भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो. यापलिकडे हरताळकेसारखं व्रतं, वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावांनी बोलले जाणारे नवस, चालणारे उपासतापास या सगळ्यांतूनही 'अमुक देवाला साकडं घातलं, तपश्चर्या केली की माझं भलं होईल' असा दृढ विश्वास आणि श्रद्धा दिसून येते. गेली शेकडो वर्षं या ना त्या प्रकाराने हे सर्व कमी अधिक प्रमाणात चालू आहे. या सर्व परंपरा, रुढी हे भारतीय समाजमनाचं एक मोठं अंग आहे.
या सामाजिक रुढीपरंपरांबरोबच वैयक्तिक धार्मिक स्वभाव, श्रद्धा, देवाची उपासना करण्याची मानसिक ओढ किंवा गरज हाही एक सहज न दिसणारा भाग आहे. नियमाने पूजा करणं, देवळात जाणं, मुलांवर विशिष्ट संस्कार करताना देवाचं नाव घेणं या स्वरूपात तो स्वभाव घराघरातून दिसतो. पावित्र्याची कल्पना, पापपुण्याची कल्पना, आपल्याला सद्गती मिळण्याची इच्छा ही त्यामागे असते. तसंच आपल्या हलाखीच्या परिस्थितीपुढे येणारी हतबलता आणि त्यातून देवाला, सर्वोच्च शक्तीला शरण जाऊन 'तूच माझं रक्षण कर रे बाबा' म्हणण्याची गरजही कारणीभूत आहे.
थोडक्यात, आपल्याला दिसणाऱ्या धार्मिकतेची ही दोन अंगं आहेत - एक सामाजिक, सार्वजनिक तर दुसरी वैयक्तिक. वैयक्तिक धार्मिकता जिथे अधिक आहे तिथेच सामाजिक, जाहीर स्वरूपात ती दिसणार हे 'यत्र वह्निस्तत्र धूम्रः' या न्यायाने उघड आहे. मात्र सध्या भारतात सामूहिक धार्मिकतेला उधाण आलेलं दिसतं. शहराशहरांतून प्रत्येक उत्सव धूमधडाक्याने डॉल्बी भिंतींसकट साजरा होतो. गोविंदाच्या हंड्यांसाठीचे थर दरवर्षी वाढताना दिसतात. महाराष्ट्रीय सण कमी पडले की काय म्हणून दांड्यारास, कडवाचौथ वगैरे इतर राज्यांमधले सणही साजरे होताना दिसतात. हे जे चित्र दिसतं त्यामागे नक्की काय कारण आहे? गेल्या वीसपंचवीस वर्षांत अचानक धार्मिक मानसिकता वाढलेली आहे का, की जेणेकरून आग वाढली त्यामुळे आगीतून येणारा धूरही वाढला? की यामागे इतर कारणं आहेत? हे तपासण्यासाठी मी १२ सप्टेंबर २०१५ ला एक सर्वेक्षण घेतलं. त्यात लोकांना विचारलेला प्रश्न असा
"तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते?" ते उत्तर देण्यासाठी १. बरेच धार्मिक २. मध्यम धार्मिक आणि ३. कमी धार्मिक असे तीन गट केले. व स्वतः व आईवडील कुठल्या गटांत बसतात ते सांगायला सांगितलं.
सर्वप्रथम सर्वेक्षणाच्या मर्यादेविषयी. हे सर्वेक्षण मी 'ऐसीअक्षरे.कॉम' आणि 'मिसळपाव.कॉम' या दोन मराठी संस्थळांवर घेतलं होतं. या संस्थळांवर वावरणारे लोक हे संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतिनिधी नव्हेत. किंबहुना सुशिक्षित/उच्चशिक्षित, खाऊनपिऊन सुखी, कॉंप्युटर व इंटरनेट मध्ये प्रवीण, बुद्धिजीवी असा मर्यादित लोकगट आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, किंवा झोपडपट्टीत राहाणाऱ्या व्यक्ती, अशिक्षित अर्धशिक्षित कामगारवर्ग असा मोठा समूह त्यातून वगळलेला आहे. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष त्या गटापुरतेच लागू आहेत. हे जरी खरं असलं तरी या गटातल्या लोकांचं या सर्वेक्षणातून निर्माण होणारं चित्र डोळे उघडणारं आहे.
एकूण ४९ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. 'ऐसीअक्षरे.कॉम' वरून ३८, तर 'मिसळपाव.कॉम' वरून ११. हे आकडे कमी असले तरी दोन वेगवेगळ्या संस्थळांवर मिळणारे निष्कर्ष हे बऱ्यापैकी मिळतेजुळते आहेत. त्यावरून प्राथमिकदृष्ट्या विश्वासार्ह असावेत अशी मला आशा आहे. या एकोणपन्नास लोकांनी 'आईवडील १ मी २' या स्वरूपाची उत्तरं दिली. याचा अर्थ आईवडील बरेच धार्मिक, तर मी मध्यम धार्मिक. पिढीमधला बदल मोजण्यासाठी मी या आकड्यांची वजाबाकी केली. २-१ = १ याचा अर्थ या घरासाठी या पिढीत धार्मिकता थोडी कमी आहे. जर उत्तर 'आईवडील १ मी ३' असं असतं तर ३-१ = २ याचा अर्था घरासाठी या पिढीत धार्मिकता बरीच कमी आहे. जर या वजाबाक्या ऋण असत्या म्हणजे -१ किंवा -२ असत्या तर या पिढीत धार्मिकता थोडी जास्त किंवा बरीच जास्त असं म्हणता येईल. मुख्य हेतू विशिष्ट गटात कुठल्या पिढीत किती लोक आहेत हे तपासण्यापेक्षा प्रत्येक घरात होणारा असा बदल, किती प्रमाणात, किती घरांत दिसतो हे तपासून पाहाण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आलेख खाली दिलेला आहे.
सर्वात प्रथम हे दिसून येतं की 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच कमी धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण सुमारे ७१ टक्के आहे. याउलट 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच अधिक धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण फक्त ६ टक्के आहे. त्यातही ज्यांनी 'आईवडिलांइतकेच धार्मिक' असं म्हटलेलं आहे त्यातल्या सुमारे निम्म्यांनी 'आईवडिल नास्तिक, आम्हीही नास्तिकच' असं म्हटलं आहे. म्हणजे सर्वेक्षणात भाग घेणारे सुमारे ८५% लोक हे स्वतः नास्तिक किंवा आईवडिलांपेक्षा कमी धार्मिक आहेत. हा फारच प्रचंड मोठा आकडा आहे. स्वतःला अत्यंत कमी धार्मिक किंवा नास्तिक म्हणवणारांची संख्याही प्रतिसादांमधून जाणवते - हा आकडा सुमारे ८०% आहे.
कुठल्याही पद्धतीने बघितलं तरी या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष दिसून येतात. सर्वेक्षणात भाग घेणारांमध्ये -
१. बहुतांश नास्तिक किंवा रोजच्या जीवनात धर्माला कमी महत्त्व देणारे आहेत
२. फार मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आईवडलांपेक्षा मुलं कमी धार्मिक आहेत.
३. आईवडलांपेक्षा अधिक धार्मिक असणारांची संख्या नगण्य - सुमारे ६ टक्के आहे.
हे सर्व एकत्रितपणे पाहिलं तर आपल्याला अचंबा वाटणारं चित्र निर्माण झालेलं दिसतं. बाहेर भारतीय समाजात धर्माचे सोहळे वाढलेले दिसतात, मात्र या गटात वैयक्तिक पातळीवर धर्माचं महत्त्व कमी झालेलं आहे. धूर बराच वाढलेला दिसतो, पण जवळ जाऊन बघावं तर काही ठिकाणी तरी आग कमी झालेली, विझत आलेली दिसते. मग या सगळ्याचा अर्थ कसा लावावा? एक शक्यता अशी आहे की या सर्वेक्षणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे त्याचे निष्कर्ष सरसकटपणे सर्व समाजाला लागू पडत नाहीत. या मर्यादा आपण जरा खोलात जाऊन तपासून पाहू.
१. हे सर्वेक्षण एका अत्यंत लहान गटाचं आहे - ही सर्वात गंभीर मर्यादा आहे आणि सुरूवातीलाच ती मान्य केलेली आहे. मात्र हा गट नक्की किती लहान आहे याचा आपण अंदाज घेऊन पाहू. हा गट आहे सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण म्हणता यावं अशा लोकांचा. आता भारतात सध्या ७५ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. पण तरुणांमध्ये हे साक्षरतेचं प्रमाण बरंच जास्त आहे - २०१५ सालची आकडेवारी पाहिली तर ९०%. म्हणजे गेली पिढी सुमारे ५०% साक्षर आणि आजची पिढी सुमारे ८५-९०% साक्षर - अशा गोळाबेरजेतून हा आकडा येतो. उच्च शिक्षणाबाबत तर गेल्या पिढीत आणि आजच्या पिढीत फारच तफावत आहे. एकंदरीत भारतात सुमारे २० ते २५% लोक कॉलेज पूर्ण केलेले असावेत. त्यातले बहुतांश आजच्या पिढीत. तेव्हा सुशिक्षितांचा आकडा सुमारे २५%चा येतो. हेच बहुतांशी खाऊनपिऊन सुखी गटात आहेत. आणि यांच लोकांकडे कॉंप्युटर प्रावीण्य आहे. तेव्हा सर्वेक्षणात दिसणारा गट लहान असला तरी तो सुमारे २०% लोकांचा बनलेला आहे. आणि हे सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिकदृष्ट्या वरच्या २० टक्क्यातले आहेत. त्यांचा आदर्श इतर करतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आत्ता लहान स्वरूपात दिसणारे परिणाम हे जसजसा काळ जाईल तसतसे मोठ्या मोठ्या गटात दिसून येतील.
२. कदाचित या गटातही धार्मिक लोक असतील, पण त्यांनी मतं नोंदवली नाहीत - हेही शक्य आहे. त्यामुळे दिसणारे आकडे एवढे मोठे राहाणार नाहीत. मात्र असा प्रश्न उद्भवतो, की अशांनी मतं का नोंदवली नाहीत? जाहीर फोरमवर आपण कमी धार्मिक आहोत हे सांगायला लोकांना कमी लाज वाटते, तर अधिक धार्मिक आहोत हे सांगायला लाज वाटते का? तसं असेल तर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. या सुशिक्षित समाजात राहायचं असलं तर धार्मिकतेचा बडिवार कमी व्हायला हवा अशी सार्वत्रिक अपेक्षा त्यातून दिसून येते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी 'आमच्या घरात पवित्रता जपण्याचे हे धार्मिक नियम आहेत' असं जेवढ्या ठासून सांगितलं जायचं तितकं आज त्या गटात सांगितलं जात नाही. पावित्र्य या कल्पनेची जागा स्वच्छता, सर्वसमावेशकता यांनी हळूहळू घेतली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
३. सर्वेक्षणात भाग घेणारांची संख्या लहान आहे - जितके जास्त लोक भाग घेतील तितकं स्टॅटिस्टिक्स सुधारतं हे खरं असलं तरी ४९ हा आकडा अगदी लहान नाही. ५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल काय येतील हे ठरवण्यासाठी सुमारे एक लाख लोकांचं सर्वेक्षण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी फक्त २०० लोक. त्यातही या सर्व्हेचे दोन भाग दोन संस्थळांवर घेतले गेले. त्यांच्यात सर्वसाधारणपणे सारखीच आकडेवारी दिसली. त्यामुळे अशा अनेक संस्थळांवर कौल घेतला तरीही साधारण हीच आकडेवारी मिळेल याची शक्यता जास्त आहे.
यामागची कारणं काय असावीत?
१. शिक्षण - ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना सिव्हिल सर्व्हिससाठी शिक्षण द्यायला सुरूवात केली तेव्हा ते शिक्षण घेणाऱ्या वर्गाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळायला लागलं. लोकशाही, स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार, राज्यपद्धती या गोष्टींबद्दल जागरुकता आली. त्यातून एक वैचारिक उत्थान झालं, आणि स्वातंत्र्यचळवळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तेच काहीसं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर झालेलं आहे. त्याकाळी साक्षरतेचंच प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास होतं. उच्चशिक्षित मोजकेच. आताच्या पिढीत साक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि उच्चशिक्षितांचं प्रमाणही मोठं आहे. शिक्षणातून विज्ञानाची माहिती होते. पृथ्वी कशी जन्मली, तिचं या विश्वातलं स्थान काय, ती गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती कशी फिरते, या व अशा गोष्टींसाठी सोपी वैज्ञानिक स्पष्टिकरणं मिळतात. मग जगात असलेल्या गूढांची संख्या कमी होते. या गूढांचं उत्तर देण्यासाठी गरज असलेल्या 'अत्त्युच्च शक्ती'चं महत्त्व कमी होतं. शिक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे धार्मिकतेची गरज, विशेषतः कर्मकांडांची गरज कमी होते. हे भारतातच नाही तर इतरत्रही दिसून आलेलं आहे. गॅलप संस्थेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं तसतसं देवावरचा विश्वास, धर्माचं महत्त्व आणि धर्मातून जगाच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यावरचा विश्वास कमीकमी होताना दिसतो.
२. आरोग्य - एके काळी भरमसाठ मुलं व्हायची आणि त्यातली बरीच अकाली मरायची. रोगराईच्या साथी यायच्या आणि धट्टीकट्टी कर्तबगार माणसं, हाताशी येणारी तरुण मुलं त्यात जायची. सदासर्वकाळ दुष्काळांतून पिचत पिचत, अर्धपोटी जगणं हे नेहेमीचं होतं. अशा दीन प्रसंगी देवाचा धावा करण्याची गरज न पडली तरच आश्चर्य. मात्र आता हे चित्र थोडं बदललेलं आहे. सहासात मुलं होण्याऐवजी दोनतीनच मुलं होतात. आणि ती जगतात. त्यासाठी तुटपुंज्या का होईना वैद्यकीय सुविधा आहेत. रोगराईच्या साथी म्हणजे देवाचे कोप वगैरे म्हणण्याची सोय नाही, कारण अनेक साथीच्या रोगांवर ताबा मिळालेला आहे. लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यासाठी देवाकडे धावा करणं किंवा पावित्र्य राखण्यापेक्षा स्वच्छता, ठीकठाक अन्न आणि वैद्यकीय मदत यावर अवलंबून राहाण्याकडे लोकांचा कल राहिलेला आहे. आणि या बदलाचे परिणाम दिसताहेत. म्हणून सुधारलेलं सामाजिक आरोग्य हे धार्मिकतेत घट येण्याचं एक अप्रत्यक्ष कारण आहे.
३. सुबत्ता - दरिद्री माणसाच्या आयुष्यात येणारी दुःखं निवारण्यासाठी लागणारा पैसा नसतो. त्यामुळे मुलाचं ऑपरेशन करता येत नाही, धनदांडग्यांची दडपशाही सहन करावी लागते. दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर माणसाला हतबल करतं. आणि अशा गांजलेल्या व्यक्तीला देवाचा सहारा घ्यावासा वाटला तर काय नवल? दुर्दैवाने दारिद्र्य आणि अशिक्षितता हे हातात हात घालून जातं. त्यामुळे हे प्रश्न अधिकच बिकट होतात. गॅलपने घेतलेल्या मोठ्या सर्वेक्षणातही http://www.gallup.com/poll/142727/religiosity-highest-world-poorest-nati... हेच दिसून आलेलं आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या गरीब देशांमध्ये ९० टक्क्यांवर लोक 'धर्म महत्त्वाचा आहे' असं सांगताना दिसतात. याउलट स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स, जपान वगैरे श्रीमंत देशांत फक्त १७ ते ४० टक्के लोक या प्रश्नाला हो असं उत्तर देतात.
४. जागतिकीकरण - जागतिकीकरणाचा फायदा सुशिक्षित, समृद्ध वर्गाला मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे. भारताबाहेरचं जग प्रत्यक्ष बघून येणं या गटाला परवडू लागलेलं आहे, आणि नवीन संधीही उपलब्ध झालेल्या आहेत. इंटरनेटमुळे सगळं जगच हाताशी आलेलं आहे. यातून काही ना काही प्रमाणात या वर्गाचा परीघ विस्तारलेला आहे. जुनं उगाच जपत बसण्यापलिकडे नवीन, स्वतःला पटेल असं शोधण्याची प्रवृत्ती आणि संधीही वाढलेली आहे. त्यामुळे 'हरतालिका व्रत मी का बरं करावं?' असा प्रश्न विचारण्याची कुवत येते. इतर देशांतल्या तरुणी काही असं व्रत करत नाहीत, पण त्यांचं ठीकठाक चालू आहे की - हे स्वतःच्या डोळ्याने पाहाता येतं. या संस्कृतीच्या सपाटीकरणातून आपल्या वागणुकीतले कंगोरे घासले जातात. हेही एक कारण या वर्गात देवधर्म कमी करण्यामागे आहे.
५. वाढलेल्या संधी - एके काळी जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, मोबाइल नव्हतं त्यावेळी लोकांकडे मनोरंजनासाठी साधनं कमी होती. त्यावेळी समाजातल्या मंडळींना एकत्र आणणारं धर्म हे एक महत्त्वाचं सोशल नेटवर्क होतं. लग्न, मुंजी, सत्यनारायण यांसाठी लोक हमखास एकत्र यायचे. रोज देवळांत जाणं, तिथे मैत्रिणींना भेटणं हा अनेक स्त्रियांसाठी हक्काचा वेळ असायचा. कारण त्यापलिकडे फारसं काही करण्यासारखंच नव्हतं. आज अशी अनेक सोशल नेटवर्क्स तयार झालेली आहेत, आणि त्यांमध्ये व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत. त्यातही आपली आवड-निवड जिथे मिळतीजुळती आहे तिथे जाण्याचं आणि इतरत्र न जाण्याचं स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळे मी म्हणू शकतो की मी या फोटोग्राफीच्या ग्रुपवर जाऊन वेळ घालवेन. केवळ लोक भेटण्यासाठी मला भजनी मंडळात मारून मुटकून जाण्याची गरज नाही.
६. राजसत्ता-धर्मसत्ता चढाओढ - गेल्या साठेक वर्षांत जगाने लोकशाहीची प्रचंड वाढ होताना पाहिलेली आहे. त्यात एकाधिकारशाहीचा ऱ्हास होऊन विविध देशांत लोकशाहीची सुरूवात झालेली आहे. लोकशाहीत जनसामान्याला पटेल अशी सेक्युलर विचारसरणी स्वीकारणं आवश्यक ठरतं. त्यामुळे धर्मांतर्गत बाबी वैयक्तिक लोकांच्या हाती असल्या तरी शासकीय पातळीवर बऱ्यापैकी निधर्मी वागणूक दिसते. अभ्यासाची पुस्तकं लोकशाहीने ठरतात. त्यामुळे त्यातून एकाच धर्माचा संदेश देणं कमी होतं. हे कारण त्यामानाने गौण असावं असं वाटतं. मात्र गेल्या अनेक शतकांत धर्मसत्तेचा प्रभाव सर्वत्र जगभर कमी होताना दिसतो आहे हे मात्र खरं आहे.
७. विज्ञान/तंत्रज्ञानाचा प्रसार - गेल्या पिढीने ज्याची कल्पनाही केली नाही अशी इंटरनेट, कॉंप्युटर आणि मोबाइलसारखी यंत्रं आजच्या पिढीला सहज वापरता येतात. माहितीच्या विस्फोटामुळे टेस्ट ट्यूब बेबी, क्लोनिंग वगैरे शोधांची माहिती चटकन कळते, पसरते. जीवनिर्मितीसाठी देवाची गरज नाही यावर अधिक लोकांचा विश्वास बसतो. त्याहीपलिकडे 'आपलं आयुष्य आपल्या हाती आहे, आणि ते हाताळण्यासाठी नवीन आयुधं आहेत' यातून एक जगण्याविषयी आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वासही अप्रत्यक्षपणे देवाधर्माचं महत्त्व आयुष्यातून कमी होण्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असावा.
८. शहरीकरण - विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात मोठ्या शहरांच्या वाढीमुळे शिवाशीव, अस्पृश्यता हे प्रश्न शहरांपुरते गौण झाले. ट्रेनमध्ये बसताना आपल्या मांडीला मांडी लावून कोण बसला असेल हे सांगता येत नाही. हॉटेलात, रस्त्यावर खाताना ते अन्न कोणी बनवलं आहे याचा हिशोब ठेवता येत नाही. ऑफिसात कोण आपल्याबरोबर काम करतं आहे यावर फार ताबा ठेवता येत नाही. आर्थिक प्रगती साधायची तर ही बंधनं सोडून द्यावी लागली. आणि बहुतांशांनी थोड्या थोड्या तडजोडी करत ती सोडून दिली. याच शहरीकरणातून वैयक्तिक धर्माची उठबस कमी होते. कारण एके काळी प्रत्येक समाज जवळजवळ राहात असे, तसं आता इथे होत नाही. त्यामुळे वैयक्तिक कर्मकांडंही चार भिंतींच्या अजूनच आत गेली.
ही सर्वच कारणं सारखीच महत्त्वाची आहेत असं नाही. मात्र गेल्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक आरोग्यवान, समृद्ध, सुशिक्षित आहे हे नाकारता येत नाही. तिला असलेल्या नेटवर्किंगच्या संधी वाढलेल्या आहेत, जगाची तिला जास्त ओळख आहे. हातात इंटरनेट-मोबाइलसारखी आयुधं आहेत. कुठचीही माहिती मिळवायची असेल तर तिला ती चुटकीसरशी मिळू शकते. त्यामुळे कोणीतरी सांगितलेलं ऐकून घेण्यापेक्षा तिला स्वतः तपासून बघणं अधिक रुचतं. 'बाबावाक्यं प्रमाणं' हे मानायला ती तयार नाही. आणि जर शब्दप्रामाण्यावरचा विश्वास कमी झाला, तर धार्मिकता कमी होणं साहजिकच आहे.
या सर्वामुळे या सर्वेक्षणातून दिसणारे आकडे अचूक नसले तरी चित्र साधारण बरोबर आहे असं म्हणता येतं.
परिणाम
इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात धार्मिकता कमी झालेलीच आहे. अमेरिकेत नव्वदीच्या दशकाआधी फक्त चार टक्के लोक म्हणत 'मी निधर्मी आहे' - आता २३ टक्के लोक ते म्हणतात. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये जाणारी लोकसंख्या वेगाने कमी होत जाते आहे, आणि तिचं सरासरी वय दरवर्षी वाढतंच आहे. याचा अर्थ चर्चमध्ये जाणारी वयस्क पिढी संपत चाललेली आहे, आणि तरुण लोक तिथे जात नाहीत. वरची कारणं तिथेही लागू आहेत. किंबहुना या प्रगत देशांमध्ये ती आधीपासून लागू आहेत म्हणून तिचा परिणाम आत्ताच दिसायला लागला आहे. भारतात हा परिणाम कधी दिसेल? मुळात दिसेल का? हा परिणाम काही काळाने भारतातही दिसू लागेल याबाबत मला बिलकुल शंका नाही. किंबहुना सुशिक्षित, समृद्ध वर्गात हे स्थित्यंतर दिसायला लागलं आहे हेच या सर्वेक्षणावरून सिद्ध होतं. किती वर्षं लागतील हाच खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देणं सोपं नाही. सर्वसाधारणपणे आपण बऱ्याच बाबतीत अमेरिकेच्या सुमारे पन्नास वर्षं मागे आहोत - तेव्हा अजून सुमारे पन्नास वर्षांनी अगदी स्पष्ट दिसायला लागेल एवढंच भोंगळ उत्तर देता येतं.
पुढच्या पाच ते दहा वर्षांचं काय? इथे खरी रोचक परिस्थिती निर्माण होते. आपण पाहिलं की ३० कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. त्याचा प्रसार अर्थातच वाढत जाणार आहे. चार वर्षांनी आत्ताच्या वयस्क पिढीतले चारेक कोटी लोक या जगात नसतील. हे अर्थातच मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब - त्यामुळे जास्त धार्मिक. याउलट त्यांपेक्षा जास्त सुारे आठ ते दहा कोटी तरुण आपली नवी पिढी बनवतील. देशातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असेल. गेल्या काही वर्षांप्रमाणेच प्रगती होत राहिली तर समृद्धीचं प्रमाणही वाढलेलं असेल. अर्थातच आपला सध्याच्या सर्वेक्षणाचा जो सुमारे वीस टक्के वर्ग असेल तो वाढून पंचवीसेक टक्के झालेला असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर धार्मिक असणारांची मतदारांमधून पाचेक टक्के घट - आणि मोठ्या प्रमाणावर अधार्मिक असणारांची मतदारसंघात दहा टक्के वाढ झालेली असेल. हा सुमारे पंधरा टक्क्यांचा स्विंग असेल.
सध्याचं भाजपाचं सरकार हे धर्म आणि विकास या दोन्ही डगरींवर पाय ठेवून निवडून आलेलं आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नसून मारक आहेत. समृद्धी वाढली की धार्मिकता कमी होते. आणि विकास तर हवाच. आणि त्यासाठी हे सरकार निश्चितच कटिबद्ध राहील याची मला खात्री आहे. तसंही भारताने गेली दहा-पंधरा वर्षं सुमारे ७ टक्के विकासदर ठेवलेला आहे. तो किंचित वाढेल किंवा तेवढातरी निश्चित राहील. तोपर्यंत आपला समृद्ध, सुशिक्षित वर्ग पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढलेला असेल. आणि अशिक्षित धार्मिक वर्ग कमी झालेला असेल. या निवडणुकीत विकासाचं आवाहन आणि धार्मिकतेवरचा भर यांचा जो समतोल साधला होता, त्यापेक्षा अधिक झुकतं पारडं विकासाला पुढच्या निवडणुकीत द्यावं लागेल.
मला वाटतं हे चित्र मला दिसतं त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भाजपाला दिसत असावं. 'विज्ञानावर आधारित नसलेल्या हिंदू परंपरा त्यागायला हव्या' या अर्थाचं जे विधान मोहन भागवतांनी केलं त्यामागे हीच जाणीव असावी.
प्रतिक्रिया
19 Sep 2015 - 10:26 pm | राजेश घासकडवी
मिपावर आलेल्या प्रतिसादांचा सारांश
आईवडील १ मी ३ - १ मत (बरीच कमी धार्मिकता)
आईवडील २ मी ३ - ८ मतं (थोडी कमी धार्मिकता)
आईवडील ३ मी ३ - २ मतं. (साधारण सारखीच धार्मिकता)
19 Sep 2015 - 10:52 pm | एस
असे सर्वेक्षण कुणी आजच्या इस्लामिक लोकसंख्येसाठी केल्यास धार्मिकतेची कट्टरता त्या धर्मात किती आहे व त्यातील तरुण पिढ्यांमध्ये ती वाढली आहे की वरील सर्वेक्षणाच्या निकषांनुसार कमी झाली आहे हे जाणून घेण्यासाठी केल्यास समाजशास्त्रात रस असणार्या माझ्यासारख्यांना ती मोलाची माहिती ठरेल.
तुम्ही केलेल्या सर्वेक्षणामध्ये बहुतांश प्रतिसाद हे निदान कागदोपत्रीतरी जे हिंदू असावेत अशांकडून आले होते. म्हणजे हे सर्वेक्षण हिंदू धर्मियांपुरतेच मर्यादित राहिले का असा प्रश्न निर्माण होतो. अगदी गॅलप या संस्थेनेही जो सर्व्हे घेतला त्यात आर्थिक-सामाजिकदृष्ट्या प्रगत अशा मुस्लिम देशांमध्येही सारखाच निष्कर्ष निघाला का अशी शंका येते.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरून पुढे काही कृती करण्याची आपली इच्छा आहे का? असल्यास त्याचे संभावित प्रारूप कसे असणार आहे आणि लोकसंख्याशास्त्र वा इतर सामाजिक शास्त्रांच्या दृष्टीने त्याचा काय परिणाम/उपयोग होऊ शकेल ह्यावरही कृपया प्रकाश टाकावा.
20 Sep 2015 - 3:09 am | राजेश घासकडवी
हा खरंच अभ्यास करण्यासारखा विषय आहे. मी दिलेल्या लिंकवर बऱ्याच देशांसाठीच्या 'धर्म तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की नाही' या प्रश्नाला दिलेलं हो-नाही उत्तरं आहेत. त्यातले मला माहित असलेले मुस्लीम देश बघितले तर त्यांचे दोन गट पडतात - एक म्हणजे मध्यपूर्वेतले देश (इराण, इराक, सौदी वगैरे) आणि इंडोनेशिया, पाकिस्तान आणि दुसरा गट म्हणजे सोव्हिएट राज्यांत असलेले अझरबैझान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे. या दोन गटांमध्ये त्यांच्या उत्तरांत प्रचंड फरक आहे. म्हणजे पहिल्या गटातल्या सर्वच महत्त्वाच्या देशातले ९२% + लोक धर्म महत्त्वाचा म्हणतात. याउलट सोव्हिएट रशियाचा भाग असलेले देश ५०% च्या आसपास आहे. पाकिस्तानसाठी हा आकडा ९२% तर भारतासाठी ९०% आहे.
मात्र पहिल्या यादीत अनेक श्रीमंत देशही आहेत, ज्यांमध्ये धर्म अतिशय महत्त्वाचा असे ९५% च्या आसपास किंवा अधिक लोक म्हणतात.
त्यामुळे सकृतदर्शनीतरी असं म्हणता येतं 'इस्लामिक स्टेट असलेल्या राष्ट्रांत धर्म महत्त्वाचा असं मोठ्या प्रमाणावर लोक म्हणतात'.
थोडक्यात 'मुसलमान अधिक कट्टर असतात का?' या प्रश्नाच्या उत्तराला अनेक कंगोरे आहेत. त्या एका गॅलप सर्व्हेवरून असं काहीसं म्हणता येईल, की जे पुरेसे कट्टर होते त्यांनी धार्मिक आधारावर देश चालवणं सुरू केलं, व ते कट्टर राहिले किंवा अधिक झाले. याउलट जे निधर्मी राज्यव्यवस्थेतून गेले ते कमी कट्टर झाले.
या सर्व्हेचा कोणाला उपयोग होईल माहीत नाही, पण समाजशास्त्रज्ञांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात त्यासाठी जास्त चांगला आणि व्यापक सर्व्हे घेणं आवश्यक आहे. तसंच राजकारण्यांसाठीही आहे. दुर्दैवाने राजकारणी लोकांत बदलती सत्यं स्वीकारण्याइतकी लवचिकता नसते बहुधा.
20 Sep 2015 - 3:50 am | एस
यामध्ये तुर्कस्तान आणि मलेशिया ह्या प्रगत मुस्लिम देशांच्या मतांचा कौल काय आहे?
पूर्वाश्रमीच्या सोवियेत संघराज्यातील देशांचे कौल अपेक्षित असेच दिसताहेत.
20 Sep 2015 - 4:06 am | राजेश घासकडवी
जगातल्या सर्वात धार्मिक पाच देशांबद्दल माहिती देणारा एक लेख सापडला. त्यातल्या काही देशांत तरी शाळेत धर्माचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे धार्मिकता ठसवण्यासाठी लहानपणापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात.
19 Sep 2015 - 10:59 pm | मारवा
१- सर्वप्रथम घासकडवींच्या उपक्रमशीलतेच सर्व्हे च्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या जिद्दीच, वैज्ञानिक रीतीने प्रश्न सोडविण्याचा किमान प्रयत्न करण्याच त्या मागील वृत्तीच मन:पुर्वक अभिनंदन,
२- सर्व्हे चा पुअर रीस्पॉन्स हे घासकडवींच अपयश नाही. हे आपल्या एकंदर सामाजिक परीस्थीतीच अपयश आहे. आपला समाज अमुर्त संकल्पनांवर चर्चा करायला जितका उत्सुक तितकाच एखादा ठोस निष्कर्ष काढणारा प्रयोग करण्यासाठी सहसा अनुत्सुक असतो. मला वाटत कुठेतरी नेणीवे मध्ये निष्कर्षांची भीती असते की काय ? हे सर्व्हे च्या व्होटींग ला मिळालेले प्रतिसाद आणि चर्चेचे ए़कुण प्रतीसाद या आकड्यांच्या तफावतीतुन च स्पष्ट होत. नकळत एक दुसरा सर्व्हे झालाच एकुण कीती व्होटींग ११ एकुण प्रतिसाद २०० देख लो.
३- या सर्व्हे कडे मी बीज पेरणी या दृष्टीने बघतो उद्या अजुन कोणी येईल अजुन मोठा सॅम्पल विदा त्याला मिळेल अजुन लोक व्होटींग करतील इ. ही एक शुभ सुरुवात आहे. आज ना उद्या लोकांना प्रश्नांना वैज्ञानीक रीतीने अधिक प्रामाणीकतेने भिडावच लागेल.
४-घासकडवींनी दिलेली कारणमीमांसा अत्यंत मार्मिक आहे त्यात घट होणार नाही मात्र कारणांची लीस्ट अजुन वाढेल . उदा. धर्माला टाळुन पर्यायी मानवी मुल्यव्यवस्था कधी नव्हे इतकी उत्क्रांत झालेली आहे. त्या अंगाने आज नैतिकतेसाठी धर्मावर वा त्याच्या सैध्दातीकतेवर अवलंबुन राहण्याची कुठलीही गरज आज तरी राहीलेली नाही.
19 Sep 2015 - 11:11 pm | स्वप्नांची राणी
नक्कीच अभिनंदन घासकडवींचे!! आणि उत्तम प्रतिसादाबद्दल आपलेही अभिनंदन मारवा साहेब!
"धर्माला टाळुन पर्यायी मानवी मुल्यव्यवस्था कधी नव्हे इतकी उत्क्रांत झालेली आहे. त्या अंगाने आज नैतिकतेसाठी धर्मावर वा त्याच्या सैध्दातीकतेवर अवलंबुन राहण्याची कुठलीही गरज आज तरी राहीलेली नाही...." हे वाक्यही मार्मिक आहे. '
20 Sep 2015 - 4:51 am | राजेश घासकडवी
संपादक मंडळाला विनंती. या लेखात 'त्याचा आलेख खाली दिलेला आहे.' या वाक्यानंतर एका आलेखाची इमेज घातलेली होती, ती काही कारणाने दिसत नाहीये. कृपया त्याजागी ही लिंक वापरून लेख अद्ययावत कराल का?
https://lh5.googleusercontent.com/hEySKWhOmUo0N-3CIGxAxgrKSnRvo3nQxG9-ch...
तो आलेख असा दिसायला हवा
20 Sep 2015 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
या आलेखचित्राची लिंक चुकीची आहे. योग्य लिंक दिल्यास दुरुस्ती करता येईल.
20 Sep 2015 - 7:45 pm | राजेश घासकडवी
वरील प्रतिसादात मला आलेख दिसतो आहे. तुम्हाला दिसतो आहे का? तसंच वरील प्रतिसादातल्या लिंकवर क्लिक केलं की मला ते चित्र दिसत आहे. तुम्हाला दिसत नाही का? तसं असेल तर मला पुन्हा तपासून पाहावं लागेल.
20 Sep 2015 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर
अजुनही मला वाटतं की सर्व्हेतून मिळालेला विदा आणि निष्कर्ष तितकेसे विश्वासार्ह नसावेत. एक तर धर्म ही संकल्पना भावनेशी निगडीत आहे. आणि भावनांचा संबंध मनाशी येतो, जे अथांग आहे. म्हणजेच ज्याचा थांग लागू शकत नाही. अगदी त्या त्या व्यक्तीलाही. आपली खरी धारणा वेगळी आहे आणि आपण वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहोत हेच कित्येकदा लक्षात येत नाही. कारण आपल्या कृतीचे (व्यक्त होण्याच्या) त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विश्लेषण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. तसे केले तर कांही व्यक्त करण्यास अवघड वाटणार्या संवेदना सार्वजनिक पातळीवर उघड होतील ही भिती आणि त्या विष्लेषणावर आपल्या मनावर पूर्वापार झालेले धार्मिक संस्कार आजही प्रभाव पाडू शकतात ही शक्यता, स्वतःच स्वतःचे केलेले विष्लेषण निष्पक्षपाती होऊ देत नाही. म्हणजे मी किती आस्तिक आहे किंवा नास्तिक आहे ह्याबद्दलचा माझा अभ्यासही कांहीसा पक्षपाती असू शकतो. आणि मनाच्या अथांगते मुळे इतरही कोणी ते करू शकत नाही. त्यामुळे स्पष्ट चित्र समोर येत नाही. थोडेफार कळू शकेल ते प्रत्यक्ष कृतीतूनच. ती कृतीही कुठल्या प्रसंगात कशी होती ह्याचा अभ्यास करावा लागेल. एव्हढे सर्व करणे सर्वसामान्यांना शक्य आहे का? हे फार कठीण आहे. जसे शारीरिक व्याधींमध्ये भोवरी, कॅन्सर, आतड्यांमधील संसर्ग ह्यांचे समुळ उच्चाटन नाही झाले जरा जरी बीज मागे उरले तरी व्याधी, कांही वर्षांनी पुन्हा फोफावते. तद्वत, धार्मिकतेतील कर्मकांडांचे प्रस्थ, त्यावरील अंधविश्वास ह्यांचे समुळ उच्चाटन होण्याची गरज आहे ते न झाल्यास समाजास जडलेली ही व्याधी पुन्हा फोफाऊ शकते. अशा वेळी आजच्या सर्वेक्षणावरून काढलेले आपले (आपण सर्वांनी मिळून काढलेले) निष्कर्श पराभूत होतील.
आपल्या वरील विश्लेषणात कांही ठिकाणी शिक्षणाचा प्रसार आणि सुबत्ता ही दोन कारणं धार्मिकता मागे पडण्याची कारणे आहेत असे म्हंटले आहे. पण, आधुनिक जगात सुबत्तेबरोबरच स्पर्धा भयंकर वाढली आहे. शिक्षणाचा प्रसार झाला पण तंत्रज्ञानाने समिप आलेल्या जगात नोकरी मिळवणं, ती टिकवणं, त्यात पदोन्नती मिळवणं आणि सामाजिक उच्चासन मिळवणं ह्यातली स्पर्धा वाढली आहे. नोकरी-व्यवसायातील असुरक्षितता भयंकर वाढली आहे परिणामतः लोकांची देवधर्माकडील धाव वाढते आहे. कारण देवासमोर तुम्ही मनाने एकरुप होता. त्यात तिसरे कोणी नसते. त्या मुळे आपले मन मोकळे कारायला लाज वाटत नाही. ती कदाचीत इररांसमोर व्यक्त होताना वाटत असते. सुबत्तेने बाह्यात्कारी आत्मविश्वास वाढतो की Yes I did it. पण अंतर्मनाची अस्वस्थता वाढत असते. जे मी मिळवलय (सुबत्ता) ते टिकून राहील नं? मग ती सुबत्ता टिकविण्यासाठी येते धार्मिकता आणि कर्मकांड. त्यासाठीही लोकं पुन्हा पुन्हा धार्मिकतेकडे वळतात. आर्थिक स्तर वाढल्यामुळे खुपशा गोष्टी सुलभ होतात. अगदी धार्मिकताही. जास्तित जास्त पैसा खर्च करून कर्मकांडांद्वारे आपला डळमळणारा आत्मविश्वास स्थिर करण्याचा प्रयत्न होतो. शिर्डीला जा देणगी दे, सिद्धिविनायकाला देणगी दे, बालाजीला जा देणगी दे ह्या सर्व देवस्थानांकडे देणगी रुपाने अमाप पैसा, सोनं येत असतं. हल्लीच एका वाहिनीवर सांगितलं होतं की हे सर्व धन एकत्र केलं तर भारतातील सर्वांना वर्षभर मोफत भोजन पुरविता येईल. येवढं अमाप धन जमतं कुठून तर आर्थिक सुबत्ता लाभलेल्या भक्तगणांच्या(?), हि सुबत्ता टिकेल की नाही ह्या, भितीतून. म्हणजेच शिक्षणाने, तंतज्ञानाने नोकरी व्यवसायातील स्पर्धा वाढली म्हणून आणि आर्थिक सुबत्तेने कर्मकांडासाठी पैसा 'फेकणे' सहज शक्य झाले म्हणून धार्मिकता कर्मकांडं वाढली आहेत.
पुरुष थोडा बेफिकीर असतो पण त्या मानाने स्त्रीचा स्वभाव निसगतःच जरा घाबरट असतो. त्यांमुळे लग्नानंतर दोघांच्याही वागण्यात सुरुवातीला सुबत्ता मिळावी म्हणून, मुलं नीट हुशार, सतशिल, सुसंस्कारी व्हावीत म्हणून, सुबत्ता मिळाली की ती टिकावी म्हणून आणि पुढे मुलांचे संसार नीट व्हावेत त्यांच्या कांही अडचणी असतील तर (आणि असतातच कारण त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते) त्या दूर व्हाव्यात म्हणून धार्मिकता, कर्मकांडांच प्रस्थ वाढत जातं. कित्येकदा नवराही ह्याच विचारांचा बनत जातो किंवा 'जाऊदे, एव्हढे केल्याने तिला समाधान मिळतय नं तर करून टाकू' ह्या भावनेतून कर्मकांडात गुरफटत जातो.
तिसरी बाजू, राजकारणी आपल्या स्वार्थासाठी, देऊळ प्रशासन त्यांच्या स्वार्थासाठी आणि दुकानदार ह्यातून निर्माण होणार्या व्यवसाय संधीसाठी मनाने दुर्बल भक्तांवर(?) सतत प्रभावपाडून त्यांच्या दोलायमान विचारांना आपल्या बाजूने वळवित असतात. त्याचाही परीणाम वाढत्या धार्मिकतेवर आणि कर्मकांडावर पडतो आहे. समाजात जेव्हढी स्पर्धा वाढेल, ऐहिकतेची ओढ जेव्हढी वाढेल, नोकरी व्यवसायातील असुरक्षितता जेव्हढी वाढेल तेवढा समाज ह्या वर सांगितलेल्या स्वार्थी 'एजंटा'च्या फसवणूकीला बळी पडत जाऊन पैसे 'फेकून' आत्मिक समाधान शोधत राहील. कुठल्याही सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष कधीच खरे चित्र उभे करू शकणार नाही.
मी कर्मकांड नाही केली तरी माझे कांही वाईट होणार नाही हा विचार रुजला पाहिजे. माझे बरेवाईट जे व्हायचे असेल ते माझ्या कृत्यातून होईल. समाजाने कर्मकांडं, धार्मिकतेच्या मागे लागण्यापेक्षा सत्प्रवृती जोपासण्याची गरज आहे. देवावर प्रेम करा, देवाची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही.
20 Sep 2015 - 7:14 pm | बोका-ए-आझम
पुरुष थोडा बेफिकीर असतो पण त्या मानाने स्त्रीचा स्वभाव निसगतःच जरा घाबरट असतो. >>>
हा एक मुद्दा सोडला तर पेठकरकाकांशी सहमत.
20 Sep 2015 - 7:36 pm | प्रभाकर पेठकर
स्त्रीचा स्वभाव निसगतःच जरा घाबरट असतो.
हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. कर्मकांडाकडे स्त्रीयांचा कल जास्त असतो. असे का करायचे? असा प्रश्न सहसा त्यांना पडत नाही. काही प्रश्न न विचारता आहे त्या पारंपारिकतेलाच चिकटून राहणं त्यांना 'सुरक्षित' वाटतं. उगाच 'त्याचा' कोप होऊन कांही संकटे येऊ नयेत असे तिला वाटत असते.
'गुलाम' ह्या भविष्यावर आधारीत नाटकात 'संसारात वाताहत होण्याची भीती ही स्त्रीलाच जास्त असते' असे एक वाक्य आहे. ह्याला कारण पूर्वीच्या काळी आणि कांही प्रमाणात हल्लीही नवरा धाडसी निर्णय घेत असतो. तो अति धाडसाने निर्णय घेत आहे असा संशय आला तरी घरची स्त्री त्याला परावृत्त करते. किंबहुना तिला ताकही फुंकून प्यायची सवय असते. ह्याला अपवादही नक्कीच असतील पण सर्वसाधारणपणे हे चित्र दिसते.
20 Sep 2015 - 8:27 pm | बोका-ए-आझम
तुम्ही जर घाबरट हा शब्द या अर्थाने वापरत असाल तर मग बरोबर आहे. सहसा स्त्रिया परंपरा आणि व्यवस्था या दोन्हीही गोष्टी जतन करण्यात पुढे असतात. पण यालाही अपवाद आहेत.
21 Sep 2015 - 2:05 am | राजेश घासकडवी
हे अगदी बरोबर बोललात. मनुष्यामधल्या सत्प्रवृत्तीला जर देव मानलं, तिची पूजा केली तर ज्या कोणात ही सत्प्रवृत्ती दिसेल तिथे आदर करणं, सन्मान देणं, प्रसंगी नतमस्तक होणं होईल. तसंच स्वतःमधली सत्प्रवृत्ती अधिकाधिक जोपासण्याचा प्रयत्न करणं होईल. हे जर झालं ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे खळांची व्यंकटी सांडेल, आणि सर्व जीवभूत-प्राणिमात्र एकमेकांचे सोयरे होतील. मग त्यासाठी कुठची मूर्ती नको, बाबा-महाराज नको, कर्मकांडं नको, व्रतवैकल्यं नको, सत्यनारायण नको की वास्तुशांती नकोत.
20 Sep 2015 - 2:15 pm | प्यारे१
समाजातला एक ठिपका जो मिसळपाव किंवा ऐसीअक्षरे वर आहे त्यावरून आक्ख्या समाजाचा आलेख काढणं हे फारच विचित्र वाटत आहे. ठामपणं, सातत्य ठेवून पूजा अर्चा न करणं, स्तोत्रं न म्हणणं अथवा एकंदर धार्मिकता न पाळणं ह्या गोष्टीन्चा संबंध अनुक्रमे सातत्य, पाठांतर आणि आळस याबाबत जास्त जोड़ता येतो. या बाबी निव्वळ धार्मिकतेच्या क्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत असं वाटत नाही. पाढे पाठ असणं, रोजच्या रोज अभ्यास करणं, कॉलेजमध्ये वर्गात उपस्थिती असणं आणि शिक्षकांचा आदर इत्यादि गोष्टी पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत समान आहेत??? एकंदर सामाजिक मन बदलतंय का फ़क्त धार्मिकतेचा तोंडवळा बदलतो आहे? बाकी कारण मीमांसा मान्य असली तरी ती पुरेशी नाही. असो!
20 Sep 2015 - 3:53 pm | मांत्रिक
एकदम परफेक्ट बोललास प्यारे! मला कर्मकांडाचा फार आळस पण नामजप किंवा स्मरणभक्ती मला सोपी वाटते. मग मी यात कुठंच बसत नाही.एवढ्याश्या सुतावरून काहीजणांनी तर वा! आता धर्म हद्दपारच झाला! या स्वर्गापावेतो खुषीत उड्या मारलेल्या दिसून येतात. असो.
20 Sep 2015 - 8:02 pm | राजेश घासकडवी
आख्ख्या समाजाचं हे चित्र नाही, फक्त याच विशिष्ट वर्गाला ते लागू आहे असं स्पष्टपणे लेखात म्हटलेलं आहे.
पण हा वर्ग ठिपक्याइतका लहान नाही. सुशिक्षित लोक (कॉलेज पूर्ण केलेले - बॅचलर्स डिग्री असलेले) सुमारे पंचवीस टक्के लोक आहेत. खाऊनपिऊन सुखी - कार/स्कूटर बाळगणारे, घरी फ्रिज-टीव्ही-फोन-इंटरनेट असणारे हेही इतकेच. शहरांत राहाणारेही तीसचाळीस टक्के आहेत. आता या सगळ्यांमध्ये प्रचंड ओव्हरलॅप आहे. त्यामुळे या सगळ्या अटी पूर्ण करणारा वर्ग लहान नाही. आणि दरवर्षी याची टक्केवारी वाढतच चाललेली आहे.
धार्मिकतेचा तोंडवळाच नाही, तर जातकुळी बदललेली आहे. ही प्रक्रिया गेली शंभरेक वर्षं तरी चालू आहे. धर्माचे नियम हळूहळू मोडत पडत आहेत. शिवाशीव पाळणं शंभर वर्षांपूर्वी प्रचंड होतं - आता ते त्यामानाने खूपच कमी झालेलं आहे. शिक्षण कोणी घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार धर्मसंस्थेला होता, आता तो निघून गेलेला आहे. कुठच्या वर्तनाबद्दल काय शिक्षा द्यायची हेही अनेक बाबतीत धार्मिक ठरवत - आता ते सरकार ठरवतं. आजार झाला की मांत्रिकाकडे जाणं सर्रास असे, आता तेही कमी झालं आहे. सर्व विश्वाची उत्पत्ती देवाने केली असं सगळेच मानत - आता वैज्ञानिक कारणं मानणारे वाढले आहेत. जीवसृष्टी देवाने तयार केली असंही सगळेच मानत. आता उत्क्रांतीतून निर्मिती झाली हे जाणणारे वाढलेले आहेत.
अनेक वैचारिक बाबतीत, कृतींच्या बाबतीत धर्मनियम होते. आता त्यातले बरेचसे न पाळता वाळीत पडण्याची भीती न बाळगता जगणारे वाढलेले आहेत. या अर्थाने धर्माचा पगडा प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे.
20 Sep 2015 - 8:23 pm | प्यारे१
बेसिक व्याख्या वेगळ्या आहेत. तुम्ही रुढी आणि परंपरांबद्दल बोलत आहात. धर्माबद्दल नाही.
ते तसं होणं साहजिक नाही तर आवश्यक सुद्धा आहे. मुळात एखादी परंपरा का करायची हे ठाऊक नसलं तर ती बाजूला आपसुकच पडते. तशी पडत नसेल तर त्यात भ्रष्टता न येता तिला बाजूला समाज धुरीणांनी सारायला हवीच. तशी ती अनेक संत म्हणवणारांनी सुद्धा केलेली आहे. शिवाशिव एकनाथ महाराज, नामदेव, तुकाराम सगळ्यांनीच बाजूला सारली.
असो. या सर्व्हेचा उद्देश फक्त धार्मिकतेचा पगडा कमी झाला हे दाखवणं आहे कि आणखी काही सामाजिक प्रयोग करणार आहात? भाकड गायीचं दूध शेरभर निघतंच नाहीतरी. ;)
21 Sep 2015 - 2:34 am | राजेश घासकडवी
नाही हो, मी उदाहरणं दिली आहेत ती धर्मामुळे काय बंधनं होती, कसा विचार करावा लागत असे याबद्दल आहेत. म्हणजे शिक्षण कोणी घ्यायचं हे धर्मग्रंथांत स्पष्ट लिहिलं आहे, म्हणून तर ज्ञानेश्वरांना त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी पैठणला जावं लागलं. ती परंपरा नाही, धर्मनियम होता.
संत लोक काळाच्या पुढे होते महाराज. त्यांना जे करायला जमलं ते त्यांच्यानंतर अनेक शतकं सामान्य लोक करतच आले. गेल्या काही दशकांत जितक्या प्रमाणात शिवाशीव गळून पडली आहे ती पाहून गाढवाला गंगाजल पाजणाऱ्या एकनाथ महाराजांना आनंदच होईल. आणि पुन्हा, ही शिवाशीव पाळणं ही परंपरा नव्हती, धर्माज्ञा होती.
सर्व्हेचा उद्देश अमुकतमुक सिद्ध करणं असा नसून काय परिस्थिती आहे ते किंचित प्रमाणात जाणून घेणं हा होता. त्या सर्व्हेच्या मर्यादांसकट त्याचं विश्लेषण मांडलं. यापिलकडे आणखीन काय अपेक्षित होतं?
मी एक विचारू का? गेल्या लेखातही मी हे पाहिलेलं आहे की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतानाही तुम्ही तिरकस, कुजकट कॉमेंटीपलिकडे काही केलेलं नाही. त्या धाग्यावर अत्रुप्त यांच्याशीदेखील भांडण केलंत. का एवढा कडवटपणा बाळगून आहात तुम्ही? मी तुमचं नक्की काय घोडं मारलेलं आहे? खरंच सांगा, मी जमेल तसं बदलण्याचा प्रयत्न करेन. पण असली उगाचच्या उगाच भांडणं करून तुम्ही तुमची प्रतिमा बिघडवत आहात असं वाटत नाही का तुम्हाला? बरं, तुमच्या प्रतिमेची समजा तुम्हाला काळजी नसेल, पण मिपावर येणाऱ्या सदस्यांना 'इकडे उगाचच्या उगाच राडे चालतात' अशी मिपाची प्रतिमा झालेली तुम्हाला आवडेल का?
तुम्हीच सुमारे दोन वर्षांपूर्वी लिहिलं होतंत
मी काय म्हणतो, तुम्हाला जर माझ्याशी काही वाकडं असेल, काही वाद घालायचा असेल तर तुम्ही माझ्या खरडवहीत लिहा, व्यनि पाठवा. पण असं धाग्यावर उगाच तिरकस कॉमेंटांचे बाण का चालवता?
विचार करा.
21 Sep 2015 - 3:32 am | प्यारे१
ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी धर्म संस्थेमध्ये आलेला कर्मठपणा हा भरपूर होता. बॅकड्रॉप हाच तर होता माऊलींचं कार्य झळाळण्यासाठीचा. संस्कृत मध्ये अडकलेली भगवद्गीता सामान्यांसाठी मोकळी करणं हेच मुख्य जीवनकार्य ठरलं ना त्यांचं?
बाकी विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा अपवाद वगळता किती संन्याशांनी पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकारुन ज्ञानेश्वरांसारखी संतती निर्माण केली? संन्यास म्हणजे गाजराची पुंगी नाही कि वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली. अपवादात्मक परिस्थिती म्हणून विठ्ठलपंतांचं उदाहरण मान्य करावं. (लग्न झालेल्या विठ्ठल पंतांनी खोटं बोलून संन्यास स्वी कारला हे त्यांच्या गुरुंना समजल्यानंतर त्यांनीच पुन्हा संसार करण्याची आज्ञा दिली) संन्यासानं गृहस्थधर्म स्वीकारणं ही रुढी नव्हती, नाही किंवा होऊ शकत नाही. काय चुकलं ओ धर्मसंस्थेचं ???? तसं झालं नाही तर आज मला वाटलं तर अय्याशी करुन उद्या संन्याशी होईन की मी. किंवा संन्यास स्वीकारेन आणि न जमल्यास पुन्हा बदलेन. त्यांच्या संततीला स्वीकारावा लागणारा त्रास हा कोलॅटरल डॅमेज म्हणून स्वीकारावा लागतो.
धर्मसंस्था आणि धर्म यांबाबत वारंवार गल्लत करणं हे जाणीवपूर्वक होतंय का? मागच्या तुमच्याच लेखा वर प्रतिसाद देताना लिहील्यानुसार धर्मसंस्थांमध्ये लोभ, हाव इत्यादी दोष शिरल्यानं त्यांच्यात उच्चनीच भेद घडवले गेले. धर्माज्ञा कुणी आणि कुठल्या प्रकारचा आदेश वापरुन अमलात आणली गेली कळेल का? यात धर्माचा आदेश कुठे असणार आहे?
बाकी कडवटपणा वगैरे काही नाही हो. तुम्ही प्रामाणिक आहात असा दावा करत असलात तर कृपया एक गोष्ट सांगाल तर बर होईल. समाजातला एक प्रचंड मोठा समुदाय काही करतो ते सगळे चुकीचं करत आहेत, त्यांनी तुम्ही सांगताय त्या गोष्टींचा विचार केला नाही असं तुम्हाला वाटत आहे का? मिसळपाव किंवा आंतरजाल वापरतच नाहीत असाही एक मोठा समाज काम करतोय. तो अशा सर्वे मध्ये कधीच सामील होणार नाहीये. त्यांना धर्माचा काही उपयोग होत आहे ना?
धर्म म्हणजे नेमकं काय हे एकदा वाचायला काय हरकत आहे म्हणतो मि? स्वतःचाच अजेंडा कायम सामोरा आणून त्याला राबवणार्या आणि त्यानुसार सगळं घडत आहे असं मानणार्या लोकांना काय म्हणावं? कर्मठपणा नेमका कुणामध्ये आहे? विश्व निर्माण कसं झालं याचा विचार जरी विज्ञान करत असलं तरी विश्वाच्या निर्माणापूर्वी नेमकं काय होतं याचा विचार 'ॐ पूर्णमदः पूर्णमिदं.... ' सारख्या विचारातून करता येतो. शंकर सगळ्याचा नाश करतो पण त्याचा नाश कोण करतो म्हणायला समर्थ रामदास असतात. रुढी, परंपरा वगैरे बदलत असतात, त्या बदलाव्यातच. घटस्फोट झालेल्या एखादीला सवाष्ण म्हणून बोलावणं, एकसष्ठीनिमित्त वृद्धाश्रमाला मदत वगैरे गोष्टी आमच्या घरीच होतात. रोज पूजा देखील होते. तारतम्य वापरावं लागतं ओ साहेब, बाकी काही नाही.
धर्म निव्वळ बाह्य अवडंबरावर अवलंबून नाही. ते अवडंबर झाडायला हवं किंवा ते कालानुरुप योग्य वेळ येता झडतंच. पण म्हणून मुळ गाभा सोडता येत नाही हे आपल्यासारख्या लोकांना समजत नाही असं वाटून चीड चीड होते एवढंच.
अवांतरः आमचे लेख वाचता हे वाचून आनंद झाला. आणि बुवा आमचे मित्र आहेत. सत्यनारायण सांगायला आम्ही मागच्या वेळी त्यांनाच सांगितलं होतं. पुढेही सांगूच. काळजी करु नये.
21 Sep 2015 - 7:29 am | राजेश घासकडवी
उत्तम. निदान तिरकसपणा सोडून योग्य रीतीने प्रतिवाद करायला लागलात हे बरं वाटलं.
सन्यासी वगैरे जाऊदेत. खरं तर प्रश्न असा विचारायला हवा की केवळ ब्राह्मणांनाच शिक्षणाचा अधिकार देऊन आणि उरलेल्या पंच्याण्णव टक्क्यांहून अधिक लोकांना तो शतकानुशतकं नाकारून किती ज्ञानेश्वर जन्मूनसुद्धा व्यक्त होऊ शकले नाही? खालीच कोणीतरी म्हटलं आहे की औद्योगिक क्रांती युरोपात झाली कारण भारतातून ज्ञान तिकडे गेलं. हे साफ खोटं आहे. जर भारतात सर्वांना शिकण्याचा अधिकार असता तर भारतातच आधी औद्योगिक क्रांती झाली असती. आणि हा तोटा झाला तो धर्माज्ञेमुळे.
तुम्ही म्हटलं आहे की मी ऑर्गनाइझ्ड रिलिजन आणि व्यक्तिगत धर्मपरायणता यात गल्लत करतो आहे. पण व्यक्तीवर जर या बाह्य धर्मव्यवस्थेचं दडपण असेल तर आंतरिक धार्मिकता फुलणार कशी? तेराव्या शतकातल्या महाराचा कितीही आध्यात्मिक स्वभाव असेल तरी आपल्याला मंदिरातही शिरता येत नाही ही भावना तो दूर कसा सारणार? तेव्हा व्यक्तिगत आणि बाह्य समाजाचा धर्म यात फरक करणं ही एकविसाव्या शतकातली चैन आहे. तेराव्या शतकातली नाही.
अजूनही तुम्हाला माझा काहीतरी अजेंडा आहे असं वाटतं आहे. तुम्ही तो काय आहे हे स्पष्ट सांगत का नाही? मी एक सर्वेक्षण घेतलं. त्यातून निघणारे निष्कर्ष बरोबर असतील, चूक असतील. पण काहीतरी सिद्ध करण्याच्या हेतूने मी हा सर्व्हे घेतला असं का वाटतं? जर मी काढलेले निष्कर्ष चुकीचे किंवा चुकीच्या मार्गाने काढलेले आहेत असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मार्गाने 'योग्य' त्या पद्धतीने योग्य ते निष्कर्ष का काढत नाही? भाकड गायीला शेरभर दूध म्हणणं सोपं असतं. पण आपण जर काही केलं नाही, तर आपणच भाकड गाय ठरत नाही का?
21 Sep 2015 - 11:49 am | प्यारे१
धर्म अशा आज्ञा देत नाही. ज्यांच्या हाती धर्मसंस्था आहेत ते लोक स्वत:च्या फायद्यासाठी हवा तसा वापर करण्याचा तात्कालिक प्रयोग करत असतात. ज्याचा त्याचा दोष ज्याच्या त्याच्याच माथी असावा. धन्यवाद.
22 Sep 2015 - 9:09 am | अर्धवटराव
धर्माने ब्राह्मणांना शिक्षणाचा अधिकार दिला व इतरांना तो नाकारला हि एक प्रचंड मोठी गफलत विचारवंतांमधे पसरली आहे. एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे ति. शिक्षणाचा जीवनक्रम आणि मानवी इतीहासातलं त्याचं स्थान याच्या शुण्य अभ्यासावर हि अंधश्रद्धा आधारलेली आहे.
हा एक दुसरा मोठा गैरसमज. असो.
22 Sep 2015 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर
जे कोणी अब्राह्मण संत होऊन गेले, उदा. नामदेव, तुकाराम, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावता माळी आणि इतर अनेक, हे ब्राह्मणांच्या तथाकथित स्वार्थी वर्चस्व काळातच झाले आणि नावारुपाला आले. जर समाजावर ब्राह्मणांचे एव्हढे अंध वर्चस्व असते तर ह्या संतांचा उपदेश समाजापर्यंत पोहोचला असता का? ह्या अब्राह्मण संतांना ब्राह्मणांनीही डोक्यावर घेतले होते हे कसे विसरता येईल?
21 Sep 2015 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी ऐसी काही संस्थळे निदर्शनास आलेली आहेत.
20 Sep 2015 - 7:11 pm | बोका-ए-आझम
प्रातिनिधीक नसलं तरी घासकडवींनी हा मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मुळात संस्कृत भाषेत असलेला धर्म हा शब्द आणि इंग्लिशमधला religion हा शब्द यांच्यात फरक आहे. जरी ते एकमेकांचे प्रतिशब्द म्हणून वापरले जात असले तरी. धर्म हा शब्द एक जीवनपद्धती सुचवतो तर Religion हा शब्द एक विश्वासपद्धती सुचवतो. त्यामुळे धार्मिक हा शब्द जेव्हा वापरला जातो, तेव्हा तो कुठल्या अर्थाने वापरला जातो हे म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे. घासकडवींच्या या सर्वेक्षणात मी भाग न घेण्याचं कारण माझ्या मनात असलेला हा संभ्रम आणि अजूनही या गुणात्मक (Qualitative) मुद्द्याला संख्यात्मक (Quantitative) प्रकारे प्रस्तुत कसं करणार हा संभ्रम माझ्या मनात आहे.
20 Sep 2015 - 8:15 pm | द-बाहुबली
भारतीयांच्या विषेशतः हिंदुच्याबाबत धार्मीकतेचा असला सर्वे घेणारा महान म्हट्लाच पाहिजे. कारण मला तरी पुर्वीच्या काळी व अगदी मागच्याच्या मागच्या पिढीत जशी धार्मीकता अस्तित्वात होती असे ऐकीव ज्ञान आहे त्याच्या किमान ९०% तरी ती केंव्हाच संपुष्टात आलेली आरामात महाराश्ट्रात अनुभवाला येते. त्यासाठी मराठी संस्थळांवर सर्व्हेची आवश्यकता का भासावी ?
पण याच जगात इश्वराचे अस्तित्व मानणार्यांची संख्या कमी होतेय की जास्त हे मोजणे जास्त रोच्क आहे.. मग इश्वराचे अस्तित्व नाकारणे हि गोष्ट सगळ्यात सोपी का असेना...
20 Sep 2015 - 8:47 pm | कवितानागेश
म्हणजे सोप्या गोष्टी करण्याकडे मानवसमाजाचा कल वाढतोय, असे तुम्हाला सूचित करायचे आहे का ?
21 Sep 2015 - 1:50 pm | द-बाहुबली
तुलनेने सोपी भासणारी गोष्ट प्रथम अनुभवणे हा मानवी मनाचा स्वभाव आहे... त्यात काहीही गैर नाही. पण जेंव्हा एखादी गोश्ट नाकारणे फार सोपे भासत आहे पण परिपुर्ण नाही याची जाणीव अनुभवाला येते तेंव्हा जिवाची व्रुत्ती तुलनेने सोप्या भासलेल्या तर्काबाबत उदासिन होउ लागते.
20 Sep 2015 - 9:12 pm | साधा मुलगा
छान विश्लेषण राजेश साहेब. पण फक्त ११ लोकांचा सहभाग मिपावर? प्रतिसाद २०० च्या वर गेले होते मला वाटलं किमान ५० एक लोक तरी सहभाग घेतील.
20 Sep 2015 - 9:22 pm | दत्ता जोशी
या धाग्यावर भाग घेतलेल्यांच्या सर्वेक्षणावर आधारभूत असे निष्कर्ष कितपत खरे खोटे असतील याविषयी नक्कीच शंका आहे. आपण यामागे दिलेल्या कारणांशी संपूर्ण सहमत नाही करण नाण्याला दुसरी बाजू आहे तिचा विचार होणेही गरजेचे आहे. व्लेलेअभवि जमेल तितकेच लिहितो.
१. शिक्षण- इंग्रजांनी त्यांना हवे तसे "माठ" बनवण्यासाठी शिक्षण पद्धती बदलली आणि समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी धर्म, रूढी इ. कशा निकामी कुचकामी आणि बुरसटलेल्या आहेत ते जनमानसात बिंबविले. त्यातूनच स्वामी विवेकानान्दान्सारखे विज्ञान निष्ठा तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवक निर्माण झाले. पण जे नियतीच्या मनात असता तेच होतं. याच स्वामी विवेकानंदांचे अनेक पाश्चात्य वैज्ञानिक आकर्षित झाले. ( उदा. निकोला टेसला सारखे चमत्कारी शास्त्रज्ञ.) याच काळात सुमारे १७ व्या शतकाच्या मध्य ते १९व्या शतकाचा मध्य भारतातील सर्व धर्म ग्रंथांचे इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत अनुवाद झाले ज्यांनी जगाला थक्क करून सोडले. त्यातील विशेष असे भौतिक ज्ञान इंग्रज आणि जर्मन लोकांनी घेतले आणि त्याच्या जोरावर त्यांनी औद्योगिक क्रांती केली. यात मुख्यत्वे करून गणित आणि धातू विज्ञान ( metallurgy) चा समावेश करता येईल. ( अलीकडच्या काळात सर्व पाश्चात्य औषध आणि प्रसाधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपले नीम, तुलसी, कोरफड, मीठ, लवंग, बाभुळ, हळद या अत्यंत गुणकारी पदार्थांचा त्यांच्या प्रसाधनात उपयोग केलेला दिसतो) अर्थात औद्योगिक क्रांती साठी त्यांनी पणाला लावलेले त्यांचे कौशल्य आणि प्रयत्न यांना कमी लेखण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. सांगायचा उद्देश हा कि आपल्याला आपला इतिहास आणि रुढीचा विसर पडून आपला स्वाभिमान पुर्णपणे संपविलेला आहे. इतका कि प्राचीन, भारतीय म्हंटले कि आपल्याला त्याची लाज वाटू लागली आहे. जगातला पहिला अणुबॉम्ब स्फोट यशस्वी केल्यानंतर डॉ. रोबेर्त ओपेन्हाय्मरना भगवान श्रीकृष्णांची गीता आठवते. आइन्स्टॆन सारख्या थोर शास्त्रज्ञ आणि विचारवंताला विज्ञान क्रांती "mother India " च्या ज्ञान भागाशिवाय अशक्य असल्याचे प्रतिपादन करावेसे वाटते. ते का?
२. आरोग्य. - काहींशी मान्य पण अजूनही आरोग्य हे विज्ञानाच्या हाती आहे असा तुम्हाला वाटत का? दुर्धर आणि असाध्य रोग जगात नाहीत का? काही कारण नसताना काही जन भयंकर रोगांची शिकार का बनत आहेत? आज संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या अनेक रोगांवर विज्ञाना कडे रामबन इलाज नाहीये. हे रोग मुळात होतातच का हेच अजून विज्ञानाला माहिती नाहीये.साठीचे अनेक रोग हे परकीय लोकांबरोबर जगभरात पोचले हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे विशिष्ट प्रदेशातील लोकांच्या शरीरात तेथील स्थानिक रोगान्विरूढ प्रतिकार शक्ती असते पण अश्या प्रदेशात परकीय विषाणू आले तर त्यांच्या प्रतिबंधाचा अनुभव तिथल्या लोकांच्या इम्यून सिस्टीम ला नसल्याने असे विषाणू हल्ले अति भयंकर रूप घेतात. ( उदा. प्लेग हा रोग भारतात ब्रिटिशांनी आणला जग भारत जिथे जिथे ब्रिटीश, डच, फ्रेंच गेले तेथील रोग इतर प्रदेशात आणि युरोपातील रोग तिथे पसरले गेले). कालांतराने लशीचा शोध लागला तसेच लोकांच्या इम्यून सिस्टीम ला रोग प्रतिबंधक बळकटी आली आणि अशा महामार्या थांबल्या. पण अजूनही आरोग्य हे संपूर्ण पणे विज्ञान आणि मनुष्याच्या हातात आहे हा एक भ्रम आहे.
३. सुबत्ता. - सांगणे कठीण आहे पण शिर्डी, तिरुपती, आणि अनेक धर्मस्थळी आणि तीर्थक्षेत्री जे कार्य होत आहे , जो निधी येत आहे, होत आहेत ते पाहता सुबत्ता असलेल्या जनात दान देण्याची भावना जास्ती वाढीला लागली आहे असेच वाटते.
४. जागतिकीकरण - आज श्री श्री रविशंकर, ईश फौंडेशन, चिन्मय मिशन, रामकृष्ण मिशन, इस्कोन इ. तसेच , अगदी वैद्य तांब्याचे जागतिक अनुनायी पाहता जागतिकीकरण हे धर्म प्रसाराच्या पथ्यावरच पडले आहे असेच म्हणवे लागेल. या सगळ्या संस्था जागातील किमल १२० देशात काम करीत आहेत. कुंभ मेळ्यासारख्या इव्हेण्ट न जागतिक कुतूहल प्राप्त होत आहे. पाश्चात्य राष्ट्रातून अनेक ( गोरे) साधक धर्माकडे आकृष्ट होत आहेत. जगभरात पौर्वात्य संस्कृती, तत्वज्ञान आणि धर्म (हिंदू, बौध, जैन इ.) विषयी कमालीचे आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. याचा डोळस पणे अभ्यास करावा.
५. शिवाशिव आणि अस्पृश्यता हे नाहीसे व्हायलाच हवेत. याविषयी दुमत नाही. धर्मग्लानी अवस्थेत चुकीच्या प्रथा आणि रूढी समाजात मुळ धरू लागल्या होत्या त्यांचे संपूर्ण उच्चाटन व्हायलाच हवे.
६. एकंदरीत पाहता सुशिक्षित समाज एक नवीन दृष्टीकोण घेवून धर्माकडे पाहू लागला आहे हि माझ्यादृष्टीने जमेचीच बाजू आहे. कारण कर्मकांड आणि रूढी का व कशासाठी असा विचारणारा आणि समजून घेवून ते करणारा अथवा टाळणारा वर्ग समाजात तयार होत आहे. पंढरीची वारी कडेही हि आज काल उच्चशिक्षित प्रतिथयश व्यावसायिक आणि नोकरदार वर्ग आत्मियतेने पाहू लागला आहे. अवास्तव भोतिक सुखांच्या फोलपणाची कल्पना आज या वर्गाला येवू लागली आहे म्हणूनच मनःशांती आणि शाश्वत सुखाचा शोध हि मंडळी ( भारतीय आणि पाश्चिमात्य ) करू लागली आहेत. माझ्यादृष्टीने हा फार महत्वाचा ( क्वालिटी) भाग आहे. बाकी मी बळी, कर्मकांड, अंधश्रद्धा याच्या पूर्ण विरुद्धआहे. माझ्या व्यक्तिगत जीवनात त्याला काहीच स्थान नाही.
20 Sep 2015 - 10:29 pm | राजेश घासकडवी
बरेच मुद्दे पटले नाहीत. भारतीय ग्रंथांची भाषांतरं करून युरोपीयनांनी औद्योगिक क्रांती केली हे म्हणणं तर अगदीच न पटण्यासारखं आहे. पंधराव्या शतकापासून विज्ञानाची परंपरा युरोपातच आहे. न्यूटनचे नियम कुठल्या ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत? कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, असे मोठेमोठे भौतिकशास्त्रज्ञ युरोपात होऊन गेले. रॉबर्ट बॉईल, व्होल्टा वगैरेंसारख रसायनशास्त्रज्ञ अठराव्या शतकातले. लिबनिझ, ऑयलर, गॉस हे गणितज्ञ अठराव्या शतकातले. डिफरन्शियल इक्वेशन्स, भौतिकीचे नियम, रसायनशास्त्राचे नियम हे सगळं युरोपात शोधलं गेलं. औद्योगिक क्रांती तिथे झाली यात काय नवल?
सुबत्तेतून धर्मादाय देणग्या वाढल्या असतीलही. पण धर्मापलिकडे स्वतंत्र देणग्यांचं प्रमाण अजूनच वाढलेलं आहे. भूकंपग्रस्तांना देशोदेशींच्या सामान्य माणसांकडून मदतीचा पूर येतो. त्यासाठी धर्माचं माध्यम आवश्यक नाही.
असो. अजून बरंच लिहिता येईल. पण शेवटी खरं काय ते काळच ठरवेल.
21 Sep 2015 - 11:40 am | मांत्रिक
या अर्थाने धर्माचा पगडा प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे @ राजेश घासकडवी साहेब:
वरती एके ठिकाणी हा तुमचा प्रतिसाद आहे. पण मला सांगा की, धर्मातील चुकीच्या प्रथा-परंपरा, अपसमज नष्ट होत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण म्हणून खरा धर्म व ईश्वर यांचे महत्व कसे कमी होईल? उलट माझ्या मते मानवजात हळूहळू खर्या ईश्वराला ओळखण्याच्या मार्गावर आता आहे. मला सांगा कुणी कितीही श्रीमंत, विज्ञानवादी, उच्चभ्रू झाला तरी त्याचा लहान मुलगा / मुलगी खूप आजारी पडली किंवा समजा अपहरित झाली तर एकदातरी मनातून ईश्वराचा धावा करणार नाही? उलट हे अशा टाईपचेच लोक तुम्हाला हायफाय बाबा आणि माताजींच्या समोर दिसून येतील. एखाद्या खेडेगावातला माणूस मात्र पोर आजारी पडलं तर म्हसोबाला फारतर कोंबडं कापंल हा फरक!
मानव प्रगतीच्या कुठल्याही पातळीला असला तरी काही किरकोळ अपवाद सोडले तर मला नाही वाटत बहुतांश लोक ईश्वराचे महत्व नाकारू शकत! मानवी आयुष्य पहिल्यापासूनच दुःख, भय, विषमता, अन्याय यांनी घेरलेले आहे. त्यावर ईश्वरच भ.गीतेतून सांत्वन देतो की "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत॥ अभ्युत्थानं अधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम॥"
असा दिलासा ईश्वर देत असेल तर दुःखी कष्टी जीव त्याकडे का वळणार नाही? बायबल मध्ये पण येशू ख्रिस्ताचे वचन प्रसिद्ध आहे की: "अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन" किंवा "जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन केले जाईल."
मग सामान्य माणूस कशाची निवड करेल? सांत्वन करणारा आधार देणारा प्रेमाचा हात की निरीश्वरवाद्यांची निष्फळ, शुष्क, वटवट?
प्यारे मस्त लढतोयस रे! मी आज गावी है. मोबल्यावर टैपत असल्याने फारसे लिहिणे जमत नाही. त्याबद्दल क्षमस्व. पण आहे तुझ्यासोबत!
21 Sep 2015 - 11:45 am | प्यारे१
लढायची गरज नाही. समुपदेशनाची आहे. ;)
21 Sep 2015 - 12:00 pm | मांत्रिक
लढतोयसचा अर्थ आपल्या सातारी भाषेत घे रे! ;)
21 Sep 2015 - 6:48 pm | राजेश घासकडवी
याबद्दल सहमत आहे.
असे लोक आहेत. गाडगेबाबांची मुलगी अत्यवस्थ होती तेव्हा त्यांनी देवाला नवस बोलण्याऐवजी डॉक्टरला बोलावलं. माझे वडील अत्यवस्थ होते तरी मला ईश्वराचा धावा करावासा वाटला नाही. कारण असं काही नसतं याची मला खात्री आहे.
बहुतांश लोकांबद्दल म्हणतच नाहीये मी. हा छोटा गट आहे. तो वाढतो आहे. इतकंच म्हणणं आहे. मला वाटतं की तुमचा असा समज आहे की 'एके दिवशी धर्म नष्ट होणार, सर्वच लोक नास्तिक बनणार' असा टोकाचा निष्कर्ष मी काढतो आहे. इतकं टोकाचं विधान करणं शक्यच नाहीये. आत्ता फक्त एक लहान वर्ग आहे, आणि तो मोठा होतो आहे, भविष्यातही वाढेल इतपतच अंदाज वर्तवले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की या वर्गाची ही वाढ कुठेतरी पंचवीस-तीस टक्क्यांपर्यंतच थांबेल तर तसंही म्हणायला तुम्ही मोकळे आहात.
मात्र तुमचा युक्तिवाद हा तुमच्या व्यक्तिगत अनुभवातून आहे. माझ्या युक्तिवादाला ४९ लोकांच्या अनुभवाचं पाठबळ आहे. तुम्हीही हवा तो सर्व्हे काढा, त्यातून लोकांच्या विचारपद्धतीबद्दल निष्कर्ष काढा.
आणि आपले सगळ्यांचे डोळस-आंधळे अंदाजच असतात. शेवटी काळच ठरवेल. वरती गॅलप पोलचा प्रश्न आहे 'तुम्हाला तुमच्या आयुष्यात धर्म महत्त्वाचा वाटतो का?' असाच सर्व्हे ते पुन्हा कधीतरी घेतील. माझं म्हणणं आहे की हो म्हणणारांची आकडेवारी कमी झालेली दिसेल. ती जर तिथेच राहिली तर तुमचं बरोबर आणि माझं चूक. कमी झाली तर तुमचं चूक आणि माझं बरोबर. हे मान्य आहे का? की कुठच्याच आकडेवारीवर तुम्ही विश्वास न ठेवता तुम्हाला वाटतं तेच बरोबर म्हणाल?
21 Sep 2015 - 7:23 pm | मांत्रिक
गाडगेबाबा तसं करु शकले कारण सर्वांभूती परमेश्वर ते पाहू शकत होते. केवळ माझं कुटुंब ही संकुचित दृष्टी त्यांच्याकडे नव्हती. माझं सर्व काही गेलं, नष्ट झालं तरी चालेल कारण मीच तो सच्चिदानंद परब्रह्म आहे, मीच सर्वत्र आहे, विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूत मीच आहे अशीच या सत्पुरुषांची धारणा असते.
अशी धारणा अर्थातच सामान्य माणसाकडे नसते, आणि म्हणून त्याचा रक्षणकर्ता, पालनहार, त्राता या दृष्टीनेच तो ईश्वराकडे पाहणाराय. त्यात चूक काय? आणि बाद्वे, तुमचं मत सिद्ध करायला तुम्हाला शेवटी उदाहरणादाखल का होईना एका सत्पुरुषाचाच आश्रय घ्यावा लागला ना? मग सामान्य माणसालाही अडीअडचणीच्या प्रसंगी ईश्वराचा आश्रय घेऊ वाटला तर त्यात चूक काय? तुमच्याच विचारसरणीपासून तुम्ही थोडेसे का होईना ढळलात असं वाटत नाही तुम्हाला?
22 Sep 2015 - 10:13 am | राजेश घासकडवी
अनेक वेळा कपाळावर हात मारून घेणाऱ्या स्मायलीची गरज वाटते. त्यातली एक वेळ ही.
अहो, गाडगेमहाराजांचं चरित्र वाचा म्हणजे त्यांचा रॅशनलिस्ट व्ह्यूपॉइंट कळेल. देवाचं भजन करायला लावून भजनातून अंधश्रद्धा निर्मूलन करणारा तो महापुरुष. मुलगी अत्यवस्थ असताना डॉक्टरकडे धाव घेणं महत्त्वाचं, कारण देव काही करणार नाही याची त्यांना खात्री होती.
सामान्य माणसाने अडीअडचणीला ईश्वराचा आश्रय घ्यावासा वाटायला माझी काही हरकत नाही. हरकत होती ती 'कोणालाच नास्तिक्य जमणार नाही' या तुमच्या विधानाला. मला जमतं बुवा नास्तिक्य.
21 Sep 2015 - 2:46 pm | पद्मावति
मूळ लेखातले बहुतेक मुद्दे आणि विश्लेषण पटण्यासारखेच आहेत. ईंग्लंड, अमेरिकेत धार्मिकता कमी झाली आहे हा मुद्दा अंशत: पटतो. तरुण पिढी चर्चेस मधे जायला फारशी खरोखरंच राजी नसते. तसंच स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी या देशातील फार कमी टक्के लोकांनी धर्म महत्वाचा आहे असे उत्तर दिलंय. अमेरिकेत तर एस्पेशली दोन्ही कोस्टस वर बरेच लोक धर्माच्या बाबतीत उदासीन आहेत असे दिसते.
पण असाही प्रश्न आहे की या सर्व पुढारलेल्या देशांमधे धर्माचं महत्व खरंच जर कमी होत असेल तर काही गोष्टी--उदाहरणार्थ-- क्रिसमस ची जवळजवळ महिनाभर चाललेली रोषणाई, त्यावर होणारा प्रचंड खर्च ( आर्थिक आणि पर्यावरणाचं नुकसान), युरोपात तर गल्लिबोळात असलेले कॅथेड्रल्स, चर्चेस त्यांच्यावर खर्च होत असलेला अफाट निधी, आज जगभरात अगदी जंगल खोर्यात पोहोचलेले धर्मप्रसार करणारे मिशनरीस- त्यांच्या मिशन ला लागणारा पैसा हे नेमकं कशाचं इंडिकेशन आहे ते समजत नाही. त्यामुळे आमच्यासाठी धर्म महत्वाचा नाही असे म्हणणारे लोकं किती आणि त्यांच्यातले खरंच आचरणात आणणारे किती असा रेशो अभ्यासाचा विषय होऊ शकतो.
21 Sep 2015 - 3:00 pm | मांत्रिक
धन्यवाद ताई! अगदी महत्वाच्या विसंगतीवर बोट ठेवलंयत!
हे सर्व्हे वगैरे वरवरचं चित्र निर्माण करतं! आम्ही त्यातले नाही म्हणायचं आणि वर पुन्हा धर्मासाठी निधी जमवत रहायचं हा खरा छुपा हेतु. आणि आमच्यातलेच तथाकथित पुरोगामी लगेच येणार स्वतःच्या ** बडवत की पहा हिंदुंनो! जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठं चाललाय! फेकून द्या देव! फेकून द्या धर्म! लोकांनी आपल्यालाच फेकून दिलंय हे त्यांच्या लक्षात येईल तो सुदिन!!!
21 Sep 2015 - 3:10 pm | नाखु
त्या "धर्मप्रसारकांचा" असा हेतू नसतोच मुळी !!! जगतील सगळ्या धर्मपिपासू,रक्तरंजीत्,दिखाऊ+बेगडी,रूढी परंपरा फक्त आणि फक्त हिंदू धर्मात (आणि मिपावर) आहेत त्यामुळे सरसकटी करणास फार सोंग आणावं लागत नाही.
फक्त घराच्या चार भिंतींच्या आतच धार्मीक नाखु
21 Sep 2015 - 6:55 pm | राजेश घासकडवी
ख्रिसमस म्हणा दिवाळी म्हणा - याची मूळ धार्मिक, पौराणिक कथांमध्ये असली तरी तो सामाजिक संस्कृतीचा एक मोठा भाग झालेला असतो. आणि हा सांस्कृतिक वारसा चालूच राहील. आणि तो राहावा असंच मलाही वाटतं. मी नास्तिक असलो तरी गणपतीच्या आरत्यांबाबत, दिवाळीच्या रोषणाईबाबत माझ्या लहानपणच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मी सांस्कृतिक हिंदू आहे.
धर्मप्रसार वगैरेबाबत म्हणाल तर त्याची धार भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यानंतर बोथट झालेली आहे. गेल्या कित्येक दशकांत भारतातल्या ख्रिश्चनांची टक्केवारी बदललेली नाही. त्यामुळे हो, अजून धर्मप्रचार करण्याइतकी ख्रिश्चन धर्मव्यवस्था श्रीमंत आहे. पण याचा अर्थ अमेरिकेत जी २३ टक्के मंडळी स्वतःला निधर्मी म्हणवतात ती नगण्य आहेत असं नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र कोएक्झिस्ट होऊ शकतात.
21 Sep 2015 - 3:42 pm | नाखु
दळण वेगळ्या डब्यात पुर्वीच दळल गेलं आहे अगदी बारीक पीठ पडेपर्यंत.
दळण देवाचे
वाचक नाखु
21 Sep 2015 - 5:56 pm | दत्ता जोशी
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण आपल्याला ( आपल्या सर्वांना) तेच शिकवलेले आहे. आपल्याला अनेक गोष्टींची माहितीच नाही तेव्हा आपल्याला त्याबद्दल अभिमान असण्याचे करणाच नाही. इंग्रजांना आपल्यावर राज्य करायचे असल्याने त्यांनी त्याला ठळकपणे मांडायचे काहीच कारण नव्हते. उलटपक्षी आमच्या परंपरा, संस्कृती कशी मातीमोल आणि टाकावू आहे हेच त्यांनी आमच्या मनावर बिंबविले. आपण जे शिकतो ते इंग्रजांनीच लिहिले आहे. तेच परंपरेने आपणास शिकवले जाते. तेव्हा त्यांना जे हवे ते आणि तसेच आणि त्यांना जे माहिती होते किवा त्यांनी जसे समोर ठेवले तसेच आपल्याला शिकविले जाते हे लक्षात घ्या. उदा. गणितातील भारतीयांचे संशोधन या विषयी त्याकाळी त्यांना माहिती नव्हती. व्यापाराच्या निमित्ताने अरब हा पूर्व आणि पश्चिम जगातला दुवा होता. अरबांनी भारतीयांकडून गणित, खगोल आणि काही अंशी विज्ञान शिकून घेतले ते युरोपात पोचले. त्यामुळे हे सर्व शोध अरबांनी लावले अशीच पाश्चात्यांची धारणा होती. नन्तर जेव्हा त्याचा मुळ स्रोत भारत हा आहे हे समजल्यावर त्यांनी या ला " इंडो अरब नंबर सिस्टम" असे नाव दिले. अनेक प्रमेये आणि सिद्धांत यांचे श्रेय लयास गेलेल्या ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीला दिले गेले. अर्थात प्राचीन ग्रीक, इजिप्त, मेसोपोटमिय, मायन, इंक, चीनी विद्वान आणि संशोधकांनी यात मोलाचा दिला आहेच पण तत्कालीन विद्या ( पेटंट ची पद्धत नसल्याने) खुले आम एकमेकांना दिल्या जायच्या आणि अंगीकारल्या जायच्या असेच दिसते. आज त्या अर्वाचीन संस्कृतीतील फक्त चीनी आणि भारतीय संस्कृतीच जिवंत आहे. आपल्याला तो काळाआड गेलेला इतिहास कधीच समजणे शक्य नाही.
हा विषय खूप खोल आणि संशोधनाचा आहे. अनेक गोष्टींचे संशोधन झाले आहे पण आपल्यालाच अजून अनेक गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे.
औद्योगीकारानासाठी लागणारी यंत्रसामुग्रीसाठी सर्वात महत्वाचे काय असते?धातू शास्त्र : metallurgy ! पोलाद बनवण्याची कला, जस्त गळण्याचे तंत्र आणि अनेक गोष्टी भारतात विकसित झाल्या आणि त्या आपल्याकडून पाश्चात्यांनी मिळवल्या. भारतात / भारताने कधीच पेटंट पद्धती अवलंबली नव्हती.
मोहेंजोदारो आणि हडप्पा या इ स पूर्व २५०० वर्ष्पुर्विच्या उत्खननात उत्तम प्रतीचे तांबे ( copper ), ब्राँझ, चांदी, सोने, जस्त धातूंच्या वस्तू सापडल्या आहेत. उत्तम मिश्र धातू बनवणे आणि त्यातून योग्य ते भौतिक गुणधर्म मिळवणे सोपे नसते. त्यासाठी अत्यंत काटेकोर तापमान, दाब, धातू थंड करणे याशिवाय खास पद्धतीने इम्प्युरिटिज मिसळाव्या लागतात लागतात. हा संशोधनाचा विषय आहे.
प्रगत धातू निर्मितीची खालील उदाहरणे अत्यंत बोलकी आहेत.
१. ४थ्या शतकातील न गंजणारा , ६ टनी फोर्जड लोखंडी ( wrougght iron ) खांब. याच्या निर्मितीचे गूढ अजूनही जगभरात उलगडत नाहीये.
२. ३र्या / ४थ्या शतकात भारतात बनत असलेले वूद्त्झ पोलाद (wootz स्टील). हे जगभरात निर्यात होत असे. सिरियात यापासून तलवारी बनवल्या जात, ज्या जगभर प्रसिद्ध होत्या. या तलवारींच्या जोरावरच १२ व्या शतकात अरबांनी युरोपियानांचा पराभव केला होता.
हे तंत्रज्ञान कालोघात नाहीसे झालेले आहे. कारणे काहीही असोत. हे आपल्याला माहिती आहे , जे माहिती नाही ते किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
वैदक शास्त्रात अत्यंत संशोधन पूर्ण आयुर्वेदाची व्याप्ती फार मोठी आहे. (आधुनिक अलोपथिची औषधे मी हि घेतो. मला त्याबद्दल तिटकारा मुळीच नाही). सुश्रुताने केलेल्या सर्जारींची नोंद जगाने घेतलेली आहे.
लिहीण्यासारख खूप खूपच आहे. तुम्ही स्वतः थोडा संशोधन करा तुम्हाला हि सापडेल.
भारतीय गणितज्ञ आणि त्यांचे बहुमुल्य कार्य खालील लिंक वर पहा. धावता आढावा मिळेल.
https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics
दुर्दैवाने आपल्याला काहीच माहिती नसते कारण आपल्याला हेतुपुरस्सर त्यापासून दूर ठेवले गेले आहे.
खगोलशास्त्रात तर प्राचीन भारतीयांनी जे कार्य करून ठेवले आहे ते अद्वितीय आहे. पृथ्वी गोल आहे ती सूर्याभोवती फिरते, सौर्य मंडळातील महत्वाचे ग्रह त्यांची परिभ्रमणे, इतकाच काय सुर्य पृथ्वी आणि चंद्राचे आकारमान, त्यांचे एकमेकापासुंचे अंतर, अनंत अवकाश आणि त्यात असणारे अनंत कोटी तारे याची कल्पना त्यांना होती. याची तपशीलवार माहिती अनेक ग्रंथांतून , याद्न्यवल्क्य, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट यांनी इसपू ८व्य शतकापासून १०व्य शतकापर्यंतच्या अनेक ग्रंथांमधून लिहून ठेवला आहे.
जगप्रसिद्ध मोहेंजोदारो आणि हडप्पा उत्खानांत मिळालेल्या काही measurement पट्ट्यावरील खुणा ( marking) अचूक 1.32 इंच असून त्यावरील खुणा मेट्रिक ( दशमान) पद्धतीने केल्या गेल्या आहेत. तसेच तिथे सापडलेली वजने अत्यंत बिनचूक असून १,४,८,१६,३२,६४ ..तसेच १/१०, १/२०, १/५, इ. प्रमाणात आहेत. इतकाच नव्हे तर हि वजने कोन, लंबगोल, बहुभुजाकृती रेग्युलर शेप मध्ये आहेत. यावरून तत्कालीन भारतीयांना सॉलिड जिओमेट्री, वस्तुमान, घनता इ. गोष्टी अत्यंत अचूकपणे माहिती होत्या हे सिद्ध होते.
अश्या अनेक आणि खूप गोष्टी आहेत. अजून टंकणे शक्य नाही.
समर्थांनी सांगितल्याप्रमाणे- सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख .. हे मला माहिती आहे तसेच आधुनिक विज्ञान आणि पाश्चात्यांचे कोण्ट्रिब्युशन मला अजिबात नाकारायचे नाहीये. पण याचा अर्थ आपला खरा उत्तुंग भूतकाळ माहिती करून न घेणे , त्याविषयी अभिमान न बाळगणे किंबहुना न्यूनगंड बाळगणे याला काहीच अर्थ नाही नाही का? हे सर्व कालाधीन आहे. अनेक प्रगत संस्कृती काळाच्या पडद्या आड गेल्या नवीन संस्कृती उदयाला आल्या त्या काहीकाळ प्रभावी राहिल्या हेच मानवी इतिहास सांगतो. ( युग प्रवर्तन..!) कलियुगात या अनेक विद्यांचा लोप पावला आहे आणि हे हेतुपुरस्सर आहे असे काही विद्वान मानतात. शेवटी कालाय तस्मै नमः ( कलियुगाची सुरवात कोठून कशी झाली आणि कलियुगात काय काय होणार आहे याचे वर्णन पुराणांत लिहून ठेवलेच आहे आणि गाडे त्याच मार्गाने चालले आहे या विषयी मला तरी शंका राहिलेली नाही.)
काही दिवसांपूर्वी नारायण मूर्तींनी केलेल्या विधानाची आठवण झाली - भारतीयांनी गेल्या कित्येक दशकात कोणतेही भरीव संशोधन केले नाही किंबहुना फक्त होयबा कामगार बनविले. विधान अत्यंत सार्थ आहे....!! यावर पूर्वग्रह दुषित दृष्टी सोडून विचार व्हावा.
राहून गेलेला मुद्दा- जगाची निर्मिती- big bang theory आणि डार्विन चा उत्क्रांतिवाद अजूनही थेओरिच आहेत याला कोणताही ठोस आणि सबळ पुरावा अजूनही मिळाला नाही. इंटरनेट वर थोडे शोधल्यास त्या विरोधी आणि बाजूने दोन्ही मतप्रवाह सापडतील.
21 Sep 2015 - 6:32 pm | राजेश घासकडवी
इथे मला कपाळाला हात लावणारी स्मायली हवी होती. जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर इतर कुठच्याही भन्नाट गोष्टींवर ठेवू शकता. त्यामुळे मी तुमचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यासाठी लागणारे कष्ट आणि वेळ माझ्याकडे नाहीत.
21 Sep 2015 - 6:43 pm | दत्ता जोशी
असल्यास मलाही लिंक द्या. कारण तसे सिद्ध करणारी कुठलीच लिंक मला मिळालेली नाही आणि माझ्या वाचनातही आलेले नाही. अशी कोणतीही अधिकृत लिंक नसल्यास काहीही कारण सांगून विषय सोडून देवू शकता. माझी हरकत नाही.
21 Sep 2015 - 7:54 pm | राजेश घासकडवी
अनेक दुवे आहेत. मात्र मी इथे दुवायुद्ध खेळू इच्छित नाही. म्हणजे मी तुम्हाला दुवे देणार, मग तुम्ही विरुद्ध म्हणणारे दुवे देणार, मग मी त्यातले आक्षेप खोडून काढण्याची तुम्ही अपेक्षा ठेवणार.... हे मला नको आहे. कारण पूर्वी ते केलेलं आहे, आणि त्यात फार वेळ खर्च होतो. आणि आत्ता तेवढा वेळ मला नाही.
http://evolutionfaq.com/articles/five-proofs-evolution या दुव्यावर तुम्हाला सुरूवात करता येईल. पाच मूलभूत कारणं सांगितलेली आहेत. तसंच इतर प्रश्नांनाही उत्तरं देणारे दुवे तिथे आहेत.
किंबहुना मी सध्या एक लेखमाला मीमराठी लाइव्ह या वृत्तपत्रात लिहितो आहे. ती दर सोमवारी प्रकाशित होते. तेव्हा तुम्ही या साइटवर जाऊन २७ जुलैच्या पेपरात गेलात तर नवव्या पानावर पहिला लेख दिसेल. त्यानंतरचे लेख दर सोमवारी नवव्या पानावर दिसतील. दुर्दैवाने मला जुन्या लेखांचे मीमराठीलाइव्हचे दुवे देता येत नाहीयेत. पण जर मीमराठीलाइव्हवर शोधणं अडचणीचं वाटत असेल, तर तेच लेख मी काही काळाने ऐसी अक्षरेवर प्रसिद्ध करतो. त्यांचे दुवे खालीलप्रमाणे.
भाग १ काळाचा आवाका
भाग २ नासदीय सूक्त
भाग ३ अस्तिस्तोत्र
भाग ४ उत्क्रांतीचे उत्तर
भाग ५ कोंबडी आधी की अंडं आधी
भाग ६ जंबोजेट दृष्टान्त
21 Sep 2015 - 7:09 pm | दत्ता जोशी
https://www.youtube.com/watch?v=DKfGC3P9KoQ
मायकेल क्रेमो यांचे गुगल येथे झालेले २०१४ मधले भाषण. सुरवातीच्या एक मिनिटाच्या प्रस्तावनेतच हे मांडले गेले आहे कि अनेकांना उत्क्रांती हि एक फक्त संकल्पनाच आहे हे माहिती नाही. ते उत्क्रांती सिद्धांत हे गुरुत्वाकर्षण सिद्धांता इतकेच ( proven) सत्य मानतात. असो. मुद्दा हा आहे कि उत्रांती आणि बिग बँग या फक्त संकल्पना असून त्याची पडताळणी कोणत्याही प्रकारे करता आलेली नाही.
21 Sep 2015 - 7:57 pm | राजेश घासकडवी
मी वर म्हटल्याप्रमाणे, मी आत्ता याचा काहीच प्रतिवाद करणार नाही. उत्क्रांती खरी आहे की नाही, हे मूळ विषयासाठी अवांतर आहे. तुम्ही दुवे मागितलेत, मी दिलेत. ते वाचूनही तुम्हाला पटलं नाही, तर ऱ्हायलं.
21 Sep 2015 - 8:36 pm | दत्ता जोशी
वेळ मलाही नाही. संपूर्ण जगात अनेक वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ या विषयावर भांडत आहेत. शेकडो मिलियन डोल्लर अशा प्रकल्पांवर खर्च होत आहेत. तेव्हा आपण पामर वाट पाहू कधी एकदा ठोस वैज्ञानिक पुरावा मिळतोय ते या बिग बँग आणि उत्क्रांती बद्दल. या जन्मी तरी तो मिळेल अशी शक्यता दिसत नाही. मी दिलेले दुवे पण वेळ मिळेल तसे पहा.
अवकाश आणि काळ अस्तित्वात येण्यापूर्वी नक्की काय होते, नेमका कशाचा आणि कशाचा बँग झाला, अशा बँग मधून इतकं नियमित आणि सुसंबद्ध विश्व कसा निर्माण झालं? एकाद्या स्फोटातून किंवा धडकेतून असे नियमित आणि सुसंबद्ध विश्व तयार होण्याचे चान्सेस किती? हे प्रश्न फसवे नाहीत तार्किकच आहेत त्यना टाळून पुढे जाने अशक्यच नव्हे अशास्त्रीय आहे. असो.
21 Sep 2015 - 8:40 pm | राजेश घासकडवी
अहो काळच अस्तित्वात नाही तेव्हा आधी नंतर कसं असणार? मी वेळ काढून वरच्या लेखांत तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ती कृपया वाचावी ही विनंती.
21 Sep 2015 - 9:15 pm | मांत्रिक
ऑ? काळ अस्तित्वात नाही? हे कसं? जरा स्वतंत्र धागा काढून इस्कटून सांगाल? वाचायला आवडेल! मीनव्हाईल हा दिव्य शोध लावणार्या शास्त्रज्ञाचेही नाव सांगा म्हणजे आंजावर सर्च मारता येईल!
21 Sep 2015 - 10:44 pm | राजेश घासकडवी
चारपाच प्रतिसाद वर मी माझ्या लेखाचे दुवे दिलेले आहेत, त्यातला 'नासदीय सूक्त' लेख वाचावा ही विनंती. तसंच बिग बॅंग किंवा महास्फोट म्हणजे नक्की काय हे समजावून घेण्यासाठी हा दुवा उपयुक्त ठरेल.
22 Sep 2015 - 5:39 am | अभिदेश
आपण म्हणता की सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण लोक कमी धार्मिक होतायत. असे असेल तर , इकडे अमेरिकेत वाढ्ती देवळे काय सान्गतायत आणि त्यात जाणार्या तरुण लोकान्बाद्दल काय म्हणणे आहे ? ती तर सगळिच तुम्हि म्हणता त्या वर्गात मोडतात.
22 Sep 2015 - 8:58 am | राजेश घासकडवी
अमेरिकेत किती देवळं वाढली? त्यादरम्यान अमेरिकेत भारतीयांची संख्या किती वाढली? ते सांगितलंत तर त्याविषयी काही बोलता येईल.
परदेशात राहाणाऱ्या विशिष्ट गटाची लोकसंख्या ही नेहमीच बदलती असते, त्यामुळे तिचा अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढणं कठीण असतं. त्यामुळे त्याच देशातल्या लोकांची वर्तणुक तपासून बघणं जास्त योग्य ठरतं. अमेरिकेत खुद्द चर्चेस ओस पडत आहेत. अनेक चर्चच्या बिल्डिंगी विकल्या जात आहेत. चर्चमध्ये जाणारांची संख्या कमी होते आहे आणि सरासरी वय वाढतं आहे. हे गेले कित्येक वर्षं चालू आहे. भारतात या प्रक्रियेला आत्ता सुरूवात झालेली आहे. त्याचे परिणाम दिसायला अजून दोनतीन दशकं जावी लागतील असं मला वाटतं.
22 Sep 2015 - 6:52 am | मिसळपाव
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------
राघा, आधी न पटलेल्या गोष्टिंबद्दल लिहितो.
ज्या ४९ लोकानी सर्व्हे पुरा केला ते २०% शिक्षीत गटातले असले तर त्याचा अर्थ "हा सर्व्हे या २०% लोकांचा प्रातिनिधिक आहे" असा होत नसून "जरी १०००, ५००० कींवा १०,००० मिपा व ऐसीच्या मेंबरानी ह्या सर्व्हेत भाग घेतला असता तरी त्याने फक्त २०% शिक्षीत लोकांच्याच मतांचा अंदाज आला असता" असा होतो.
ईथे परत चुकीचं निदान केलं गेलंय. हा असा निश्कर्ष काढणं म्हणजे - "५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल ठरवण्यासाठी आत्तापर्यंत ५४ मतदारसंघातनं २०० लोकांचं सर्वेक्षण घेतलंय. त्यात अबक पार्टीला बहुमत मिळाल्याचं दिसलं. उरलेल्या मतदारसंघात कौल घेतल्यानंतर तिथेही अबक पार्टीलाच बहुमत मिळेल याची शक्यता जास्त आहे" असं म्हणण्यासारखं आहे.
सर्व्हे ईतक्या तुटपुंज्या गटावर आधारित आहे हे मान्य करूनही पुढचं विश्लेषण करणं हे बरोबर वाटंत नाही. "मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच वापरलंय. पण तरिही मी त्याबद्दल रिव्ह्यू लिहितो. तो अर्थातच अचूक असायची शक्यता फारच कमी आहे पण अर्धा तासतर वापरलाय त्यामुळे लिहितो तरीही" असं केल्यासारखं वाटतंय.
आता मी पुढे जे लिहिणारे, पटलेल्या गोष्टिंबद्दल, त्यामुळे मी नक्की काय पिउन लिहायला बसलोय अशी शंका तुम्हाला येणं साहजिकच आहे - ईतकं सगळं असलं तरी "यामागची कारणं काय असावीत?" या पुढचा सगळा लेख बरोब्बर वाटतो नी पटतो!! कारण मला वाटतं 'यामागची' याचा अर्थ "गेल्या दोन पिढ्यांमधे - विज्ञानाने अनेक घटनांची/परिणामांची/अनुभवांची कारणमिमांसा विशद केल्यामुळे - दैववाद, देव/वाईट शक्तिंमुळे अमुक-तमुक गोष्ट होते अशा कार्यकारणभावावरचा विश्वास, धार्मिक कर्मकांडांचा आधार घेणं अशा गोष्टींमधे झालेली (लक्षणीय) घट".
सर्व्हे घेउन 'साधार' स्पष्टिकरण देण्याचा तुमचा उद्देश असावा असं वाटतं. पण मला वाटतं हि अशी घट झालेली आहे असं सर्व्हे न घेताही म्हणायला प्रत्यवाय नसावा कारण आपण त्याची उदाहरणं आपल्या आसपास बघतो आहोत. गणेशोत्सव वाढले आणि दहिहंड्या जास्त लागतात याचा निश्कर्ष धार्मिकता वाढली असा काढणं चुकीचं ठरेल. गणेशोत्सव वाढले पण सह्स्त्रावर्तनं करणं, २१ गणपती बघून येणं, गणपतीच्या कार्यक्रमात कीर्तन असणं हे झपाट्याने लयाला जातंय / गेलंय, दहिहंड्या जास्त लागतात पण त्यात लाखा-लाखांच्या रोख उत्पन्नाची सोय असते आणि दहिहंडी पथकातल्या कीती जणाना कृष्णजन्माशी देणं-घेणं असतं देव जाणे! उलट एकादष्ण्या, भूत उतरवणं, एका दिवसात गुरूचरित्र वाचणे हे ईतकं ऐकू येत नाही. मी तर म्हणेन दोन नाही, तीन पिढ्यांपासून अशी घट होतेय. कीती वेळा तुम्ही बोडण भरलेलं ऐकलंय, कीती वेळा घागरी फुंकणं नी त्या बाईच्या अंगात येणं हे पाहिलंय, गावात साप/विंचू चावल्यावर देवॠषाकडे / तालुक्याच्या हॉस्पिटलात जाणार्या लोकांचं गुणोत्तर पन्नास वर्षांपूर्वी किती होतं आणि आता किती आहे त्याचा विचार करून बघा. असो.
राघा, पंचवीस वर्षानी हा लेख वाचला जाईल तेव्हा जग कसं असेल याची उत्कंठा आहे. :-)
22 Sep 2015 - 8:51 am | राजेश घासकडवी
पण जिथे "मी फोटश़ॉपच्या सॉफ्टवेअरचा बॉक्स उचलून त्यात डिस्क असल्याचं हलवून बघितलंय" "मी त्या बॉक्सला हात लावून बघितलाय" "मी तर पंधरा बॉक्सेसचे रंग बघितले आहेत" असं म्हणून ठाम मतं मांडली जातात, त्यात अर्धा तास वापरणाराचं मत अधिक महत्त्वाचं नाही का? आणि ज्यांनी वर्षभर वापरलंय अशांचे रिव्ह्यू तुम्हाला मिळतात का? संपूर्ण भारतीय समाजाच्या क्रॉससेक्शनचा, डेमोग्राफिकवाइज पद्धतशीर सर्व्हे वाचायला मिळाला तर मी माझा कचऱ्याच्या टोपलीत टाकायला तयार आहे.
याच्यापुढे तुम्ही लिहिलेलं बरोबरच आहे. मात्र तुम्ही जितक्या ठामपणे हे सांगत आहात तितक्याच ठामपणे इतर काहींनी 'असली काही घट-बिट झालेली नाही, आणि होणारही नाही' (कारण मी फोटोशॉपचा बॉक्स व्यवस्थित न्याहाळलाय!) असं म्हटलं आहे. म्हणूनच व्यक्तिगत निष्कर्षापेक्षा लहान का होईना समूहाचा सहभाग महत्त्वाचा होतो.
22 Sep 2015 - 6:32 pm | मिसळपाव
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------
तुमचे वरचे दोन्ही मुद्दे पटले. सर्व्हेतली आकडेवारी देण्यामागे 'साधार स्पष्टिकरण' देण्याचा तुमचा हेतू असावा हा माझा कयास बरोबर आहे तर. पण त्यामुळे मूळ लेखनाला (जे सुसंगत आहे, पटतंय) त्याला बाधा येत्येय असं वाटलं म्हणून प्रतिक्रियेचा खटाटोप केला !
आणि मोठ्ठ्या प्रमाणाचा सर्व्हे जरी असला, मोठ्ठ्या समूहाचा प्रातिनिधिक जरी असला तरी जोपर्यंत Theory of Evolution एव्हढं वाचल्यावर "घ्या. अहो निव्वळ थिअरी आहे ही नुसती. पुरावा कुठाय याचा? कसलं विज्ञान बिज्ञान घेउन बसलात? " इथपासून सुरू करणाते भिडू आहेत तोपर्यंत ५०० प्रतिसादाना मरण नाही !!!
22 Sep 2015 - 9:48 am | दत्ता जोशी
जगाच्या व्युत्पत्तीचा शोध घ्यायचा प्रयत्न वेदांनी केला आहे. आता तुमचे अंदाज सिद्ध करण्यासाठी जर वेद हे प्रमाण ठरत असतील तर मग मला काही म्हणायचे नाही, कारण त्याच रुग्वेदामधील सुक्त घेऊन आपण बिग बँग च्या सिद्धांताला चिकटवण्यचा प्रयत्न केला आहे.
नक्की काय झालं ते कोणालाच माहिती नाही. (जगात काही लोक ते याची देही याची डोळा देखिल्या प्रमाणे सर्वज्ञाचा आविर्भाव आणतात त्यांची क्षमा मागून). कारण वेदांनुसार या सर्वांच्या पलीकडे जावून सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेशवराला (supreme power - देव देवता नव्हे, देव आणि देवता या सृष्टीच्या निमितीनंतर अस्तित्वात आल्या.) समजून घेणे अशक्य आहे. (जो वेदांनाही कळला नाही). असो.
जेव्हा आकाश पृथ्वी (पंच महाभूते नव्हती), आपल्याला अभिप्रेत असा काळ ( time ) अस्तित्वात नव्हता तेव्हाही या उत्पात्तीनान्तारच्या काळाला ( time after creation ) व्यापणारा असा एक महांकाळ ( great time ) होताच कि.म्हणजेच सर्व सृष्टी " भूतकाळात" जावून आकुंचन पावत पावत एका बिंदू मध्ये सामावेल तो बिंदू या महाकाळ आणि हे सर्व जिथे घडले तिथे एक अवकाश (space ) असणारच कि. जे अवकाश या स्फोटानंतर सृष्टीच्या प्रसारणाला वाव देईल. म्हणजे time आणि space नव्हतेच हा तर्क अगदीच एकाकी पडतो. फक्त time before creation आणि time after creation असे दोन भाग या बिन्दुमुळे होतात. आपण सर्व दुसर्या काळाविषयी ( time ) बोलतो कारण आपल्याला तो समजतो किंवा लागू होतो पण हा काळ आपल्यात समाविष्ट करून घेणारा एक सुपर टाईम आहेच कि. जो सृष्टी आधी होता आणि सृष्टी नंतर हि राहील. बरं अश्या स्फोटामुळे किंवा धडके मुळे प्रसारण पावणारे विश्व इतके नियमित कसे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या या सृष्टीआधी पंचमहाभूते कोणत्या स्वरुपात होती आणि ती नक्की कशी अस्तित्वात आली याचे काहीच स्पष्टीकरण मिळत नाही. ( हे मी अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर लिहितो आहे. तेव्हा विरोधासाठी विरोध करतो आहे असा गैरसमज करून घेवू नये. आपल्याला याचे स्पष्टीकरण देणारा शास्त्रीय आधार मिळाला असल्यास कृपया दुवा देणे. पण असे कोणतेही स्पष्टीकरण आज तरी उपलब्ध नाही.)
एकूणच पाहता जगाच्या निर्मितीची नास्तिक/ परमेश्वर न मानणाऱ्या वैज्ञानिकांची बिग बँग थियरी आणि श्रद्धाळु लोकांची सृष्टीकर्ता परमेश्वर निर्मिती ची थियरी या दोन्ही तितक्याच हायपोथेटिकलच आहेत. म्हणूनच बिग बँग, बिग बँग करून परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि श्रद्धाळू लोकांची टर उडवणाऱ्या विभूतींना मी कायमच कोपरापासून नमस्कार करत आलो आहे. .
22 Sep 2015 - 11:12 am | नया है वह
(मराठी मधे नाही लिहिले त्यासाठी क्षमस्व!)
या बद्दल आपले विचार काय आहेत?
22 Sep 2015 - 8:34 pm | द-बाहुबली
बरं या सर्वेक्षणसहभागाबद्दल पार्टी वगैरे मिळणार आहे का ?
का सदस्यांना आपलं आपलं मत जाणून घेण्यासाठीच फक्त याचा उपयोग समजायचा ?
23 Sep 2015 - 12:51 am | उपाशी बोका
ऐसीअक्षरेवर माझ्या उत्तराला खवचट श्रेणी मिळाली आहे, म्हणून तिथे दिलेले उत्तर इथेपण डकवत आहे.
स्टॅटिस्टिक्समध्ये महत्वाचे आहे म्हणजे विदा आणि त्याचे विश्लेषण. The point of statistical analysis is to determine to what degree, if at all, the hypothesis may be said to hold true for a generic class of subjects, when all other possible influencing factors are accounted for or eliminated. This is usually done by taking a large enough number from a sufficiently diverse pool of subjects within the said class.
Statistics published in peer reviewed journals are likely to be better, and are at least open about the methods, but even then there are often arguments about the validity of the analysis used and possible biases in the population.
सर्वात महत्वाचे म्हणजे काढलेला निष्कर्श अचूक आहे, ही बाब पुन्हा-पुन्हा सिद्ध करता आली पाहिजे. (It should be reproducible.) याकरता लॉ ऑफ लार्ज नंबर्स वापरतात.
स्टॅटिस्टिकचा वापर करून आपल्याला पाहिजे तसा निष्कर्श काढता येतो. बर्याचदा आपले मत पुढे करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स वापरले जाते. ते कसे हे पाहू.
१. स्वतःला सोयीस्कर डेटासेट वापरायचा.
समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू कमी वापरतात. मग तुम्ही सर्वे घेताना उदगीरच्या, फक्त २ कॉलेजात, मुलींना प्रश्न विचारायचे पण निष्कर्श काढताना "महाराष्ट्रात तंबाखू वापर कमी झाला" असे म्हणायचे. समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू जास्त वापरतात मग तुम्ही आयटीसी कंपनीचा वाढता रेवेन्यू सर्वेसाठी वापरायचा.
२. सोयीस्कर प्रश्न विचारायचे.
बाबरी मशीद पडली किंवा गुजरातमध्ये दंगे झाले, तेव्हा सरकारला दोष द्यायचा असेल तर पुढील प्रश्न विचारायचे.
तुमच्या मते सरकारला अपयश आले का?
a) No, they did everything possible.
b) Yes, security could have been a bit tighter.
c) Yes, the government is hopelessly incompetent.
d) Yes, the government did it on purpose.
e) Not sure.
अर्थात फार कमी लोक a) पर्याय वापरतील, म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध झाला.
३. अॅवरेज, मीन, मिडियन हे स्वतःच्या सोयीनुसार वापरायचे.
मी काही विचारवंत नाही, पण पुढील मते पुरेशी बोलकी आहेत.
* There are lies, damned lies and statistics. - Mark Twain
* Statistics are used much like a drunk uses a lamppost: for support, not illumination. - Vin Scully
* There are two ways of lying. One, not telling the truth and the other, making up statistics. - Josefina Vazquez Mota
* It is the mark of a truly intelligent person to be moved by statistics. - George Bernard Shaw
* I can prove anything by statistics except the truth. - George Canning
* Do not put your faith in what statistics say until you have carefully considered what they do not say. - William W. Watt
23 Sep 2015 - 1:38 am | राजेश घासकडवी
हे सगळंच मान्य आहे. म्हणूनच कौल घेताना त्यामागचं उद्दिष्ट आणि त्यासाठी तयार केलेले प्रश्न हे सगळ्यांसमोर स्वच्छपणे मांडलेले असले पाहिजेत. मला प्रश्न असा पडतो की कौलाबद्दल घेतलेले आक्षेप कौलावरच का नाही नोदंले गेले?
विश्लेषण करताना कौलाच्या मर्यादा स्पष्टपणे मांडल्या असल्या पाहिजेत. इथे त्या केलेल्या आहेत. निष्कर्ष आख्ख्या समाजाला लागू नाहीत तर या कौलाला प्रतिसाद देणाऱ्यांच्या गटाबद्दल बोलतो हेही स्पष्ट म्हटलेलं आहे. असं असताना हे स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर कशासाठी?
इथे प्रश्न असा आहे की या कौलांमध्ये भाग घेणारांचं खरोखर प्रमाण भारतातल्या लोकसंख्येमध्ये किती आहे. माझा अंदाज सांगितला - २० टक्के. तो तितका का असावा याबद्दल काही सपोर्टिंग आकडेवारीही दिलेली आहे. जर हा २० टक्के आकडा मान्य असेल तर त्या २० टक्क्यांसाठी निष्कर्ष लागू आहेत असंच म्हटलं पाहिजे. आणि लेखात तेवढंच म्हटलेलं आहे. तुम्हाला जर हा आकडा कमी असेल असं वाटतं तर त्यासाठी काहीतरी आकडेवारी, कारणपरंपरा द्या. ज्या ४९ लोकांनी उत्तरं दिली ते कुठच्या ना कुठच्या गटाचे प्रतिनिधी आहेतच. तो गट किती मोठा आहे, अथवा लहान आहे यावर वाद होऊ शकतो. कौलच इनव्हॅलिड कसा ठरतो?
23 Sep 2015 - 1:42 am | मांत्रिक
वा बोकोबा! काय खतरनाक ओचकरलंय! वादाची बाजू फटक्यात पलटवलीत की! आवडला मुद्दा!!!