'एका दिशेचा शोध' हे संदीप वासलेकर यांनी लिहिलेले नवीन पुस्तक आहे. लेखक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक विचारवंत आहेत. मुंबईत त्यांची ' स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' नांवाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा सतत संवाद असतो. डोंबिवलीच्या एका छोट्या शाळेपासून सुरु झालेला त्यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे.
या पुस्तकात भारताच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मुद्यांवर सांगोपांग चर्चा केलेली आहे. या जगातील आपल्या देशासारखी वा त्याहूनही वाईट स्थिती असलेल्या देशांनी, त्यातून बाहेर पडून आपली सर्वांगीण प्रगति कशी करुन घेतली याविषयीची माहिती अत्यंत उदबोधक आहे. पुस्तकात अनेक प्रकरणे आहेत . त्यातील विशेष उल्लेखनीय, सिंहासन, आंधळी कोशिंबीर, हिमालयाला जेंव्हा ताप येतो, ही वाटतात.
आपला देश सुधारणे हे केवळ राज्यकर्त्यांचे काम नसून त्याची सुरवात आपल्या स्वतः पासून केली पाहिजे हे मुख्य सार आहे. ज्या देशातल्या सिंहासनावर लोकांचा अंकुश असतो, ज्या सिंहासनाला पायर्या असतात, किंबहुना ज्या देशातली सिंहासने छोटी असतात ते देश मोठे होतात, ही वाक्ये लक्षांत रहाण्यासारखी आहेत.
दहशतवादावरही लेखकाने आपली मते व अनुभव विस्तृतपणे मांडले आहेत. दहशतवादाचा मुकाबला हा बळाने कदापि यशस्वी होणार नाही तर त्यासाठी वाट चुकलेल्या या युवकांशी संवादानेच यावर मात करता येते हे अनेक उदाहरणांवरुन लेखकाने पटवून दिले आहे. आपल्या देशातली शिक्षणपद्धती, शेतकर्यांच्या समस्या यावरही लेखकाकडे ठोस उपाय आहेत.
आश्चर्य याचेच वाटते की अनेक देशांचे राज्यकर्ते वासलेकरांना चर्चेला बोलावतात तर भारतात असूनही आपले सरकार त्यांचा उपयोग का करुन घेत नाही ?
पुस्तक एकदा जरुर वाचावे असेच आहे.
एका दिशेचा शोध
लेखकः संदीप वासलेकर
राजहंस प्रकाशन
किंमत : रू.२५०/-
प्रतिक्रिया
20 Nov 2011 - 2:50 pm | दादा कोंडके
धन्यवाद ति.मा.
20 Nov 2011 - 3:43 pm | आत्मशून्य
थोडा अजून प्रकाश टाकता येइल काय ?
20 Nov 2011 - 4:12 pm | तिमा
'स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' ही वेबसाईट बघावी.
20 Nov 2011 - 7:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे
आपल्याकडील हिरे आपल्यालालाच गवसत नसतात ही तर खरी आपल्या राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे. पुस्तक परिचय आवडला.
20 Nov 2011 - 8:57 pm | काव्यवेडी
हे पुस्तक मी पण वाचले आहे. सर्वानी जरुर वाचावे असेच आहे.