सिनेमा आणि प्रेम
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो. पूर्वी फक्त हिंदी सिनेमांनाच नावं ठेवली जायची. कारण मराठी सिनेमा होता कुठे तेव्हा? आणि मुलं तर इंग्लिश मीडियममध्ये घातलेली. त्यामुळे हिंदी सिनेमे बघायचे, त्यात जे काही भलंबुरं दिसेल त्यातल्या फक्त बुऱ्या गोष्टींनाच नाकं मुरडायची. हे असलं सगळं चालू असतं. आता हे लोण मराठी सिनेमांना नावं ठेवण्यापर्यंत पोचलेलं आहे.
पण सिनेमाने जशा मारामाऱ्या करायला शिकवल्या तसं प्रेमही करायला शिकवलं हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. जितके तथाकथित समाजघातक संदेश दिले त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजपोषक विचार दिले हे लक्षात घ्यायला हवं. मला स्पष्टपणे आठवतंय. माझी आजी सांगायची की तिच्या आईला मातृप्रेम म्हणजे काही माहीतच नव्हतं. जेव्हा 'श्यामची आई' चित्रपट आला तेव्हा तिला आईचं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलं. 'माझ्या आईने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही' ती सांगत असे. 'आमच्या आसपासच्या सर्व मुलांचीही हीच कथा होती. त्यांच्या आयांना मुलांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणं, मुलांना मायेने जवळ घेणं, त्याला प्रेमाने डबा तयार करून देणं, आपल्या पोटचा घास काढून त्यांना भरवणं... या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. श्यामची आई सिनेमा बघितला आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. त्याचा आमच्या मनावर इतका गहिरा परिणाम झाला की तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला शिकलो.' श्यामची आई हा सिनेमा या मातृशिक्षणात यशस्वी झाला, तेव्हापासून सिनेमाने मागे वळून पाहिलेलं नाही. अक्षरशः शेकडो सिनेमांतून आई मुलांवर कसं प्रेम करते याचे धडे त्यांनी नवीन पिढीला दिले. हिरॉइनगिरी करण्याचे दिवस अचानक संपलेल्या निरुपा रॉय वगैरेंसारख्या नट्यांना त्यामुळे आईची भूमिका करायला संधी मिळाली. अमर, अकबर, ऍंथनीमधला सीन आठवून बघा. ती तिघं बिछडी हुई मुलं हॉस्पिटलच्या तीन खाटांवर पडून आपापलं रक्त एकाच वेळी बेशुद्ध निरुपा रॉयला देतात. तीन धर्मांची तीन मुलं पण आई एकच. साक्षात भारतमातेचंच रूप. यातून अनेकांना मातृभक्ती आणि प्रतीकात्मक रीत्या देशभक्तीही शिकायला मिळाली. सिनेमांचं हे ऋण आपणा सर्वांवर आहे, ज्यांच्या आया आपल्या मुलांवर प्रेम करायला सिनेमे पाहून शिकल्या.
आपल्यालाही हे ऋण फेडता यावं यासाठी सिनेमांनी काही उत्कृष्ट संस्कार दिले. म्हणजे आपल्या आईला (पुन्हा निरुपा रॉयच) गळ्यात फास लटकावून डगडगत्या पिंपावर उभं केलेलं असेल तर आपली शस्त्रं टाकून द्यायची हे सिनेमात आलं नसतं तर आपल्याला शिकता आलं असतं का? शंभर वर्षांपूर्वीच्या पोरांना हे शिकायला मिळालेलं नसल्यामुळे ती खुशाल आयांना मरू द्यायची. कर्तव्य पिक्चर आला आणि तेव्हापासून हे थांबलं. पण या चांगल्या बदलाकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाही. आईमुलांच्या प्रेमाबरोबरच बहन-भाईचा रिश्ता किती अटूट आणि गेहरा आहे हे सिनेमांच्या आधी कुठे माहीत होतं आपल्याला? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा म्हणत बापालाही रडायला अलाउड असतं हे समाजाला समजणं ही आत्ता आत्ताची गोष्ट. पूर्वी पोरीला सासरी पाठवताना खुशाल बाप दारू पिऊन नाच वगैरे करत असत. आपल्या मित्रासाठी, मैत्रीसाठी प्रेमाची 'कुर्बानी' द्यायची असते हीदेखील हिंदी सिनेमाचीच शिकवण. मग भले झीनत अमान कितीही अंगप्रदर्शन करत असो, मित्राची गर्लफ्रेंड ती मित्राची गर्लफ्रेंड. मित्रावरचं प्रेम सिनेमाने शिकवण्याआधी होतंच कुठे?
चांगल्याबरोबरच काही वाईट गोष्टीही यायला लागलेल्या आहेत हे खरं आहे. उदाहरणार्थ पूर्वी लोक १७ व्या वर्षी प्रेमात वगैरे पडत नसत. लग्नच लवकर व्हायची, त्यामुळे त्याच्या बऱ्याच आधी सरळ शरीरसंबंधच सुरू होत. मग कुठला आलाय प्रेम वगैरेसारख्या प्लेटॉनिक कल्पनांना वेळ? सिनेमांमुळे लग्नाचं वय पुढे गेलं आणि तरुणांना रिकामा वेळ निर्माण झाला. पूर्वी लोक मुकाट्याने चौदाव्या वर्षापासून गायी हाकायला वगैरे जात. सिनेमांमुळे ते कॉलेजांत वगैरे जायला लागले. आणि मग तिथे वेळ कसा जाणार म्हणून मग प्रेमात वगैरे पडायला लागले. नाहीतर १७ हे काय प्रेमात पडायचं वय आहे? असो. पण सिनेमाच्या परिणामांकडे बघताना नुसत्या छोट्याशा नकारात्मक गोष्टीकडे बघून चालत नाही. संपूर्ण गोळाबेरीज बघायला लागते. मुळात पूर्वीच्याकाळी सगळ्याच लोकांना भावना हा प्रकार काय असतो ते माहीत नव्हतं. सिनेमे पाहून समाज हे शिकला. सिनेमांचे आपल्या सगळ्यांवरच अनन्वित उपकार आहेत. मग त्यासाठी मुलांनी १७ व्या वर्षी प्रेमात पडण्याची छोटीशी किंमत द्यावी लागली तरी हरकत नाही.
पण मी आशावादी आहे. जर यापुढे १७ व्या वर्षी आपल्या प्रियेला सोडून जाऊन देशकार्यासाठी स्वतःला जखडून घेणाऱ्या हिरोंबद्दल सिनेमे निघाले तर तेही चित्र पालटेल. मी नक्कीच या बाबतीत आशावादी आहे.
प्रतिक्रिया
अनकुल न म्हणता येण्या इतपत कुल लिखाण.
समयोचित लेख !!
गस्कदवी साहेब, चन्गले लिहिलेय
१० दिशा
मस्त !
हं!
मला तुमचा प्रतिसाद नीट कळला
ते असो. तुम्ही स्वाक्षरी का
लेख आवडला.
बातमे दम है !
सिनेमे हवेत कशाला?
च्यायला, तुम्ही पण ना... ;)
विनोदी लेख का?
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर
+१
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी
(पाच सात प्रतिसाद तयार करून
थोडं गंभीरपणे...
घुसखोरीबद्द्ल क्षमस्व.
तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला
असे दुसर्या टोकाला जाणे मला
उपरोध जरुर असावा...
वाईट्ट..
+१
+२
>>पण तरी सीरियसनेसपणा आणि
सहमत!
पण अजूनही अनेक इस्पितळांतून
गुंडांशी मारामारी कशी करायची
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल
बहुतेक विज्ञानाच्या अतिरेकाने
ओक्के. म्हणजे कम्युनिझममुळे
चांगलं लिहीलंय. शुद्धलेखन
`बालगंधर्व'
विचक्षण म्हणायचंय तुम्हाला
एकतर लेख ट्रॅक्शन लावून ताणलायं,