)माझं सामान हे...(
लेखनविषय:
शैलेंद्र यांनी रसग्रहणाची परंपरा पुढे चालवत धनाजीराव वाकडे यांच्या 'माझं हे सारं सामान गं सखू...' या कवितेवर लेख लिहिला. ती कविता व तो लेख या दोन्हीवर एकंदरीतच धमाल, हहपुवा वगैरे प्रतिसाद पाहून थोडी निराशा झाली. शैलेंद्र यांनीदेखील ही कविता काहीशी गमतीदार असल्याप्रमाणे तिचा अर्थ लावलेला आहे. माझं नेहेमीच असं मत पडलेलं आहे की लेखकाच्या रचनेचा अभ्यास हा त्याच्या इतर रचनांच्या संदर्भात घेतला पाहिज. पदार्पणालाच ज्ञानेश्वर, तुकोबा, रामदासस्वामी यांच्या कवनांची रेलचेल असलेला लेख लिहिणारे धनाजीराव काही थिल्लर काव्य लिहितील अशी कल्पनाच करवत नाही. त्यांनी नुकत्याच अनेकांनी थिल्लर म्हटलेल्या एका लेखाला 'फक्त तो उजव्या बाजूला असलेला ज्ञानोबा तुकोबांचा फोटो मात्र काढून टाकायला हवा.' असं तिरकसपणे फटकारलं देखील. त्यावरून हेच सिद्ध होतं की त्यांच्या कवितेचा अर्थ काही वेगळाच असणार. तो समजावून सांगण्याऐवजी, तीच कविता थोडी बदलून ओवीस्वरूपात मांडलेली आहे.
बाजारा निघालो | घाई करूनिया | हाती घेऊनिया | पिशवीला ||
सामानाचं ओझं | ठेवतो आता मी | पिशवी रिकामी | करूनिया ||
विश्वाच्या बाजारी | भली होय गर्दी | केली मी खरेदी | जन्मभर ||
सामानाचं ओझं | झालं आता फार | पिशवीला भार | साहवे ना ||
पिशवीला ताण | रक्त आणि घाम | श्वासाचाही दाम | देऊनिया ||
केली खरेदी मी | थोडे पुण्य गाठी | पापांचीच दाटी | झाली आता ||
जीर्णशीर्ण झाली | कायेची ही थैली | आणि झाली मैली | प्रवासाने ||
बाजाराची ओढ | आता नाही चित्ती | द्यावी आता मुक्ती | कायमची ||
माझं सामान हे | सांग विठूराया | आपुलिया पाया | घेशील का? ||
मीरा जर कृष्णाला प्रेमगीतं लिहीत असेल, तर धनाजीराव विठ्ठलाला सखू म्हणून वरवर वात्रट वाटणारी गाणी का लिहिणार नाहीत? ही त्यांची मधुरा भक्तीच मी समजतो.
वाचन
5948
प्रतिक्रिया
28