दिनांक : ०१-०७-२०१४
"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा
शब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहाच्या दुसर्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी, सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.
या प्रसंगी तीन नवीन पुस्तकांचे व २ पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
१. माझी गझल निराळी (दुसरी आवृत्ती) – गंगाधर मुटे
२. घरी रोज करायचे व्यायाम (तिसरी आवृत्ती) – अनिल बर्वे
३. तरंग मनाचे – रवींद्र कामठे
४. काचखड्यांची नक्षी – प्राजक्ता पटवर्धन
५. Your Daily Execerise at Home – अनिल बर्वे / प्रसन्न केसकर
या प्रसंगी मी व्यक्त केलेल्या मनोगताचा संक्षिप्त सारांश :
आतापर्यंत माझी तीन पुस्तके प्रकाशित झालीत. नोव्हेंबर २०१० मध्ये माझा पहिलावाहिला काव्यसंग्रह “रानमेवा” प्रकाशित झाला. जुलै २०१२ मध्ये “वांगे अमर रहे” हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये “माझी गझल निराळी” हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. या तीनही पुस्तकांना वाचकांची पसंती आणि भरभरून प्रेम मिळाले असले तरी चारच महिन्यात हातोहात पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सोनेरी दिवस मात्र माझ्या आयुष्यात “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहानेच आणला त्याबद्दल मी वाचकांना अभिवादन करतो.
माझी गझल खूपच लोकप्रिय आहे किंवा मी खूप विकला जाणारा गझलकार आहे म्हणून इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागली असे मी समजत नाही. धडाडीची वृत्ती आणि मार्केटिंग कौशल्य असलेला राज जैन/निवेदिता जैन यांच्यासारखा प्रकाशक मला मिळाला, त्यामुळेच इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सन्मान “माझी गझल निराळी”ला मिळाला त्याचे सर्व श्रेय राज जैन/निवेदिता जैन या प्रकाशकव्दयांनाच जाते, म्हणून मी त्यांनाही अभिवादन करतो.
माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असली तरी मी आजही स्वतः:ला साहित्यिक वगैरे मानत नाही आणि साहित्यात भर घालण्यासाठी मी माझी लेखनीही झिजवत नाही. मी जे जगतो तेच लिहितो. कल्पनाविलासात रमून भावविश्वाचे आभासी मनोरे रचने, हा माझा प्रांत नाही. शेती केली, शेतीमधली गरिबी जवळून न्याहाळली, देशाच्या दूरवर कानाकोपर्यात फिरल्यानंतर जे वास्तव दिसलं तेच माझ्यासाठी ब्रह्मज्ञान ठरलं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही जा, शेतीमध्ये सर्वत्र कॉमन आढळणारी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे गरिबी. शेतीमध्ये हमखास पिकणारं पीक म्हणजे शेतीवर कर्जाचा डोंगर आणि दरिद्री.
देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!
झिजतात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी
सांगा कशी फुलावी, तोर्यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी
गेल्या १५-२० वर्षांमध्ये ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे, यापलीकडे साहित्याला काही लिहिताच आले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक. मी शाळेत शिकत असताना मी गावाच्या भकासपणाचे कारण शोधत होतो, एकही पुस्तक मला योग्य व समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही, त्यामुळे मराठी साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही.
खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडोने पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; शेतकर्यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? आणि जर हे खरे असेल तर साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे असे म्हणण्याला अर्थच काय उरतो? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला लाजिरवाणीच म्हटली पाहिजे. त्यामुळे माफ करा; मी साहित्यक्षेत्राकडे फारफार आदराने पाहू शकत नाही.
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे वगैरे. मी वयाच्या ४७ व्या लिहायला लागलो. मी हातात लेखणी धरण्यामागची प्रेरणा अशी की मी एक दिवस विचार केला. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रस्त्यावर उतरून लढलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आम्ही, बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आम्ही.
अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. द्सर्याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर आपण हातात नांगराऐवजी लेखनी धरायलाच हवी, या स्वयंप्रेरणेने मी लिहायला सुरुवात केली. लिहायला लागलो, वाचकांना आवडायला लागलं, प्रबोधनाचा यज्ञ सफल व्हायला लागला की ऊर्मी आणि मस्तीचा आपोआपच अंगात संचार व्हायला लागतो.
माझ्या गझलांवर प्रेम करणार्या समस्त रसिकांचे मी आभार मानतो आणि त्यांना एवढेच सांगू इच्छितो की,
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
1 Jul 2014 - 10:13 pm | आयुर्हित
१०१% खरे आहे आपले.
"माझी गझल निराळी"या गझलसंग्रहाच्या दुसर्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याबद्दल साहित्यिक श्री गंगाधर मुटेजी, अभिनंदन.
आता आपला हा गझलसंग्रह सर्व गरिब शेतकर्यांना मोफत वाटुन २६ लवासा कसे लवकरात लवकर होतील याची व्यवस्था झालेली आहे, हे आमच्यासारख्या गरिब व शेतकरी श्री गंगाधर मुटे यांना लक्षात यावा.
एक दुरुस्ती सुचवितो.
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-कट्या
करतील "लवासा" मागून चालणारे
2 Jul 2014 - 2:35 am | गंगाधर मुटे
तुम्ही कसे काय गरिब? कुणामुळे गरिब? तुमच्या गरिबीला कारणीभूत तुम्हीच कि अन्य कोणी?
खुलासा कळेल काय?
2 Jul 2014 - 2:39 am | गंगाधर मुटे
लवासाचा या पोस्टशी काय संबंध आहे, ते कळले नाही.
16 Sep 2014 - 10:00 pm | गंगाधर मुटे
* * * *
दिनांक : १६-०९-२०१४
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
गझलसंग्रह : माझी गझल निराळी
गझलकार : गंगाधर मुटे
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे
पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.
माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------