तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते. त्याचे ओठ हलकेसे स्मित करत आहेत असा भास एकाद्याला त्याच्याकडे पाहताना नक्कीच झाला असता.
त्याचा प्रवास सुरु होऊन खूप काळ लोटला होता, अंगावरील एकुलती एक देवदुष्या जीर्ण होऊन कधी मागे राहिली याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती, आता दिगंबर अवस्थेत त्यांचे भ्रमण सुरु होते. त्यांचा निवास हा निसर्ग निर्मित व कधी कधी मोकळ्या असलेल्या एखाद्या झोपडीत किंवा धर्मशाळेत होत असे, पण त्याचा ओढा खरा निसर्गाकडेच राहिला. असाच एक दिवस प्रवास करत करत एका जंगलातून जाताना त्याला वाटले की ही जागा योग्य आहे, आपल्या चिंतन व तप यासाठी. एक मोठा असा वृक्ष ज्याच्या फांद्या अजस्त्र अश्या आपल्या भुजा फैलावून आकाशाला गवसणी घालाव्यात या प्रमाणे पसरल्या होत्या, अश्या त्या वृक्षाची निवड केली व त्याच्या बुंध्याजवळ आपले आसन लावले. तो मिताहारी असला तरी भूक ही शेवटी शारीरिक गरज होती, तेव्हा जवळपासच्या गावात जाऊन भिक्षा घेण्यासाठी फेरी मारत असे, रसस्क्ती नव्हती ना स्वाद इच्छा. जो जे जे आहार देईल तो स्वीकारणे योग्य ते बाजूला ठेवणे व अयोग्य ते निसर्गास परत देणे, भिक्षा न मिळाली तर रिक्तहस्ते परत जाणे हा दिनक्रम चेहऱ्यावरील संतोष व आनंद न ढळू देता चालू असे. अश्याच एक दिवशी भिक्षा घेऊन आपल्या तपस्थळवर तो परत आले. अन्नग्रहण झाले व पुन्हा त्याने आसन लावले व शांतमुद्रेत तपामध्ये लीन झाला.
थोड्याच वेळात, पाला-पाचोळा तुडवत, हातातील फांदी टेकत तो वृद्ध तेथे पोचला व त्याच्या समोर एक जागा पाहून तेथे बसला. थोड्यावेळाने तो वृद्ध बोलता झाला व म्हणाला “मागील वार्तालाप व आजचा दिवस यात काय अंतर निर्माण झाले?” त्यांने हळूवारपणे डोळे उघडले व वृद्धाकडे पहात एक स्मित हास्य केले व म्हणाला “शेवटची आसक्तीकारक वस्तू देखील जीर्ण होऊन विरून गेली. एका प्रश्नातून अनंत प्रश्न उभे राहिले. ईश्वर म्हणजे कोण? हा प्रश्न सध्यातरी मोठा आहे. उत्तर मिळेल असे वाटत आहे.” तो वृद्ध एकदम सावरून बसला व म्हणाला “समजावून सांग. माझ्या माहीतीनूसार, तो ईश्वर म्हणजे निर्माता, त्राता व नष्टकर्ता! त्यानेच हे जग, हे विश्व, सगळे जीव जंतू, हा निसर्ग उभा केला. तोच कर्ता-धर्ता या जगाचा. सर्व शक्तीमान असा तो एकमेव. हे सर्व विश्व त्याने निर्मिले व नष्ट देखील तोच करणार. सुख-दु:ख याचा प्रत्येक जिवाचा वाटा त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या जीवाला भोगण्यास देणे हे देखील त्याचे कार्य.”
त्याने वृद्धाकडे पाहीले व हलकेसे स्मित करत तो म्हणाला ”स्थविर, तुम्ही जो ईश्वर म्हणत आता, तो कर्ता-निर्माता आहे, पण तो सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय असा तो नाही आहे. मी ईश्वर नाकारत नाही आहे. पण त्याचे एकमेव तोच कारणीभूत सर्वासाठी हे नाकारतो आहे. द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव ही चार विश्वे आहेत. तो ईश्वर देखील आपल्याच प्रमाणे गतिमध्ये अडकलेला आहे, चार गति आहेत, देव गति, मानव गति, तिर्यञ्च गति, नरक गति. सर्व जीवाप्रमाणे ईश्वराला देखील या गतिमधून प्रवास करावा लागतो.” वृद्धाने नकारात्मकता दर्शवत आपली मान हलवली व म्हणाला “ज्याने हे निर्माण केले त्यालाच हे भोग कसे काय सहन करावे लागतील? निर्माता कधी आपल्याच निर्माण केलेल्या भवनामध्ये हरवू शकतो?” तो हसला व म्हणाला “ तुमच्या मते जर ईश्वर सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय आहे तर तो गतिमध्ये असणेच शक्य नाही. मग असे का? ठराविक काळाने ब्रम्ह बदलतो, नवा इंद्र, नवे देव येतात, इतर वर नव्हे तर इतर देव देखील त्यांच्या ठरलेल्या काळाने निघून जातात, त्याचे पद जाते व त्या पदावर नवा देव उभा राहतो. शेकडो जप-तप आणि पुण्य केले की इंद्रपद प्राप्ती होते ना?”
वृद्ध चपापला, थोडे सावरून बसला व म्हणाला “ मुनिवर्य, मग ईश्वर देखील आपल्या सारखाच? सुख-दु:ख आणि या विश्वाच्या चक्रात अडकलेला?” त्याने स्मित केले व म्हणाला ”त्यांना थोडे वेगळे ज्ञान मिळाले, ज्यामूळे ते देवत्वाला पोचले. सहा द्रव्याचे ज्ञान जर तुम्हाला झाले तर तुम्ही देखील ईश्वरपदी, जरी नाही पण देवपदी नक्कीच पोचाल. ते सहा द्रव्य आहे, जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ. सहा द्रव्य, सात तत्त्वे जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष याचे ज्ञान तुम्हाला त्या पदावर पोचवेल.”
वृद्ध म्हणाला “ देव, आज तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप सांगितले, अजून चर्चा अपेक्षित आहे. पण आता निघावयास हवे, ईश्वर यावर अजून प्रश्न. तुमचे मत आणि उत्तरे पुढील भेटीत मिळतील अशी आशा करतो” असे म्हणून वृद्ध बाजूच्या वेलीचा आधार घेत उभा राहिला, व त्याच्याकडे पाहून समाधानाने हसला आणि जाण्यासाठी वळला, तोच तो म्हणाला “ स्व:ताच्या विवेकाने सद्भूत तत्त्वांच्या अस्तित्वावर तुमची आंतरिक श्रद्धा बसली असेल तर, असे म्हणा की तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप समजावून घेतले, कारण यालाच सम्यकत्व म्हणता येईल. अजून प्रश्न जसे तुम्हाला आहेत, तसेच माझ्यासमोर देखील आहेत. आता पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी, पुढील प्रवास. भेटू असेच पुन्हा.”
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज होते व ओठांवर स्मित!
शब्द-संदर्भ
- स्थविर – श्रुत, ज्ञान, वय याने मोठा, अनुभवी
- तिर्यञ्च गति – एखादा मेलेला जीव, तिसर्याचे शरीर धारण करतो ती अल्प गति
प्रतिक्रिया
28 Aug 2014 - 10:57 pm | विलासराव
वाचतोय. जमल्यास मोठे भाग टाका.
28 Aug 2014 - 11:15 pm | दशानन
विलासराव, हा भाग जरा मुद्दाम लहान केला आहे, कारण पुढील भाग, हा पुर्णपणे वैचारिक आणि तत्त्वज्ञान यावर आधारित आहे, व तो खूप मोठा होणार आहे. लय जपणे एवढाच उद्देश आहे. नेहमी प्रमाणे जे जे लिहतो आहे ते ते प्रकाशित करतो आहे. त्यामुळे लेखन लांबी विचार घेत नाही आहे. :)
29 Aug 2014 - 10:54 am | विलासराव
धन्यवाद.
जमेल तसे लिहा.
आपला आवडीचा विषय आहे हा ,म्हनुन वाचतो आहेच.
28 Aug 2014 - 11:20 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
स्थविर शब्द पाहून हीनयान (थेरवादी/स्थविरवादी) बौद्ध पंथाची आठवण झाली.
28 Aug 2014 - 11:22 pm | दशानन
>>>बौद्ध पंथाची आठवण झाली
बुद्धाच्या काळात महावीर होते, त्यांची प्रत्येक्ष भेट झाली की नाही, हे माहिती नाही. याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत, पण दोघांची भाषा, विचार, जन्म (स्वप्न इत्यादी) यात खूप साम्य आहे.
28 Aug 2014 - 11:27 pm | प्रचेतस
हो.
साधारण कालखंड एकच आहे.
अगदी नंतरची आयकॉनोग्राफीसुद्धा बरीच समान आहे.
28 Aug 2014 - 11:33 pm | दशानन
एस.. म्हणून मध्यंतरी असा मत प्रवाह निर्माण झाला की आधी, गौतम यांचा बुद्ध धर्म व नंतर जैनधर्म. पण नंतर असे मान्य झाले की, महावीर हे २४ व्ये तीर्थंकर, म्हणजे आधी २३ तीर्थंकरानी याच विचार धारेचा पुरस्कार केला. पण मी अजून शाशंक आहे याबद्दल. शक्यतो, वैदिक धर्म त्याग करणारे दोन गट असतील, एक ज्यांनी पूर्णपणे वैदिक मते नाकारली व एक ज्यांनी गरजेपूर्ती / विचारांशी मेळ असलेली स्वीकारली व बाकी नाकारली.
28 Aug 2014 - 11:42 pm | प्रचेतस
सहमत.
जैनांचे महावीरांआधीचे तीर्थंकर ही संकल्पना मला काहीशी इस्लामसारखी वाटते. जसे प्रेषित मुहम्मद हे शेवटचे. पण आधीचे प्रेषित थेट अॅडम, नोहा वैग्रेपासून.
शिवाय यातील बहुतांश तिर्थंकर हे पौराणिक ग्रंथांतील दिसतात. उदा. २२ व तिर्थंकर नेमिनाथ. हे थेट कृष्णाचे चुलतबंधू असल्याचे जैन धर्मिय मानतात.
28 Aug 2014 - 11:48 pm | दशानन
२४ पैकी फक्त तीन तीर्थंकर याचे अस्तित्व होते, असे आज मान्य केले जाते (यात खूप गोंधळ आहे, पण पुराण, धर्मग्रन्थ, इतर काही पुरावे धरून) एक वृषभनाथ, दुसरे नेमीनाथ व तिसरे महावीर. बाकीच्या बद्दल कुठलाही अगदी लोककथेमध्ये पण पुरावा नाही आहे.
*वृषभनाथ, रामायण मध्ये येतात.
28 Aug 2014 - 11:56 pm | प्रचेतस
पार्श्वनाथांबद्दल पण काही उल्लेख नाहीत का?
महावीरांनंतरचे ते सर्वात जास्त प्रसिद्ध तीर्थंकर.
धरणेन्द्र यक्ष, कमठ राक्षस ह्या सगळ्या कथा नंतरच्या का?
तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.
29 Aug 2014 - 12:03 am | दशानन
>>>तसेही गौतम बुद्धांचा मारविजय आणि पार्श्वनाथांचे कमठविजय यात प्रचंड समानता आहे.
यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.
पार्श्वनाथांबद्दल 'महाभारतात' उल्लेख येतो, पण ते पार्श्वनाथ ते हेच याबद्दल देखील संदेह आहे.
जैनधर्मामध्ये कालगणना एवढी विचित्र आहे की, साधे उदा. महावीर यांचा जिवनकाल हा लाखो वर्ष लिहतात, सांगतात :( अजून सखोल वाचन सुरु आहे. पण त्याकाळात एकच नाव असलेली व्यक्ती अनेक होत्या.
महावीर यांचा प्रिय शिष्य याचे नाव देखील "गौतम" होते.
29 Aug 2014 - 12:14 am | दशानन
याच वेळी, महावीर यांचे दुसरे तप चालू होते तेव्हा "मूळ" गौतम यांना मोक्ष प्राप्त झाला होता. मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जाते, म्हणजे, महावीर वयाच्या 30व्या वर्षी घरातून बाहेर पडले व दोन तप १२-१२= २४ वर्ष.. जेव्हा महावीर ५४ व्या वर्षी होते तेव्हा गौतमबुद्ध हे मोक्षगतीस प्राप्त झाले होते. शक्यतो भेटले देखील असतील. कोण जाणे.
29 Aug 2014 - 12:24 am | प्रचेतस
भेट झाली नसावी असे मला वाटते. नाहीतर समकालीन किंवा तदनंतरच्या साहित्यात याबद्दल काही उल्लेख नक्कीच आले असते.
शिवाय दोन्ही धर्मांच्या विचारधारा वरकरणी जरी सारख्या वाटल्या तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत.
29 Aug 2014 - 11:00 am | विलासराव
मोक्ष समयी गौतमबुद्ध हे ८३ वर्षाचे होते असे मानले जात
माझ्या माहितीप्रमाणे गौतमबुद्धाने २९ व्या वर्षी घर सोडले, ३५ व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. ८० व्या वर्षी महापरीनिर्वान झाले त्यांचे. अर्थातच त्यांची शिकवण महत्वाची आहे. बाकी गोष्टी गौण आहेत.
29 Aug 2014 - 11:05 am | विलासराव
http://misalpav.com/comment/reply/28662/606780
बुद्द साहित्य इथे उपलब्द्ध आहे.
12:00 noon to 4:00 pm - Monday to Friday (Wednesday Closed)
12:00 noon to 5:00 pm - Saturday & Sunday
‘Pariyesana Potthakalaya / Research Library’
http://misalpav.com/comment/reply/28662/606780
29 Aug 2014 - 11:28 am | संजय क्षीरसागर
लेखन (बहुदा) बाकी गोष्टींवरच होणार आहे. ज्याचा `ऐतिहासिक आभ्यास' म्हणून काहीएक उपयोग असेल. आणि प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील.
`अहिंसा परमो धर्मः' या महावीराच्या अल्टीमेट शिकवणीवर (पंचशीलाचा मागोवा घेत) चर्चा, बहुदा बराच ऐतिहासिक उहापोह झाल्यावर होण्याची शक्यता दिसते (किंवा ती देखिल होण्याची शक्यता कमीच).
29 Aug 2014 - 9:06 pm | दशानन
>> प्रतिसादांचा रागरंग पाहाता चर्चाही त्याच अंगानं घडत राहातील.
हे काथ्याकूट मध्ये नसून "जनातलं मनातलं" मध्ये. येथे मला चर्चा अपेक्षीतच नाही आहे ना, वाद-विवाद.
मी एक कादंबरी प्रकारात लेखन करतो आहे व जेथे जेथे हवे तेथे तेथे लेखन स्वातंत्र्य घेतो आहे.
29 Aug 2014 - 9:09 pm | दशानन
विलासराव, अडीच हजार वर्षापुर्वीच्या घटणेबद्दल लिहिताना 2-३ वर्ष इकडे तिकडे धरून चालायलाच हवे :)
29 Aug 2014 - 9:17 pm | विलासराव
अगदी खरय.
लिहा वाचतो आहेच मी.
29 Aug 2014 - 2:54 am | आयुर्हित
सोनिजी की नसियत: हे अजमेर येथील मंदिर भगवान ह्रुषभदेव उर्फ आदिनाथ यांना वाहिलेले मंदिर आहे. भगवान ह्रुषभदेव हे इक्ष्वाकू वंशातील राजा भरत व भगवान रामाचेही पुर्वज आहेत, ज्यांनी जगाला सर्व प्रथम "अहिंसेचा मार्ग" दाखविला आणि म्हणुन ते प्रथम तिर्थंकर बनले आहेत.
हे मंदिर बघण्यासारखे आहे. यात अयोध्येचे प्रारुप(मॉडेल)व इतकी सून्दर नगररचना आकाशमार्गासहित दाखविली आहे. पहिल्यांना बघितल्यावर मी तर थक्कच झालो होतो!
29 Aug 2014 - 9:07 pm | दशानन
तुमचा प्रतिसाद, प्रतिसाद प्रकार व आशय काहीच समजले नाही. लेखनाबद्दल, लेखनातील आशयबद्दल मला यात काही आहे असे दिसत नाही आहे.
29 Aug 2014 - 9:36 pm | आयुर्हित
आपला प्रतिसादःएस.. म्हणून मध्यंतरी असा मत
वल्लींचा प्रतिसादःसहमत.
आपल्या व वल्लींच्या प्रतिसादावरुन तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला असावा याचे उत्तर व संदर्भ दिला आहे.
29 Aug 2014 - 9:40 pm | दशानन
चौवीस तीर्थंकर ही संकल्पना महावीर यांच्या देखील खूप नंतर आली असावी, आणि आजचा जो धर्म आहे, तो " तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.
31 Aug 2014 - 1:22 am | आयुर्हित
आजचा जो धर्म आहे, तो "तीर्थंकरांनी कोणत्या विचार धारेचा पुरस्कार केला" तो विचार सोडून कधीच पदभ्रष्ट झाला आहे.
आय ऑब्जेक्ट!
धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही.
तर पदभ्रष्ट तो होतो जो धर्माची शिकवण विसरतो किंवा नीजी स्वार्थापोटी चुकीचा अर्थ लावतो/सांगतो.
24 Sep 2014 - 10:41 pm | दशानन
>>>धर्म कधीच पदभ्रष्ट होत नाही.
कश्यावरून?
29 Aug 2014 - 10:26 am | स्पा
मस्त रे
वल्ली काकांची माहीती पण खुप उपयुक्त, थोडे मोठाले भाग येउंदेत :-)
29 Aug 2014 - 9:10 pm | दशानन
लिहितो आहे मित्रा.
24 Sep 2014 - 7:35 am | इनिगोय
पुढचा भाग कधी?
30 Aug 2014 - 12:08 am | संजय क्षीरसागर
इथे लेखन प्रकार काय आहे यावर चर्चा घडावी की नाही हे ठरत नाही. पब्लिक श्रद्धांजलीच्या धाग्याचा राजकीय आखाडा करु शकतं तिथे जनातल्या मनातल्याची काय कथा!
असो, तुम्ही `कादंबरी' लिहा पण ती वर्धमानाची होईल, महावीराची नाही. जो सिद्ध होतो त्याला भूतकाळ राहत नाही, इतिहास राहात नाही. तो सनातन वर्तमान होतो. सनातन वर्तमान अशा अर्थानं की त्याची शिकवण साधकाला वर्तमानाशी संलग्न करते, मग काळ कोणताही असो.
महावीराचं अलौकिकत्व त्याच्या शिकवणीत आहे, इतिहासाच्या उहापोहात नाही. महावीराच्या दृष्टीनं साक्षात्कार म्हणजे स्वतःला सर्वस्वी उघड करणंय (Enlightenment is the Ultimate Unfoldment of Self : Osho on Mahavir). आणि म्हणून तर हा एकमेव सिद्ध निर्वस्त्र उभा आहे.
हे स्वतःला उघडत जाण्याचा त्याचा मार्ग पंचशीलातून जातो आणि अहिंसेला परमधर्म मानतो.
कोणता तिर्थंकर क्रमवारीत कितवा होता वगैरे प्रकारची चर्चा म्हणजे साईबाबांना देव म्हणायचं की नाही यानं जितपत मनोरंजन होऊ शकेल तितपतच मनोरंजन करेल.
24 Sep 2014 - 10:40 pm | दशानन
मी येथे वादविवाद करण्यासाठी, किंवा मी काय लिहितो व कसे लिहितो, कोणासाठी लिहितो याची चर्चा करण्यासाठी येत नाही. व तुम्ही देखील आपला अमुल्यवेळ माझ्या काही शब्दांना प्रमाण मानून वाया घालवू नये ही नम्र विनंती. आणि इतर काय खातात याचे प्रमाण देऊन तुम्ही पण खाणे कसे योग्य आहे हे कृपया मला शिकवण्यासाठी तर नक्कीच येऊ नका, दैवदयेने थोडीफार माझी स्वत:ची विचार करण्याची कुवत आणि समज आहे.
शक्यतो हा प्रतिसाद तुम्हाला खटकेल, आणि तो खटकावा याच हेतूने लिहिला आहे त्यामुळे प्रतिवाद घालू नये. कुठल्या विभागात काय लिहावे काय नाही याची माझी जाण अजून स्थीर आहे.
1 Sep 2014 - 10:21 am | शेखर
राज, माझा ह्या बाबतचा अभ्यास फारच कमी आहे त्यामुळे सध्या फक्त वाचतोय. तुझ्या मुळे छान ओळख होती आहे.
धन्यवाद.
1 Sep 2014 - 7:48 pm | सुहास..
मस्त ...तुला परत लिहिता झाला याचा आनंद आणि लेखमाला आहे याचा डबल आनंद
24 Sep 2014 - 10:35 pm | दशानन
इनिगोय, पुढील भाग एक-दोन दिवसात येईल.
शेखर, सुहास.. वाचत आहात लेखमाला याचा आनंद देखील जास्त आहे :)