डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम
मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]
इस्लाम मध्ये समता आहे का ?
पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :
नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)
.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -
" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)
पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)
जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.
बौद्ध धर्माचा विनाश का झाला ?
सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)
दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :
मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -
भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :
" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)
भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)
मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)
मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .
झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .
" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)
या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)
पाकिस्तान का बनले ?
डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)
पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -
" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)
अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.
फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)
फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)
त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .
त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)
इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील
बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-
"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)
" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर, भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते. मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .
धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ
हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)
कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर
कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -
" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे. त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय. मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)
सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.
समस्येवरील दोन उपाय
वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .
१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .
२) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .
समारोप
हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे. पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही. इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे. आणि इस्लाम हा मुक्तिदाता, समतेचा, शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे. कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही. या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत.
बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते. विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे. इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :
"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith
मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !
- डॉ. अभिराम दिक्षित
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]
संदर्भ ग्रंथांचे तपशील :
(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Jul 2015 - 5:54 am | गुलाम
अत्यंत मुद्देसुद आणि अभ्यासपुर्ण लेख!!! लेखातल्या मुद्द्यांच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेवर इथले जाणकार प्रकाश टाकतीलच. परंतु, आजच्या काँग्रेसच्या आंधळ्या मुस्लिम अनुनयाच्या आणि भाजपच्या सरसकट मुस्लिमद्वेषाच्या राजकारणा मध्ये ईस्लाम धर्माचे असे परखड आणि वस्तुनिष्ठ परिक्षण वाचायची अजिबात सवय राहिलेली नाही, असे नोंदवतो.
अवांतर- मी पहिला!!!
18 Jul 2015 - 7:56 am | जयंत कुलकर्णी
श्री. आंबेडकरांची ही मते माहीत होती....अर्थात १८५७ सालचा जिहाद हे पुस्तक वाचून. त्याला प्रत्युत्तर म्हणून लिहिलेले पुस्तक अजून वाचलेले नाही. पण प्रतिसाद द्यायचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिम समाजात चर्चा झडत आहेत...आणि मला खात्री आहे मुस्लिम स्त्रियाच या धर्मात असलेल्या वाईट प्रथा उधळून देतील.... अर्थात तो दिवस भाग्याचा...
श्री. शाहीन हे असेच एक गृहस्त आहेत ज्यांनी कुराणात सुधारणेला वाव आहे, हदीथ खोट्या आहेत इ. इ. मते मांडली आहेत. मी यांची साईट बराच काळ वाचतो आहे. अर्थात आपल्याला माहीत असेलच.... ज्यांना नाही त्यांच्यासाठी खाली लिंक देत आहे...
http://www.newageislam.com/
जरुर वाचावे...
18 Jul 2015 - 8:40 am | वॉल्टर व्हाईट
तारेक फता ह्या कनाडिअन लेखकाची मतेही मुळात वाचण्या सारखी आहेत. त्याची ट्विटर फीड सुद्धा.
http://tarekfatah.com/about-tarek/
बाकी हा लेख माहितीपूर्ण आहे पण त्याहॆपेक्षा जास्त प्रचारकी वाटला.
18 Jul 2015 - 8:08 am | जेपी
लेख आवडला.
18 Jul 2015 - 8:24 am | उगा काहितरीच
अतिशय अभ्यासपूर्ण लेख! आवडला ...
18 Jul 2015 - 9:00 am | अनुप ढेरे
लेख आवडला. छान लिहिलाय.
+१
18 Jul 2015 - 9:04 am | शब्दानुज
मी इतिहासातील जाणकार अजिबात नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे हे माझे काम नाही. इतिहासाप्रमाणेच वर्तमानाही दोन्ही समाजात झालेले बदलांचीही नोंद घ्यावी.
अवांतर- माझ्या एका मुस्लिम मित्र्ाच्या सांगण्यावरुन मी एक दिवस रोजा पकडलो होतो. तोही आता एकादशी करणार आहे. दोन्ही समाजतली अढी काही प्रमाणात का होईना पण कमी होत आहे असे वाटते. सुधारणेचा प्र्ारंभ तिथून होतो जिथे एखादी गोष्ट खटकते. त्यासाठी धर्मग्रंथात बघण्याची गरजच काय ?
18 Jul 2015 - 6:40 pm | कविता१९७८
अवांतर- माझ्या एका मुस्लिम मित्र्ाच्या सांगण्यावरुन मी एक दिवस रोजा पकडलो होतो. तोही आता एकादशी करणार आहे. दोन्ही समाजतली अढी काही प्रमाणात का होईना पण कमी होत आहे असे वाटते.
18 Jul 2015 - 6:41 pm | कविता१९७८
प्रशंसनीय.
18 Jul 2015 - 9:10 am | खटपट्या
अतिशय मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण लेख.
असेच लेख मिपावर यावेत.
18 Jul 2015 - 10:09 am | पैसा
सर्व बाजूंचा अभिनिवेशविरहित व्यवस्थित विचार करणारा लेख. आंबेडकरांचे हे विचार त्यांच्या आजच्या तथाकथित अनुयायांनी वाचलेत का आणि त्यांना ते पचतील का हा मोठ्ठा प्रश्न आहे.
सर्व जगात वंचित आणि नीचतम अवस्थेतला वर्ग कोणता असेल तर तो बुरखा घ्यावा लागणार्या स्त्रियांचा. रस्त्यात चालताना दीड दोन वर्षांच्या मुलींना हिजाब घातलेले बघते तेव्हा मनात कालवाकालव होते. बुरख्याआडच्या अश्रूंच्या कित्येक कहाण्या वाचल्या आहेत. त्यांची नावे आठवणेही नको वाटते.
18 Jul 2015 - 11:07 am | विशाखा पाटील
बाकी हा लेख माहितीपूर्ण आहे पण त्याहॆपेक्षा जास्त प्रचारकी वाटला.
+१
इस्लाम धर्माचा उदय झाला त्याठिकाणचा इस्लाम आणि मध्य आशिया आणि भारतीय उपखंडातला इस्लाम यात काही फरक आहेत. अरबस्तानात कबिला व्यवस्था होती. इस्लाम त्या व्यवस्थेतून जन्माला आला. इस्लामपूर्व काळात गुलामगिरी होती, विषमता होती. ती नष्ट करणे हे इस्लाम धर्म स्थापन करण्यामागचे एक कारण होते.
भारतीय उपखंडात विषमता दिसण्याचे कारण आपल्या समाजातली विषमता इस्लाम स्वीकारल्यानंतरही काही प्रमाणात टिकून राहिली. आपल्या व्यवस्थेतले दोष पुढे तसेच उतरले.
18 Jul 2015 - 11:22 am | अर्धवटराव
बाबासाहेबांची मते निश्चितच आत्मपरिक्षण करायला लावणारी आहेत. जरा बंदुक बाजुला ठेवायची तयारी असेल तर आधुनीक विज्ञान, अर्थव्यवस्था आणि सामाजीक जाणिवा (खास करुन स्त्रियांच्या, शोषीतांच्या) या समस्येवर उपाय शोधतील देखील. पण हे सर्व करायला जी उसंत लागते तिच हरवली आहे जगातुन. जिथे लाठी चालते तिथे मसल पॉवर, जिथे मतदान चालते थिथे नंबर गेम, आणि सोबतीला प्रचंड आर्थीक पाठबळ, एव्हढ्या सगळ्या भांडवलावर धार्मीक उन्मादाची जुनीच दारु नव्या बाटलीत येऊन अधिकच नशिली बनली आहे.
एखाद्या अंधारलेल्या घराला प्रकाशमान करायचं असेल तर बाहेरुन लाईट पाडुन काहि होत नाहि. घरातच दिवे लागावे लागतात. असे दिवे, थोड्या प्रमाणात का होईना, आज लागत आहेत. कदाचीत त्यांच्या उग्र मशाली होतील भविष्यात. या प्रकरणाचा शेवट चांगलच होईल अशी प्रार्थना आज ईदेच्या दिवशी करुया.
मस्त तंदुरी चिकन, मटन निहारी, छोले, पुरी आणि फेणी चापुन आलोय मित्राकडुन :)
ईद मुबारक.
18 Jul 2015 - 1:11 pm | प्यारे१
अभ्यासपूर्ण लेख असला तरी दुर्दैवानं याबाबत विचार करण्याची तसदी कुणी घ्यायचं नाही बहुतेक. उलट गोष्टी आणखी बिघडलेल्या आहेत अथवा बिघडत चालल्या आहेत असं वाटतं.
अवांतर: आखातात किंवा मध्यपूर्वेत तेल सापडलंच नाही असा विचार करुन पाहिला तर...???? तेल नाही म्हणून तिथली अर्थव्यवस्था पुढे आली असती का? त्यातून लोकांना रोजगार मिळाले असते का? देशोदेशीचे लोक तिथे गेले असते का? त्यातही एका धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी जास्त फंडिंग तिथून होतं ते करता आलं असतं का वगैरे अनेक प्रश्न आहेत....
18 Jul 2015 - 5:32 pm | काळा पहाड
तेल कधी तरी संपणारच. जगाची एकूणच स्थिती तेलानंतर भीषण बनणार असली तरी मध्यपूर्वेचं काय होईल हे सांगायला नकोच. अर्थात बाकीचे देश त्यापूर्वी शहाणपणा स्वीकारून बहुधा समांतर उर्जा व्यवस्था स्वीकारतील. पण मध्यपूर्वेत तेल हे एकमेव उत्पन्नाचं साधन असल्याने तिथले लोक परागंदा होतील. अर्थातच कोणताही देश त्यांना स्वीकारून पायावर धोंडा पाडून घेण्याची चूक करणार नाही. त्या परिस्थितीत एका विशिष्ट धर्माकडून प्रायोजित अतिरेक्यांचा धंदा बंद पडेल आणि बाकीचे देश या अतिरेक्यांना टिपून संपवतील. त्यानंतर सध्या आफ्रिकेतले देश ज्या अवस्थेत आहेत (उदा> सोमालिया) त्या अवस्थेत हे देश जगतील.
18 Jul 2015 - 5:35 pm | dadadarekar
ते लोक आजवरच्या मिळकतीच्या व्याजावर जगु शकतात.
18 Jul 2015 - 5:41 pm | काळा पहाड
=) कळलं तुमचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान. काय मदरशात शिकला का? बसा खाली आता.
18 Jul 2015 - 7:23 pm | dadadarekar
त्यांम्चे तेल गेले तरी पैसे रहातील.
आपले तेलही जाईल आणि पैसेही गेलेले असतील.
18 Jul 2015 - 11:11 pm | विनोद१८
माहित नाही वाट्टे ??
18 Jul 2015 - 11:35 pm | dadadarekar
इस्लामी ब्यान्केनुसार ठेवीदार हा ब्यान्क व्यवसायतला ब्यान्केचा भागीदार मानता येतो व तो नफा शेअर करु शकतो.
' व्याजा' ऐवजी ' नफा' शब्द वापरला की झालं !
अशीच संकल्पना इस्लामी इन्शुरन्स / तकाफूल मध्ये आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Islamic_banking
19 Jul 2015 - 7:08 am | माहितगार
ब्यान्केचा भागीदार असणे आणि व्यवसायाचा भागीदार असणे यात फरक आहे. अस खाल्ल काय तस खाल्ल काय खायला लागतच. जेव्हा गोष्टी भावनेनी सोडवल्या जातात तेव्हा, कोणती गोष्ट सोवळ्यात आणि कोणती गोष्ट ओवळ्यात, उपवासाला काय चालत काय चालत नाही हे शेवटी ज्याच्या त्याच्या मानण्यावर असावे. शेवटी तुम्ही भागीदार असा का एकले मालक कोणत्याही व्यवसयातली गुंतवणूकीवर परतावा येणे न येणे अनिश्चित असते. अनिश्चित गोष्टीतली गुंतवणूक अंशतः जुगारच असतो :) एकुण काय तर टोकाच्या भूमीकांची दिशा कोणतीही असली की त्यात विरोधाभास निर्माण होणार हे निश्चित. म्हणूनच गौतम बुद्ध सम्यक भूमिकेचा आग्रह धरतात अर्थात गौतम बुद्धाच्या अनुयायांनाही सम्यक भूमिका घेणे जमते असे नाही इतरांची काय कथा ?
18 Jul 2015 - 6:27 pm | प्यारे१
मला तेल सापडलंच नसतं (60 च्या दशकात जे साठे सापडले) किंवा तिथे न सापडता दुसरीकडे कुठे सापडले असते तर जगाचं चित्र काय असतं असं म्हणायचं होतं!
18 Jul 2015 - 2:12 pm | श्रीगुरुजी
खूपच माहितीपूर्ण लेख आहे.
18 Jul 2015 - 3:17 pm | dadadarekar
लेख वाचून गोळवलकर गुरुजींच्री आठवण आली व मन सद्गगदीत झाले.
इस्लाम मुस्लिम याविरुद्ध व हिंदुत्वाच्या प्रचारासाठी गुरुजीनी वुइ द नेशन अse एक पुस्तक लिहिले होते. त्ञा पुस्तकान३ खळबळ माजल्यावर इंग्रजानी गुरुजींविरुद्ध वॉरंट काढले. गुरुजी भूमिगत झाले . पण इंग्रजी ससेमिरा चुकत नाही हे पाहिल्यावर ते प्रकट झाले व हे पुस्तक माझे नाही , बाबाराव सावरकरांच्या एका मराठे पुस्तकाचे हे भाशांतर अहे असा कांगावा करुन ते नामानिराळे राहिले. ( बाबाराव आधीच स्वर्गवसी झाल्याने त्यांच्या अटकेचा सवालच नव्हता ! )
आता पुन्हा तोच कित्ता.. वाक्यावाक्यावर दिवंगत आंबेडकरसाहेबांचे नाव लिहुन मुस्लिमद्वेषी विधाने मांडुन म्हटलं तर आपला लेख आणि संकट आल्यास बाबासाहेबांचं नाव असा नरो वा कुंजरो वा असा खास हिंदू आदर्श धर्मराजी साळसूदपणा पाहून गुरुजीही गहिवरले असतील !
18 Jul 2015 - 5:37 pm | काळा पहाड
सो कॉल्ड मुस्लिमद्वेषी विधाने करायला कशाची मदत घ्यायची गरजच नाही. तसेही, जग या धर्मावर प्रेम करतं आणि फक्त गोळवलकरांनाच त्यांच्याविषयी राग होता असा तुमचा गैरसमज दिसतोय. अमेरिकेत (खर्या) पासपोर्ट वर प्रवास करताना असले वाद तिथल्या कस्टम अधिकार्यांशी घालून पहा आणि मग पहा काहीही करायला परत वाकता येतं का ते. बाय द वे, हॅपी रमादान.
18 Jul 2015 - 10:19 pm | dadadarekar
हिंदू धर्मातील अत्याचारांना कंटाळून ज्या माणसाने हिंदू धर्म सोडला , त्या माणसाची इस्लामबद्दल काय मते आहेत , याच्या उचापती हिंदुत्ववाद्यानी कराव्यात , हाच एक मोठा विनोद आहे.
19 Jul 2015 - 12:09 am | सुबोध खरे
हितेस राव
डॉ आंबेडकरानी हिंदू धर्म सोडला पण इस्लाम का स्वीकारला नाही हे त्यांच्याच शब्दात वाचले का?
इस्लाम हा राष्ट्र्निष्ठेपेक्षा धर्माशी जास्त निष्ठा ठेवण्याची अपेक्षा करतो. आणी हे मला कदापि मान्य होणार नाही.
ISLAM DEMANDS LOYALTY TO RELIGION FIRST AND THEN THE NATION.
म्हणूनच अबू आझमी सारखे नालायक लोक मुंबईत भर सभेत असे बोलतात
"देश के कितने भी तुकडे हो जाये पर हम किसीको अपने मजहब से खिलवाड करने नही देंगे"
आणी हे सेक्युलर !!!! आणी त्यांची दाढी धरणारे तुम्ही सुडो सेक्युलर !!!
एकदा डॉ. आंबेडकरांचे समग्र साहित्य इमान दारीने वाचा. एक तर तुम्ही आमुलाग्र बदलाल किंवा मूळव्याध तरी होईल.
आज डॉ. आंबेडकरांचे स्वतःला अनुयायी "म्हणवणाऱ्या" लोकांनी त्यांचे विचार अमलात आणायला सुरुवात केली तर त्यांना आपली सत्तेची दुकाने बंद करावी लागतील कारण खरा अंत्योदय त्यांना झेपणार नाही.त्यांच्या नावाचा बाजार मात्र यांनी चांगला मांडला आहे.
राखीव जागांवरील त्यांचे विचार असेच न झेपणारे आहेत.
श्री गाडगे महाराजांनी सुद्धा त्यांना तू "दुसर्या" धर्मात जा( जो धर्म या मातीत जन्माला आला.) "तिसर्या" धर्मात (जो धर्म मातीशी इमान राखु शकत नाही त्या धर्मात) जाऊ नकोस असे सांगितले होते. हेहि मुळापासून वाचून पहा.
19 Jul 2015 - 1:32 am | मास्टरमाईन्ड
नक्कीच
19 Jul 2015 - 7:00 am | dadadarekar
इस्लाम जर मातीशी इमान ठेऊ नका असे सांगतो तर पाकिस्तानशी लढून भारतासाठी शहीद होणार्या जम्म्यु कश्मिर इन्फन्ट्रीत ५० % सैनिक मुसलमान दिसले नसते. भारतीय सैन्यात मुसलमान आहेत व ते भारतासाठीच शहीद होतात , तर मुसलमान धर्म मातीऐवजी धर्माशी इमान ठेवा असे सांगतो, हे विधान आपोआपच खोटे ठरते.
इस्लाम विज्ञानाशी फारकत घेते म्हणे... ! सौदी व इतर गल्फ राष्ट्रे भारतापेक्षा प्रगत आहेत ती कशाच्या जोरावर ?
इस्लाम स्त्रीयांना शिकु देत नाही म्हणे .... ! मग मोघल राजांचे इतिहास त्यांच्या घरच्या स्त्रीयांनी लिहुन कसा काय ठेवला बुवा ? मोघलांच्या कितीतरी स्त्रीया पर्शियन होत्या. तसेच त्यांच्या मुलीही लग्नानंतर तिकडे दिल्या जायच्या. अशा स्त्रीयांना दोन्ही लिप्या व भाषा अवगत असायच्या, हे आपल्याला शिकवतात का ?
दुसरा धर्म व तिसरा धर्म यांचा हा अर्थ आहे हे माहीतच नव्हते हो !
गाडगेबाबा बोलले होते.. एक धर्म आवडला नाही की दुसरा पत्कर पण तिसरा नको !
म्हणजे सर्व धर्मांचा नीट अभ्यास करुन दुसरा धर्म कोणता हे एकदाच ठरव .
नै तर असे व्हायचे की दुसरा धर्मही काही काळाने पसंत पडला नाही की अजुन तिसर्या धर्माकडे जाणार . असे होऊ नये ... म्हणून दुसरा स्वीकार , पण तो नीट अभ्यास करुन , हा त्याचा अर्थ आहे.
दुसरा धर्म म्हणजे बौद्ध व तिसरा म्हणजे मुसलमान असे गाडगेबाबांना अपेक्षित होते , तर कृपया तसा संदर्भ दिलात तर बरे होइइल.
.......
'दुसरा' धर्म मनाने स्वीकारलेला ..
आलमगीर दादाखान
18 Jul 2015 - 5:52 pm | खटपट्या
दरेकर साहेब, धागाकर्त्याने कोणता परीच्छेद कोणत्या पुस्तकातून, कोणत्या पानावरून घेतला आहे हे लीहीले आहे. त्यामुळे वाक्यावाक्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेउन नरो वा कुंजरोवा केलेले दीसत नाही.
18 Jul 2015 - 6:43 pm | उगा काहितरीच
तुम्हाला तुमचे मत खरंच पटवून द्यायचे असेल ना प्लिज लेखकाने जे संदर्भ दिलेत ना त्या पानावरचे मूळ इंग्रजी लेखन इथे पेस्ट करा, (मी तसं करणार नाही कारण लेखकावर तेवढा विश्वास आहे) नाहीतर तुमचे विधान मागे घ्या .
18 Jul 2015 - 11:18 pm | विनोद१८
तुला उगाच नव्हतो मी 'बाटगा' म्हणत यापूर्वी, माझी तर खात्रीच पटली, शक्य असेल तर विषयाला धरुन प्रतिक्रिया दे, समजले का नान्या ???
19 Jul 2015 - 12:19 am | एस
एखाद्यावर सातत्याने अशा स्वरूपाची वैयक्तिक आणि हीन टीका केल्याने अंतिमतः संस्थळाचेच आपण नुकसान करत असतो हे आपल्यासारख्या सूज्ञ माणसांना वेगळे समजावयास नको. प्रतिवाद करताना वैचारिक मतभिन्नतेचे जे काही मुद्दे असतील ते शांतपणे आणि संसदीय भाषेत मांडल्यास समोरच्याने कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी शेवटी आपली बाजू योग्य ठरण्याची शक्यता वाढते; जे अशा स्वरूपाचे पातळी सोडून टंकलेले कितीही प्रतिसाद करू शकत नाहीत असा अनुभव आहे.
एखादा प्रतिसाद मिपाधोरणांविरूद्ध वाटल्यास अथवा कुणा आयडीचे वर्तन आक्षेपार्ह वाटत असल्यास तशी तक्रार संपादकांकडे करण्याची सोय आहे, तिचा वापर केला जावा.
19 Jul 2015 - 1:13 pm | dadadarekar
वुइ पुस्तक १९३९ ला आले.
बाबारावांचे निधन १९४५ ला झाले.
गांधीहत्येनंतर या पुस्तकावर ४८ ला बंदी आली होती.
18 Jul 2015 - 4:59 pm | सुनील
लेख आवडला.
18 Jul 2015 - 6:09 pm | काळा पहाड
हा विनोद आठवला:
तसाच,
हा आणखी एक विनोदः
18 Jul 2015 - 8:06 pm | धर्मराजमुटके
लेख चांगलाय पण !
आंबेडकरांचे (सो कॉल्ड) अनुयायीच आज आंबेडकरी चष्म्यातून नीट पाहू शकत नाहियेत तिथे मुस्लीमांकडून अशी अपेक्षा करणे म्हणजे अरण्यरुदनच ठरेल.
एकंदरीत भारतीय मन म्हणजे कोकणातली मातीच. आतापर्यंत एवढे महापुरुष बरसले पण सगळयांचेच विचार वाहून जातायेत. चातुर्मास संपला की पाण्यासाठी वणवण सुरुच !
18 Jul 2015 - 8:28 pm | खटपट्या
आंबेडकरांच्या सो कॉल्ड अनुयायींना आंबेडकर कीती कळलेत हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
18 Jul 2015 - 8:40 pm | माहितगार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण डिसेंबर ६, इ.स. १९५६ रोजी झाले त्यांच्या लेखनावरील कॉपीराइट ६० वर्षांनी म्हणजे ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपेल, ज्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचे (मूळ)लेखन उपलब्ध आहे त्यांना ते १ जानेवारी २०१८ पासून आंतरजालावर जसेच्या तसे उपलब्ध करता यावयास हवे.
(चुभूदेघे डिस्क्लेमर लागू)
18 Jul 2015 - 9:56 pm | एस
इस्लामविषयी रोखठोक आणि व्यावहारिक भूमिका घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील पहिले राजकारणी असावेत. परंतु त्यांची भूमिका ही रा. स्व. संघाच्या इस्लामविरोधाच्या प्रमाणे विखारी अशा स्वरूपाची नव्हती. आजच्या काळात इस्लाम वा इतर कोणत्याही धर्माचे अशा प्रकारे विश्लेषण करणे शक्य होईल का हे सांगता येणे अवघड आहे.
राहता राहिला प्रश्न इस्लामच्या रूपाचा, इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे, की इस्लाम हा गैरइस्लामी लोकांना, म्हणजेच इस्लामच्या बाहेरील सर्व लोकांना 'काफिर' मानतो. तसे इतर कोणताही धर्म त्या-त्या धर्माबाहेरील लोकांना स्वतःचे दुश्मन मानत नाही.
आज इस्लाममध्ये जितक्या भयावह प्रमाणात कट्टरवाद बोकाळलाय त्याकडे पाहता सुधारणावादी इस्लामी प्रवाहांचा क्षीणपणा काळजीत टाकणारा आहेच; त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर धर्मांमध्येही कट्टर मूलतत्त्ववाद बोकाळल्यास त्याचा त्रास त्या धर्मांच्या मूळच्या सहिष्णू आणि पुरोगामी तोंडावळ्यावर होऊ लागतो.
लेख उत्तम. यानिमित्ताने खूप दिवसांनी राजघराणं मिपावर लिहिते झाले याचे स्वागत.
19 Jul 2015 - 7:32 am | माहितगार
+१
18 Jul 2015 - 10:00 pm | संदीप डांगे
माहितीचा कचरा...
.
.
.
18 Jul 2015 - 11:56 pm | खटासि खट
लिऑनपणी पुण्याचा बेस्ट लक्ष्मीनारायण चिवडा खाताना त्यातला शेलका चटपटीत माल वेचून वेचून खायचो आणि बाकीचा ठेवून द्यायचो. आज ब-याच दिवसांनी आठवण आली त्याची.
http://www.apnaorg.com/books/english/ambedkar-pakistan/book.php?fldr=book
घ्या मंडळी ओरीजिनल चिवडा. जमल्यास सगळाच खा. हे पाकीट संपलंच तर दुकानात मिळतील..
18 Jul 2015 - 11:57 pm | खटासि खट
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_partition/
हा चिवडा घ्या हो मंडळी. चुकीचं पाकिट दिलंय...
19 Jul 2015 - 12:01 am | खटासि खट
https://www.facebook.com/notes/babasaheb-ambedkar/was-ambedkar-anti-musl...
19 Jul 2015 - 12:26 am | अवतार
आंबेडकर यांनी इस्लामविषयी काय लिहिले आणि हिंदूंविषयी काय लिहिले यावर बरीच चर्चा झाली आहे आणि होत राहील.
पण आंबेडकर यांनी बौद्ध धम्माविषयी काय लिहिले यावर चर्चाच होत नाही हे आश्चर्यच नव्हे काय?
19 Jul 2015 - 12:36 am | श्रीरंग_जोशी
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माविषयी काही लिहिले आहे का याविषयी मला माहिती नाही.
परंतु १९५६ सालच्या १४ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली अन ६ डिसेंबर रोजी ते निवर्तले. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ ६५ वर्षे होते.
बाबासाहेब अजून जगले असते तर अजून खूप काही करू शकले असते त्यात बौद्ध धम्माविषयी लेखनाचा समावेश नक्कीच असता असे वाटते. त्यामुळे तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी असली तरी त्याबाबत आश्चर्य अजिबात वाटणार नाही.
21 Jul 2015 - 4:33 pm | अमोल मेंढे
अभ्यास वाढवा हो. बाबासाहेबांनी बुध्द आणि त्याचा धम्म हा अप्रतिम ग्रंथ लिहलाय.
21 Jul 2015 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी
अभ्यास वाढवायचा आहेच त्याबाबत काहीच शंका नाही.
माझ्या प्रतिसादाचा आशय असा होता की बाबासाहेबांना अधिक आयुष्य लाभायला हवे होते. अजुन कितीतरी चांगले कार्य त्यांच्या हातून घडले असते ज्यात ग्रंथलेखनाचाही समावेश असता.
19 Jul 2015 - 12:41 am | खटासि खट
संपूर्ण लेखाची चिकित्सा करण्यासाठी भरपूर वेळ हवा. लेख वेचक वेधक असल्याचं लक्षात येतं. फक्त एकच उदाहरण पाहूयात.
इथे फक्त थॉट्स ऑन पाकिस्तानचा उल्लेख झालेला आहे. हिंदू कोड बिलासंदर्भातली बाबासाहेबांची भाषणे आणि मी बौद्ध धर्म का स्विकारला हे भाषण विचारात घेतलेलं नाही.
पाकिस्तानच्या संदर्भात इस्लाममधील स्थितीचा विचाआ=हा नव्या राष्ट्रात कसं व्हायचं या दृष्टीने आलेला आहे. त्याचा धर्मांतराशी काही एक संबंध नाही, तसंच त्यामुळे अमूक एक धर्म श्रेष्ठ ठरतो असं प्रमाणपत्र हीथे विवेचन देत नाही.
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_partiti...
हा परीच्छेद फक्त विचारात घेऊयात. हा परीच्छेद म्हणजे हिंदू धर्म मुस्लीम धर्मापेक्षा चांगला आहे असा निष्कर्ष निघत नाही. सर्वच धर्मात असलेले गैर वेगवेगळ्या अभ्यासातून लक्षात येते.
मुंबईत दि.१४ जाने १९५५ रोजी बौद्धधर्म सल्लागार समितीतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या सभेला संत गाडगे महाराज, संत मोडक महाराज, करमाळेकर उपस्थित होते. बाबासाहेब म्हणाले
"बुद्ध धर्म मी का स्विकारला ते मी सांगतो. बुद्ध धर्माची गौतम बुद्धाची व्याख्या अशी - बहुजनहिताय, बहुजनसुखाय, लोकनुकंपाय, हितय, सुखाय, देव मनुस्सानं, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अंति कल्याणं.
बुद्ध धर्म हा लोकांच्या कल्याणाकरता, हिताकरता, सुखाकरता, त्यांच्यावर प्रेम करण्य़ाकरता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनी स्विकारून चालणार नाही तर देवांनीही त्याचा स्विकार केला पाहीजे. ज्याप्रमाणे ऊस मुळाशी गोड असतो. मधे गोड असतो आणि शेवटीही गोड असतो त्याप्रमाणे बुद्ध धर्म हा आरंभी कल्याणकारक आहे, मध्यावरही कल्याणकारक आहे आणि शेवटासही कल्याणकारक आहे.
(ही बुद्धाची व्याख्या सांगून बाबासाहेब विचारतात)
मला कुणीही सांगावं की आमचा हिंदू धर्म हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे काय ? आजही सात कोटी अस्पृश्य आणि बहीष्कृत केल्याने वनात राहणारे आदिवासी आहेत तसेच चो-या करून उपजीविका करणारे (पेंढारी आणि तत्सम) लोक आहेत. मग या धर्माला बहुजन हिताय , बहुजन सुखाय कसे काय म्हणावे ? जर ब्रह्म सर्वत्र आहे तर मग महारात, चांभारात, मांगातही ते असले पाहीजे. मग हिंदू धर्मात अशी असमानता का ?
इ.स. १९१० साली जेव्हां हिंदू-मुसलमानात जातीयवादावर बखेडा सुरू झाला तेव्हां हिंदू कोणास म्हणायचे , हिंदूची सर्वमान्य व्याख्या काय असा कठीण प्रश्न उपस्थित झाला ,तेव्हां भारतातील अकरा विद्वानांनी अकरा व्याख्या केल्या, कुणाचाच कुणाशी ताळमेळ बसेना. हिंदू शब्दाच्या व्याखेतील बेंबंदशाही व बेबनाव हास्यास्पद नाही का ?
सावरकरांची व्याख्या
आसिंधु: सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका ।
पितृभुभ: पुण्यभुश्चैव सवै हिंदु: इति उच्यते ॥
राधाकृष्णन यांची व्याख्या ही वेगळी जी टिळकांच्या व्याख्येशी जुळत नाही. टिळकांची व्याख्या पाहू.
प्रामाण्यं, बुद्धिर्वेदषु साधनानाम अनेकता उपास्या नाम नियम:
टिळकांच्या दृष्टीने हिंदू म्हणजे वेदांना मानणारा पुरूष. मग धर्माचरणात त्याची साधना काही जरी असली तरी चालेल".
अगदी थोडक्यात या भाषणाचा गोषवारा देऊन आता हिंदू कोड बिलाच्या भाषणाकडे वळूयात.
19 Jul 2015 - 1:03 am | खटासि खट
२ मे १९५० ला दिल्ली येथे बुद्धाची २४४९ वी जयंती बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी बौद्ध धम्मामुळेच भारत महान असे उद्गार त्यांनी काढले. याच अर्थाची भाषणे या काळात दिसतात. पण सदरच्या भाषणात बाबासाहेब विचारतात
हिंदू धर्म इतर धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे, याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील का ? अस्पृश्यांचे जीवन बरबाद करण्याची ताकद आहे म्हणून श्रेष्ठ की अस्पृश्य गुणवान असला तरी त्यास सामाजिक दर्जा मिळत नाही म्हणून श्रेष्ठ ? अस्पृश्याने पवित्र उद्गार काढले तर त्याची जीभ छाटली जावी हे रास्त आहे काय ? अस्पृश्य मनुष्य गुरू होऊ शकत नाही म्हणून हा धर्म श्रेष्ठ की तप्त शिसे अस्पृश्यांच्या आणि शूद्रांच्या कानात ओतले जावे असे सांगतो म्हणून हा धर्म श्रेष्ठ ? असे सांगणारा धर्म धर्म या संज्ञेस पात्र ठरतो काय ? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहीजेत.
तर मिलिंद महाविद्यालयामधे हिंदू कोडबिलावरून मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी ते बिल का हवे आणि त्या बिलावरून मी कसा राक्षस ठरवलो गेलो आहे, धर्मबुडवा आणि हिंदू धर्माचा मारेकरी ठरवलो गेलो आहे हे थोडक्यात सांगितले. वर्तमानपत्रातून नाही नाही ते आरोप केले जात असले तरी त्याची पर्वा करण्य़ाची गरज नाही असे सांगताना त्यांनी त्या लिखाणाची थट्टाही केली.
त्यांचं म्हणणं होतं की खंडप्राय पसरलेल्या या देशात एकही प्रथा समान नसलेल्या धर्माप्रमाणे कायदे स्वतंत्र भारतात लागू होऊ शकत नाहीत,. मध्य प्रांतात असलेल्या चालींप्रमाणे मान्य रूढींप्रमाणे कायदा दक्षिणेत चालणार नाही. म्हणून सर्वांना एकच एक लागू होईल अशा कायद्याची गरज होती. बंगालमधे एका तालेवार जमातीमधे एका सभ्य गृहस्थाला पाचशे बायका होत्या. त्याने बायकांचे नाव आणि पत्ता लक्षात ठेवण्यासाठी एक रजिस्टर ठेवले होते. ज्या गावी तो जाई तिथल्या बायकोचा पत्ता घेऊन तिच्या घरी मुक्काम करी. अशी प्रथाच त्या भागात होती, तर एकापेक्षा जास्त बायका नसाव्यात अशी प्रथा अनेक ठिकाणी आढळते. त्यामुळे त्यातला सुवर्नमध्य साधत धर्माची चिकित्सा करत सर्वांना काळाशी सुसंगत होईल आणि विवेकाला धरून राहील असा कायदा बनवला आहे. त्यामुळे अन्याय कुनावरच होत नाही. उलट ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळेल. त्यासाठी धर्माच्या अनेक दुर्लक्षित पण महत्वाच्या ग्रंथांचा सहारा मी घेतला आहे , अशा प्रकारे धर्मचित्सेचा फायदाच होऊन धर्माचे अधिष्ठान एकच एक कायद्यासाठी मिळेल. ब्रिटीश काळामधे सतीच्या प्रथेविरुद्ध कायदा झाला तरी त्याचे श्रेय राजा राममोहन राय यांनाच गेले पाहीजे. कारण त्यानंतर ब्रिटीशांनी कुठलीही सामाजिक सुधारणा केली नाही. शिक्षणाचा अधिकार मात्र दिला. स्त्री ला जिवंतपणी मृत नव-याला मांडीवर घेऊन जाळण्याला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते ? त्यामुळे धर्मातील अशी कलमे काढून टाकली गेलीच पाहिजेत.
विधवा स्त्री असो वा विवाहीत, तिला कसले स्थानच नाही. त्यामुळे स्त्रियांच्या हक्कांचा विचार केला गेला आहे....
याउप्पर सर्व साहीत्य सर्वांसाठी उपलब्ध असल्याने आपले आपण मिळवणे कठीण नाहीच. सदर लेखामुळे सध्या वाचनाची व्याप्ती काय असावी अशी एक मर्यादा घालून दिली जातेय, त्यामुळे का होईना पिन पॉईण्टेड वाचन होईल. हे योग्य की अयोग्य हे मात्र मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचे संदर्भ जाणून न घेता वाचन जरी केले तरी बाबासाहेबांच्याच भाषेत गाढवावर लादलेले ग्रंथांचे ओझे होईल फक्त.
यापेक्षा आंजा वर लिखाण करणे अशक्य ही मर्यादा ओळखून थांबतो.
19 Jul 2015 - 1:05 am | आतिवास
लेख वाचनीय आहे.
पण थोडं 'सोयिस्कर' विवेचन आहे असं प्रथमदर्शनी मत झालं.
डॉ. आंबेडकर यांचं 'हिंदू' धर्माविषयीचं विवेचनही वाचायला आवडेल.
19 Jul 2015 - 1:14 am | प्यारे१
ज्या समाजातून पूजनीय डॉ. बाबासाहेब आले त्या समाजावर अनेकानेक वर्षं झालेला अन्याय आणि लोकांना दिली गेलेली अमानुषपणाची वागणूक यामुळे हिन्दू धर्माबद्दल तिरस्कार निर्माण होणे स्वाभाविक असेल तरीही पुन्हा हिन्दू धर्माचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्या लोकांमुळे अशा गोष्टी झाल्या आहेत. हिन्दुत्वाचं तत्त्वज्ञान कुणालाही नीच लेखत नाही. घटनेनं सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत पण काही ठराविक लोकच त्या अधिकारांचा वापर मनासारखा करतो तर यात घटना चुकीची कशी ठरते हे समजू शकणार नाही तसंच अम्मलबजावणी मधल्या तपशीलांचा आणि त्यातल्या न्यूनत्वाचा दोष तत्त्वांवर लादला जाऊ नये
19 Jul 2015 - 10:40 am | अनुप ढेरे
कुठल्या ना कुठल्या धर्मात राहिलं पाहिजे ही भुमिका का होती? हिंदू धर्म त्यागून 'कुठलाही धर्म नाही' या स्टेटमध्ये राहता येतं का भारतात?
19 Jul 2015 - 10:55 am | dadadarekar
न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे. याबाबत अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत.
19 Jul 2015 - 11:05 am | खटासि खट
असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्या निर्णयांवर संसदेत चर्चा होऊ शकते.
धर्मच का स्विकारला, निधर्मी का नाही याचीही उत्तरं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. आहे तो धर्म सोडून निधर्मी होणं हे ही धर्मांतरच. जे काही आहे ते वाचनासाठी उपलब्ध आहे.
19 Jul 2015 - 12:39 pm | माहितगार
19 Jul 2015 - 12:49 pm | dadadarekar
Atheism and irreligion are not officially recognized in India. Apostasy is allowed under the right to freedom of religion in the Constitution, and the Special Marriage Act, 1954 allows the marriage of people with no religious beliefs, as well as non-religious and non-ritualistic marriages. However, there are no specific laws catering to atheists and they are considered as belonging to the religion of their birth for administrative purposes
19 Jul 2015 - 1:12 pm | माहितगार
एखादी गोष्टीचा कायद्यात विशीष्टपणे उल्लेख नाही आणि कायद्यास अमान्य आहे या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. तुम्ही म्हणता तो विकिउल्लेख Atheism and irreligion यांचा कायद्यात विशीष्टपणे उल्लेख नाही असा आहे म्हणजे ते कायद्यास अमान्य आहे असा त्याचा अर्थ भारतीय घटनेतून काढता येऊ शकणार नाही एवढी भारतीय घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक कलमे मजबूत आहेत (हे माझे व्यक्तीगत मत).
आपण दिलेली विकिसंदर्भ टाइम्स ऑफ इंडीयाचा हा संदर्भ देतो. पण टाइम्स ऑफ इंडीयाच्या बातमीत न धर्मी स्टेटस अमान्य करणार्या कोणत्याही कायद्याचा उल्लेख दिसत नाही.
न धर्मी स्टेटस कायद्यास अमान्य आहे असे आपण म्हणता तर त्या कायद्याचा संबंधीत कलमा सहीत संदर्भ द्यावा. आज भारतातील बहूतेक कायदे आणि हायकोर्ट लेव्हलच्या वरच्या कोर्टांच्या जुन्या नव्या सगळ्या केसेस आंतरजालावर उपलब्ध आहेत. 'अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत' असे आपण म्हणता तर त्या नेमक्या कोणत्या कोर्ट केसेस आहेत त्यांचे संदर्भ द्यावेत.
आपण वकील असाल तर आपण आपले तथाकथीत संदर्भ देऊ शकालच नपक्षी indiacode.nic.in/ येथे भारतीय कायद्यांची माहिती मिळते. http://judis.nic.in/ या वेबसाईटवर जजमेंट शोधता येतात. indiankanoon.org हे खासगी संकेतस्थळही बरे आहे. स्वतःच्या म्हणण्याच्या पुष्ठीसाठी आपल्याला कुठे शोधावे असा प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी अपेक्षा.
आपण म्हणता त्या कायद्यांचे आणि हायकोर्ट लेव्हल अथवा सुप्रीम कोर्टाच्या केसेसचे दाखले नमुद करावेत. तो पर्यंत सदंर्भ हवा हि विनंती शिल्लक आहे.
19 Jul 2015 - 1:40 pm | dadadarekar
मी वकील ( होऊ शकलो ) नाही. ( अॅडमिशन अपघातानंतर कॅन्सल केल्री. )
तुम्ही अशा केसेस शक्य असल्यास शोधा किंवा वकिइल / कोर्ट गाठा.
19 Jul 2015 - 1:49 pm | माहितगार
'न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे. याबाबत अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत.' स्टेटमेंट तुमच आहे, बरे तुम्ही एखादी केस झाली असण्याची शकयता आहे अथवा माझ्या वाचनात आल्याचे अंधूक आठवते असे काहीही म्हटलेले नाही, तेव्हा संदर्भ देण्याची पहिली (नैतीक) जबाबदारी आपली नाही का ? (बर मी तर कुठे शोधायचे ते आंतरजालीय दुवेही दिलेत) इतरांनी सुद्धा थोडीही शोधाशोध न करता ऐनचर्चेत आपल्याला 'पेप्रात कुठेतरी वाचली होती' असं सागीतलत तर आपली रिअॅक्शन काय असेल ?
19 Jul 2015 - 2:20 pm | dadadarekar
विकिपेडिया आर्टिकल नीट वाचा.
त्यात महत्वाच्या कोर्ट केसेसचे संदर्भ दिलेले आहेत.
मी वाचलेल्या केसमध्ये विवाहीत पुरुषाषाने नंतर धर्म सोडला व अता मी हिंदु नसल्याने / मला धर्मच नसल्याने बायकोस पोटगी देणार नाही असा दावा केला होता... पण कोर्टाने तो युक्तीवाद नाकारून पोटगी वारसाहक्क इ इ हे मूळच्या धमानुसार लागू होतील असा कोर्टाने निकाल दिलेला होता.
19 Jul 2015 - 2:36 pm | माहितगार
दादा इंग्रजी विकिपीडियावरील Legal awareness या लेखाच्या इतिहासात जाऊन त्या लेखाची माहितगार नावाने किती संपादने आहात पहाल का ? विकिपीडियाची डिसक्लेमर्स आणि विकिपीडियाच्या मर्यादांचे विकिपीडियाने सांगीतलेले वाचन आपण केले आहे का ? आपण ज्या वाचलेल्या केसचा दुवा देत आहात त्यात त्याने पोटगीदेण्याच्या जबाबदारीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला म्हणून कोर्टाने निकाल दिला असेल आणि वृत्तपत्रीय बातम्यांवरून कोर्टाने नेमका काय निकाल दिला याचे वाचन कसे शक्य होणार बरे ती वृत्तपत्रीय बातमीचा नेमका संदर्भही तुमच्या हाताशी नाही.
एनी वे हा घ्या माझ्याबाजूने एक सुयोग्य संदर्भ
Dr. Ranjeet Suryakant Mohite vs The Union Of India on 23 September, 2014 - Bench: A.S. Oka (बॉम्बे हायकोर्ट)
वेळ वाचवायचा असेल तर त्यातील निकालाच्या ७व्या मुद्यापासून वाचन चालू करू शकता.
.....
7. 7. Clause (1) of Article 25 of the Constitution of India is in two parts. The first part confers fundamental right to freedom of conscience. The second part confers a right on a citizen to freely profess, practice or propagate any religion. We have already discussed the concepts of conscience and religion. The term religion cannot be necessarily theistic. Apart from the freedom of conscience, there is a fundamental right to freedom of speech and expression. Articles 19 and 25 confer a freedom of conscience on a citizen which is a fundamental right guaranteed by the Constitution of India. As far as the freedom of speech and expression is concerned, it guarantees the freedom to an individual from compulsion as to what he shall think and what he shall say. India is a secular democratic republic. The State has no religion.
There is a complete freedom for every individual to decide whether he wants to adopt or profess any religion or not. He may not believe in any religion. If he is professing a particular religion, he can give up the religion and claim that he does not belong to any religion. There is no law which compels a citizen or any individual to have a religion. The freedom of conscience conferred by the Constitution includes a right not ash 8 pil-139.10 to profess, practice or propagate any religion. The right of freedom of conscience conferred on a citizen includes a right to openly say that he does not believe in any religion and, therefore, he does not want to practice, profess or propagate any religion. If the parents of a citizen practice any particular religion, he has a freedom of conscience to say that he will not practice any religion. There is a freedom to act as per his conscience in such matters.
8. Freedom of conscience under Article 25 of the Constitution encompasses in itself a freedom to an individual to take a view that he does not belong to any religion. The freedom conferred by Article 25 of the Constitution also includes a right of an individual to claim that he is an 'Atheist'. As the freedom of conscience confers a fundamental right to entertain a religious belief, it also confers a right on an individual to express an opinion that he does not belong to any religion.
9. No authority which is a State within the meaning of Article 12 of the Constitution of India or any of its agency or instrumentality can infringe the fundamental right to freedom of conscience. Any individual in exercise of right of freedom of conscience is entitled to carry an opinion and express an opinion that he does not follow any religion or any religious tenet. He has right to say that he does not believe in any religion. Therefore, if he is called upon by any agency or ash 9 pil-139.10 instrumentality of the State to disclose his religion, he can always state that he does not practice any religion or he does not belong to any religion. He cannot to be compelled to state that he professes a particular religion.
10. The prayer made in this Petition is to direct the Respondents to recognize "No Religion" as a form of religion. When an individual says that he does not practice or profess any religion, he does not belong to any religion or any religious sect. The other part of the Prayer Clause (A) seeks a writ of mandamus directing the Respondents not to insist on writing/mentioning/specifying/quoting religion in any of its forms or declarations which are to be filled in by a citizen. No individual can be compelled to state that he belongs to a particular religion, though he does not practice or profess the said religion. He has a fundamental right to state that he does not profess or practice any religion and, therefore, what follows is the second part of the Prayer Clause (A) which will have to be granted. Therefore, the Government Printing Press cannot deny request of a citizen to declare in the gazette that he does not belong to any religion.
11. Therefore, the Petition must succeed and we pass the following order: 10 pil-139.10
ORDER :
(a) We issue a writ of mandamus directing the Respondents not to compel any individual to declare or specify his religion in any form or any declaration;
(b) We declare that by virtue of Article 25 of the Constitution of India, every individual has right to claim that he does not belong to any religion and that he does not practice or profess any religion;
(c) The order of the Government Printing Press is set aside to that extent;
(d) The Petition is allowed on above terms.
( A.S.CHANDURKAR, J ) ( A.S. OKA, J )
उत्तरदायकत्वास नकार
19 Jul 2015 - 3:19 pm | अनुप ढेरे
अप्रतीम माहिती महितगारजी. धन्यवाद!
19 Jul 2015 - 3:32 pm | माहितगार
अनुपजी आपल्या वरच्या या प्रतिसादात आपल्याला 'कुठल्या ना कुठल्या धर्मात राहिलं पाहिजे ही भुमिका का होती?' असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबाबत म्हणावयाच होत का ? आणि "न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे." म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असं दादा दरेकरांना म्हणावयाचे होते का ? चार्वाक प्रकरण भारतीय दर्शनात एवढ प्रचंड प्राचीन आणि चर्चीत आहे की निधर्मीयतेवर भारतात टिका होईल पण कोणताही सच्चा हिंदू निधर्मी राहण्याचा अधिकार नाकारू शकणार नाही. आणि आतातर हा (राइट टू कन्सायन्स) अधिकार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संकेतांचा भाग आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागताना न धर्मी व्यक्ती होण्याचा निर्णय का घेतला नाही हा आपला प्र्शन असेल आणि न धर्मी राहता येत ह्याचा संदर्भ तर मी वर दिला आहे, आता आपण दादा दरेकरां प्रतिसादा करता वेळ देऊ. (दादांचा तुमच्या शंकेस प्रतिसाद नाही आला तर बाकी मंडळी आहेतच तुमच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी)
19 Jul 2015 - 3:59 pm | अनुप ढेरे
हो. कोणताच धर्म नको अशी भुमिका बाबासाहेबांनी का नाही घेतली अशी शंका आली. पण एका प्रतिसादात त्यांनी याची कारणं दिली आहेत असा उल्लेख आहे. सो ते वाचलं पाहिजे.
कायद्याला मान्य नाही हा युक्तिवाद लंगडा वाटतच होता. तुमच्या माहितीने ते कन्फर्म झालं.
19 Jul 2015 - 5:31 pm | dadadarekar
बाबासाहेबांच धर्मपरिवर्तन हा मुद्द वेगळा होता. बाबासाहेबाना समता व बंधुता यांचा शोध घ्यायचा होता. त्याना बौद्ध धर्मात उत्तर मिळाले.
आजचा कायदा नdharmee स्टेटस मानतो का हा एक वेगळा मुद्दा होता. याचे उत्तर हो व नाही यांच्या सीमेवर आहे.
तुमचे नधर्मी स्टेटस जोवर वाइट हेतूने नाही तोवर ते कोर्ट मान्य करते. उदा. मी कोर्टात नधमी असे जाहीर करुन गीता नाकारू शकतो. शाळेत नधर्मी असे जाहीर करुन धार्मिक प्रार्थनेतून बाहेर पडु शकतो. एखाद्या फॉर्मवर कोणत्याच धर्माचा नाही इ इ इ .
पण मूळ एखाद्या धर्मातील वाइइट हेतूने निधर्मी स्टेटस घेत असेल तर कायदा त्याला विरोध करेल. उदा... एखाद्या हिंदूने जाहीर केले की मी आता हिंदु धर्म सोडला व आता मी एकपत्नी कायदा पाळणार नाही . तर त्यावेळी कायदा त्याचे बखोट धरून त्याला त्याच्या मूळच्या धर्मात बंद करेल.
अशा कॉम्प्लिकेशन्समध्ये कोर्ट केसेसचे जजमेंट्स हे केस टू केस भिन्न भिन्न असतील.
19 Jul 2015 - 6:03 pm | माहितगार
हे ठिक.
इथे कायद्याची परिभाषा नेमकेपणाने समजाऊन घेण्यात गल्लत होत असावी. कमीत कमी क्लिष्टतेने समजून घ्यायचे तर (जिथ पर्यंत माझे वाचन आहे) जेव्हा दोन वेगवेगळ्या कायदे विषयक प्रावधाने परस्पर विरोधी असण्याची शक्यता संभवते सर्वसाधारण न्यायालयीन भूमीका ह्या कायद्याची अंमल बजावणी स्वतंत्रपणे करू आणि त्या कायद्याखाली वेगळी केस लावा त्याची अंमलबजावणी स्वतंत्रपणे करू अशी असते. त्यामुळे कुणी धर्म बदलला न धर्मीपणा कोणत्याही कारणाने जाहीर केला तरी इरिस्पेक्टीव्ह ऑफ हिज हेतू मूळच्या धर्मास बांधील ठेवणार नाही अशा न्यायालयीन कृतीने त्याच्या घटनात्मक स्वातंत्र्यावर बंधन येईल असे न्यायालय काहीही करणार नाही. त्याच वेळी दुसर्या कायद्यान्वये त्याच्या पुर्वाश्रमीपासून लागू असलेल्या जबाबदार्या त्यास टाळता येणार नाही इतपत दक्षता कायदा घेईल.
सर्वसाधारणपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कॉपीराईट बद्दल माझे वाचन अधीक आहे . समजा क्ष व्यक्तीला काही बाजू मांडावयाची आहे त्याच्या प्रसिद्धीच्या स्वांतत्र्याबद्दल त्याने केस टाकली तर न्यायालय आधी त्याच्या प्रसिद्धी स्वातंत्र्याचे रक्षण करेल. विरुद्धबाजूने कॉपीराईट, गोपनीयता, बदनामी विषयक अथवा अन्य कायद्याने वेगळी केस लावली तर कोर्ट सर्वसामान्यतः सरमिसळ न करता प्रत्येक केसचा निकाल स्वतंत्रपणे देईल. (चुभूदेघे उत्तरदायकत्वास नकार लागू)
समता व बंधुता यांचा शोध न धर्मी राहुनही घेतला जाऊ शकतो यापेक्षा बाबासाहेबांचा अभ्यास नक्कीच खूप अधीक असावा, अनुप ढेरे यांच्या प्रश्नाचे उत्तर या पेक्षा अधीक असण्याची शक्यता आहे. अर्थात (मी जरासा लिहूनही थकलो आहे) हि जबाबदारी मी आता इतर जाणकारांवर सोपवून आजच्या पुरता तरी या चर्चेतून निरोप घेतो.
19 Jul 2015 - 6:25 pm | पैसा
पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका.
19 Jul 2015 - 6:35 pm | माहितगार
:) धन्स
19 Jul 2015 - 6:59 pm | प्यारे१
प्रतिसाद आवडले
पैसा - Sun, 19/07/2015 - 13:55 नवीन
पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका.
ब्वार्र! ;)
21 Jul 2015 - 11:01 pm | विकास
मूळ लेख आवडला.
पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका.
अगदी अगदी. धोतर कितीही आकर्षक वाटले तरी सारखा हात लावू नये! ;)
जोक अपार्टः वर एक मुद्दा आला नाही असे वाचताना वाटले. आला असला पण माझे वाचायचे राहीले असेल तर क्षमस्व. पण, भारतात नागरी (दिवाणी) कायदा हा धर्माधारीत आहे. त्यामुळे तो प्रत्येक प्रमुख धर्मानुसार वेगळा आहे. पण जे भारतीय उपखंडात तयार झालेले धर्म-पंथ आहेत त्या सगळ्यांची संस्कॄती समान असल्याने ते हिंदू बिल मधे समाविष्ट केलेले आहेत. त्यात निधर्मीपण येतात. कारण बर्याच वेळेस निधर्मी असले तरी बाकी सांस्कॄतिक दॄष्ट्या ते हिंदूच असतात. एक केवळ उदाहरणादाखलः कुंकू लावणे हे बर्यापैकी हिंदू सांस्कृतिक लक्षण समजता येईल. आता कम्युनिस्ट वॄंदा कारत या निधर्मी असल्यातरी सध्याच्या "माडर्न" युवतींपेक्षा ठळक कुंकू लावतात. त्या कधी गंमत म्हणून हिजाब अथवा बुरख्यात दिसणार नाहीत... तेच मेधा पाटकरांबाबत पण म्हणता येईल. थोडक्यात हिंदू धर्म हा रहाणीमानाने अनेकदा समान असतो, जरी कुठल्या देवाला पुजता अथवा पुजत नाही, (दुर्दैवाने) जाती (अजूनही) पाळता का पाळत नाहीत तरी देखील... म्हणून ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पार्सी सोडल्यास जर कोणी धर्माने हिंदू, बौध्द, जैन, शिख अथवा निधर्मी असला तरी त्याला दिवाणी कायद्यासाठी हिंदूच मानला जातो.
वास्तवीक सेक्यूलर लोकशाहीत कायदा हा धर्मविरहीत मानला पाहीजे. पण ते आपल्याकडे घडलेले नाही. परीणामी आपण नुसतेच सिक्यूलर होऊन राहीलो आहोत....
20 Jul 2015 - 10:10 am | सुबोध खरे
या साठीच समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे.(कुणाचाही धर्माच्या नावाने सवता सुभा नसावा.)आणि तो गोव्यात आहे.
19 Jul 2015 - 3:44 pm | माहितगार
हा ह्हा आमच्या खालील ध्वज परिणामकारक असल्याची ही पावती का ? (ह. घ्या)
केवळ दादांबाबत नाही तर कोणत्याही डिबेट मध्ये अबकड वादाचे झेंडे घेऊन फिरणार्या मंडळींना स्वतःच्याच वादाची माहिती पुरेशी ठरणारी नसते हेही ठिक; पण कुणी आपल्या भूमिकेस उपयूक्त माहिती देते आहे हेही लक्षात येत नाही; तरी टोकाच्या भूमिका दामटवण्याचा प्रयत्न चालू असतो. असो
19 Jul 2015 - 1:42 pm | माहितगार
दादा तुमच्या कडचे संदर्भ कितीवेळात येतील मैत नाही. पण माझ्या बाजूने पहीला संदर्भ कोर्टात कोणत्याही शपथविधी देवधर्माचे नाव न घेता पार पाडणार्या एका भारतीयाचा वृत्तांत.
19 Jul 2015 - 2:25 pm | dadadarekar
मीही कोर्टात पोस्ट मॉर्टेमच्या साक्षी देताना ' खरे सांगेन खोटे सांगणार नाही ' इतकीच साक्ष दिली होती. कॉणतेही पुस्तक नव्हते.
19 Jul 2015 - 2:27 pm | dadadarekar
..
19 Jul 2015 - 3:03 pm | माहितगार
भारतात तुम्हाला (म्हणजे भारतीयांना) ईश्वर किंवा धर्मग्रंथाच्या नावाने साक्ष घेण्याचे बंधन नाही कारण कोणतातरी धर्म असलाच पाहीजे असे बंधन नाही म्हणूनच तुम्ही (म्हणजे भारतीयांना) ईश्वर अथवा धर्मग्रंथाची सोबत न घेता सुद्धा शपथ घेऊ शकता.
एनी वे मी सप्टेंबर २०१४चा बाँबे हायकोर्टाचा निकाल संदर्भार्थ आता वर दिलाच आहे.
19 Jul 2015 - 11:40 am | सुबोध खरे
https://en.m.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India
हितैस भाउ वाचून घ्याया
19 Jul 2015 - 12:15 pm | मदनबाण
लेख आवडला...
@डॉक...
पाषाणावर अभिषेक ! हे वाक्य / म्हण लक्षात ठेवा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
19 Jul 2015 - 12:28 pm | सुबोध खरे
पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचे का?
19 Jul 2015 - 12:35 pm | मदनबाण
हो... हे सुधा योग्यच आहे !
१० जुलै ला शुक्रवारचा नमाज अदा केल्यावर मुस्लिम बांधवांचे "देशकार्य"
जाता जाता :- 43 British women and girls in Syria, say police
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
19 Jul 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा
असल्या लोकांना रणगाड्यांखाली चिरडले पाहिजे
19 Jul 2015 - 1:18 pm | मदनबाण
असल्या लोकांना रणगाड्यांखाली चिरडले पाहिजे
हॅहॅहॅ... अहो ते आपले काश्मिरी बंधु आहेत ना ? भले त्यांनी पाकिस्तानचे झेंडे,आयसीसचे झेंडे फडकवले तरी चालेल,पण त्यांच्या "भावना" सुद्धा दुखावल्या जाता कामा नये.
बाकी, यासिन मलिक सगळ्यांनाच ठावूक आहे नाही ? तो मुसलमान आहे ना ? दारु तर इस्लाम मधे "हराम" आहे ना ? मुस्लिम स्त्रीयांना उंचा सन्मान मिळतो ना ? मग याच यासिन मलिकचे दारु पिउन चालले उधोग पहा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
19 Jul 2015 - 2:04 pm | नाव आडनाव
पाकिस्तानचे झेंडे फडकावणे (काश्मिर किंवा मिरज दंगलीत), मुंबईतल्या अमर जवान ज्योतीला लाथ मारणे - अश्या लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? त्यात किती शिक्षा असते? कायदा माहित असणार्यांनी कृपया माहिती सांगा.
केंद्रात आणि काश्मिरात भाजपा आहे (खरंतर कॉन्ग्रेस सोडून कोणी पण असेल तर) कारवाई होउ शकते. काँग्रेसला "भावनांची" काळजी असते / असायची, त्यामुळे त्यांनी मुंबईत "एवढा महिना जाउ द्या. नंतर कारवाई करू" असं सांगितलं आणि नंतर त्या कारवाईची कधी बातमी आलीच नाही.
19 Jul 2015 - 7:35 pm | बॅटमॅन
मिरज दंगलीत इस्लामिक धार्मिक झेंडा फडकावला गेला होता, पाकिस्तानी झेंडा नव्हे. दोन्ही झेंडे बरेच सारखे असले तरी पूर्ण सारखे नव्हेत.
जर पाकिस्तानी झेंडा फडकावला गेला असता तर कत्तलीच झाल्या असत्या.
19 Jul 2015 - 8:59 pm | dadadarekar
पण मग इथले भगवे झेंडे माझ्यावर तुटून पडले असते. म्हणून लिवलं नाही. अनुमोदन
19 Jul 2015 - 1:33 pm | संदीप डांगे
मुस्लिम-बॅशींगचा अजून एक धागा.
अ लार्ज कप ऑफ
.
.
.
.
.
पॉपकॉर्न्स प्लीज....
19 Jul 2015 - 9:27 pm | नमकिन
शिवाजी कोण होता या पुस्तिकेत कॅा. गोविन्द पानसरे यांचा रोख व बाबासाहेबांचा विचार भिन्न दिसला.
पानसरे म्हणतात धर्म दुय्यम तर राज्य /सत्ता प्रथम.
21 Jul 2015 - 4:19 pm | अमोल मेंढे
आपण डॉ. अभिराम दिक्षीत असाल तर आनंद आहे.. अन्यथा हा लेख डॉ. अभिराम दिक्षीत यांच्या ब्लॉगवरून ढापलेला आहे असे म्हणावे लागेल.ही लींक बघा