आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.
२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.
आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्हाइकच वाईट.
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.
मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
प्रतिक्रिया
12 Jan 2015 - 12:08 pm | वेल्लाभट
तुम्हाला वाईट अनुभव आला हे वाईटच आहे. परंतु धाग्यात किंवा विशेषतः प्रतिसादात मांडलेली एकंदरित मतं ही अतिरेकाची आणि केवळ रागापोटी मांडलेली वाटतात.
आम्हाला याच हॉटेलचा अगदी चांगला अनुभव आहे. पदार्थांची चवही उत्तम होती, मालक स्वतः गप्पा मारून गेले, त्यांनी गर्दीमुळे त्यांची उडणारी तारांबळ आम्हाला सांगितली. तेंव्हा, त्यांची चूक त्यांच्यापर्यंत पोचवणं इथपर्यंत ठीक आहे.
पण मराठी माणूस, त्याचं ते नेहमीचं जनरलायझेशन की त्याला बिजनेस कसा करायचा न कळणं इत्यादी टिप्पण्या निषेधार्ह आहेत. मराठी माणसाने मराठी माणसाचेच पाय ओढणं का काय ते यालाच म्हणतात. जा ना, तोंडावर सांगा हे असं आवडलं नाही हे हे सुधारा. नाही ऐकलं तर करा मग जे हवं ते. आहेच तुमचं व्हॉट्सॅप, फेसबुक, ट्विटर; राग काढायला.
12 Jan 2015 - 12:35 pm | काळा पहाड
बघा, म्हणजे राग कसा काढायचा, केव्हा काढायचा आणि कुठे काढायचा याचे पण नियम तयार झालेत वाटतं. अर्थातच इथे रागच आहे. स्वतःचे पैसे घालून अशी वागणूक मिळत असेल तर राग येणार नाही तर काय लोकांना?
हो ना सुधारणेचा मक्ता घेतलाय ना लोकांनी मग्रूर वागणूक सहन करून. बाय द वे, म्हणजे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत या लोकांना त्यांची चूक कळलीच नाहीये की काय?
टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे म्हणजे नवीनच. या गुंठामंत्र्यानी कुठेही हॉटेल काढायचं. मग्रूरी करून लोकांचा अपमान करायचा आणि टीकाही सहन होत नाहीये काय? मराठी माणसाला पायाची काळजी नव्हे, त्याच्या खिळे ठोकून ताठ केलेल्या पाठीच्या कण्याची काळजी करायला हवी.
12 Jan 2015 - 12:42 pm | वेल्लाभट
हेच ते मी म्हटलं ते. चालूदे :) यन्जॉय.
12 Jan 2015 - 12:43 pm | वेल्लाभट
पावसात जायचं नाही आणि टबात थबथबाट करत बसायचं. LOL
12 Jan 2015 - 12:46 pm | वेल्लाभट
अन तुम्ही टीका करा की आणि काय करा मला कैच्च नाही त्याचं. फक्त शितावरून भाताची; किंवा सुतावरून स्वर्ग; किंवा असलं काहीतरी करू नका असा आपला सल्ला. सहज शब्द आठवला. रॅशनॅलिटी. असो.
12 Jan 2015 - 12:58 pm | काळा पहाड
अहो, पैसे देवून जेवायला जायचं असतं ना? त्यात रॅशनॅलिटी कुठे आलीय? बाकी तुमचे मित्र असले ते हॉटेलवाले तर सांगा ना त्यांना त्यांच्याच फायद्यासाठी. बाकी शितावरूनच भाताची परिक्षा करतात यात काही नवीन किंवा चुकीचं आहे का? बाकी पाऊस आणि टब या उपमा कशासाठी वापरल्यात काही कल्पना नाही. आमची जबाबदारी हॉटेल मालकाला सुधारणं नाही. यड्या मराठी हॉटेल मालकांना सुधारणं तर त्याहून नाही.
12 Jan 2015 - 1:09 pm | वेल्लाभट
नाही कळलं? राहिलं !
नाही सुधारायचं? राहिलं !
बाकी हॉटेलवाले माझे मित्र नव्हेत.
12 Jan 2015 - 1:29 pm | वेल्लाभट
दोहोंतला फरकच अनेकांना कळत नाही.
12 Jan 2015 - 12:50 pm | सर्वसाक्षी
मी माझा अनुभव जसा आला तसा व्यक्त केला.
वर धर्मराज यांना नुकत्याच दिलेल्या प्रतिसादात उहापोह केलाच आहे, कृपया वाचा. जेव्हा मालकाला सांगितल्यावर तो तुम्हालाच बदलायचा सल्ला देतो तेव्हा राग हा येणारच. मी मराठी माणसाचे जनरलायझेशन व कशाचेच जनरलायझेशन करत नाही. अनेक उत्तम सेवा देणारे मराठी व्यावसायिक मला माहित आहेत. अनेक मराठी उद्योजक यशस्वी आहेत. मी माझा तिथला अनुभव सांगितला. आपला अनुभव वेगळा असू शकतो.
12 Jan 2015 - 12:56 pm | वेल्लाभट
तुम्ही नाही; मी म्हटलंय प्रतिसादात जनरलायझेशन्स झालीयत.
तुम्हाला आलेला अनुभव वाईट आणि खेदजनकच आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं. त्याबाबत नो दुमत.
12 Jan 2015 - 12:29 pm | सुनील
हॉटेलचे नाव 'मेतकूट' असेच आहे की 'मेटाकूट'? ;)
अवांतर - मेटाकूट शब्दाची व्युत्पत्ती काय? हा शब्द मेटाकुटीला येणे ह्या वाक्प्रचाराव्यतिरीक्त अन्यत्र वापरण्यात येतो काय?
12 Jan 2015 - 12:40 pm | आदूबाळ
मेटेंखुंटीस, मेटाखुटी, मेटाकुटीस येणें-१ मांडी घातलेली काढून गुडघ्यावर उभें राहणें (एखाद्यास मारण्याकरितां वादांत वरचष्मा होण्याकरितां) २ नेटानें खेचण्याकरितां, ओढण्याकरितां गुडघे टेकून उभें राहणें. (मनुष्य, पशु यांनीं).
इथे पहा - दाते कर्वे शब्दकोश
http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/philologic/getobject.pl?c.37:1985....
12 Jan 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
माणूस मराठी असो की अमराठी... प्रथम अव्यवस्था आणि त्यावर उद्धटपणा करणे अक्षम्य आहे.
"मी उद्धटपणा केला तरी (पैसे मोजून माझ्या दुकानात येत असलात तरी) तुम्ही मात्र गप्प राहून सहन करा किंवा फारतर विनयाने माझ्याकडेच तक्रार करा." असा विचार करणार्या व्यावसायीकाची कीव करणे सोडून धडा शिकवणेच जास्त योग्य आहे.
किंबहुना, हा धडा शिकल्याशिवाय व्यवसायांत यशस्वी होता येत नाही... म्हणजे एक प्रकारे असे करणे हा गिर्हाईकाने व्यावसायीकावर केलेला उपकारच आहे... त्याचा सकारात्मक उपयोग करून घेणे, न घेणे सर्वस्वी व्यावसायीकावर अवलंबून आहे !
12 Jan 2015 - 12:50 pm | काळा पहाड
एक विशेष म्हणजे आता पुण्यातील सर्व हॉटेल्स् मध्ये जागेचा अत्युच्च वापर केलेला दिसतो. मोकळी जागा ही शिल्लकच नसते. जरा जागा दिसली की तिथेच एक टेबल टाकून दोन खुर्च्या टाकतात. अरे काय हे. लोक हॉटेलात जेवायला आलेत की खानावळीत? बर डिशेसही दीडशे दोनशे अडीचशे अशा रेटने. म्हणजे स्वस्त नव्हेतच. चव चांगली असली तर गर्दी जास्त आणि मग टेबल्स ही तेवढीच जास्त. वेटरवर्गाचा आविर्भाव ही असा की जेवा आणि लवकर जा. तसे रेट देवून दुसर्या कुणाच्या तरी पाठीला पाठ लावून जेवणे हे म्हणजे हॉटेलमालक उपकार करतोय असेच वाटते. एकूणच "लुटणे" हा पुण्यातल्या हॉटेलमालकांचा मुख्य धंदा आहे. हॉटेल चालवणे हा जोडधंदा.
12 Jan 2015 - 1:55 pm | मृत्युन्जय
जागेचा पुरेपूर वापर ही पुण्या मुंबईची गरज आहे. जागेच्या किंमती प्रचंड वाढल्यात. हॉटेलचा धंदा चालवुन नफा मिळवण्यासाठी जागेचा पुरेपूर वापर केलाच गेला पाहिजे. नुकतेच ऐकले की पुण्यात नवी तुळशीबाग जी सुरु होते आहे तिथे १०*१० च्या गाळ्याचा (५०% बिल्ट अप) रेट ५० लाख रुपये आहे (खरे खोटे देव जाणे). हा जर रेट असेल तर हॉटेलवाले पण नफा कमाविण्यासाठी जागेचा सुयोग्य वापर करुन घेणारच.
रेट बद्दलही तेच. पुण्यात एकुणच जागेचे भाव जास्त असल्याने डिशेसही महाग असतातच, हे कोल्हापुर सांगली सातार्यात रेट्स अर्थाच कमी असतील. हॉटेलवाल्यांनी रेट कमी लावु नयेत असे काही म्हणणे नाही पण इतर शहरांच्या मानाने दर जास्त असण्याचे मुख्य कारण जागेचा भाव हे आहे.
पुण्यातल्या ज्या ज्या हॉटेलात मला सेवा अयोग्य मिळाली ती मी ब्लॅकलिस्ट केली. कालांतराने त्यातली बरीच हॉटेल्स बंद पडली. जी अजुन चालु आहेत तिथे मी जात नाही. वेटर्स तुसडे असलेले मात्र फारसे कुठे बघायला नाही मिळालेले. नारायण पेठेतल्या ४ टेबलाच्या क्षुधा शांती गृहातील वेटर कदाचित तुसडे असु शकतील. पण त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही.
लुटणे हा कुठल्याही उद्योजकाचा स्थायीभाव असतो. कुठल्याही शहरातला. त्याची किंमत जर जास्त असेल तर तो आपोआप स्पर्धेबाहेर पडतो किंवा किंमत कमी करतो. तो तरीसुद्धा लुटत असेल तर तो केवळ मालाच्या दर्जाच्या बळावरच.
12 Jan 2015 - 2:35 pm | काळा पहाड
एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार्या दुकानमालकाला तेवढाच फायदाही अपेक्षित असणार. जर त्या किंमती वरचे व्याज पाहिले तर जागामालकाला महिन्याला किमान एक कोटीची उलाढाल (आणि दोन लाखांचा नफा) अपेक्षित असणार. एवढ्याश्या जागेतून एवढी मोठी उलाढाल कशी चालेल याचा काही अंदाज येत नाही ब्वा. सध्या सगळा किराणा बिग बाझार मधून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेतोय. बाकी भारतीयांना आपली किंमत जास्तच असल्याचं वाटतं (ओव्हर व्हॅल्युएशन) त्याचा हा परिणाम आहे.
12 Jan 2015 - 12:53 pm | वेल्लाभट
दमण येथील एका मोठ्ठ्या पॉश हॉटेल मधे बिलातील उरलेले पैसे परत करताना कमी पैसे परत केले गेले. कारण विचारलं असता सुट्टे नाहीत असं सांगितलं. 'बरं' म्हणून मालकाकडे गेलो. आवाजाची पट्टी न बदलता घडली गोष्ट सांगितली. तो म्हणे आत्त देतो, सगळं फ्री देतो इत्यादी. मी म्हटलं, 'गरज नाही. एखाद्याने चार दोन रुपयांसाठी हे सांगितलंही नसतं, पण प्रश्न तत्वाचा आहे. आज एवढं मोठं हॉटेल थाटून बसता आणि सुट्टे नाही म्हणता? बरं हे खरोखर नसतील तर ते मान्य नाहीच पण सुट्यांच्या नावाखाली जर तो वेटर पैसे मारत असेल तर मॅनेजर ला सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतोय. याहून अधिक सांगण्याची किंवा उगाच तमाशा करायची माझी इच्छा नाही. बाकी तू बघ काय करायचं ते.'
12 Jan 2015 - 1:17 pm | असंका
प्रत्येक वेळी आपल्या हॉटेलात काय चाललंय हे मालकाला कळतंच असं नाही. एक चांगुलपणा म्हणून गिर्हाइकाने अशा गोष्टी आपण होऊन सांगणं हे अत्यंत सेन्सिबल आहे.
14 Jan 2015 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर
खरं आहे. महिन्याला जवळ जवळ १५ ते २० हजार गिर्हाईकांना सेवा पुरवायची म्हणजे तारेवरची कसरत असते. १५ ते २० हजार गिर्हाईके म्हणजे १५ ते २० हजार स्वभाव. स्वतःचा व्यवसाय असल्याकारणाने मालक डोके शांत ठेवून, प्रसंगी अपमान झेलून प्रत्येक तक्रारदार गिर्हाईकाची समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. (केलाच पाहिजे). पण तिथे नोकरी करणार्यांचे तसे नसते. पुन्हा, वरचेवर कर्मचार्याला काढून टाकणे आणि नविन चांगला कर्मचारी मिळविणे दुरापास्त असते. हल्ली उपहारगृह व्यवसाय जोरात आहे. अनेक नविन उपहारगृह उघडत आहेत. ह्या क्षेत्रात नोकरी करणार्यांना (आचारी, सेवादाते, स्वच्छ्ता कर्मचारी, स्वयंपाकगृह आणि जेवण दालनाचे पर्यवेक्षक) अनेक संधी उपलव्ध असतात. जरा काही त्यांना बोललं की लगेच नोकरी सोडून जायचे हत्यार उपसतात. त्यामुळे आहे त्यांनाच दादापुता करून, समजावून क्वचित धमकावून कामे करून घ्यावी लागतात.
प्रत्येक तक्रारदाराची तक्रार मालकापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असते. त्याने ताबडतोब एखाद्या कर्मचार्याला नोकरीवरून काढून नाही टाकले तरी मालकाच्या मनांत कर्मचार्यांची एक 'काळी यादी' तयार होत असते आणि संधी मिळताच तो कृती करतो. माझ्या इथल्या दोन उपहारगृहात मिळून २२ माणसे काम करीत आहेत. नविन दोन उपहारगृह सुरु होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे अजून ३० ते ३५ कर्मचारी येतील ह्या ५० -५५ कर्मचार्यांमध्ये सर्वच जणं अप्रतिम सेवादाते, निष्ठावंत आणि बौद्धीक चुणूक असणारे नसतात. सतत त्यांचे वागणे, गिर्हाईकांच्या तक्रारी आणि अभिप्राय ह्यातून त्यांचे मुल्यमापन होत असतेच. संधी मिळाली की कचरा साफ केला जातोच. पण, त्यासाठी आपल्या निरिक्षणाबरोबरच गिर्हाईकांचे 'फिड बॅक' फार महत्त्वाचे असते.
12 Jan 2015 - 1:41 pm | कंजूस
मला वाटतं एवढं हे हॉटेल चालतंय तर रेट दुप्पट करावेत तिथे बसून वाफाळलेला डोसा खाणाऱ्यांसाठी. बाकीच्यांना पार्सल द्यावे. खातील त्यांच्या दोन गाड्या उलटसुलट लावून डिक्यांची शटरं वर करून. मालकपण खुश गिऱ्हाइकंपण खुश.
12 Jan 2015 - 2:15 pm | सर्वसाक्षी
एखाद्या पंचतारांकित प्रचंड पसारा असलेल्या हॉटेल्च्या चेअरमन विषयी कदाचित असे असू शकेल पण ते त्यालाही भारी पडेल. इथे नव्याने सुरू झालेल्या हॉटेलवर मालक स्वतः नसेल तर काही खरं नाही.
बहुतेक हॉटॅलचे मालक बहुतांश वेळ स्वतः तिथे उपस्थित असतात अन्यथा त्यांच्या कुटुंबातिल एखादी विश्वासू व जबाबदार व्यक्ति त्यांच्या गैरहजेरीत देखरेख करते. कुठलाही व्यवसाय विशेषतः हॉटेल, वाहतुक व्यवसाय हे हात स्वतः काळे करायचे उद्योग आहेत. मी शेठ बनुन घरी बसतो, संध्याकाळी गल्ला आणुन द्या असे होत नाही. अनेक हॉटेल मध्ये शेट्टी स्वतः तिथे नाश्ता / जेवण करताना दिसतात.
12 Jan 2015 - 2:21 pm | गवि
..प्रचंड सहमत..नुसते हजरच नव्हे तर मुदपाकखान्यातही प्रसंगी उभे राहणारे आणि स्वतःच्या हातात चव असणारे जाणकार मालक आवश्यक असतात.
14 Jan 2015 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षी,
मालक स्वतः हजर नसेल तर कर्मचार्यांच्या वर्तुणूकीवरही प्रचंड नकारात्मक परिणाम होतो. जो धंद्याला अत्यंत घातक असतो. कर्मचार्यांवर वचक ठेवणे, त्यांच्या बारीक सारीक (नगण्य वाटणार्या) चुकाही त्यांच्या निदर्शनास आणुन देणे त्याच बरोबर त्यांनी केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टी बद्दल इतर कर्मचार्यांसमोर शाबासकी देणे हे करावेच लागते. कोणीही कर्मचारी बेफिकीर राहू नये आणि सहकर्मचार्यांना आणि आपल्यालाही डोईजड होऊ नये इथे लक्ष देण्यासाठी तिथे त्यांच्या डोक्यावर उभे राहावे लागते. उपहारगृह व्यवसाय संध्याकाळ ते मध्यरात्र ह्या वेळेत जोरात असल्याने मालकाला सोशल लाईफ उरत नाही. एकाहून अधिक उपहारगृहे असतील तर प्रत्येक ठिकाणी आकस्मित भेट देऊन नियंत्रण ठेवावे लागते.
मीही अजून शिकतोच आहे.
12 Jan 2015 - 6:14 pm | मी-सौरभ
असा अनुभव प्रत्येकाला येइलच असे नाही पण तुम्हि हा प्रसन्ग सांगून काही जणांना सावध केले आहे हे नक्की. हा आण्भव वाचून तिथं जायचं का नाही हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे.
बाकी तुम्हाला आलेला अनुभव वाईटच होता याबद्दल दुमत नाही. :(
12 Jan 2015 - 9:22 pm | आजानुकर्ण
मलाही ही मेतकूटची जाहिरात व्हॉट्सअॅपवर आली होती. आता हाच रिव्ह्यू व्हॉट्सॅपवर टाका. आपण घामाचे पैशे खर्च करताना गुजराती-मराठी वगैरे अस्मिता मध्ये आणायची काडीचीही गरज नाही. मराठी गिऱ्हाईकांचा अपमान करण्यात मराठी दुकानदारच पुढे असतात.
12 Jan 2015 - 9:23 pm | दर्यासारंग
काही वर्षापुर्वी ठाण्यात तलावपाळिजवळ नमस्कारमद्धे असा अनुभव आला होता. काहितरी चिकन-मटणची डिश व आठ रोट्या मागवल्या होत्या.जेवण वेळेवर आले, पण त्याने चारच रोट्या दिल्या. बाकिच्या नन्तर देतो असे सान्गितले. पहिल्या चार रोट्या खाउन झाल्यावर आम्हि उरलेल्या चार आणायला सान्गितले. तर त्याने आता देतो/ थोड्या वेळा येतील असे बोलुन अर्धा तास लावला, तोपर्य्नत आमच्या पुढ्यातली डिश गार होउन गेली होती, तेव्हडा वेळ आह्मि एकमेकान्च्या तोन्डाकडे बघत होतो. हॉटेलात बाकी लोक सुद्धा अर्धा तास असेच बसुन इकडेतिकडे बघत होते, कोणालाच काहिच सर्व्ह केले जात नव्हते. शेवटि एकदाच्या रोट्या आल्या. त्या खाउन आणखी काही ऑर्डर न करताच आम्हि घरी परत आलो. ( न जाणो आणखी अर्धा तास लावला तर). तिथुन जाताना नेहमी त्या दिवसाची आठवण येते. सध्यातरी ते हॉटेल बन्द पड्ले आहे. त्यामानाने मखमली तलावासमोरिल उत्सवमद्धे चान्गली सेवा व जेवण मिळते.
12 Jan 2015 - 9:25 pm | रेवती
मी यावेळी चांगल्या म्हणवल्या जाणार्या फराळवाल्यांकडून (चितळे नाही, घरगुती करणारे असतात त्यांच्याकडून) एक दोन पदार्थ करवून घेतले. हे टिकावू पदार्थ त्यांच्याकडून उचलल्यापासून ३ दिवसात खराब झाले. विमानात सगळे सामान थंडगार असते. येथे पोहोचल्यावर मिपाकर लंबूटांगने आम्हाला विमानतळावरून उचलले. त्या रात्री भयंकर थंडी होती. नंतर सामान बेसमेंटच्या गारव्यातच होते. सकाळी सामानातून फराळ काढून ज्यांनी मागवला होता त्यांना म्हणजे ३ घरी दिला दुसर्या दिवशी आमचे म्हणून आणलेले पाकीट उघडले तर बुरशी आलेली. आईकडे फोन करून खात्री करून घेतली की तिने दुसरीकडून मागवलेला हाच पदार्थ टिकलाय ना तर तिचा पदार्थ २ अठवडे मजेत डब्यात बसला होता. मग त्या फराळवाल्यांना कळवले व दीड हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावर, त्यात काय एवढे! असं होतं कधीकधी.........तुम्हाला त्याचे एवढे वाटायला नको वगैरे. भरपाईचे तर नावच नको. त्यावर मी म्हणाले की पुढील वेळी तुम्हाला ऑर्डर देण्याआधी मी विचार करावा लागेल. तर ते म्हणाले की काही हरकत नाही.
आपल्यामुळे कोणाचे नुकसान झालेय तर दिलगिरी नाही उलट भरपाई मिळणार नाही म्हणाले. आता या मनुष्याकडे मी अजिबात जाणार नाही पण म्हणून यांना ग्राहकांची कमतरताही नाहीये ना! चितळ्यांना पर्याय म्हणून यांचा विचार केला होता. आता हेही बाद!
14 Jan 2015 - 2:46 pm | प्रभाकर पेठकर
त्यात काय एवढे! असं होतं कधीकधी.........तुम्हाला त्याचे एवढे वाटायला नको वगैरे.
बापरे! मी तर एखाद्या गिर्हाईकाने 'पेठकर, आज मिसळ मधे मजा नाही आली.' असे म्हंटले तरी बिलात मिसळीचे पैसे लावत नाही. स्वतः मिसळ चाखून जे काही कमी जास्त आहे ते आचार्याला दम मारून सांगतो आणि नंतर वरचेवर मिसळ चाखून लक्ष ठेवतो. (मी लक्ष ठेवतो आहे हे कर्मचार्याच्या नजरेत असणं महत्त्वाचं असतं).
14 Jan 2015 - 6:44 pm | रेवती
:)
14 Jan 2015 - 7:13 pm | सुबोध खरे
पेठकर साहेब
हाच तर बर्या आणि चांगल्या हाटेलातील फरक आहे.
15 Jan 2015 - 2:12 pm | नाखु
पेठकर काका
हॉटेल मालकाचे "लक्ष्य" आणि लक्ष मधील फरक मेतकूट समानधर्मींना समजेल तो सुदीन !
17 Jan 2015 - 10:46 pm | हुप्प्या
आता पुढच्यास ठेच मागचा शहाणा हा नियम लावून सदर फराळवाल्यांचे नाव कळवा म्हणजे बाकी लोक त्यांच्या कडून घेताना विचार करतील.
17 Jan 2015 - 10:52 pm | रेवती
जाऊ द्या हो हुप्प्याभौ! त्या मनुष्याचे नावही घ्यायची नाही मी आता!
13 Jan 2015 - 1:55 am | गुळाचा गणपती
मी ब्लोक-लिस्ट केलेली ठिकाणे
१. डॉमिनोज पिझ्झा हिंजेवाडी & चिंचवड
२. सयाजी हॉटेल मध्ये पोर्तीको
३. सर्जा- औंध
13 Jan 2015 - 2:04 am | आदूबाळ
सर्जा? का बर??
13 Jan 2015 - 8:46 am | नाखु
हिंजवडी...
बघा जमलं तर नीट लिहा.
13 Jan 2015 - 10:38 am | काळा पहाड
हे बरं नै राव.. मलाबी हेच ल्याचं हुतं.
26 Sep 2015 - 4:11 pm | एस.योगी
सर्जा - याच्या मालकीण खुद्द गानकोकिळा लताबाई आहेत .
14 Jan 2015 - 10:35 am | योगी९००
मागच्या आठवड्यात कोयनेवरून येताना मुद्दाम चिपळूण महाड मार्गे मुंबईला आलो. येताना महाडच्या जवळ एका नदीच्या बाजूला असणार्या एका छान मिनी-रिसॉर्ट मध्ये जेवण घेतले. बहूतेक रत्ना असे नाव होते रिसॉर्टचे. जेवण ठिक होते पण लोकेशन खूप छान होते. वेटरने जेवण झाल्यावर हाताने लिहीलेले बील दिले. बिल घेताना सहज बिलावर नजर टाकली असता माझ्या अंदाजापेक्षा जवळ जवळ दिडपट बील जास्त वाटले म्हणून चेक केले तर वेटरने दोन पदार्थ जास्त लावले (जे आम्ही घेतलेच नव्हते) असे दिसले. म्हणून त्याला नवीन बील आणायला लावले. नवीन बीलात (ते सुद्धा हाताने लिहीले होते..प्रिंटेड बील नव्हते) वेटरने जी भाजी आम्ही खाल्ली तिचा दर पन्नासने वाढवून ठेवला होता.
मग सरळ मॅनेजरकडे गेलो. एक बाई बसली होती. तिने बील पाहून जास्त डोके न लावता सरळ पेनाने खाडाखोड केली आणि वेटरची चुक झाली हो म्हणून बील करेक्ट केले. नंतर उगाच आम्ही विचारले नसताना ही हा वेटर हल्लीच आला हो. त्याला काय बी माहीत नाही अशी सुद्धा माहिती दिली. तिचे बोलणे आणि एकंदरीत बॉडी लॅग्वेज बघता ती खोटे बोलतेय असे वाटले. कदाचित असे जास्तीचे पदार्थ बिलात लावणे किंवा वाढीव दर लावणे असा प्रकार त्यांचा रोजचा असावा असे उगाचच वाटून गेले. आमची छोटी फॅमिली होती आणि त्यामुळे आम्हाला लगेच कळले की जास्तीचे बील लावलेय पण एखादा मोठ्ठा ग्रुप गेला तर असे हे सहज खपुन जात असावे. तसेच अशा ग्रुप मध्ये काहीच जणांना पैसे देऊन मोठेपणा घेण्याची घाई असते त्यामुळे सहसा बील चेक होत नाही आणि यामुळे असले हॉटेलवाले याचा फायदा उठवत असावेत.
कदाचित ती मॅनेजर बाई म्हणाली ते खरे सुद्दा असावे की वेटर नवा होता आणि त्याला काय बी माहित नसावे. म्ह्णजे छोट्याबीलात असा प्रकार न करता मोठ्या बीलात अशी फसवाफसवी करावी हे त्याला कळले नसावे.
26 Sep 2015 - 1:20 pm | अभिजित - १
हे सर्व ठिकाणी कॉमन आहे. इथे शहरात वाणी / दुकानदार यांना जर का वाटले हा माणूस पैसेवाला आहे तर त्याला नक्की चुना लावतात.
17 Jan 2015 - 11:56 pm | किसन शिंदे
खरं तर साक्षीकाकांचा लेख यायच्या आधीच मी मेतकूटला जायचं ठरवलं होतं, पण गेला आठवडा बाहेर भटकण्यात गेल्यामुळे जायला जमलं नाही. ठाण्यात परत यायच्या आधीच साक्षीकाकांचा या मराठी उपहार गृहाविषयीचा वाईट अनुभव मिपावर आल्यामुळे मन थोडे साशंकित झाले होते. हा धागा आणि त्यावर येणार्या सर्व बर्या-वाईट प्रतिक्रिया वाचल्या आणि भलेही थोडा वेळ गेला तरी चालेल, पण मेतकूटला एकदा भेट द्यायला हवी असं ठरवून आज संध्याकाळी पावणे नऊला उपहार गृहाच्या बाहेर पोचलो.
शनिवार संध्याकाळ आणि या नव्या उपहार गृहाविषयी उत्सूकता असल्याने बर्यापैकी गर्दी होतीच. गेल्यानंतर उपहार गृहाच्या मालकांना श्री. सनी पावसकर यांना भेटून दोन माणसांसाठी कधीपर्यंत जागा मिळेल अशी विचारणा केली. अत्यंत नम्रपणे बाहेर असलेल्या गर्दीचा अंदाज घेत त्यांनी साडेनऊ तरी वाजतील असे सांगितले. साक्षीकाकांचा धागा डोक्यात असल्यामुळे "साडेनऊला तरी नक्की मिळेल, कि आम्हाला उपाशीच परत जावे लागेल?" असे बोलल्यानंतर पावसकरांना मी त्यांचा इथला अनुभव वाचून गेलोय हे लगेच कळाले. त्यानंतर त्यांनी लगेच बाहेर येत झाल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. थाळीची वेळ (दुपारी ३:३०) संपल्यानंतरही आमच्याकडे अ ला कार्टे स्वरूपात फक्त अळूवड्या, थालिपिठ असे पदार्थ न मिळता सगळे पदार्थ(पोळ्या, भात, वेगवेगळ्या भाज्या) मिळतात. आणि हीच गोष्ट आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही.
पावसकरांसोबत दहा मिनिटाच्या बोलण्यात मला त्यांच्या बोलण्यात कुठेही मग्रुरी जाणवली नाही. उलट जाणवलं ते फक्त महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये वैविध्यपूर्णतेने नटलेल्या खाद्यपदार्थांना जागेच्या अभावामुळे ठाण्यातल्या लोकांपर्यंत पोचायला अडचण येतेय. साधारण तासाभरात आम्हाला आत बसायला जागा मिळाली. थाळी संपलेली होतीच त्यामुळे "अ ला कार्टे" स्वरूपात पोळ्या, कोल्हापूरी रस्सा आणि फोडणीचा भात हे पदार्थ आम्ही मागवले होते. सोबतीला खमंग कोशिंबीर(होय! ते त्या पदार्थाचे नाव आहे), अळूवड्या आणि सरतेशेवटी गाजराचा हलवा मागवला होता. एकुणात सगळ्याच पदार्थांची चव चांगली होती. पुन्हा मेतकूटला जायला मला तरी हरकत नाही.
18 Jan 2015 - 12:36 am | प्रचेतस
माझा एक बेशिक प्रश्न हाय.
हाटेलात जाऊन पोळ्या, अळूवड्या, कोशिंबीर आणि फोडणीचा भातच जर खायचा तर हाटेलात कशाला जावं म्हंतो मी.
18 Jan 2015 - 12:40 am | पैसा
हे सगळे सोप्पे घरी सहज आणि खूपवेळा होणारे पदार्थ आहेत. शिवाय जेवणासाठी एक तास थांबून मग थाळी संपली हे ऐकणं परवडणारं नाही. आ-ला-कार्ट प्रकाराने जेवणातलेच पदार्थ घेणे खूप महाग पडते. थाळीची किंमत आणि या सुट्या मागवलेल्या पदार्थांची किंमत यात किती पैसे जास्त गेले सांग.
18 Jan 2015 - 12:53 am | निनाद मुक्काम प...
पूर्वी खव्याचे गुलाबजाम करायचे आता गिट्स चे करतात ,
घरच्या गृह्देवतेला एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी देण्यात काय हरकत आहे , वरील उल्लेख केलेले पदार्थ ज्या दिवशी महाराष्ट्रात ज्या दिवशी नवरे आपल्या बायकांना करून खायला घालायला लागले त्या दिवशी महाराष्ट्र खर्या अर्थाने पुरोगामी होईल ,
ता,क
पावभाजी ते डोसे ते वडापाव व भेळ अनेकदा रविवार चा बेत म्हणून घरी केले जातात तरीही ह्यांच्या साठी बाहेर खवय्ये गर्दी करतात.
18 Jan 2015 - 12:56 am | पैसा
डोसे, वडा, याला जरा तरी खटपट करावी लागते. फोडणीचा भात आणि कोशिंबीर यात करायचं काय असतं? बाहेर नेऊन खायला घालायचं तर खास काहीतरी घाला ना! फोडणीचा भात कशाला?
19 Jan 2015 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे
मेतकूटच्या व्यवस्थापनाच्या वागण्यात फरक पडला आहे हे केव्हाही स्वागतार्ह आहे.
मात्र तुमच्या आणि सर्वसाक्षींच्या तेथे जाण्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तुम्ही अनाहूत म्हणुन गेला होता आणि ते आरक्षण करून गेले होते.
रेस्तरॉच्या व्यवस्थापन समस्येमुळे त्यांना टेबल उशीरा मिळाले असल्याने "रेस्तराँची जेवणाची ठराविक वेळ संपली. आता अ ला कार्ट घ्या." असे सांगणे म्हणजे "आमची चूक असली तरी त्याची शिक्षा तुम्हीच भोगली पाहिजे." असे गुर्मीने म्हटल्यासारखे आहे. त्याउलट व्यवस्थापनाने आपली चूक मानून, माफी मागून, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हाही तयार असलेले पदार्थ वापरून थाळी बनवून द्यायला पाहिजे होती... आणि खरेच त्या व्यवस्थापनाला चांगले व्यवस्थापन करावयाचे असते तर एखादा विशेष / गोड पदार्थ "ऑन द हाऊस" देऊन त्यांनी गिर्हाईकाचे मन जिंकले असते. असे झाले असते तर हा लेख स्तुतीपर असता.
त्या अभावी आताचे वर्तन "वाईट वर्तन व्यवसायाला भोवू शकते" या विचाराने झालेली उपरती आहे... पण आताच्या घडीला हे ही नसे थोडके ! कारण बाहेर जेवायला जाण्यात बहुसंख्य गिर्हाईकांचा मुख्य उद्देश "मालकाला धडा शिकवणे" असा नसतो तर "परत परत भेट द्यावी असे वाटणारे उत्तम जेवण आणि सेवा मिळणे" हा असतो.
19 Jan 2015 - 1:30 am | मनिष
अगदी मनापासून सहमत! :-)
18 Jan 2015 - 1:06 am | निनाद मुक्काम प...
फोडणीचा भात कोशिंबीर हे उंच इमारतीत राहणाऱ्या आजच्या तरुणाई साठी नेहमीचे खाद्य पदार्थ उरले नाही आहेत.
कार्यालयातील कार्यबाहुल्यामुळे आधुनिक गृहिणी घरी जेवण खुपदा करत नाही , सर्व एका फोनवर घरबसल्या मागवता येत.
अश्या हायटेक लोकांच्या साठी अश्या गोष्टी हॉटेलात पैसे देऊन खाणे हा नॉस्टेल्जिया चा अनुभव देतो.
भारतात आल्यावर घरी मी फोडणीची पोळी फोडणीचा भाताची फर्माईश करतो.
18 Jan 2015 - 12:55 pm | मेतकूत
सर्वप्रथम "मेतकूट"मधून नाराज होऊन गेलेल्यांची मन:पूर्वक माफी मागतो. मराठी खाद्यसंस्कृतीचा झेंडा सर्वभाषिकांमध्ये फडकवण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या लहानशा खानपानगृहाला सुरुवातीसच जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हाला आनंदोत्साहाचे भरते आणि जबाबदारीचे ओझे या दोन्हीचा अनुभव येत आहे. आमची तुलनेने लहानशी जागा, घरी करायला सोपे वाटणारे पण हाॅटेलमध्ये चौदा तासात कधीही ताजे उपलब्ध करण्यास कठीण पदार्थ आणि लांबूनलांबून प्रवास करुन येणारे ग्राहक अशा वस्तुस्थिती व अपेक्षा यात असलेल्या अंतरामुळे काहीजण नाराज होत आहेत, याचे आम्हाला वाईट वाटते. मनापासुन व्यक्त केलेल्या दिलगिरीने समोरच्याच्या मनातले ओरखाडे बुजत नाहीत पण अशांनी कृपया "मेतकूट"ला पुन्हा एक भेट द्यावी. आमचे पाहुणे म्हणून आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. त्याच्या प्रतिक्रिया थेट आमच्याकडे द्याव्यात ज्यामुळे आवश्यक त्या सुधारणा करणे आम्हाला शक्य होईल.
उत्तम प्रतिसादामुळे उतणार नाही मातणार नाही आणि ग्राहकांना पोटभर खूष करण्याचा वसा टाकणार नाही एवढंच या निमित्त आम्ही सांगू इच्छितो.
किरण भिडे, सनी पावसकर - "मेतकूट" ठाणे
18 Jan 2015 - 2:45 pm | गवि
...उत्कृष्ट प्रतिसाद..
साक्षीकाका जाल तेव्हा आम्हालाही बोलवा ;)
18 Jan 2015 - 2:55 pm | गवि
.स्वाद थाळी, खवय्या,पुरेपूर कोल्हापूर, पॉप टेट्स आणि महेश लंच होम येथील प्रचंड यशस्वी कट्ट्यांनंतर..
.पुढचा भव्य मिसळपाव मेंबरकट्टा मेतकूट इथे करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.
19 Jan 2015 - 3:34 am | मुक्त विहारि
अगदी बियर नसली तरी चालते...
हम भी आयेंगा...
20 Jan 2015 - 10:55 am | मदनबाण
"मेतकूट" यांचे व्यक्त केलेले मनोगत आवडले.
कधी तरी अचानक चक्कर टाकुन पहावयास हवे !
@ डॉक
आमच्याकडे असेच रायते मिळते.मी शांतपणे विचारले कि आमचा दही पुरी वाला भैया मे मध्ये सुद्धा गोड दही घालूनच दही पुरी देतो. तो अमुलचे दही वापरतो तुमचे दही आंबट झाले तर तुम्ही त्या ऐवजी बाहेरून दही आणणे आवश्यक आहे.
असांच एक अनुभव आम्हाला ठाण्याच्या हाटिलात आला होता, दहीवडा मागवल्यावर त्यांनी चक्क गोड ताकात बुडवलेल्या वड्यांची डिश आणुन समोर ठेवल्या होत्या,यात दही कुठे आहे ? असे विचारणा केल्यावर दही असेच असते असे उत्तर मिळाले, मग त्याला सांगितले की मी माझ्या आयुष्यातला पहिला दहिवडा तुझ्या हॉटेल मधे येउनच खातो आहे असे तुला वाटते काय ? असा तक्रारीचा सुर ऐकुन झाल्यावर आमच्याकडे दही असचं मिळत ! असे उत्तर मिळाल्यावर आम्ही तिथुन निघालो पण जाताना मी त्याला उत्तर दिले { जे आत बसलेल्या सर्व लोकांनाही व्यवस्थित ऐकु जाईल अशा आवाजात } जिथे ताकाला दही सांगितले जाते अश्या या हॉटेलात परत पाउल ठेवणार नाही, हे लोक एक नंबरचे गाढविचे आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
20 Jan 2015 - 1:15 pm | सुबोध खरे
बाण साहेब
ठाण्यातील "एक" हॉटेल पेक्षा नाव सांगितले असतेत तर जास्त आवडले असते. या लोकांनी माज दाखवायचा आणी आपण मात्र सभ्यपणे राहायचे हे मला पटत नाही. जर तुम्ही आमच्याकडे असेच असते म्हणून सांगता तर तुम्हाला तुमची जागा दाखवणे आवश्यकच आहे असे मी मानतो. एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही परत त्या डॉक्टर कडे पाऊल ठेवता का?
मग जर दमड्या मोजल्या आहेत तर यांची भीड का बाळगायची? ते काही समाजसेवा करीत नाहीत. २०० ग्राम दही आणी अननसाचे चार तुकडे याला जर आपण १५० रुपये मोजत असू तर त्याचे मूल्य परत मिळावे हि अपेक्षा काय चूक आहे? लंगर मध्ये जेवत असाल आणी तेथील दाल अळणी असेल तर गोष्ट वेगळी. दमड्या मोजल्यावर तेथील आचार्याने पदार्थाची चवसुद्धा बघू नये? आणी बिघडली असेल तर सुधारू नये? आणी वर माज दाखवावा याचे कारण आपण ग्राहक असे बोटचेपे धोरण स्वीकारतो म्हणून. मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे. या बद्दल केंव्हातरी धागा टाकायचा मानस होता पण आळशीपणामुळे ते केलेले नाही.
20 Jan 2015 - 1:30 pm | मदनबाण
मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे. या बद्दल केंव्हातरी धागा टाकायचा मानस होता पण आळशीपणामुळे ते केलेले नाही.
लिहा की... आम्हालापण मार्गदर्शन होइल ! :)
बाकी त्या हॉटेलचे नाव आठवले असते तर ते इथे नक्कीच लिहले असते.... हा किस्सा घडुन बराच काळ लोटला आणि नंतर त्या भागात जाणे झाले नाही,त्यामुळे नाव लक्षात येत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
20 Jan 2015 - 3:19 pm | मोदक
मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे
वाचण्यास उत्सुक.
20 Jan 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा
झैरात ;)
20 Jan 2015 - 3:57 pm | मोदक
बरं मग? ;)
20 Jan 2015 - 8:56 pm | सुबोध खरे
आळशीपणाची हो कसली जाहिरात ?*cray2* :'( :'-(*cray2* :'( :'-(
20 Jan 2015 - 10:03 pm | टवाळ कार्टा
ते तुमच्यासाठी नव्हते हो सर
यात मोदकरावांनी त्यांच्या लेखाची लिंक देउन "झैरात" केलेली...मी फक्त काही अस्सल (कुजकट??) मिपाकरांच्या सवयीनुसार प्रतिसाद दिला
आणि
हे लिहून मोदकरावांनी त्याला पोचपावती दिली =))
18 Jan 2015 - 2:52 pm | आदूबाळ
सकारात्मक प्रतिसाद आवडला. तुम्हाला शुभेच्छा.
19 Jan 2015 - 12:56 am | आजानुकर्ण
शुभेच्छा
18 Jan 2015 - 10:02 pm | सुबोध खरे
मेतकूट साहेब
दोन वाजता आरक्षण करून २. ४५ ला जागा मिळाली हि गोष्ट साधी नव्हे
"थाळी संपली आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले"
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
हि नव्याची नवलाई चार दिवस असू शकते परंतु जर ग्राहकाचे समाधान हा जर आपला केंद्रबिंदू नसेल काळाच्या ओघात कठीण होत जाते.
या ओळी पाहून कुणालाही असेच वाटेल कि जर वाट पाहून कोशिंबीर आणि फोडणीचा भातच खायचा असेल तर मराठी म्हणून अभिमानाने हाटेलात का जायचे?
जर मी मराठी थाळी खायला आलो आणि कोशिंबीर आणि फोडणीचा भात खाऊन परत जावे लागले तर मी परत त्या हाटेलात पाय ठेवणार नाही हे नक्की.
ठाण्यातीलच एक हाटेल रॉयल च्यालेंज मध्ये आम्ही नोव्हेंबर २०१३ मध्ये पाईन एपल रायते मागवले तेंव्हा त्यातील दही "करकरीत" आंबट होते. ( दही खाताना दात करकरले तर त्याला करकरीत आंबट म्हणतात). मी त्याबद्दल तक्रार केली असता त्यांनी गरमी मुळे दहि आंबट होते म्हणून सांगितले. आम्ही परत घेऊन जा आणि दुसरे आणा सांगितल्यावर त्यांनी त्यातच शुगर सिरप( साखरेचा पाक फ्रेश लाइम सोडा वाले ) घालून आणून दिले. आम्ही त्याबद्दलची तक्रार वरिष्ठ व्यवस्थापकाकडे केली असता त्यांनी आमच्याकडे असेच रायते मिळते.मी शांतपणे विचारले कि आमचा दही पुरी वाला भैया मे मध्ये सुद्धा गोड दही घालूनच दही पुरी देतो. तो अमुलचे दही वापरतो तुमचे दही आंबट झाले तर तुम्ही त्या ऐवजी बाहेरून दही आणणे आवश्यक आहे. त्यावर त्यांनी आमच्या कडे असेच आहे हे सांगितले ताबडतोब पुढच्या सर्व ऑर्डर आम्ही रद्द केल्या आणि तिथून बाहेर पडलो. zomato सारख्या जालावर त्याचा साद्यंत इतिहास लिहिला आणि आजतागायत तेथे पूल ठेवलेले नाही यात आम्ही कमीत कमी २५ मित्र आणि परिवार असू.
असो
आपला खुलासा वाचला गैरसमज झाला असेलहि परंतु ज्याअर्थी एखादा माणूस लिहितो त्याअर्थी त्यात थोडेतरी तथ्य नक्कीच आहे असे मी मानतो. आपल्या हॉटेलला जरूर भेट देऊ पण हाच अनुभव परत आला तर …।
शेवटी माणूस हॉटेलात जातो ते एक दुपार किंवा संध्याकाळ मजेत घालविण्यासाठी त्यासाठी तो घरच्या पेक्षा तिप्पट( किंवा जास्त) किंमत मोजत असतो. त्यामुळे आपल्या पैश्याचे मुल्य मिळाले पाहिजे हि अपेक्षा असते त्याशिवाय एका संध्याकाळीवर विरजण घालणारा अनुभव जर आला तर तो सहजासहजी विसरता येत नाही
जाता जाता --- मुलुंड मधील काही हॉटेल्स "नम्रपणे" फोनवर सांगतात, "साहेब, शनिवारी आणि रविवारी आम्ही आरक्षण ठेवत नाही. आणि हे पटण्यासारखे आहे. कारण एखादी व्यक्ती येउन बसली तर तिला विविक्षित वेळेत उठवणे शक्य नाही हे मान्य.
19 Jan 2015 - 1:38 am | मनिष
बरोबर आहे!! 'आमच्याकडे असेच मिळते' अशा उत्तरावर असेच केले पाहिजे!
19 Jan 2015 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
सकारात्मक प्रतिसाद, आवडला.
चुका सगळेच करतात... मात्र त्या मान्य करून, समजावून घेऊन, सुधारणा करणारेच प्रगती करू शकतात.
तुमचे यश उत्तरोत्तर वर्धित होत जावे हीच एक मराठी माणुस म्हणून सदिच्छा !!!
19 Jan 2015 - 4:43 pm | अनुप ढेरे
किती प्रतिसादांचं स्वसंपादन कराल एक्का काका!!
19 Jan 2015 - 4:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढच्या वेळेला चुकार शब्द बदलायला तुम्हाला विनंती करेन, बास ! +D
19 Jan 2015 - 5:03 pm | अनुप ढेरे
हे आणि वर खिजवणं दुसर्याला!
19 Jan 2015 - 5:22 am | रमेश आठवले
सर्वसाक्षी यांना आपल्या मेतकुट या नवीन उपक्रमात खूप वाट पाहिल्यावर जेवल्या शिवाय परत फिरावे लागले. या विषयावर बरीच आणि सविस्तर चर्चा झाली आहे. त्यातून एक निष्पन्न हे निघाले कि सध्या आपले हॉटेल अल्पावधीत खूप लोकप्रिय झाले आहे. या मुळे आमच्यासारख्या दूरस्ताना तेथे खास मिळणार्या पदार्था विषयी कुतूहल निर्माण झाले आहे. तरी तुमचा मेनू याच चर्चेत -अर्थात संपादकीय संमतीने -आपण टाकलात तर पुढे मागे त्याचा लाभ घेण्याचा विचार करता येईल .
बराच उहापोह झाल्यांनतर आपण आवर्जून मिपा चे सदस्य झालात आणि आपली दिलगिरी व्यक्त केली या बद्दल आपले अभिनंदन.
18 Jan 2015 - 6:18 pm | vikramaditya
आलेला अनुभव निराशाजनक होता ह्यात दुमत नसावे. व्यवस्थपनाचा प्रतिसादही योग्य वाटला.
ह्या निमित्ताने जी चर्चा झाली त्या अनुषंगाने असे म्हणेन की कधी कधी काही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे अशक्य असते.
उदा. पॅकेज टूर मध्ये निघालेल्या काही व्यक्ती टूर सुरु झाल्या पासुन फक्त भांडतच असतात. तुम्ही अमुक कबुल केले मग तमुक का दिले असे क्षुल्लक गोष्टींवरुन वाद घालत राहतात ते टूर संपेपर्यंत... जर काही major breach of commitment असेल तर गोष्ट वेगळी, पण सतत 'निट-पिकिंग' करत राहण्या-यांना संतुष्ट करणे फार कठीण असा ही एक अँगल आहे.
19 Jan 2015 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे
सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा म्हणजे मोठ्या संख्येने अनेक प्रकारची माणसे येणे गृहीत आहे... आणि (काही अतिरेकी उदाहरणे सोडता) त्या सर्वांना यशस्वीपणे सेवा देणे हा त्या व्यवसायाचा आवश्यक अंगभूत भाग आहे.
म्हणूनच सेवा व्यवसाय दीर्घकाळ व्यवस्थितपणे करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे !
19 Jan 2015 - 12:27 am | रेवती
सहमत. या धाग्याच्या निमित्ताने मलाही चार गोष्टी शिकायला मिळाल्या. उपहारगृह व्यवसायात कष्ट असतात हे जाणून होते पण यानिमित्ताने ते किती असू शकतात व ग्राहकाचे समाधान कसे करावे, असमाधानी ग्राहकाशी वर्तन कसे असावे यासारख्या गोष्टींकडे बघता आले. मिपाकर पेठकरकाकांबद्दल आदर दुणावला. मेतकूट मालकांचा प्रतिसादही आवडला.
19 Jan 2015 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे
आताच एका दुसर्या धाग्यावर लीडर आणि मॅनेजर यांच्यावर चर्चा चालू आहे...
सेवा व्यवसाय उत्तम चालण्यासाठी मालक उत्तम लीडर असणे आवश्यक आहे आणि व्यवसायात काम करणारा इतर प्रत्येक माणूस त्याला नेमून दिलेल्या कामाचा उत्तम मॅनेजर असणे आवश्यक असते... मॅनेजर नावाची व्यक्ती केवळ "सेकंड लेवल रिस्क मॅनेजमेंट" असायला हवी.
19 Jan 2015 - 12:37 am | रेवती
ओक्के. धागा वाचला नाही . आता वाचते.
19 Jan 2015 - 12:48 am | अर्धवटराव
सहसा मिपावर सदस्यता मिळवायला महिनाभरापेक्षा जास्त वेळ लागतो. हा धागा सुरु होण्यापूर्वीच जर 'मेतकुत'चि सदस्यता रिक्वेस्ट आलि आहे का माहित नाहि, पण तसं नसल्यास हल्लि मिपावर सदस्यता लवकर मिळु लागली आहे हे बघुन बरं वाटलं.
19 Jan 2015 - 4:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
मेतकूट या शब्दाचे मराठीत एकापेक्षा जास्त अर्थ आहेत ! :) ;)
23 Jan 2015 - 3:57 pm | पूनम खरे
maraathit type karane bhayankar watat aahe. kahi marathi akshare yetach nahit.
koni madat karu shakel ka?
23 Jan 2015 - 9:41 pm | हाडक्या
मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे आहे .
क्रोम वापरू नये त्यात टायपिंग गंडते.
बादवे तुम्ही इथल्या डॉ. खरेंच्या कोणी आहात काय ? :)
27 Jan 2015 - 1:43 pm | सुबोध खरे
आमच्या चुलत बहिणीचे नाव पण पूनम ( पौर्णिमा) आहे. पण या "त्या नव्हेत". मी आमच्या पुनमला फोन करून विचारले तेंव्हा तिने मिसळपाव चे सदस्यत्व घेतलेले नाही असे सांगितले.
या पुनम ताई महेश अशोक खरे यांच्याशी संबंधित आहेत काय ( किंवा डू आय डी) हे पाहिले पाहिजे.
27 Jan 2015 - 6:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खरे-खोटे करुन पाहिले पाहिजे =))
(ह.घ्या.) :)
27 Jan 2015 - 7:59 pm | हाडक्या
"खरे" नावाचे सर्वच आयडी, डुआयडी महापराक्रमी असे ऐकून आहे. (खरंच, चेष्टा नव्हे!) ;)
24 Jan 2015 - 2:53 am | बहुगुणी
सर्वसाक्षी यांचा अनुभव, त्यावरील साधक-बाधक चर्चा आणि त्यानंतर मेतकुट उपहारगृहाच्या चालकांचा सकारात्मक प्रतिसाद वाचल्यावर वाटलं की मिसळपाव डॉट कॉम हे केवळ एक भावना व्यक्त होण्याचं ठिकाण न राहता या संस्थळाची अनावृत्त ग्राहक व्यासपीठ म्हणून वाटचाल सुरू झाली आहे!
एक ग्राहक-मंच म्हणून विभागच सुरू करायला हरकत नाही, जिथे ग्राहक म्हणून आलेल्या भल्या बुर्या अनुभवांची नोंद केली जाईल, आणि व्यावसायिकांना आपली बाजू मांडायला (आणि झाल्या असल्यास चुका सुधारायला :-) ) संधी दिली जाईल.
25 Sep 2015 - 12:25 am | बोका-ए-आझम
असेच म्हणतो.
27 Jan 2015 - 1:16 am | महेश अशोक खरे
श्री. सर्वसाक्षी यांना मेतकूट हॉटेलमध्ये आलेल्या वाईट अनुभवानंतर मिसळपाववर झालेली खमंग (काहीवेळा जळजळीतही) चर्चा वाचली. थोडी गंमत, थोडी खंत वाटली. एकूणच समाजामध्ये संयम कमी झाला आहे याचा आणि तो अजिबात संपलेला नाही याचाही पुनःप्रत्यय आला. श्री. सर्वसाक्षी यांना आलेला अनुभव आणि त्यांचा संताप एकवेळ समजू शकतो पण त्यावर इतर काहींनी दिलेल्या प्रतिक्रियामात्र खटकल्या. सर्वसाक्षी यांना दोन ऐवजी पावणेतीन वाजेपर्यंत ताटकळावे लागले. त्यामुळे त्यांचे संतापणे स्वाभाविक आहे. थाळी मागितल्यावर ती संपली आहे असे उत्तर मिळाल्यावर आलेला रागही समजू शकतो. पण ‘जेवण संपलय असे का सांगता? असे विचारल्यावर आ ला कार्टे मागवा. असे मग्रुर उत्तर मिळाले.....’ या वेळचा राग कळू शकत नाही. आ ला कार्टे म्हणजे स्वतंत्रपणे पोळी किंवा भाकरी, मेनुतील हव्या त्या भाज्या, स्वीट डिश अशी ऑर्डर केल्यास त्यांना तेथे जेवण मिळू शकले असते असे वाटते. त्याहीनंतर पदार्थ, सेवा चांगली मिळाली नसती तर त्यांचे चिडणे १००% वाजवी ठरले असते असे मला वाटते. मला जेव्हा अशा प्रकारचा अनुभव येतो तेव्हा मी तेथे उपस्थित असलेल्या सर्वात मोठ्या पदावरील व्यक्तीला ताबडतोब भेटून माझे म्हणणे त्याच्या कानावर घालतो. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर त्याच्यावर कायमची फुल्ली मारतो. खूपच संतापलो तर माझा अनुभव इतरांनाही सांगतो. मात्र तोही अशा स्वरूपात की अबक ठिकाणी मला असा अनुभव आला तुम्ही काय करायचं ते ठरवा. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे श्री. सर्वसाक्षी यांनी जास्त जळजळीतपणे इतरांना गैरसोय, अपमान, मनस्ताप सहन करण्यासाठी मेतकूटला जा असे सांगितले. असो.
हा अनुभव वाचून आलेल्या इतर अनेक प्रतिक्रियामात्र पचण्यास कठीण होत्या. ‘हॉटेल मालकाची गुर्मी जिरवा...., चार दिवसात सुतासारखे सरळ येतील..., धडा शिकवलाच पाहिजे..., लवकर अक्कल येण्यासाठी रिव्ह्यु लिहायलाच पाहिजे...’’
काळा पहाड या सद्ग्रहस्थांनीतर सनी पावसकर या नावावरून हॉटेलमालकाचे व्यक्तिमत्त्वच गुंडपणाचे ठरवले. हा तर केवळ अविचारीपणा नाही का? म्हणजे यांना माहित असलेले तथाकथित सनी नावाचे आणि वेगळ्या आडनावाचे गुंड नगरसेवक पुण्यात असल्यामुळे जगातले सर्व सनी नावाचे लोक गुंड व्यक्तिमत्त्वाचे असल्याचा शिक्का ठोकून श्री. काळा पहाड मोकळे होणार. या न्यायाने दाऊद किंवा गवळी नाव असलेले सर्व डॉन आणि पांडुरंग किंवा धर्माधिकारी नाव असलेले सर्वजण संत होतील. त्यांचे स्वतःचे टोपणनावही गुप्तहेर सदृश असल्याने त्यांनी हे शोध लावले आहेत का? श्री. मदणबाण यांनी तर मेटकूटला स्वतः अनुभव न घेता रद्दडकूट ठरवून टाकलं. वर ‘ग्राहकांना सेवा देता येत नसेल तर हॉटेल बंद करा‘ अशी तंबी देण्याचा सल्लाही दिला. बर्याचवेळा आपण सर्वच जण उचलली ‘जिभ लावली टाळ्याला’ अशा स्वरुपात प्रतिक्रिया देऊन टाकतो. ’’या तेंडूलकरला ना रिटायर केलं पाहिजे...’’ असं एखादा, गल्ली क्रिकेटमध्येही बॅट हातात न धरलेला सहजपणे म्हणून जातो. ‘‘पाकिस्तानवर सरळ हल्लाच का करत नाहीत हे आर्मीवाले?’’ असं एखादा, लोकलमध्ये चढताना दोन गाड्या सोडाव्या लागणारा तावातावाने म्हणतो. एवढंच कशाला ’अमक्या तमक्याने घटस्फोट घ्यायला नको होता.’ असं त्या प्रकरणाची दोन्ही बाजूंची काहीही अथवा पूर्ण माहिती नसताना एखादा मत व्यक्त करतो. आपण काय बोलतोय? कुणाबद्दल बोलतोय? आपल्याला त्या विषयी थोडीतरी वस्तुस्थिती माहित आहे का? आपण आपल्याला आलेल्या लहानशा अनुभवाचे सार्वत्रीकरणतर करत नाही आहे ना? असा कोणताच विचार आपण मत देताना, प्रतिक्रिया व्यक्त करताना करत नाही का?
सोशल नेटवर्कवर तर बर्याच वेळा याचा अतिरेक आणि काही जणांवर नक्कीच अन्याय होतो. ‘आलिया भट खरोखरच एवढी मठ्ठ आहे का? असा प्रश्न कुणाला कधी पडत नाही का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवेळी असा अनुभव प्रकाशित केल्यावर संबंधित व्यक्तीला खुलासा करण्याची संधीही मिळत नाही. जी सुदैवाने यावेळी मेतकूट मालकांना मिळाली. त्यांनी केलेला खुलासा व मागितलेली माफी आवडली. मात्र त्यांनी सेवा व दर्जाबाबत जास्त जागरूक राहणे आवश्यक आहे. चांगला प्रतिसाद व प्रसिद्धी या अपेक्षा निर्माण करतात आणि वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास काय होते याचा अनुभव भारतीय क्रिकेटपटूंनी अनेकवेळा घेतला आहेच. तसे त्यांचे न होवो.
या सर्व चर्चेत सर्वश्री धर्मराज मुटके, प्रभाकर पेठकर, वेल्लाभट, मृत्युंजय यांच्या प्रतिक्रिया समंजस व संतुलित होत्या. श्री. किसन शिंदे यांनी तर ‘हा सूर्य हा जयद्रथ’ करून पाहिले आणि स्वतःचा सकारात्मक अनुभव लिहिला याचे कौतुक वाटले.
मिसळपाव वर पुढेही स्वतंत्र अनुभव लेखनाच्या स्वरुपात व्यक्त व्हायला आवडेल.
महेश अशोक खरे
27 Jan 2015 - 10:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख परत एकदा नीट वाचा एवढचं म्हणतो.
27 Jan 2015 - 11:58 am | काळा पहाड
मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५
२७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours
श्री. महेश अशोक खरे यांच्या आत्तापर्यंतच्या बाकीच्या पोस्टसः 0
हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?
27 Jan 2015 - 1:31 pm | महेश अशोक खरे
श्री. काळा पहाड यांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले. त्यांच्या मताविरुद्ध लिहिले म्हणजे मी मेतकूटचे समर्थन करण्यासाठी
आय.डी. बनवला आहे हे म्हणणे अन्यायकारक आहे. वादासाठी ते खरे आहे असे गृहीत धरले तरी त्यामुळे माझे मुद्दे चुकीचे ठरत नाहीत. मिसळपाव या छान साईटवर नवीन सदस्यांनी फक्त छान छान ! वा वा !
अशा प्रतिक्रिया द्याव्यात काय? हे म्हणजे कॉलेजमध्ये/ऑफिसमध्ये ज्युनिअर्सनी सिनिअर्सच्या हो ला हो केल्यासारखे होईल. असो. हा विषय मी माझ्याकडून थांबवतो. पुढे अन्य लेखांविषयी प्रतिक्रिया देताना किंवा स्वतंत्रपणे इतर विषयावर सुचेल तेव्हा लिहेन.
माझा लोकशाहीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे श्री. काळा पहाड यांच्या
मताचा मी आदर करतो आणि माझे वेगळे मत मी मांडतो.
27 Jan 2015 - 3:49 pm | हाडक्या
(अवांतर : तुमच्या मुद्द्यांबद्दल काही म्हणणे नाही हे आधीच नमूद करतो.)
ह्या ह्या ह्या.. हाय कंबख्त तुमने मिपा वाच्या ही नही .. :)
सदस्यत्व घेण्याआधी मिपा वाचले असेल तर (तशी काही पूर्वअट नाही हो, तरी पण) तुमच्या लक्षात येईल की इथे कोणाच्याही धोतरास हात घातला जातो. उगी जास्त पत्रास ठेवली जात नाही.. दांभिकास दांभिक त्याच्या तोंडावर म्हणतात.. उगी "चान चान" म्हणण्याची कोणाकडून ही शक्यता तशी कमीच.
इथले संपादक आमचेच असतात, आणि वर्गातल्या मॉनिटर झालेल्या पोरांना बाकीची पब्लिक जसा तरास देते तसाच इथे संपादकाना पण हक्काचा तरास दिला जातो. (त्यावर ते कितीपण तक्रार करु देत मग ;) )
मिपावर "चान चान" पणाचा आरोप केलात तर खरेसाहेब, तुमचे काही "खरे" नाही..
(नावावरच्या श्लेषाचा विनोदासाठी सपक प्रयोग.. हलके घ्या, नायतर घेऊ नका, तुमची मर्जी )
27 Jan 2015 - 5:09 pm | महेश अशोक खरे
मा. हाडक्याभाऊ,
तुमचं म्हणणं खरं आहे काही अंशी. मी नवा नवाच मिपाकर असल्याने मिपावर प्रकाशित काही मजकूराचाच आनंद घेऊ शकलोय.
पण तुमची एक मात्र गल्लत झाली आहे असे वाटते. मी मिपाच्या संपादक मंडळावर किंवा मिपावर कोणताच आरोप केलेला नाही. मला हा सर्व परिवार आवडलाय. मी केवळ श्री. काळा पहाड यांच्या प्रतिक्रियेवर प्रतीप्रतिक्रिया दिली
एवढंच. असो.
सध्या खर्याची दुनिया नाही हा आमचा अनुभव आहेच.
(ह्ये केवळ गंमतीने लिवले हाये. आमी आमच्याच नावावर कोटी करू शकतो. त्यामुळे तुम्ही केलीत तरी हरकत नाही.
केवळ दैवगतीने खरेकुलात जन्मलो. खैरे किंवा खुरमांडीकर असतो तरी काय करणार होतो?)
28 Jan 2015 - 5:09 am | हाडक्या
ठिक .. आम्ही पण असे नाय म्हटले की तुम्ही संपादकांवर कसले आरोप करताव म्हणून. ती आगावू माहीती होती हो.
लई झाले की "बाई मला हा मारतोय बगा" म्हणित जायचे संमंकडे, त्यासाठी सांगून ठेवलं. हाकानाका. ;)