मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'अल्लाह्'- 'अल्लाह्' मधील फरक

प्रदीप · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बर्‍याच तरूण मित्रमैत्रिणींच्या तोंडून नसरत फते अली खाँ ह्यांच्या 'अल्लाह् हू' विषयी ऐकले होते. सगळेच ऐकलेले केवळ कौतुकच होते, तेव्हा आज वेळ काढून मुद्द्दाम ते यूट्यूबवर पाहिले/ऐकले. हे संपूर्ण सुमारे पंचवीस मिनीटांचे सादरीकरण आहे. अगदी खरेच सांगतो-- कसेबसे शेवटपर्यंत पाहिले/ ऐकले. कारण जी स्तुति मी ऐकले होती, त्याचे कारण मला कुठेच सापडले नाही, तेव्हा 'आता काही सुंदरसे, आतून हलवणारे येईल, नंतर येईल' असे करत राहिलो. शेवट झाला आणि अत्यंत निराशाच पदरी पडली. एखाद्या गायकाने/ गायिकेचे गाणे, माझ्या मते, नुसते ऐकावे. शक्यतोंवर डोळे बंद करून ऐकावे. उगाच व्हिज्यूअल्सचे डिस्ट्रॅक्शन नको. तेव्हा इथे तसेच करण्याचा प्रयत्न केला. आणि काहीही पदरात पडले नाही. जवळजवळ संपूर्ण वेळ सरगम, सुरांची कसरत हेच चाललेले होते असे वाटले. ह्या सुरांतून काहीतरी निश्चीत भाव पोहोचवायचे आहेत, ह्याचा गायकाला विसर पडला होता असे वाटले. स्वतःची गायनावरील हुकूमत दाखवावयास असे भक्तिपर गीत कशास हवे? ह्या 'अल्लाह्' गीतावरून अर्थात आठवले साहिरचे 'अल्लाह् तेरो नाम'. मग यूट्यूबवरच केवळ गीताचा दुवा शोधला, आणि ते गीत पुन्हा एकदा ऐकले. हे मी कितीदा ऐकले आहे, आणि त्यात प्रत्येकवेळा तीच तीव्र सद्भावना जाणवली आहे, ह्याचा मला आता पत्ता नाही. 'ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले, बलवनों को दे दे ग्यान, सब को संमति दे भगवान, अल्लाह् तेरो नाम, ईश्वर तेरो नाम' -- साहिरचे लिखाण अनेकदा मीटरमधे नसायचे. त्यातून जयदेव ह्यांची कठीण चाल, त्यावरील हरकती (उदा. 'निर्बल को बल देने वाले' ह्यातील 'को' ज्या तर्‍हेने लांबवावा लागला आहे, तिथली खास लता टचची जागा)! सगळेच विलक्षण, थरथरून टाकणारे, आत कुठेतरी थेट गीताची भावना पोहोचवणारे! जयदेव ह्यांच्या अनेक गीतांतून चाल संथ पुढे चाललेली असते,म्हणजे शब्द विस्तारून, विखरून टाकलेले असतात. असे शब्दोच्चार जबाबदारीने व अगदी नेमके करणे हे तर लताचे एक वैशिष्ट्यच आहे. गीतात मागे कोरस आहे. कुठल्याही दुसर्‍या कोरस गीतात मी कोरस व मुख्य गायक/ गायिका ह्यांचा ओव्हरलॅप ऐकलेला नाही. ह्यात तो तसा आहे, आणि ही ह्या संगीतरचनेची अजून एक खुबी आहे. मागील काँट्राही लक्षणीय ठरावे. दोन अल्लाह् गीतांत हा प्रचंड फरक मलाच जाणवला, की तो इतरही कुणास जाणवला आहे? बहुधा मीच आता म्हातारा होत चाललेलो असावो, ही शक्यता आहेच!

वाचने 6554 वाचनखूण प्रतिक्रिया 19

अस्वस्थामा गुरुवार, 10/18/2012 - 21:12
गाण्याची आवड वक्ती सापेक्ष असू शकते.. त्यामुळे नाही आवडलं तर नाही आवडलं.. नुसरत फते अली यांनी कष्ट तर घेतले आहेत गाण्यामध्ये.. पण एवढे पण काही खास नाही वाटलं.. असो.. यावरून एक दुसरे सुफी गाणे आठवले, जुगनी जी. सिंधी शब्द, सुरेख अर्थ आणि आरिफ लोहार यांनी मनापासून गान सुंदर केलंय.. दोन्ही गाण्याचा हेतू एकच तसा ..

सोत्रि गुरुवार, 10/18/2012 - 21:16
बहुधा मीच आता म्हातारा होत चाललेलो असावो, ही शक्यता आहेच!
शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही दिलेला दुवा हा 'सुफी कव्वाली' ह्या गाण्याचा प्रकार आहे. त्यात देवाची आराधाना ही अशीच जरा आक्रमकपणे केली जाते. त्यात एक प्रकाराचा कैफ असतो आणि त्यातुन तादात्म्य पावल्याची भावना व्यतीत होते. - (सुफी कव्वाली आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

पिवळा डांबिस Fri, 10/19/2012 - 10:13
मला हे गाणे खूप चांगले वाटते. आणि ते माझ्या संग्रही सीडीमध्ये (व्हिज्युअलच्या विना) आहे. हे गाणे आणि अन्य सूफी संगीत उत्तम आहे. ते वेगळं आहे, पण उत्तम आहे. बाकी या गाण्याची 'अल्ला तेरो नाम'शी तुलना करून अल्ला तेरो नाम कसं श्रेष्ठ आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न खटकला. लता मंगेशकर या श्रेष्ठ गायिका आहेत, त्यांनी हिन्दी चित्रपटांत गायलेली गाणी सुरेख आहेत यात शंकाच नाही. पण ज्यांनी त्यांचा लाईव्ह प्रोग्राम पाहिला असेल त्यांतल्या काही जणांना लताजींचा निर्गुण निराकार अविर्भाव, मग गाणं कुठल्याही भावना व्यक्त करणारं असो, खटकतो! (वरील काही ओळी हायलाईट केलेल्या आहेत, उगाच प्रतिसादांची मारामारी नको!!) पण एक गाणं लाईव्ह परफॉर्मन्समधलं आणि त्याची तुलना करतांना बेंचमार्क मात्र (अनेक रीटेक घेऊ शकता येत असलेल्या) पार्श्वसंगीतातील गाण्याचा अशी तुलना नसावी... तुम्ही अशाच सूफी संगीतात असलेलं, "आया तेरे दरपे दीवाना" ऐकावं अशी शिफारस करतो... चूभूद्याघ्या...

In reply to by पिवळा डांबिस

सुधीर Fri, 10/19/2012 - 11:00
"आया तेरे दरपे दीवाना" (वीर-झारामधलंच ना? नाहीतर दुसरं अजून कुठलं असेल तर कल्पना नाही) ही कव्वाली मलाही खूप आवडते. त्यातले बोल खूप भारी वाटतात.

दादा कोंडके गुरुवार, 10/18/2012 - 21:30
दोन अल्लाह् गीतांत हा प्रचंड फरक मलाच जाणवला, की तो इतरही कुणास जाणवला आहे? बहुधा मीच आता म्हातारा होत चाललेलो असावो, ही शक्यता आहेच!
मी सुद्धा नुसरतफतेहअली खानांचा फ्यान आहे. मला त्यांची असंख्य गाणी आवडतात. पण ही कव्वाली मला पण आवडली नाही. अल्लागीतच म्हणायचं तर मला त्यांचं हे गाणं अतिशय आवडतं. (अर्थात ही कव्वाली नाही उलटपक्षी पॉप प्रकार आहे). तुम्हाला हे आवडलं का सांगा.

निमिष ध. गुरुवार, 10/18/2012 - 23:51
हा एक वेगळा प्रयत्न या वेळच्या कोक स्टूडीओ मधला. नुरान भगिनी आणि हितेश सोनिक यांनी अल्लाहू गाण्याला सुफी ढंगातील रॉक मध्ये सदर केले आहे. आणि जर आशय समजून घेतला तर अतिशय उत्तम गाणे आहे. मला वाटते जर आताच्या पिढीला अशी चांगली कविता रॉक मध्ये ऐकवली आणि त्यांना ती आवडली तर अतीशय उत्तम !!! http://www.youtube.com/watch?v=Pt0nqbSJiEE

इस्लाम निरिश्वर किंवा निराकारवादी धर्म आहे. अल्ला कुठेही नाही आणि तोच सर्वत्र आहे हा त्याचा दावा आहे, आणि निराकाराला समर्पण ही त्याची भावना आहे. सूफी संगीत इस्लामच्या या सिद्धांताच प्रकटीकरण आहे. कव्वलीतली शायरी पहा: ये जमीं जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज ना थे, आसमां जब न था, राजे-हक भी किसीपर अया जब न था, तब ना था कुछ यहां, था मगर तू ही तू अल्ला हू, अल्ला हू, अल्ला हू ( ही जमीन नव्हती, हे जग नव्हत, चंद्र-सूर्य नव्हते, आकाश (देखील) नव्हतं, सृष्टीनिर्मितीचा (रहस्यमयी) नियम नव्हता, जेव्हा इथे काहीही नव्हतं तेंव्हाही तू होतास!) ला लिल्लाह तेरी शान या वाहदाऊ, तू खयालो-तज्जसूस, तूही आरजू, आंखकी रौशनी दिलकी आवाज तू था भी तू, है भी तू, होगा भी तूही तू ( अल्ला ही तुझी शान, हे एकत्व तूच (माझं) चिंतन, शोध; तूच इच्छा, तूच दृष्टी आणि तूच हृदयाचा आवाज तूच होतास, आहेस आणि तूच असशील अल्ला हू, अल्ला हू, अल्ला हू. ही कव्वाली अनेक वेळा ऐकली होती. आज तुमच्यामुळे नुसरतनं तयार केलेला अप्रतिम माहौल पहायला मिळाला. अत्यंत बेभान होऊन एका कडेलोटाप्रत नेणारं आणि कमालीच्या अस्थिरतेनं सौंदर्य निर्माण करणारं हे सूफी संगीत, एकदम खल्लास... धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

विसुनाना Fri, 10/19/2012 - 11:05
'अल्लाह हू' हे सूफी गाणे ऐकल्यासारखे आहे. 'अल्लाह तेरो नाम' तर काय नेहमीचे आहे. सूफी गाण्यात एक झिंग आहे. डोके सतत मागेपुढे हालवल्यावर चक्कर येते.तशी झिंग हे गाणे ऐकल्यावर येते. नाचूननाचून अंगातली रग जिरवून क्लांत झाल्यावर अल्लाहला शरण जाण्याची भावना या गाण्यातून येते. लता मंगेशकरांच्या गाण्यात एक आर्तता आहे. ती ईश्वराची प्रार्थना असल्याने ते स्वाभाविकच आहे. ते गाणे ऐकून शांतरसाचा अनुभव येतो. अर्थातच, कोणत्या मार्गाने ईश्वराची साधना करायची याचे स्वातंत्र्य पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीत आहे. त्यामुळे दोन्ही (प्रकारची) गाणी स्विकारायला हरकत नसावी. उदा. आता हेच पहा: ये जमीं जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज ना थे, आसमां जब न था, राजे-हक भी किसीपर अया जब न था, तब ना था कुछ यहां, था मगर तू ही तू अल्ला हू, अल्ला हू, अल्ला हू हे तत्त्वज्ञान शांतरसात असे मांडता येईल : (नव्हे, फार पूर्वीच मांडले गेले आहे) नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत | किमावरीव: कुहकस्यशर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं || आणि हे त्याचे आर्वाचिन भाषांतर : सृष्टीसे पहले कुछ नहीं था... सत भी नही, असत भी नही अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था... छिपा था क्या ,कहां,किसने ढका था.... उस पल तो आगम,अटल जल भी कहां था... सृष्टीका कौन है कर्ता ?... कर्ता है वा अकर्ता ? ऊंचे आकाशमे रहता... सदा अध्यक्ष बना रहता... वोही सच मुचमे जानता या नही भी जानता... है किसीको नही पता.... नही पता, नही है पता, नही है पता ...... किंवा मराठीत : जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा अर्थ तोच, भाषा वेगळी - सादरीकरण वेगळे, इतकेच!

In reply to by विसुनाना

सुधीर Fri, 10/19/2012 - 11:25
नासदीय सुक्तांवर लोकमान्यांनी खूप चांगली टिका (विश्लेषण) केली आहे. त्यामुळे वरील संस्कृत श्लोकांचा अर्थ चांगला समजला. मराठीतली ही वेगळी मांडणी आजच कळली.

मदनबाण Fri, 10/19/2012 - 10:37
ह्म्म...नुसरतफतेहअली यांचे हे गाणं एव्हढ काही आवडलं नाही. मला त्यांची काही गाणी आवडतात,त्यातली २ इथे देतो. हे लिसा रे च्या "अदांमुळे" जास्त आवडलं ! ;)

प्रदीप Fri, 10/19/2012 - 20:39
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार, विशेषतः विसूनानांचे-- त्यांचा सविस्तर प्रतिसाद खास आवडला. हिंदी चित्रपट संगीतात कव्वाल्या अगदी चाळीशीच्या दशकापासूनच येत राहिलेल्या आहेत, त्यातील अनेक प्रेमभावाभोवतीच्या होत्या हे खरे, पण काही भक्तिपरही होत्या. तेव्हा त्यातील जोश, ढोलकचा झुलवणारा ठेका वगैरे मला अजिबात नवीन नाहीत. ह्या भक्तिपर कव्वाल्या सूफी पंथातून आलेल्या आहेत, इत्यादी माहिती गेल्या काही वर्षांत, इंटरनेटच्या कृपेने मिळाली, पण हा गायनप्रकार पूर्वीपासून माझ्या कानात आहे, मला तो खूप आवडतोही. पिवळा डांबिस ह्यांनी निर्देशीत केलेली 'वीर झारा'तील कव्वाली त्या 'जुन्या' काळातील एक बुजूर्ग संगीतकार मदन मोहन ह्यांनी केलेल्या काही संगीत रचनेचा, त्यांच्या म्रुत्यूनंतर पंचवीस वर्षांनंतर वापर करून बांधली गेली आहे, ती अप्रतिमच आहे. त्यांच्याच 'लैला मजनू' तील दोन कव्वाल्याही मला आवडलेल्या आहेतः तेरे दर पे आया हूं होके मायूस तेरे दर से सवाली न गया तसेच अजून खूप आवडलेली भक्तिपर ही कव्वाली सत्तरीच्या दशकात कधीतरी आलेल्या 'गरम हवा' मधील आहे. अलिकडे साब्री ब्रदस्रच्या कव्वाल्याही आर्त भाव व्यवस्थित श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात सफल होत. मात्र नसतर फते अलींच्या 'अल्लाह् हू' ने माझी घोर निराशा केली, कारण ते अगदी कसरतबाज गायन आहे, असे मला वाटले. त्यामुळे मी व्यथित झाले, व त्याच 'अल्लाह्' हाकेपासून सुरू होणारे मला माहिती असलेले गीत मी ऐकले, तेव्हा मला बरे वाटले. ही दोनी गीते विभिन्न शैलीतील आहेत ह्याची मला जाण आहे. त्यामुळे त्यांची मी तुलना केलेली नाही. पण गाणे इतके कसरतबाज अले तरी ते तरूणांना का आवडावे, असा प्रश्न मला पडला. इतरांच्या आवडीबद्द्दल आदर आहेच, तेव्हा ती आवड तशी का आहे ह्याचा शोध घेता आला तर घ्यावा, म्हणून मी हा लेखप्रपंच केला. भारतात सुमम संगीताचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीत गेल्या दोनेक दशकात आमूलाग्र फरक पडला आहे असे मला जाणवत आहे. पूर्वी गीताच्या केवळ श्राव्य अनुभवावरून श्रोत्यांची आवडनिवड ठरत असे. चित्रपटातील गीते पडद्यावर कुणी व कशी साकारलेली आहेत हे फारसे पहाता शक्य नसे, व त्याची कुठेही कमतरताही कुणाला भासली नसावी. गेल्या दोन दशकात मात्र भारतात गीताच्या व्हिज्युअल परिणामाने त्याच्या श्राव्य परिणामावर मात केलेली आढळते. वरील काही प्रतिसाद माझे हे निरीक्षण अधोरेखित करत आहेत. ह्या 'आक्रमक' शैलीचा खास मराठी आविषकार इथे पहा. गाण्यातील करूण भाव राहिले बाजूला, इथे काही वेगळेच चालले आहे. आपण अगदी कठीण सुरावटींशी किती लीलया खेळतो, ते दाखवण्यास गायिका उत्सुक आहे. लता मंगेशकर किती टेकमध्ये गाणे गाऊन जात, आणि कव्वालीसारख्या लाईव्ह परफॉर्मन्समधे चुकीला वाव असतो का, वगैरे मुद्द्यांबद्दल जरूर चर्चा करता येईल, पण तशी ती इथे नको. काही गीतांचे दुवे देण्याबद्दल प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे. मी त्यातील सिंधी गीत व दादा कोंडकेंनी दिलेल्या नसरतच्याच दुसर्‍या एका गीताचे, असे दोन्ही दुवे पाहिले/ ऐकले. दोन्ही आवडले. सवडीनुसार इतर दुवेही अवश्य बघेन.

पैसा Fri, 10/19/2012 - 22:32
सवडीने वाचायला हा लेख ठेवून दिला होता, त्याचं चीज झालं! लेख आणि प्रतिसाद, त्यात दिलेली गाणी सगळं छान आहे. नुसरत फतेह अलींचं गाणं हे जास्त गायकी ढंगाचे तर लताचे सुगम, भावनाप्रधान म्हणायला हरकत नाही. दोन्हीही आपाआपल्या परीने छानच आहेत. पण गाण ऐकतानाच्या त्या त्यावेळच्या मूडवर गाणं आवडणं नावडणं कधी कधी अवलंबून असतं. अर्थात लताची गाणी सुगम म्हटली तरी त्यातील तयारी भावनेच्या मागे लपून रहाते. आजकालच्या स्पर्धा कार्यक्रमांमधे लाताची गाणी फार कोणी म्हणायला जात नाहीत, किंवा म्हटलीच तरी ती स्पर्धकांना फार कमी गुण मिळवून देतात. यातच लताची गाणी किती कठीण आहेत हे समजून यावे. लताचं हे आणि प्रभू तेरो नाम ही दोन गाणी मला खूप आवडतात. कोणत्याही मनस्थितीत शांतता मिळवून द्यायची ताकद त्यात आहे. @पिडां, लता एका टेकमधे संपूर्ण गाणं रेकॉर्ड करण्यासाठी प्रसिद्ध आणि संगीतकारांची आवडती होती. आणखी एका बाबतीत मतभेद आहे, लताच्या चेहर्‍यावर भावना दिसत नाहीत असं लोक म्हणतात, पण त्या भावना लताच्या गाण्यात पुरेपूर उतरलेल्या असतात. अनेकदा मठ्ठ नायिकांची गाणी केवळ लताच्या आवाजामुळे सुसह्य झालेली आहेत.

पिवळा डांबिस Sat, 10/20/2012 - 02:05
लता मंगेशकर किती टेकमध्ये गाणे गाऊन जात, आणि कव्वालीसारख्या लाईव्ह परफॉर्मन्समधे चुकीला वाव असतो का, वगैरे मुद्द्यांबद्दल जरूर चर्चा करता येईल, पण तशी ती इथे नको. मान्य आहे. पण एक स्पष्ट केलं पाहिजे की इथे लताबाईंच्या गाण्याचं उदाहरण दिलं आहे म्हणून त्यांचं नांव आलं. त्याजागी "क्ष" गायक कोणीही घ्या. माझ्या मुद्दा हा लाईव्ह व्हर्सेस संकलित केलेल्या गाण्याच्या क्वालिटिबद्दलचा होता, कुणा एका गायक्/गायिकेला टार्गेट करून नव्हे. लताचं हे आणि प्रभू तेरो नाम ही दोन गाणी मला खूप आवडतात. कोणत्याही मनस्थितीत शांतता मिळवून द्यायची ताकद त्यात आहे. सहमत आहे. मलाही त्यांची ही आणि इतर असंख्य गाणी आवडतात. @पिडां, लता एका टेकमधे संपूर्ण गाणं रेकॉर्ड करण्यासाठी प्रसिद्ध आणि संगीतकारांची आवडती होती. असहमत आहे. माझ्याकडची माहिती वेगळी आहे. मलावाटतं खुद्द लताबाईदेखील असं विधान करणार नाहीत आणखी एका बाबतीत मतभेद आहे, लताच्या चेहर्‍यावर भावना दिसत नाहीत असं लोक म्हणतात, पण त्या भावना लताच्या गाण्यात पुरेपूर उतरलेल्या असतात. माझा अभिप्राय नीट वाचावा. "ज्यांनी त्यांचा लाईव्ह प्रोग्राम पाहिला असेल त्यांतल्या काही जणांना लताजींचा निर्गुण निराकार अविर्भाव, मग गाणं कुठल्याही भावना व्यक्त करणारं असो, खटकतो!" तसंच काही जणांना त्यांच्या भावना गाण्यात पुरेपूर उतरलेल्या असतात असं वाटू शकतं. पण सगळ्यांनाच तसं वाटतं असं नाही. ज्यांनी त्यांचे अडीच -तीन तासांचे लाईव्ह प्रोग्राम पाहिले आहेत त्यांना त्यातलं प्रत्येक गाणं भावना पुरेपूर उतरलेलं वाटत असं नाही. अनेकदा मठ्ठ नायिकांची गाणी केवळ लताच्या आवाजामुळे सुसह्य झालेली आहेत. कोणत्या हो त्या नटया? जरा नांवं द्या ना!! ;) -काडीटाकू पिडां :)

In reply to by पिवळा डांबिस

प्रदीप Sat, 10/20/2012 - 11:14
@पिडां, लता एका टेकमधे संपूर्ण गाणं रेकॉर्ड करण्यासाठी प्रसिद्ध आणि संगीतकारांची आवडती होती. असहमत आहे. माझ्याकडची माहिती वेगळी आहे. मलावाटतं खुद्द लताबाईदेखील असं विधान करणार नाहीत
एका टेकमध्ये गाणे ओ. के. करणे हे आशा - लता ह्यांनी साध्या केले आहे अशीच माझीही माहिती आहे. आता तुम्ही ह्याविषयी चर्चा करताच आहात तर काही गोष्टींचा उल्लेख करतो: * ज्या काळात लता- आशा- रफी- मुकेश्-किशोर इत्यादी गायले तेव्हा गाणे संपूर्ण एका टेकमधेच करावे लागे. कारण एडिंटींग इतके सोयीचे तेव्हा नव्हते. तांत्रिक बाबींविषयी इथे थोडे सांगतो-- अगदी पूर्वी गाणी सरळ ऑप्किटलवरच रेकॉर्ड होत. अर्थात त्यात एडिटींग करण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे कधीतरी (मला वाटते पन्नाशीच्या दशकाच्या शेवटी, अथवा साठीच्या दशकाच्या सुरूवातीस) मुंबईच्या साँग रेकॉर्डिंग व्यवसायात मॅग्नेटिक रेकॉर्डिंगही उपलब्ध झाले. सेलसिंक एडिटींग उपलब्ध असलेले रेकॉर्डर्स मात्र ह्या इंडस्ट्रीमधे ६७- ६८ च्या दरम्यान उपलब्ध झाले. तिथपर्यंत गाणे एकाच टेकमधे रेकॉर्ड होण्याची गायकांची, वादकांची इतकी तयारी झाली, की ती प्रॅक्टिस बदलण्याची जरूर पुढे अनेक वर्षे भासली नाही. * पूर्वी गाणी ७८ च्या वायनॅल तबकडीसाठी म्हणून केली जात, ती सर्वसाधारणपणे ३.५ मिनीटांची असत. त्यात इंटर्ल्यूड्स वगैरे सव्वा मिनीट सोडले तर गायक/ गायिकांसाठी सुमारे २.२५ मिनीटे असायची. त्यात गाण्याचे शब्द, त्यातील भावना पोहोचवणे ह्यावर मुख्य फोकस ठेऊन ते गाणे व ह्यात कुठेही स्वतःच्या prowess ची अतिशयोक्त चमक न दाखवताही गाण्यावर स्वतःचा ठसा उमटवणे हे कठीण काम होते. त्या काळातील सर्व प्रमुख गायक गायिकांनी हे सुंदर रीत्या पार पाडले आहे. * गाण्याशी चाल संगीत दिग्दर्शकाने सांगितली की ती आत्मसात करून, तीवर स्वतःचे जरूरीपुरते embellishment करणे आणी हेही अगदी थोड्या वेळात, ह्यात लताचा हात अन्य कुणी धरला नाही, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ति नाही. तिच्या peak च्या काळात तिने दिवसात तीन- ते चार गाणी रेकॉर्ड केलेली आहेत असे मी तरी ऐकून आहे. अनेक गाणे तेव्हा अर्ध्या शिफ्टमधे ती व आशा संपवीत असत, हे खरे आहे. * लताचे रेकॉर्डिंग प्रत्यक्ष पहाण्याचा, अनुभवण्याचा योग कधीच माझ्या दुर्दैवाने मला आला नाही, एकदा, मला वाटते, ८३ साली आशाचे एक रेकॉर्डिंग प्रत्यक्ष हजर राहून पहाता आले. सबंध रेकॉर्डिंग अर्ध्या शिफ्टमधे संपले होते. त्या सबंध वेळ आशा स्वतः तिथे नव्हती. ती शिफ्ट सुरू झाल्यावर सुमारे तासा-दीड तासाने कधीतरी तिथे आली होती. * अलीकडे एका तरूण साउंड रेकॉर्डिस्टने लताचे एक रेकॉर्डिंग केले (सुमारे २००४- ५ सालातील ही घटना असावी), त्याविषयी त्याने मला सांगितले की (हल्लीच्या पद्धतीनुसार) ट्रॅक अगोदरच 'ले' झालेला होता. त्यावर लताने गायचे होते. ती आली, एकदा संपूर्ण चाल ऐकली, रिहर्सल केली, व एका टेकमधे तिने ते संपवले. त्यानंतर तिने ('हल्लीच्या अनेक इतर गायक- गायिकांप्रमाणे'---हे त्याचे शब्द, मला त्याविषयी काही माहिती नाही)'पिच बदला' इथे रेव्हर्ब टाका-- असले काही सांगितले नाही. हे अशासाठी लिहीले की बदलत्या काळानुसार, नव्या रूपातही लता तितक्याच तयारीने गाऊ शकते. संपूर्ण बललेल्या रेकॉर्डिंगच्या ढाच्याचा तिच्यावर काही परिणाम नाही.
ज्यांनी त्यांचा लाईव्ह प्रोग्राम पाहिला असेल त्यांतल्या काही जणांना लताजींचा निर्गुण निराकार अविर्भाव, मग गाणं कुठल्याही भावना व्यक्त करणारं असो, खटकतो
हे अर्थात तुम्ही कुठच्या लाईव्ह कार्यक्रमाला कुठल्या अपेक्षेने जाता ह्यावर अवलंबून आहे. अलिकडच्या 'रॉक' संगीताच्या जमान्यातील गायक- गायिका हे मुळात धड गायक- गायिका नसले तरी हरकत नाही, पण त्यांना 'रॉक' करता येणे आवश्यक आहे. परवाच आमच्या गावात शंकर महादेवनचा लाईव्ह परफॉर्मन्स झाला. हा गायक मला आवडतो, त्याचा परफॉर्मन्स मात्र वेगळीच बाब होती-- तरूणांच्या अपेक्षा लक्षात घेऊन, त्याप्रमाणे तो रॉकींग व त्यातून 'पार्टिसिपेटींग- इंटरअ‍ॅक्टिव्ह' असा केला होता. हे धंद्याच्या दृष्टीकोनातून ठीकच आहे. पण त्याच्या बरोबर कुणी मणि नावाची (अलिकडील एक बर्‍यापैकी नावाजलेली, म्हणे!) गायिका होती, तिचे शब्दही धड समजू शकत नव्हते. पण त्या संदर्भात हे कुणालाही खटकले नसावे. अशी रॉकींग अपेक्षा लत- आशा ह्याजकडून ठेवावी, हे मुळात चुकीचे आहे. त्यांच्या कार्यक्रमाचा ऑडियन्स वेगळा.

In reply to by प्रदीप

पैसा Sat, 10/20/2012 - 21:59
अगदी दाद देण्यासारखा मस्त प्रतिसाद! रेकॉर्डिंगबद्दल बरीच नवी माहिती मिळाली. @पिडां, मी जर एखाद्या नायिकेचं नाव घेतलं तर नेमकी तीच मला आवडते असे तुम्ही म्हणाल त्यामुळे कोणतेही नाव घेत नाही. भावनाओंको समझो! उदाहरणे खरोखरच खूप आहेत. (तुमच्या काडीवर पाणी ओतत आहे :D)

नुसरतच्या गायकीचा बाज वेगळा आहे. एक कमालीचा थरार, कुठल्यावेळी तो काय गाईल याची अनिश्चितता, त्यातून निर्माण होणारी गूढता, उर्दूचा लहजा, साथीदारांच्या ताना आणि अलापी, सरगमची अफलातून काँबीनेशन्स, कव्वालांच्या टाळ्यांचा रिदम, सतत बदलत राहणारी लय आणि या सर्वातून दिसणारं बेतहाशा समर्पण- जिथे चूक होईल ही भीतीच नाही... हे सगळं मिळून तो जलसा तयार होतो. एक कमालीचा चित्तवेधक माहौल तयार होतो. कुणाला हे आवडेल कुणाला नाही, तो व्यक्तिगत प्रश्न आहे पण शांतरस आणि आवेग यांची तुलना कशी होईल? लताची गाणी, तिच्या आवजातलं माधुर्य निर्विवाद आहे पण सूफिजमचा अंदाजच वेगळा आहे. ते म्हणतात प्रत्येक आवज अल्लाचाच आहे. तिथे सुरेल आणि बेसूर हा प्रश्न नाही. गाणार्‍याचं संपूर्ण समर्पण, त्यातनं निर्माण होणारी निर्भय चित्तदशा, त्या निर्भयतेमुळे निर्माण होणारी अनिश्चितता आणि त्या अस्थिरतेतनं निर्माण होणारं सौंदर्य जर तुम्हाला भावलं तर तो जलसा तुम्हाला शून्य करू शकेल. तुम्हाला पटलं तर या अँगलनं नुसरतला ऐकून पाहा. मालकंसमधली त्याची `मन कुंतो हे मौला' अशीच बेभान बंदीश आहे.