भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी.....

हातामध्ये हात गुंफुनि, बालपणी ते बागडले ....
अल्लडपणे त्या प्रेमाचे, बंध गुंफिले गेले...

कधी राजाचे डोळे विचारिती, घरट्यात राहशील माझ्या?
राणीला ही कळली त्याची, शब्दावाचूनि भाषा...

वचन दिले त्यांनी परस्परांना, मानुनि जीवनसाथी...
आयुष्यभर साथ देण्याच्या, बांधल्या रेशीमगाठी...

त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली...
राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली...

ते दोधे आनंदाच्या डोही रमले, काळ लोटला काही...
पण राजा-राणीचा हा संसार, नियतीला बघवला नाही...

नियती अचानक एके दिवशी, वादळ घेऊनि आली...
अन् राणीच्या त्या प्रिय राजाला दूरवर घेऊन गेली...

पण राणीचे ह्रदय राजाकडे, अन् राजाचे राणीपाशी....
नियती घेऊन गेली राजाला एका दूरदेशी...

त्या देशी होत्या अनेक राजकन्या अन् अनेक सुकुमारी...
पण त्या 'राजाच्या राणीची' त्यांना सर-ही नाही आली...

पुढे राजाचे काय झाले, ते राणीला उमगले नाही...
ती राजाच्या आठवणीने, वेडीपिशी होऊनि जाई....

मोडले घरटे, सुकुन गेल्या सुखस्वप्नांच्या वेली....
ना कधी कळले, नियतीने का ही क्रूर थट्टा केली....

राणी विचारे नियतीला, का ठरवली प्रीत ही खोटी....?
ती वेडी राणी वाट पाहते, झुरते राजासाठी....

नियतीलाही ठाऊक नव्हते, उत्तर तिच्या प्रश्नाचे...
आणि राणीलाही मान्य नव्हते, चक्र हे जीवनाचे....

'नियतीवरती मात करुनि, नक्की येईल माझा राजा....'
राणीच्या वेड्या मनात, अजूनही आहे ही वेडी आशा....

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी...
अर्ध्या डावाची ही आहे, अधूरी प्रेमकहाणी.......

सुंदर

अतिशय सुंदर कविता. जरी दुसर्‍या काव्यावर आधारीत असली तरी विडंबन नाही म्हणता येणार ...

त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली...
राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली...

हे तर मस्तच

शेखर

मृगनयनी

मृगनयनी ,

तुमचा प्रयत्न खूप छान आहे.

मी स्वतः एक कवी आहे. (चांगला की वाईट देव आणि वाचकच जाणे ...)
मागे मी माझ्या एका मैत्रीणीला म्हणालो होतो की मी " भातुकलीच्या खेळामधली " या गाण्यावर यापेक्षा चांगले काव्य लिहू शकेन.
अनेक कागदं वाया गेलीत, मी तशा ताकदीचेच काय पण काव्यच लिहू शकलो नाही. गाण्यातील शब्द किती ताकदीचे आणि किती अर्थपूर्ण आहेत हे मला प्रत्यक्ष लिहायचा प्रयत्न केल्यावरच कळाले.

तुम्ही केवळ २-३ नाही तर तब्बल १३ कवने केलीत , याबद्दल तुमचे अगदी मनापासून अभिनंदन.

'नियतीवरती मात करुनि, नक्की येईल माझा राजा....'
राणीच्या वेड्या मनात, अजूनही आहे ही वेडी आशा....

हे कडवे म्हणजे तुमच्या काव्यातील कळसच.... मनाला एकदम स्पर्शून गेले

असेच छान लिहीत रहा....

(कविता प्रेमी ) सागर

आयला ... नयने ... काय ग हे ...

आम्ही तसे लेखक पाहुन धाग्यात घुसणार्‍या २०% पैकी. आम्ही पुर्ण इंप्रेस झालेलो आहोत.
आम्हाला कविता कळत नाही पण भावना कळतात.बाकी काही असो .. कविता मनाला स्पर्श करून गेलेली आहे.

'नियतीवरती मात करुनि, नक्की येईल माझा राजा....'
राणीच्या वेड्या मनात, अजूनही आहे ही वेडी आशा....

खलास !!!!!!
त्या पौराणिक ग्रंथ कम कादंबर्‍या करण्यापेक्षा असं लिही काही झकास ......
प्रत्येक सबुद आवाल्डा आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अप्रतिम

खुपच सुंदरपणे शब्द रचना केली आहे. प्रत्येक ओळ भावनेने परिपुर्ण असुन हृद्यस्पर्शी आहे. असेच काव्य करत रहा.

प्रद्युम्न -
॥ एक अजेय योद्धा ॥

चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी घेणा-याला
आभाळाचे ओझे नसते.

बर्‍याच

बर्‍याच ओळींमध्ये वृत्तामध्ये गडबड वाटते...
मला चालीत म्हणता आले नाही...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हो...

मलाही.