ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली. ती मिपावरही टाकत आहे.
का असे केलेस?
कोप-या वरच्या दुकानात
एकदा येणे केलेस,
सर्व मूर्तींमधे मलाच
अचूक तू हेरलेस.
खिशातल्या पाकिटातून
लगेच पैसे काढलेस,
``नंतर घेऊन जातो``
हलकेच मला सांगितलेस.
कागदी रंगीत मखरावर
छान दिवे सोडलेस,
लगबगीच्या तयारीला
उत्साहाने भरलेस.
चतुर्थीला मोटारीतून
मला घरी नेलेस.
जरीकिनारी आसानावर
स्थानापन्न केलेस.
पान,सुपारी,हार,तुरे
सर्व काही आणलेस.
भटाच्या सांगण्यानुसार
कसेबसे पुजलेस.
पेढे,मोदक,करंजी
खाऊ मला घातलेस.
नैवेद्याच्या लाचेमधे
नखशिकांत बुडवलेस.
टाळ्या,टाळ, झांजा वाजवून
कौतुक असे केलेस,
की भक्तिच्या देखाव्यात
सार खरे भासवलेस.
का अशी पापे करून
सर्व काही गमावलेस?
`मला माफ कर``
नाही कधी म्ह्टलेस.
दुस-या दिवशी दुपारीच
पुन्हा एकदा ओवाळलेस,
उत्तर पूजा उरकून घेऊन
हलकेच मला हलवलेस.
`पुढल्या वर्षी लवकर या`
म्हणून पाण्यात शिरवलेस,
स्वतःला धांदलीतून
लगेच मोकळे केलेस.
दिड दिवस का होईना,
तू मला आळवलेस,
जन्माचा राखणकर्ता म्हणून
मला कायमचे अडकवलेस.
प्रतिक्रिया
12 Sep 2008 - 9:40 pm | वेताळ
आवडली आपल्याला.
वेताळ
12 Sep 2008 - 9:43 pm | मनीषा
छानच आहे
(आपण बीजींग(चीन) ला भेटलो होतो ना?)
12 Sep 2008 - 11:16 pm | प्राजु
मीनल,
अतिशय बोलकी आहे बाप्पांची प्रतिक्रिया...
छान मांडली आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Sep 2008 - 11:28 pm | चतुरंग
सुंदर व्यक्त झालेत भाव.
चतुरंग
13 Sep 2008 - 12:37 am | केशवराव
अजूनही कीत्येकांच्या घरी मनोभावे , भक्तीभावाने गणपती आणतात. दिड दिवस मनापासून पूजन करतात. त्यांच्या भावनांचे काय?
13 Sep 2008 - 9:14 am | विसोबा खेचर
अजूनही कीत्येकांच्या घरी मनोभावे , भक्तीभावाने गणपती आणतात. दिड दिवस मनापासून पूजन करतात. त्यांच्या भावनांचे काय?
सहमत आहे!
गणेशोत्सव म्हणजे सतत काहितरी दुर्मुखलेले लिहायचे, भक्ति काही उरलीच नाही -जो काही आहे तो सगळा केवळ दिखावा आहे, देखावा आहे असे सतत मानत राहायचे, ही आजकाल एक फ्यॅशनच होऊ पाहते आहे! :)
असो...
बोला, गणपती बप्पा मोरया.....! :)
तात्या.
13 Sep 2008 - 1:47 am | संदीप चित्रे
आवडली मीनल...
>> भटाच्या सांगण्यानुसार
>> कसेबसे पुजलेस.
हे तर खूप आवडले.
13 Sep 2008 - 11:38 am | घाटावरचे भट
मी काही कोणाला 'कसंबसं पुजायला' नाही सांगत हो... (ह.घ्या) ;)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
13 Sep 2008 - 2:20 am | चकली
कविता आवडली
चकली
http://chakali.blogspot.com
13 Sep 2008 - 9:47 am | धनंजय
चांगली कल्पना - गणपतीच्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न.
13 Sep 2008 - 3:44 am | मदनबाण
छान कविता ,,
दिड दिवस का होईना,
तू मला आळवलेस,
जन्माचा राखणकर्ता म्हणून
मला कायमचे अडकवलेस.
हे फार आवडलं
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
13 Sep 2008 - 8:33 am | अनिल हटेला
मस्तच लिहीलीये !!!!
छान !!!!!!
आधी वंदू तुज मोरया !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
13 Sep 2008 - 2:06 pm | ऋषिकेश
नाहि आवडली
13 Sep 2008 - 5:28 pm | मीनल
सर्वांना धन्यवाद.
घाटावरचे भट पूजा छान सांगत असतिलच ,पण ती पूजा करणारा कसबस उरकतो असं वाटत.
केशव राव - मला `दिड दिवस` गणपती खरोखरच उरकल्या सारखा वाटतो.आम्ही ही मनोभावे पूजा करतो.
पण जन्माच्या रक्षणासाठी ती पूरीशी नाही अशी खात्री आहे.कळत नकळत केलेल्या पापांचे आकडे वजा जाता ,अकाऊंटला काहीच उरत नाही.
गणपती तक्रार करत असेल तरीही पाठीशी आसतोच असे व्यक्त करयचे होते.
अनी वे ,प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मीनल.