७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं.
वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच.
पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल.
मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे.
अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.)
पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या!
एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रतिक्रिया
24 Jul 2013 - 2:10 pm | ऋषिकेश
माझ्या दुनियादारी कॉलेज लाईफ 'कसं असतं' यापेक्षा ते बहुसंख्यांना 'कसं असलेलं सांगायला आवडलं असतं' त्याचं वर्णन आहे.
आणि त्या दृष्टीकोनातून पुस्तक नेमकं आहे!
23 Jul 2013 - 12:22 pm | कपिलमुनी
उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद ?
उच्च निर्मीतिमुल्ये ?
चकचकीत कपडे आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असली की उच्च निर्मीतिमुल्ये ??
एक अंकुश चौधरीचा अभिनय सोडला तर इतर कोणी अभिनय केला आहे का ?
>>रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा....यावर काहीच म्हणायचे नाहिये ..कारण मला एकहि व्यसन नसून , गुंडगिरी करत नसून देखील मला दुनियादारी आवडते
23 Jul 2013 - 6:00 pm | अग्निकोल्हा
आणखि काय असते ? तांत्रिक सफाइ अन स्पेशल इफेक्ट्स खरोखरच सुरेख आहेत. म्हणूनच चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बघताना अगदी फ्रेश वाटते. उगाच चायनिज फोन मधुन शूटिंग केलेल्या प्रिंटसारखे दिसणार्या अनेको मराठि चित्रपटांपेक्षा हजारपटिने सरस आहे.
मी चित्रपटाच्या कथेबाबत बोललोय कादंबरी न्हवे. तसही निव्वळ व्यसने व गुंडगिरी आहे या निकशावर मी चित्रपट चांगला अथवा वाइट हे ठरवत नाही. कथेचा गाभा कसा आहे हे महत्वाचे असते त्याला दिलेली फोडनी न्हवे. उदा. डि-डे चित्रपट, अतिशय बकवास वाटला.
23 Jul 2013 - 12:25 pm | कपिलमुनी
दिग्याची इलेक्ट्रा आणि प्रीतमची क्लासिक दोन्ही मॉडेल नव्हते त्या काळात ..
येझदी, जावा किंवा स्टँडर्ड बुलेट दाखवायला हवी होती
23 Jul 2013 - 1:32 pm | सुहास..
फक्त एकच म्हणेन
तुम्ही 'दुनियादारी' मुळे बदलु शकता पण तुम्ही 'दुनियादारी' बदलु शकत नाही
23 Jul 2013 - 9:02 pm | प्रभाकर पेठकर
'दुनियादारीच्या' हाऊस फुल्ल यशाच्या निमित्ताने आज झी टिव्हीच्या स्टुडिओत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात जो केक कापला गेला त्यावर 'हाऊस फुल्ल' चे स्पेलींग 'HOSE FULL'. असे पाहून हसावे की रडावे हेच कळेना. 'दुनियादारी'ची टिम आनंद जल्लोष साजरा करीत आहे आणि झी टिव्ही HOSE FULL चा केक मिरवते आहे असे केविलवाणे दृष्य झी २४ वर दाखविले जात आहे.
24 Jul 2013 - 1:28 pm | प्रीत-मोहर
मी ह्या चित्रपटाच्या प्रिमीयरला गेले होते, पराच्या चेतावनीनंतरही. मनसोक्त शिव्या घालुन आले. कलाकारांनी ऐकल्याही. स्पेशली ज्तेंद्र जोशेए. मान वळवु वळवुन पाहत होता मागे. :ड
24 Jul 2013 - 2:14 pm | बॅटमॅन
आयला, कलाकार असतानाही शिव्या घातल्या म्हंजे खत्रा डेअरिंग आहे की हो तुमचं एकदम!!
24 Jul 2013 - 3:57 pm | लॉरी टांगटूंगकर
+११११
24 Jul 2013 - 3:56 pm | कपिलमुनी
भारीच की !
"ना तुम जानो ना हम" नावाच्या भिक्कार पिक्चरच्या शो ला हेमा मालिनी आणि इशा देओल असताना आम्ही शिव्या घातल्या होत्या ..मग आम्हाला बाहेर काढला ... बाकी प्रेक्षकांच्या चेहर्यावर "नशीबवान आहेत , सुटले !" असे भाव होते ..
24 Jul 2013 - 11:55 pm | श्रीरंग
हाहाहा! "काय सॉल्लिड पिक्चर आहे रे.. अगदी कादंबरीच वाचतोय असा फील आला!" असे म्हणून मित्राला टाळी दिली आणी अचानक लक्ष्त आलं, संजय जाधव अगदी शेजारीच उभे होते. एक ऑकवर्ड स्माईल देऊन निसटलो.
सुरुवातीला दाखवलेली "नारबाची वाडी" चित्रपटाची झलक बरी वातली. चांगला असावा चित्रपट असं वाटतंय.
4 Aug 2013 - 7:05 pm | रघुनाथ.केरकर
अतीरन्जक समीक्शा....... आणी धागाकर्त्याने म्हटल्या प्रमाणे जर सिनेमा एवढाच जर रटाळ अस्ता तर हाउस फुल चालल नसता......
नोटः दुनियादारी सिनेमा म्हणुन पहावा.... कादम्बरी सोबत तुलना न केलेली बर.
4 Aug 2013 - 9:19 pm | श्रीरंग
सिनेमा रटाळ असल्याचे कुठे म्हटले आहे जरा दाखवाल का?
आणी कादंबरीबरोबर तुलना होणं सहाजीक आहे. कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत.
6 Aug 2013 - 8:47 pm | स्वलेकर
<<कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत. >> एकदम बरोबर......
5 Aug 2013 - 3:22 pm | मालोजीराव
काल पाहिला, चित्रपट चांगला वाटला…उर्मिला कानेटकर सोडली तर कॉलेजवयीन कोणीच वाटत नव्हत, श्रेयस आणि साई च्या भूमिकेत इतर कोणी कलाकार घेता आले असते तर चित्रपट अजून चांगला वाटला असता. बाकी दिग्या बेष्ट
(कादंबरी वाचली नाही अजून)
5 Aug 2013 - 9:04 pm | मी-सौरभ
+१
6 Aug 2013 - 10:37 pm | रघुनाथ.केरकर
एकन्दर सुर तसाच होता ना?
10 Aug 2013 - 12:29 am | श्रीरंग
?? काहीही.. चित्रपटाबाबत काय काय खटकलं ते स्पष्ट लिहिलंय मी. त्यात चित्रपट रटाळ असल्याचा सूर तुम्हाला कुठे जाणवला माहित नाही. असो..
7 Aug 2013 - 1:42 pm | प्रचेतस
दुनियादारी आताच पाहून आल्यावर अशी अवस्था झाली.
सुशिंच्या कथेची शक्य तितकी वाट लावण्यात आली आहे.
(स्वगतः का? का?? का??? भाग मिल्खा भाग नैतर वूल्वरीन का नै पाहिलास?)
7 Aug 2013 - 2:33 pm | मालोजीराव
:))
म्हणूनच कादंबरी नाय वाचली आणि वाचणार पण नाय…
7 Aug 2013 - 3:41 pm | मृत्युन्जय
आपल्याला ब्वॉ चित्रपट आवडला. सुशि भक्तांना नाही आवडणार कदाचित.
स्वप्नील जोशी कॉलेजकुमार नाही वाटत. पण शम्मी कप्पूर, धर्मेंद्र, गोंद्या, संजय दत्त यांना कॉलेजकुमार म्हणून सहन केल्यानंतर स्वप्नील जोशी फारसा वावगा वाटत नाही. कालेजात असताना मीही बर्यापैकी वजनदार होतो. अजुनही आहे. त्यामुळे श्रेयस तसा दाखवल्यास मला काहीच खटकत नाही.
दिग्या म्हणुन अ़ंकुश चौधरी बरा वाटत नसेल तर त्याच्याऐवजी बरा वाटणारा चेहराच मराठीत नाही. दिग्या म्हणुन एखादा अनोळखी कलाकार चाललाच नसता त्यामुळे अंकुश चौधरीच योग्य आहे.
उर्मिला कानेटकर खास दिसली आहे. ती कॉलेजातली देखील वाटते :)
सई ताम्हणकर बेष्ट आहे. आपल्याला तर लै आवडली.
सुशांत शेलारला वाया घालवला आहे आणि तो चित्रपटातल्या प्रीतमच्या क्यारेक्टरला शोभत नाही.
गाणी उत्तम आहेत.
जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही.
सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती. ती वाचायला खुपच छान वाटते. त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. सुशिंच्या पुस्तकात असे होते अशी तुलना केली तरच चित्रपट खटकतो. पुस्तक न वाचलेल्या जनतेला तो आवडला असेल तर चित्रपट उत्तमच जमला आहे असे म्हणायला हरकत नाही. पुस्तक वाचलेल्या जनतेला तो आवडला नाही हे सुशिंचे यश. उद्या ३ इडियट्स फाइव्ह पॉईंट सारखा नाही म्हणुन कसे चालेल. माध्यम वेगळे आहे शेवटी.
7 Aug 2013 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा
@जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही.>>>>
@सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती.त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. >>> ++++++११११११११
10 Aug 2013 - 12:16 am | आतिवास
इतकं चर्चेत असणारं पुस्तक आपण वाचलेलं नाही हे लक्षात आलं होतं.
पुण्यात आले तेव्हा योगायोगाने शेजा-यांच्याकडे हे पुस्तक सापडलं (त्यांच्या पुतणीने चित्रपट पाहून विकत घेतलं ..), हाताशी वेळ होता, मग वाचून काढलं.
पुस्तक "ठीकठाक" आहे. वाचलं नसतं तरी चाललं असतं असं लक्षात आलं!
चित्रपट पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
पुस्तक आणि चित्रपट ही दोन वेगळी माध्यमं असताना अशा चर्चा होत राहतात पुस्तकाधारित सिनेमांवर - हे खूप रोचक आहे. त्याबाबत विचारांत पडले आहे :-)
10 Aug 2013 - 12:41 am | तुमचा अभिषेक
माझे कालचे फेसबूक अपडेट
_____________________
आज "दुनियादारी" बघितली..!!
आय नो, बरेच उशीरा पाहिली.. पण तसे वाटले नाही.. आजही थिएटर हाऊसफुल्ल होते.. बरेच दिवसांनी एक चित्रपट अगदी आतवर भिडला, अगदी सुरुवातीपासूनच.. ईंटरव्हल कधी आलागेला कळलेच नाही आणि दि एण्डची पाटी लागली तरी टिकटिक डोक्यात वाजतच होती.. एखाद्या लव्हस्टोरीची नाही तर यारीदोस्तीची टिकटिक.. ज्याने आयुष्यातले चार दिवस जरी मित्रांच्या कट्ट्यावर घालवले असतील त्यावर हा चित्रपट असेच काहीसे गारुड करून जात असेल.. आमची तर वर्षे गेलेली..
स्वप्निल, सई आणि इतर सारेच सही, पण अंकुश चौधरीला दिग्याभाईच्या भुमिकेत बघून बरे वाटले.. पण पिक्चरच्या शेवटी त्याच डीएसपी बद्दल सर्वात जास्त वाईट वाटले.. एनीवेज, पिक्चरचे परीक्षण द्यायला मी इथे बसलो नाही.. पण अजून कोण इडियट असेल आपल्यात ज्याने अजून हा पिक्चर पाहिला नाही तर आजच तिकीट बूक करा आणि थिएटरमध्येच बघा.. मराठी पिक्चर आहे, पॉपकॉर्नच्या किंमतीपेक्षाही स्वस्तात पडेल तिकिट.. आणि म्हणूनच मी आज पॉपकॉर्नच खाल्ले नाहीत.. ;) .. विचार करतोय वाचलेल्या पैश्यात पुन्यांदा होऊन जाऊ दे.... तुझी माझी यारी, तर भोकात गेली दुनियादारी !!
___________________________
फेसबूक अपडेट संपले
१५ ऑगस्टला पुन्हा जातोय दुनियादारीला.. :)
आता तळटीप - पुस्तक मी वाचले नाही आणि त्या वादात मला पडायचे नाही :)
11 Aug 2013 - 12:41 am | श्रीरंग
दुनियादारीने १५ कोटी च विक्रमी व्यवसाय केल्याची बातमी आजच समजली. एका मराठी चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश बघून अतीशय आनंद झाला.
11 Aug 2013 - 10:03 am | किसन शिंदे
ऑ??
मी तर चेपूवर २५ कोटी वाचलं होतं.
11 Aug 2013 - 10:28 pm | श्रीरंग
१५च बरोबर आहे. या चित्रपटाशी संबंधित लोकांकडून खात्रीशीररित्या समजलंय.
12 Aug 2013 - 7:59 pm | धमाल मुलगा
आमची वैयक्तिक मतं काहीही असोत, एका मराठी सिनेमानं इतका तगडा धंदा करुन दाखवला ह्याचं मात्र कौतुक आहे. :)
टीम दुनियादारी, अभिनंदन!
13 Aug 2013 - 2:28 pm | बॅटमॅन
ऐसेच म्हणतो. पिच्चर पाहिला नाही, कदाचित पाहणारही नाही. पण असा तगडा धंदा मराठी पिच्चर करू शकले याचे लै कौतुक आहे राव.
13 Aug 2013 - 2:34 pm | कपिलमुनी
+१
11 Aug 2013 - 5:32 pm | कपिलमुनी
http://en.wikipedia.org/wiki/Duniyadari
इथे २५ कोटी लिहिलय
12 Aug 2013 - 10:14 am | विश्वनाथ मेहेंदळे
ते तुम्ही पण एडीट करून १२५ करू शकता.
12 Aug 2013 - 11:15 am | कपिलमुनी
कोणालापण एडिट करता येता ते माहीत नव्हता ..
धन्यु
12 Aug 2013 - 11:52 am | बाबा पाटील
काल दुनियादारी पाहिला,विमाननगर पुणे सारख्या तथाकथीत हुच्चाभ्रू सोसातटॆत असणाऱ्या फिनिक्स मल्टीप्लेक्स मध्ये मराठी पिक्चरचा सक्काळी सक्काळी दहाचा शो हाउसफुल्ल ,निच्छितच पिक्चर मध्ये दम आहे ……। पण ………… आयच्या गावात …सु. शिं च दुनियादारी वाचल असल्यामुळे असा वाटत होत की भोसडीचा दिग्दर्शक काय डोक्यावर पडला होता काय भेंडी………
12 Aug 2013 - 7:58 pm | धमाल मुलगा
डाक्टरबाबा, तुमचा सात्विक संताप समजू शकतो मी. :)
15 Aug 2013 - 4:41 pm | आदूबाळ
दुनियादारी प्रेमींची ही प्रतिक्रिया सार्वत्रिक आहे. त्यामुळेच शिणुमा पहाण्याचा उत्साह मावळत चाललाय!
पण दुनियादारीने केलेल्या जोरदार धंद्यामुळे म्हणूया हवं तर सुशिंच्या इतर कादंबर्यांकडे चित्रपट निर्मात्यांचं लक्ष गेलं तर फार बरं होईल. विशेषतः दारा बुलंद आणि मंदार पटवर्धन असलेल्या कादंबर्यांकडे.
13 Aug 2013 - 2:16 pm | मृणालिनी
मी पाहिला 'दुनियादारी'. खुप छान आहे.
सु.शिं.ची कादंबरी पण वाचली...अजिबात आवडली नाही....टपोरी संवाद, अधांतरी कथानक. उगाचच ती कादंबरी वाचली, अस झालंय. नसती डोकेदुखी विकत घेतल्याचा मनस्ताप झाला मला.'
असो, हे माझ मत आहे, आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते.
13 Aug 2013 - 7:15 pm | बाबा पाटील
कट्ट्यावरच सगळ जगच अधांतरी असतो हो . एथे फिक्स असते ती दोस्ती,अकरावी पासुन ते वैद्यकिय शिक्षणाची साडेपाच वर्ष अशी तब्बल ७ ते ८ वर्ष या कट्ट्यानेच तर जगवल राव,जो कट्टा जगला त्याच्या मनाचा हळवा कोपरा आहे ही कादंबरी....तुम्हाला नाही कळणार ते.....
15 Aug 2013 - 2:47 pm | प्रेरणा पित्रे
मी पुस्तक वाचलेले नाही. श्रीरंग यांचा राग समजु शकते...
५ पॉइंट समवन वाचल्यानंतर जेव्हा ३ इडियट हा डोक्यात जाणारा चित्रपट बघितला तेव्हा मला सुध्दा असाच त्रास झाला होता...
तारे जमीं पर मधे समंजस वाट्णारा अमीर खान, यात आपल्या शिक्षकांनाच अक्क्ल शिकवत होता... मोना सिंग आणि जावेद जाफ्री यांनी जो उच्छाद मांडला त्या बद्दल काय बोलणार..
आजच दुनियादारी पुस्तक मैत्रिणीकडुन मागवले आहे.. बघुया कसे वाटते ते.....
16 Aug 2013 - 12:12 pm | पुष्कर जोशी
पण हे पहा ...

17 Aug 2013 - 12:05 pm | श्रीरंग
अतिशय आनंद झाला हा फोटो बघून! जबरदस्त!!