हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून..
शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं!
झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे..
घरी असतो आमच्या गणपती..
सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी..
त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची..
साफ सफाई, सजावट सगळंच..
गणपती आले की एकंदरीत सगळं छान असतं, प्रसन्न वाटतं मग मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, आणि अगदी काही जवळची माणसे☺(ज्यांना इतर वेळी घरी बोलावणं अवघड) यांना आमंत्रने जातात!
लोकं येतात, गप्पा गोष्टी करतात, भेटी होतात, एकमेकांची विचारपूस, चर्चा, आणि बरंच काही!
म्हणजेच एकोपा, सद्भावना टिकून राहावी यासाठी हे सण असतात ते यावरून वाटतं आणि मग ही आपली संस्कृती/परंपरा आहे आणि ती आपणच चालू ठेवायला हवी असंही वाटतं!
आता दुसरीबाजू
काय आहे नेमका गणेशोत्सव? नेमका गणपती कोणता?
लोकप्रिय लालबागचा राजा गणपती की jsb चा सर्वात श्रीमंत असलेला गणपती?
गणेश गल्ली चा सर्वात उंच की पेठेतल्या हलवाईंचा छोटा पण मानाचा असलेला गणपती?
सारसबागेतला निसर्गाच्या सानिध्यात असलेला की धारावी च्या गल्लीत गटारावर table ठेऊन बसवलेला?
जर यातला एक आहे तर बाकीचे काय आहेत?
आणि जर यातलाच कोणीतरी असेल तर मग मी घरी आणतो ते काय आहे?
दिवसेंदिवस हा मोठा (मंडळाची श्रीमंती वाढवणारा) आणि वाढत चाललेला (मंडळांची संख्या वाढवणारा) गणपती जेव्हा जातो तेव्हा काय मागे ठेऊन जातो?
चौपाटी वरची घाण,
मंडपा साठी रस्त्यावर केलेले खड्डे,
झाडांच्या फांद्या कापून तिथे लावलेले banner..
आणि मग जर सगळया सणांचा विचार केला तर बऱ्याच मोठ्या आणि महत्त्वाच्या सणांचे हे होणारे दुष्परिणाम दिसतात!
दिवाळी च्या फटाक्यांपासून दहीहंडी ला होणारे मृत्यू सगळे वाईटच आहेत हे माहीत आहे..
पण दिवाळी ला फराळासाठी एकत्र येणारे गणपतीत दर्शना साठी येणारे दहीहंडी ला नाचणारे सगळे
15 ऑगस्ट / 26 जानेवारी ला झेंडावंदनासाठी,
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावण्यासाठी नाहीत येत एकत्र..!
ते संस्कार झालेच नाहीत..!
काय करू मग सांगा?
नास्तिक म्हणून गणपती वर विश्वास नाही म्हणून बंद करू गणपती बसवायचं?
जर सगळे सण साजरे करायचं थांबवल तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर ल एवढंच राहील ज्याचं कोणाला सोयरसुतक नाही!
आणि मग हा एकोपा ही सद्भावना टिकवायची असेल तर काय करायला हवं?
संस्कृती च्या नावाखाली चालू असलेली अंधश्रद्धा आणि मूर्खपणा चालू द्यायचा की त्यावर टीका करून त्याचा बहिष्कार करुन आपल्या लोकांपासून दूर व्हायचं?
-योगेश कोयले
प्रतिक्रिया
22 Aug 2017 - 2:08 pm | प्रमोद देर्देकर
तुम्हाला संस्कृती कुठे सापडली ते सांगा आधी ?
नाही म्ह ण जे मिपाकर ती बुडाली असं समजत आहेत
22 Aug 2017 - 2:09 pm | मराठी कथालेखक
नास्तिक आहात तर गणपती कशाला बसवताय.
मी तर हेच म्हणेन सगळ्यांना की नास्तिक बना, मजेत रहा.. आणि उगाच शेकड्यांच्या संख्येने एकत्र येवून सण/उत्सव साजरा करण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनापासून जवळचे वाटतात ते मित्र, नातेवाईक यांना भेटत रहा, त्यांच्या सुखदु:खात सामील व्हा. . .
22 Aug 2017 - 4:15 pm | पगला गजोधर
दुजोरा १+
22 Aug 2017 - 2:16 pm | अत्रे
तुम्ही-आम्ही कोण चालवू देणारे?
आपल्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्यात सहभाग घेऊ नये, आपल्या घरापुरते त्याचे अनुचरण करावे. मित्रमंडळीत विषय निघाला की आपले मत नम्रपणे मांडावे. कोणालाही हिणवू नये. खूप त्रास होत असल्यास समविचारी लोकांना एकत्र आणून पोलीस कम्प्लेंट कराव्यात, कोर्टात जावे. मग आपले अनुभव लोकांना सांगावेत.
22 Aug 2017 - 2:21 pm | अमरेंद्र बाहुबली
होना हो! गणपतीत प्रदुषनाचा! दहीहंडीत मृत्युचा! होळीत पाणी अपव्यायाचा! दिवाळीत प्रदुषणाचा! फक्त हिंदूंच्या सणांचा कसा त्रास होतो हो तुम्हाला? ईद ला ईतके जनावरं मारले जातात. त्याचा का नाही होत त्रास??
22 Aug 2017 - 2:21 pm | मराठी_माणूस
तुम्ही घरातला खाजगी गणपती आणि सार्वजनीक गणपती ह्यांची तुलना केलेली आहे जी चुकीची आहे.
22 Aug 2017 - 2:32 pm | हतोळकरांचा प्रसाद
हेच म्हणायचं होतं! बाहेरच्या सार्वजनिक गणपतीमंडळांचं राजकरण बघून घरचा गणपती बंद करण्याचा संबंध कळला नाही. हे म्हणजे हॉटेलात फिरनी आवडली नाही म्हणून घराची खीर खाणे बंद केल्यासारखे आहे ना!
22 Aug 2017 - 3:03 pm | पुंबा
मस्त व्यक्त झालायस मित्रा.. माझ्या मते, जे हिडिस रूप सार्याच सार्वजनिक उत्सवांना आलंय त्यात सकारात्मक बदल घडवून आणने कठीण आहे. वर्गणी नावाची खंडणी, ट्रॅफिकची जितकी वाट लावू शकेल त्यावरून मंडळाची इभ्रत जोखली जाणं, डॉल्बी नावाचा वृद्ध, विद्यार्थी आणि लहान मुलं यांच्यावरचा अत्याचार, गणपती मंडळांची दादागिरी, ती गर्दी ह्या सगळ्याचा उबग आलाय. मात्र आपण हे रोखू शकत नाही, लोकांना देखिल हे हवं आहे तेव्हा आपण अंतर राखायचं. आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.
22 Aug 2017 - 3:24 pm | योगेश कोयले
माझं म्हणणं तुमच्या पर्यंत नेमकं पोचलं!
22 Aug 2017 - 3:28 pm | अत्रे
थोडे अवांतर - एक मिपिय निरीक्षण- कोणी एखाद्या मिपा लेखकाची थोडी प्रशंसा केली की लगेच लेखकाला आपण लिहिलेले या एकट्यालाच कळाले आहे असा साक्षात्कार होतो. (पर्सनली घेऊ नका, हलके घ्या :)
22 Aug 2017 - 3:42 pm | योगेश कोयले
मुळात प्रशंसा व्हावी यासाठी हे लिहिलेलाच नाही माझं द्वंद्व संपावं म्हणून.. आणि मी लिहिलेल्या गोष्टींशी साधर्म्य असलेल्या बाबींवर त्यांनी पुढे लेखन केले आहे त्यामुळे मला तसे वाटणे सहाजिक आहे!
22 Aug 2017 - 5:32 pm | हतोळकरांचा प्रसाद
गणपती उत्सवाबाबत बाहेर असलेल्या परिस्थतीला आपण कसे कारणीभूत आहोत? किंवा आपल्यातील बदल ह्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणू शकतो? लेखक बाहेरील परिस्थितीला कंटाळून घरातील गणपती बंद करू का असे विचारात आहेत? या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का? तुमच्या घरात गणपती बसवायचा कि नाही हा तुमच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे, बाहेरच्यांच्या विशिष्ट श्रद्धेचा नाही. लेखकांचा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर तुम्ही तो स्पष्ट कराल काय (गणपती मंडळे अति करत आहेत हे सोडून, ते सगळ्यांना मान्य आहे असे मला वाटते)?
22 Aug 2017 - 6:30 pm | पुंबा
हे माझे मत आहे.
घरगुती गणपती आणि सार्वजनिक धुडगुस यात फरक आहे. घरगुती गणेशोत्सव करणे न करणे वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे धागाकर्त्याच्या. त्यांना जे मानसिक द्वंद्व वाटते(घरात गणपती बसवावा/ सहभाग घ्यावा कि न घ्यावा वगैरे) त्याबद्दल सल्ला हाच..
बाकी, सार्वजनिक उत्सवांचे हिडिस रूप पाहून वैयक्तिक श्रद्धेबद्दल देखिल अविश्वास निर्माण झाला आहे ते अयोग्य आहे असे वाटत नाही. बाहेर श्रद्धेच्या नावावर चालणारा अनाचार पाहून सश्रद्धालादेखिल उबग येऊ शकतो.
आता ह्याबद्दल..
या परिस्थितीत बदल घडवून आणने आपल्याला शक्य नाही असेच वाटते. वैयक्तिक बदल म्हणजे आपल्या वैयक्तिक श्रद्धेमुळे इतरांना त्रास होऊ न देणे हि काळजी घेणे. या बदलांमुळे बाहेरची परिस्थिती सुधारेल असे नाही.
22 Aug 2017 - 6:24 pm | खग्या
देव म्हणजे काय या प्रश्नांच उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य खर्च केल्याचं आपण वाचत आलो. पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी आधी देव असतो असा विश्वास असणं गरजेचं आहे. पण देव नक्की असतो का? देवाची गरज आहे का? देव असला तर नक्की काय काम करतो या सारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मला अजून मिळाली नाहीत. मग मीच चिंतन करून स्वतःपुरती स्वतःची उत्तर शोधून काढली. तीच खाली देत आहे. आपले विचार ऐकून ती उत्तर अधिक प्रगल्भ करायला मला आवडेल.
देव नक्की असतो का?
हो देव असतो. कुठे असतो ते माहित नाही आणि कुठेही असला तरी फरक पडत नाही. देव हा राष्ट्रपतींसारखा असतो. तो सत्ता चालवत नाही. तो शक्यतो पर्यंत कशातही लक्ष घालत नाही तरी त्याच्या परवानगी शिवाय कुठलंही काम तडीस जात नाही. तरी त्याला स्वतःला आणीबाणी शिवाय कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही.
देव नक्की काय करतो?
देव स्वतः काहीच करत नाही. फक्त तो इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जो जस वागेल तस तो त्याला वागू देतो. तुम्ही वाईट वागलात म्हणून तुम्हाला शिक्षा देण्याची जबाबदारी देव घेत नाही, आणि तुम्ही चांगलं वागलात म्हणून तुमचं भलं सुद्धा देव करत नाही. किंबहुना देवाचं ते कामच नाही. तुमच्या आमच्या सारख्या शूद्र लोकांच्या आयुष्यात देवाला काडीइतका सुद्धा रस नाही.
देवाची गरज कशासाठी आहे?
प्रत्यक्ष जीवनात देवाची गरज अजिबात नाही. देवाची गरज मुख्यतः दोष देण्यासाठी आणि क्वचित आभार मानण्यासाठी आहे. जे तुम्ही बदलू शकत नाही अशा गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या इच्छित कार्यात अपयश आलं कि दोष देण्यासाठी देव लागतो कारण स्वतःचे दोष स्वीकारणं आपल्याला सहज जमत नाही. तसंच तुम्हाला यश मिळालं कि ते मिळवताना तुम्हाला जाणवलेल्या स्वतःच्या मर्यादा आणि तरी मिळालेलं यश याची सांगड घालताना मनात आलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव लागतो.
23 Aug 2017 - 12:41 pm | मराठी_माणूस
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/state-to-hc-there-are-no-...
ह्यात एक मोठा गंभीर प्रश्न विचारला आहे
"Why is the state getting so agitated because somebody is not allowed to use loudspeakers? Why is the state so keen to encourage the use of loudspeakers?"
24 Aug 2017 - 2:38 pm | अत्रे