काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता. तो कधी गुडघ्यापर्यंत जात होता तर कधी तिच्यापर्यंत पोहचतच नव्हता. सुरवातीला ते एकाच जागी उभे होते. नंतर लाटेचा अंदाज बांधून मागे पुढे करीत होते कधी वेगात पुढे पळत होते तर कधी मागे जात होते. इतके करुनही जर फोटो काढला तर तो हवा तसा येत नव्हता. त्याचा हा प्रकार बघून बघनाऱ्यांचे छान मनोरंजन होत होते. सुरवातीला नवऱ्याला उत्साहाने मदत करनाऱ्या तिला नंतर मात्र कंटाळा यायला लागला. अंधार झाला पण शेवटपर्यंत हवा तसा फोटो आला नाही. निराश होउन ते निघून गेले पण त्याने त्या फोटोसाठी केलेला तो आटापिटा मात्र कायम लक्षात राहीला.
(कवि अनिल यांची माफी मागून)
कुणि जाल का, थांबवाल का, आटवाल का ह्या सागरा
रात्री तरी धावू नकोस, सतावू नको ह्या प्रियकरा
आधीच संध्याकाळची पायपीट आहे लांबली
परत आता उभे राहूनी गात्रे माझी कावली
त्या रातीला दिला तो हार कधीचा वाळला
फोटोतच मधुचंद्राचा चौथा दिन मी मोजीला
समजावूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
करता काय कपाळकरंटे हे योग असे जुळले
सांगाल का त्या सागरा, की लाट आहे वाढली
अशी उभीच इथे मी, फुका रात्र जागून काढली
मित्रहो
www.mitraho.wordpress.com
प्रतिक्रिया
20 May 2015 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी
पुन्हा सवडीने वाचतोच. तोवर असेच शीर्षक असलेल्या पूर्वीच्या धाग्यांचे दुवे देतो.
20 May 2015 - 9:22 pm | पैसा
मस्त आहे!
20 May 2015 - 9:47 pm | अर्व
=)
21 May 2015 - 7:24 am | दमामि
बाकी आजकाल कोकिळा रात्री खरेच उच्छद मांडतात !
21 May 2015 - 4:41 pm | गणेशा
कविता छान आहे..