............ ते कोण आहेत माझे ?............ काय नातं आहे त्यांच्यात आणि माझ्यात?.......रक्ताचं तर नाहीच नाही....पण बाकी?..... काका ....मामा .... खरं सांगू? मला तर आज हे लिहिताना सुद्धा समजत नाहीये कि त्यांना काय नाव देऊ !.....
"दीपक भा"..... त्याना ओळखणारे सगळेजण त्यांना याच नावाने ओळखत ....मीही तेच म्हणते....
..... कधी कधी टिपूर चांदण पडतं ..... रात्रीच्या जेवणा नंतर सहज चांदण्यात थोडसं फिरून यावसं वाटत..... बाहेर पडते .... कोपऱ्यापर्यंत जाता जाता सवयीप्रमाणे आकाशाकडे नजर जाते..... चंद्रकोर अतिशय मोहक दिसत असते... मधेच एखादा हलकासा ढग तिच्यावरून हळूच सरकत सरकत निघून जातो... हलकीशी पुसट होता होता ढग बाजूला झाल्यावर ती आणखीनच ताजीतवानी होते... हे मनभर साठवून घेताना एकदम एक आवाज आठवतो..." जाई,......चंद्र पाहिलास आज?....... पटकन बाहेर जा आणि पहा!" दीपक भांचा तो अवेळी आलेला फोन...त्यांचा आवाज...तसाच्या तसा आठवतो मला..!
......... शरदातल चांदण असो ..पौर्णिमेचा शुभ्र चंद्र असो...गेट वरच्या जाईचा फुलताना येणारा सुगंध असो....... किंवा दुरून वाऱ्याच्या झुळूके बरोबर दरवळत येणारी रातराणी असो.... दीपक भा माझ्याबरोबर असतातच... हे सार अनुभवण्याच सुख त्यांनीच तर बहाल केलंय मला....
..... मी साधारण ७ वी - ८ वीत असेन तेंव्हापासून मी त्यांना ओळखते ..... पुस्तकं....गाणी ......कविता...आयुष्य सुंदर बनवणाऱ्या या साऱ्या गोष्टींची ओळख त्यांनीच करून दिली... आयुष्यातले शक्य तितके क्षण .... समरसून जगण्याची समज हे ही असंच त्यांच्या कडून मिळालेलं देण आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असते कि जिथे वय,नातं ,लहानमोठेपणा,संकोच ,भीड या गोष्टीची तमा बाळगायची गरज नसते..आपण कोणत्याही विषयावर ... कधीही काहीही बोलू शकतो...आपल्याला हवे तसे 'व्यक्त' होऊ शकतो... ! आपण आहोत तसे.......गुण दोषांसकट ... कोणताही स्वार्थ, किंतु परंतु मध्ये न "स्वीकारले" जाऊ ही खात्री असते...कोणताही आडपडदा न ठेवता आपण बोलू शकतो....मन रिकाम करू शकतो.....एखाद्या पोरकट जोकवर पोट दुखेपर्यंत हसू शकतो.......कधी कधी मनातले भाव निश:ब्द करत त्याच्यासमोर शांत बसून राहू शकतो....आणि कधी कधी दाटून येणाऱ्या हुंदक्यांना मुक्तपणे वाट करून देऊ शकतो. ती व्यक्ती.....ते नातं म्हणजे "मैत्र"...
'मैत्र' शोधावा लागत नाही.....बनवावा लागत नाही ....तो घडतो....it just happens to you..!
माझ्यासाठी हे अतिशय सुंदर.....गाढ....निखळ....जिवंत नातं म्हणजे दीपक भा ..माझा मित्र...
..... माझा हा पन्नाशीच्या घरातला मित्र दोन वर्षापूर्वी जग सोडून निघून गेला...अतिशय अनपेक्षित ह्रदयविकाराच्या झटक्याने आम्हा सर्वाना तो दुरावला ..
...... पण माझ्यासाठी....माझ्यासाठी ते कधीच 'गेले' नाहीयेत....ते आहेत....आसपास... त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये....त्या हस्ताक्षरामध्ये ..... त्यांनीच दिलेल्या पुस्तकांमध्ये.
...इतकंच सांगायचं आहे..
दीपक भा,
......... तुमच्याशी मारलेल्या उशिरापर्यंत च्या गप्पा...... strong कॉफी......सोबत पारायण केलेला "इजाजत".....तुमच्याकडून ऐकलेले गुलजार आणि साहीर.... कतरा कतरा आणि मेरा कुछ सामान.....असंख्य आठवणींमध्ये तुम्ही सतत भेटत राहता. अजूनही बऱ्याचदा तुमचा नंबर हि डायल करते...असंच गम्मत म्हणून...! माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे सांगण्यासाठी मला एका खास दिवसाची वगैरे गरज नाहीये...तरीही आज सांगते " you are the greatest and closest friend ever happened to me....happy friendship!......एक मैत्र.......आयुष्यभरासाठी!
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 7:58 am | बहुगुणी
म्हणजे तुम्ही काढलेली आठवणही त्यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचली असणार!
मुक्तक आवडलं. आपण अशी मैत्र जपावीत, जोपासावीत, आणि एक काही कारणामुळे संपेल तिथे आपणही असंच कुणाचं मैत्र बनून दुसरं सुरू करावं.
1 Aug 2010 - 8:25 am | प्रकाश घाटपांडे
कधी हे नात पान, झाड, फुले ,दगड ,धोंडे, प्राणी अगदी सृष्टीतला कशाशीही असु शकत . अनिल अवचटांचे सृष्टीत गोष्टीत हे पुस्तक अगदी हा मैत्र उलगडुन सांगते.
अवांतर- जेव्हा आपण असा मैत्र मान्य करतो त्यावेळी शैत्र देखील अस्तित्वात असतो.उपयुक्तता व उपद्रव मुल्यांच्या बदलत्या छटा या नात्यांचे रंग कसे सरड्यासारखे बदलतो हे देखील बघण्यासारखे असते.
अतिअवांतर- जालीय जगात देखील हे रंग दिसतात
1 Aug 2010 - 10:44 am | जाई अस्सल कोल्हापुरी
...मैत्र्...कोणत्याहि स्वरुपात अनुभवास येउ शकत....
..... यावरुन एक आठवलं...
" बे यारो मददगार हि काटा था सारा दिन (बे यारो मददगार : मित्रांविना,सहकार्यांविना)
कुछ खुद से अजनबी सा, कुछ तन्हा उदास सा
साहिल पे दिन बुझा के मैं लौट आया फिर वहीं
सुनसान सी सडक के इस खाली मकान में
दरवाजा खोलते ही मेज पर किताब ने
हल्के से फडफडा के कहा---
"बडी देर कर दी दोस्त......!"
...:पुखराज
...: गुलजार
... गुलजार नी उलगडलेला.....पुस्तकाचा "मैत्र"
1 Aug 2010 - 4:22 pm | मराठमोळा
पका काकांशी सहमत!!!! :)
1 Aug 2010 - 8:57 am | स्पंदना
भावना पोहोचल्या.
'मैत्र' या नात्याला साधारण समाजान ठरवलेला साचा कधीच लागु नाही होत.
आपल्या वयाचे असावेत, आपल्या स्तराचे असावेत वा पुरुष स्त्री हा भेद लक्षात ठेवुन मैत्री करावी , या सगळ्याच्या पलिकडुन जी साद येते ती 'मैत्र'
1 Aug 2010 - 10:38 am | क्रान्ति
सुरेख लिहिलंय!
1 Aug 2010 - 11:28 am | भारतीय
"प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असते कि जिथे वय,नातं ,लहानमोठेपणा,संकोच ,भीड या गोष्टीची तमा बाळगायची गरज नसते..आपण कोणत्याही विषयावर ... कधीही काहीही बोलू शकतो...आपल्याला हवे तसे 'व्यक्त' होऊ शकतो... ! आपण आहोत तसे.......गुण दोषांसकट ... कोणताही स्वार्थ, किंतु परंतु मध्ये न "स्वीकारले" जाऊ ही खात्री असते...कोणताही आडपडदा न ठेवता आपण बोलू शकतो....मन रिकाम करू शकतो.....एखाद्या पोरकट जोकवर पोट दुखेपर्यंत हसू शकतो.......कधी कधी मनातले भाव निश:ब्द करत त्याच्यासमोर शांत बसून राहू शकतो....आणि कधी कधी दाटून येणाऱ्या हुंदक्यांना मुक्तपणे वाट करून देऊ शकतो. ती व्यक्ती.....ते नातं म्हणजे "मैत्र"..."
..................... जाईबाई या ओळी भिडल्या थेट.. मैत्रीची ईतकी चांगली व्याख्या अजून असुच शकत नाही... खरं सांगायच तर 'दिपक भा' नाही भिडले मनाला.. भिडले ते तुम्हा दोघांतील मैत्र.. असं मैत्र अनुभवायला नशीब लागतं...
1 Aug 2010 - 1:26 pm | अवलिया
सुरेख लेखन !!
1 Aug 2010 - 1:30 pm | बिपिन कार्यकर्ते
छान लेखन... उत्कट नात्याचे उत्कट चित्रण. छानच. पण तुमच्याही कीबोर्डावरचे '.' चे बटण निकामी करावे लागेल असे दिसते आहे. वाचायला त्रास होतो हो...
1 Aug 2010 - 1:43 pm | गोगोल
पण मग मी मनाची समजूत घातली की कदाचित यांनी ३-४ बियर्स "ओढूनच" हा लेख लिहिला असेल.
1 Aug 2010 - 2:27 pm | मेघवेडा
अगदी असेच म्हणतो. :)
1 Aug 2010 - 2:53 pm | Nile
+१.
1 Aug 2010 - 2:37 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
काय आहे ना.....मला एखाद्या शब्दावर 'जोर' द्यायचा असेल किंवा विशेष अर्थ द्यावासा वाटला कि मी "..." किंवा '...' वापरते..
पण ठिक आहे....मी असे छापले तर चालेल का...... याने इच्छित बोध होतो आहे का?
1 Aug 2010 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते
पटले नाही. पण हा वरचा लेख तुम्ही . काढून लिहा... तेवढाच अर्थवाही होईल, काहीच फरक पडणार नाही.
1 Aug 2010 - 2:42 pm | गोगोल
असे छापले तर ज्यास्त पळेल.
1 Aug 2010 - 1:54 pm | आनंदयात्री
सुरेख शब्दांकन. अतिशय आवडले.
1 Aug 2010 - 4:00 pm | स्वछंदी-पाखरु
सुरेख लेख..... ह्या लेखातून आज मला की "दीपक भा" तुमच्यासाठी काय होते ते सगळे चित्र अगदी समोर दिसले.
ह्या लेखातून तुमची मैत्री अगदी जश्या च्या तश्या समोर आली आहे. फाSSSSरच सुंदर लेख.......
1 Aug 2010 - 5:03 pm | पल्लवीपियुष
प्रत्येका ला त्याच्या एका तरी जवळ च्या मित्रा ची आठवण नक्की येइल......... असा लेख आहे.
जाई तुझ्या कडून "प्रेम" या विषया वर हि कविता किंवा लेख वाचायला आवडेल.
1 Aug 2010 - 5:20 pm | असुर
जाईतै,
सुरेख!
माझेही एक स्नेही, तुमच्या 'दीपक भा' सारखेच! स्साला, अर्धा डाव खेळून कल्टी मारून गेले! आता राहिल्यात त्या आठवणी!
पण मैत्रीला मरण नसतं.. वैवाहिक संबंध ७-७ जन्म टिकतात म्हणे, मैत्री ७७ जन्म टिकत असावी!
उगाचच पियुष मिश्राच्या "मौत अंत है नही, तो मौत से भी क्यो डरे, ये जाकर आसमानो में दहाड दो!" या ओळी आठवून गेल्या!
--असुर