कृतघ्न -7
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4: https://www.misalpav.com/node/46203
भाग -5
https://www.misalpav.com/node/46261
भाग -6
https://www.misalpav.com/node/46656
आता पुढे....
"या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.
काल रात्रीच रामदास चे सर्व रिपोर्ट आलेत आणि it is confirmed case of Guillain-Barre Syndrome. "
आज रामदास चे रिपोर्ट आणि पुढील ट्रीटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी माऊली हॉस्पिटल मध्ये आला होता..
डॉक्टर रणदिवे हे शहरातील एक प्रख्यात सर्जन होते. त्यांनी माऊलीसोबत शेकहॅण्ड केला आणि बोलायला सुरवात केली.
" सो Mr. पाटील, तुमच्याबाबत आणि रामदास च्या केस बाबत मला सगळी माहिती डॉक्टर जोशींनी दिलीये. अहो आजच्या काळात पोटची पोरं देखील आजारपणात सख्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात, आणि तुम्ही तर रामदास साठी इतके करतायेत ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या स्वार्थी जगात जी थोडीफार माणुसकी अजूनही जिवंत आहे ती तुमच्यासारख्या लोकांमुळेच.
रामदास चे सर्व रिपोर्ट मी पाहिलेत, आणि डॉक्टर जोशींनी सांगतिल्याप्रमाणे it is Guillain-Barre Syndrome.
हा आजार तसा दुर्मिळ आहे. रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या पेशंन्स ची परीक्षा घेणारा आजार. या आजारातही बरेच प्रकार आहेत. रामदास ला जो गिया बारे syndrom झालेला आहे त्याचे वैद्यकीय नाव आहे Acute inflammatory demyelinating polyradiculoneuropathy
ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातील immune सिस्टिम त्याच्याच शरीरातील नर्व्हस सिस्टिम वर हल्ला चढवतात आणि त्यामुळे शरीरातील सर्व स्नायूंच्या संवेदना निघून जातात, आणि हे शरीराच्या खालील भागाकडून वरच्या भागाकडे म्हणजेच पायाकडून डोक्याच्या दिशेने प्रोग्रेस होत जाते.
अंदाजे 1 लाख व्यक्तींमागे 2 ते 3 लोकांना हा आजार होतो, पण जर रुग्ण आणि नातेवाईकांनी योग्य काळजी आणि उपचार घेतले तर रुग्ण पूर्ण बरा देखील होतो, पण हा वेळखाऊ आजार आहे, पूर्णपणे बरे होण्यासाठी 6 महिने ते 2 वर्षे देखील लागू शकतात. या कालावधी मध्ये जर रुग्णाला जर इतर त्रास असतील तर कॉम्प्लिकेशन वाढू शकतात.
रामदास च्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची आत्ताची परिस्थिती पाहता चान्सेस थोडे कमी आहेत, कारण रामदास च्या लिव्हर आणि किडनी चे कार्य म्हणावे तितके व्यवस्थित नाहीये. अल्कोहोल consumption मुळे दोंघांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला आहे, त्याचे वय हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे.
त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आपण ट्रीटमेंट केली तरीही पूर्ण रिकव्हर होने थोडेसे अवघड आहे आणि त्यालाही 1-1.5 वर्षे लागतील. पण जर नशिबाने साथ दिली तर आपण नक्की रामदास ला त्याच्या पायावर उभे करू. त्याला स्वावलंबी जिवन जगता येईल इतक्या स्टेज पर्यंत तरी पोहचू. यासाठी आपली हॉस्पिटल मधील ट्रीटमेंट ही 1 ते 2 आठवड्यांची असेल त्यांनतर तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर घरीच फिजिओथेरपी आणि औषधपाणी करावे लागतील.
आपण हॉस्पिटल मध्ये रामदास साठी जी ट्रीटमेंट करणार आहोत त्यामध्ये आपण त्याच्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करणार आहोत म्हणजे त्याच्या शरीरातून त्या antibodies काढणार आहोत ज्यांनी त्याच्याच शारीरातील नर्वस सिस्टिम वर हल्ला केला. या प्रोसेस ला Plasmapheresis किंवा plasma exchange असे म्हणतात. रामदास च्या शरीरातील सर्व रक्त एका मशीन मधून प्रोसेस करून पुन्हा त्याच्या शरीरात सोडायचे. एकंदरीत परिस्थिती पाहता रामदास साठी ही प्रक्रिया 2-3 वेळेला करावी लागेल. एकदा का त्याच्या शरीरातून त्या antibodies संपल्या कि मग त्यानंतर फिजिओथेरपी सुरु करून हळू हळू सर्व स्नायू आणि हालचाल पूर्वपदावर आणावी लागेल. त्यासाठी जवळपास 1 वर्ष आपल्याला मेहनत करावी लागेल.
आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या ट्रीटमेंट साठी अंदाजे 2-3 लाख रुपये लागतील. आणि त्यांनतर वर्षभर औषधे आणि फिजिओ साठी पण जवळपास तेवढेच पैसे. "
माउलीने शांतपणे सर्व ऐकून घेतले. पैश्याचा आकडा नक्कीच मोठा होता. आणि त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे बरे होण्यासाठी लागणारा कालावधी.
पण आता मागे हटायचे नाही, आपण आजपर्यंत त्याच्या जीवावर आपली शेती केली, धान्य पिकवले. जमीन सुस्थितीत राहिली, आपल्या भावाला मदत झाली. रामदास नसता तर आपल्या कुटुंबालाच सर्व कष्ट करावे लागले असते. भले आज माझ्या भावाला आणि इतरांना रामदास च्या कष्टाची जाण नसेल पण आपण पण तसेच वागलो तर उद्या देवापुढे कोणत्या तोंडाने जाणार? आज मला कोणी काहीही बोलणार नाही पण भविष्यात स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला कसे सामोरे जायचे? आपल्याच नजरेत आपण कृतघ्न बनून कसे जगायचे??
"सर तुम्ही वेळ आणि पैसा या दोन्हीची काहीही काळजी करू नका. रामदास ला शक्य ते उपचार लवकरात लवकर सुरु करा. " माउलीने डॉक्टर जोशी आणि रणदिवे दोघांनाही पुढील उपचारासाठी परवानगी दिली.
माऊली कन्सल्टिंग रूम मधून बाहेर आला. रामदास च्या बेडजवळ जाऊन त्याने शांतपणे त्याच्याकडे पाहिले. रामदास खिन्न नजरेने शून्यात पाहत होता. आतून दुःखी होता कारण कदाचित आपला मृत्यू च जवळ आला आहे अशी त्याची समजूत झालेली होती. इतका मोठा दवाखाना आजपर्यंत तयार पाहिलेला नव्हता.
आजूबाजूला होणारी धावपळ, नर्स, वार्डबॉय यांचे चाललेले संवाद इतर लोकांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक हे सर्व तो खिन्नपणे पाहत होता.
आपल्याला देखील कोणीतरी भेटायला यावे, विचारपूस करावी, 2 मायेचे शब्द बोलावेत, काहीतरी गोड खायला द्यावे असे त्याला मनोमन वाटत होते पण आज त्याच्या सोबत कोणीच नव्हते. ना जन्म दिलेली मुले, ना गावाकडचे मित्र, आणि ना तो तुकाराम, ज्याच्यासाठी इतकी वर्ष शेतात काम केले.
त्याच्यामागे उभा होता तो फक्त माऊली.. जो मात्र निर्विकारपणे त्याच्याच भल्याचा विचार करत होता कालही आणि आजही.
आता माउलीसमोर मोठा प्रश्न होता कि रामदास ला त्याला झालेल्या आजाराबाबत कसे समजवून सांगायचे? सांगितलेले त्याला समजेल का? काही चुकीचा अर्थ त्याने घेतला तर तो मानसिकदृष्ट्या खचून जाण्याची शक्यता होती.
" मामा कशी आहे तब्येत आता?? "
माउलीने चेहऱ्यावर हास्य ठेवून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला.. रामदास उत्तर देण्याच्या अवस्थेत च नव्हता. तोंडातून फक्त काहीसे पुटपुटला..
" काही काळजी करू नका मामा, सगळं ठीक आहे. तुमच्या अंगात पायाच्या बाजूने एक व्हायरस आत आलेला आहे आणि त्यामुळेच खालून वर पर्यंत शरीर निबर झालेय.. आता डॉक्टर तुमचे सर्व रक्त फिल्टर करून परत सोडतील त्यामुळे तो व्हायरस मरून जाईल. त्यांनतर काही महिन्यात तुम्ही ठीक होताल.. "
रामदास माऊलीकडे फक्त बघतच राहिला, खरंतर त्याला अजूनही काही समजले नव्हते, पण माऊलीचे शेवटचे वाक्य ऐकून तो मनातून सुखावला. काही महिन्यात तुम्ही ठीक होताल एवढे एकच वाक्य त्याला खूप धीर देऊन गेले.
त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी आज हलकेसे का होईना पण स्मितहास्य आले. त्याने ट्रीटमेंट ला संमती दर्शवली.
डॉक्टर जोशी आणि रणदिवे दोघांनीही काही फॉर्मॅलिटीज कंप्लिट झाल्यावर ट्रीटमेंट सुरु केली.
आपल्या शेजारी दिसणाऱ्या लांबलचक पाईप्स, मोठमोठाल्या स्क्रीन्स, वेगवेगळ्या मशिन्स, यंत्राचे येणारे चित्रविचित्र आवाज, शिरीराला ठिकठिकाणी लावलेल्या वायरी सर्व पाहून रामदास गांगरून गेला, घाबरून गेला. पुढे काय होणार, आपल्याला नेमके काय झालेय कोणते उपचार होतायेत हे देखील अजूनपर्यंत त्याला ठिकसे समजले नव्हते. पण फक्त माऊली सोबत होता त्यामुळे तो निर्धास्त होता.
डॉक्टरांनी मशीन चालू केले, हातात टोचलेल्या पाईप मधून आता रक्त बाहेर ओढले जात होते, सर्व पाईप्स हळूहळू रक्ताने भरून गेल्या. एका बाजूने रक्त मशीन मध्ये आत जात होते आणि दुसऱ्या पाईप मधून ते बाहेर येत होते. रामदास ला काही समजत नव्हते पण हळूहळू अंगात गर्मी जाणवू लागली. मशीन मधून पुन्हा शरीरात जाणारे रक्त हे थोडेसे गरम असल्याने त्याला सर्व शरीरात उष्णता जाणवू लागली. आजूबाजूला होणारे प्रयत्न आणि धावपळ करणारे लोकं पाहून आता आपण लवकरच बरे होऊ अशी आशा त्याला वाटू लागली.
पण त्याला नव्हते माहित कि ही तर फक्त सुरवात आहे.. अजुन खूप मोठी लढाई बाकी आहे.
क्रमश :
प्रतिक्रिया
छान...
पुढचा भाग?