काही गाणी असतातच अशी एकदा ऐकली की कधी जिभेवर चढतात आणि ह्रदयात उतरतात कळतच नाही. एक सुंदर गाणं जमवून यायला जसे शब्द आणि संगीत मदत करतात तितकीच किंबहूना त्याहून जास्त मदत गाण्याचं चित्रिकरण आणि कलाकार ज्याच्यावर चित्रिकरण झालेलं आहे ते सुद्धा करतात. बर्याच चित्रपटात काही गाणी अतिशय सुमधूर असून देखील त्याच चित्रपटातील इतर काही अतिप्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या सावलीत झाकोळून जातात. आज काल युट्यूब आणि इतर संस्थळांमूळे ही सर्व परिचीत - अपरिचीत गाणी सहज उपलब्ध झाली आहेत.
'स्विकार किया मैने' या चित्रपटातील 'शबाना आझमीं'वर चित्रीत केलेलं हे गाणं असच एक अप्रतिम मास्टरपीस.
'अजनबी कौन हो तुम, जबसे तुम्हे देखा है
सारी दुनिया, मेरी आखोमे सिमट आयी है'
हे गाणं मी ३-४ वर्षांपूर्वी प्रथम ऐकलं किंवा नोटिस केलं म्हटलं तरी चालेल. एकदा ऐकून मन भरलं नाही म्हणून परत ऐकलं, परत परत ऐकलं पण मन भरलच नाही. इतकी वर्ष कस काय हे ऐकायच राहून गेलं म्हणून थोडी हूरहूर झाली. या गाण्यात स्वप्नात रमलेली शबाना तिचे बोलके डोळे सगळच मस्त. उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं निदा फाझली यांची शायरी आणि लताचा स्वर सगळ कस मस्त जमून आलयं. त्याच दरम्यान पेपरात शबानाची मुलाखत वाचण्यात आली ज्यात त्यांनी जावेद अख्तर साहेबां बरोबरच्या ओळखीचे सुरवातीचे दिवस सांगीतले होते. उमेदवारीच्या दिवसात जावेद हे कैफी आझमींना भेटण्यासाठी बरेचदा यायचे त्यांना आपली शायरी ऐकवण्यासाठी .मग शबाना ती शायरी गुणगुणत कितीतरी वेळ जावेद साहेबांविषयी विचार करीत बसत. हे गाणं बघताना कुणास ठाऊक पण मला तशीच स्वप्नात रममाण झालेली शबाना दिसते.
तीच गोष्ट 'मंझील' या चित्रपटातील अमिताभवर चित्रीत या गाण्याची. माझ्या बरोबर कंपनीत रूजू झालेला माझा सहकर्मी बरेचदा एक धुन गुणगुणायचा ए़कदा त्याला छेडल्यावर त्यानी हे गाण सांगितलं. याच चित्रपटातील 'रीमझीम गिरे सावन' हे किशोरच्या आवाजातील गाणं बरच गाजलं पण लताच्या आवाजातील 'रीमझीम गिरे सावन' आणि मी इथे बोलत असलेलं
'तुम हो मेरे दिल की धडकन, तुमबीन लगे ना मन
तुमकोही ढुंडा करते है, हरपल मेरे दो नयन'
मात्र जास्त गाजली नाहीत. पण मला मात्र 'तुम हो मेरे...' हे गाणं त्याच्या सरळ सोप्या बोलांमूळे आणि लताचं 'रिमझीम गिरे..' हे त्याच्या चित्रिकरणामूळे अगदी अफाट आवडलेत. पावसात भिजलेली त्या वेळची मुंबई आणि अनवाणी चलणारी साडीतील मौसमी खरच क्लास.
'स्वामी' चित्रपटातील 'का करू सजनी... आए ना बालम' हे येसूदासनी गायलेलं गाणं जेव्हडं गाजलं तितकं लतानी गायलेलं
'पलभर मे ये क्या हो गया
वो मै गयी वो मन गया
चुनरी कहे सुनरी पवन
सावन लाया अब के सजन'
हे गाणंसुद्धा तितकसं गाजलं नाही. या गाण्यात पण शबानाचे बोलके डोळे, राजेश रोशन यांच संगीत, लताचा गळा आणि साधं पाऊस पडतानाचं व पडून गेल्या नंतरच चित्रिकरण खरच उत्तम.
'रजनिगंधा' मधील 'रजनिगंधा फुल तुम्हारे, मेहेके मेरे जिवन मे'हे गाणं जितकं मनभावन तितकच विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकुर यांवर चित्रीत टॅक्सीतील हे गीत
'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है
अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है'
मुकेश चा आवाज आणि परत एकदा त्या वेळची मुंबई आहाहा.
ही आणि अशीच आणखी कितीतरी दर्जेदार गाणी आहेत जी मिळावी तितकी प्रसिद्धी नाही मिळवू शकलीत पण आजही एकांतात डोळे मिटून शांत पडून ऐकलीत तर मनात खोलवर उतरतात. परत कधितरी लिहिलंच त्याविषयी.
साभार - वरील सर्व लिंक्स युट्यूब वरून साभार.
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 11:05 am | रणजित चितळे
'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है
अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है'
मुकेश चा आवाज आणि परत एकदा त्या वेळची मुंबई आहाहा.
हेच गाणे बंगाली मध्ये लताने म्हटले आहे फार सुंदर आहे ही घ्या लिंक
http://www.salilda.com/playlists/songs/nonfilm/bengali/adhunik/lata/aami...
9 Apr 2012 - 8:09 pm | तिमा
या गाण्यात ये जो मनकी सीमारेखा है, मन 'डोलने' लगता है असं ऐकू येतं.
10 Apr 2012 - 10:22 am | अमृत
ते 'तोडने' च आहे. मी परत खात्री करून घेतली.
अमृत
10 Apr 2012 - 1:06 pm | चौकटराजा
प्र का टा आ
9 Apr 2012 - 2:21 pm | चौकटराजा
ही आणि अशीच आणखी कितीतरी दर्जेदार गाणी आहेत जी मिळावी तितकी प्रसिद्धी नाही मिळवू शकलीत.
बाकीची गाण्याबाबत काहीच बोलू शकत नाही. पण "कई बार युंही देखा है हे चांगलेच गाजलेले गीत आहे.
10 Apr 2012 - 10:25 am | अमृत
लेखातील सगळेच शब्द प्रमाण मानू नयेत. ते ईंग्रजीत म्हणतात ना 'Take it with pinch of salt' तसंच काहितरी :-)
अमृत
9 Apr 2012 - 4:08 pm | Madhavi_Bhave
तीच गोष्ट 'मंझील' या चित्रपटातील अमिताभवर चित्रीत या गाण्याची. माझ्या बरोबर कंपनीत रूजू झालेला माझा सहकर्मी बरेचदा एक धुन गुणगुणायचा ए़कदा त्याला छेडल्यावर त्यानी हे गाण सांगितलं. याच चित्रपटातील 'रीमझीम गिरे सावन' हे किशोरच्या आवाजातील गाणं बरच गाजलं पण लताच्या आवाजातील 'रीमझीम गिरे सावन' आणि मी इथे बोलत असलेलं
तुम्हि दिलेल्या लिन्क वर हे गाणं बघितले. गाणे बघताना डोळे कधी पाणावले तेच कळले नाही. आज का कोण जाणे अगदी उदास उदास होते. हे गाणे पहिले आणि सर्व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. किती निष्पाप मुंबई होती आपली. सर्वत्र एक आपुलकी होती. अमिताभला आणि मौशमीला पावसात भिजताना बघून आता आयुष्यात काय गमावले आहे हे प्रखरतेने जाणवले. पावसात चिंब भिजलेली आपली मुंबई जगातील कोणत्याही शहरापेक्षा सुंदर दिसते (आताची नव्हे). शुटींग करताना मौशमीला वाटले तरी असेल का हा अगदी निरुपद्रवी दिसणारा साधा माणूस, उद्याचा महानायक होणार आहे?
जेव्हा जुनी गाणी बघायला मिळतात (म्हणजे रिमोट हातात येतो आणि कोण disturb करत नाही) तेव्हा गाण्यांपेक्षा मी जुन्या काळातली मुंबई कोठे दिसते का हेच बघत असते. आणि म्हणूनच रजनीगंधा किंवा छोटीसी बात असे सिनेमा मी अगदी अधाश्याप्रमाणे पाहत असते.
बाकी ह्या सुरेख धाग्य बद्दल खूप धन्यवाद. जरी खूप काही गमावले आहे ह्याची जाणीव जरी झाली तरी मनाला खूप उभारी आली. आजच्या नवीन पिढीला कधीच कळणार नाही त्यांनी काय गमावले आहे ते आजच्या चकचकीत आणि दिखावू माल संस्कृतीच्या जमान्यात.
11 Apr 2012 - 4:18 pm | इनिगोय
सरींच्या शिडकाव्याने या शहराला लाभणारी प्रसन्नता कधी कुठे हरवली काही कळलंच नाही.
जुन्या काळातली देखणी मुंबई, तेव्हाची सुरेख नि प्रशस्त घरे, स्वच्छ मोकळे रस्ते कसे होते ते दाखवणारे रजनीगंधा, छोटीसी बात, घर हे सिनेमे गतरम्यतेची ओढ वाटणार्यांना अगदी जिव्हाळ्याचे!
9 Apr 2012 - 7:42 pm | मराठी_माणूस
वाचनीय
9 Apr 2012 - 7:46 pm | पैसा
भूले बिसरे गीत आणखी आठवून द्या!
11 Apr 2012 - 4:41 pm | स्मिता.
लेख खूप छान झालाय. लेखांमधल्या गाण्यांच्या अनुशंगाने बरीचशी गाणी पुन्हा वर आली आहेत.
असेच म्हणते.
9 Apr 2012 - 8:12 pm | मराठी_माणूस
छोटीसी बात मधले "ये दिन क्या आए' हे मुकेश चे गाणे त्याच प्रकारातील
9 Apr 2012 - 10:51 pm | अशोक पतिल
अगदी बरोबर ! लहानपणीचे दिवस ( ३०-३५ वर्षापुर्वीचे ) आठवल्यावर कसे गलबल्यासारखे होते . 'रीमझीम गिरे सावन' हे गाणे मी यु ट्यूबवर काही दिवसापुर्वी बघीतले...... तर त्या खाली ज्या comments होत्या त्याहि अश्याच भुतकाळ आठवण्यार्या, नास्टालजीक होत्या.