डिस्क्लेमर ०: (काही प्रतिसाद वाचून या लेखाबद्द्ल खुलासा करण्यासाठी हा डिस्क्लेमर टाकण्यात आलेला आहे)
हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा. 'बंडखोर मिपा संपादकीय' ही पार्श्वभूमी केवळ विनोदनिर्मीतीसाठी वापरली आहे.
डिस्क्लेमर १: येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेख काल्पनिक वाटल्यास त्यास लेखक जबाबदार नाही.
या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे. गेले काही दिवस मिपावर सायलेंट-मोडमध्ये वावरताना जे अभ्यासपूर्ण विश्लेषण आम्ही केले ते आपणासमोर मांडताना (बंडखोर) पाहुण्या संपादकाला अत्यानंद होत आहे.
"मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" - असे आमचे प्रामाणिक आणि क्रांतिकारक विधान आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व मराठीबांधवांच्या मराठीप्रेमामुळे आंतरजालावर अनेक मराठी संकेतस्थळे उदयास व नावारूपास आली. याच सं.स्थळांना एकत्रितरित्या आणि ढोबळमानाने मराठी आंतरजाल असे संबोधले जाते. यामध्ये अनेक ब्लॉग्स्, वैयक्तिक सं.स्थळे, वर्तमानपत्रे, साहित्य-संगीताशी संबंधित सं.स्थळे यांचा समावेश होतो. आणि 'ऑनलाईन सोशल नेटवर्क्स्' (ऑ.सो.ने.) च्या निकषांमध्ये बसतील अशी मिपा, मनो*त, उ*क्रम इ. सं.स्थळे आहेत. या मराठी ऑ.सो.ने. चे महत्व आपण आता जाणून घेऊया. ब्लॉग्स्, वैयक्तिक सं.स्थळे, वर्तमानपत्रे इ. आंतरजालावर विखुरलेली आहेत. अनेक ब्लॉग्सवर महिनोन् महिने लेखन होत नाही. आणि उत्कृष्ट लेखन असणारे ब्लॉग्स् सापडणे महाकठीण! काही चांगले ब्लॉगही आहेत, परंतु तिथे चर्चा वगैरे करता येईल अशी नीटशी सुविधा नसते. त्यामुळे या विखुरलेल्या सं.स्थळांवर भरीव असे काही होत नाही. या सर्व सं.स्थळांचे एकीकरण हे म.ऑ.सो.ने.नी केले अहे. चार माणसं एकत्र आली की प्रथम चर्चा सुरु होते. अशा चर्चेसाठी मुबलक जागा ऑ.सो.ने.ने उपलब्ध करून दिली. लोकांना त्यांचे ब्लॉगवरील लिखाण प्रकाशित करण्याकरता अजून एक मंच मिळाला. यातून चांगल्या ब्लॉग्स् चे दुवे वाचकवर्गाला मिळाले. आधीसारखे वाचकांना लेखांकडे जावे न लागता, म.ऑ.सो.ने.द्वारे लेखच वाचकांकडे येऊ लागले. प्रतिसाद पाहून, सोपे तंत्रज्ञान पाहून अनेकांचा धीर चेपला व तेही ब्लॉग्स् काढून लेखन करू लागले. आणि तेच लेख म.ऑ.सो.ने. वरही आले. अशाप्रकारे म.ऑ.सो.नेंनी मराठी आंतरजालाची भरभराट सुरू केली! जसजशी म.ऑ.सो.नेंची संख्या वाढेल तसतशी मराठी आंतरजालाची वाढ अविरत चालूच राहील याबाबत आता कुणाचेही दुमत नसेल. (असले तरी वाचकांच्या मताला महत्व देण्या न देण्याचे अधिकार लेखकाधिन आहेत.)
आता या म.ऑ.सो.नेंचा जीवनक्रम पाहू -
- सुरूवातीला काही (ध्येयवेडे वगैरे) लोक एकत्र येतात (का, त्यांचे ध्येय काय वगैरे प्रश्नांची उत्तरे पुढे मिळतीलच.)
- द्रुपाल, गमभन वापरून एक सं.स्थळ बनवतात
- या स्थापनकर्त्यांचे मित्र या सं.स्थळाचे सदस्य बनतात
- सावकाशीने इतर लोक सदस्यत्व घेतात आणि हळूहळू हे सं.स्थळ बहरू लागते
- लेखांचा पाऊस पडतो आणि प्रतिसांच्या नद्या वाहू लागतात. या नद्या गढूळ होऊ नयेत आणि धोक्याची पातळी ओलांडू नयेत म्हणून मग प्रशासनाची स्थापना होते. संपादक महोदयांची नेमणूक होते.
- आणि मग स्थळाची भरभराट होते. आणि मराठी आंतरजालाला बहर येतो.
परंतु, मराठी आंतरजालच्या भरभराटीसाठी अत्यावश्यक कच्चा माल म्हणजे दुखावले गेलेले लोक होत. (का, कसे इ.च्या उत्तरासाठी वाचत रहा.) भरभराटीस आलेल्या म.ऑ.सो.ने. मध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यातून हा कच्चा माल तयार होतो. अश्याच काही महत्वाच्या कच्च्या मालाच्या कारखान्यांचा आढावा घेऊ..
चर्चासत्रे:
ही कच्च्या मालाची भट्टीच आहे. चार माणसे एकत्र आली की चर्चा सुरू होते परंतु, चार मराठी माणसे एकत्र आली की चर्चा कमी आणि भांडणे (वैचारिक मतभेद असे वाचावे) जास्त होतात. चर्चाविषयही फार गहन असतात जसे की, अवांतर प्रतिसाद आणि संपादकांचा हस्तक्षेप, एकमेकांच्या सह्या चोराव्यात की नाही, अमुकअमुक ठिकाणी पुण्याचा उल्लेख का केला आहे, शुद्धलेखन - शाप की वरदान (हस्त*थुन - शाप की वरदान स्टाईल) इ. अशा चर्चांमध्ये वैचारिक मतभेदांपासून वैयक्तिक मतभेद (एकामेकांना उद्देशून शिवीगाळ) होण्याचा फार संभव असतो. आणि मग यातून अनेक लोक दुखावले जातात.
मित्रमंडळे अर्थात कंपूबाजी:
समविचारी, एकाच ध्येयाने प्रेरित मंडळी एकत्र येऊन कंपू तयार होतो. कंपूंचे वैशिष्ट्य असे की कंपूसदस्यांपैकी कुणाचा लेख आला की ते भरघोस प्रतिसाद पाडतात आणि दुसर्या कुणाचा लेख आलतर हा कंपू त्याला पुरता बेजार करून टाकतो. (आठवा - पुरूषोत्तम, फिरोदियाच्या वेळी केलेली कंपूबाजी). एकटा माणूस असेल तर त्याला सारखेसारखे लक्ष्य केले जाते व तो दुखावला जातो. कधीकधी एकमे़कांविरोधी कंपूही तयार होतात. मग या कंपू-कंपुंच्या कंपूबाजी मधून अजून कच्चामाल तयार होतो.
प्रतिसादाभिलाषी:
दोन-चार वाक्याचे लेख टाकून लोकांना प्रतिसादासाठी आवाहन करणे हा यांचा धंदा. यावरूनच यांची चारचौघांमध्ये टिंगळटवाळी होण्याचा धोका असतो. आणि ते दुखावले जातात.
अजब सरकारचा गजब कारभार:
तसे पाहिले तर प्रशासनाबद्दल कुणालाही आपुलकी नसते. सं.स्थळांवरील प्रशासनालाही हे लागू होते. एखाद्या तापलेल्या ठिकाणी प्रशासनाचे प्रतिनिधी हस्तक्षेप करतात पण त्याने वातावरण अजून तापते. ज्याच्यावर कारवाई झाली त्याला हा अन्याय वाटतो. दुसर्याची बाजू घेतल्यामुळे प्रशासन, स्थळचालक त्या कंपूत सामील असल्याचा संशय येतो आणि पहिला कंपू नाराज होतो.
तसेच वर म्हटल्याप्रमाणे विविध प्रकारे दुखावलेले लोक प्रशासनाकडे जाब मागतात. आणि मग वादावादी, कंपूबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू होऊन वातावरण चिघळते.
तर या अशाप्रकारे दुखावल्या गेलेल्या माणसांपैकी काही स्वाभिमानी (गर्विष्ठ) व बाणेदार (भांडकुदळ) महापुरूष एकत्र येतात आणि एका सं.स्थळाची स्थापना करतात (आठवा - म.ऑ.से.ने.चा जीवनक्रम). जुन्या सं.स्थळाची बदनामी करण्याकरता नवीन स्थळाची स्थापना झाली नाही असे भासवण्यात येते. हळूहळू तेथे इतर सं.स्थळांची बदनामी सुरू होते. नंतर त्याचा जोर कमी होते, पण अधूनमधून अशा चर्चा रंगतात. आणि म.ऑ.से.ने.च्या जीवनक्रमात सांगितल्याप्रमाणे हेही स्थळ बहरू लागते. आणि मराठी आंतरजालाच्या शिरपेचात एक तुरा खोवला जातो! परंतु सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, बाणेदार व स्वाभिमानी माणसांची कमी नसल्यामुळे अनेक माणसे दुखावली जातात आणि एक नवे सं.स्थळ उदयास येते. हे चक्र चालूच राहते. (मराठी आंतरजालाच्या शिरपेचात तुरेच तुरे!).
मुळात लोक येथे का येतात याचा आढावा घेतल्यावर आमच्या हाती काही कारणे लागली.
त्यापैकी महत्वाची अशी -
- माणूस हा एक सामाजिक प्राणी असून मराठी माणूस त्याला अपवाद नाही
- स्वतःचे अप्रकाशित टुकार लेखन प्रकाशित करण्यासाठी
- आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी
- इतरांच्या लेखनाला जळजळीत प्रतिसाद देऊन वातावरण गढूळ करण्याकरता
- कंपूबाजीसाठी
- स्वत: बहिर्जी नाईंकाचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे शत्रूच्या स्थळावर हेरगिरी करण्याकरता
- शत्रूस्थळावर आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावे फेक आयडीज घेऊन शिवीगाळ करण्याकरता
- फेक आयडी काढून आपणच आपल्या टुकार लेखनावर दाद देणारे प्रतिसाद टाकायला
याशिवाय मराठी साहित्यरसास्वाद वगैरे गौण कारणे आहेत.
कारणे काहीही असलीतरी लोक या सं.स्थळांवर अधिकाधिक संख्येने येत आहेत आणि अप्रत्यक्षरित्या मराठी आंतरजाल बहरत आहे.
आपापसातल्या भांडणांमुळे निर्माण होणार्या म.ऑ.सो.ने.मुळे मराठी आंतरजाल कसे वृद्धिंगत होत आहे ते आपण पाहिले. या व्यतिरिक्तही काही तांत्रि़क लाभ होतात.. जसे की शत्रू अनेक आयडीज काढून तुम्हाला हैराण करताना, तुमच्या सिस्टीमचे फुकटात स्ट्रेस-टेस्टींग होते. (अफलातून कॉस्ट-कटींग! टेस्टींग शत्रूला आऊटसोर्स्ड!). शत्रूच्या भितीमुळे स्थळचालकाला त्यांचे स्थळ तांत्रिकदृष्ट्या अभेद्य ठेवावे लागते. एकच लेख विविध स्थळांवर प्रकाशित होत असल्याने मराठी आंतरजालावर आपोआप लोड-बॅलन्सिंग होते इ.
तर या अशा बाणेदार, स्वाभिमानी लोकांमुळे मराठी आंतरजालाची भरभराट होत आहे. म्हणूनच बाणेदार लोकांनी पुढे यायला पाहिजे, यातच मराठी आंतरजालाचा विकास आहे. (इच्छुकांनी पुण्यातील 'बाणेदार मी होणार' या अभ्यासवर्गात दाखल व्हावे.)
डिस्क्लेमर २: हा लेख कुणाचा अपमान करण्याच्या हेतूने लिहिला आहे असे जर कुणाला वाटले तर त्याने खुशाल जाऊन नवे सं.स्थळ बनवावे आणि त्यावर शिवीगाळ सुरू करावी. जमल्यास इतरही लेखन करावे.
बंडखोर पाहुणा संपादक : शक्तिमान
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 10:51 am | घाशीराम कोतवाल १.२
आवडला लेख पण काहि गोष्टी पटल्या नाहीत
मुळात लोक येथे का येतात याचा आढावा घेतल्यावर आमच्या हाती काही कारणे लागली.
त्यापैकी महत्वाची अशी -
माणूस हा एक सामाजिक प्राणी असून मराठी माणूस त्याला अपवाद नाही
सहमत
स्वतःचे अप्रकाशित टुकार लेखन प्रकाशित करण्यासाठी
प्रत्येकाचे लेखण टुकार असते हे तुम्ही कसे म्हनु शकता
आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी
आता तो / ती तिकडे कमवते आहे त्याला तुम्ही काहि करु शकता ते लोक पोट भरण्यासाठी गेलेत मजा करायला नाही
इतरांच्या लेखनाला जळजळीत प्रतिसाद देऊन वातावरण गढूळ करण्याकरता
काही अंशी सहमत आहे
कंपूबाजीसाठी
पटत नाहि हे मनाला बुद्धीला सुद्धा
स्वत: बहिर्जी नाईंकाचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे शत्रूच्या स्थळावर हेरगिरी करण्याकरता
पटल मला हे
शत्रूस्थळावर आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावे फेक आयडीज घेऊन शिवीगाळ करण्याकरता
ईथे अस कोणी करत नाहि हे लक्षात घ्या
फेक आयडी काढून आपणच आपल्या टुकार लेखनावर दाद देणारे प्रतिसाद टाकायला
गैरसमज आहे तुमचा
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
23 Jan 2009 - 1:58 pm | घाटावरचे भट
डिसक्लेमर २ मनावर घेतला की काय राव? तुम्हीच नवीन संस्थळ काढणार आहात असं दिसतंय ;) . लोड काहून घेऊन राहिले भौ?
23 Jan 2009 - 7:16 pm | शक्तिमान
युद्धात, प्रेमात आणि विनोदात सर्वकाही माफ असते असे म्हणतात :)
23 Jan 2009 - 10:54 am | झेल्या
भांडणे (स्पर्धा) आणि विकास हे जनरिक आहे असे वाटते. फक्त संकेतस्थळ निर्मितीतच नव्हे तर इतरही (मोबाईल फोनच्या कंपन्या, मॉल्स, ईलेक्ट्रॉनिक वस्तू इ. इ.) व्यवसायांमध्ये भांडणे-स्पर्धा-विकास हे लागू होईल.
बंडखोरी सर्वत्र आहे.... (अगदी संपादक मंडळात सुद्धा... ;) )
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
23 Jan 2009 - 10:56 am | विसुनाना
हे तर मिपाघराण्याचे अस्सल वारसदार संपादकीय आहे.
तात्यांना सांगितले असते तर येत्या सोमवारी टिळक महाराजांच्या रांकेत जाऊन बसला असतात.
असो. संपादकीय आवडले.
कोणीतरी (नक्की माहित नसले की असे म्हणायचे असते) म्हटलेलेच आहे - युद्धच नव्या संस्कृतींना जन्म देते. ;)
23 Jan 2009 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
संपादकीय आवडलं, अंमळ मौज आली वाचताना आणि विसुनानांचा प्रतिसादही!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
23 Jan 2009 - 10:12 pm | धनंजय
असेच म्हणतो.
मराठी संकेतस्थळांमधील हा नेहमीच्या चर्चेला शक्तिमान यांनी देऊ केलेली अजरामर उपमा होय.
23 Jan 2009 - 10:53 pm | अवलिया
मराठी संकेतस्थळांमधील हा नेहमीच्या चर्चेला शक्तिमान यांनी देऊ केलेली अजरामर उपमा होय.
धनंजय लय फार्मात
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 11:01 am | झेल्या
'बंडखोरी' नावाचे नवे संकेतस्थळ चालू करूया का?
....फक्त बंडखोरांसाठी... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
23 Jan 2009 - 11:07 am | सहज
मराठी आंतरजालावर "स्वाभिमानी व बाणेदार" लोकांची कमी नाही आहे त्यामुळे मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास दिन दुगना रात चौगुना होणारच.नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पोटदुखी.कॉम [अपचन, जळजळ इ ], गैरसमज.कॉम, दु:खभावना.कॉम लवकरच येणार आहे.
लेख चांगला आहे आशिष.
अजुन लिहीत रहा.
पुलेशु.
:-)
23 Jan 2009 - 11:08 am | दशानन
पुलेशु !
हेच म्हणतो !
बाकी तुमचा इतिहास चांगलाच पक्का आहे ;)
23 Jan 2009 - 11:15 am | मराठी_माणूस
आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी
हे फारच पटले
23 Jan 2009 - 11:30 am | अनिल हटेला
बंडखोर संपादकीय आवडेच !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Jan 2009 - 11:40 am | विसोबा खेचर
या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे.
आभारी आहे! नेहमीप्रमाणे येत्या सोमवारी प्रसिद्ध होणारे संपादकीय तीन दिवस आधीच प्रसिद्ध झाले असे वाचकांनी समजावे ही विनंती! :)
गेले काही दिवस मिपावर सायलेंट-मोडमध्ये वावरताना
सायलेन्ट मोडमध्ये असतांनादेखील आपला अभ्यास कौतुकास्पदच आहे! :)
"मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" - असे आमचे प्रामाणिक आणि क्रांतिकारक विधान आहे.
सहमत आहे! :)
परंतु, मराठी आंतरजालच्या भरभराटीसाठी अत्यावश्यक कच्चा माल म्हणजे दुखावले गेलेले लोक होत.
हा हा हा! खरं आहे! :)
शक्तिमानराव,
आपण खरोखरच शक्तिमान आहात! संपूर्ण लेखच जबरा झाला आहे! आम्ही याला लेख ऑफ द इयर अशी दाद देतो..!
आपला,
(एक नंबरचा कंपूबाज असलेला एका मराठी संस्थळाचा मालक) तात्या.
23 Jan 2009 - 7:26 pm | शक्तिमान
कसचं कसचं!
लेख ऑफ द ईयर, संपादकीय वगैरे गोष्टींसाठी आम्ही अजून लहान आहोत तात्या!
आपल्या या दादेबद्दल आभार!
23 Jan 2009 - 1:49 pm | मॅन्ड्रेक
लेख छान आहे .
पण जौ द्या.
आपण मिसळ खाऊ .
जै हो.
23 Jan 2009 - 4:13 pm | अवलिया
लेख छान आहे
बाकी तुमचा इतिहास चांगलाच पक्का आहे हे नक्की
पु ले शु
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 5:13 pm | लिखाळ
लेख छान आहे :)
तुम्ही अनेकांना टपल्या मारल्याने तुम्ही आपोआपच नि:पक्षपाती आणि प्रतिभावान ठरलात किंवा तसे सिद्ध केलेत. (तपासा निरनिराळ्या संस्थळांचा इतिहास. तसेच जाताजाता पुणेकरांना टपली मारल्यामुळे तुमचा बाणेदारपणा सुद्धा सिद्ध झाला. (ह.घ्या्ए सां न लगे ) :)
कंसात वाक्ये टाकून पुढे वाचण्यास उद्युक्त करण्याची शैली मस्त :)
-- लिखाळ.
हा .. म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग वाचलात तर ! :)
-- लिखाळ.
खरेतर मला दर्जेदार लेखक बनायचे होते. पण अवांतर आणि फुटकळ प्रतिसादच देत बसलो.
23 Jan 2009 - 5:32 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
एकमेकांच्या सह्या चोराव्यात की नाही, अमुकअमुक ठिकाणी पुण्याचा उल्लेख का केला आहे
हे वाक्य अमुक्-अमुक शहर म्हणून करता आला असता...(ह्.घ्या.)
लेख बाकी उत्तम...
सुहास..
अवा॑तर:एखादा शब्द "पुण्याविषयी"लिहीला की लेख प्रसिध्द होतो का (ह.घ्या)
23 Jan 2009 - 7:56 pm | विकास
बंडखोर अग्रलेख चांगला आहे. मात्र बंडखोर व्यक्ती फेक आयडीज ने असे कसे लिहीते त्यामुळे बंड हे बंड वाटत नाही. असो.
सर्वप्रथम एक डिसक्लेमर हवा ;)
ह्या संपादकीयाचा आणि येथील "विकास" या नावाच्या सदस्याचा काही संबंध नाही. असलाच तर तो योगायोग समजावा (प्रतिसाद देणारा हा "विकास" त्याला एक भोग समजेल) :-)
असे लिहायचे कारण खालील शिर्षक आणि वाक्यात दडले आहे -
तसेच अजून एक आक्षेपार्ह विधान आढळले:
इच्छुकांनी पुण्यातील 'बाणेदार मी होणार' या अभ्यासवर्गात दाखल व्हावे.
या विधानाचा गर्भितार्थ असा होतो की पुणेकरांना बाणेदार होण्यासाठी अभ्यासवर्गात जावे लागते. अशी वाक्ये कारण नसताना अस्मिता दुखवून अजून एखाद्या संकेतस्थळाला जन्म देऊ शकतात. म्हणजे परत तेथे जा, आयडी घ्या, लिहा, वाद घाला, विकास (मी नाही) करा आणि परत नवीन संकेतस्थळ तयार करा...
आता आपले डिसक्लेमर ० आणि १ वाचले तर काय समजते?
डि. ० :- हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा.
डि. १ :- येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात आपल्या लेखी "सत्य हा एक विनोद" आहे असा होवू शकतो. आपल्याला माहीत असेलच की, रामदासांनी म्हणलेच आहे की "टवाळा आवडे विनोद". म्हणजे एकत्रीत अर्थ असा होतो की "सत्य हे टवाळांचे" असते. आता विचार करा, येथील गांधीवादी, हे संकेतस्थळ इतर नव्याने विकसीत झालेल्या संकेतस्थळाप्रमाणे मजेशीर अथवा विरंगुळा म्हणून घेत नाहीत हे आपल्याला येथील चर्चा/लेख वाचून माहीत असेलच. त्यामुळे, अशा डिसक्लेमरच्या विधानांनी गांधीवादींना नकळत दुखवले जाऊ शकते. असो.
23 Jan 2009 - 8:09 pm | मुक्तसुनीत
लेख आवडला. या बाबतीत "द्वंद्वात्मक भौतिकवादाचे " ( शुद्ध मराठीत "डायालेक्टीक मटेरिलिझम") च्या नियमांची आठवण होणे अपरिहार्य आहे.
प्रस्तुत लेखातले प्रमुख वाक्य आहे : "मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" , जे "द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या" सूत्राचेच एक उदाहरण आहे असे मला वाटले. काय आहे हे सूत्र ? ते सूत्र असे आहे की, कुठल्याही गोष्टीबद्दल वाद आणि प्रतिवाद यांच्या , अनेक काल चाललेल्या लढाईतूनच नवीन गोष्ट अस्तित्वात येते. थोडक्यात , सामूहिक इतिहासात कुठल्याही नवीन बदलाचे स्पष्टीकरण या एका सूत्राने करता येते (असे हे शास्त्र म्हणते). कुठल्याही जड गोष्टीला लागू होतील असे हे नियम समूहाला , समूहाच्या वर्तनाला लागू केले की त्या त्या समूहाचा इतिहास आपल्याला समजावून घेता येतो.
तर मग काय आहेत या "द्वंद्वात्मक भौतिकवादाचे " नियम ?
१. "परस्पर विरोधाचे तत्त्व" : कुठल्याही गोष्टीचे अस्तित्त्व हे परस्परविरोधी घटकांच्या मीलनाचा परिणाम असतो. भौतिक जगतात याची उदाहरणे द्यायची तर पॉझिटिव्ह्-नेगेटीव्ह वगैरे वगैरे अनेकानेक देता येतील. हा नियम समूहाला लागू केला की , परस्परविरोधी मतांचे गट असे त्याचे रूप दिसते. या विरोधामुळेच समूहात खळबळ , हालचाल निर्माण होते.
२. "स्वतःची घट करण्याचे तत्त्व " : याचा अर्थ असा की , एखाद्या समूहातला एखादा घटक विरोधी गोष्टीचा समजला जातो. या विरोधामुळेच समूहात खळबळ , हालचाल निर्माण होते. तर या सगळ्या खळबळीचा परिणाम तो घटक कमजोर होण्यात होतो. म्हणजे असे की , जर एखादा घटक विरोध करत असेल , त्या विरोधाने जर समूहात खूप खळबळ माजत असेल , तर त्याचा एक परिणाम म्हणजे , खळबळ माजवणाअर्या गटाचे खच्चीकरण होणे असाही होतो. थोडक्यात , जोषात तरवारी फिरवताना , ती तलवार अपरिहार्यपणे स्वतःला जखमी करतेच.
३. "निर्णायक बदलाचे तत्त्व " : आणि अशा , शक्तीने , संख्येने छोटेछोट्या असणार्या अनेक खळबळी , हालचाली यांचे रूपांतर एका निर्णायक क्षणी एका निर्णायक बदलामधे होते. (quantitative developments lead to qualitative change)
वर उल्लेख केलेल्या सूत्रांचा उपयोग अर्थातच मार्क्सिस्ट विचारसरणीत झालेला आहे. (किंबहुना , त्याचा उगम तिथलाच. ) पण , उत्क्रांतीवाद , इतकेच काय तर शेअर बाजारातील भावभावना (मार्केट सेंटीमेंट) समजावून घेताना सुद्धा काही अभासकानि याचा उपयोग केला आहे.
हीच सूत्रे आपल्या मराठी आंतरजालाला (कळत नकळत ) लावून हा लेख बनला असे एका अर्थाने म्हणता येईल.
23 Jan 2009 - 10:52 pm | अवलिया
हे सगळे मराठित लिहाल का?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 11:43 pm | मुक्तसुनीत
हे सगळे मराठित लिहाल का?
हाहा =))
23 Jan 2009 - 8:30 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
या विधानाचा गर्भितार्थ असा होतो की पुणेकरांना बाणेदार होण्यासाठी अभ्यासवर्गात जावे लागते. अशी वाक्ये कारण नसताना अस्मिता दुखवून अजून एखाद्या संकेतस्थळाला जन्म देऊ शकतात.
हे मात्र खर ...जे ते पुण्याच्या मागे का ...ईतका छान लेख पण.....
इच्छुकांनी पुण्यातील 'बाणेदार मी होणार' या अभ्यासवर्गात दाखल व्हावे.
अशी वाक्ये का ???
23 Jan 2009 - 9:02 pm | प्राजु
मराठी आंतरजालाचे इतिहासकार म्हणावे लागेल तुम्हाला.
लेख अंमळ गमतीदार झाला आहे.
(आवांतर : बाय द वे, शक्तिमान खेरीज तुमचे आणखी किती फेक आयडीज आहेत हो?) ह. घ्या. :)
- (प्राजु आणि बिनडोक बनी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jan 2009 - 9:12 pm | कोलबेर
:O हे नविनच आहे!!
विकेड बनी पण तुम्हीच काय मग?
23 Jan 2009 - 9:18 pm | मुक्तसुनीत
अनिरुद्ध अभ्यंकर आणि केशवसुमार
आनंदयात्री आणि केशवटुकार
हेआयडीद्वयसुद्धा (प्रत्येकी ) एकाच व्यक्तिंचे आय्डीज आहेत. (सामान्य ज्ञान.)
कळावे
(मुक्तसुनीत आणि मुक्तसुनीत हे आयडीज असणारा.)
23 Jan 2009 - 9:21 pm | कोलबेर
जसेकी 'विसोबा खेचर' आणि 'आणिबाणीचा शासनकर्ता' आणि 'सरपंच 'आणि ..... जे सगळे एकाच व्यक्तिचे आयडीज आहेत.
पण बनी म्हणजे प्राजुताई हे माहित नव्हते.
सामन्य ज्ञान कच्चे म्हणा झालं!
23 Jan 2009 - 10:51 pm | अवलिया
बापरे... रोज काहीतरी नवीनच माहिती कळते
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 11:49 pm | प्राजु
मी बिनडोक असू शकते पण विकेड नाही हो..
आणि बिनडोक बनीच्या ख व मध्ये प्राजु च्या पानाची लिंक आहे. इतकं साधं सोप्पं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jan 2009 - 11:00 pm | सर्किट (not verified)
श्री. शक्तिमान ह्यांचा मराठी आंतरजालाचा अभ्यास, व्यासंग, आणि योग्य निष्कर्षाला येण्याचा गुण बघता, आता अस्मादिकांना निवृत्ती घेण्यास काहीही प्रत्यवाय नसावा.
उत्कृष्ट संपादकीय.
-- सर्किट
23 Jan 2009 - 11:04 pm | अवलिया
सर्केश्वर ... खरे तर हा लेख वाचल्यावर आम्हाला वेगळाच संशय आला होता.
आपला प्रतिसाद पाहुन तो संशय फिटला. असो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 11:07 pm | सर्किट (not verified)
छ्या ! अहो, आम्ही कसले शक्तिमान ?
("शक्तिपाताची विविध कारणे" अस विप्रंचा आगामी अग्रलेख वाचा.)
-- सर्किट
23 Jan 2009 - 11:09 pm | अवलिया
छे छे -- मी समजलो होतो तुम्ही आधीच निवृत्त झालात...
पण तुम्ही आताशी निवृत्तीची (फक्त) भाषा सुरु केली हे वाचुन बरे वाटले.
बाकी तुम्ही शक्तिमान नाहीत ह्या खुलाशाची तशी आवश्यकता (निदान आम्हाला) नव्हती ...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 11:21 pm | बेसनलाडू
आवडला.
(ऐतिहासिक)बेसनलाडू