मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे असे का असावं?

तमराज किल्विष · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते. आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती. प्रश्नोत्तरे विभागात जाता न आल्याने इथे लिहीलं आहे.

वाचन 33194 प्रतिक्रिया 0