मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

)माझं सामान हे...(

राजेश घासकडवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शैलेंद्र यांनी रसग्रहणाची परंपरा पुढे चालवत धनाजीराव वाकडे यांच्या 'माझं हे सारं सामान गं सखू...' या कवितेवर लेख लिहिला. ती कविता व तो लेख या दोन्हीवर एकंदरीतच धमाल, हहपुवा वगैरे प्रतिसाद पाहून थोडी निराशा झाली. शैलेंद्र यांनीदेखील ही कविता काहीशी गमतीदार असल्याप्रमाणे तिचा अर्थ लावलेला आहे. माझं नेहेमीच असं मत पडलेलं आहे की लेखकाच्या रचनेचा अभ्यास हा त्याच्या इतर रचनांच्या संदर्भात घेतला पाहिज. पदार्पणालाच ज्ञानेश्वर, तुकोबा, रामदासस्वामी यांच्या कवनांची रेलचेल असलेला लेख लिहिणारे धनाजीराव काही थिल्लर काव्य लिहितील अशी कल्पनाच करवत नाही. त्यांनी नुकत्याच अनेकांनी थिल्लर म्हटलेल्या एका लेखाला 'फक्त तो उजव्या बाजूला असलेला ज्ञानोबा तुकोबांचा फोटो मात्र काढून टाकायला हवा.' असं तिरकसपणे फटकारलं देखील. त्यावरून हेच सिद्ध होतं की त्यांच्या कवितेचा अर्थ काही वेगळाच असणार. तो समजावून सांगण्याऐवजी, तीच कविता थोडी बदलून ओवीस्वरूपात मांडलेली आहे. बाजारा निघालो | घाई करूनिया | हाती घेऊनिया | पिशवीला || सामानाचं ओझं | ठेवतो आता मी | पिशवी रिकामी | करूनिया || विश्वाच्या बाजारी | भली होय गर्दी | केली मी खरेदी | जन्मभर || सामानाचं ओझं | झालं आता फार | पिशवीला भार | साहवे ना || पिशवीला ताण | रक्त आणि घाम | श्वासाचाही दाम | देऊनिया || केली खरेदी मी | थोडे पुण्य गाठी | पापांचीच दाटी | झाली आता || जीर्णशीर्ण झाली | कायेची ही थैली | आणि झाली मैली | प्रवासाने || बाजाराची ओढ | आता नाही चित्ती | द्यावी आता मुक्ती | कायमची || माझं सामान हे | सांग विठूराया | आपुलिया पाया | घेशील का? || मीरा जर कृष्णाला प्रेमगीतं लिहीत असेल, तर धनाजीराव विठ्ठलाला सखू म्हणून वरवर वात्रट वाटणारी गाणी का लिहिणार नाहीत? ही त्यांची मधुरा भक्तीच मी समजतो.

वाचने 5948 वाचनखूण प्रतिक्रिया 28

गुर्जींना गुर्जी बनवण्याचा आज मला आनंद होतो आहे. चिल्लर आणि थिल्लरपणाच्या पलिकडे पोहोचलेलं महान व्यक्तीमत्त्व. गुर्जींच्या चरणी माझा नमस्कार. 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' या कवनाचा अर्थ गुर्जींना उलगडून सांगावा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्या Fri, 09/23/2011 - 09:35
चिल्लर आणि थिल्लरपणाच्या पलिकडे पोहोचलेलं महान व्यक्तीमत्त्व. गुर्जींच्या चरणी माझा नमस्कार.
गुरुरायांच्या चरणी मज पामराचे दंडवत. तुम्ही जगाकडे ज्या नजरेने पाहाल जग तसेच तुम्हाला दिसेल. तुमच्या नजरेत चांगुलपणा, मनात सदविचार असतील तर तुमच्या समोर येणारी गोष्टही चांगलीच दिसेल. या रसग्रहणातून गुरुजींनी ते दाखवून दिलंय. धन्य झालो आज गुरुजी. आम्हाला तुमची ओळख तुम्ही सांगितलेल्या पुजेच्या पथ्यावरुन आणि सैपाक कसा करावा यावर केलेल्या साधक बाधक चर्चेतूनच झाली होती. परंतू दोन तीन दिवसांपूर्वी "अर्घ्य" वाचली आणि तुमच्या चिल्लर आणि थिल्लरपणाच्या पलिकडे पोहोचलेल्या महान व्यक्तीमत्वाची ओळख पटली. "शहाणे करुन सोडावे सकलजन" या संतोक्तीप्रमाणे तुम्ही हसत खेळत ज्ञानदानाचे कार्य करत आहात ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. असो. आपलं हे काव्य आमच्या "सामान" काव्यापेक्षा खुपच उजवं आणि सरस आहे. थोडा वेळ काव्याचा संदर्भ बाजूला ठेवला हे काव्य स्वतंत्र काव्य म्हणून वाचलं. आणि खरोखरीच मीरेला असणार्‍या कृष्णाच्या ओढीची उत्कटता त्यात जाणवली. संसाराने विटलेल्या आणि मुक्तीची आस लागलेल्या भक्ताची व्याकुळता दिसून आली. असो. जाता जाता एव्हढंच म्हणेन की एका उथळ धाग्याला प्रत्त्युत्तर म्हणून शब्दांचे खेळ करत लिहिलेल्या एका सामान्य कवितेचं आपण सुरेख रसग्रहण केलंत. नव्हे एक सुंदर कविता लिहिलीत. एक स्वतंत्र कविता म्हणून ही कविता मुळच्या सामान काव्यापेक्षा खुपच उजवी आहे.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Fri, 09/23/2011 - 21:18
तुम्ही जगाकडे ज्या नजरेने पाहाल जग तसेच तुम्हाला दिसेल.
इतरत्र चाललेल्या अश्लीलतेच्या चर्चेवरून आणि या तुमच्या वाक्यावरून मला अत्र्यांचा एक किस्सा आठवला. अत्र्यांवरती अश्लीलतेची टीका कोणीतरी केली होती. हे गृहस्थ (नाव आठवत नाही) बुटके होते. आणि अत्रे उंच धिप्पाड. म्हणून अत्रे म्हणाले. "आता हे म्हणतात की आम्ही अश्लील लिहितो. मी तर म्हणेन की यांची उंची कमी आहे. त्यामुळे त्यांना आमचं अश्लील तेवढंच दिसतं. जरा उंची वाढवा आणि वर बघा. मग दिसेल आमच्या हृदयात किती अपार प्रेम भरलंय ते."
आम्हाला तुमची ओळख तुम्ही सांगितलेल्या पुजेच्या पथ्यावरुन आणि सैपाक कसा करावा यावर केलेल्या साधक बाधक चर्चेतूनच झाली होती.
मी काही अत्र्यांच्या कुवतीचा नाही, पण माझ्याही हृदयात अपार प्रेम भरलंय एवढंच दाखवायचं होतं. ;) थोडं सीरियसली - उजवं काय डावं काय यापेक्षा कवितांमधून एकमेकांशी गप्पा मारण्याची, धमाल करण्याची हौस फिटू शकते हे मला अशा संस्थळांचं शक्तिस्थान वाटतं. एरवी टीपी, भंकस काय आपण इतर मित्रांबरोबरदेखील करतो.

शैलेन्द्र Fri, 09/23/2011 - 08:28
वा वा वा.. व्यासंग म्हणतात तो याला.. पिंजरामधील " अरे कान्हा " ची आठवण झाली. विषेशता: "जीर्णशीर्ण झाली | कायेची ही थैली | आणि झाली मैली | प्रवासाने ||" इथे कवीता एक वेगळीच आध्यात्मीक उंची गाठते. पण "बाजाराची ओढ | आता नाही चित्ती | द्यावी आता मुक्ती | कायमची ||" हे मुळ कवीच्या मनात असेल असे वाटत नाही(त्याच अजुन सगळ व्हायच जायचय). गुरुजींच्या मनात हे भाव तरळले याचे कारण कदाचीत त्यांचा आध्यात्मीक आधिकार व पारमार्थीक वय असु शकते. "पिशवीला ताण | रक्त आणि घाम | श्वासाचाही दाम | देऊनिया || केली खरेदी मी | थोडे पुण्य गाठी | पापांचीच दाटी | झाली आता ||" इथे गुरुजींनी स्वपीडनाचा आनंद, जो आध्यात्मात आवश्यक मानतात तो मन भरुन घेतलाय.. अनुभवी व्यक्तीकडुन या वेदनेचे खरे रुप जाणुन इतर मुमुक्षुंना फारच फायदा होईल असे वाटते..

नगरीनिरंजन Fri, 09/23/2011 - 08:52
घोर निराशा झाली आहे हे रसग्रहण वाचून. संत धनाजींसारख्या जीवनरसाने तटतटलेल्या आणि वरकरणी वाकडे दिसणार्‍या पण आतून अगदी सरळसोट असणार्‍या संताला असे निवृत्तीचे वेध लागतीलच कसे? जीर्णशीर्ण झाली | कायेची ही थैली | आणि झाली मैली | प्रवासाने || बाजाराची ओढ | आता नाही चित्ती | द्यावी आता मुक्ती | कायमची || स्वतः संत धनाजी बोंबलाला अजून ओला म्हणत असताना कायेच्या थैलीला जीर्णशीर्ण म्हणण्याची घाई कशासाठी? आणि पिशवीत सामान तात्पुरतेच ठेवायचे आहे असे संत धनाजींनी स्पष्टपणे सूचित केले असताना ही कायमची मुक्ती कशाला? बाजारा निघालो | घाई करूनिया | हाती घेऊनिया | पिशवीला || सामानाचं ओझं | ठेवतो आता मी | पिशवी रिकामी | करूनिया || संत धनाजींच्या कवितेत सखूची पिशवी असा उल्लेख असताना ते हाती पिशवी घेऊन कसे जातील? सखूचे रुपक बहुतेकांना कळले नाही असे दिसते आहे. एकंदरीतच दुर्दैवाने गुर्जींनी भलताच अर्थ लावला आहे असे खेदाने म्हणतो. आता याचा खरा अर्थ मलाच सांगावा लागणार असं दिसतंय.

In reply to by शैलेन्द्र

धन्या Fri, 09/23/2011 - 09:40
आणि पिशवीत सामान तात्पुरतेच ठेवायचे आहे असे संत धनाजींनी स्पष्टपणे सूचित केले असताना ही कायमची मुक्ती कशाला?
ननि, बेक्कार हसतोय राव. बाकी चालू दया. आम्ही आमचे सामान काव्य लोकार्पण केले आहे. ;)

In reply to by धन्या

नगरीनिरंजन Fri, 09/23/2011 - 09:59
तर मी काय सांगत होतो? हां.... बहुजनांना ज्ञानाची गोडी लागावी म्हणून बहुजनांना भावेल अशा भाषेत ते काव्य लिहीले असले तरी त्यात उदात्त अर्थ आहे हे गुर्जींनी बरोबर ओळखले. पण त्यातला अर्थ मात्र अचूकपणे पकडण्यात ते अयशस्वी झाले. म्हणून मी आमचे गुरु श्री. संत धनाजी यांचे ध्यान लावून स्मरण केले आणि मज पामरास त्याचा खरा अर्थ समजावून सांगावा असे साकडे घातले. तेव्हा आम्हास दृष्टांत देऊन धनाजींनी त्याचे निरुपण करून त्यातली खरी 'सामानदान' ओवी ऐकवली. ती येणे प्रमाणे: विश्वरूप गाव अपार | दशदिशांचे बलुतेदार | लागला असा बाजार | विज्ञानाचा || गेलो वाटेने सत्वर | केला आनंदे बाजार | कसा पडला विसर | बहुजनांचा || मोक्षाची कास सोडावी | तशीच की राहू द्यावी | मोकळीच ती पिशवी | पामरांची || जनहो तुम्ही नम्र व्हावे | ज्ञानियापुढे झुकावे | तोंड आपुल्या उघडावे | पिशवीचे || अपार विश्वाचे ज्ञान | नसे थोडके सामान | खाली खेचतसे अभिमान | मानवाचा || ज्ञान असे जे प्रचंड | भागविल मोहाचा कंड | निर्बंध मनाचे उदंड | फाकवून || आत्मज्ञानाचे वाण सकल | प्रभूप्रेमाचे ताजे फळ | भूतदयेचा बोंबील | कोवळासा || जनहो सखे माझे | ग्रहण करावे सगळे ताजे | आवरण पापलेट साजे | नम्रतेचा || आत्मज्ञानी किती झाले | आपुल्या वाटे निघोनि गेले | जनांशी का सख्य केले | धनाजीने || धना म्हणे मायबापो | एकटाच तो पाप खातो | सामान हातात मिरवितो | एकल्याचे ||

In reply to by नगरीनिरंजन

धन्या Fri, 09/23/2011 - 10:15
आज मी धन्य झालो शिष्या. तू लिहिलेलं 'सामानदान' आज आयायटी, आरीसी, आयायम, गेला बाजार काही ऑटोनॉमस अभियांत्रिकी महाविदयालयांमधून ऐकवण्याची गरज आहे.
ज्ञान असे जे प्रचंड | भागविल मोहाचा कंड | निर्बंध मनाचे उदंड | फाकवून ||
अप्रतिम !!!

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र Fri, 09/23/2011 - 10:31
मस्त.. आपल्या एका कवितेवर अर्थ सांगणार्‍या दोन कविता, हा दुर्मिळ बहुमान आज संत धनाजीस प्राप्त झालाय, शरदीनीतैच्या पुढे गेलात तुम्ही.. कवितेच्या शब्दांना अर्थ नसुन तो ती वाचणार्‍याच्या मनात असतो, हे आमचे ग्रुहीतक आज पक्के झाले. "आत्मज्ञानी किती झाले | आपुल्या वाटे निघोनि गेले | जनांशी का सख्य केले | धनाजीने || धना म्हणे मायबापो | एकटाच तो पाप खातो | सामान हातात मिरवितो | एकल्याचे ||" अगदी बरोबर.. कवीला दृष्टांत देत संत धनाजींनी सामान हातात मिरवायचे मान्य केलेय हे पाहुन आम्हांस परम संतोष जाहला.

In reply to by नगरीनिरंजन

राजेश घासकडवी Fri, 09/23/2011 - 21:48
भूतदयेचा कोवळा बोंबिल आणि त्यावर नम्रतेच्या पापलेटाचं आवरण हे वाचून हसू आवरत नाहीये... ते आवरून झाल्यावर थोडा सीरियस प्रतिसाद देईन म्हणतो...

In reply to by नगरीनिरंजन

@--स्वतः संत धनाजी बोंबलाला अजून ओला म्हणत असताना कायेच्या थैलीला जीर्णशीर्ण म्हणण्याची घाई कशासाठी? आणि पिशवीत सामान तात्पुरतेच ठेवायचे आहे असे संत धनाजींनी स्पष्टपणे सूचित केले असताना ही कायमची मुक्ती कशाला? :-D ---- अरे काय चाल्लय हे,,,हसुन हसुन दम लागतोय एक तर.... एक कविता आणी तिनी मिपावर पार अपार दंगल माजवुन ठेवलीये... अबा बा बा बा बा.... फाट-फुट-फट्याक--- आज पूर्णपणे फुटलो :bigsmile:

ऋषिकेश Fri, 09/23/2011 - 08:53
राजेशराव, मनापासून दंडवत! __/\__ काय प्रतिभा मिळालेली असते एकेकाला.. मानलं!!!

अडगळ Fri, 09/23/2011 - 08:53
शब्द धनाजीचा , गुरुजीन्चा सूर , विठ्ठलाचा प्राण कोंदाटला. वाया झाला तुका, वाया ज्ञानेश्वर, एका नामा सारे मुके झाले. जना म्हणे बहिणे , आवरा पसारा , सखुचा यायचा टाईम झाला. हटवा कटवा , गोपाळांचा मेळा , सखूचा गजर , वैकुंठाला.

In reply to by अडगळ

सूड Fri, 09/23/2011 - 09:57
हा हा हा ...जना म्हणे बहिणे , आवरा पसारा , सखुचा यायचा टाईम झाला. गुर्जींनी लिहीलेलं रसग्रहणही झकास आहे.

In reply to by अडगळ

मात्रा थोड्या हुकल्या हो अडगळसेठ. हे पहा कसं वाटतंय? शब्द धनाजीचा , गुरुजींचा सूर , विठ्ठलाचा प्राण कोंदाटला. वाया गेला तुका, वाया ज्ञानेश्वर, एका नामा सारे मुके झाले. जना म्हणे भैणे , आवरा पसारा , सखूचा यायचा टैझाला. हटवा कटवा , गोपाळांचा मेळा , सखूचा गजर , वैकुंठाला.

श्रावण मोडक Fri, 09/23/2011 - 10:05
मी वाचता-वाचता गुणगुणू लागलो. दुसऱ्यांदा फक्त गुणगुणत वाचली. दोन जागी बदल हवासा वाटला. केली खरेदी मी | - ऐवजी 'केली मी खरेदी'. माझं सामान हे | - ऐवजी 'माझं हे सामान'. गुणगुणणं सहजसुंदर झालं. :)

गुर्जी, ननि, शैलेंद्र आणि महान संत श्री श्री धनाजीराव सर्वांना दंडवत.... काय म-हान चर्चा चाल्लीये...आपण अत्ता 'त्वांड' घालण बर नव्ह.. म्हनून जरा इश्रांती ग्येतो... :-) अवांतर-@-तर धनाजीराव विठ्ठलाला सखू म्हणून वरवर वात्रट वाटणारी गाणी का लिहिणार नाहीत? ही त्यांची मधुरा भक्तीच मी समजतो..... हम्म..मंजे घासू गुर्जी..मधुरा भक्ती माहित्ये तर..आं? ;-)