पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात.
अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत.
एकेका लेखांचे विषय तर पहा.
कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले?
दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला? कोणत्या नातेवाइकांचे कोणकोणते अवयव निकामी झाले?
किती तास किती मिनिटे अपघात स्थळी पोलिस कसे फिरकले नाहीत?
मॄताच्या शरीराचे देहदान करताना काय काय होते?
चोर बाइकवरुनधडक मारुन कसा पर्स पळवून गेला?
असे सगळे मन विषण्ण करणारे लेख.
आणि गंमत अशी वाटते की चांगले अनुभव देणारे वाचकच नाहीत की चांगले अनुभव ह्या जगात कुणाला येत नाहीत?
पंचाहत्तरीतले आजोबा देखील मी नोकरीला धुळ्याला चालू केली तेव्हा म्हणून सुरुवात करतात आणि लिहितात काय तर त्यावेळी नोकरीवर रुजू झाल्यावर स्थानिक लोकांनी कसा त्रास दिला?मागचे अनेक महिने तर कॅन्सर, केमोथेरपी, देहदान, मृतदेहाची विटंबना , स्पॉन्डिलाइटीस , सांधेदुखी, अपघात,इत्यादी वाचून तर बंदपीठ उघडायच नाही , बंदच ठेवायचं असं ठरवलं होतं.
हल्ली दोन महिने जरा बरे अनुभव छापून येउ लागले. मला वाटलं की आहे बुवा कुणी चांगले अनुभव येणारं जगात शिल्लक तर सध्या पुन्हा ये रेमाझ्या मागल्या. पुन्हा अपघात, हार्टएटॅक, पॅरालिसिस, वेगात ठोकरणे,सांधेदुखी सुरु.
आता तर वैद्यकिय महाविदयालयात ऍनोटोमी च्या पुस्तकांएवजी “बंदपीठ” अभ्यासाला लावणार असे एकले आहे.
कारण प्रत्येकाचे अनुभव, इस्पितळातील रसभरीत वर्णने, आजारांची नवनवीन नावे, शरीराच्या विविध अवयवांची आणि नीला- धमन्यांची शास्त्रीय नावे, अस्थिभंगाचे अनेक प्रकार हे सगळं फ्रेश, ताजं दर आठवड्याला दोन रुपयात मिळतं , मग कशाला ती ऍनोटोमीची जाडजूड पुस्तकं वाचा बुवा? ह्या बंदपीठाने लोकांना एवढं शिक्षीत केलंय की, हल्ली डॉक्टर लोक उपचार करायला घाबरु लागले. रुग्णाचे नातेवाइक बरोबर बंदपीठाचा ताजा अंक आणतात सोबत. त्याबरहुकुम उपचार होतायत ना हे बघायला.
चार महिन्यांपूर्वी तर कहर झाला. तेव्हा बंदपीठात देहदानाची चर्चा भलतीच रंगली होती. एका सुपुत्राने बंदपीठाच्या कार्यालयात फोन केला, देहदानाची सोय कुठे आहे? आमचे पिताश्री आता काही तासांचे सोबती आहेत. झालं त्याच्या पुढच्या बंदपीठात “ बंदपीठ इफेक्ट- असेही एक देहदान” असा लेख संपादकांनीच दिला छापून.
जागतिक चोर पाकिटमार भुरटे महासंघ देखील प्रात्यक्षिकासोबत बंदपीठ अभ्यासक्रमाला लावतो. त्यांच्या धंदयाचे विविध प्रकार एकाच जागी वाचायला मिळतात ना. मराठीतून प्रकाशित होणारं एकतरी नियतकालिक आहे का सांगा बघू जागतिक अभ्यासक्रमाला?
रोजचं वर्तमानपत्र तर चोरी, बलात्कार, खून, मारामारी, दंगल, बॉम्बस्फोट, अपघात ह्या सगळ्याने भरलेलं असतंच हो. चॅनेलवाले तर २४ X ७ दाखवायचं तरी काय म्हणून एखादी काचा फुटलेली टॅक्सी भाड्यावर घेउन तीच ठिकठिकाणी फिरवून, तिचे निरनिराळ्या एंगल्स मधून शूटींग करतात आणि अलम शहरातल्या टॅक्स्या फुटल्याच्या बातम्या देतात पसरवून, किंवा पावसात गेला बाजार एखादा नाला तुंबला की राहिले त्याच्या समोर उभे मग आलाच पूर शहरात.
त्याच्यापेक्षा प्रिंट मेडिआ बरा . पण तिथे पण हल्ली अशी विकतची फ्रस्ट्रेशन्स मिळतात. ती पण एकदम कन्साइज, क्रिस्प, खमंग आणि चुरचुरीत.
मी म्हणतो आजकाल ह्या धकाधकीच्या जीवनात आधीच ताण- तणाव फार, गाडी चालवताना ट्रॅफिकचा त्रास, हापिसात गेलो तिथे तणाव, घरी आलो सोसायटीच्या कटकटी, मग सकाळी पेपर वाचताना तरी आनंदी रहा की. पण कसचं काय राव, बंदपीठ हातात घेतलं की हात लागतो कापायला. आनंदी विचार मग कुठच्या कुठे पळून जातात. चोरट्याने धक्का मारुन दगडावर आपटलेल्या वृद्धेच्या जागी आपली आई दिसू लागते, दोन ट्रकांमध्येचेपल्या गेलेल्या कारच्या जागी आपल्या कारचे भास होतात, व्हॅनवाल्याने अपहॄत केलेल्या शाळकरी मुलीची जागा मनातल्या मनात आपली मुलगी घेते. अजून थोडी धक धक वाढते.
मॄत्यू हा माणसाच्या जीवनाला सुंदर बनवतो. पण तो किती भयप्रद अवस्थेत येउ शकतो त्याचे वर्णन करणारे अनेक पुठ्ठा बांधणीचे ग्रंथ भरतील इतके लेख ह्या बंदपीठात आले असतील आजपर्यन्त. वाइट अनुभव नसतातच असं नाही म्हणायच मला. कधी न कधी ते येणारच त्याच्यासाठी तयार असायला हव हे मान्य. त्यातून गेलेल्यांप्रति मी सहॄदय आहे. असे प्रसंग कुणावर येउ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
पण जगात चांगुलपणादेखील आहे की शिल्लक, तो येउ द्या की भाउ समोर. जरा हुरुप वाढेल असं काहीतरी छापा ना जरा. सकाळी पेपर उघडला की समोर डोक्यातून भळभळ रक्त वाहणारी आज्जी, नाहितर पाय वर टांगून हॉस्पिटलात पडलेले आजोबा. कशी होइल बरं दिवसाची सुरुवात? आणि प्रत्येक आठवड्याला हे सगळं एकत्र छापून देणारे ते “बंदपीठ”
मी तर म्हणतो की Happy people find happy experiences, मग अश्या अनुभवांना पण येउ दया की समोर.चांगले- वाइट अनुभ येणारच की प्रत्येकाला कारण तुम्ही जगाकडे ज्या दॄष्टीतून बघता, जग तुमच्याकडे त्याच दॄष्टीतून बघते.
सुखी ताणरहित जीवनशैलीसाठी माझ्याकडे तरी एकच उपाय आहे.. "बंदपीठ" वाचायचं बंद करा.. मी ही तेच करतोय..
प्रतिक्रिया
19 Nov 2008 - 10:10 am | महेश हतोळकर
मी पण ती पुरवणी वाचत नाही. सोमवारी सकाळी इतकं उदासवाणं वाचायला नको वाटतं...
19 Nov 2008 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्वी एक वाक्य ऐकलेलं होतं, कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर होते ती बातमी!
खरोखर चांगल्याचं कौतुक किती वेळा होतं, दिसतं, समोर येतं?
19 Nov 2008 - 10:10 am | महेश हतोळकर
दोनदा आल्याने.
19 Nov 2008 - 7:59 pm | टारझन
दोनदा न आल्याने
19 Nov 2008 - 11:37 am | मैत्र
आजकाल तिथे उदास गोष्टी वाढल्या आहेत हे खरं... पण सामान्य माणूस असे अनुभव घेत असतो... ज्यात सहन करणे याशिवाय काहिच दुसरा पर्याय नसतो. जर इतकं मोठं वृत्तपत्र एक संधी देत असेल तर काय वाईट आहे त्यात?
गेल्याच आठवड्यात मी आमच्या घराजवळ राहणार्या एका वयस्कर काका काकूंनी कोणाला तरी मदत केली ते त्या बाइंनी लिहिलं आणि मग आम्हाला समजलं... चांगलं वाटलं. जर अपघात चोर्या वाइट अनुभव जास्त छापले जात असती तर ती वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्या. छान छान गोड गोष्टीसाठी करण जोहर छाप सिनेमे आणि मासिकं वगैरे आहेतच की.. धमाल करायची असेल तर मिपा आहे. वाइट अनुभव घेतलेल्या व्यक्तीला ते इतक्या मोठ्या स्तरावर मांडून काही हलकं वाटत असेल तर नक्कीच चांगलं आहे.तरीसुद्धा आता असे अतिशय तपशीलवार वाइट अनुभव वाढले आहेत हे खरं... ब्लॉग्ज मध्ये लोक अशा शेकडो गोष्टी किंवा विचार लिहितात. ज्यांचं विश्व त्या पेपर पलीकडे फारसं नाही त्यांच्या साठी तो एक खुला ब्लॉग आहे...
19 Nov 2008 - 7:46 pm | कपिल काळे
मैत्र
दु:खी लोक ह्या जगात खूप आहेत. त्यांच्या प्रति मी सहॄदय आहेच. त्यांचे दु:ख हलके होते हा मुद्दा ठीक आहे. पण त्यामुळे बाकीचे अजून दु:खी होतात त्याचे काय?
हे म्हणजे पेला अर्धा रिकामा अश्या सारखे झाले.
माणूस जगतो कश्यासाठी, दु:खासाठी? की चांगल्याच्या आशेवर?
वॄत्तपत्राचे काम काय? लोकांचा हुरुप वाढवणे? की त्यांची आठवडयाची सुरुवातीला त्यांना नको त्या काळजीत ढकलणे?
दु:खी माणसांची दु:ख नुसती लिहून कशी हलकी होतील? थोडं बरं वाटेल, पण अश्या परिस्थितीचा सामना करण्याचे बळ , समाजातील चांगले शोधण्यात मिळेल.
मग हा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार हे एवढे मोठे वॄत्त्पत्र का बरे करत आहे?
http://kalekapil.blogspot.com/
19 Nov 2008 - 8:01 pm | टारझन
=)) =)) =)) =)) टाळ्या ...
बाकी पोलिस टाईम्स आणि संध्यानंद हे पेपर मिक्स करून वाचले तरी चालेल...
- दैनिक टारानंद
19 Nov 2008 - 8:14 pm | लिखाळ
मी अनेकदा मुक्तपीठ वाचतो. काही अनुभव-कथा या लोकांनी कशी मदत केली हे सांगणार्या असतात तर काही अनुभव दु:खद असतात.
मुक्तपीठ ठीक असते. दुपारचा चहा पिताना मी पाचदहा मिनिटे मुक्तपीठावर चक्कर टाकतो. काही लेख-अनुभव एकदम 'ललित' असतात. ते वाचूनसुद्धा करमणूक होते.
-- लिखाळ.
19 Nov 2008 - 9:21 pm | रेवती
फक्त दैन्य दाखवण्यासाठीच ही दैनिकं छापली जातात.
आता आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आजारी माणसांची संख्या मोजायला गेलं तर काय होइल?
समोरच्या घरातले आजोबा वयपरत्वे आजारी. नवरा आजारी म्हणून आज्जी आजारी.
वरच्या मजल्यावर राहणारे काका वजन कमी असल्यामुळे तर काकू वजन ज्यास्त असल्याने आजारी.
खालच्या मजल्यावरची तीन चार कुटुंबे तीथे सध्या रहातच नाहीत. मग आमच्या आसपास फक्त आजारी लोक आणि भयाण
घरंच आहेत असं म्हणायला हवं.
मला वाटतं पूर्वी नातेवाईक भेटत, निमित्ताने का होईना.
आजकाल फारसं जाणं येणं नाही राहीलं, मग मन मोकळं करायला वृत्तपत्रांच्या पुरवण्यांचा वापर सुरू आहे.
रेवती
20 Nov 2008 - 4:01 am | घाटावरचे भट
>>फक्त दैन्य दाखवण्यासाठीच ही दैनिकं छापली जातात.
त्यांना 'दैन्यिके' म्हणावे काय? :-?
20 Nov 2008 - 5:28 am | कपिल काळे
असेच छापत राहिले तर मात्र तसे नामांतर करावे लागेल
http://kalekapil.blogspot.com/
20 Nov 2008 - 6:18 am | नंदन
दैन्यिके सहीच! :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Nov 2008 - 7:05 pm | अनंत छंदी
अहो
त्यांना दैन्यिकं म्हटले तरी चालेल, नव्हे धावेल. बर्तमानपत्र चालवून विकतचे दैन्य घेण्याचा अनुभव माझ्या पदरी आहे. म्हणजेच हे अनुभवाचे बोल आहेत. :))
19 Nov 2008 - 9:50 pm | अनिल भारतियन
काय लिहावे ?<अनिलstrong>
न आवडले तर न वाचावे..आवडले तर सोडू नये.असे म्हणणे सोप्पे आहे. आपण या दैनिकाला पत्र पाठवायचे का ? बघा हं..पटत्येय का ?
हल्ली आई वडिलांचे दु:ख ऐकायला वेळ नाही..वॄद्धाश्रम भरलेत तर लोकांचे दःख काय ऐकायचे ? कदाचित जेव्हां आपण दु:खी होऊ ना, तेव्हां आपल्याला सहानुभूतीची गरज लागणार नसावी. आपल्याला ना गाडी ओढावी लागत्. ना दारोदार फिरून का।ईतरी विक्री करावी लागत. दु:ख आहेच कुठे ?
जिकडे तिकडे चकचकीत मॉल्स, मल्टीप्लेक्स व त्यात जाणारे भारतीय नागरिक आहेत. चोहोकडे आनंद पसरला आहे. मग हे लोक का रडत आहेत ?
त्यांना हे अनुभव का आले ? छे.
अशा लोकांना या जगात राहण्याचा काहीही अधिकार नाही. अरे तुमची दु:खे आम्हांला का सांगता ? चहा पिता पिता मस्तपैकी नाष्टा करतांना वाचवत नाही हे. आम्हाला राहू दे ना आनंदात. .. आम्ही काय देणे लागतो हो या लोकांचे ?
19 Nov 2008 - 9:58 pm | कपिल काळे
दु:ख नाही असे मी म्हणतच नाही. नीट वाचा. त्या दःखितांच्या प्रति मी सहॄदय आहेच.
पण त्या दु:खाचा सामना करण्याची क्षमता कशी येइल ते बघावे.
इथे अनुभव लिहिल्याने दु:खितांची दु:खे नाहिशी होणार आहेत का? थोडा दिलासा मिळेल, दोन चार फोन येतील. पण आपला लढा आपल्यालाच लढायचा असतो, तिथे कोणी मदत नाही करत. माझ्या तरी मते त्यांनी समाजातील चांगुलपणाचे अनुभव वाचले तर त्यांची इच्छाशक्ती वाढेल. जगण्यासाठी काही प्रेरणा मिळेल.
अर्धा पेला रिकामा असला तरी अर्धा भरलेला असतो हे कळू दया की समाजाला.
http://kalekapil.blogspot.com/
19 Nov 2008 - 11:12 pm | भाग्यश्री
माझा असा अंदाज आहे.. की मुक्तपीठ ला एक थीम आहे.. एका पुरवणीत एकाच टाईपचे अनुभव्कथन असते.. कदाचित दर सोमवारी बदलत असेल.. परवाच्या पुरवणीत सगळे अपघात होते.. त्यामुळे खूप तोचतोचपणा वाटत असेल..
मला मुक्तपीठ आवडतं वाचायला.. नेहेमीच टाकाऊ नसतं.. त्यामुळे वाचते..
तुम्ही जे म्हणताय, अपघात्,हल्ले,स्फोट, ई गोष्टींची रेलचेल पेपरमधे १ ल्या पानावर तर असतेच! हल्ली या गोष्टीच वाढल्यात त्याला काय करणार..
अरे तो बोल्डचा टॅग कोणीतरी बंद करा रे..
http://bhagyashreee.blogspot.com/
20 Nov 2008 - 3:57 am | घाटावरचे भट
20 Nov 2008 - 3:59 am | घाटावरचे भट
झाला बंद टॅग!!!!
20 Nov 2008 - 4:21 am | विकास
http://goodnewsindia.com/ नावाचे एक संकेतस्थळ बरेच वर्षे चालू होते अजूनपण आपण पाहू शकता मात्र ताज्या बातम्या देणे बंद झाले आहे कारण ज्या व्यक्तीने ते चालू केले ती व्यस्त आहे २०१० पर्यंत!
20 Nov 2008 - 7:20 pm | कलंत्री
लेख खुपच छान आहे.
८७/८८ ला एका कंपनीत लागलो होतो. तेथे एक सदगृहस्थ होते आणि चुकुन कधी विचारले गेले की, " **** कसे काय चालले आहे?" असा प्रश्न विचारता क्षणीच कमीत कमी २ तास त्यांच्या भुत आणि वर्तमानातील अडचणीचा पाढा वाचला जाई. बरे त्यांची गाडी थांबवणे अशक्यच होते. एकदा / दोनदा असा अनुभव घेतल्यानंतर त्यांना पाहता क्षणीच मी पळ काढत असे. अर्थात हीच पद्धत अनेकांनी अनुकरलेली होती.
अपघात, फजिती, फसवणूक इत्यादी बातम्यानी दिवस वाईट जातो हेही नकी.
अवांतर : परवाच सकाळी एक बातमी वाचली. ( लोकसत्ता) पिंप्रीच्या डॉ. तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार. दिवसभर बलात्काराची व्याख्या काय असते यावरच विचार करत होतो. शेवटी मेंदु शिणला म्हणून बरे, नाहीतर मिपावाल्यांना शिणवले असते हा भाग वेगळा.
21 Nov 2008 - 9:59 am | विसोबा खेचर
अरे वा! वाचलं पाहिजे एकदा! :)
21 Nov 2008 - 12:05 pm | मनीषा
आणि सकाळच्या इतरही पुरवण्या वाचनीय असतात ..
दुर्दैवाने तुम्ही अपघात, आजारपण वगैरे विषय असलेली पुरवणी वाचली असावी ..
पु.ल. नी अशा योगाला "जल-शृंखला योग " असे नाव दिले आहे .