या कोल्हापुरातल्या 5 तालुक्यात होत असल्याचं एका पाहणीत आढळलंय.
.
1991 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटात एक हजार पुरुषामागे 931 मुली होत्या. पण दहा वर्षांनंतर हा समतोल बिघडला. 2001 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण एक हजार पुरुषामागे 859 इतकं खाली आलं. शिरोळ तालुक्यात 0 ते 6 वयोगटात 1991मध्ये दरहजारी पुरुषामागे 914 इतक्या मुली होत्या. आता ही संख्या 827 वर येऊन पोहचलीय. हातकणंगले तालुक्यात हेच प्रमाण 925 वरून 829 वर आलंय. पन्हाळा तालुक्यात हे प्रमाण 931 वरून 816 वर आलंय. करवीर तालुक्यामधील हे प्रमाण 925 वरून 803 तर कागलमध्ये हे प्रमाण 925 वरुन 816 पर्यंत खाली घसरलंय.
.
येथे सविस्तर बातमी वाचा.
.
याचे उत्तर आहे का कोणाकडे?
7 Apr 2011 - 10:05 pm | शिल्पा ब
जगात कुठेही असाल तर हा प्रकार अघोरी आणि संतापदायकच.
मी ३-४ महिने प्रेग्नंट असताना बागेत एक चीनी बाई तिच्या ७-८ महिन्याच्या लेकीला लेकासारखे कपडे घालून अन बारीक केस करून घेऊन आली होती...मी कौतुकाने त्या बाळाच्या जवळ गेल्यावर तिच्याशी बोलणे झाले...ती मला म्हणाली कि तुला बाळाचे लिंग माहित आहे का? भारतीयांनासुद्धा मुलंच (मुली नकोत) हवी असतात न? मी सांगितला मला मुलगीच हवी आहे (आणि मला मुलगीच आहे)...पण कोणताही लिंग असलं तरी बाळ निरोगी असावं एवढीच इच्छा. मग मी तिथून काढता पाय घेतला कारण मला अशा विचारांच्या लोकांबरोबर बोलायची इच्छा नव्हती आणि नाही.
हि गोष्ट ५ वर्षापूर्वीची....म्हणजेच परिस्थितीत खूप फरक पडलाय असे नाही. आपल्याकडे थोडातरी बदल आहे.
7 Apr 2011 - 10:49 pm | नेत्रेश
अमेरीका, युरोप, वगैरे पुढारलेल्या देशांतही बहुतेकजणांना मुलगाच हवा असतो. मुलग्याच्या प्रतेक्षेत तीन चार मुली होउ देणारे कित्येक महाभाग मी अमेरीकेतही पाहीले आहेत. अर्थात ईथे त्या सर्व मुलिंना तेवढ्याच प्रेमाने वाढवतात आणी त्यांना सर्व संधी उपलब्ध करुन देतात, हा भाग वेगळा. पण आपल्याला मुलगा व्हावा असे जगभरातील सर्व लोकांना वाटत असते. फक्त विकसनशील आणी मागासलेल्या देशात बर्याच मुलांचे (मुलिंचे) पालन करण्याची आर्थीक ताकद नसल्याने त्यांची हत्या (जन्मा आधी / जन्मा नंतर) करण्यात येते.
7 Apr 2011 - 11:50 pm | किशोरअहिरे
अमेरिकेत मुलांचे प्रमान मुलिंपेक्षा कमी आहे :)
तसेच मागच्या ३ वर्षांमधे असा भेदभाव तरी दिसुन आलेला नाही..
हो पण काही भारतीय वाय*** लोक हा मुर्ख पणा करायला ईकडे येऊन सुध्दा कमी जास्त करत नाहीत..
9 Apr 2011 - 4:36 am | नेत्रेश
त्याचे कारण मी आधीच सांगितले आहे. मुलगा व्हायच्या प्रतिक्षेत लोक ३ मुली सहज होउ देतात. पण अमेरीकेत भ्रुण हत्या हा प्रकार नसल्यामुळे मुलिंची संख्या मुलांपेक्षा जास्त होते. हा प्रकार मी लॅटीन अमेरीकेतुन आणी पुर्व युरोपातुन आलेल्या इमिग्रंटस मध्ये जास्त पाहीला आहे. त्यामनामे, भारतिय आनी ईतर एशियन लोक १ किंवा २ मुले (मुलगा/मुलगि) होउ देतात.
10 Apr 2011 - 6:17 pm | चिंतामणी
बरोबर आहे. ही आकडेवारी बघा.
9 Apr 2011 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार
वॉssssव !!
वा वा ! ३ वर्षे झाली तुम्ही तिकडे आहात का? छान छान.
+१ सहमत आहे.
काही भारतीय भारतात असताना आधिच वाय असतात. ते अमेरिकेत गेले की वायझेड होतात. अहो ते काय ते म्हणतातना.. 'आधिच मर्कट....'
10 Apr 2011 - 5:11 am | पंगा
'वायझी' अशी सुधारणा सुचवू इच्छितो.
खरंय. रस्त्यारस्त्यातून दारूचे ओहळ वाहतात खरे अमेरिकेत. आणि भारतातून गेलेली मर्कटे सारखी नुसती आचमने घेत असतात. काय करणार, भारतात ही चीज बघायला मिळत नाही ना कधी! भारत खर्या अर्थाने सु'जलाम्' झाल्याशिवाय प्रश्न सुटण्यासारखा नाही हा.
9 Apr 2011 - 3:13 pm | चिंतामणी
माझ्या समोर अशी खूप उदाहरणे आहेत.हे वंशाचे दिवे काय दिवे लावतात आणी म्हातारपणाला आधार होण्याऐवजी काळ बनतात. हे बघितल्यावर "कशाला मुलगा पाहीजे" असे वाटते.
मुलगाच पाहीजे म्हणणारे विसरतात की (बाप असेल तर) आपल्याला जन्मदेणारी आई, आपल्या मुलाला जन्म देणारी बायको ह्या स्त्रीयाच आहेत. जर बाईलाच वाटत असेल की आपल्याला मुलगाच हवा तर त्याहून दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाही.
यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मुले आणी मुलींच्या प्रमाणात झालेला असमतोल. त्यामुळे पुढे अजून काय काय बघायला लागणार या कल्पनेने धडकी भरते.
7 Apr 2011 - 11:10 pm | रेवती
नोव्हें. २०१० च्या रिडर्स डायजेस्टच्या अंकात 'अ बाँड सो स्ट्राँग' ही सत्यकथा छापून आलीये.
जुळ्या बहिणींना पालकांनी वेगवेगळ्या दिवशी अनाथलयाच्या आसपास सोडून दिल्यानंतर त्या दोघींनाही अमेरिकेतील वेगवेगळ्या कुटुंबांनी दत्तक घेतले. मुलींना खूप एकटं वाटत असताना इंटरनेटाद्वारे दोन्ही कुटुंबांना हा शोध लागला. मुलींचे फोटू पाहून आणि डीएनए तपासणीद्वारे त्या जुळ्या बहिणी असल्याचे सिद्ध झाले. आता दर ६ महिन्यांनी पालक त्यांना भेटवतात आणि एकमेकांच्या घराजवळ रहायला येण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या मुली खूपच कनेक्टेड आहेत.
मुलींची चित्तरकथा (दुधात बुडवून मारण्याची) राजस्थानातही होती/आहे.
माझ्या इथे राहणार्या एका भारतीय मुलीची आई मनोरुग्ण आहे. तिने सांगितले की (मी न विचारता) तिच्या आईला दोन्ही मुलीच झाल्याने समाजाने, नातेवाईकांनी इतका त्रास दिला की आईचे मानसिक संतुलन ढळले आहे. माझ्या अंगावर काटा आला. एखाद्याचे संपूर्ण आयुष्य रसातळाला घालवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नसतो. आणि ज्या मुली मेल्या ते बरेच झाले. जो समाज त्यांना समजून घेण्यास नालायक आहे तिथे वाईट वातावरणात रहायची शिक्षा तरी नको. जे आईवडील आपल्या बाळाचा सांभाळ समर्थपणे करू शकत नाहीत ते काय उपयोगाचे? ज्या जगल्यात आणि मुलगी असल्याची शिक्षा भोगताहेत त्यापेक्षा मरण परवडले.
7 Apr 2011 - 11:58 pm | मृत्युन्जय
माझ्या ओळखीतल्या काही कुटुंबांमध्ये २ मुलींनंतर जवळपास १२-१३ वर्षांनी मुलगा झाला. मधली १२-१३ वर्षे ते लोक स्वस्थ बसले होते हे मानायला मी तरी तयार नाही. मधल्या काळात कितीवेळा गर्भपात झाले असतील देव जाणे. ही हत्या नाही?
8 Apr 2011 - 9:05 am | विनायक बेलापुरे
खरे आहे. १२-१३ वर्षे लिंगनिदानाचा प्रयत्न केला असण्याचीच दाट शक्यता आहे.
10 Apr 2011 - 9:35 am | पंगा
पुरावा काय? आपण पाहायला गेला होतात काय?
अवांतर शंका: लिंगनिदानाच्या उपलब्ध वेगवेगळ्या पद्धतींत लिंगनिदान हे साधारणपणे गरोदरपणाच्या कितव्या आठवड्या/महिन्यानंतर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य व्हावे? तोपर्यंत गरोदरपणाची बाह्यलक्षणे (जसे: पोटाचा आकार वगैरे) सामान्यतः (सगळ्यांना - विशेषतः चिकित्सक त्रयस्थांना - लक्षात येण्याइतपत) वृद्धिंगत व्हावीत की होणार नाहीत? वैद्यकीय तज्ज्ञांनी खुलासा करावा.
11 Apr 2011 - 12:27 am | मृत्युन्जय
हे मानायला मी तरी तयार नाही
आपण वरील विधान वाचले होते काय?
8 Apr 2011 - 8:41 am | नगरीनिरंजन
नवजात मुलींची हत्या ही संतापजनक विकृती तर आहेच पण एकंदरीत मानवी लोभी प्रवृत्ती पाहता यात आश्चर्यकारक ते काहीही नाही. अर्थशास्त्राच्या मागणी-पुरवठा नियमांप्रमाणे मुलींची संख्या कमी झाल्याने त्यांची किंमत वाढून एकदिवस मुलग्यांपेक्षा जास्त होईल अशी आशा.
8 Apr 2011 - 9:09 am | विनायक बेलापुरे
चालूच राहणार.
8 Apr 2011 - 9:59 am | पिलीयन रायडर
आमच्या सोसायटी मध्ये एक सुखवस्तु कुटुंब आहे.. त्याना आधी २ मुली झाल्या आणि मग तिसरा मुलगा....
आता त्या २ बहीणी रात्री १०: ३० वाजे पर्यन्त खाली बसुन असतात.. आम्ही आरडा ऑरडा करुन हा प्रकार बन्द केला.. बाकी मित्र मैत्रिणी कडे जातात तेवा जर कही खायला दिले तर अधाशा सारखे खातात , तेव्हा कळ्त की पोरी जेवल्याच नाहीएत...सणाच्या दिवशी सुद्धा मळलेले कपडे घालुन फिरतात... मुलगा मात्र राजकुमारा सारखा वाढत आहे..
9 Apr 2011 - 11:05 am | शिल्पा ब
अरे बापरे!!! भारतात फॉस्टर केअर सारखे प्रकार नाहीत म्हणुन त्यांना सुरक्षीत घरही नाही अन कदाचीत अशी सुविधा(?) असती तरी लोकांनी गैरफायदा मोठ्या प्रमाणात घेतला असता असं वाटतं. बाकी त्या मुलींची आई म्हणजे कैदाशीणच म्हणायची. त्या पोरींना कुणी उचलुन नेले म्हणजे? :(
8 Apr 2011 - 11:24 am | जासुश
माझया चुलत बहीनीची गोष्ट तिने एका मुलिनन्तर २ वेळा लिंग निदान करून गर्भपात केला आणि गावकडे अगदी न भिता न लाजता ह्या गोष्टी सांगितल्या जातात. जसा की असा कायदाच आहे की पहिल्या मुलिनन्तर पुन्हा मुलगी झाली नाही पाहिजे. ही गोष्ट धुळे येथील आहे.लोक शिकलेले असून ही अशा गोष्टी करतात. वाईट वाटते की हे रोखण्यासाठी सरकार काहीच करू शकत नाही.
9 Apr 2011 - 12:21 pm | विनायक बेलापुरे
चीन मधील मुले : मुली यांचे गुणोत्तर ही घसरतेच आहे.
८० च्या दशकात दर १००० मुलांच्यामागे ९२१ मुली असण्याचे प्रमाण घसरत घसरत २००५ मध्ये ८३३ इतके कमी तर कित्येक भागात ६९९ इतके कमी पातळीला पोचले आहे. (म्हणजे भारतापेक्षाही कमी )
भारत हा अश्या तर्हेच्या गैरसमजूतीत अडकलेला एकमेव देश नाही हे ही या निमित्ताने अधोरेखीत होते आहे हे विशेष आणि ते ही "सांस्कृतिक क्रांती" झालेल्या देशात.
किमान भारतात परिस्थिती सुधारणेच्या वाटेकडे जात आहे ही त्यातल्या त्यात समाधान.
9 Apr 2011 - 1:13 pm | योगप्रभू
स्त्रियांना मारहाण, हुंड्यासाठी छळ, मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव, भ्रूणहत्या अशा घटना वाचल्यावर/ऐकल्यावर कुणाही संवेदनशील व्यक्तीला संताप येणे स्वाभाविक आहे. पण अशा घटनांत अनेक पदर असतात. ते विचारात घेतल्याखेरीज एकदम स्त्रिया किंवा पुरुष दोषी, असा निष्कर्ष काढून चालणार नाही. त्यातून या घटना कोणत्या समाजांत घडतात, हेसुद्धा महत्त्वाचे असते. कट्टर पुरुषसत्ताक, वंशशुद्धी जपण्याबाबत आग्रही असलेले, जातीचा दुरभिमान बाळगणारे, धर्माच्या आत्यंतिक पगड्याखाली असलेले, निरक्षर व दरिद्री अशा लोकांत या घटना आढळून येतात.
मध्यंतरी एक बातमी वाचली, की हरियानात जाट समाजात उपवर मुलांना स्वजातीय मुली सहजपणे मिळत नाहीत म्हणून ते लोक बिहारसारख्या प्रचंड दारिद्र्य असलेल्या राज्यातून चक्क पैसे देऊन सुना खरेदी करतात. आता ही वेळ त्यांच्यावर का यावी? तर मुलाचा आग्रह धरुन मुलींची भ्रूणहत्या केल्याने. जातीच्या नावाने मिशांना पीळ भरणार्यांवर मिळेल त्या जातीतील मुलगी स्वीकारण्याची पाळी येणे, याला 'करावे तसे भरावे' किंवा 'काळाने उगवलेला सूड' असे म्हणतात.
महाराष्ट्रापुरता विचार केला तर असे दिसून येईल, की बहुतांश ब्राह्मण समाज व अन्य समाजांतील सुशिक्षित व पुरोगामी विचारांच्या कुटूंबांत अशा घटना घडताना आढळत नाहीत. ब्राह्मण समाजात हुंड्याची प्रथा नाही. मुलगा-मुलगी असा भेदभाव नाही. स्त्रिया नोकरी करतात आणि मुलींनी आंतरजातीय विवाह केला तरी ऑनर किलिंगचे प्रकार होत नाहीत. माहेरुन पैसे आणावेत म्हणून ब्राह्मण मुलींचा सासरी छळ होत नाही किंवा त्यांनी नाकापर्यंत घुंगट घेऊन वावरावे, अशी सक्ती नसते. ब्राह्मण बायका तर डोक्यावर पदरही घेत नाहीत.
हा मुद्दा सांगण्याचे कारण म्हणजे ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवायचे आहेत त्यांनी ते कधीच घडवले आहेत आणि ते पुढे जात आहेत. पण जे बदलांना सामोरे गेलेले नाहीत ते कधी ना कधी काळाचे फटके खातात. पण तोवर अशा वैचारिक मागासलेल्या समाजांत या घटना घडतच राहतात. त्यावर उपाय म्हणजे त्या त्या समाजांतील लोकांनीच प्रबोधन घडवणे होय.
9 Apr 2011 - 5:03 pm | रेवती
जातीच्या नावाने मिशांना पीळ भरणार्यांवर
असाच प्रकार धुळे, जळगाव असा कुठेसा झालाय. मुलांना जातीतल्या मुली मिळेनात म्हणून दुसरीकडे लग्ने केली आणि त्याची बातमी पेप्रात आली होती.
दुसर्या जातीतल्या सुनांबरोबर संसार सुरु झाल्यावर घरातल्यांना आनंद झाला आणि कित्येकांनी सांगितले कि गेली अनेक वर्षे उगीच जातीधर्माच्या नावाखाली भेदभाव करत राहिलो पण ही मुलगी तर आमच्या मुलींसारखीच आहे. या त्यांच्यातील बदलामुळे त्यांनी सुनांना चांगली वागणूक दिल्याने सुनाही खूष होत्या आणि वयाच्या पंचविशीतच त्यांच्या मनातून जातीभेद पार निघून गेला होता. या बातमीची मजा वाटल्याने लक्षात राहिली.
10 Apr 2011 - 6:45 pm | स्मिता.
धुळे-जळगाव भागात उपवर मुलगी मिळत नाही म्हणून विदर्भातल्या मागास भागातून पैसे देऊन बायका करून आणण्याचे प्रमाण बरेच आहे, पण ते गरीब शेतकर्यांमध्ये! कारण आधीच मुली कमी, त्यात बहुतेक मुलींचे वडील त्यांच्या मुलीसाठी नोकरदार मुलगा बघतात.
त्यातही गोम अशी आहे की या पैसे देऊन लग्न करून आणलेल्या मुली शेवटपर्यंत संसार करतात असं नाही. बर्याच बाबतीत तर असं घडलंय की या मुली काही दिवस घरात राहून नंतर घरात असेल-नसेल ते घेऊन पळून जातात.
----------------------
मुलींची घटलेली संख्या निराशाजनक आहेच पण त्याचं कारण संतापजनक आहे. खरं तर मुलगा/मुलगी जे अपत्य असेल त्याचे व्यवस्थित शिक्षण, संगोपन करणे एवढेच जन्मदात्यांच्या हातात असते. 'म्हातारपणीचा आधार' या एकाच पारंपारिक कारणामुळे सगळ्यांना मुलगाच हवा असतो पण आज-काल असे किती मुलं हा आधार बनतात?
आपल्याला सगळ्यांना हे कळते पण जिथे या बाबतीत अज्ञान आहे तिथे आपण काही बदल करू शकतो का यात मात्र शंकाच आहे.
10 Apr 2011 - 8:06 pm | रेवती
मुली काही दिवस घरात राहून नंतर घरात असेल-नसेल ते घेऊन पळून जातात.
हात्तिच्या! हे भलतच!
30 Apr 2011 - 1:33 am | चिंतामणी
आपल्याला सगळ्यांना हे कळते पण जिथे या बाबतीत अज्ञान आहे तिथे आपण काही बदल करू शकतो का यात मात्र शंकाच आहे.
या विषयासंदर्भातील भारताविषयी ताजी आकडेवारी येथे पहा.
http://www.indiaonlinepages.com/population/sex-ratio-of-india.html
या विषयासंदर्भातील भारताविषयी ताजी आकडेवारी नीट बघाल तर डोळ्यात अंजन पडेल. (लिंक वरती दिली आहे).
Sex Ratio of India as per 2001 Census
Sex Ratio of India India 933
Rural Sex Ratio of India Rural 946
Urban Sex Ratio of India Urban 900
हे व्यस्त प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त आहे. (कारण जास्त सुशिक्षीत लोक तेथे राहतात ना. ) म्हणजे सुशिक्षीत असले तरी शहरी लोक अज्ञानी आहेत असे म्हणावे लागेल ना.
30 Apr 2011 - 2:52 am | स्मिता.
बरोबर आहे. शहरी भागात स्त्रियांचं प्रमाण कमी असण्याच्या अनेक कारणांपैकी "सुशिक्षीतपणा" हे एक असावं असं म्हणायला हरकत नाही. कारण आज-काल बर्याच जोडप्यांचा एकच मूल होवू देण्याकडे कल असतो. मग ते एकच मूल म्हणजे मुलगाच हवा हा अलिखीत नियमच होतो.
"मुलगा होण्यासाठी काय करावे?" अशी पुस्तके वाचून फॅमिली प्लॅनींग करणारे बरेच लोक ओळखीत आहेत.
30 Apr 2011 - 9:51 am | चिंतामणी
आहे अशी परिस्थीती. :(
9 Apr 2011 - 1:26 pm | कलंत्री
सुदैवाने मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मला जेंव्हा मुलगी झाली तेंव्हा मला खुपच आनंद झाला होता. मुलगीला जेंव्हा दवाखाण्यात पाहिले तेंव्हा इतका आनंद झाला कि विचारता सोय नाही.
आता ती १४ वर्षाची आहे.
मुलापेक्षा मुलगी असण्यात जास्त आनंद असतो असे मी सांगु शकतो.
9 Apr 2011 - 2:25 pm | योगप्रभू
<<मुलापेक्षा मुलगी असण्यात जास्त आनंद असतो असे मी सांगु शकतो.>>
मला हे तुमचे मत ऐकून वाईट वाटले. आपण जर स्त्री-पुरुष समानतेचे न्याय्य पालन करत असू तर मला वाटते, की अशी भावना आपल्या मनात यायला नको. मुळात अपत्याचे वात्सल्याने संगोपन करण्यात आनंद असणार्याला मुलगा किंवा मुलगी याने फरक पडू नये. त्यामुळे मुलापेक्षा मुलगी असण्यात जास्त आनंद असतो, या विधानाने एकप्रकारे आपण भेदभाव तर करतोच, पण विनाकारण पुरुषांवर अन्यायही करतोय.
मलाही मुलगी आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे. एका स्त्रीचे डोळ्यासमोर फुलत जाणारे जीवन बघणे आणि या प्रवासात तिला खर्या अर्थाने सक्षम, परिपूर्ण करणे यासारखी कृतकृत्यता नाही. पण याचठिकाणी मुलगा असता तरी माझे प्रेम आणि कर्तव्य तितकेच राहिले असते. तुम्हाला तर मुलगा व मुलगी दोघांनाही फुलवण्याची संधी मिळाली आहे. या द्विगुणित आनंदाचे कृपया विभाजन आणि वर्गवारी करु नका.
मुलीच्या तुलनेत मुलाकडून काही अपेक्षापूर्ती होत नसल्याच्या भावनेतून आपले विधान आले असल्यास जडण-घडणीत आपण कुठेतरी कमी पडतोय, असाही त्याचा अर्थ निघू शकतो.
9 Apr 2011 - 3:33 pm | कलंत्री
माझ्याही मनात असा भेदभाव नाही. परंतु मुलगा झाला तेंव्हाचा आनंद आणि मुलगी झाली तेंव्हाचा आनंद यात मी मुलगी झाली तेंव्हा आनंद जास्त झाला किंवा तो काही तरी वेगळाच आनंद होता असे मला जाणवले. अजूनही जास्त विस्तृत लिहायचे तर, त्या दिवशी रस्र्त्यावर फिरताना तरुण मुली पाहतांना माझीही मुलगी त्यामुलींसारखी आनंदी असेल अशीच भावना झाल्याचे स्मरते.
कदाचित तो आनंद माझ्या आई अथवा आत्यांच्या विधानांचा मुलगी झाली त्यावर असलेल्य प्रतिक्रियेचाही परिपाक असावा.
जे काही आहे ते खरे आहे ते सांगतो.
11 Apr 2011 - 12:00 pm | आंसमा शख्स
मन असे आनंदी होते हे खरे आहे. मी त्यातून गेलो आहे. खुदाने दिलेला एक अतिशय आनंदी दिवस असेच म्हणेन.
10 Apr 2011 - 6:15 pm | चिंतामणी
या विषयासंदर्भातील भारताविषयी ताजी आकडेवारी येथे पहा.
http://www.indiaonlinepages.com/population/sex-ratio-of-india.html