सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो. पूर्वी फक्त हिंदी सिनेमांनाच नावं ठेवली जायची. कारण मराठी सिनेमा होता कुठे तेव्हा? आणि मुलं तर इंग्लिश मीडियममध्ये घातलेली. त्यामुळे हिंदी सिनेमे बघायचे, त्यात जे काही भलंबुरं दिसेल त्यातल्या फक्त बुऱ्या गोष्टींनाच नाकं मुरडायची. हे असलं सगळं चालू असतं. आता हे लोण मराठी सिनेमांना नावं ठेवण्यापर्यंत पोचलेलं आहे.
पण सिनेमाने जशा मारामाऱ्या करायला शिकवल्या तसं प्रेमही करायला शिकवलं हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. जितके तथाकथित समाजघातक संदेश दिले त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजपोषक विचार दिले हे लक्षात घ्यायला हवं. मला स्पष्टपणे आठवतंय. माझी आजी सांगायची की तिच्या आईला मातृप्रेम म्हणजे काही माहीतच नव्हतं. जेव्हा 'श्यामची आई' चित्रपट आला तेव्हा तिला आईचं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलं. 'माझ्या आईने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही' ती सांगत असे. 'आमच्या आसपासच्या सर्व मुलांचीही हीच कथा होती. त्यांच्या आयांना मुलांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणं, मुलांना मायेने जवळ घेणं, त्याला प्रेमाने डबा तयार करून देणं, आपल्या पोटचा घास काढून त्यांना भरवणं... या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. श्यामची आई सिनेमा बघितला आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. त्याचा आमच्या मनावर इतका गहिरा परिणाम झाला की तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला शिकलो.' श्यामची आई हा सिनेमा या मातृशिक्षणात यशस्वी झाला, तेव्हापासून सिनेमाने मागे वळून पाहिलेलं नाही. अक्षरशः शेकडो सिनेमांतून आई मुलांवर कसं प्रेम करते याचे धडे त्यांनी नवीन पिढीला दिले. हिरॉइनगिरी करण्याचे दिवस अचानक संपलेल्या निरुपा रॉय वगैरेंसारख्या नट्यांना त्यामुळे आईची भूमिका करायला संधी मिळाली. अमर, अकबर, ऍंथनीमधला सीन आठवून बघा. ती तिघं बिछडी हुई मुलं हॉस्पिटलच्या तीन खाटांवर पडून आपापलं रक्त एकाच वेळी बेशुद्ध निरुपा रॉयला देतात. तीन धर्मांची तीन मुलं पण आई एकच. साक्षात भारतमातेचंच रूप. यातून अनेकांना मातृभक्ती आणि प्रतीकात्मक रीत्या देशभक्तीही शिकायला मिळाली. सिनेमांचं हे ऋण आपणा सर्वांवर आहे, ज्यांच्या आया आपल्या मुलांवर प्रेम करायला सिनेमे पाहून शिकल्या.
आपल्यालाही हे ऋण फेडता यावं यासाठी सिनेमांनी काही उत्कृष्ट संस्कार दिले. म्हणजे आपल्या आईला (पुन्हा निरुपा रॉयच) गळ्यात फास लटकावून डगडगत्या पिंपावर उभं केलेलं असेल तर आपली शस्त्रं टाकून द्यायची हे सिनेमात आलं नसतं तर आपल्याला शिकता आलं असतं का? शंभर वर्षांपूर्वीच्या पोरांना हे शिकायला मिळालेलं नसल्यामुळे ती खुशाल आयांना मरू द्यायची. कर्तव्य पिक्चर आला आणि तेव्हापासून हे थांबलं. पण या चांगल्या बदलाकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाही. आईमुलांच्या प्रेमाबरोबरच बहन-भाईचा रिश्ता किती अटूट आणि गेहरा आहे हे सिनेमांच्या आधी कुठे माहीत होतं आपल्याला? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा म्हणत बापालाही रडायला अलाउड असतं हे समाजाला समजणं ही आत्ता आत्ताची गोष्ट. पूर्वी पोरीला सासरी पाठवताना खुशाल बाप दारू पिऊन नाच वगैरे करत असत. आपल्या मित्रासाठी, मैत्रीसाठी प्रेमाची 'कुर्बानी' द्यायची असते हीदेखील हिंदी सिनेमाचीच शिकवण. मग भले झीनत अमान कितीही अंगप्रदर्शन करत असो, मित्राची गर्लफ्रेंड ती मित्राची गर्लफ्रेंड. मित्रावरचं प्रेम सिनेमाने शिकवण्याआधी होतंच कुठे?
चांगल्याबरोबरच काही वाईट गोष्टीही यायला लागलेल्या आहेत हे खरं आहे. उदाहरणार्थ पूर्वी लोक १७ व्या वर्षी प्रेमात वगैरे पडत नसत. लग्नच लवकर व्हायची, त्यामुळे त्याच्या बऱ्याच आधी सरळ शरीरसंबंधच सुरू होत. मग कुठला आलाय प्रेम वगैरेसारख्या प्लेटॉनिक कल्पनांना वेळ? सिनेमांमुळे लग्नाचं वय पुढे गेलं आणि तरुणांना रिकामा वेळ निर्माण झाला. पूर्वी लोक मुकाट्याने चौदाव्या वर्षापासून गायी हाकायला वगैरे जात. सिनेमांमुळे ते कॉलेजांत वगैरे जायला लागले. आणि मग तिथे वेळ कसा जाणार म्हणून मग प्रेमात वगैरे पडायला लागले. नाहीतर १७ हे काय प्रेमात पडायचं वय आहे? असो. पण सिनेमाच्या परिणामांकडे बघताना नुसत्या छोट्याशा नकारात्मक गोष्टीकडे बघून चालत नाही. संपूर्ण गोळाबेरीज बघायला लागते. मुळात पूर्वीच्याकाळी सगळ्याच लोकांना भावना हा प्रकार काय असतो ते माहीत नव्हतं. सिनेमे पाहून समाज हे शिकला. सिनेमांचे आपल्या सगळ्यांवरच अनन्वित उपकार आहेत. मग त्यासाठी मुलांनी १७ व्या वर्षी प्रेमात पडण्याची छोटीशी किंमत द्यावी लागली तरी हरकत नाही.
पण मी आशावादी आहे. जर यापुढे १७ व्या वर्षी आपल्या प्रियेला सोडून जाऊन देशकार्यासाठी स्वतःला जखडून घेणाऱ्या हिरोंबद्दल सिनेमे निघाले तर तेही चित्र पालटेल. मी नक्कीच या बाबतीत आशावादी आहे.
प्रतिक्रिया
14 May 2014 - 11:47 pm | आत्मशून्य
अजुन कुल करायचे होते. उन्हाळा आहे.
14 May 2014 - 11:58 pm | सूड
समयोचित लेख !! *i-m_so_happy*
15 May 2014 - 1:28 pm | बालगंधर्व
गस्कदवी साहेब, चन्गले लिहिलेय. अजुण थोडा मासाला हवा होताआ. अजुण येउ दे.
15 May 2014 - 2:17 pm | तुषार काळभोर
दाहि दिशा मोकळ्या झाल्या की येईल अजून!!
15 May 2014 - 12:08 am | तुमचा अभिषेक
मस्त !
ना तो डिडीएलजे आला असता, ना मी वयात आलो असतो,
ना तो मैने प्यार किया आला असता, ना मी प्रेमात पडलो असतो ..
ना हम आपके कौन आला असता, ना मी तिला भिडलो असतो,
ना तो दिल तो पागल है आला असता, ना मी आयुष्यभर रडलो असतो..
15 May 2014 - 4:33 am | स्पंदना
हं!
बरोबर आहे तुमच. काही काळ सिनेमे समाजाच दर्शन करवत राह्यले अन काही काळाने समाज सिनेमाचं.
अर्थात उपदेशात्मक लिहायला आम्ही अजुन ती उच्च पातळी गाठली नसल्याने तुमच उपरौधिक चालु द्या.
15 May 2014 - 6:57 am | राजेश घासकडवी
मला तुमचा प्रतिसाद नीट कळला नाही. तुम्हाला खरंच वाटतं का सिनेमा नसताना आई-मूल, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, स्त्री-पुरुष यांच्यात प्रेम अस्तित्वात होतं? अहो सिनेमांनीच शिकवलं आहे हे सगळं. मला तर असं वाटतं की मुळात नाती, प्रेम ही संकल्पनाच सिनेमाने शिकवली. पण तुमचे विचार काहीतरी वेगळे वाटतात. कारण तुम्ही म्हणता की
हा टर्निंग पॉइंट नक्की कधी आला? कारण काही लोक तर म्हणतात की पूर्वी सिनेमा केवळ पौराणिक नाटकं, परीकथा वगैरेवर भर द्यायचा. सुरूवातीच्या काही सिनेमांची नावं तर पहा - श्री पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, कीचकवधम... पहिले टॉकीज - आलम आरा, भक्त प्रल्हाद, कालिदास, सती सावित्री. नंतर तो सामाजिक आशय वगैरे मांडायला लागला. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्या बरोब्बर विरुद्ध थियरी. औपरोधिक न होता खरोखरच तुम्हाला असं का वाटतं हे मांडलंत तर नक्कीच सिनेमाकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळेल.
15 May 2014 - 8:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ते असो. तुम्ही स्वाक्षरी का बदलत नाही ते आधी सांगा.
15 May 2014 - 7:31 am | जेपी
लेख आवडला.
15 May 2014 - 8:19 am | सस्नेह
हिंदी सिनेमांनी केलेलं मोठं काम म्हणजे राष्ट्रभाषेचा प्रसार. नाहीतर या अनेकभाषी देशात हिंदीला वाईट दिवस आले असते.
15 May 2014 - 9:04 am | जेम्स बॉन्ड ००७
सिनेमे हवेतच कशाला म्हणतो मी? संस्कारी पिढी आणि निरोगी समाज घडवायचा असेल तर लहानपणापासुनच मुलांना पुजेची पथ्यं आणि मुलींना स्वैपाकाची पथ्यं शिकवावीत..
15 May 2014 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वप्रथम लेख आवडला. लेखात अजून भर घालून घालता आली असती, म्हणजे आपला मुद्दा समजला असता. पण एक गोष्ट मलाही मान्य की चित्रपटाने प्रेम करायला शिकवलं पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र. (इ.स.१९१२/१३) पात्रांच्या हालचालीवरुन पात्रांना काय म्हणायचं आहे ते समजून घ्यावं लागलं. प्रेम हे असं मुकच असतं आणि ते असं समजून घ्यावं लागतं. मला वाटतं प्रेमाची मुहुर्तमेढ रोवली ती राजाहरिश्चंद्र या चित्रपटांनेच. पुढे ती राधा, तो कृष्ण, ती मीरा.. वगैरे हे सर्व अगदी स्वातंत्र्यापुर्वी कळु लागलं होतं. आणि मग लोकांच्या समोर आला तो 'महल' (१९४९) हा चित्रपट. चित्रपटात झोपाळ्यावर बसलेली वीशीची मधुबाला आणि थोराड सॉरी अडतीशीचा अशोक कुमार चेह-यावरच्या रेषा हलु न देता सिगारेट ओढत झोपाळ्याकडे जाणारा आणि लता मंगेशकरचा 'आयेगा आनेवाला आयेगा' या ब्याग्राउंडला वाजणार्या गीत आणि प्रसंगानी लोकांच्या मनात प्रेमाची भावना उभी केली. लोक आपल्या आजुबाजुला मधुबाला शोधु लागले. माझ्या आजोबाच्या मनात या चित्रपटातील प्रेमानं घर केलं आणि चित्रपटांनी जशी प्रेमाची परंपरा पुढे नेली तशी ती प्रेमाची परंपरा आमच्या पिढीत आली. आमचं वय तेव्हा १५ असेल. कोणत्याही शिक्षकानं १५ वय काय प्रेमाबिमाचं असतं किमान १७ पर्यंत तरी असा विचार आणू नये, असं कै शिकवलं नै. आणि मग आम्ही माधुरी दिक्षीत, जुही चावला, ती मैने प्यार किया वाली ती 'सुमन' काय नाव तिचं सालं विसरुन गेलो यांच्याभोवती आमचं मन पिंगा घालु लागलं. आणि मग आम्हीही प्रेम वगैरे काय असतो हे चित्रपट पाहुन शिकलो. कॉलेजला दांड्या मारु मारु आम्ही या चित्रपटातील प्रेमाच्या आणाभाका पाहिल्या आणि आमच्याही मनात मोगर्याच्या सुंगधासारखं प्रेम फुललं. आजही तो सुगंध आमच्याबरोबर दरवळतोय.(येतोय ना दरवळ)
बाकी, आईचं प्रेम, वडीलांच प्रेम, बहिनीचं प्रेम, वहिनीचं प्रेम (वहिनीच्या बांगड्या) मित्राचं प्रेम (दोस्त असावा तर असा)
अशा विविध चित्रपटातून कळु लागलं. नाय तर आमचं काय खरं नव्हतं. सालं आम्ही दगडच राहीलो असतो. शाळेतल्या मारामा-या (ढिशीम ढिशीम) चित्रपटातूनच कळल्या नै तर आमचा जन्म सुरपारंब्यातच गेला असता. शाळेतल्या पोरांना दगड मारुन कोचा पाडल्या. हेअर स्टाईल बीए.पर्यंत अमिताब बच्चन सारखी ठेवली होती पण तोवरही आमच्या आयुष्यात कोणी जया नं पाऊल ठेवलं नाही.
असो, चित्रपटाने खूप संस्कार केले (चांगले वाईट) याच्याशी सहमत. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होईल म्हणुन आवरते घेतो. नै तर चित्रपटाने कसे कसे संस्कार केले ते अजून लिहिलेच असते.
-दिलीप बिरुटे
15 May 2014 - 9:34 am | दिनेश सायगल
एक footnote लिहा तशी. नाही म्हणजे चित्रपटांची उदाहरणे विनोदी आहेत. पण तो विनोद तुमच्या लिखाणात कुठे औषधाला पण दिसला नाही.
15 May 2014 - 10:34 am | असंका
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही.
उडदामाजी काळे गोरे! काही लोक आपल्या कामात चांगले असतात, काही लोक नसतात. त्यावरून सरसकट सगळ्या सिनेमांबद्दल कसं मतप्रदर्शन करणार?
मुळात सिनेमा हे एक माध्यम आहे. आपली गोष्ट सांगण्याचं. जसं हे मिसळपाव किंवा इंटरनेट माध्यम आहे, तसंच. पण ते इतरांपेक्षा फार ताकदवान माध्यम आहे, आणि फार थोड्या वेळात ते आपला परीणाम करते.
सिनेमाची गोष्ट स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करते. शिवाय स्वप्न वास्तववादी व्हावं म्हणून सतत त्याची धडपड चालूच असते..आपण जे आयुष्य जगतो, ते इतरांच्या नजरेला कसे दिसत असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमा द्यायचा प्रयत्न करतो. सिनेमातल्या गोष्टीत आपल्या आयुष्यातल्या काही जागा गाळल्या गेल्या तरी बहुतांश इतर ठिकाणी त्या जागा भरल्या जातात. गाळलेल्या जागा भरणे सोपे असेल, तर तशा त्या भरायचा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे, कदाचित आपले आयुष्यही त्या सिनेमासारखे संगीतमय, रंगीत, आकर्षक होइल! ....हे असं मनात येणं अशक्य आहे का?
जे आपण आजुबाजूला बघतो, ते सगळे संस्कार आपल्यावर होतच असतात. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून स्विकारतो, काही न करण्यासारख्या किंवा टाळण्यासारख्या म्हणून. सिनेमात दाखवलेल्या गोष्टी म्हणजे बहुतांशवेळा एकांगी असतात. जसा पत्त्याचा बंगला. सगळ्या बाजूंनी जोवर बघितला जात नाही, तोवर तो बंगला छानच वाटतो. सिनेमा हा असा पत्त्याचा बंगला असतो. सगळ्या बाजूने तो बंगला दाखवणं न दाखवणं हे सिनेमा तयार करणार्यांच्या हातात असतं.
15 May 2014 - 11:03 am | बाळ सप्रे
+१
15 May 2014 - 11:12 am | राजेश घासकडवी
मी तर म्हणतोय की आपलं भावविश्वच सिनेमांमुळे तयार झालेलं आहे. त्याआधी काही नव्हतंच. मला सांगा, १७ व्या वर्षी प्रेम करायचं, किंवा बंगलेवाल्याच्या मुलीने रस्त्यावरच्या फळविक्याशी लग्न करायचं हे पूर्वी कधी व्हायचं का? आपल्याला साली श्रीमंताची पोरगी पटली पायजेल असं पूर्वीच्या गरीब मुलांच्या मनात तरी यायचं का? सिनेमांमध्ये हे सर्रास दाखवायला लागले तेव्हापासूनच या घटना वाढल्या. आता फॅंड्रीसारखे पिक्चर बघून उच्चवर्गियाच्या नाही तर उच्चवर्णियाच्या मुली हव्याशा झाल्या. नाहीतर पूर्वी असलं नसायचं हो.
15 May 2014 - 12:08 pm | सुबोध खरे
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. (त्या मुलीच्या सौंदर्य प्रसाधनांचा खर्च त्या फळ वाल्याच्या कमाई एवढा होता.) असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा?
15 May 2014 - 12:34 pm | असंका
(पाच सात प्रतिसाद तयार करून खोडून टाकले मी....पुन्हा पुन्हा आपला प्रतिसाद वाचून खिन्नपणे हसत होतो. ठीक आहे. आणि खरं सांगू, आपण जर माझ्या प्रतिसादावर काही उलट लिहिताल तर हेच लिहिताल हे मला आधी पण लक्षात आले होते- तुम्ही तेच तर म्हणत आहात जे मी वर म्हणालो. फक्त वर आणखी शेर दोन शेर टाकून.)
ते श्यामची आई कशाला मध्ये घेतलंत? ते नाव नस्तं तर मी काहीच बोललो नसतो.
19 May 2014 - 7:06 am | राजेश घासकडवी
तुम्हाला थोडी गंभीर चर्चा करायची आहे आणि माझ्या उपरोधाने मी तिची मुस्कटदाबी करतो आहे असं काहीसं वाटलं. तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला ठेवतो आणि गंभीरपणे बोलू.
अर्थातच, सगळ्याच बाह्य गोष्टींचा काही ना काही परिणाम होतोच. मात्र मुद्दा परिणाम होतो की नाही हा नाहीये, तर किती परिणाम होतो हा आहे. जेव्हा कोणीतरी म्हणतं की '१७ हे काय प्रेमात पडण्याचं वय आहे का? हे टाइमपास, फॅंड्री वगैरेसारखे सिनेमे बघून तरुणांच्या मनात भलत्या कल्पना येतात' अशा प्रकारचं विधान होतं, त्यात 'असे सिनेमे यायच्या आधी कोणीच १७ व्या वर्षी प्रेमात पडत नसत. असलेच तर त्यांचं प्रमाण नगण्य होतं.' थोडक्यात, ही प्रेमात वगैरे पडण्याची थेरं सिनेमातून शिकलेली आहेत. तेव्हा मग प्रश्न असा येतो की पूर्वी जेव्हा सिनेमा नव्हता तेव्हा सतरा वर्षांची पोरं काय करायची?
नगरीनिरंजन यांनी 'लाइफ इमिटेट्स आर्ट/ आर्ट इमिटेट्स लाइफ' हा मुद्दा मांडलेला आहे. हा लेख का लिहिला हे त्यांना बरोब्बर कळलेलं आहे. कला-जीवन हे नातं अत्यंत व्यामिश्र असताना या दोन टोकांपैकी एकच टोक स्वीकारणं हे चुकीचं आहे. हे दाखवून देण्यासाठीच या लेखाचा अट्टाहास होता. कारण प्रेमासारखी मानवी भावविश्वातली मूलभूत भावना सिनेमातून शिकली जाते असं म्हटलं तर इतरही सिनेमातूनच येतात असं म्हणावं लागतं. रिडक्शियो डि अॅब्सर्डम पद्धतीचा युक्तिवाद या लेखात आहे.
श्यामची आई पूर्णपणे इन्सिडेंटल आहे. त्याऐवजी एक क्ष सिनेमा म्हणूनही चाललं असतं. शामची आई हे ओळखीचं आणि आजीच्या लहानपणीचं म्हणून वापरलं इतकंच. टीका त्या विशिष्ट सिनेमावर नसून 'सिनेमांमधून मूलभूत भावना शिकल्या जातात' या भूमिकेवर आहे.
19 May 2014 - 10:25 am | अनुप ढेरे
घुसखोरीबद्द्ल क्षमस्व. घासकडवींशी सहमत आहे.प्रेम, द्वेश, भांडणं या नैसर्गिक संकल्पना आहेतच यावर दुमत नाहीच. त्यांच्या अस्तित्वाचा आणि सिनेमाचा संबंध नाहीच. सिनेमा यायच्या आधिही त्या होत्याच.
पण माझ्यामते सिनेमा हा प्रेम वगैरे सारख्या भावनांना मूर्त स्वरूप देतो. प्रेमाचं manifestation हे सिनेमा/ इतर कलाप्रकार प्रभावित करतात. सिनेमात दाखवतात तसंच करणं म्हणजेच प्रेम करणं असा समज होतो. हे केवळ सिनेमा नाही तर इतर अमेरिकन्/ईंग्लिश सिटकॉम्स पण प्रभावित करतात.
20 May 2014 - 10:18 am | बाळ सप्रे
धन्यवाद.. आणि विचारांशी सहमत..
लेखात उपरोधाचा डोस जरा जास्तच झाल्याने खरा विचार समजण्यात गोंधळच होत होता..
20 May 2014 - 5:04 pm | आनन्दा
असे दुसर्या टोकाला जाणे मला पटत नाही. सिनेमाचा प्रभाव पडतोच. म्हणजे मी सिनेमाचाच पडतो असे म्हणत नाही. संस्कारक्ष्॑म वयात माणसाला जे वाचायला, ऐकायला, पहायला मिळते, त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो यात शंका नाही. सिनेमा याला अपवाद कसा असू शकेल?
असो, यासाठी तळणीत एक जिलबी टाकवी असा विचार आहे. पाहतो वेळ मिळेल तेव्हा.
15 May 2014 - 12:13 pm | आत्मशून्य
पण तो विरोधाभासी मात्र नसावा.
15 May 2014 - 12:51 pm | चिगो
हा फारच व्वाईटरित्या चांगला जमलेला भाग आहे.. सिनेमा नसता तर ना मातृप्रेम,ना पितृप्रेम, ना बंधुप्रेम आणि ना प्रेमाच्या इतर कॅटॅगिर्या लोकांना कळल्या असत्या. मारे "सिनेमाचा प्रभाव नसतोच पडत" म्हणणार्यांनी सिनेमातली गाणी आणि डायलॉक मारुनच लायनी मारल्या आणि खोडल्या असतील.. आम्हाला नका गमजा सांगू, भौ..
लेख जमलाय मस्त, गुर्जी..
15 May 2014 - 1:18 pm | बॅटमॅन
खत्रा पञ्चेस जमलेले आहेत.
15 May 2014 - 2:54 pm | आदूबाळ
+२
पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख असल्याने रणकंदन माजणार.
15 May 2014 - 3:09 pm | सूड
>>पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख
उलट यामुळेच रणकंदन माजायची शक्यता फार्फार कमी आहे. ;)
15 May 2014 - 3:36 pm | साती
चित्रपटानी किती किती काँट्री दिलंय त्याचं काही काऊंटींगच नाही.
आमच्या तर कॉलेजनेपण लेक्चर सोडून चित्रपटांचे शुटींग करायला हॉल भाड्याने दिले होते.
मुन्नाभाई एम बी बी एस वैगेरे बघूनच पॉईजनिंग पेशंटला पेपर बनवायच्या आधी ट्रीटमेंट द्यायला, कॅन्सरच्या पेशंटला सायकॅट्रीक काऊंसेलिंग करायला,
शिकलो.
17 May 2014 - 11:01 pm | नगरीनिरंजन
पण अजूनही अनेक इस्पितळांतून जादू की झप्पी मिळत नसल्याने चिडून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर लोकांना मारहाण करतात. मी तर म्हणतो मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट वैद्यकीय अभ्यासक्रमात लावला जावा.
15 May 2014 - 4:45 pm | बॅटमॅन
गुंडांशी मारामारी कशी करायची तेही पिच्चरकडूनच शिकलो.
अर्थात प्रत्यक्षात कधी चान्स नै आला, चाण्स आलेल्यांची अवस्था पाहिली पण तोही पिच्चर न पाहण्याचाच परिणाम असे त्यांस बजावून पळून आलो, हाकानाका.
15 May 2014 - 8:36 pm | नगरीनिरंजन
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन!
चित्रपटातल्या नायकाप्रमाणे हमाली, दारुचा धंदा, श्रीमंतांच्या पोरींचा माज उतरवणे, फसवाफसवी, गँगवॉर वा स्मगलिंग यापैकी काहीच करत नसल्याचे आयुष्यभर बाळगलेले दु:ख तुमच्या लेखाने पुन्हा ताजे केले.
नशिब ऋशिकेष मुखर्जी व अमोल पालेकरांचे काही चित्रपट आले म्हणून मध्यमवर्गीय जगणं जगता येतंय नाहीतर कसं झालं असतं या कल्पनेने काटा येतो अंगावर.
बागा-बागांमध्ये झाडामागे पळापळी करत प्रेम करणे किंवा जितेंद्र-श्रीदेवीसारखं पोजेस देत प्रेम करणे हा प्रकार लोक कधी शिकणार याची फार काळापासून उत्सुकता आहे.
मुळात माणसाच्या इतिहासाचा विचार सिनेमासापेक्ष नव्याने करायला हवा. उत्क्रांतीच्या सिद्धांताची तर या पुराव्यापुढे लक्तरे निघतात.
जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते.
असो. तरीही लेख थोडा अपूर्ण वाटला. यात "समाजाचे देणे" हा भाग आलेला नाही. संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते तिचा उल्लेख लेखात राहून गेला असे वाटते.
15 May 2014 - 11:36 pm | राजेश घासकडवी
निकाल वगैरे लावण्यासाठी याबद्दल संदेह होताच कुठे? सामान्य जनांचे शब्द अर्थानुधावंते असतात, पण महान लोकांच्या बाबतीत अर्थ शब्दानुधावंते असतात. जेव्हा ते थोर ऋषि-मुनि बोलतात, तेव्हा त्या शब्दांनाच एक नवीन प्रमाण अर्थ प्राप्त होतो. जसजसे ऋषिमुनि संपत गेले तसतसा नाटक-सिनेमा त्यांची जागा भरून काढू लागला. त्यामुळे त्या कलाकृतींमधून जे 'शब्द' किंवा विधानं आली ती प्रमाण ठरायला लागली. आणि त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सिनेमांमध्ये काय दाखवलं आहे याचा परिणाम व्हायला लागला. कारण सामान्य माणूस हा आदर्शांकडे टक लावून बघतो. मग ज्यांच्याकडे टक लावून बघायला झालं ते हिरो-हिरॉइनीच त्याचे आदर्श झाले. आणि मग तिथूनच सर्व लाइफ इमिटेटिंग आर्ट सुरू झालं. आर्टला इमिटेट करणार नाहीतर इमिटेट करायला दुसरं आहे तरी काय? आणि इमिटेट न करता आपल्या आपण काही करावं इतका प्रगल्भ थोडाच आहे माणूस?
एक्झॅक्टली! कुठच्यातरी एका आदिवासी समाजात पुरुषांचा उपयोग काय - मूल तर स्त्रीला होतं - असा प्रश्न पडलेला असल्याचं मी ऐकलेलं आहे. मागास समाजात सिनेमे न पोचल्यामुळे कशी दुरवस्था होते हे उघडच दिसून येतं. त्या समाजाला म्हणे शेती करायला लागल्यावर 'अच्छा, बी टाकली की जमिनीत काहीतरी उगवतं!' हे पाहून समजलं म्हणे. आता त्याच जागी जर हिंदी सिनेमे असते तर 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बनने वाली हूॅं.' नंतर येणाऱ्या ढॅण् बरोबरच समजलं नसतं का?
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात. आत्तापर्यंतच्या इतिहासात माणसाने देवाचं दर्शन मिळावं म्हणून किती प्रयत्न केले. संतांनी त्याची आळवणी केली, ऋषिमुनिंनी घोर तपश्चर्या केली. पण त्या काळी सिनेमेच नव्हते. आणि आपण असे नतद्रष्ट की आपल्यासमोर आज हजारोंनी सिनेमे आहेत, पण आपल्या डोळ्यासमोर देव असून दिसत नाही. परीस शोधणाऱ्या, आणि तो हाती गवसूनही न कळलेल्या माणसाप्रमाणे आपण वागत आहोत.
17 May 2014 - 11:47 pm | आत्मशून्य
मानवी मनाची संवेदनशिलता आज धुळीस मिळवली याचेच हे ध्योतक असावे. ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रामींगव्र प्रभुत्व आले म्हणजे जिवनाचे कोडे सूटल्याचा जो थाट आज मनाला रुजलाय त्याची विशारी फळे आज ना उद्या आपणच भोगणार... आयुष्य फार निरागस होते जेंव्हा अॅपल आणी ब्लॅकबेरी फक्त फळे होती, चित्रपटकला समृध्दीचा तो सुखाचा काळ होता. तुझे आहे तुझपाशी परी तु संस्थळ चुकलाशी.. कालाय तस्मै नं:. इत्यलम् आणी बरेच काही
15 May 2014 - 11:08 pm | कवितानागेश
ओक्के. म्हणजे कम्युनिझममुळे जसे भांडवलदार कामगारांवर अन्याय करायला शिकले तसेच काहीसे दिसतय हे प्रकरण! ;)
17 May 2014 - 11:10 pm | प्यारे१
चांगलं लिहीलंय. शुद्धलेखन देखील उत्तम. :)
18 May 2014 - 11:38 pm | संजय क्षीरसागर
नामक एका विलक्षण आयडीची ही लक्षवेधी कमेंट वाचून लेखाचा परिणाम नक्की कोणत्या स्तरावर झालायं हे सहज लक्षात येतं!
19 May 2014 - 9:24 pm | आदूबाळ
विचक्षण म्हणायचंय तुम्हाला ;)
19 May 2014 - 10:28 pm | संजय क्षीरसागर
वरनं बालगंधर्वांच औक्षण... आता तूच काय ते ठरव!