बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
30 Mar 2020 - 9:34 am

बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
सप्टे१९१८, पहिलं महायुद्ध अजूनही चालूच आहे. जर्मनीची शेवटची निकराची लढाई-‘कैसरश्लाख्त’ फसली आहे आणि आता दोस्त सैन्य विशेषत: नव्या दमाचे अमेरिकन सैन्य निर्णायक विजयाकडे हळू हळू पण निश्चित वाटचाल करत आहेत. अमेरिकेत, ज्यांचा उपचार युद्ध आघाडीवर होऊ शकत नाही, असे गंभीररित्या जखमी किंवा आजारी असलेले सैनिक मोठ्या संख्येने येताहेत.कॅम्प डेव्हन्स, मेसाच्यूसटस इथल्या लष्करी इस्पितळातल्या ऑटोप्सी रूममध्ये (शवविच्छेदन आणि विश्लेषण करायची खोली)एक अगदी हिरव्या निळ्या पडलेल्या सैनिकाचे कलेवर टेबलावर आहे. डॉ. विलियम एच वेल्श आणि त्यांचा सहकारी शव विच्छेदन सुरु करतात. सहकारी मृताची छाती उघडतो बरगड्या बाजूला करून फुप्फ्फुसे कापून उघडी करतो.त्यांना काय दिसतं! त्या सैनिकाची फुप्फुसं कसल्यातरी निळसर रंगाच्या द्रवाने शिगोशिग भरलेली असून तो द्रव श्वास-नलिकातही भरला आहे. फुप्फुसे कापल्यावर त्यातील द्रव ओघळून टेबलावर सांडतो. द्रवाचे प्रमाण इतके जास्त आहे कि सैनिकाचा मृत्यू फुप्फुसात अतिरिक्त द्रव भरल्याने श्वास कोंडून म्हणजेच आपल्याच शरीराने तयार केलेल्या द्रवात बुडून झाला आहे. हि काही पहिलीच केस नाही, डॉ. वेल्श विमनस्क अवस्थेत खोली बाहेर पडतो बाहेर हॉस्पिटलच्या जमिनीवर अनेक जखमी आजारी सैनिक पडलेत. सगळे अशाच आजाराने ग्रस्त झालेत शरीर निळी पडताहेत अनेक तर उपचार मिळण्य आधीच मेले आहेत. १२०० लोकांसाठी उपचार करण्याची क्षमता असलेले इस्पितळ ६००० रुग्णांनी भरून गेले आहे.
पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी घेऊन लिहिलेली हि भय कथा नव्हे. हा खरा खुरा इतिहास आहे १०२ वर्षापूर्वी सगळ्या जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या एका जीवघेण्या आजाराचा- स्पॅनिश फ्लू चा
सध्या आपण करोना विषाणूच्याच्या महासंकटाशी मुकाबला करत आहोत. जगभर ह्याचे थैमान चालू आहे घरं, वस्त्या आणि शहरंच नाही तर देश चे देश आपल्या सीमा एकमेकांना बंद करत आहेत. आतापर्यंत साधारण सव्वा तीन लाख लोकांना ह्याचा संसर्ग झालाय आणि पंधरा हजार लोक मृत्युमुखी पडलेत म्हणजे आजच्या घडीला ह्या आजाराचा मृत्युदर साधारण ५ टक्के आहे. पण १०२ वर्षापूर्वी अशाच एका फ्लू च्या रोगाने जगभर धुमाकूळ घातला होता.(करोना आणि एन्फ़्ल्युएन्ज़ा किंवा सोप्या भाषेत फ्लू हे दोन्ही श्वसनसंस्थेवर आघात करणारे आजार असले, त्यांची लक्षणं साधारण समान असली तरी त्यांचे विषाणू वेगवेगळे आहेत.)तेव्हा ह्या रोगाने जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्येला म्हणजे ६० कोटी लोकांना (तेव्हा जगाची लोकसंख्या १८० कोटी अंदाजे होती.) ग्रासले होते आणि पाच ते दहा कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.हा अंदाज इतका धूसर आहे कारण तेव्हा नक्की किती लोक जगभरातून मेले असावेत ह्याची आकडेवारी निश्चित उपलब्ध नाही. तसे नोंद करणारी यंत्रणा आणि तंत्रज्ञान तेव्हा नव्हते. पण तरीही कमीतकमी ५ कोटी मृत हि आकडेवारी किती महाभयंकर आहे ! इतकी माणसे केवळ १८ महिन्यात मेली. पहिले मह्युद्ध ४ वर्षे चार महिने चालले त्यात साधारण १.८ ते २ कोटी लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे तीनपट अधिक लोक एक तृतीयंश काळात मृत्युमुखी पडली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ह्या आजाराची सुरुवात कशी झाली? कुठे झाली? तो नक्की कसा पसरला? हे नक्की सांगता येत नाही आणि त्यामुळेच त्याबाबत अनेक अंदाज व्यक्त गेले आहेत. अजूनही नवनव्या थेअरीज-अंदाज समोर येत आहेत त्यातील एक सध्या तरी सर्वमान्य अंदाज असा. नावाप्रमाणे हा आजार स्पेन मध्ये उद्भवला नाही हे नक्की. पहिल्या महायुद्धात चीन (इथेपण!) हे तटस्थ राष्ट्र होते.एकतर तेथे नुकतीच प्रज्सात्त्काचे स्थापना झाली होती आणि त्यात तेथे अनेक युरोपियन देशांच्या वखारी-व्यापारी बाजारपेठा होत्या. कुणा एका बाजूने उतरल्यावर विरोधे देशांनी नवजात आणि दुबळ्या चीनचे लचके तोडण्याचा धोका मोठा होता. पण दोस्तांच्या बाजूने युद्धात उतरलेल्या जपानने चीनवर हल्ला केला आणि चीनच्या मुख्य भूभागावर सैन्य घुसवले. अक्ष राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरून फायदा नव्हता एक तर त्यात जर्मनी हा एकमेव बलिष्ठ पण तो मुख्यत: युरोपातच युद्धात गुंतून पडला होता. आणि त्याच्याकडून जपान विरुद्ध फार काही मदत मिळायची शक्यता नव्हती.उलट जपानने चीन मधील चिंग ताओ, शान्ग्तून हे जर्मन अखत्यारीतले प्रदेश हस्तगत केले होते आणि आशियातील जर्मन साम्राज्य नष्ट केले होते. म्हणून मग जपानवर खेळी म्हणून चीनने दोस्तांच्याच बाजूने जर्मनीवर युद्ध पुकारले. त्यांचा होरा असा कि दोस्त राष्ट्र युद्ध काळात एकमेकांच्या जीवावर उठणे बरोबर नाही म्हणून बडी दोस्त राष्ट्रे जपानला समज देतील शिवाय युद्धानंतर जपानने हस्तगत केलेला भूभागही परत मिळवता येईल.ह्याउलट जर अक्ष राष्ट्र जिंकली तर त्यांची फार खप्पामर्जी ओढवायला नको म्हणून दोस्त्नाच्या युद्ध प्रयत्नात प्रत्यक्ष सहभाग न घेता फक्त इतर कामाकरता मजूर पाठवायचे चीनने मान्य केले. हे चीनी मजूर निरनिराळ्या दोस्त देशात कारखान्यात काम करणे, लोहमार्ग आणि रस्ते, पूल, इमारती बंधणे अशा कामाकरता पाठवले जात. ह्यातील कुणी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होणार नव्हते.अशीच चीनी मजुरांची एक तुकडी कॅनडा इथे १९१७ साली पोहोचली.त्यांना आगगाड्यात भरून हेलीफ्याक्स येथे घेऊन जाण्यात आले.तेथे उतरले तेव्हा त्यातील काही मजूर फ्ल्यू च्या आजाराने ग्रासलेले होते. हा असा आजार मागील वर्षी उत्तरी चीनच्या काही भागात उद्भवला होता. तसाच परत तो ह्या चीनी मजुरांना झालेला होता. आजारी – संसर्गजन्य आजारांनी पछाडलेले मजूर आल्यावर कॅनडाच्या सरकारने( म्हणजे ब्रिटीश सरकारने) काय केले?तर त्यांच्यातील जे खूप आजारी होते त्याना विलग केले (quarantine) आणि आजारी वाटत नसणाऱ्या बाकीच्यांना जहाजात भरून फ्रान्सला पाठवले.आता फ्ल्यू हा संसर्गजन्य आजार आहे हे त्यांना माहिती नव्हते अशातला भाग नाही पण तो पर्यंत विषाणू हा प्रकार काय असतो हेच माहिती नव्हते त्यामुळे रोग कशामुळे होतो? आणि कसा पसरतो? हेच नक्की माहिती नव्हते. वरकरणी निरोगी दिसणारा माणूस आजाराने ग्रस्त असू शकतो हे देखील माहिती नव्हते. असो तर हे मजूर फ्रान्समध्ये युद्धआघाडीच्या अगदी जवळ कामाला जुंपले गेले आणि तिथूनच त्यानी आजार सैनिकात पसरवला.(हा एक अंदाज झाला.)
पुढे जाण्या अगोदर ह्या आजाराला स्पॅनिश फ्ल्यू नाव असे मिळाले ते पाहू. खरेतर फेब्रु १९१७ पासूनच युद्ध आघाडीवरील सैनिक ह्या आजाराने मरू लागले होते. पण वृत्तपत्रांवर, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध असल्याने ह्या आजाराच्या बातम्या त्या त्या देशात समजत नव्हत्या पण हा स्पेन हा तटस्थ देश त्यामुळे तेथे वृत्तपत्रांवर निर्बंध नव्हते. जसजशा ह्या स्पॅनिश वृत्तपत्रातून फ्ल्यूच्या बातम्या येऊ लागल्या तशा इतर जगाचे लक्ष तिकडे वेधले गेले. स्पेनमधील आजाराच्या बातम्या देण्यावर निर्बंध नसल्याने ह्या वृत्तपत्रांनी मग स्पेन मधील बातम्या देण्याचा सपाटा लावला आणि ह्या नव्या आजाराला स्पॅनिश फ्ल्यू हे नाव दिले त्यातून पुढे गैरसमज असा झाला कि हा आजार स्पेन मध्ये प्रथम उद्भवला.
ता. ४ मार्च १९१७ कॅम्प फन्स्टन, कान्सास इथे अमेरिकेतला मोठा लष्करी तळ होता. इथे ५६००० नव्याने भरती झालेले सैनिक प्रशिक्षण घेऊन युरोपात निरनिराळ्या आघाड्यांवर पाठवले जात. असे अमेरिकेत १००च्यावर सैनिकी तळ होतेत्यापैकी ३६ मोठे तळ होते, जेथे नव्याने भरती होणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देऊन पहिल्या महायुद्धात भाग घ्यायला युरोपात पश्चिम आघाडी तसेच इतरत्र लढायला पाठवले जात असे. त्याच बरोबर आधीच तैनात असलेल्या सैनिकांच्या तुकड्यांची अदलाबदली, नवीन जागी नियुक्ती, सैनिकांच्या रजांचे नियोजन- व्यवस्था, आजारी सैनिकांची देखभाल त्यांची योग्य त्या इस्पितळात रवानगी, सैनिक तसेच युद्धसामग्रीचे परिवहन अशा गोष्टी देखील इथूनच कार्यान्वित होत असत. जिथे असे नवीन-जुने सैनिक जिथे मोठ्या संख्येने एकत्र येत,तिथे लहानमोठे साथीचे आजार पसरतच असत. त्यामुळे ४ मार्च ला सकाळी सकाळी जेव्हा एका सैनिकाने आपण (अमेरिकन भाषेत-प्रायव्हेट) फ्ल्यू मुळे आजारी असल्याची तळावरच्या डॉक्टरकडे तक्रार केली तेव्हा डॉक्टरला त्याचे फार काही विशेष वाटले नाही.दुपार होई पर्यन्त १०७ सैनिक आपण फ्ल्यू मुळे आजारी असल्याचे सांगू लागले तर आठवड्यभरात हा आकडा ११०० च्या वर गेला.दोन आठवडे होई पर्यंत तळावरचे १० टक्के म्हणजे ६००० सैनिक आजारी झाले होते. “ठीक आहे! तळावर फ्ल्यूची साथ पसरली आहे. त्यावर औषध योजना करून काबूत आणता येईल.” असा विचार तळावरच्या डॉक्टरांनी केला. पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली नव्हती. मागील महिन्यातच म्हणजे फेब्रु १९१८ मध्ये टेक्सास राज्यातील हक्स्फुल काउंटी इथे अगदी असाच एक फ्ल्यूच्या साथीचा उद्रेक झाला होता आणि त्यात ३८ सैनिक दगावले होते. हा आजार आधीच्या सर्वसामान्य फ्ल्यू प्रमाणे नसून तो फार लगेच पसरतो,आणि मुख्यत: धडधाकट, निरोगी तरुण लोकांना ग्रासतो आणि काही समजून उमजून उपचार करायच्या आत जीव घेतो असे तेथील एका डॉक्टरच्या लक्षात आले होते. त्याने त्याप्रमाणे त्याच्या अधिकाऱ्याना सांगून सावधही केले होते पण अधिकाऱ्यानी फार लक्ष दिले नाही. वर्तमानपत्रात ह्याची बातमीही आली खरी पण तेव्हा वर्तमानपत्रात युद्धाच्या बातम्या इतक्या असत कि हिच्याकडे सगळ्यांचे दुर्लक्षच झाले. महत्वाची गोष्ट म्हणजे हक्स्फुल काउंटी इथे येऊन नव्याने भरती होणारे तसेच आपल्या रजा संपवून परत आघाडीवर जाणारे सैनिक आधी कॅम्प फन्स्टन इथे जात आणि मग तिथून ते फ्रांस मध्ये पाठवले जात. (त्याचप्रमाणे फ्रांस मधून येणारे सैनिक आधी कॅम्प फन्स्टन इथे येत आणि मग पुढे जात हे वर आलेलेच आहे.)तर मार्च महिना संपे पर्यंत ३६ पैकी २४ तळावर ह्या फ्ल्यू चा प्रादुर्भाव झालेला होता.तरी हि कुणी फारशा गांभीर्याने इकडे बघितले नाही.
सुरुवातीला वर्णना केले डॉ. विलियम एच वेल्श हे मात्र ह्या घटनांवर लक्ष ठेवून होते ते काळजीतही पडले होते. डॉ. विलियम एच वेल्श हे अमेरिकेतील एक वृद्ध, अनुभवी आणि प्रतिष्ठीत डॉक्टर होते. त्यांचा लौकिक मोठा होता.अमेरिकेत आधुनिक वैद्यकीय शास्त्राची पायाभरणी करण्यात त्यांचा हातभार फार मोठा होता.अमेरिकेतील हाफकीन वैद्यकीय संशोधन संस्था तसेच अमेरिकेतील पहिली वैद्यकीय अनुसंधान करणारी प्रयोगशाळा-रॉकफेलर संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता. त्यानी शब्दश: अमेरिकेला वैदू-भगत असल्या जुन्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या युगातून बाहेर काढून आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या युगात आणले होते.१९१८ साली ते सैन्याच्या वैद्यकीय विभागाच्या संचालक मंडळावर होते.त्यानी सैन्य विभागाला सावध करायचा प्रयत्न केला पण एक तर फ्ल्यू च्या साथी वारंवार येत आणि थोडा आराम आणि जुजबी औषध घेऊन सैनिक/माणसे बरी होत, देवी कॉलराप्रमाणे ह्या साथी जीवघेण्या नसत. शिवाय देवी कॉलराप्रमाणे ह्यावर प्रभावी लस अजून सापडलेली नव्हती. युद्ध आता शेवटच्या निर्णायक अवस्थेत होते आणि क्षुल्लक फ्ल्यू च्या साथीमुळे घाबरून जायचे कारण आहे असे लष्करी अधिकाऱ्याना वाटले नाही.त्याना पूर्वानुभवावरून सैनिकात, देवी कॉलरा असे रोग पसरू नये ह्याची काळजी जास्त होती.त्यामुळे लवकरच अमेरिकेतून असे फ्ल्यू झालेले सैनिक इतर निरोगी सैनिकांबरोबर खच्चून भरलेली जहाजे युरोपात फ्रान्सच्या दिशेने जाऊ लागली. रोग आता सैनिकाच्या धमन्यात नव्हे तर जगाच्या धमन्यात शिरला होता.
सैनिकांनी भरलेली जहाजं युरोपच्या किनाऱ्यावर उतरू लागली. सैनिक निरनिराळ्या आघाड्यांवर पाठवले जाऊ लागले आणि एप्रिल महिन्यातच अमेरिकन आणि त्यांच्या बरोबरच लढणाऱ्या फ्रेंच सैनिकात आजार पसरू लागला ताप डोकेदुखी असली लक्षणे टायफस, मलेरिया, मेंदूज्वर अशा इतर आजारात देखील दिसून येतात त्यामुळे आधी कुणाचे लक्ष गेले नाही पण युद्ध आघाडीवर, खंदकात कमालीच्या अस्वच्छ, वातावरणात, अनेक आजारी,जखमी कुपोषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेले सैनिक दाटीवाटीने राहत असल्याने ह्या रोगाचा विषाणू लवकरच उत्क्रांत होऊन अधिक जीवघेणा बनला. मे महिना उजाडे पर्यंत हा इंग्लिश सैनिकातही पसरला.महिना संपेपर्यंत ३६००० इंग्लिश सैनिक आजारी पडले आणि मग मात्र तो सैन्याच्या युद्ध करण्याच्या क्षमतेवर आघात करू लागला. आघाडीवर लढणार्या फ्रेंच सैनिकापैकी ७० टक्के सैनिक आजारी झाले तर १० टक्के ब्रिटीश सैनिक आजारी पडले.१९१८च्य वसंतात जर्मनांनी त्यांची शेवटची निकराची लढाई -‘कैसरश्लाख्त’ सुरु केली. सुरुवातीला त्याना चांगलेच यश मिळाले आणि अर्थातच दोस्त सैन्यांवर दबाव वाढला. जखमी आजारी थकलेल्या सैन्य तुकड्या जेव्हा माघारी येत आणि त्यांच्या जागी तैनात होणाऱ्या सैनिकांच्या अख्ख्या तुकड्या ह्या फ्ल्यू ने गारद झालेल्या असत. तेव्हा किती धक्का बसत असेल.आघाडीवरची आणि शहरातील सैन्य इस्पितळ देखील त्यांच्या क्षमतेबाहेर आजारी सैनिकांनी भरून जाऊ लागली. इतर जखमी सैनिकाना उपचार मिळणे अशक्य होऊ लागले. इस्पितळाच्या खोल्या, बाल्कन्या, गच्ची, वरांडे, कॉरिडॉर आजारी सैनिकांनी भरून जाऊ लागले काही ठिकाणी तर सैनिकांना बाहेर हिरवळीवर उघड्यावर खाली कांबळी, घोंगडी,ताडपत्री जे मिळेल त्यावर ठेवावे लागले.आता मात्र सगळे खडबडून जागे झाले. डॉ. वेल्श ह्यांच्या सूचना गंभीर पणे न घेतल्याची चूक लक्षात आली. वेल्श ह्यांनी हाती सूत्र घेऊन डॉक्टर लोकांची पथक तयार करून आघाडीवर पाठवली- उपचारासाठी नाही तर आजारी सैनिकांच्या रक्त थुंकी आणि कफाची सॅम्पल्स घेऊन येण्यासाठी.ह्या आजाराचा जीवाणू / विषाणू शोधून लवकरात लवकर त्यावर लस तयार करणे आवश्यक होते. (विषाणू म्हणजे व्हायरस हा जीवाणू म्हणजे बक्तेरिया पेक्षा खूप लहान असतो आणि साध्या सुक्ष्मदर्शका खाली दिसू शकत नाही. तो इलेक्ट्रोन सुक्ष्मदर्शकातून पाहता येतो पण १९१८-२० मध्ये इलेक्ट्रोन सुक्ष्मदर्शक नव्हता. अर्थात संशोधकांना असे काही अतिसूक्ष्म जीवाणूपेक्षाही लहान असते ह्याची अंधुक कल्पना आलेली होती आणि त्याला शोधायची त्यांची धडपड चालू होती.)सर्वसामान्य जनतेला आणि लढणार्या सैनिकांना मात्र ह्या साथीच्या बातमीपासून अनभिज्ञच ठेवले गेले , बातम्या वर्तमानपत्रे , नियतकालिके ह्यांच्यावर कडक निर्बंध घातले गेले. जनतेबरोबरच शत्रूला देखिल ह्याची खबर लागता उपयोगाची नव्हते. पण आजार सुटी घेऊन घरी गेलेल्या सैनिकांपासून त्यांच्या कुटुंबियाना आणि त्यापासून सर्वसामान्य जनतेत पसरू लागला.रजा घेऊन माद्रिद स्पेन इथे मौजमजा करायला अमेरिकन सैनिकांपासून तो स्पेन मध्ये पसरला आणि तिथे वृत्तपत्रांनी ह्या आजाराच्या बातम्या अगदी पहिल्या पानावर द्यायला सुरुवात केली.निर्बंध घातली गेलेली वृत्तपत्रे मग ह्या स्पेन मधल्या वृत्तपत्रांचे संदर्भ देऊन बातम्या द्यायला लागली आणि ह्या आजाराला स्पॅनिश फ्ल्यू हे नाव पडले.
इकडे जर्मनी आणि अक्ष राष्ट्र अजून तरी ह्या आजारापासून वाचलेली होती . नुकतीच रशियाला युद्धात हरवून आणि त्यांच्याशी तह होऊन रशियन आघाडीवरचे ६० डिविजन सैन्य जर्मन सेनापती ल्युडेनडॉर्फकडे आले होते. त्यांना पुरेसा आराम आणि प्रशिक्षण देऊन त्याने पश्चिम आघाडी वर हल्ला केला. हाच तो वर उल्लेख केलेला कैसरश्लाख्त’.ह्या हल्ल्याच्या पहिल्या चरणात जर्मनांना चांगले यश मिळाले आणि त्यानी जोरदार मुसंडी मारत जवळपास सगळा उत्तर फ्रांस काबीज केला. पश्चिम आघाडीवर खंदकात गेली चार वर्ष टिकलेला स्टेलमेट अखेर उखडला जातोय अशी परिस्थिती निर्माण झाली पण अजूनही महत्वाची बंदरे आणि रेल्वे स्टेशन्स दोस्त राष्ट्रांकडेच होती आणि अमेरिकेतून मदतीचा ओघ सुरु झाला होता. दिवसाला ८४००० सैनिक आणि युद्धसामग्री ह्या बंदरावर येत होती आणि रेल्वेच्या साह्याने आघाडीवर पोहोचत होती. कैसरश्लाख्तच्या दुसऱ्या चरणात ही बंदरे आणि रेल्वे स्टेशन्स काबीज करणे हेच मुख्य उद्दिष्ट होते हा दुसरा चरण जुलै मध्ये सुरु होणार होता पण पहिल्या चरणात जे ब्रिटीश आणि फ्रेंच युद्ध कैदी जर्मनांनी पकडले त्यात अनेक फ्ल्यू ने आजारी होते. त्यांच्या पासून लवकरच हा रोग जर्मन सैन्यात पसरला. एक-दोन नाही तर ५ लाख जर्मन सैनिक ह्या आजाराने ग्रासले आणि युद्धाकरता निकामी झाले. काही तुकड्यात तर फक्त २५ टक्के जवानच युद्धालायक उरले होते. आधीच पहिल्या चरणात जर्मनांनीनी बरेच मनुष्यबळ गमावले होते,त्यात हा नवीन फटका जीवघेणा होता.जर्मन सैन्याधीकाऱ्यानी ल्युडेनडॉर्फला हल्ला पुढे ढकलणे गरजेचे आहे, त्याशिवाय पर्याय नाही हे समजावण्याचा प्रयत्न केला पण हा आजार किती गंभीर आहे आणि त्याचे काय परिणाम होताहेत हे नीट न समजल्याने त्याने फक्त पाच दिवसांनी हल्ला पुढे ढकलला. पाच दिवसांनी काय होणार होते? असो कैसरश्लाख्तच्या दुसऱ्या चरणात फ्ल्यूने जर्जर झालेल्या जर्मन सैन्याचा धुव्वा उडाला, कैसरश्लाख्त’ पूर्ण पणे फसले. ह्या पराभवाचे खापर फक्त फ्ल्यूच्या साथीवर फोडणे बरोबर नाही. पण ऐन निर्णयाच्या क्षणीच उद्रेक होऊन त्याने जर्मनीचा पराभव जवळ आणला हे नक्की. ऑक्टोबर संपेपर्यंत जर्मनीचा पराभव निश्चित झाला होता. कैसरश्लाख्त’ यशस्वी झाले असते तरी दोस्त राष्ट्रांनी हार पत्करली नसती पण युद्ध अजून कमीत कमी वर्ष दीड वर्ष नक्की लांबले असते.
हे सगळ होई पर्यंत आजारानेही दोस्त सैनिकातून माघार घ्यायला सुरुवात केली. ऑगस्ट १९१८ संपेपर्यंत ब्रिटीश सैनिकातून हा आजार पूर्ण पाने गायब झाला. जणू देवानेच जर्मनीला पराभूत करायला हा आजार पाठवला होता. पण तसे नव्हते. ह्या आजाराचा विषाणू परत एकदा उत्क्रांत होत होता. नक्की का? आणि कसे हे होत होते? ह्या मागे काय कारण होते? हे आज निश्चित सांगणे मुश्कील आहे.काही जण युद्धात वापरलेल्या विषारीवायू कडे बोट दाखवतात. मस्टर्ड गॅस हा विषारी वायू त्यावेळी दोन्ही बाजूकडून विपुल प्रमाणात वापरला गेला ह्या वायू मुळे विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल होण्याचा वेग वाढला असे काही जणांचे मानणे आहे तर काही जणांच्या मते युरोपातील प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये आधीच असलेल्या एखाद्या फ्ल्यू विषाणूशी ह्या फ्ल्यू विषाणूचा संयोग होऊन एक तात्पुरता सौम्य माणसाला फारसा त्रास न देणारा विषाणू तयार झाला असावा, नक्की माहिती नाही. पण एक मात्र नक्की, हा विषाणू आधीच्या जुन्या सर्वपरिचित फ्ल्यू विषाणूहून एका बाबतीत वेगळा होता ते म्हणजे तो निरोगी धडधाकट आणि तरुण लोकांना लक्ष्य करत होता. आधीचे फ्ल्यू विषाणूचे प्रकार आजारी,वृद्ध आणि वयाने लहान अशा लोकांना मुख्यत्वे जखडत असत, शिवाय ह्या फ्ल्यूचा जीवघेणा रोग बनण्याचा वेग फार जास्त होता. संसर्ग झाल्यापासून २४ ते ३६ तासात माणूस गारद होत असे. काय होतंय हे समजायच्या आत.रोगाचे निदान होऊन उपचार सुरु करण्याची संधी देखील मिळत नसे आजही आजाराला इतका जलद प्रतिसाद देता येणे अवघडच आहे. असो तर हि त्या विषाणूची पहिली खेप किंवा लाट होती. जी विरली होती....आत्तातरी.
नोव्हे १९१८ मध्ये युद्ध संपले सैनिक परतू लागले. ऑगस्ट १९१८ मध्ये फ्ल्यू चे प्रमाण कमी होत होत तोजवळपास नाहीसा झाला होता. ऑगस्ट च्या सुमारास युद्ध ही अंतिम टप्प्यात आल्यचे सगळ्यांना कळले होते आता काही आठवड्यातच जर्मनी लोळणार आणि युद्ध समाप्त होणार हे दिसू लागले होते.जग युद्ध संपल्याचा निश्वास टाकत होते तर डॉ वेल्श आजार संपल्याचा. पण दोघेही इतके नशीबवान नव्हते.सप्टे१९१८ च्या सुमारास डेव्हन-मेसाच्युसटस इथल्या लष्करी तळावर परत एकदा स्पॅनिश फ्ल्यूचा उद्रेक झाल्याच्या खबरा आल्या.रुग्णांनी लष्करी इस्पितळ अगदी भरून गेले होते, सगळेच रुग्ण मरणासन्न होते. ताप डोकेदुखी, शरीर हिरवी निळी पडलेली, खोकून खोकून बेजार झालेले. छाती अन फुप्फुसात पाणी झाल्याने श्वास घेता येत नव्हता. खोकला तर इतका येई कि त्याने पोटात मुरडा येई आणि पोटाच्या स्नायुना दुखापत होई.फुप्फुसातले पाणी/द्रव आणि हवा एकमेकात मिसळून फेस तयार होई, त्यात ऑक्सिजन हवेचे बुडबुडे अडकून बसत त्यामुळे रुग्ण जरा हलला, कुशीवर वळला कि बबल रॅप फोडल्यावर येतो तसा पॉप-पॉप असा आवाज येई.वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसपैकी निम्मे आजारी होते काही तर आजाराचे कोणतेही लक्षण न दिसण्या आधीच आजारी पडत, काही काम करत असताना कोसळत आणि मरत. काहीच्या बाबतीत संसर्ग झाल्यापासून १२ तासात मृत्यू ओढवे. जे मारत नसत त्यांना तीव्र स्वरूपाचा न्युमोनिया होत असे.हे काय चालू आहे कुणालाही कळणे शक्य नव्हते. हा नुकतीच साथ येऊन गेलेल्या स्पॅनिश फ्ल्यूचाच नवीन प्रकार आहे का? ह्या बाबतही साशंकता होती. खरेतर सगळे स्तंभित झाले होते. डॉ वेल्श ह्यांनी परिस्थितीची पाहणे केली आणि सर्जन जनरल गोर्गस ला फोन करून सर्व सैन्य कवायती, सैनिकांची ने आण, तैनाती-नियुक्ती सर्व थांबवून पाहिजे, तात्पुरती इस्पितळ उभारली पाहिजेत मुख्य म्हणजे जे सैनिक युरोपातून घरी जायला परत आले आहेत त्यांना घरी जाऊ न देणे हे तातडीने करायला सांगितले. कुणाच्या ध्यानात येवो न येवो पण स्पॅनिश फ्ल्यूची दुसरी लाट सुरु झाली होती.
स्पॅनिश फ्ल्यू असो वा नसो हि एक फार मोठी आणि जीवघेणी साथ आहे हे डॉ वेल्श ह्यांच्या लगेच लक्षात आले. आता ह्या संकटाचा मुकाबला दोन आघाड्यांवरून करावा लागणार होता. रोगाचा फैलाव रोखणे, शासनाला, लोकांना आणि रुग्णांना संकटाची जाणीव करून देणे, पण त्याच वेळी त्यांच्यात घबराट न माजेल हे पाहणे हा एक सामाजिक भाग झाला , दुसरे म्हणजे ह्यावर औषध शोधणे आणि मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करणे. दोन्ही कामे करणे डॉ वेल्श ह्यांच्या एकट्याच्या क्षमतेत नव्हते. त्यानी डॉ ओस्वाल्ड अवेरी ह्या एका तरुण संशोधकाला पाचारण केले. डॉ ओस्वाल्ड अवेरी हा रॉकफेलर संस्थेत संशोधक होता. लग्न संसार मित्र परिवार इतर कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त फक्त आपल्या वैद्यकीय संशोधानातच गढलेला. हा माणूस ह्या कामाला अगदी योग्य होता.त्याने ह्या आधी मेंदूज्वर आणि न्युमोनिया वर प्रभावी औषध शोधण्याच्या कामी मदत केली होती. डॉ वेल्श आणि त्यांच्या चमू बरोबरच न्युयोर्क इथली डॉ विल्यम पार्क आणि आना विल्यम हि जोडी कामाला लागली होती. त्याना आधी पोलियो, डीप्थेरीया आणि क्षयावर औषध तयार करण्याचा अनुभव होता. ह्या कामाचा त्यांचा अनुभव गेल्या २५ वर्षांचा होता. आपला लेख वैद्यकीय ज्ञानावर आधारलेला नसल्याने फार खोलात जाऊन सांगणे शक्य नाही पण साधारण संसर्गाने होणार्या आजारावर लस किंवा औषध तयार करताना आधी रोगी माणसाच्या रक्त लाघवी थुकी किंवा अशाच दुषित स्त्रावातून आधी विषाणू किंवा जीवाणू किंवा त्यानी शरीरात तयार केलेले टोक्सीन/ विषारी द्रव्य अलग करून ते सौम्य करून मग घोड्याच्या शरीरात टोचतात. घोड्याचे शरीर मग त्यावर अँटी बॉडी तयार करते ह्यांच्या पासून मग लस किंवा औषध करता येते. दोन वाक्यात लिहिले तितके हे सोपे सरळ अजिबात नाही पण एक कल्पना यायाला एवढे पुरेसे आहे. साहजिक औषध बनवून त्याचे घाऊक उत्पादन करायला मोठ्या प्रमाणात घोडे लागणार जे डॉ विल्यम पार्ककडे भरपूर होते ते पिढीजाद ह्या घोड्यांच्याच व्यवसायात होते.१६ वर्षापूर्वी रिचर्ड फाय्फर ह्या संशोधकाने बसिलास एन्फ़्ल्युएन्ज़ाइ हा जीवाणू फ्ल्यू ला कारणीभूत असल्याचे शोधले होते (ते चूक होते )आता हि दोघे देखील ह्याच बसिलास एन्फ़्ल्युएन्ज़ाइची एखादी जात स्पॅनिश फ्ल्यू ला कारणीभूत आहे का ते पाहत होती.त्याना आजारी माणसांच्या गोळा केलेल्या नमुन्यात बहुसंख्येने हा बसिलास एन्फ़्ल्युएन्ज़ाइ जीवाणू सापडला , म्हणजे त्याना मुल कारण सापडले आता लस तयार करून आणि घाऊक प्रमाणात बनवून देणे बाकी होते डॉ विल्यम पार्क,आना विल्यम आणि त्यांचा चमू वेगाने कामाला लागला. इकडे डॉ ओस्वाल्ड अवेरी अस्वस्थ होता बहुसंख्य रुग्णांच्या नमुन्यात बसिलास एन्फ़्ल्युएन्ज़ाइ जीवाणू सापडला पण बहुसंख्य म्हणजे ७०%. त्याच्या मते हे प्रमाण पुरेसे नव्हते. कोणतातरी दुसरा जीवाणू किंवा विषाणू जो आपण उपलब्ध तंत्रज्ञानाने शोधू शकत नाही तो ह्या मागे असेल ह्याची त्याला खात्री होती, पण उपाय काय? सध्या वेळ फार कमी होता आणि अशी शक्यता होती कि जर हे द्रावण घोड्याला टोचले तर त्यात तो न सापडलेला विषाणू ही असेल आणि घोड्याचे शरीर त्याच्यादेखील अँटी बॉडी तयार करेल.असे गृहीत धरले गेले. त्याशिवाय दुसरा उपाय काय होता! पण अशा प्रकारे घाई घाईत आणि अनमानधक्क्याने तयार केलेल्या लसी कूचकमी ठरल्या आणि मेहेनत वाय गेली. अर्थात म्हणून सपशेल अपयश आले असे नाही. ह्यानिमित्ताने झालेल्या संशोधन आणि प्रयोगातून पुढे बरेच फायदे झाले , न्यूमोनियाची लास जी आधीच बनली होती ती अधिक प्रभावी करता आली, प्रत्यक्ष विषाणू जरी शोधता-मारता आला नाही तरी रुग्णांचे जे हाल होत असत ते कमी करता आले फ्ल्यू मुले छातीत पाणी भरून माणूस मारायचा पण ते पाणी बाहेर काढून त्याला वाचवता येऊ लागले, कमी डॉक्टर , कमी औषधे जास्त रुग्ण असताना रुग्णांच्या शरीराला स्वत:च रोगाचा मुकाबला करताना शक्य ती मदत पुरवणे महत्वाचे होते आणि ते काम नर्सेसनी उत्तम केले त्यामुळे नर्सेस – म्हणजे परीचाराकांचे महत्व सगळ्यांना नीट समजले त्यांना मान दिला जाऊ लागला , त्यांच्या करता योग्य त्या प्रशिक्षाणाची गरज ओळखली गेली हेही नसे थोडके. ह्या सगळ्या धामधुमीचा आनि कामाचा ताण डॉ वेल्श ह्यांच्यावर आला आणि ते आजारी पडले, रुग्णांच्या सतत संपर्कात राहून राहून त्यानाही संसर्ग झाला आणि ते अनेक आठवडे आजारी झाले . अमेरिका ह्या रोगाच्या दुसर्या आणि सगळ्यात भयंकर जीवघेण्या लाटेत असतना त्याविरुद्ध लढणारा हा सेनापती गारद झाला.
सप्टे१९१८ युद्ध शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या अवस्थेत होते, आता जर्मानीवाराचा दबाव हल्ले रोखून चालणार नव्हते. अमेरिकन सरकार सैन्य प्रयत्नांत कोणतीही कसूर कोणत्याही कारणासाठी करायच्या मन:स्थितीत नव्हते. लिबर्टी बॉंड हे सरकारने काढलेले कर्ज रोखे जनतेने भरभरून घेऊन सरकारला पैशाची मदत करावी म्हणून फिलाडेल्फिया इथे एक परेड आयोजित केली होती. ता होती २८ सप्टे १९१८ .आरोग्य विभागाने ही परेड हे आयोजन रद्द करावे असा सल्ला दिला पण सरकारने ऐकले नाही. परेडला लाखो लोक आले होते त्यांच्या समोर सैन्य कवायती , संचालन विमानांचे उड्डाण प्रात्याक्षिके . लुतुपुतुच्या लढाया सगळे आयोजित केले गेले . आपले सैनिक कसे मृयुच्या छायेत झुंज देत आहेत त्यांना मदत करणे आपले कसे कर्तव्य आहे हे ठासून ठासून सांगितले गेले. जनतेला माहिती नव्हते कि ते देखील मृत्युच्या सावटाखाली आलेले आहेत त्यांची जीवन मरणाची लढाई आता सुरु झाली आहे. तीनच दिवसांनी लोक आजारी पडू लागले. एका दिवसात ५०० आठवड्यात १००० च्यावर आणि पंधरवड्यात ५००० लोक आजारी पडून मेले. फक्त इस्पितळ नाही तर शवागारात जागा उरली नाही, कबरस्तानात जागा संपली , लाकूड संपले शवपेट्या बनवता येईनात लोक मृताना गोण्यात भरून आणू लागले शव स्वीकारालायला नकार दिला जाऊ लागला मृतदेह रस्त्यात पडून राहू लागले. अनेक घरात आजारी झालेले लोक आपल्या मेलेल्या आप्तांच्या शावाबरोबर राहू लागले. त्यांचा मृत्यू अटळ होता घरच्या घर फक्त आणि फक्त मृतानी भरून गेली. अनेक कुटुंबच्या कुटुंब -घराणी नामशेष झाली. मृताची नोंद करणे सोडून दिले , इस्पितळात रुग्ण हिरवा नीळा पडू लागला कि त्याला मृत घोषित करून बाहेर काढण्यात येऊ लागले. रस्त्यावर पडलेल्या प्रेतातून वाहणार्या हिरवट निळसर द्रवाचा चिखल रस्त्यावरच सडलेल्या प्रेतांची दुर्गंधी आणि त्यावर घोंघावणाऱ्या माशा असे चित्र सर्वत्र दिसू लागले. नोव्हे सुरु होई पर्यंत ५ लाख लोक आजारी पडले. शासन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली.मग शहरातले धडधाकट लोक एकत्र आले त्यानी त्याचे गट स्थापून निरनिराळी कामे हाती घेतली. पैसा गोळा करून अर्थमुव्हर आणून सामुहिक कबरी खणून त्यात प्रेते पुरली गेली. शहराची साफ सफाई केली गेली खाजगी गाड्या रुग्णवाहिका,शववाहिकात रुपांतरीत केल्या गेल्या.अर्थात त्याला थोडा वेळ लागला आणि मधल्या काळात जनतेने प्रचंड हाल भोगले. आरोग्य विभागाने दिलेला इशारा न ऐकण्याची फार जबर किंमत निरपराध जनतेने दिली. हीच गोष्ट अख्या अमेरिकेत सुरु होती.सरकारने अजूनही ह्या आजाराचे वर्तमान दाबयचेच ठरवले असल्याने आगगाड्या आजारी लोकाना घेऊन जात येत होत्या त्यामुळे लवकरच हा आजार सर्व अमेरिकाभर पसरला.
सरकार जरी खुलेपणे जनतेला काही सांगत नव्हते तरी बातम्या हळू हळू झिरपत होत्याच, अशामुळे मग अफवांना उत आला. कुणी म्हणाले कुत्र्यामुळे हा आजार पसरतो मग अरीझोनातल्या हजारो भटक्या कुत्र्यांना यमसदनी धाडले गेले.कुणी सांगितले कपूर हा ह्या आजारावर गुणकारी आहे झाले लगेच कापडात बांधलेल्या कापराच्या वाड्या लोक गळ्यात ताइतासारख्या लटकावू लागले. त्यातही अनेकाने पैसा कमावला. कुणी साधा शिंकला तरी लोक पळ काढू लागले. कृष्णवर्णीय . आशियाई लोक ह्या रोगाचे खरे जनक आणि वाहक आहेत अशी अफवा पसरली आणि आधीच काळे गोरे अशा भेदाने पोखरलेले समाजमन अजून दुभंगले. काळ्या लोकाना कामावरून काढणे त्यांना गोर्यांच्या वस्त्यातून हाकलायला सुरुवात झाली.कुणी फ्ल्यू चा आजार झटक्यात बारा करायचे मशीन काढले आणि पैसे कमावले. काय काय वेडेपणा लोक करत होते ह्याला सीमा नाही. शेवटी सरकारला जाग आली. औषध अजूनही सापडले नसल्याने मग आज आपण जे करतो आहोत तेच त्यानी हि केले, सर्व ठिकाणी संचार बंदी करणे, लोकांना एकत्र जमायला बंदी घालणे, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ह्यांना वेगळे करणे. सभा समारंभ मेळावे रद्द करणे इ.इ. पण युद्ध प्रयत्न आणि तयारी त्याबाबतीत मात्र सरकार ढिम्म होते राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन ह्यांनी सैनिकांची भरती आणि तैनाती सैनिकांची ने आण चालूच ठेवली. फ्ल्यू चे थैमानही मग चालूच राहिले. असा हाहा:कार उडाला असताना ऑक्टोबर १९१८ संपेपर्यंत हा आजार अचानक पुन्हा मागे हटला. म्हणजे पुरता गेला नाही पण नव्याने आजारी पडणारे आणि मरणारे ह्यांच्या संख्येत लक्षणीय रित्या घट झाली.
११ नोव्हे १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले जगाने, मुख्य म्हणजे अमेरिका आणि युरोपने सुटकेचा नि:श्वास टाकला. लोक विजयोत्सव साजरा करायला घराबाहेर पडून रस्त्यावर आले. निरनिराळ्या शहरात मिरवणुका आणि सैनिकांचे सत्कार सोहळे आयोजित केले गेले आणि फ्ल्यू परतला. हि फ्ल्यू ची तिसरी आणि शेवटची लाट होती. पुन्हा नव्याने उद्रेक झालेला असला, लोक आजारी पडत आणि मरतही असले, तरी आता रोग तितका भयानकरित्या जीवघेणा आणि घातक राहिलेला नाही हे हळू हळू लक्षात आले. रोग झाला तरी शरीर हिरवे निळे पडून मारण्याचे प्रमाण कमी झाले, रोग बरा होऊन माणूस वाचण्याचे प्रमाण वाढले. ही लाट १९२० च्या मार्च पर्यंत जोरात होती आणि नंतर हळूहळू विरत जाऊन जून जुलै पर्यंत रोग नाहीसा झाला. अमेरिकेत साधारण दीड कोटी लोकांना हा रोग झाला आणि त्यात अंदाजे सात लाख लोक मृत्यू पावले.
जसा अचानक हा रोग आला, त्याने थैमान घातले तसाच अचानक तो नाहीसा झाला. नक्की काय झाले कशामुळे नाहीसा झाला ह्याबाबत आजही तर्क वितर्क चालू आहेत पण त्याबद्दल नंतर पाहू.
आतापर्यंत आपण ह्या रोगामुळे मुख्यत: अमेरिकेत काय झाले हे आपण पहिले. आता इतर जगात मुख्य म्हणजे भारतात काय झाले ते थोडक्यात पाहू.
सैनिकांनी/ सामानानी भरलेली जहाजे जशी अमेरिकेतून युरोपात जात होती तशीच इतर देशातूनही जात होती आणि येताना सुटीवरच्या किंवा आजारी/जखमी, जायबंदी सैनिकांना मायदेशी घेऊन येत होती. हि जहाजे म्हणजे बंदिस्त परीक्षा नळ्याच जणू, त्यामुळे त्यात एखादा सैनिक ह्या आजाराने बाधित असला कि थोड्याच काळात त्या जहाजावरचे सगळे जण ह्या रोगाने ग्रासले जात. ह्याबाबतीत लावायथान ह्या जहाजाची कहाणी मोठी रोचक (आणि प्रातिनिधिक) आहे.२८ सप्टे.१९१८ रोजी बोस्टनच्या किनाऱ्यावरून हे जहाज निघाले तेव्हा त्यात ९००० सैनिक होते. थोड्याच काळात म्हणजे १ ते दीड आठवड्यात जहाजावर फ्ल्यूचा उद्रेक झाला सुरुवातीला आजारी वाटणाऱ्या लोकांना जहाजावरील एअर टाईट( हवाबंद ) खोल्यात ठेवले गेले. तरीही रोग पसरलाच. जहाजावरची वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागली, आजारी सैनिकांना ठेवायचे कुठे? त्यांना जहाजाच्या डेकवर ठवले गेले उन, वारा, पाऊस थंडी दिवस रात्र हे आजारी सैनिक तिथेच ठेवावे लागले. दुसरी सोयच नव्हती. सैनिक मरू लागल्यावर नाईलाजाने त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून दिले गेले.८ ऑक्टो १९१८ रोजी जहाज जेव्हा फ्रान्सला पोहोचले तेव्हा २००० लोकांना संसर्ग झालेला होता आणि १०० च्यावर मेलेले होते.
ही काही अपवादात्मक घटना नव्हती. उलट सर्वच जहाजान्बाबत हिच गोष्ट होती.अमेरिकन किनाऱ्यावरून निघणारे प्रत्येक जहाज मग ते लष्करी असो व व्यापारी, युरोपकडे निघाले असो वा इतरत्र , हा रोग घेऊन जगाच्या कानाकोपर्यात इमाने इतबारे पोहोचवत होते.युरोपच्या किनाऱ्यावरून निघणारी जहाजे देखील रोग प्रसारातला आपला वाटा उचलत होती.बंदरातून लवकरच हा रोग मग आगगाड्या, मोटारी आणि मावाहतूक करणाऱ्या इतर साधनामार्फात आतील भागात पसरत असे. एक अंटार्क्तिका खंड सोडला तर रोग सर्व जगभर पसरला.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
दक्षिण आफ्रिकेत आधीच असलेल्या गोरे काळे वर्ण भेदाची दरी त्याने अधिक वाढवली. काळे लोक अस्वच्छ आणि ओगाचे वाहक असा शिक्का मारून त्यांच्यावर अत्याचार केले गेले आजारी असो व नसो शंका आली तरी त्यांना तुरुंगात डांबले गेले वैद्यकीय उपचार सुविधा मदत देणे दुरच राहिले. आफ्रिकेने ह्या साथीत ५० लक्ष लोक गमावले.किम्बर्ली येथे हिर्याची खाण होती.ह्या किम्बर्ली शहरात २५ टक्के खाण कामगार रोगाने मेले, शहरातली एकूण ९ टक्के जनता रोगाला बळी पडली.
जपानमध्ये ह्या साथीला सुमो रोग म्हणून ओळखले गेले कारण ह्याची साथ एका सुमो कुस्ती सामन्यानंतर उसळली.
जावा द्वीप्समुहात ह्या रोगाने ४० लक्ष बळी घेतले.रशिया मेक्सिको चीन इथेही ह्याने बळी घेतले अलास्का सारख्या दुर्गम भागातही त्याने थैमान घातले. अलास्का रशिया सीमेवर असलेल्या वूड्स रीवर (नदीचे नाव) काठचे युपीक गाव हे तसे दुर्गम भागात. कुत्र्यांनी ओढायची स्लेज गाडी हे एकमेव दळणवळणाचे साधन . पूर्वी हा भाग रशियात येत असे पण लोकांपर्यंत अजून रशियात झारशाही कोसळून तेथे क्रांती झाल्याची खबर पोहोचली नव्हती पण फ्ल्यू पोहोचला. ह्याची कहाणी मोठी भयानक आहे. अलास्काच्या आंतरभागात फ्ल्यू पोहोचल्याने ह्या भागातील लोकांना काही मदत पुरवता येईल का ते पाहण्याकरता वैद्यकीय अधिकारी आणि शिपाई (जंगली श्वापदान्पासून रक्षण करण्यासाठी)गावोगावी जात होते. ते तसेच ह्या युपीक गावी आले. पण अख्खे गाव अंधारात बुडालेले. कुणी घरात असावे असे वाटत नव्हते. बहुधा आजाराची बातमी मिळाल्याने गावकरी गाव सोडून पाळले असावेत. पण त्यांना एका घरात खुडबुड जाणवली, कुणी जरी मागे राहिले कि काय पाहावे म्हणून शिपायांनी दार उघडले तर आतले सगळे जण आजाराने मेलेले होते आणि त्या कुटुंबाने पाळलेले स्लेज गाडी ओढणारे कुत्रे काहीच खायला न मिळाल्याने शेवटी आपल्या धन्याचीच प्रेते खात होती. सगळ्या गावात हाच प्रकार होता. नाईलाजाने सर्व कुत्रे मरून गाव जाळून टाकले गेले. फिजी टोंगा वानुवातु पागो हि प्रशांत महासागरातली बेटे जगापासून तुटलेली , तिथेही रोग पसरला इथे काही गावात तर ९० टक्के लोक मारले गेले. ह्या बेतान्वाराचे लोक अशा कुठल्याच आजाराला ह्यापूर्वी सामोरे गेलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात बळी पडले त्यांच्याबरोबर जवळपास २० एक स्थानिक भाषा लुप्त झाल्या.
सामोआ हि न्यूझीलंड जवळची बेटं म्हणजे जर्मन वसाहती होत्या, युद्ध सुरु झाले तेव्हा न्यूझीलंड ने दांडगाई करून ती जिंकून घेतली त्यातील पूर्वेकडचे बेत अमेरिकेच्या ताब्यात होते, फ्ल्यूची साथ आधी अमेरिकेत आणि नंतर जगभरात तसेच न्यूझीलंड मध्ये पसरल्याचे समजताच ह्या पूर्व सामोआ बेटाच्या अमेरिकन गवर्नरने बेट बाहेरील जगाला बंद केले. कोणतेही जहाज बंदरापर्यंत यायला मनाई केली. पण न्यूझीलंड च्या ताब्यातील पश्चिम सामोआ वासी एवढे नशीबवान नव्हते. त्यना ह्या रोगाने ग्रासले आणि जवळपास एक तृतीयांश लोक मृत्युमुखी पडले. पूर्व सामोआ बेटांचे इलागीकरण १९२० पर्यंत चालू राहिले आणि तेथे एकही माणूस आजारी पडला नाही कि मेला नाही. माणसांची वस्ती असलेल्या अख्ख्या जगात हा एकच देश/ बेट किंवा भूभाग असा होता जेथे फ्ल्यू पोहोचू शकला नाही.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भारत आणि स्पॅनिश फ्ल्यू
इतिहासात ज्या नोंदी आहेत त्याप्रमाणे हा आजार भारतात प्रथम मुंबईत आला. मे १९१८ मध्ये मुंबई बंदरात आलेल्या जहाजातून सहा खलाशी आजारी असल्याने खाली उतरवून इस्पितळात भरती केले गेले. लवकरच ह्या आजाराने ग्रस्त लोक मुंबई बंदर, बंदरालगतचे इलाखे आणि नंतर सगळ्या शहरात सापडू लागले. तिथून हा रोग मग अख्या भारतभर पसरला. मध्य भारत,पश्चिम महारष्ट्र, पंजाब आणि उत्तरप्रदेशात ह्या रोगाने अक्षरश: थैमान घातले. नदीकाठी प्रेत जाळून राख आणि अस्थी नदीत सोडायची आपली जुनी परंपरा पण उत्तरप्रदेशात, वाराणसीत लोक इतक्या संख्येने आणि इतक्या पटापटा मरत होते कि चितेला लाकूड मिळेना. गंगेच्या काठावर-आसपास एक झाड शिल्लक राहिले नाही लोक मग अर्धवट जळलेली किंवा तशीच प्रेतं नदीत फेकून देऊ लागले. गंगेतल्या सुसरी आणि डॉल्फिन्स हे मांस खाऊ लागले. पण प्रेतं इतकी जास्त होती कि ते सुद्धा फारकाही करू शकले नाहीत. गंगेसारख्या मोठ्या नदीचे विस्तीर्ण पात्र प्रेतांनी भरून गेले परिणामस्वरूप मग इतर रोगराई काठावरच्या गावात पसरली.
हिंदुस्तानी जनतेला रोगराई, साथी, महामारी, दुष्काळ काही नवे नव्हते पण मृत्यूचे इतके भयानक तांडव त्यानी आधी कधी पाहिले नव्हते.दोन दशकांपुर्वीच भारतात प्लेगच्या साथीने हाहाकार माजवलेला अनेकांना आठवत होता. त्यावेळी इंग्रजांनी हि महामारी ज्या पद्धतीने हाताळली होती त्यामुळे लोकांच्या मनात संशय, भीती आणि रागच होता.पुण्या-मुंबई सारख्या शहरात त्यानी आजारी आणि संशयित आजारी लोकांना घराबाहेर काढून वेगळे करणे, त्यांचे कपडेलत्ते सामानसुमान जाळून टाकणे, त्यांची घरे कार्बोलिक असिडने निर्जंतुक करून सील करणे, स्त्री पुरुषांची रस्त्यात कपडे काढून तपासणी करणे, असले अघोरी प्रकार करून रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था केली तर ह्याउलट ग्रामीण भागात काहीच उपाय केले नाही. त्यातून रोग कसे होतात? आणि फैलावतात? ह्याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा ह्यांचा पगडा भारतीयांच्या मनावर जास्त होता. त्यामुळे जेव्हा १९१८ साली हि साथ पसरली तेव्हा भारतीय लोकांनी इंग्रजांकडे त्यांच्या प्रयत्नांकडे संशय आणि रागानेच पहिले. भारतातील इंग्रजान्कडेही ह्या साथीच्या रोगाचा सामना करायची कोणतीही ठोस योजना आणि यंत्रणा होती असे दिसत नाही. त्यामुळे फार थोडे उपाय थोडी मदत त्यानी दिली आणि त्याहून फार कमी मदत भारतीयांनी स्वीकारली.दस्तुरखुद्द म. गांधीना ह्या आजाराने ग्रासले आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. ह्या रोगाने दीड ते दोन कोटी भारतीयांचे बळी घेतले.हि आकडेवारी जगात सगळ्यात जास्त आहे. सभ्य-कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्या इंग्रजांनी ह्या बाबतीतले वर्तमान शक्यतो दाबयाचाच प्रयत्न केला (आणि त्याला बऱ्याचप्रमाणात यशही आले.)
अशावेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काम करणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी गावोगावी मदत पोहोचवण्याचे काम केले. अर्थात हि मदत पारंपारिक उपचार करणे. भारतीय वैद्य-वैदू ह्यांनी दिलेली औषधे पुरवणे, स्वच्छतेत बाबत माहिती देणे अशाच प्रकारची होती त्यामुळे फारच थोडा फायदा झाला. तसेही आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक शास्त्राकडेही ह्या आजारावर प्रभावी औषध तेव्हा उपलब्ध नव्हतेच त्यामुळे विशेष काही फरक पडला नसताच, पण स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या ह्या कामाचा दुसरा फायदा असा झाला कि त्यांच्या बद्दल आदराची आणि स्नेहाची भावना भारतीयांच्या मनात बळावली.ह्यापूर्वीही अनेक लोक इंग्रजी अंमलाविरुद्ध निरनिराळ्या मार्गानी चळवळी, कारवाया करत होते आणि त्याबद्दल सर्वसामन्य भारतीयांना आदर वाटत असला तरी ते ह्यात सक्रीय सहभाग घेण्यापासून तसे लांबच होते पण ह्या साथीत त्यानी केलेल्या कामामुळे स्वातंत्र्य चळवळीला जनसामान्याचा मनापासून पाठींबा आणि सक्रीय सहभाग मिळण्याकरता आवश्यक असलेली पायाभरणी झाली. इंग्रजविरोधी भावना बळावली.
तशात १९१९ साली झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाने लोकभावनेवर जणू शिक्कामोर्तब झाले. इंग्रज हे फक्त शोषक आणि जुलमी राज्यकर्ते आहेत, भारतीयांचा फक्त ते संसाधानासाठी वापर करून घेतात आणि गरज संपली कि फेकून देतात. हा समज पक्का झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बहुसंख्य जनतेचा सक्रीय सहभाग असणे हा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक टप्पा ओलांडला गेला, स्वातंत्र्य मिळवण्याच्या वाटेवरचे एक मोठे पाउल पुढे टाकले गेले.ह्या फ्ल्यूच्या साथीमुळे भारतात जे उत्पात घडले, जी अपरिमित प्राण हानी झाली त्याला लाभलेली एक रुपेरी किनार आहे हे खरे.
स्पॅनिश फ्ल्यू चा वारसा
एकुणात पाहता ह्या स्पॅनिश फ्ल्यूने जगभरात साधारण ५ कोटी बळी घेतले. भारतासारख्या गुलाम आणि मागास भागात नक्की आकडेवारी गोळा करता न आल्याने निश्चित सांगता येणे मुश्कील आहे पण काही तज्ञांच्या मते हा आकडा ह्या पेक्षा खूप जास्त आहे. पण सगळ्यात कमी अंदाज म्हणजे ५ कोटी. पहिले महायुद्ध आणि त्यात समावेश असलेले जवळपास सगळे जग हे ह्या आजाराच्या साथीची तीव्रता आणि संहारकता वाढवण्यास कारणीभूत ठरली हे नि:संशय.(खाली मोठ्या प्रमाणात मृत्यू घडलेल्या देशांची साधारण आकडेवारी दिली आहे.)
देश मृत्यू (अंदाजे)
भारत १.७ - २ कोटी
इंडोनेशिया ४० लाख
रशिया १० लाख
फ्रान्स ४ लाख
जपान ३.९ लाख
युनायटेड किंग्डम
(इंग्लंड+उत्तरआयर्लंड+वेल्स+स्कॉटलंड २.२ लाख
अमेरिका ६.७५ लाख

पहिल्या महायुद्धात साडेचार वर्षात २ कोटीच्या आसपास प्राणहानी झाली त्यापेक्षा दुपटीहून अधिक जीव ह्या साथीने २ वर्षांच्या आत घेतले . पहिल्या महायुद्धात बळी गेलेल्यांची जागोजाग स्मारके आहेत, त्यावर विपुल साहित्य, कलाकृती निर्माण केल्या गेल्या, पण तुलनेने त्यापेक्षा भयानक अशा ह्या आजाराला, त्यात बळी गेलेल्यांना, त्यात जीव धोक्यात घालून आणि काम केलेल्या, बरेचदा तो गमावलेल्या डॉक्टर, नर्सेस, परिचारक आणि स्वयंसेवकांना मात्र आपण म्हणजे जग विसरलो आहोत. असे का झाले असावे? लोक असे चमत्कारिक का वागले असावेत? ह्याचे नक्की उत्तर सांगता येत नाही. कदाचित पहिल्या महायुद्धाचा धक्का इतका जास्त होता कि त्यामुळे ह्या धक्क्याकडे म्हणावे तितके लक्ष दिले नसेल. असेही असेल कि ह्या रोगाने जवळपास प्रत्येक कुटुंबातील कुणा न कुणाला प्रभावित केले, इतक्या प्रचंड प्रमाणावर लोकांनी आपले आप्त,स्नेही,कुटुंबीय,जवळचे नातेवाईक गमावले, कि त्यानी त्या कटू आठवणी विसरणेच पसंत केले असावे.शिवाय हा आजार म्हणजे एक बिन चेहऱ्याचा शत्रू होता आणि त्याने मानव जातीला नामोहरम करत गुडघे टेकायला भाग पडले.
सुप्रसिद्ध लेखिका कॅथेरीन ऍन पोर्टर हिने लिहिलेली पेल हॉर्स पेल रायडरहि एक गाजलेली कादंबरी सोडता फार मोठ्या कादंबऱ्या, नाटकं लिहिली गेली नाहीत. स्वत: कॅथेरीन ह्या आजाराच्या विळख्यात सापडून मारता मारता वाचली होती. पण अशा प्रकारे वाचलेली ती एकमेव कलावंत किंवा प्रसिद्ध व्यक्ती नव्हती.ह्या उलट असंख्य मान्यवर, प्रसिद्ध, सेलिब्रिटी लोक, नेते ह्या आजाराने जखडले आणि बरे झाले पण त्यानी त्या अनुभवाबद्दल बद्दल फार काही व्यक्त केले नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन, इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड लॉइड जॉर्ज. जर्मन सम्राट कैसर विल्हेल्म, महात्मा गांधी, फ्रान्क्लीन डी रूझवेल्ट( हे तर आजारी पडले तेव्हा वर उल्लेख केलेल्या लावायथन ह्या जहाजावर होते, पण वाचले.) ह्यांसारखे राजकीय पुढारी लोकनेते किंवा प्रसिद्ध कवी टी एस एलीयट, वॉल्ट डिस्ने( हा तेव्हा युद्धात रुग्णवाहिका चालक होता.) अशा सारखे अनेक ह्या आजाराने ग्रासले पण त्यानी त्याबद्दल पुढे अवाक्षरही काढले नाही.
एक रंजक माहिती म्हणून सांगायचे तर एक जर्मन-अमेरिकन रियलइस्टेट ब्रोकर- फ्रेडरिक ट्रम्प ह्या आजाराला बळी पडला. त्याच्या मुलाने-जॉन ट्रम्पह्याने वडलांच्या जीवन विम्याची रक्कम गुंतवून बांधकाम क्षेत्रात उडी घेतली आणि नाव लौकिक,पैसा कमावला.त्याचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे.
पण स्पॅनिश फ्ल्यूचा इतिहास म्हणजे फक्त मृत्यू, वियोग आणि आजारपणाचा इतिहास नाही. ह्या आजाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली. आपण ह्या क्षेत्रात अजून खूप मागे आहोत हे जाणवले. सरकार ह्या क्षेत्रातल्या संशोधनाला मदत पुरवू लागले. अशा रोगांना, साथीना तोंड द्यायला सामाजिक पातळीवर प्रयत्न करावे लागतात. फक्त वैद्यकीय तंत्रज्ञानावर विसंबून चालत नाही. हेही समजले त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. डॉ ओस्वाल्ड अवेरी ह्याने आपले काम पुढे सुरूच ठेवले. पुढे dnaचा शोध आणि संरचना तसेच जनुक शास्त्रात त्याने भरीव योगदान दिले. डॉ विल्यम पार्क आणि आना विल्यम ह्यांनी जी लस तयार केली होती त्यावरून पुढे अनेक रोगांना एकत्र प्रतिबंध करणाऱ्या लसी तयर करण्याचे तंत्र विकसित झाले.आज आपण ज्या ट्रिपल पोलियो सारख्या दोन तीन रोगांच्या एकत्रित लसी देतो त्यांच्या शोधाचे मूळ इथे आहे.अशा साथीच्या रोगाचे जीवाणू/ विषाणू हुडकणे आणि त्यावरचे उपाय शोधण्याच्या कामी अनेक तरुण शास्त्रज्ञ लागले त्यातीलच एक अलेक्झांडर फ्लेमिंग ह्याने पुढे १९२८ साली पेनिसिलीन ह्या प्रतिजैविकाचा शोध लावला. वैद्यकशास्त्रात ह्या शोधाने क्रांती घडवली.विसाव्या शतकातल्या सगळ्यात महत्वाच्या शोधातला तो एक शोध गणला जातो.
आजही लोक ह्या साथीची चिकित्सा करतात. अलास्का च्या बर्फाळ वातावरणात जे रुग्ण पुरले गेले त्यांची प्रेते अतीशीत वातावरणात अगदी जशीच्या तशी राहिली असतील म्हणून जॉन हुल्तीन ह्या तरुण शास्त्रज्ञाने त्या कबरीतून फुफ्फुसाचे नमुने मिळवून त्यातून स्पॅनिश फ्ल्यूचे विषाणू अलग करण्याचा प्रयत्न केला साल होते १९५१ पण त्यात त्याला यश आले नाही.पण त्याने हार मानली नाही पुढे ४६ वर्षाने म्हणजे १९९७ साली परत एकदा त्याने प्रयत्न केले आणि ह्यावेळी त्याला यश आले . हा विषाणू म्हणजे २००९ साली आलेला कुप्रसिद्ध H1N1 विषाणू म्हणजे स्वाईन फ्ल्यू होता.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या विषाणूच्या शोधाने लस तयार करणे आणि त्याचा प्रसार रोखण्याच्या कामी मोठी मदत झाली. काही प्रश्नांची उत्तरे हि मिळाली. १९१८ मध्ये ह्या आजाराने ग्रासलेले रुग्ण निळे पडत त्यांच्या फुप्फुसात निळसर द्रव भरून जात असे.ह्या आजाराने मुख्यत: तरुण धडधाकट माणसांचा जास्त प्रमाणात बळी घेतला असे का? ह्याचे उत्तर मिळाले. ह्या रोगाचा विषाणू तरुण धड धाकाट माणसे, ज्यांची रोग प्रतिकार क्षमता उत्तम आहे तिलाच डिवचत असे आणि तिला एक प्रकारे ओवरड्राईव्ह मध्ये टाकत असे त्यामुळे विषाणूला मारायला ज्या अँटी बॉडी शरीरात तयार होत त्यांचा जणू एक महापूर येऊन तो द्रव फुफ्फुसात भरून जाई श्वास घ्यायला ऑक्सिजन न मिळाल्याने माणूस स्वत:च्या शरीराने तयार केलेल्या द्रवात बुडून मरत असे. विषाणू मुळे नाही.
समारोप
आज १०२ वर्षानंतर साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यात मानव जात सक्षम आहेका?ह्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे देणे अवघड आहे, अशा रोगांचा मुकाबला फक्त आजारावर औषधे, उपचार ह्या मार्गाने शक्य होत नाही त्याकरता मानव समूह आणि देशादेशातला सहकार जास्त निर्णायक भुमिका बजावतो. विषाणू जात धर्म भौगोलिक परिस्थिती वंश वर्ण काही पाहत नाही पण मानव समूह मात्र आजाराला सामोरे जाताना ह्या सगळ्या गोष्टींची जळमटं डोक्यात घेऊन जातात. स्वार्थ आणि भीती जेव्हा समूहाची मानसिकता बनते तेव्हा आजाराशी लढण्य ऐवजी एकमेकातच धुमश्चक्री सुरु होते. सध्या आपण हे पाहतोच आहोत. शिवाय अंधश्रद्धा आणि अफवा आहेतच. तेव्हा होय आज आपण साथीच्या आजाराचा मुकाबला १९१८ पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकत असलो तरी अजून सुधारणेची खूप गरज आहे वाव हि आहे.
भारताबद्दल काय बोलायचे. पाहिल्या महायुद्धात सगळ्यात जास्त योगदान दिलेला युरोप बाहेरचा देश म्हणजे भारत. पण जिथे भारतीयांना पहिले महायुद्ध विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी झाले ह्यापेक्षा फार काही माहिती नसते, ह्या पेक्षा जास्त काही माहिती घ्यायची इच्छ्ही नसते,तिथे स्पॅनिश फ्ल्यू आणि भारत ह्याच्याबद्दल काय उत्सुकता असणार! आजही कोरोनाच्या साथीत लोक धर्म आणि रुढीना चिकटून आहेत. कोरोना हा अल्लाने काफिरांना शिक्षा पाठवलेला रोग आहे असे काही मुस्लीम मुल्लामौलवी बोलतात तर पूर्वीच्या सोवळ्या ओवाळ्याचे महत्व सांगणारे हिंदूहि आहेत ह्यांच्यात गुणात्मक फरक कसा करायचा.
इतिहास हा पूर्वजांच्या चूकातून शिकणे आणि त्यांच्या मोठे पणातून स्फूर्ती घेऊन पुढे जाण्याकरता अभ्यासायचा असतो. चुकांची पुनरावृत्ती, पूर्वजांचे दैवतीकरण करणे त्यांना प्रेरणास्थान करण्या ऐवजी मर्मस्थान बनवणे असे करण्याने समाजाचे नुकसानच होते. नियती न्यायनिष्ठुर आणि निर्दयी असते असा इतिहासाचा धडा आहे. वास्तवाला नाकारून आंधळेपणाने वागणाऱ्याना ती शापच देत असते. भारतीय समाजाला अजून तरी उ:शापाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
स्पॅनिश फ्ल्यूच्या उद्रेकाशी आपण कसे झुंजलो, तो किती भयानक होता ह्या इतिहासाबरोबरच त्यातून आपण काही शिकलो असू आणि अशा साथीना तोंड द्यायला थोडेफार तयार झालो असु तर ते केवळ चिकित्सक वृत्ती, शास्त्रीय संशोधन आणि सामाजिक जागृतीतूनच... हे वर्तमान समजावे म्हणून हा लेखन प्रपंच.
समाप्त
--आदित्य
लेखाचे संदर्भ
1.The 1918 Flu Pandemic - Extra History Part 1 to 6 You tube documentary series
2.1918 Spanish Flu historical documentary _ Swine Flu Pandemic _ Deadly plague of 1918 - YouTube documentary
3. https://www.cdc.gov/flu/pandemic-resources/index.htm
4. The 1918 Spanish Flu Pandemic: The History and Legacy of the World’s Deadliest Influenza Outbreak
by Charles River Editors Kindle E book

इतिहासजीवनमानलेख

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

31 Mar 2020 - 2:17 pm | जयंत कुलकर्णी

भयंकर...

सुखी's picture

31 Mar 2020 - 3:34 pm | सुखी

एक शंका, चीन मध्ये असं काय वेगळं आहे की तिथे अशा साथी पहिल्यांदा सापडतात

आदित्य कोरडे's picture

31 Mar 2020 - 6:26 pm | आदित्य कोरडे

ब्युबोनिक प्लेग हा सगळ्यात जास्त संहारक होता त्याने एकूण लोकसंखेच्या १/३ बळी घेतले, तो चीन मध्ये उद्भवला नाही

जेसिका ब्राउन's picture

31 Mar 2020 - 10:20 pm | जेसिका ब्राउन

From what I have read so far:
Bats are carriers of over 400 different corona viruses but these virus have a symbiotic relation with bats - bats don't get sick because of these viruses. But the virus, on occasion, can jump from bats to some other species - cats, camels etc.
Bats exist in almost all parts of the world and the jumps of viruses happens all too often. But it would take decades fro a virus to mutate enough to be able to infect humans and even more time to get a mutation that can cause human to human transmission (Huntavirus, for example, does not transmit human to human yet.). The more animals the virus can infect, the more favorable mutations occur in the virus.

In most of the world, humans and animals maintain some distance (we wouldn't stand a foot away from a Bat/Pangolins/ Wild Cats etc. under normal circumstances) In China, due to wet markets, viruses can jump easily from one animal species to other and infect greater number of animals than it could in wild. To add to this, humans are also in closer contact with such animals because either the animal is eaten or is considered beneficial medically or has some other cultural significance. This allows the viruses to jump to humans more easily. But that doesn't mean the virus can transmit human to human yet.
For human-to-human transmission to be possible, a virus will have to combine with some other virus that has already achieved human to human transmission. And if the virus acquires this mutation, it can freely spread in human population. In China's case, due to it's population density, it's easy for any infections to spread quickly (same with New York or Mumbai)
China is also well connected with rest of the world because of tourism and business activities. So some infected people from China can easily spread the infection to many other countries.

tl;dr
1. Animals in close contact in unhygienic wet markets facilitates animal-to-animal/ species-to-species jumps and mutations
2. Animals in close contact with humans facilitates animals-to-human transmission
3. What causes a virus to acquire human-to-human transmission is a complex subject
5. High population density increases the infectivity(?) of the virus in humans
4. Ease of travel from China to rest of the world spreads the infections far and wide

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Mar 2020 - 7:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे बघा-- आत्ताची बातमी, निजामुद्दीन मध्ये झालेल्या या कार्यक्रमातील लोक करोनाबाधित झाले आहेत आणि आता देशभर पसरले आहेत. पोलिस या प्रकरणाची माहिती घेउन लोकांना शोधुन काढत आहेत.

https://maharashtratimes.com/india-news/coronavirus-india-delhi-cm-arvin...

शशिकांत ओक's picture

31 Mar 2020 - 8:37 pm | शशिकांत ओक

विषाणू जात धर्म भौगोलिक परिस्थिती वंश वर्ण काही पाहत नाही पण मानव समूह मात्र आजाराला सामोरे जाताना ह्या सगळ्या गोष्टींची जळमटं डोक्यात घेऊन जातात.

जळजळीत वास्तव...

भीमराव's picture

31 Mar 2020 - 9:48 pm | भीमराव

पटकीचा रोग म्हणून जो काही होता तो हा फ्लू च असावा बहुदा.

जेसिका ब्राउन's picture

31 Mar 2020 - 10:23 pm | जेसिका ब्राउन

https://mr.wikipedia.org/wiki/पटकी

पटकी म्हणजे कॉलरा

गामा पैलवान's picture

1 Apr 2020 - 3:36 pm | गामा पैलवान

आदित्य कोरडे,

अतिशय रंजक व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद! :-)

पहिल्या महायुद्धात ५३४०० अमेरिकी सैनिक मृत्युमुखी पडले तर फ्लूने ४५००० खाल्ले. हे आकडे तुल्यबळ आहेत.

संदर्भ : https://www.army.mil/article/210420/worldwide_flu_outbreak_killed_45000_...

अमेरिकी राजकीय नेतृत्व नेभळट निपजल्याने, हे अमेरिकी सैन्याचं मुद्दाम केलेलं खच्चीकरण तर नव्हे? एक आपली शंका.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2020 - 4:55 pm | मराठी कथालेखक

काही वर्णनं मन विषण्ण करणारी आहेत. असो, जे झालं ते कुणी बदलू शकत नाही आणि survival of the fittest या न्यायानुसार हा जवळपास विषाणू असूनही रोगाचा प्रादुर्भाव न झालेले वा रोग होवून बरे झालेले लोक अधिक धडधाकट असावेत, त्यांची रोगप्रतिकारक्षमता उच्च प्रतीची असावी. यामुळे अशा लोकांच्या पुढील पिढ्याही अधिक फिट निपजल्या असाव्यात.
एक शंका आहे
या रोगाचा पाळीव प्राण्यांवर काय परिणाम झाला ? गायी, म्हशी, शेळ्या, कुत्रे , मांजरे ई. याचा काही उल्लेख संदर्भग्रंथात होता का ?

प्रमोद देर्देकर's picture

3 Apr 2020 - 11:17 am | प्रमोद देर्देकर

भयंकर .