तुलना नको!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
1 Mar 2021 - 7:47 pm

एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?"
हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल? डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का?
-----------------------------------------------------
इच्छा - आकांक्षा दुःखं जन्माला घालतात , पण त्यातूनच जगण रुचकरही होतं , असं वाटतं. खूप क्षणभंगुर आयुष्य आहे माणसाचं ; पण तेवढ्यात केवढा पसारा मांडतो आपण . ध्येय , यश यांच्या मागे ऊर फुटस्तोवर कधीकधी इतकं धावतो की , हाती आलेल्या या छोट्याशा कालखंडात जगणं राहूनच जातं. ' मिथ्या गोष्टींच्या मागे जन्म वाया जातो. डॉक्टर , हा विचार चूक आहे का ? अशा विचारांच्या गुंतागुंतीत न अडकता , आसपासची विशिष्ट फोकस ठेवून लौकिक यशाचे टप्पे पार करत , नेमून दिलेल्या चौकटीत जगणारी माणसं पाहिली की मात्र , कधीकधी आपलं चुकतंय की काय , अशी शंका येते . त्यांच्यासारखंच आपणही लौकिक यशाच्या मागे धावायला हवं , असं वाटतं. काय बरोबर , काय चूक?

स्मिता सावंत

उत्तर
तुमच्या प्रश्नाचा रोख समजला. तुम्ही फार काव्यमय पद्धतीने तुमचे विचार मांडलेले आहेत आणि तुमच्या लिखाणात एक संवेदनशीलता जाणवतेय. काही ठिकाणी तुम्ही मनाने खूप हळव्या झाल्या आहात , असं जाणवतं . तुमच्यासारख्या बऱ्याच संवेदनशील माणसांना असा संभ्रमित अवस्थेचा अनुभव येतो आणि यातून नेमका , अचूक मार्ग सापडेल आणि आपल्या मनाची संभ्रमावस्था संपेल , असं वाटतं. आता तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी काय चुकीचं , काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करत आहात. एकदा त्याचं उत्तर मिळालं की , आपले प्रश्न सुटतील , असे तुम्हाला वाटतंय. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , तुम्हाला त्या गोष्टीचा निवाडा करायचाय. काय चूक आणि काय बरोबर हे ठरवण्यापेक्षा कोणत्या गोष्टीतून आपल्याला जीवनात आनंद मिळू शकेल , आपण केलेल्या कामातून आनंद मिळू शकेल ( काही प्रमाणात ) ; आपल्याला कोणत्या गोष्टी केल्याने आनंद , समाधान मिळतं याचा तुम्हाला शोध घ्यायला लागेल. कारण चूक बरोबर या गोष्टींची काळानुरूप व्याख्या बदलू शकते . त्यामुळे आपला गोंधळ उडतो. त्याऐवजी आपली भावनिक गरज समजून घेणं गरजेचं आहे. आपली भावनिक गरज हीच असते की , आपल्या कामातून समाधान मिळणं आणि शांतपणे , आनंदाने कुटुंबासोबत जगता यावं , ही सगळ्यांची गरज असते आणि ती तुमचीही आहे , हे या पत्रावरून कळतं आहे . आता हे सुख - समाधान कसं मिळवायचं , हा तुमच्या समोरचा प्रश्न आहे ; परंतु तुमचा खरा प्रश्न आनंद कसा मिळवायचा हा नसून . तुमच्या मनात निर्माण होणारं दुःख कसं मिटवायचं , हा तुमच्या समोरचा खरा प्रश्न आहे . हे दुःख निर्माण होण्याचं कारणही तुमच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. तुम्ही असं म्हणता , बाकीची माणसं कशा प्रकारे लौकिक अर्थाने सुखी होतात , यशस्वी होतात , म्हणजेच तुम्ही याचा विचार करता . म्हणजे तुम्ही तुमची इतरांशी तुलना करता. या तुलनेवरून तुमच्या लक्षात येतं की , इतर माणसं तथाकथित अर्थाने तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आणि सुखी आहेत. त्यांनी निवडलेल्या मार्गाने त्यांना यश आणि सुख मिळतं , मग ते मला का बर मिळत नाही. ही व्यथा तुम्हाला छळते ; पण ही व्यथा निर्माण होण्याचं एकमेव कारण तुम्ही तुलना करता एवढंच आहे. तुलना करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने कधीही स्वतःला यशस्वी किंवा सुखी समजू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुलना करण्याचे सोडून द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्गातून कसं सुख मिळू शकतं , याचा आपोआप उलगडा होईल. तुमच्यापेक्षा कमी यशस्वी किंवा तुमच्यापेक्षा कमी सुखी माणसाशी तुमची तुलना करा म्हणजे तुम्हाला समाधान लाभेल , असा सल्ला काही हितचिंतक तुम्हाला देतील. वरवरच्या अर्थाने हा सल्ला पटणारा असला , तरी तो चुकीचा आहे . कारण अशा वेळीही तुम्ही कोणाशी तरी तुलना करत असता आणि त्यातून समाधान मिळेल , असं तुम्ही मानता ; पण ते फसवं असतं. ऊर फुटेस्तोवर तुम्हाला धावायला कोणी सांगितली जीवन हे क्षणभंगुर आहे. याची कल्पना सगळ्यांना आहे. त्यामुळे ध्येय,आकांक्षा यांच्यामागे तुम्ही न धावता शांतपणे चालू शकता. कोणीही आपल्यावर धावण्याची वा चालण्याची कोणतीही जबरदस्ती करत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला. बाकी लोक किती जास्त धावत आहेत की , हळूहळू चालत आहेत , याच्याशी आपल्याला देणं-घेणं नसतं आणि यात काही चूक आणि बरोबरही नसतं. त्यामुळे फारशा हळव्या कविता वाचू नका. हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा.

डॉ.राजेंद्र बर्वे
( लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत ) drrajendrabarve@gmail.com

मुक्तकजीवनमानविचारसल्ला

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Mar 2021 - 10:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विचार करायला लावणारा लेख. भारतासारख्या खूप लोक्संख्या व विषमता असलेल्या देशात 'तू आपल्या मार्गाने चालत रहा.आजूबाजुला पाहु नकोस' असे सांगणे व त्या व्यक्तीला पटणे कठिण आहे.
"हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा."
हे मात्र खरे.

बरखा's picture

1 Mar 2021 - 11:34 pm | बरखा

वर लिहिल्याप्रमाणे खरच तुलना करण सोडण हि गोष्टच जर एखाद्याला ठरवुन सुधा जमत नसेल, अथवा त्याच्या स्वभावातुन बाहेरच काढु शकत नसेल तर त्यान्च्या साठी काहि दुसरा मार्ग आहे का?
कारण अशी काही उदा. बघितली आहेत कि कितिही वेळा तुलना करु नये असे सान्गितले तरीते त्यान्च्या पचनी ते पडत नाही. दोन दिवस नव्या सारखे वागुन पुन्हा मुळ पदावर येतात आणि सुन्दर आयुष्य ह्यात वाया घलवतात.

उपयोजक's picture

1 Mar 2021 - 11:53 pm | उपयोजक

मूळ पदावर येण्याचं कारण म्हणजे कोणातरी विशिष्ट व्यक्तीइतकं यश मी मिळवू शकलो नाही तर मी केवळ 'अपयशीच असणार' या विचाराला मनातून मान्यता देणे.हा विचार कुविचार आहे याचा विसर पडणे,वास्तवापासून दूर जाणे, व्यक्तीपरत्वे क्षमता भिन्न असणार हा विचार मान्य न होणे.

चौकटराजा's picture

2 Mar 2021 - 9:45 am | चौकटराजा

मी जिथे कामाला होतो त्या खाजगी कंपनीत एकदा पगार इतर युनिट सारखा मिळावा यासाठी एम डी ना भेटण्याचा योग आला तर त्यांनी आम्हाला " तुलना नको " असे आध्यात्म चक्क सुनावले व काढता पाय घ्यायला लावले ! याच कंपनीने इतर कंपनी ३५०० हजार कामगारांत तो " एम " जर माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही ? अशी तुलनाच केली व कामगार व कर्मचारी यांना येणं केन प्रकारेण कंपनी सोडायला भाग पाडले ! तुलनेचा फायदा कसा करून घ्यायचा हे असे असते !

बाकी कोणताही माणूस तुलना की करीतच असतो . यात एक उपाय असा आहे की ती सर्वच बाबतीत करून त्याचा एका रिझल्टंट काढावा व आपली मनोधारणा ठरवावी !
उदा मुंबईचे जीवन पुण्याच्या मानाने हालाखीचे आहे ! इथे एखाद्या बँक मॅनेजरला पगार तुलनेने अधिक भत्ते मिळून जास्त ही मिळत असेल पण पुण्यात राहणे हवामान गर्दी याचा विचार करता अधिक चांगले आहे ! सबब दोन्ही चा विचार करून मी पुण्यात बदली मागायची व स्वीकारायची की कसे हे ज्याने त्याने ठरवायचे ! ( हे फक्त उदाहरण आहे यावर मुंबई पुणे मुंबई असे चर्वण कृपया नको ) !

मुक्त विहारि's picture

2 Mar 2021 - 11:29 am | मुक्त विहारि

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"हत्ती उडू शकत नाही आणि चिमणी चालू शकत नाही."

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2021 - 1:44 pm | चौथा कोनाडा

आजकाल जसं सोशल मिडियाला टाळू शकत नाही तसंच तुलना करण्याला टाळू शकत नाही !

मुक्त विहारि's picture

28 Mar 2021 - 2:58 pm | मुक्त विहारि

तुलना फक्त स्वतःशीच करा ....

तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल? डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का?

पुर्ण पणे नाही पटत.
___

माझे उत्तर :(हे लिहिताना फक्त स्मिता यांचा प्रश्न समोर ठेवत आहे, मला उत्तर काय हवे असावे ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय )

स्मिता जी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नातून मनाचा झालेला संभ्रम कळत आहे..
माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे त्यामुळे ते समरसून जगता आले पाहिजे...चाकोरी बद्धता म्हणजे सुसूत्रता असेल, असे तुम्हाला वाटणे चूक हि ठरू शकते.. उलट आपल्या आयुष्याला कुठल्याही चौकटीत न बांधता, जीवनाचे अनेक रंग अनुभवत जगता आले पाहिजे. माणुस ज्याला जीवन म्हणतो, ती काही एक रेषा नाही जी एका बिंदू पासून सुरु होऊन दुसऱ्या बिंदूपाशी संपणार आणि आपल्या इच्छा काही त्या मार्गवरील दिशादर्शक नाहीत.

त्यामुळे त्या आभासी रेषेवर संतुलन सांभाळत चालणारे लोक तुम्हाला यशस्वी वाटत असतील हि.. पण तुम्ही हि तुलना का करताय ह्याचा शोध घ्या..
तुलना चांगल्या गोष्टींशी कदाचीत चांगली असेलही.. पण आपल्या जीवनाला त्या तुलनेसाठी तुल्यबळ बनवणे आपल्या हातात असते हे कधीच विसरता कामा नये.
एका टोकावर उभे राहून दुसरे टोक चांगले कि वाईट हे ठरवनेच मुळी चुकीचे आहे..त्यामुळे आपल्याला जसे हवे तसे, ज्यात आनंद मिळेल तसे जगले पाहिजे..
यशाला कदाचीत समाधानाची झालर नसते, एका यशा च्या शिखरावर चढले कि नंतर पुन्हा दुसरे शिखर समोर दिसते, आणि त्या मध्ये पुन्हा दरीच असते.. आणि मग पहिल्या यशाच्या शिखरावरून अन्य काही पूर्ती साठी माणुस पुन्हा चालू लागतो..

आनंदाचे तसे नसते, आनंद हा समाधानाचे अस्तर घेऊनच आलेला असतो..तुमच्या सर्व इच्छा ह्या पुर्ण झाल्या नाहीत तरी त्या साठीचा वेडा वाकडा प्रवास तुम्हाला आनंद देऊ शकतो.. त्यामुळे इच्छा व आकांशा ह्या दुःखाचा उगमदात्या नसून त्या जीवनाच्याच हिस्सा आहेत हे माणून जगणे महत्वाचे..
आनंद कशात आहे हे व्यक्ती सापेक्ष असते, परंतु आपला आनंद ओळखून त्यानुसार जगणे हे त्या माणसाच्या हातातच असते..

माणसाला संवेदना असतात, पण त्या संवेदना म्हणजे, काय चूक आणि काय बरोबर याच्या तराजु नसतात, तर त्या असतात आपल्या विचाराचे तरंग आणि आपल्या विचारांना आचरणात आणताना आपल्याला प्रश्न पडू शकतात.. त्यात वाईट काही नाही.. प्रश्न हेच उत्तराचे जन्मादाते असतात, आणि त्यामुळेच आपण का कशासाठी करतोय हे आपल्याला कळते.. त्यामुळे अश्या संवेदना ह्या आपल्या आचरणामागच्या खऱ्या शक्ती दात्या असतात..त्या नाकारून चालुच शकत नाहीत..

तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात, आपल्याला हवे तसे, चाकोरी मध्ये न अडकता जीवन जगणे हे आनंद देऊ शकते.. आणि जीवन म्हणजे तरी दुसरे काय?
जीवन भावनांची, संवेदनाची हळवी कविता हि असते आणि जीवन ध्येयपूर्तीच्या वाटेवरचा कठोर धडा हि असतो..

आनंदी रहा...

- गणेशा