रक्त आटते जनतेचे
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला
जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला
दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला
किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------
प्रतिक्रिया
13 May 2013 - 9:25 am | चाणक्य
शेवटचा शेर सोडुन बाकीची गझल आवडली. खरं तर शब्दरचना आवडली म्हणायला पाहिजे कारण तुम्ही गझलेत मांडलेल्या वास्तवात आवडण्यासारखं काय आहे ? काही नाही.
13 May 2013 - 12:19 pm | Bhagwanta Wayal
वा..! छान..!
13 May 2013 - 9:11 pm | अर्धवटराव
:(
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला
:)
अर्धवटराव