इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला.
त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे. युनिव्हर्सिटी, कॉलेजं इत्यादी होती, पण तुरळकच. ज्योर्दानोचे विचार प्रस्थापित विचारांच्या विरोधात होते. त्याचा विश्वास होता की आकाशात दिसणारे तारे हे सूर्याप्रमाणेच आहेत, पण लांबवर आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपल्या ग्रहाप्रमाणेच इतर अनेक अनंत विश्वं आहेत. हे विचार आणि मेरीचं अनाघ्रातपण, जीजस, ट्रिनिटी या व इतर ख्रिश्चन कल्पनांच्या विरोधात मतं व्यक्त करणं आणि विश्वाविषयी असल्या कल्पना बाळगणं यापायी रोमन इन्क्विझिशनने त्याला 'हेरेटिक' (प्रस्थापित कल्पनांपेक्षा वेगळा विचार बाळगणारा) ठरवलं. त्याला त्याचे शब्द जाहीरपणे मागे घेण्याची संधी दिली गेली. पण त्याने ती नाकारली व आपल्या वेगळ्या विचारांवर शिक्कामोर्तब केलं. या गुन्ह्याबद्दल अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूदंडाची सोय होती. पण बर्निंग अॅट स्टेक किंवा खांबाला बांधून जाळणं ही शिक्षा विशेष लोकप्रिय होती. ती त्याला मिळाली.
गॅलिलिओ गॅलिलिइलादेखील 1635 मध्ये याच रोमन इन्क्विझिशनचा असाच अनुभव आला. गॅलिलिओ आणि ज्योर्दानो यांच्यात तशी बरीच साम्यं आहेत. दोघांनाही सुरूवातीला त्यांच्या कर्तृत्वामुळे उच्च स्थानावरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. दोघांनाही अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची हौस होती. गॅलिलिओ त्याच्यापेक्षा थोडा लहान असला तरीही त्यांचा कर्तृत्वाच्या काळात थोडा ओव्हरलॅप आहे. 1591 साली ज्योर्दानोला ज्या गणित विभागाचं चेअरमनपद हवं होतं ते त्याला मिळालं नाही, तर पुढच्या वर्षी गॅलिलिओची त्या पदासाठी निवड झाली. काळ, परिस्थिती आणि विचारपद्धती सारखी असली तरी त्यांच्या स्वभावात फरक होता असं म्हणता येईल. ज्योर्दानो परखड आणि फटकळ म्हणून प्रसिद्ध होता. तर गॅलिलिओ जाहीरपणे तरी विशिष्ट मर्यादा राखून होता. मात्र गॅलिलिओलादेखील पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्याबद्दल इन्क्विझिशनकडून बोलावणं आलं. त्याने मात्र शहाणपणा करून आपली विधानं मागे घेण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणून त्यांनी दयाळूपणा दाखवून फक्त त्याच्या सर्व (आजवरच्या आणि आगामी) पुस्तकांवर बंदी घातली. आणि गॅलिलिओला नजरकैदेची अत्यंत मवाळ शिक्षा दिली.
या पार्श्वभूमीवर आजच्या काळातली एक घटना उठून दिसते - 2008 सालची. रिचर्ड लेन्स्की नावाच्या जीवशास्त्रज्ञाने त्याआधीची वीस वर्षं एक प्रयोग चालू ठेवला होता. या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रयोगशाळेत उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पहाणं. यात त्याला घवघवीत यश आलं. हे पाहून बायबलच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवणारांना राग आला. याचं कारण उघड आहे. जगन्निर्माता, जगन्नियंता अशी देवाची प्रतिमा आहे. पृथ्वी हा सामान्य ग्रह आहे, तो सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणाने फिरतो हे एव्हाना सर्वमान्य झाल्यामुळे देवाने त्यात काही विशेष केलं नाही हे मान्य करावं लागलं होतं. मात्र सजीवांची निर्मिती आणि त्यांच्यात होणारे बदल हेही आपोआप होतात हे मान्य झालं तर देवाचं उरलंसुरलं कर्तृत्वही नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे येनकेनप्रकारेण या प्रयोगाच्या निष्कर्षाला बट्टा लावण्याचा प्रयत्न श्लाफ्ली नावाच्या गृहस्थाने केला. हा माणूस होता एक वकील. त्याने या प्रयोगात खोडा घालण्यासाठी त्याच्या खास वकिली खाशाने लेन्स्कीकडे या सर्व प्रयोगाचा विदा मागितला. लेन्स्कीने प्रथम त्याचं अज्ञान दाखवून नम्रपणे 'आधी आमचे पेपर नीट वाचा' अशी सूचना केली. तरीही श्लाफ्लीने बेमुर्वतखोरपणे दुसरं पत्र लिहून 'आम्हाला विदा तपासून बघण्याचा कायदेशीर अधिकार आहे, तेव्हा तुम्ही हा विदा आम्हाला दिलाच पाहिजे' असं म्हटलं. मग लेन्स्कीने त्याला पुढच्या पत्रात म्हटलं 'माझा विदा फुटकळ निरीक्षणात नाही, आमच्याकडे असलेल्या सॅंपल्समध्ये आहे. ती तुम्हाला मी जरूर पाठवेन. पण तुम्हाला ती हाताळता येणार आहेत का?' हे मी फारच त्रोटकपणे लिहिलेलं आहे. संपूर्ण कथा फारच रंजक आहे. मुद्दा असा आहे की हे वाचून बावचळलेला श्लाफ्ली पुन्हा उत्तर देण्याच्या फंदात पडला नाही.
आता पावणेचारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा लेन्स्की आणि श्लाफ्ली यांच्यात घडलेल्या पत्रव्यवहाराशी काय संबंध? गॅलिलिओ आणि ज्योर्दानो दोघेही भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते, लेन्स्की जीवशास्त्राचा. श्लाफ्लीने लेन्स्कीकडे पुरावे मागितले तर रोमन चर्चतर्फे त्या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांना शिक्षा देण्याची शक्ती रोमन इन्क्विझिटर्सकडे होती, तर श्लाफ्लीकडे तसे काही व्यापक अधिकार नव्हते. वरवर बघता फरकच जास्त दिसतात. आणि हे फरकच खरे तर महत्त्वाचे आहेत.
भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र असो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा दावा असो की उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पाहिली असं म्हणणं असो - दोन्हीची जातकुळी काही महत्त्वाच्या पातळींवर सारखी आहे. ज्योर्दानोचे विचार आणि लेन्स्कीचे निष्कर्ष हे दोन्ही, जग कसं चालतं याबाबतच्या निरीक्षणांतून आलेले होते. दोघेही विज्ञानवादी दृष्टिकोनातून जे सत्य गवसलं आहे ते जगापुढे मांडत होते. याउलट विचारसरणी म्हणजे आंधळ्या विश्वासाची. रोमन इन्क्विझिटर्स आणि श्लाफ्लीची. बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ज्ञान आणि बाकीचं सगळं पाखंड ही आंधळी विचारसरणी दोन्हीतही दिसते. एका अर्थाने हा विचारसरणींमधला लढा आहे. श्रद्धा विरुद्ध विज्ञानामधला लढा. निरीक्षणांमधून दिसणारं ते सत्य मानणारे आणि पुराणपुस्तकात लिहिलेलं, ते देवाने सांगितलेलं आहे म्हणून सत्य मानणारे यांच्यातला झगडा. हा शतकानुशतकं चालू आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरूवातीला हा लढा देणाऱ्यातले ज्योर्दानो आणि गॅलिलिओ. त्यांच्यानंतर चारशे वर्षांनी तीच जागा लेन्स्कीने घेतलेली आहे.
या चारशे वर्षांत या लढ्याच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेला दिसतो. ज्योर्दानोच्या काळात बायबलची शक्ती महाकाय होती. नवीन विचार मांडणं हे धोकादायक काम होतं. गॅलिलिओ, ज्योर्दानो या दोघांनाही आपल्या विचारांतून बायबलच्या सत्यांना धक्का लागत नाही असं त्यांच्या विचारांबरोबरच सांगण्याची जबाबदारी होती. पण एका विशिष्ट मर्यादेबाहेर कोणी बायबलविरुद्ध बोललं तर चर्च ते खपवून घेत नसे. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात अशा पाखंड्यांना खेचून त्यांना शिक्षा देत असे. बायबलमध्ये सांगितलेलं 'सत्य' प्रस्थापित होतं. सर्वांचा त्यावर विश्वास असो नसो, विरुद्ध विचार हे तणांप्रमाणे निपटून काढले जायचे. त्यामुळे तेच प्रस्थापित सत्य अजूनही पुढे प्रस्थापित राहील अशी काळजी घेतली जात होती. याचं कारण उघड आहे. या विचारांना उचलून धरण्याचं, जनतेत पसरवण्याचं कार्य करणाऱ्या धर्मसंस्थेला प्रचंड शक्ती प्राप्त होत होती. राज्यसत्तेतला काही हिस्सा धर्मसंस्थेच्या पुढाऱ्यांना मिळायचा. आर्थिक फायदाही प्रचंड होता. या सगळ्याचा पाया होता तो म्हणजे सामान्य जनतेत पसरलेले विशिष्ट विचार - देवाने या विश्वाची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली, प्राण्यांची निर्मिती केली. तो सर्वशक्तिमान आहे. आणि त्याच्याशी बोलायचं असेल तर ते आमच्यामार्फतच बोललं पाहिजे. या बोलण्याच्या अधिकारासाठी जो पैसा लागतो तो जनतेकडून, श्रीमंतांकडून उकळून घेण्याचा अधिकार धर्मसत्तेकडे आला. त्यामुळे हे सगळं खोटं आहे, खरं नाही असं सांगणारांकडून या संस्थेच्या पायावरच हल्ला होत होता. आणि तो धोका निवारण्यासाठी जागोजागी इन्क्विझिशनची क्रूर व्यवस्था निर्माण झाली होती.
याच संस्था अजूनही बदललेल्या स्वरूपात दिसतात. पण त्यांच्या शक्तीत प्रचंड फरक पडलेला आहे. गॅलिलिओच्या काळात धर्मसंस्था ही एखाद्या महाबलाढ्य किल्ल्याप्रमाणे होती. आणि तीवर एखाद दुसरा शास्त्रज्ञ आपल्या विचारांच्या घोड्यावर बसून हल्ला करत असे. त्या किल्ल्याच्या फार जवळ यायला लागला तर तोफा डागून त्याचा खात्मा सहज केला जायचा. किंवा अगदीच ठार मारायचं नसेल तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला नामोहरम केलं जायचं. पण ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. लवकरच पाश्चिमात्य राष्ट्रांत चर्चचा पगडा कमी व्हायला लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं. इन्क्विझिशनचे सर्व अधिकार आपोआप कमी होत जात एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला या संस्था संपुष्टात आल्या. रोमन इन्क्विझिशन ही संस्था तत्वतः जिवंत आहे, पण 'कॉंग्रेगेशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ फेथ' या गुळमुळीत नावाखाली. अर्थातच त्यांना कोणाला चौकशीसाठी बोलवण्याचे अधिकार नसावेत. असल्यास गेल्या कित्येक दशकांमध्ये ते वापरले गेलेले नाहीत. त्यांनी सुनवलेल्या शिक्षा सरकारं अमलात आणतील याची शक्यता शून्य आहे.
आता वैज्ञानिकांना रास्त संरक्षण आहे. जगभर असलेल्या सेक्युलर सरकारांनी कायद्याचा भरभक्कम पाठिंबा वैज्ञानिक पद्धतींना दिलेला आहे. जगभर - किमान जिथे धार्मिक राज्यकर्ते नाहीत तिथे - प्रमाण सत्य म्हणून वैज्ञानिक पद्धतींनी शोधून काढलेलं सत्य शाळांमध्ये शिकवलं जातं. न्यायपद्धतीत वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरले जातात. श्लाफ्लीची इन्क्विझिशन मनोवृत्ती असणाऱ्यांना लेन्स्कीच्या वैज्ञानिक विचारांचं तोंड बंद करण्याची शक्ती नाही. फारतर थोडाफार उपद्रव देण्याची क्षमता आहे. उलट लेन्स्कीसारख्या मान्यवर शास्त्रज्ञांना कायद्याचं संरक्षण आहे. त्याच्या शेवटच्या पत्रात जी अरेरावीची भूमिका लेन्स्कीला घेता आली ती या सुरक्षिततेच्या भावनेतूनच. रोमन इन्क्विझिशनला ज्योर्दानोने अत्यंत कळकळीने 'माझं सत्य बायबलला विसंगत नाही' असं सांगण्याचा प्रयत्न केला, करावा लागला. आजच्या काळात श्लाफ्लीसारख्यांकडून पाखंड्यांना शिक्षा देण्याचा अधिकारच काढून घेतला गेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही, यावर तर आता चर्चाही होत नाही, इतकं ते सत्य प्रस्थापित झालेलं आहे. लेन्स्कीकडे सत्य होतं, आणि बायबलच सत्य मानणाऱ्यांच्या तोंडावर ते फेकून मारून तो त्यांचा पराभव करू शकला. ज्योर्दानो किंवा गॅलिलिओला ते करणं शक्य नव्हतं.
लेन्स्कीच्या सत्याचा विजय हा व्यापक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय आहे. हे युद्ध गेली अनेक शतकं चालू होतं. त्यात अनेकांचे बळी पडले. 1540 ते 1794 या कालखंडात लिस्बन, पोर्टो, कोइंब्रा आणि एव्होरा इथल्या स्पॅनिश इन्क्विझिटर्सनी 1175 लोकांना जाळून मारलं. जाळून मारण्यासाठी अर्थातच जे अपराध कबूल करून घेतले जात ते त्या व्यक्तीने कबूल करावे म्हणून महाभयंकर छळ करणारी सामुग्री मुक्तहस्ताने वापरली. हे फक्त चार शहरांमध्ये. संपूर्ण युरोपभर आणि त्यांच्या वसाहतीत कमी अधिक प्रमाणात त्या काळी असले प्रकार चालू होते. पण तरीही यथावकाश जनसामान्यांमध्ये हे आधुनिक ज्ञानाचे विचार मुरले. ज्ञान पसरलं. आणि ते इतकं फैलावलं की शेवटी पाखंडाला अशी शिक्षा करण्याचा प्रयत्नच सामान्य जनतेला खटकायला लागला. आणि चर्चला हे प्रकार गुंडाळून ठेवावे लागले. चर्चचा ज्ञानावरचा पगडा नष्ट झालेला आहे. बायबलमधलं ज्ञान हेच सर्वोच्च या भूमिकेचा किल्ला ढासळून पडला आहे.
मर्ढेकरांनी म्हटलेलं आहे -
या जगण्यातुन या मरणांतुन
हसण्यातुन अन् रडण्यातुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या
अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल.
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे. हळूहळू पेटणाऱ्या ठिणग्यांनी, एकमेकांना भेटून पेटणाऱ्या ज्योतींनी, अंधाराच्या इतिहासावर मिळवलेला!
प्रतिक्रिया
24 May 2013 - 9:24 am | मूकवाचक
+१
26 May 2013 - 2:47 pm | संजय क्षीरसागर
सत्याची व्याख्या अध्यात्मिक भाषेत : अॅबसल्यूट : समथींग दॅट डजंट चेंज अशी आहे.
तुमच्या सत्याच्या व्याख्याचा अर्थ : रिअॅलिटी किंवा वास्तविकता असा आहे (उदा. या लेखात - पृथ्वी सूर्याभोवती फिरते).
तुमच्या लेखाचा निष्कर्श पुन्हा पाहा :
बायबल हा धर्मग्रंथ आहे. खगोलशास्त्राचा काही भाग त्याला जोडला होता, तो अर्थात विज्ञानानं चूक ठरवला आहे. पण बायबलचा उद्देश वैज्ञानिक तथ्यांचा उहापोह नाही तर सत्याचा (अबसल्यूट) उलगडा करणं आहे.
माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञानाच्या आजच्या प्रगल्भ अवस्थेत देखील `बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही. आणि पुढेही देऊ शकणार नाही कारण विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करणारं शास्त्र आहे आणि धर्म सत्याचा उलगडा करणारं.
26 May 2013 - 4:52 pm | प्यारे१
(१८ मे ला एका वेगळ्या संदर्भात मोदकला लिहीलेली खरड इथे शब्दशः लागू होत असल्यानं टाकतोय.)
अध्यात्मातल्या काही शब्दांचा इतका सुमारपणे वापर होतो की त्याचा खरा अर्थ लागत नाही, लागला तर त्याचा विपरीत उपयोग होतो.
उदा: अपरोक्ष म्हणजे साक्षात. अ- परोक्ष डोळ्यांच्या पलिकडे नाही असे ते. आपण एक्क्झॅक्ट उलटा अर्थ अपरोक्ष म्हणजे माझ्या मागे असा काढतो.
तसेच सत्य म्हणजे जे आहे, आहे नि आहे असे ते. त्रिकालाबाधित असे ते. असं काही असतं का? तर असतं.
मिथ्या म्हणजे आज आहे, पूर्वी आज आहे तसं नव्हतं अथवा अजिबातच नव्हतं उद्या कसं असेल ते ठाऊक नाही.
******************************
बाकी उडालेला प्रतिसाद वाचला होता. त्यामध्ये लेखकाच्या स्वतःला हवे त्या प्रकारे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी आणू पाहणार्या एका तालिबानी विचारसरणीच्या प्रतिसादक आयडी पासून घासकडवींनी स्वतःचे संरक्षण करु शकण्याच्या शक्यतेबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा माझा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ पाहत आहात का?
बाकी धर्म न मानणे हा एक प्रकारे धर्म बनू पाहतो. धर्मसंस्थेबद्दल केलं गेलेलं लिखाण हेच बायबल बनू पाहतं, प्रयोगशाळा प्रार्थनास्थळं नि विज्ञान हा मंत्र बनतो तेव्हा धर्म मानणार्या नि न मानणार्यामध्ये नक्की काय फरक राहतो असं वरच्या वाक्यात म्हणायचं होतं.
घासकडवींसाठी सत्यान्वेषण करायला व्यक्तीगत अनुभव कुचकामी आहेत.
स्ट्रॉबेरी ज्यूस / पेढा कसा होता? 'छान होता' असं म्हणताना म्हणजे नेमकं काय? याचं स्पष्टीकरण कुणी देऊ शकत नाही. त्याचा अनुभवच घेतला गेला पाहिजे.
अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणता ना व्यक्तीचं शरीर हीच प्रयोगशाळा असते. इंद्रियांच्या पलिकडं असलेलं काही असतं ह्याचा नकार देताना वरच्या पेढ्याच्या अनुभवानं मिळणारं सुख हे अत्यंत वैयक्तिक असतं म्हणून नाकारावं का ?
ह्याचं उत्तर नाकारावं असं असेल तर पुढची चर्चा करुन उपयोग होत नाही.
विज्ञान म्हणतं दाखवा. अध्यात्म म्हणतं अनुभवा.
असो.
बाकी नंतर. :)
26 May 2013 - 7:07 pm | अर्धवटराव
बहुत प्यारी बात कहि है प्यारेजी
अर्धवटराव
26 May 2013 - 7:05 pm | अर्धवटराव
26 May 2013 - 7:41 pm | कवितानागेश
कोण जिंकतय शेवटी? श्रद्धा की विज्ञान की सत्य की घासूगुर्जी? ;)
26 May 2013 - 8:12 pm | राजेश घासकडवी
पुन्हा सांगतो, एकतरी उदाहरण द्या राव. हे विधान नुसतंच विधान आहे - अगदी अॅब्सोल्यूट सत्य असल्याच्या थाटात ते वावरत. तुम्ही सुरूवातीला 'विज्ञान धारणा बदलू शकणार नाही म्हटलं'. मी त्या विपरित उदाहरणं दिली. मग तुम्ही 'बायबल मोडीत निघणार नाही' म्हटलं. मी मोडीत निघण्याची व्याख्या विचारली. तुम्ही सांगितली नाही. पुन्हा तेच वाक्य लिहिलंत. मग मी बायबलमधल्या एकतरी परिच्छेद दाखवा म्हणालो. आता तुम्ही म्हणता की 'बायबलचा मार्ग योग्य आहे ही लोकांच्या मनातली धारणा बदलू शकणार नाही' हे वाक्य अधिक स्पष्ट आहे, सुरूवातीलाच लिहिलं असतं तर चर्चा इतकी आडवळणांनी गेली नसती. तरीही या वाक्याला आधार काय? बायबलने सांगितलेला मार्ग नक्की कुठचा - जो बदलणं शक्य नाही? याबद्दल जर दोन शब्द लिहिलेत तर बरं होईल. नाहीतर चर्चा करण्यात काय अर्थ? नुसते शब्दांचे विशविशीत ढग तयार होतात.
प्रार्थनास्थळं? अहो, प्रयोगशाळा या प्रार्थनास्थळांच्या बरोब्बर उलट्या असतात. प्रत्येकाला तिथे जाऊन, नवीन प्रयोग करून ज्ञानात भर टाकण्याची, चुकीचे विचार निपटून टाकण्याची मुभा असते. प्रार्थनास्थळात 'प्रश्न विचारणं सोडा, आणि या देवाची प्रार्थना करा' अशी अपेक्षा असते. प्रार्थनास्थळाचं - चर्चचं - इन्स्टिट्यूशनलायझेशन झाल्यावर ज्ञानाचा प्रवाह गोठला. बायबल सांगतं पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, मग ते तसंच असलं पाहिजे - जो कोणी विपरित सांगेल त्याचा मुडदा पाडा, त्याला जाळून टाका - ही पद्धत आली. हे अढळपद जाऊन सत्यशोधनाला, प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे विचार मांडण्याला संरक्षण आणि सन्मान प्राप्त झाला - हाच सत्याचा विजय.
इतिहासाने जर काही शिकवलेलं असेल तर हे की 'ज्या विचाराने म्हटलं की संपूर्ण सत्य गवसलेलं आहे, त्यामुळे ते बदलणं शक्य नाही, आणि ते शोधण्याचा मार्ग आमच्या प्रांतातून जातो - तो विचार अप्रवाही आणि म्हणूनच मृत डबक्यासारखा ठरतो.'
27 May 2013 - 12:44 am | संजय क्षीरसागर
पुढे जे लिहीलंय ते तितकंच महत्त्वाचंय.
त्यामुळे विज्ञान आणि धर्म अशी तुलनाच अयोग्य आहे. विज्ञान माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भ्रम दूर करू शकत नाही. मानशास्त्र ही जरी विज्ञानाची शाखा मानली तरी तो विषय मानसशास्त्राचा नसून अध्यात्माचा आहे. मानसशास्त्र व्यक्तिमत्वाची घडण आणि तिचं करेक्शन करण्याचा प्रयत्न आहे तर अध्यात्म व्यक्तिमत्वापासनं मुक्ती देतं.
क्रिस्टशिअॅनिटी मधे दोन अत्यंत महत्त्वाच्या अध्यात्मिक प्रक्रिया आहेत : एक : कन्फेशन (ज्यात व्यक्तिमत्वावरचं संपूर्ण भूतकाळाचं ओझं दूर करण्याची किमया आहे) आणि दोन : सर्विस (यामुळे तुम्ही स्वतःच्या कोषातून बाहेर येता आणि अस्तित्वाशी आपल्या संलग्नतेची तुम्हाला जाणिव निर्माण होऊ शकते)
या दोन्हीही प्रक्रिया अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहेत आणि त्या वैज्ञानिक कक्षेच्या संपूर्णपणे बाहेर आहेत.
तस्मात, बायबलची बेसिक शिकवण, त्यात सांगितलेल्या या दोन महत्वाच्या प्रक्रिया कधीही बाद ठरू शकत नाहीत.
27 May 2013 - 5:49 am | राजेश घासकडवी
पुन्हा नवीन काहीतरी शब्द, व्याख्येशिवाय.
कन्फेशन मित्राकडे किंवा सायकीअॅट्रिस्टकडे करून तोच फायदा होत नाही का? त्यासाठी ही विचित्र संस्था का आवश्यक आहे? आणि सर्विसचं म्हटलं बायबलमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा पुन्हा पुन्हा घोळवून त्यातून हवा तो अर्थ सांगण्याची प्रक्रिया आहे.
बरं, या इतक्या फायदेशीर गोष्टी आहेत, तर मग लोकं चर्चमध्ये जायची कमी का झालेली आहेत?
इथे लिहिलेलं आहे -
"In 1990, 20.4% of the population attended an Orthodox Christian church on any given weekend. In 2000, that percentage dropped to 18.7% and to 17.7% by 2004."
मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे 'होऊ नये' असं वाटतं आहे (बायबलचा पगडा कमी होणं) ते फक्त तुम्ही 'कधीच होणार नाही' अशा स्वरूपात सांगत आहात. याला विशफुल थिंकिंग म्हणतात. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या.
27 May 2013 - 9:14 am | संजय क्षीरसागर
ते समजत नाहीये.
बायबलचा पगडा कमी होऊ नये असं मला वाटत नाही. संपूर्ण मानवता निधर्मी व्हावी असं वाटतं पण तो वेगळा विषय आहे.
कन्फेशन हा सायकिअॅट्रीचा विषय नाही. तुम्हाला `व्यक्तिमत्व' म्हणजे काय हेच कळत नाही तर त्यापासनं मुक्ती कळणं शक्य नाही.
कारण कन्फेशन, सर्विस यानंतरची शेवटची पायरी `दाय विल बी डन' ही आहे. मी त्याविषयी लिहीलं की तुम्ही पुन्हा संपूर्ण समर्पण म्हणजे काय? विचारणार.
असो, एक ज्योक सांगतो त्यानं उलगडा झाला तर पाहा :
एक शिक्षिका वर्गात सांगते की मानवी जीवनात क्रांती घडवणार्या न्यूटनच्या एका शोधाबद्दल आज आपण शिकणार आहोत. नंतर ती झाडावरचं सफरचंद खाली पडतांना पाहून गुरूत्वाकर्षणाचा शोध कसा लागला ते सांगते. मागच्या बाकावरचा एक मुलगा हात वर करतो.
काय? शिक्षिका विचारते.
`मॅम, गुरूत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंद खालून वर जात होती का?'
आय होप यू विल गेट द पॉइंट.
विज्ञान `वास्तविकतेचा' उलगडा करतं. पण तुम्हाला वास्तविकता आणि सत्य यातलाच फरक कळत नाहीये आणि अशा परिस्थितीत तुम्ही `मी बायबलचा पगडा कमी होणार नाही म्हणतोय' असा निष्कर्ष काढला आहे.
आणि खरी कमाल तर त्याही पुढे केली आहे. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या' असं मला सांगताय!
सत्याची व्याख्या मी सुरूवातीलाच सांगितली आहे आणि ते न कळता तुम्ही वास्तविकतेला `सत्य' समजता आहात.
विज्ञानानं विमानाचा शोध लावून `गुरूत्वाकर्षणावर विजय मिळवला' असं वाटू शकतं. पण निसर्गानं तयार केलेलं इंधन वापरून विमान उडतं आहे आणि ज्या क्षणी इंधन संपेल तेंव्हा विमान खाली येईल ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ विमान व्यर्थ आहे असा नाही तर ते गुरूत्वाकर्षण या अनिर्मित शक्तीच्या परिघातंच काम करतंय.
या आणि अशा अनेक अनिर्मित निसर्गानियमांवर विजय मिळवणं असा विज्ञानाचा अर्थ नाही जो तुम्ही तुमच्या आकलनानुसार शीर्षकापासून सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा मांडायचा प्रयत्न करत आहात.
`दाय वील बी डन' चा अर्थ या अनाकलनीय, गूढ आणि रम्य अस्तित्वाप्रती संपूर्ण शरणांगती कारण वैज्ञानिक कल्पना सुचणं हे सुद्धा त्या अस्तित्वाचंच कार्य आहे. आणि त्या कल्पनांची परिपूर्ती ही सुद्धा अस्तित्वाच्याच आधिन आहे. अर्थात तुमच्या निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीतून इतकं समग्र आकलन होणं अशक्य आहे.
27 May 2013 - 5:02 pm | राजेश घासकडवी
विज्ञान विरुद्ध श्रद्धा या लढाईत, कुठेच विज्ञानाने निसर्गावर विजय मिळवला असं म्हटलेलं नाही. या लेखाचा मतितार्थ - श्रद्धा दुसऱ्यांवर लादण्यामुळे जी सत्याची हानि होत होती ती थांबलेली आहे - असा आहे.
हे गूढरम्य अस्तित्व काय प्रकरण आहे? अहो, माणूस तयार झाला उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून. त्याचा मेंदू आणि विचारशक्तीही त्याच प्रक्रियेतून तयार झाली. मग कुठेच नसलेल्या गूढरम्य अस्तित्वाला शरण जाणं वगैरे भंपकपणाच ठरतो.
तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत - कन्फेशन आणि सर्विस हे इतकं भारी प्रकरण आहे की ज्यामुळे बायबलवरची श्रद्धा कधीच नष्ट होणार नाही असं म्हणता, तर चर्चला जाणारे लोक कमी का होत आहेत? (खाली ब्रिटनचा विदा दिलेला आहे) 'बायबल कधीच मोडीत निघणार नाही' असं तुम्ही म्हणत आहात त्याच्या बरोब्बर उलटं घडताना दिसतं आहे म्हणजे तुमचं विधान चुकीचं नाही का? की काहीही विदा असला तरी ते विधान सत्य? आपण या विधानाबद्दलची चर्चा पूर्ण करू, मग पुढे सरकू.
![ब्रिटनमधील चर्चमध्ये जाण्याचं प्रमाण](http://www.powerlineblog.com/admin/ed-assets/2011/12/ChurchAttendanceTrends066.jpg)
27 May 2013 - 8:14 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला सत्य म्हणजे वास्तविकता वाटते आहे (यू आर इक्वेटींग फॅक्ट ऑर रिअॅलिटी विथ `दि अॅबसल्यूट'). हा तुमचा मानासिक गोंधळ संपेपर्यंत चर्चा होते कुठे आहे?
आहो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वास्तविकता आहे (आणि ती विज्ञानानं सिद्ध केली आहे) पण म्हणून :
म्हणजे लोकांचा बायबलवरचा विश्वास उडाला असा होत नाही.
तुम्ही चर्चगोईंग पीपलचा डेटा सारखासारखा पुढे करता आहात. त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की हल्ली लोकांचं चर्चमधे जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
जर लोकांना बायबल खोटं आहे असं वाटलं असतं तर लोकांनी क्रिस्टशियन धर्म सोडला असता.
मी म्हटलंय तसंच पुन्हापुन्हा होतंय, तुम्ही समग्रतेनं विचार करण्याऐवजी निव्वळ डेटाफेक करता आहात, कसं ते पाहा:
तुमचा श्वास चालू आहे हे गूढ नाही? नुसत्या श्वासाच्या सुरू राहण्यामागे सूर्याचं प्रकाशमान असणं, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, असंख्य ग्रहतार्यांचं एकमेकांना न धडकता वेगवेगळ्या कक्षेतून फिरणं, पृथ्वीवरची झाडं, त्यांच्यात आणि माणसात चाललेला कार्बनडायॉक्साईड आणि प्राणवायुचा एक्सचेंज, इथल्या नद्या, समुद्र.. अश्या असंख्य गोष्टी एकावेळी कारणीभूत आहेत. हा श्वास केव्हाही बंद पडू शकतो आणि तो चालू राहील हे केवळ गृहित आहे त्याला काहीही आधार नाही.
अर्थात तुम्हाला इतकं समग्र आकलन जमणार नाही.
तुम्ही पहिल्यांदा वास्तविकता (रिअॅलिटी) आणि सत्य (अॅबसल्यूट) यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. सत्याची हानि कधीही होत नाही कारण सत्याचा अर्थच `समथींग दॅट दजंट चेंज असा आहे' आणि तो विज्ञानाचा विषयच नाही.
विज्ञानाची कक्षा वास्तविकतेपुरती मर्यादित आहे आणि विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करत राहिल त्यानं सत्याला काहीही बाधा येत नाही.
तुमचे फंडाच क्लिअर नाहीत त्यामुळे या विषयावर चर्चा माझ्याकडून थांबवतो.
28 May 2013 - 11:51 pm | धन्या
:)
29 May 2013 - 12:21 am | संजय क्षीरसागर
अर्थात मला ही प्रतिसाद पूर्ण करायचा होता. तो या निमित्तानं करतो.
एकदा स्वतःच्या श्वासावरच नियंत्रण नाही म्हटल्यावर अस्तित्वाची गूढ रम्यता कळते. आपल्या हातात फार किरकोळ गोष्टी आहेत हे लक्षात येतं. हे अफाट विश्व चालवणार्या युनिवर्सल इंटेलिजन्स पुढे आपली बुद्धीमत्ता ती काय हा उलगडा होतो. आपण अस्तित्वाप्रती कृतज्ञ होतो, शरणांगत होतो. आणि असा शरणांगत माणूस अनाहूतपणे म्हणतो : दाय विल बी डन! .... दॅट इज बायबल.
29 May 2013 - 12:48 am | धन्या
माणूस ही निसर्गाचीच निर्मिती असून एकंदरीत निसर्गापुढे मानव खुपच छोटा आहे यात शंकाच नाही. निसर्गाची ताकद अफाट आहे. पण तुम्ही म्हणताय तसं "युनिवर्सल इंटेलिजन्स" विश्व चालवणारं काहीतरी अस्तित्वात असेल असं वाटत नाही.
दिवसाला हजारो लोक अपघातांमध्ये, युद्धांमध्ये, नैसर्गिक आपत्तींमध्ये मरत आहेत. गुन्हे घडत आहेत, बलात्कार होत आहेत, गोरगरीबांना नाडलं जात आहे. हेच का युनिवर्सल इंटेलिजन्सचं विश्व चालवणं?
भरल्या पोटी तत्वज्ञानाच्या गप्पा मी मारु शकतो, तुम्ही मारु शकता. अन्नासाठी, पाण्यासाठी दाही दिशा वणवण फीरणारा नक्कीच तुम्ही म्हणताय त्या अस्तित्वाप्रती कृतज्ञ, शरणांगत होऊन "दाय विल बी डन" म्हणणार नाही.
29 May 2013 - 1:56 am | अर्धवटराव
>>दिवसाला हजारो लोक..."दाय विल बी डन" म्हणणार नाही.
-- या न्यायाने तिजोर्या आणि पोटं तुडुंब भरलेल्या लोकांनी "दाय विल बी डन" असं मनापासुन, उच्चरवाने म्हणायला हवे. पण त्यांची भूक कुपोषणाने मरणार्या सोमालीयन बालकांपेक्षाही जास्त वखवखलेली असते. मानव निर्मीत प्रॉब्लेम्स, जसं युद्ध वगैरे, वा नैसर्गीक आपत्तींचं थैमान अत्यंत विनाशकारी, दु:खदायक असतं यात शंकाच नाहि. एव्हढच नव्हे... तर काहि लाख वर्षांपुर्वी या पृथ्वीवर मानवच अस्तित्वात नव्हता. आणखी काहि लाख वर्षांनी पृथ्वी परत निर्मानव होऊन जाईल(पृथ्वीवर एखादा ग्रह आदळेल काय ह विचारच नाहिए... तो कधी आदळेल याचीच वाट बघणं सुरु आहे) थोडक्यात काय, तर मानवी सुख दु:खाच्या परिपेक्षेने सृष्टीचा कारभार चालत नाहि. तो कसा चालतो याचं थोडंफार आकलन मानवाला निश्चित करता येईल/आलय... पण हा डोलारा खरोखरच अमर्याद आहे. मोठमोठाले विद्वान, तत्ववेत्ते, शात्रज्ञ, या अफाट पसार्याकडे बघुन थक्क होतात. आपण ज्ञानसागरात उभे आहोत व आपल्या हाती त्याचा केवळ एक थेंब लागलाय या जाणीवेने ते विनम्र होतात. जितकं जास्त खोलात जावं तितकं गुढ आणखी वाढतं. ज्यांनी या गुढतेला आपली जिज्ञासा अर्पण केली ते शास्त्रज्ञ झाले. ज्यांनी "आपण या गुढतेचा एक इंटीग्रेटेड पार्ट आहोत एव्हढं नक्की" अशी शरणागती अर्पण केली ते खिस्त, बुद्ध, कबीर झाले. उरलेले आपण मिपा मिपा खेळुया :)
अर्धवटराव
29 May 2013 - 7:34 am | धन्या
प्रतिसाद पटला, आवडला.
देव, धर्म आणि अध्यात्म यातला एकही शब्द न वापरता माणूस आणि निसर्ग यांच्यामधील नात्यावर किती चांगलं भाष्य करता येऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.
ही गुढता = ईश्वर ही धारणा मनात नसेल तर या यादीत अगदी बाबा आमटे आणि त्यांचा परिवार, डॉ. बंग यांचीही नावं आपोआपच जोडली जातात.
29 May 2013 - 7:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद अगदी मनापासून पटला.
बाकी, धन्या म्हणतोय -
"युनिवर्सल इंटेलिजन्स" विश्व चालवणारं काहीतरी अस्तित्वात असेल असं वाटत नाही.
इथे थोडा घोळ आहे, विश्व चालवणारं काही अस्तित्त्वात नाही हे सिद्ध झालं की मग बाकी, घोळ थांबेल.
तो पर्यंत आपण रिस्क घेऊ नये असे वाटते. ;)
-दिलीप बिरुटे
30 May 2013 - 1:03 am | अत्रुप्त आत्मा
29 May 2013 - 2:10 am | शिल्पा ब
29 May 2013 - 8:48 am | संजय क्षीरसागर
खाली दिला आहे.
29 May 2013 - 8:50 am | शिल्पा ब
जगातल्या मोठाल्या तत्वज्ञांनी तुमच्याकडुन दिक्षा घ्यायला हवी म्हणजे हे जग बदलेल..
27 May 2013 - 1:09 am | प्यारे१
धर्मसंस्था म्हणजे चर्च हेच अपेक्षित असेल तर माझी माघार आहे. कारण बायबल अथवा चर्च बद्दल मी ऐकलेलं / वाचलेलं नाहीये.
माझा होकार होता तो सत्य चा अर्थ काय ह्याबद्दल. भारतीय तत्वज्ञानामधला भगवदगीता, उपनिषदे (वेदांत) अथवा ब्रह्मसूत्रं नि त्यांच्यावरील कॉमेंटरीज (ज्ञानेश्वरी, शंकराचार्यांची टीका इ.इ. ) तसेच ह्या ग्रंथांना घेऊन रचलेले ग्रंथ म्हणजे दासबोध, आत्माराम, एकनाथी भागवत ह्या ग्रंथांचं स्वरुप पाहिलं तरी लक्षात येईल की तो एकतर संवाद आहे अथवा प्रश्नोत्तराच्या फॉरमॅट मध्ये आहे.
ह्या मध्ये कसल्याही प्रकारच्या सक्तीच्या आज्ञा नाहीत अथवा प्रश्न विचारु नका अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही. उलट शिष्य त्याच्या शंका निरसन होईपर्यंत प्रश्न विचारत राहतो नि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे कृती करुन कृतार्थ होतो.
अर्थात शंका निरसन होऊ शकतात कुशंका नाहीत. (औषधाचं प्रिस्क्रिप्शन किती वेळा वाचलं तर बरा होतो माणूस? औषध घ्यावं, गुण येतो.)
ह्यात कुठल्याही प्रकारे कमीपणाची, बाबा वाक्यं प्रमाणम ची शक्यता नाही. तसंच म्हणणं असेल तर शाळेतल्या अभ्यासक्रमाला सुद्धा एका मर्यादेमध्ये 'बाबा वाक्यं प्रमाणम' म्हणावं लागेल.
मुळात अध्यात्मामध्ये सृष्टी व तिच्या निर्मितीचा विचार हा क्षणाक्षणाला बदलणार्या, नाश पावणार्या व पुन्हा जन्म घेणार्या अशा क्षणभंगुरत्वाकडे लक्ष वेधणे ह्या संदर्भात आहे. अशा 'फिकल' विश्वामध्ये असं काही आहे का जे कायम आहे? शाश्वत आहे? अपरिवर्तनीय आहे? ते जर तसं असेल तर ते काय आहे असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. वर अर्धवटरावांनी म्हटल्याप्रमाणं खर्या विज्ञानाचा नि खर्या अध्यात्माचा मार्ग कदाचित रुळांप्रमाणं समांतर जात आहे.
माणूस म्हणजे नक्की कोण? त्याचं शरीर की आणखी काय? आधी हात पाय असलेला नि नंतर काही कारणानं गेलेला माणूस म्हणजे तोच माणूस म्हणावं का? माणसाचा नि जगाचा संबंध काय आहे? शाश्वत तत्त्वाबरोबर त्याचं काही नातं आहे का? असा सगळा प्रवास सुरु होतो. ह्यामध्ये सत्य गोष्ट म्हणजे आपल्या व सृष्टीमध्ये अनादि कालापासून असलेला कॉन्शसनेस,चैतन्य, आत्मा, सोल, रुह (नाव द्या नाहीतर देऊ नका) हीच एक गोष्ट आहे.
असो.
27 May 2013 - 5:34 pm | राजेश घासकडवी
तत्वज्ञानाची वेगवेगळी दर्शनं हा एखाद्या विषयाकडे पहाण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा उत्तम नमुना आहे. 'जग काय आहे? मनुष्य म्हणजे काय? सत्य कसं शोधून काढावं?' याबद्दल विविध विचार मांडलेले आहेत. दुर्दैवाने सत्य शोधनाचं तत्वज्ञान आणि धार्मिक परंपरा या एकमेकांत गुंतलेल्या आहेत.
"प्रार्थनास्थळात 'प्रश्न विचारणं सोडा, आणि या देवाची प्रार्थना करा' अशी अपेक्षा असते." यात सक्तीपेक्षा विचारप्रक्रिया बाजूला ठेवून निव्वळ विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं भलं होईल अशी शिकवणूक असते. हे विशेषतः भक्तिमार्गात दिसून येतं. 'मला शरण ये.' 'योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्यापेक्षा तुला आखून दिलेलं कर्म करणं हेच महत्त्वाचं आहे' असं कृष्ण भग्वद्गीतेत म्हणतो.
विज्ञान व त्या शोधासाठी आपलं आयुष्य घालवणारे लेन्स्कीसारखे शास्त्रज्ञ नेमका हाच शोध घेत आहेत. 'कुठच्याही रेफरन्स फ्रेममध्ये असा - प्रकाशाचा वेग बदलत नाही' किंवा 'भौतिकीचे नियम रेफरन्स फ्रेमप्रमाणे बदलत नाहीत' हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय शोधून काढण्याचंच उदाहरण आहे. लेन्स्की जेव्हा उत्क्रांती प्रत्यक्ष घडली हे दाखवून देतो, तेव्हा 'माणूस म्हणजे नक्की कोण?' या प्रश्नाचाच एक भाग उलगडत असतो. ते उत्तर असं की मनुष्य उत्क्रांतीतून जन्माला आला. कोबे, डब्लुमॅप, प्लांक यांतून विश्वाची जी प्रतिमा मिळाली त्यातून विश्व अनादी नाही हे सिद्ध होतं. वैज्ञानिकांना हे तपासून पहाण्याची गरज का वाटली? कारण त्यांची आणि दार्शनिकांची वैचारिक जातकुळी एकच आहे. सध्याच्या वैज्ञानिकांच्या हातात अत्याधुनिक उपकरणं आहेत इतकंच.
दुर्दैवाने मधले श्लाफ्लीसारखे लोक, किंवा रोमन इन्क्विझिशनसारखे - आपली सत्ता टिकवून धरण्यासाठी नवीन ज्ञानाला अवरोध करणारे - हे तत्वज्ञान गुंडाळून ठेवतात. त्यातून आंधळा विश्वास जोपासला जातो.
27 May 2013 - 6:25 pm | प्यारे१
कृपया ह्या धाग्यावरचा माझा पहिला प्रतिसाद वाचावा.
सत्ता, संपत्ती किर्ती, प्रतिष्ठा ह्यांच्यासाठीची रस्सीखेच जेव्हा धर्मसंस्थेमध्ये सुरु होते तेव्हा धर्म कधीच मोडला जातो.
धर्माला डबक्याची उपमा द्यायचीच असेल तर डबक्यामध्ये देखील कुठंतरी असा किमान ओंजळभर पाण्याचा साठा असतोच ज्यानं त्रास न होता पाण्याची तहान भागते.
सगळ्यांना 'मर्यादेत' ठेवण्यासाठी, समाजाची घडी योग्य तर्हेनं चालण्यासाठी आवश्यक नैतिकतेच्या चौकटी धर्म घालतो तेव्हा बहुसंख्य लोकांची ती आवश्यकता असते. कारण सगळी माणसं सारख्या मानसिक क्षमतेची नसतात हे तुम्हाला कबूल असावं.
भारतीय तत्वज्ञानातला बराचसाच भाग हा सामान्य माणसाला योग्य मार्गात ठेवण्याच्या कामी खर्ची आलाय. त्यामध्ये कुणीतरी शिक्षा करेल ची भीती देखील आहे, कुणाच्या तरी प्रेमापोटी काही कर असं आमिष देखील आहे.
मला शरण ये असं कृष्ण म्हणतात तेव्हा 'मी सगळं बघून घेतो रे तू लढ बिनधास्त' असा एक आश्वासक सूर आहे. (सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं शरणं व्रज) माझ्यामागं कुणी आहे हे पाहून स्फुरण येणं हे मानसशास्त्र आहे. पण कृष्ण अर्जुनाला तत्वज्ञान सांगितल्यावर 'तू काय ते ठरव' असं म्हणालेलं सोयिस्कर रित्या विसरलं जाऊ नये. (श्लोक आता माझ्याकडं उपलब्ध नाही पण शोधला तर मिळेल. तो तसा आहे.)
>>>वैज्ञानिकांना हे तपासून पहाण्याची गरज का वाटली? कारण त्यांची आणि दार्शनिकांची वैचारिक जातकुळी एकच आहे. सध्याच्या वैज्ञानिकांच्या हातात अत्याधुनिक उपकरणं आहेत इतकंच.
अगदीच मान्य आहे. ह्या बरोबरच सत्यान्वेषणासाठी हा नि हाच एकमेव मार्ग आहे असं म्हणून विज्ञानाचा उपमर्द होऊ नये. विज्ञान सगळ्या मार्गांना मान्यता देतं ना?
एक मार्ग शरीर, मनावर प्रयोग करणं हाही असू शकतो असा विचार का नाही होत? फक्त त्याचे 'रिझल्ट' डोळ्याला (पक्षी: इंद्रियांना) दिसत नाहीत म्हणून?
तुम्ही आम्ही विचार करतो म्हणजे नक्की काय करतो ह्याचा विचार व्हावा, तो विचार करता करता विचार कशाच्या 'बेस'वर होतो ह्याचा विचार व्हावा.
बाकी कृष्णाला माझी प्रॉपर्टी मिळेल असं काही नाहीये. ज्ञानेश्वरांना कुठलं संस्थान स्थापायचं नाहीये त्यामुळं फसवण्याचा प्रयत्न अजिबात नाही.
भेसळीचं, भ्रष्टाचाराचं नि फसवणुकीचं कुठलंच क्षेत्र कुणीच मोकळं सोडलेलं नाही पण त्यामुळं सरसकट सगळ्यालाच नाकारणं चुकीचं नाही का होणार????
27 May 2013 - 7:40 pm | मूकवाचक
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया| विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरू||
- भगवद्गीता (१८.६३)
श्रीमत् भावार्थ गीतेतील (स्वामी स्वरूपानंद) अनुवादः
तुज सांगितले असे हे भले पावन आत्म-ज्ञान
असे चि सहजे धनंजया जे माझे गुप्त निधान
सर्वतोपरी तू चि विचारी मनी एक निर्धारी
आणि जाणले उचित ते करी धरी शस्त्र वा न धरी
27 May 2013 - 8:08 pm | प्यारे१
श्लोक दिल्याबद्दल आभारी आहे.
27 May 2013 - 11:55 pm | राजेश घासकडवी
आजकाल सेक्युलर राज्यव्यवस्था ते काम बऱ्यापैकी बरं करत आहे. उलटपक्षी असं दिसून येतं की एकाच देशातल्या धर्माचा पगडा असलेल्या भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक आहे. उदाहरणार्थ - अमेरिकेत दक्षिणेचा भाग हा सर्वात धार्मिक समजला जातो. तिथे गुन्हेगारीचं प्रमाण अधिक सेक्युलर उत्तरेपेक्षा जास्त आहे. तसंच अमेरिका व इंग्लंड या देशांमध्ये तुलना केली असता अमेरिकेत एकंदरीत धार्मिकता अधिक आहे, आणि गुन्हेगारीही अधिक आहे. धर्माच्या नावाखाली झालेल्या अत्याचारांची यादी तर वाचवणार नाही इतकी मोठी आणि भयंकर आहे. तेव्हा धर्म माणसाला अधिक नीतिमान बनवतो हे प्रत्यक्षात दिसून येत नाही.
'मला शरण ये' या स्वरूपाची विधानं वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारे येतात. ख्रिश्चन धर्माचा गॉड 'माझ्याशिवाय कोणाची पूजा करायची नाही' असं स्पष्ट सांगतो. जे करतील त्यांना सजा-ए-मौत आहे. इस्लामचंही तेच. गीतेत लिहिलेलं आहे -
Engage your mind always in thinking of Me, become My devotee, offer obeisances to Me and worship Me. Being completely absorbed in Me, surely you will come to Me. (B-Gita 9.34)[7]
One can understand Me as I am, as the Supreme Personality of Godhead, only by devotional service. And when one is in full consciousness of Me by such devotion, he can enter into the kingdom of God. (B-Gita 18.55) [8]
एकंदरीत सगळेच धर्म आपल्या अनुयायांना स्वतंत्र विचारापेक्षा धृढ विश्वास ठेवायला सांगतात.
नाहीच ना. खरं नाणं कुठचं आणि खोटं कुठचं यात फरक करणं म्हणजे बाजारावरच विश्वास न ठेवणं नाही. जे लोक सचोटीने सत्य शोधतात, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ते प्रशंसनीयच आहेत.
शेवटी गाडी व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष यांच्या सीमेवर येऊन उभी रहाते. व्यक्तिनिरपेक्ष ज्ञान विज्ञानाच्या अखत्यारीत येतं, व्यक्तिसापेक्ष अनुभूतींवरचे निष्कर्ष अध्यात्माच्या अखत्यारित येतात. पण ही रेषा आत सरकते आहे. मनात काय विचार चालू आहेत हे हळूहळू अंधूकपणे ओळखता यायला लागलेलं आहे.
28 May 2013 - 12:54 am | प्यारे१
पुन्हा तोच विषय येतो आहे. धर्मसंस्था सर्वार्थानं भ्रष्ट झाल्यानं ज्या गोष्टी झाल्या आहेत अथवा होत आहेत त्याचं खापर धर्मावर फोडता येणार नाही.
अणुबाँब विज्ञानाची देणगी आहे? आजचा अत्याधुनिक दहशतवाद विज्ञानाची देणगी आहे? रासायनिक नि जैविक शस्त्रास्त्रं विज्ञानाची देणगी आहे? विज्ञान हे शिकवतं? नाही. १०० % नाही.
हा विज्ञान नि तंत्रज्ञानाचा माणसानं केलेला स्वार्थी उपयोग आहे. सत्ता, संपत्ती टिकवण्यासाठी, मिळवण्यासाठी, वाढवण्यासाठी.
धर्माच्या नावावर ह्याच प्रकारे गोष्टी झाल्या. धर्मानं हे शिकवलं? नाही.
इतर धर्मांबद्दल मी बोलणार नाही. भगवदगीतेमध्ये लोकांच्या ठराविक गटांसाठी भक्ती, काहींसाठी ध्यान, काहींसाठी ज्ञान असे वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत.
वर तुम्ही दिलेले भगवदगीतेतील श्लोकांचे अर्थ हे द्वैतवादी इस्कॉन संप्रदायाच्या भगवदगीतेतील असावेत असा माझा समज आहे.
चुकीचं काहीच नाही. एकाच सत्याला वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानी लोक ओळखतात असं ते स्वरुप आहे.
माणसानं ह्या सत्याला देव मानलं नि नुसतं देव न मानता त्याला 'माणसात' आणला. त्याची थोडी सुपरनॅचरल स्वरुपातली मूर्ती बनवली नि त्याची पूजा सुरु केली.
राजेश ह्या 'नावानं' जसं त्या व्यक्तीला ओळखलं जातं तसं अमुक नावानं, तमुक चेहर्यानं, ढमुक शस्त्रानं त्या त्या देवतेला ओळखलं जाऊ लागलं. त्या खूणेनं त्या सत्याला ओळखलं जावं म्हणून.
राजेश नाव वेगळं केलं, त्याची पदवी वेगळी केली तरी राजेश नाही बदलत. तसंच वेगवेगळ्या भूमिकांमधून नि मार्गांमधून त्या सत्याला ओळखण्याच्या प्रयत्नामध्ये 'आलंबन' म्हणून कृष्णाच्या नामरुपाचा वापर कर असं सांगणं आहे. (गीतेमध्ये हे प्रथमपुरुषी म्हटलेलं आहे, इतर ग्रंथांमध्ये तू त्याची पूजा कर अशा प्रकारे.)हे सगळं का करायचं ह्या बद्दल एक वेगळं पुस्तक लिहावं लागेल अर्थात मी लिहीण्याची गरज नाही तशी उपलब्ध आहेत.
आता हे श्रद्धाळूपणे का फॉलो करायचं? तर त्या सत्यापर्यंत पोचण्याचे राजमार्ग एकदा निश्चित झालेले आहेत तर अकारण नवीन मार्गाचा शोध घेण्यात वेळ जाऊ नये म्हणून.
तुमचा चॉईस आहेच. एकेक पर्याय निवडत, चोखाळत आयुष्य वाया जाण्याची शक्यता आहे. मर्यादित कालावधी मध्ये ध्येय साध्य करता येईल का ह्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्याला व्यावहारीक शहाणपणा असं नाव आहे. मी स्वतः दगड फोडून रस्ता बनवून मग त्यावरुन जाईन असं होणं शक्य नाही. मग मी दुसर्यानं बनवलेल्या रस्त्यावरुन जाईन का?
तर ते तुम्ही देखील जाता आहात नि मी देखील जाण्याचा प्रयत्न करतो आहेच. नावं का ठेवायची?
तुमचा रस्ता नवा आहे. सगळ्या साईनबोर्डस नी दिशादर्शन करणारा आहे. सगळ्या उपकरणांनी युक्त आहे.
माझ्या मार्गावर मला माझ्या पूर्वसुरींनी सांगितलेल्या खुणा आहेत. ते चुकीचं सांगणार नाहीत ह्याची खात्री आहे कारण त्यातून फसवणुक होण्याचं एकही चिन्ह नाही. त्यांनी मार्ग पार केल्यावर पोचण्याच्या ठिकाणाबाबत दिलेली ग्वाही आहे. नि मार्गावरुन जाताना मिळणारे वैयक्तिक समाधान, शांती, तृप्ती, आनंद हे लाभ देखील साईड प्रॉडक्ट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. और क्या चाहिये?
बाकी नंतर मिळणारं ज्ञान दिसताना व्यक्तीसापेक्ष दिसलं तरी असताना ते व्यक्तिनिरपेक्ष असंच असतं. आश्चर्यकारकरित्या सगळे संत, महानुभाव (प्रोक्लेम्ड नव्हे) त्यांना आलेले अनुभव अतिशय एकसारखे सांगतात. निरनिराळ्या कालखंडात जन्मलेले, सामाजिक परिस्थितीमध्ये वाढलेले वेगवेगळ्या मार्गांनी साधना केलेले असले तरी. कारण ज्या तत्त्वाचा अनुभव त्यांना येतो ते एकच आहे.
28 May 2013 - 11:02 am | इनिगोय
वा!
27 May 2013 - 8:02 pm | मूकवाचक
कितव्या अध्यायात कुठल्या श्लोकात आहे असे? संदर्भ मिळेल का?
भगवद्गीतेचा सगळा प्रवासच प्रामुख्याने प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. अर्जुनाने एकूण किती पश्न विचारले हा विदा गोळा करायला हरकत नसावी.
कृष्णाने विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे दिली आहेत. त्यात तिसर्या अध्यायाच्या सुरूवातीला अर्जुनाने विचारलेल्या "हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा साम्य बुद्धी श्रेष्ठ वाटते, तर या घोर कर्मात मला का लोटतो आहेस?" या प्रश्नाचे उत्तरही विचारप्रक्रिया बाजूला ठेवून निव्वळ विश्वास ठेवा अशा प्रकारे दिलेले दिसत नाही. असो.
29 May 2013 - 7:48 pm | विकास
'मला शरण ये.' 'योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्यापेक्षा तुला आखून दिलेलं कर्म करणं हेच महत्त्वाचं आहे' असं कृष्ण भग्वद्गीतेत म्हणतो.
गीतेमध्ये कर्म आखून दिलेले म्हणजे "मी सांगतो ते कर" असे कुठेही म्हणलेले नाही. कर्मण्येवाधिकारस्ते या कायम वापरात असलेल्या श्लोकात देखील कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे असे म्हणलेले आहे. फक्त कर्म केल्यावर अमूक एक फळच मिळाले पाहीजे असे म्हणता येत नाही कारण ते आपल्या हातात नसते आणि ते नसते म्हणून काम करायचे नसते असे देखील नसते.
त्याहूनही पुढे कर्म हे जन्मापासून ते मरणापर्यंत बांधलेले असल्याने करावेच लागते असे म्हणलेले आहे. कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि । प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ॥ ५ ॥
योग्याअयोग्याविषयी देखील बोलायचेच झाले तर...
शेवटच्या अध्यायात "विमृश्यैतद अशेषेण यथेच्छसि तथा कुरू" किंवा मराठीत. असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज । ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥ असे म्हणलेले आहे.
असो.
30 May 2013 - 12:00 am | राजेश घासकडवी
अर्जुनाचा मूळ प्रश्न होता की माझे हे आप्त, नातेवाईक. मी यांना मारणं योग्य वाटत नाही. त्यावर कृष्णाचं साधारण उत्तर आहे की तू क्षत्रिय आहेस तेव्हा हे तुझं कर्म आहे, तेव्हा तेच करणं योग्य. हे तो अतिशय चांगल्या शब्दात सांगतो. पण यात 'ही व्यवस्था आहे ही अशी आहे. तेव्हा तीप्रमाणे वागणंच योग्य आहे.' हा संदेश आहेच.
भग्वद्गीतेच्या एका उद्धरणापेक्षा सर्वसाधारण विधान मला असं करायचं होतं की बहुतेक धर्मगुरू बहुतेक सामान्यांना 'शंका घेऊ नका, दृढ विश्वास ठेवा' हे वेगवेगळ्या पद्धतींनी सांगतात. काही वेळा ग्रंथात स्पष्ट लिहिलेलं असतं, काही वेळा नसतं. पण देवाचे बडवे म्हणवणारे सर्वत्रच प्रश्नकर्त्यांना आधी चुचकारून गोंजारून प्रश्न सोडून द्या, श्रद्धा बाळगा, विश्वास ठेवा असं सांगतात.
26 May 2013 - 8:32 pm | शिल्पा ब
ही धर्मसंस्था फार माजलीये साली !!
27 May 2013 - 10:04 am | धन्या
ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जिवो ब्रह्मैव नापरः |
बाकी आपटणं, धोपटणं चालू दया. लई मजा येतीया. ;)
28 May 2013 - 1:46 am | मोदक
ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जिवो ब्रह्मैव नापरः |
अतिशय माहितीपूर्ण धाग्यावर तितकाच माहितीपूर्ण व सुंदर प्रतिसाद!!
28 May 2013 - 10:42 am | मृत्युन्जय
चांगला लेख. श्रद्धा शब्द खटकला. त्याऐवजी कडवा धर्मवाद हा शब्द बरा वाटला असता. शब्दाचे शब्दकोशीय अर्थ काय असतात त्यापेक्षाही त्याचा उपयोग सामान्यतः कुठल्या अर्थाने होतो हे जास्त महत्वाचे आहे आणि तद्नुषंगाने श्रद्धा हा शब्द अयोग्य आहे असे वाटते.
29 May 2013 - 8:46 am | संजय क्षीरसागर
पहिली गोष्ट : अध्यात्म विकल्प आहे, बळजबरी नाही. तुम्ही अस्तित्वाप्रत शरणांगत व्हा किंवा होऊ नका, फरक तुम्हाला पडतो, अस्तित्वाला नाही..... तुम्ही युनिवर्सल इंटेलिजन्स मान्य करा की अमान्य, तुमच्यावर कधीही सूड उगवला जाणार नाही. तुमचा श्वास चालू राहतो, हृदय स्पंदनं बंद पडत नाहीत. फक्त एकच फरक पडतो... कृतज्ञ व्यक्तीचा श्वास शांत होतो, त्याचं हृदय अस्तित्वाच्या लयीशी समरूप होतं, तो निर्धास्त होतो.
आता तुमचे प्रतिसाद :
@ धनाजीराव,
तुमचा श्वास चालू आहे, हृदय धकंधकतंय हा अगदी निकटचा पुरावा सर्व सिद्ध करतो.
ज्यांना युनिवर्सल इंटेलिजन्स म्हणजे काय याची कल्पना नाही आणि तो कळण्याची सुतराम शक्यता नाही अश्या लोकांचं ते जगणं आहे. अस्तित्वाला त्यानं काही फरक पडत नाही. ते स्वतःच्या अंगभूत व्यवस्थेनं हरक्षणी स्वतःला समत्वात ठेवतं. फरक अपराधी व्यक्तींच्या जीवनात पडतो, वरून काहीही दिसो, त्यांचं अंतरंग दुभंगलेलं असतं, त्यांच्या जीवनातली शांती हरवते, आयुष्य सैरभैर होतं.
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हा मूर्खपणा आपण अजून किती दिवस करणार? एकतर गरीबांसाठी काम करा, ते काही तरी विधायक होईल. किंवा मग जे लिहीलंय ते आचरणात आणा त्यानं आयुष्य बदलेल. पुन्हा इतके फालतू मुद्दे काढू नका.
माझं पोट भरलंय, मी गरीबी हटवण्याचं काम करत नाही, ते राज्यकर्त्यांचं काम आहे. मी थोडं वेगळं काम करतोय, ज्यांना समजेल अश्या लोकांसाठी लिहीतोय. आणि मला एकच खात्री आहे; अस्तित्वाप्रती कृतज्ञ व्हायला पोट भरलंय की रिकामंय हा प्रश्न व्यर्थ आहे, तिथे आकलनाची पातळी निर्णायक आहे.
@ अरा,
शरणांगती हा कुणाचा मक्ता नाही. आपण नेहमी एकच चूक करतो. लिहीतांना मोठ्या गोष्टी लिहीतो आणि आचरणात आणायची वेळ आली की बुद्ध आणि ख्रिस्ताचं नांव घेतो. याचा अर्थ एकच : आपल्याला एकतर समजलं नाहीये किंवा शरणांगत व्ह्यायचं साहस आपल्याकडे नाहीये.
ओशोंचं एक अप्रतीम वाक्य आहे : समझ आचरणमे बदल जाती है.
एकतर `दाय विल बी डन' असे जगा, त्यानं तुफान मजा येईल आणि त्याल मी साक्षी आहे. नाही तर मिपा मिपा खेळा,त्याला फारशी बुद्धी लागत नाही. उगीच डेटाफेक करणं आणि गीतेतले भारंभार श्लोक इथे डकवणं एकूण एकच.
या संदर्भातल्या शेवटच्या प्रतिसादाला उत्तर देण्यात अर्थ नाही कारण `एकूण डोकं' किती आहे याची प्रतिसादावरनंच कल्पना येते.
29 May 2013 - 9:39 am | अर्धवटराव
>> शरणांगती हा कुणाचा मक्ता नाही. आपण नेहमी एकच चूक करतो. लिहीतांना मोठ्या गोष्टी लिहीतो आणि आचरणात आणायची वेळ आली की बुद्ध आणि ख्रिस्ताचं नांव घेतो. याचा अर्थ एकच : आपल्याला एकतर समजलं नाहीये किंवा शरणांगत व्ह्यायचं साहस आपल्याकडे नाहीये.
-- बुद्ध, ख्रिस्त वगैरे मंडळींबद्दल खात्री आहे म्हणुन त्यांची नावे घ्यायला अडचण होत नाहि. "इतरे वाहावा भार माथी" लोकांबद्दल बोलण्यात काय अर्थ... बुद्धाचं बुद्धत्वच त्याचा परिचय आहे. ते कोणाच्या आकलनाला चॅलेंज करत नाहि कि बोधिगयेत कान पकडुन कोणाला झाडाखाली बसवत नाहि. ख्रिस्ताला त्याच्या क्रॉसचा फाजील अभिमान नाहि आणि कबीर त्याच्या दोह्याच्या श्रोत्यांना "साधु" म्हणुन संबोधतो कारण त्याला स्वतः प्रमाणे इतरांच्या विचारशक्तीचं देखील भान असतं.
अर्धवटराव
29 May 2013 - 11:25 am | संजय क्षीरसागर
कारण ते गेलेत. आता त्यांचा उदोउदो करून आपली साइड सेफ होते. ते होते तेव्हा त्यावेळच्या लोकांनी त्यांना दगड मारलेत आणि क्रुसिफाय केलंय.
ते ग्रेट होते म्हटलं की पुन्हा आपण नेहेमी सारखे जगायला मोकळे.
आकलन सगळ्यांच एकच आहे; तो बुद्ध असो, जिजस असो की इथला सदस्य. प्रश्न आकलनाचा नाही, ते आचरणात आणण्याचा आहे. तुमचं स्वतःचं आयुष्य या क्षणापासनं `समर्पणाच्या - रेझर एजवर' जगण्याचा आहे.
29 May 2013 - 5:57 pm | अर्धवटराव
कोणाला कुठल्याप्रकारे आकलन होईल ही वैयक्तीक बाब आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सत्य शोधत असतो व त्याप्रमाणे वागत असतो. तिथे उगाच जजमेण्टल होण्यात काहि पॉईण्ट नाहि.
जीजसला कृसीफाय करणारे, त्याला केवळ मखराच्या शोभेपुरते ठेवणारे, आणि त्याच्या शिकवणीचा अभ्यास करणारे सर्वकाळ आढळतील. त्यात काहि विषेश नाहि.
अर्धवटराव
29 May 2013 - 6:08 pm | प्यारे१
@ अर्धवटराव,
माझ्या आकलनानुसार नुस्ता जयजयकार अथवा नुस्त्या पूजा करण्यापेक्षा स्वतःच बुद्ध होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायला हवी. तसं असेल तर बरोबरच आहे. पण तरीही कोपर्यात उभं राहणंच चांगलं... ;)
29 May 2013 - 9:06 pm | अर्धवटराव
थोडी आम्हालाही जागा द्या कि कोपर्यात ;)
अर्धवटराव
29 May 2013 - 6:19 pm | संजय क्षीरसागर
करेक्ट!... शिकवण आचरणात आणणारा दुर्लभ आहे.
29 May 2013 - 1:58 pm | राजेश घासकडवी
हा भाग आवडला. मात्र जितकं खोलात जाऊ तितकं गूढ वाढतं म्हणण्यापेक्षा सौंदर्य आणि थक्क करण्याची शक्ती वाढते. न्यूटनने जेव्हा लोलकातून प्रकाशकिरण पाठवून सप्तरंग तयार केले तेव्हा काही लोकांना ते गूढाचं सामान्यीकरण वाटलं. असंही म्हटलं गेलं की ते गूढ, गूढच रहायला हवं होतं. आता इंद्रधनुष्यातली जादू नाहीशी होईल. पण तसं झालेलं नाही. इंद्रधनुष्य का पडतं हे कळलं तरी त्याचं सौंदर्य कमी होत नाही. उलट प्रकाश काय आहे हे समजून घेतल्यामुळे आपल्यासमोर महाप्रचंड विश्व उघडतं, ज्याचा एक कोपरा पाहून, समजून घेऊन देखील थक्क व्हायला होतं. न्यूटनने (किंवा इतर कोणी) हा अभ्यास केल्याशिवाय लेन्स्कीचा हा प्रयोग शक्य झाला नसता. मायक्रोस्कोप तयार करता आले नसते, बॅक्टेरिया दिसलेही नसते. ही यादी वाढवता येईल. मुद्दा असा आहे निसर्गाच्या सौंदर्याशी एकरूप होण्यासाठी गूढाचं धुकं ठेवण्याची गरज नाही. धुकं सुंदर असतंच, पण धुकं उलगडल्यावर दिसणारा देखावाही सुंदर असतो.
या विषयावर रिचर्ड डॉकिन्सने 'अनवीव्हिंग द रेनबो' नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते जरूर वाचावं.
29 May 2013 - 5:43 pm | अर्धवटराव
29 May 2013 - 7:13 pm | राजेश घासकडवी
मला वाटतं आपण एकाच गोष्टीबद्दल बोलत आहोत. मला वाटतं तुम्हालाही गूढतापेक्षा अंडरलायिंग कॉंप्लेक्सिटी हा अर्थ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या स्केलवर वेगवेगळी चित्रं दिसतात. उदाहरणार्थ, प्रकाशवर्षांच्या स्केलवर गुरुत्वाकर्षणापलिकडे काही दिसत नाही. निव्वळ ग्रहांच्या चलनवलनाच्या अभ्यासासाठी न्यूटन पुरेसा आहे. आपल्या रोजच्या जीवनात ज्या घटना घडतात त्या स्थानिक गुरुत्वाकर्षण (स्थिर) आणि इलेक्ट्रॉन पातळीवर समजावून घेता येतात. जसजसे आणखीन सूक्ष्मात जाऊ तसतसे प्रोटॉन-न्यूट्रॉन दिसतात. आणि क्वार्क वगैरेही दिसतात. या सगळ्यांची एकमेकांशी इंटरऍक्शन होतेच - त्याशिवाय बिगबॅंग समजावून घेता येत नाही. या अर्थाने सगळंच एकमेकांवर अवलंबून आहे. पण तरीही विविध स्केलला वेगवेगळी बलं प्रभावी ठरतात - त्या स्केलपुरतं 'दुसरी बलं नाहीतच' असं ऍप्रॉक्झिमेशनही यशस्वी ठरतं. इतर बलं लक्षात घेतली की ते चित्र जास्त रेखीव आणि अचूक होतं.
चांगली गोष्ट अशी की एका पातळीवरचं चित्र वरच्या व खालच्या पातळ्यांशी सुसंगत आहे. त्यामुळे एक सम्यक चित्र तयार होतं आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी वापरलेले मूलभूत स्थिरांक आणि गृहितकं अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे दर स्केलला दिसणाऱ्या गोष्टी अनेक पटींनी वाढत असल्या तरी त्यांचं वर्णन करणारे नियम एकाच जातकुळीचे आणि सारखे आहेत.
29 May 2013 - 9:14 pm | अर्धवटराव
>>चांगली गोष्ट अशी की एका पातळीवरचं...तरी त्यांचं वर्णन करणारे नियम एकाच जातकुळीचे आणि सारखे आहेत.
-- होय. त्यामुळे त्या नियमांना अप्लिकेशन इंजीनिअरींग द्वारे मानवी सेवेत दाखल करता आलं ही देखील अत्यंत चांगली गोष्ट झाली. पुढील काहि दशकात या क्षेत्रात आजच्या विज्ञानाला देखील आश्चर्य वाटावं इतक्या प्रचंड उलाढाली होतील असा सुर वैज्ञानीक विश्वात उमटतोय. ते बघायला, अभ्यासायला मिळावं अशी फार इच्छा आहे.
अर्धवटराव
18 Sep 2017 - 1:44 pm | arunjoshi123
ना धुकं सुंदर असतं, ना ते उलघडल्यावरचा देखावा. आता उलघडलेल्या जगात अजून खालच्या प्रस्तरावरचं जे नविन धुकं असतं ते अजून भयकारक असतं.
17 Sep 2017 - 4:45 pm | गामा पैलवान
अहाहा ! हे वाचून मन आनंदाने थुईथुई (की थयथया) नाचू लागलं :
पाच किलोचं मुंडकं घेऊन पोलोसारखा खेळ खेळणे म्हणजे भीमासारखी अचाट शक्ती हवीच. हा पोलोदेखील इंग्रजांच्या आधीपासून खेळायचे, म्हणजे कालयंत्रातून भूतकाळात सफर घडली म्हणायची. कोण म्हणतो आपल्याकडे प्राचीन काळी शोध लागले नव्हते म्हणून? आपली एव्हढी प्रगती बघून माझं मन आनंदाने थुईथुई (की थयथया) नाचू लागलं, त्यात नवल ते काय !
-गा.पै.
17 Sep 2017 - 5:19 pm | श्रीगुरुजी
त्या सामन्यात ती रेफ्री असेल बहुतेक.
18 Sep 2017 - 1:28 pm | वामन देशमुख
>> पाच किलोचं मुंडकं घेऊन...
येक लंबर हाणलास रे गड्या!
एकेरीबद्धल क्षमस्व.
18 Sep 2017 - 12:24 pm | ओरायन
माहितीपुर्ण व उत्तम लेख.