मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवजयंती

मकरंद घोडके · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील? नंतर जुने इकडचे तिकडचे संदर्भ जे व्हाट्सअप्प वर फिरत असतात ते आठवले-चायनीज हे पदार्थ आहेत (जे चायनात पण असे बनवत नाहीत आणि फक्त इंडिया मधेच असे असतात) आणि विकणारे इथलेच कुठले तरी आसामी बांधव आहेत.मग ते आसाम मध्ये का नाही राहत असा निरुपयोगी प्रश्न पडला आणि गाडीचा गियर नकळत उचलला. एकदम मेंढरं सुटावी तशी माझ्यासकट गाडी त्या झुंडीतून जाऊ लागली आणि एकदम टर टर ssss ट ssss टर अशी सुसाट एक गाडी पुढून निघून गेली. त्यावर तीन मावळे ट्रॅफिक रुल्स धाब्यावर बसवून स्वार आणि हेल्मेट पण नाही!(पुण्यात आणि हेल्मेट? ते काय असतं? काय बोलता राव) भगवा कुर्ता पांढरा पायजमा कानात बाळी हातात ब्रेसलेट कपाळाला चंद्रकोर! असे प्रसन्न चेहरे.. शिवाय डोक्याचे खालून भादरलेले वर डोंगर म्हणून ठेवलेले केस(स्टाईल असते ती!) पुन्हा चौथीच्या धड्यात महाराजांच्या स्वप्नरंजनाचा भाग आठवला. हेच ते आधुनिक मावळे आता जयंतीच्या निमित्ताने महाराजांचा इतिहास जागवत आहेत आणि काळानुरूप हा बदल झालाय असं सहज वाटून गेलं. आधुनिक काळात घोडे वापरणं तसं योग्य व्हायचं नाही कारण तेवढी बडदास्त ठेवायची तर या मावळ्यांकडे तेवढी दौलत नाही आणि शिवाय PETA वाले प्राण्यांचा अमानुष छळ म्हणून केस वगैरे करतील! नकोच ते.शिवाय गाडीला झेंडा होताच-क्षत्रिय कुलावतंस! अशा रयतेच्या राजाला कूळ भूषणाला अभिमानाने सगळीकडे झेंड्याच्या रूपाने मिरवणारे मावळे पाहिलं की वाटतं-हो गरज आहे सर्वांना सांगण्याची की,होता असाही एक राजा जो कित्तेक शतकानंतर ही आठवला जातो. गाडी निघाली आणि पुन्हा दुसरा चौक आणि पुन्हा तोच माहोल. त्यात भर फक्त साऊंड सिस्टीम च्या रॅक ची! दन दन वाजत होतं, गाणी होती का नव्हती नीट ऐकू येत नव्हतं पण तुताऱ्या आणि ढोल एकदम शंभर बाजूने वाजत होते त्यामुळे माहोल अगदी सळसळत होता. काही मंडळींना आज सरकारी सुट्टी असल्याने ती भाजी किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात गुंग! तसं एवढ्या कोलाहलात कुणाला काही त्रास वगैरे होत नव्हता म्हणा. आता पूजा साहित्य आणि त्या बरोबरीने फेटे झेंडे भगवामय पाहायला छान वाटत होतं आणि एकदम साऊंड सिस्टीम ला कंठ फुटला! पोवाडे वाजू लागले..झालं एकदाचं जयंती साठी म्हणून आवश्यक जे आहे ते आलेलं आहे आणि वातावरणात तजेला आहे. अर्धाकृती पुतळ्याला हार घालून झाला..सुवासिक अगरबत्ती ,पेढे, गुलाल आणि एकमेकांच्या गळाभेटी.. गाडी अजून पुढे सरकली आणि काही मावळे टर ट ssss र करत सुसाट झेंडे घेऊन निघाले..नेमकं कुठे जाणार ते दरवर्षी वाटतं ते याही वर्षी वाटलं आणि मध्ये दाटीवाटीने बसलेला मावळा त्वेषाने ओरडू लागला- शिवाजी महाराज की.. बाकीचे जय म्हणे पर्यंत त्याने तोंडातून काहीतरी रस्त्यावर ओतलं-अगदी लालेलाल एकदम रक्तासारखं आणि पुन्हा ऊर्जेने ओरडला-शिवाजी महाराज की.. पुन्हा जय झालं. अजून पुढच्या महिन्यात अजून एकदा शिवजयंती आहे याचा विचार करत पुन्हा.. गाडी निघाली..

वाचने 27323 वाचनखूण प्रतिक्रिया 53

बाप्पू Wed, 03/06/2019 - 21:52
मी शिवजयंती या गोंडस नावाखाली 1000 रुपये वर्गणी (कि खंडणी?? ) पायी घालवून बसलोय.. त्याच्या बदल्यात मी - तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ जय शिवराय.. असल्या भंपक घोषणा ऐकल्या , दारू पिऊन झिंगलेले मावळे पहिले डीजे चा दणदणाट ऐकला महाप्रसादच्या नावाखाली काही बाहि खाल्ले.. जे मावळ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांचे खाऊन झाल्यावर जे आमच्यासाठी शिल्लक ठेवले ते.. दोन दिवस घरावर डेकोरेशन च्या नावाखाली भगवा झेंडा फडकावून घेतला.. अश्या पद्धतीने आमच्या गल्लीत शिवजयंती साजरी झाली.

In reply to by विजुभाऊ

माहितगार गुरुवार, 03/07/2019 - 11:02
हे जरासे अनफेअर नाही ना ? ह्या लेखात वर्णीलेले प्रकार अलिकडचे असणार त्या मानाने 'मवाली' शब्द पुरेसा जुना असावा.

In reply to by विजुभाऊ

Chandu Sun, 03/10/2019 - 11:42
मुगाल आक्रमकांच्या फौजे बरोबर त्यांच्या बलात्कारातूं उत्पन्न झालेली बेवारस पोरे जिनकाकोईवालीद =(पोशिंदा,वडील )नाही ते मवाली.मृत शिपायांचे अंगावर न बसनारे ढगळ चित्र विचित्र कपडे घालणे ,घरदार नसल्याने वेळी अवेळी ब्बोंब्लत फिरणे ही त्यान्ची खासियात......बाकी चालू द्या.....

nanaba गुरुवार, 03/07/2019 - 10:29
मला महाराजां बद्दल असलेल्या नितांत आदरामुळे - हे असे वागणार्‍या लोकांच्या इन्सेन्सिविटीचे वाईट वाटते, हे कळूनही काहीच करण्याची ताकद नसलेल्या आपल्या षंढपणाचे ही. हे बर्‍यापैकी सगळ्या सामाजिक सणांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.

सोन्या बागलाणकर गुरुवार, 03/07/2019 - 10:48
सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल अँगल" काढून टाकला तर ही फालतुगिरी बंद होईल पण हे सणच तर शक्ती प्रदर्शन करण्याच्या संधी बनल्या आहेत मग हे करेल कोण? असल्या उत्सवांमध्ये "बघतोय रिक्षावाला" किंवा "शांताबाई" असली गाणी आणि त्यावरचा दारू पिऊन केलेला धांगडधिंगा बघून टिळकांचा आत्मा वर तडफडत असेल.

In reply to by सोन्या बागलाणकर

अभ्या.. गुरुवार, 03/07/2019 - 11:08
फारच थोडे आत्मे समाधानात असतील, बाकीच्या सगळ्याच आत्म्यांच्या नशिबी तडफडच असणारे. एकट्या टिळक आत्म्याचे काय.

In reply to by सोन्या बागलाणकर

आनन्दा गुरुवार, 03/07/2019 - 12:38
राजकीय पुढाऱ्याना त्यांच्या विशेष कामासाठी मुले पुसावी लागतात. त्यांना दरवेळी पदरचे पैसे देणे अर्थातच परवडत नाही... मग काय करायचे? सापही मेला पाहिजे आणि काठीही वाचली पाहिजे. अश्या वेळेस हे उत्सव कामाला येतात. आजूबाजूच्या दुकानदारांकडून सुरक्षा शुल्क (वर्गणी) घेऊन अश्या ठिकाणी मंडप टाकला जातो. पुढारी पण थोडीफार देणगी देतो, त्याबद्दल त्याची जाहिरात केली जाते. मिळालेल्या सुरक्षा शुल्काचा थोडा भाग कार्यक्रमावर खर्च केला जातो, आणि उरलेला भाग शक्तीप्रदर्शन आणि त्या पाळलेल्या सुरक्षाभारवाहकांच्या योगक्षेमासाठी वापरला जातो.. अश्याप्रकारे त्यांचा योगक्षेम चालू राहिला की मग अन्य अधिकृत - अनधिकृत ठिकाणी आणि निवडणुकीमध्ये ही मुले सदर नेत्याचा चाकरीत काम करू शकतात. हे अर्थकारण लक्ष्यात घेतलं की मग आपल्याला समजेल की बदल नेमका कुटगे घडायला हवा आहे हे.. आपण त्या मुलांना नावे ठेवून काहीच साध्य होबार नाही, ते सगळे भावी भारताचे पुढारी आहेत, आपल्याला मुळावरच घाव घालणे आवश्यक आहे, पण कसा ते माहीत नाही...

In reply to by सोन्या बागलाणकर

फेरफटका गुरुवार, 03/07/2019 - 20:52
टिळकांचा आत्मा तडफडण्याचं कारण नाही. कारण मुळातच ह्या 'सार्वजनिक सेलिब्रेशन' ची सुरूवात 'पॉलिटिकल अँगल' मधूनच झालीये. गणेशोत्सवातले मेळे हे टिळकांनी सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी वापरले होते. आता एकंदरीतच लोकसंख्येची घनता कमी असणं आणी ह्या उपक्रमांचा सुरूवातीचा काळ असणं ह्यामुळे कदाचित त्रास कमी जाणवत असेल. पण नदी उगमापाशी जरी लहान अवखळ झर्यासारखी असली, तरी पुढे त्याचं पात्र अमर्याद विस्तारत जातच. दैनंदिन सामाजिक आयुष्यात अडचण निर्माण करणार्या कुठल्याही सार्वजनिक सादरीकरणावर कडक निर्बंध असावेत.

समीरसूर गुरुवार, 03/07/2019 - 11:24
दुर्दैवाने सगळंच खरं आहे. आमच्या इथे मोठी मिरवणूक निघाली. एक रस्ता पूर्ण बंद! प्रॉब्लेम सेलिब्रेशनचा नाहीये; प्रॉब्लेम यांच्या गुंडगिरीचा आणि दादागिरीचा आहे. ज्या उन्मत्तपणे हे रस्त्यावर फिरत असतात तो उन्मत्तपणा आणि 'आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही' हा माज सगळ्यात तापदायक आहे. सध्यातरी याच्यावर उपाय नाही. तोच प्रकार दहीहंडी या फालतू सणाचा. खुशाल संपूर्ण रस्ते ब्लॉक करून ठेवतात. माझ्यामते जेव्हापासून हे ढोल-ताशाचे प्रस्थ वाढलेय तेव्हापासून दहीहंडी, गणेशोत्सव, शिवजयंती वगैरे अधिक त्रासदायक झाले आहे. कानाचे पडदे फाटतील एवढ्या प्रचंड आवाजात ढोल-ताशे आणि ती कर्कश घंटा बडवणे हा सेलिब्रेशनचा एक अत्यंत हिडीस, त्रासदायक, आणि निर्बुद्ध प्रकार आहे. त्यामुळे रस्ते बंद होतात, वाहतूक विस्कळीत होते, इतरांना उपद्रव देण्याची समूहवृत्ती बळावते, आणि आपण काहीही केले तरी आपल्याला कुणी हात लावू शकत नाही हा फाजील आत्मविश्वास वाढतो. जगात असले फालतू प्रकार फक्त भारतातच चालतात. आठ-दहा वर्षांपूर्वी ढोल-ताशे बडवण्यासाठी मुलीदेखील पुढे आल्या होत्या. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. ढोल-ताशे बडवल्याने किती 'एम्पॉवर्ड' वाटतं; ढोल-ताशे बडवल्याने एक स्त्री म्हणून कसं 'मुक्त' असल्यासारखं वाटतं; ढोल-ताशे बडवणं (आणि दुसर्‍यांना त्रास देणं) तणाव घालवण्यासाठी किती उपयुक्त आहे वगैरे तद्दन भिकारचोट आणि फालतू शोध लावण्यात आले होते. आता हे सगळे शोध गायब झालेत कारण सगळ्यांनाच पटलेलं आहे की ढोल-ताशे हा एक फक्त उपद्रवी आणि निरर्थक प्रकार आहे. आता वर्तमानपत्रांपत्रांढोल-ताशाविषयी तक्रारीच फक्त येतात.

In reply to by समीरसूर

अभ्या.. गुरुवार, 03/07/2019 - 12:01
आणि ते बायकांनी फेटे गॉगल आणि पैठण्या घालून बुलेटा फिरवायच्या मिरवणुका ते.....

In reply to by समीरसूर

आनन्दा गुरुवार, 03/07/2019 - 12:26
खखोदेजा पण ढोल ताशे बदवणाऱ्या मुलींना उत्तरायुष्यात संततीविषयक प्रश्नांना सामोरे जावे लागले असे त्यातल्या एका मैत्रिणीने नंतर सांगितले होते. अर्थात याबद्दल विडा उपलब्ध नसल्यामुळे काही बोलणे चूक आहे, पण हा अभ्यास आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by आनन्दा

समीरसूर गुरुवार, 03/07/2019 - 15:26
ढोल-ताशाचा तो कर्णकर्कश्श्श्श्श आवाज आणि डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा...एकदा या पथकाजवळ १५ मिनिटे थांबलो होतो. अक्षरशः मेंदू सुन्न पडला. डोकं थाड-थाड उडायला लागलं. छाती दडपली. आसपासचे पक्षी, प्राणी, ज्येष्ठ, आजारी, लहान मुले सगळे पार भेदरून जातात. घाबरतात. आमच्या घराजवळ एक मंदिर आहे. तिथे कधी कधी सगळे डोक्यावर पडल्यागत तासंतास ढोल-ताशे बडवत बसतात. हा प्रकार करून नेमकं काय साधतं मला अजून कळलेलं नाहीये. सगळा निव्वळ बिनडोकपणा आहे. याचे विपरित परिणाम होत असणारच. मला तर असं वाटतं की कायद्यानेच या वाद्यांवर बंदी आणली पाहिजे. जो ढोल-ताशे बडवेल त्या प्रत्येकाला पोलीसांनी चौकात बडवला पाहिजे.

In reply to by समीरसूर

बबन ताम्बे गुरुवार, 03/07/2019 - 17:21
एका पथकात मी पितळी घंटेऐवजी दोन गॅस वेल्डिंगचे सिलिंडर टांगलेले पाहिले होते आणि वाजवणारा जीव खाऊन त्यावर हातोडी मारत होता. सिलिंडर मोकळे असावेत अशी आशा.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द गुरुवार, 03/07/2019 - 17:30
लोखंडी घंटा किंवा जाड लोखंडी प्लेट बडविणाऱ्या इसमाची audiometry केली आणि त्याला श्रवणशक्तीवर झालेला परिणाम दाखवला तर तो आपण होऊन हे काम सोडून देईल

In reply to by ओम शतानन्द

बबन ताम्बे गुरुवार, 03/07/2019 - 18:08
ती घंटा ही मारे लोखंडी अँगलचे स्ट्रक्चर आणि चाके असलेली गाडी बनवून त्याला टांगलेली असते. अजून एका गावठी वाद्याची भर पडली आहे. एक मोठी परात (थाळी) एका सरळ लोखंडी पट्टीला जोडलेली असते आणि ती पट्टी गोलाकार बनवुन वादकाच्या कमरेला बसवलेली असते. परात वादकाच्या तोंडासमोर थोड्या अंतरावर तिरकी असते आणि वादक ती बडवत असतो. या थाळीचा देखील अत्यंत कर्कश आवाज येतो.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द गुरुवार, 03/07/2019 - 17:23
याचे कारण म्हणजे अतिरेक , पूर्वी ढोल ताशे मिरवणुकीमध्ये वाजत असत ,प्रमाण कमी असल्याने त्याचा उपद्रव होत नसे. कुणी तरी एक नवीन प्रयोग म्हणून मुलींनीही ढोल का वाजवू नयेत अशा विचाराने हे चालू केले असावे , त्याला प्रसिद्धी आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असे दिसल्याने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी मुलींची ढोल पथके निर्माण झाली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्यापासून आनंद तर दूरच, उपद्रव वाढू लागतो , सर्वच बाबतीत हे दिसते उदा. गल्लोगली गणपती, डीजे, गरबा , दहीहंडी , एका वस्तीत दोन शेजार शेजारच्या गल्ल्यात दोन गणपती निमित्त कर्णकटू आवाजात वेगवेगळी गाणी लावलेली असतात. तथाकथित समाजसेवक , राजकीय पक्ष राजकीय नेते सुद्धा या अतिरेकाला कारण आहेत ह्या असल्या अतिरेक करायच्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे कुठलाही उत्सव, सण सार्वजनिक करू नये असे वाटू लागले आहे

वकील साहेब गुरुवार, 03/07/2019 - 11:27
शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी या हेतूने शिवजयंती साजरी व्हायला हवी. हे खरेच. मग आता जशी शिवजयंती साजरी होतेय तशी नाही तर अन्य कशा प्रकारे शिवजयंती साजरी व्हावी असे तुम्हाला वाटते ? मी माझी संकल्पना मांडतो. इतरांनीही त्यात भर घालावी. १. शिवचरित्रावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करणे. २. निबंध स्पर्धा. ३. चित्रकला स्पर्धा. ४. किल्ले बनवण्याची स्पर्धा. ५. तलवारबाजी, कुस्ती, मैदानी खेळ प्रदर्शन /स्पर्धा. ६. नाटिका. ७. वक्तृत्व स्पर्धा. ८. शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन. ९. किल्ला भेट सहलीचे आयोजन. १०..................

In reply to by वकील साहेब

समीरसूर गुरुवार, 03/07/2019 - 11:47
दरवर्षी काय तेच तेच करणार...शिवचरित्रावर आतापर्यंत पन्नास कोटी व्याख्यानं झालीयेत. आता आपण इतिहासातून बाहेर पडलं पाहिजे. तेच तेच दळण पुरे करायला पाहिजे. या यादीपैकी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि किल्ले स्पर्धा तेवढ्या फायद्याच्या आहेत. अर्थात प्रत्येक वर्षी निबंध लिहिण्यासाठी शिवचरित्राचाच विषय नाही दिला तरच! या स्पर्धांमुळे मुलांना नवीन कौशल्ये तरी शिकायला मिळतील. बाकी सगळं आधीच खूप वेळा झालेलं आहे. आणि मी म्हणतो दणदणीत सेलिब्रेशन दर वर्षी करण्याची खरंच गरज आहे का? दुर्दैवाने सारखं मागे वळून बघत राहिल्याने आपले सामाजिक प्रश्न जास्त उग्र झालेत. अब बस करो! "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे', 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत; मी टरफलं उचलणार नाही', 'सिंहाच्या जबड्यात घालुनि हात...वगैरे वगैरे', 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा'........हे आणि असलं बरंच काही गेली कित्येक वर्षे, दशके ऐकून ऐकून कान विटले आहेत; बुद्धीवर गंज चढला आहे. यातून बाहेर पडलो तरच काहीतरी चांगलं शक्य आहे. अजून किती काळ आपण त्याच टोकदार (आणि निरर्थक) अस्मिता मिरवत राहणार आहोत?

In reply to by समीरसूर

आनन्दा गुरुवार, 03/07/2019 - 12:23
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा शिवचरित्र ते मंगळागौर या चौकटीत बंदिस्त झालेली आहे असे माझे मत आहे.. या पलीकडे जाऊन आपल्याकडे बरेच काही आहे, पण लोकांना स्पष्ट बोललं की राग येतो. वरती माझ्या अश्याच एका स्पष्ट प्रतिक्रियेला पंख लागले. असो, काय बोलणार, कालाय तस्मै नमः.

मनिम्याऊ गुरुवार, 03/07/2019 - 12:55
या सगल्या शिवजयन्ती celebration मंडळांनी वर्षभरासाठी महाराजांच्या एका एका किल्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. अगदी अगदी साफ़सफ़ाई पासून ते दुरुस्तीपर्यन्त सर्व. आणि मग पुढील शिवजयन्तीला या उपक्रमाचे मूल्यमापन करावे. (दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है)

In reply to by मनिम्याऊ

उत्तम कल्पना! नुसते गड किल्लेच नाही तर तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे झालंच तर आपापल्या वॉर्डात रस्तेसफाई, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन ही कामेही करावीत, तीही वर्गणी गोळा ना करता आमदारनिधीतून. मग बघा कशी या उत्सवांमधून हवा निघून जाते.

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा Sat, 03/09/2019 - 16:51
स्तुत्य उपक्रम आहे. याच धर्तीवर पुण्यातही सगळ्या रस्त्यांवर फेरीवाले आणि उत्सववाले यांच्यासाठी ओव्हरब्रिज बांधावे असे सुचवतो.

शब्दानुज गुरुवार, 03/07/2019 - 13:22
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे. याचा थोडा मानसशास्त्राच्या दिशेने विचार करायला हवा. तरूणवयात नेहमी करून दाखवायची ऊर्मी असते. त्याचवेळी त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट नकोसे असतात. मग आपण कोणी तरी आहोत हे स्वताः करून दाखववण्यापेक्षा जे आधीच करून झालेले आहे ते माझेच हे सांगता येते. अस्मिता असे त्याला गोंडस नाव दिले की झाले. मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. कूणाच्याही जयंत्या , कसल्याही प्रकारच्या मिरवणूका , जुलूस , मंडप असले कुठलेही प्रकार रस्त्यावर न करण्याबाबत कायदा करण्याची गरज कितीही असली तरी लोकानुनय करण्याची खोड सर्वपक्षीय आहे. थोडक्यात आपण आपली काने बंद करून घ्यायची आणि होणा-या धिंगाण्याला हताशपणे पहात राहयचे.

In reply to by शब्दानुज

अभ्या.. गुरुवार, 03/07/2019 - 15:28
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. पण हे लॉजिक गणेशोत्सवाला लावता येत नाही, ओंगळवाणे प्रदर्शन तिथेही असते. सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागणे जरी थोडे बाजूला ठेवलं तरी ते करताहेत त्या एन्जॉय मध्ये काय समाधान त्यांना मिळते हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित समाजातील काही जणांच्या एन्जॉयच्या कल्पना वेगळ्याही असू शकतात. आपण जसे काव्य शास्त्र विनोद वाचन संगीत अशा गोष्टीत मन रमवतो तसे त्यांचे नसेलही. मोठ्ठा कानफाडु आवाज, चित्रविचित्र कपडे, अविर्भाव, हेअरस्टाइल हे कदाचित स्टॅंडर्ड वर्तनापेक्षा वेगळे वाटत असेल तरी एक मोठ्ठा वर्ग त्याला फॉलो करतो असे दिसून येईल. अशा गोष्टींचा प्रभाव असणे, तिकडे तरुण पिढी (सगळीच नसली तरी काही) खेचली जाणे ह्यात चूक कुणाची हे शोधणे रोचक असणार.

In reply to by शब्दानुज

चिगो Fri, 03/08/2019 - 16:03
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे.
सहमत.. इतिहासाबद्दलचा वाढता उन्माद हा एक चिंतेचा विषय आहे. शिवाजीमहाराजांना नुस्तं 'शिवाजी' (ऐतिहासिकदृष्ट्या योग्यच) असं संबोधल्यास भावना दुखावतात आजकाल.. महाराजांची वागणूक, राजनैतिक धुर्तता, प्रजाहितदक्षपणा इत्यादींबद्दल कणभर ही शिकून/समजून न घेता केवळ त्यांच्या जयजयकाराने किंवा दाढी/पोस्टर/कवड्यांची माळ/ टॅटू इत्यादीतून 'गर्व' वाटून घेण्यात आपली जनता आणि विशेषतः तरुण पिढी धन्यता मानतेय, हे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल भिती आणि त्यातूनच 'डिनायल' आहे, ह्याचं द्योतक आहे. कुठल्याही समाजाला तीन/चारशे वर्षांपुर्वीच्याच एका 'हिरो'वरच प्रेरणेसाठी अजूनही निर्भर रहावं लागतंय, हे दु:खद आहे. आपल्या प्रतिसादाशी सहमत.

पी. के. गुरुवार, 03/07/2019 - 14:52
तरुण हे या देशाची शक्ती आहे असं कलाम साहेब बोलून गेले. पण आज आर्धे तरुण रस्त्यावर मशाल घेऊन पळत असतात आणि बाकीचे पालखी घेऊन पळत असतात. काय होणार या देशाचं..

In reply to by विजुभाऊ

समीरसूर Fri, 03/08/2019 - 09:58
मागील वर्षी एक तरुण कॉलेजकुमार कुठूनतरी ही शिवज्योत की काय म्हणतात ते घेऊन जात असतांना अपघातात ठार झाला. कोवळा मुलगा होता. जेमतेम २०-२२ वर्षांचा. ही काय भलतीच प्रथा सुरू झाली आहे देव जाणे. तद्दन निरर्थक!

In reply to by समीरसूर

लई भारी Fri, 03/08/2019 - 11:39
सरकारी अभियांत्रिकी कॉलेज चा विद्यार्थी होता. कुठून असलं सुचत काय माहित?

In reply to by स्वलिखित

आनन्दा Fri, 03/08/2019 - 12:47
NH-4 वरती वाहत्या रस्त्यात ज्योत घेऊन धावण्यात कसली आलेय प्रथा? आणि हे देखील प्रथा म्हणून मी समजा मान्य करेन. पूर्वी कुठेतरी एखादी ज्योत असायची, आणि त्या ज्योतीची काळजी घेणारे आणि सगळेच त्यात उत्सव आणि अप्रूप असायचे. आज जर शिवजयंतीच्या आसपास तुम्ही जर पुणे कोल्हापूर गेलात तर 10-15 तरी ज्योती मिळतील.. खरेच इतकी गरज आहे का असं प्रेम व्यक्त करायची? अवांतर - तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे कल्पना नाही, पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. लक्ष्यात घ्या, आम्हाला केवळ शिवजयंती साजरी करण्याबद्दल आक्षेप नाही, आम्हाला जनतेला वेठीला धरून कोणताही सण साजरा करण्याबद्दल आक्षेप आहे. व्हॉट अबाऊटरी करण्याची काहीही गरज नाही, काय बोलायचे असेल तर स्पष्ट बोला. आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा. वरती पण तुम्ही अशीच मळमळ बाहेर काढली होती, पण नंतर तो प्रतिसाद एडिट करून घेतलात. जाता जाता - टोकदार अस्मिता हा भारताला झालेला कॅन्सर आहे.

In reply to by स्वलिखित

आनन्दा Fri, 03/08/2019 - 22:40
तुमची तशी इच्छा असेल तर त्रिशतक पण होइल. पण त्याने सत्य परिस्थिती बदलणार नाही. मी सहसा अश्या वादात उतरत नाही, पण सध्या जाणीवपूर्वक काड्या सारण्याचे उद्योग काही लोक करत आहेत, त्यामुळे नाइलाजास्तव या चिखलात हात घालावा लागतोय.

In reply to by आनन्दा

स्वलिखित Sat, 03/09/2019 - 08:27
1.पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. 2.आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा सगळे सण सारखेच आहेत तर मग व्हॉट अबोउटरी चा प्रॉब्लेम काय आहे आम्ही सगळ्याच सणवार सारखे बोलतो याच विधानावर प्रश्नचिन्ह

In reply to by आनन्दा

आनन्दा Sat, 03/09/2019 - 13:36
आणि व्हॉट अबाउटरी बद्दल म्हणत असाल तर पहिल्यांदा तुम्ही इथे आंबेडकरांना खेचलात, त्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तो प्रतिसाद गायब केलात आता देवीला आणताय मध्ये, याला व्हॉट अबोटरी म्हणायचे की खोडसाळपणा हे तुम्हीच सांगा. अवांतर - अचानक एखादा आयडी सक्रिय होऊन एखादा अजेंडा रेटायला की हल्ली भीतीच वाटते बुवा.. पुनर्जन्म तर नसेल? नसावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लई भारी Fri, 03/08/2019 - 11:38
लिखाण आवडलं. वर चर्चिलेले सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहेच. प्रचंड त्रासदायक प्रकार आहे. दही हंडी, गणेशोत्सव, नवरात्र, गणेश जयंती आणि बाकी जयंत्या, पुण्यतिथ्या आहेतच. फक्त कारण पाहिजे असत आपलं उपद्रवमूल्य दाखवायला! ते ढोल ताशाच्या उन्मादाला मोठं करण्यात सेल्फीसम्राटांचा आणि DSLR वाल्या उत्साही लोकांचा मोठा वाटा आहे असं वाटत! ते सायलेन्सर ची पुंगळी काढून 'फट फटी' च्या नावाला जागणारे वीर राहिलेच की!

धर्मराजमुटके Fri, 03/08/2019 - 13:54
शिवाजी जन्माला यावा तो दुसर्‍या घरात असे उगाच म्हणत नाहीत. दुसरा कोणी बदल घडवील अशा भ्रमात राहिलो तर काहीच होत नाही. मग काय करायचे ? खालील पर्यायापैकी कोणता योग्य वाटतो ? १. बघताय काय सामील व्हा ! म्हणत आपण त्यातलेच एक होऊन जायचे मग द्वैत उरत नाही आणि त्रास ही होत नाही. २. चिडचीड करत रक्त आटवायचं ? जगाचे कसे भले होणार म्हनत रात्रंदिवस झुरत बसायचं आणि स्वतःला त्रास करुन घ्यायचा ? ३. ठार दुर्लक्ष करायचं ! दु...र्ल.... क्ष........... कोणीही कितीही ढ्याण्डटंड्याण करत असलं तरी त्या च्या बाजूने जाताना मोबाईल मधे विनाकारण बोटं घालतं स्वत:शीच हसत राहायचं.नाहीतर मस्त एखादं पुस्तक घेऊन लक्षपुर्वक वाचतोय अस नाटक करत तिथे थांबायचं ! कार्यकर्त्यांना भाव नाही दिला तर त्यांचा अर्धा आवेश कमी होतो. ४. नाहितर मिपाच्या एक्स मालककांच्या भाषेत सांगायचं तर चपला घालून चालू पडायचं !