प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं.
याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा.
ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे. अनुश्रीसोबत काही वर्षांचा संसार झाल्यानंतर दोन मुली आणि आई यांच्याकडे पाठ फिरवून केदार वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडून चार वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला आहे. अनुश्री तिचं दुखावलेपण, एकटेपण मनाच्या कोपर्यात टाकून ठामपणे मुलींना, सासूबाईंना, आईवडिलांना, आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सांभाळते आहे. फुलांचा व्यवसाय करते आहे. तर संशोधनात करियर करायची असल्याने रोहितवर मुलांची जबाबदारी टाकून प्रज्ञाने वैयक्तिक प्रगतीची वाट निवडली आहे. हे दोघं प्राचीच्या आग्रहाखातर कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत, मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत.
यांच्या आधीची पिढी आहे अनुश्रीच्या आईवडिलांची, सासूबाईंची. तिच्या सासूबाई सुनेशी प्रतारणा करणार्या मुलाला आयुष्याबाहेर काढण्याइतक्या तत्त्वनिष्ठ आहेत. तर आई आणि वडील हे अनुक्रमे 'केलंय ते निभवायला हवं' आणि 'आता या वयात मुलीचं दु:ख पाहायला लागू नये, तिला आधार देण्याची आता ताकद नाही, म्हणूनतरी तिने तडजोड करावी' अशा विचारांचे आहेत.
अनुश्रीची बहिण मात्र मोठ्या बहिणीच्या विस्कटलेल्या संसारामुळे लग्नाच्या बाबतीत काहीशी बॅकफूटवर गेलेली, सहजीवनाचा अर्थ शोधतेय. ज्याच्यासोबत तडजोड आणि व्यक्तीस्वातंत्र्य या दोहोंमध्ये संतुलन साधता येईल असा जोडीदार शोधतेय.
रोहित आणि अनुश्रीची भेट ही फिल्मी न वाटणार्या योगायोगाने होते. रोहितच्या हॉस्पिटलच्या आवारात बाग फुलवण्याच्या निमित्ताने दोघं भेटत राहतात. आधी मैत्री आणि मग त्याहून पुढे आकर्षण यातून दोघं एकमेकांना जाणून घेत राहतात. आपल्या एकत्र असण्यामध्ये नुसत्या मैत्रीच्या पलीकडच्या शक्यता आहेत असं दोघांनाही लक्षात येतं.
दोघंही आपल्या मनाशी आणि परिस्थितीशीही प्रामाणिक राहून एकमेकांशी याबद्दल बोलू पाहात असतानाच केदार अनुश्रीच्या आयुष्यात परत येतो. रोहित आणि अनुश्रीकडून नीटसपणे कळायला हवं ते अगदी धक्कादायक अपघातानेच तिच्या मुली, नवरा आणि सासूबाईंना कळतं. इतकी वर्षं सुनेच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार्या सासूबाई यावेळी मात्र तिच्याशी बोलणं सोडतात. वाढत्या वयाची मोठी मुलगी तर आईवर थेट आरोप करते. अशा आक्रमक परिस्थितीत हे दोघं नेमकं काय करतात, स्वतःच्या भावनांना न्याय देतात की कुटुंबापुढे वैयक्तिक सुखाचा विचार बाजूला ठेवतात, याची उत्तरं म्हणजे हा सिनेमा.
अनेकविध भूमिकांद्वारे दीर्घ कारकीर्द गाजवून एखादी व्यक्ती जेव्हा दिग्दर्शनाकडे वळते, तेव्हा त्यातून तिने शिकलेल्या, खरंतर टिपलेल्या गोष्टी दिसून याव्या ही अपेक्षा सहजच निर्माण होते. आणि या सिनेमातून मृणाल कुलकर्णी यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केलीय. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही आघाड्या त्यांनी सांभाळल्यात.
या सिनेमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, केदार वगळता यातल्या सगळ्या व्यक्तीरेखांनी आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगी त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार जे सर्वात योग्य वाटले ते निर्णय घेतले आहेत. घरापेक्षा संशोधनातलं करियर मोठं वाटू लागल्यावर सगळ्या शक्यता आजमावून अखेर प्रज्ञाने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा कायमच आदर करणार्या रोहितने सर्व प्रयत्न करून झाल्यावर घटस्फोटाच्या निर्णयाचा स्वीकार केलाय. तर अनुश्रीच्या सासूबाईंनी सुनेची फसवणूक ती कुटुंबाची फसवणूक असं मानून स्वतःच्या मुलाला घरापासून वेगळं काढलंय. अनुश्रीला तर निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालेलंच नाही. तिचं भावविश्व केदार निघून गेला त्या क्षणापाशीच थांबलेलं आहे. किंबहुना अनुश्री ही व्यक्तीरेखा वाट्याला आलं ते गप्पपणे स्वीकारणारी अशीच आहे.
केदार ही व्यक्ती मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हटली तर इम्पल्सिव्ह आणि म्हटली तर बेजबाबदारही आहे. संसाराच्या कोणत्याशा टप्प्यावर वेगळीच स्त्री आवडली म्हणून स्वतःची वाट बदलणारा हा पुरुष आहे. तितकाच तो मुलींच्या प्रेमाने हळवा होणारा बाप आहे, आईच्या दुराव्याने कासावीस होणारा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्याचा बेस हा पूर्णतः 'तो स्वतः' हाच आहे. त्याच्या परत येण्यालाही कोणतंही ठोस कारण नसून केवळ ते त्याच्या सोयीचं आहे, म्हणून तो परत येतो आहे.
सगळ्या व्यक्तीरेखांना माणूस म्हणून वागायची दिलेली मूभा ही या सिनेमाची आणखी एक विशेष बाब. उदाहरणार्थ, केदार चुकला असताना स्त्री म्हणून त्याला शिक्षा करणारी त्याची आई, तो परत आल्यावर आई म्हणून विरघळते, सुनेनेही त्याला माफ करावं ही अपेक्षा करते. स्वतःच्या मुलीला तडजोड कर असं सांगताना अनुश्रीचे वडील 'हाच सल्ला मी मित्राच्या मुलीलाही दिला असता का? कदाचित तिथे जबाबदारी नसल्याने वेगळं वागलो असतो' असं स्वतःशी परखडपणे कबूल करतात. अनुश्री स्वतः केदारच्या परत येण्याची मूकपणे वाट पाहते आहे, पण तो अशा वेळी परत येतो, जेव्हा तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व आणि सहजीवनातला आनंद या दोन्ही गोष्टी लाभत आहेत. संसार आणि स्वानंद यातून काय निवडावं याबाबत ती गोंधळून गेलीय.
सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत दबलीशी राहणारी, सगळ्या आघाड्यांवर तोंड देणारी अनुश्री मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम साकारली आहे. परिस्थितीचा स्वीकार हाच जिचा स्वभाव आहे, अशी स्त्री 'आता मात्र निर्णय घ्यायला हवाच' या टोकाला येऊन पोचत असतानाचे तिच्यातले बदल लहानलहान प्रसंगातून दाखवले आहेत.
प्रज्ञा झालेली पल्लवी जोशी आणि केदारच्या भूमिकेतील सुनिल बर्वे यांना कथेमध्ये पूरक भूमिका आहेत, आणि दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा समजून उभ्या केल्या आहेत. सतत संशोधकाच्या शिस्तीने वागणारी स्त्री आणि मुलांपासून, सदैव पाठिंबाच देणार्या जोडीदारापासून दूर गेलेली स्त्री ही प्रज्ञाची दोन रूपं असोत, किंवा आयुष्यात काय हवं आहे याबद्दल कोणताच नेमकेपणा नसलेल्या केदारचा स्वभाव असो, ही एखाद्याच प्रसंगातून ठळक झालीयेत.
मात्र सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे सचीन खेडेकरांचा डॉ रोहित फडणीस. जणू खेडेकरांना डोळ्यापुढे ठेवूनच हे रेखाटन केलं गेलं असावं, इतकं हे पात्र उत्तम साकारलं आहे. आपल्या बायकोला हवी ती स्पेस मिळवून देणारा, त्यासाठी नीट विचारांती पाठिंबा देणारा, कृती करणारा असा हा नवरा आहे. ती स्पेस मिळवण्याच्या नादात घराचं घरपण मोडून निघून गेलेल्या बायकोसाठी तो जितका अढळ आहे, तितकाच अनुश्रीबरोबरच्या नात्यातही दृढपणे, संयमाने उभा राहिला आहे. आपल्या आयुष्यात आता दुसरी व्यक्ती आलीय, हे प्रज्ञाला सांगत असताना सचीन खेडेकरांनी आणि पल्लवी जोशी यांनी तो पूर्ण प्रसंगच तोलून धरला आहे! या प्रसंगातून त्यांच्यातलं नवराबायकोचं नातं संपलं तरी परस्परांबद्दलचा आदर संपला नाहीय, हे उमगून जातं.
कुटुंबासाठी करायची असलेली तडजोड आणि स्वतःला पूर्ण वाव देण्याची धडपड, या दोन परस्पर विरोधी घटना सर्वात जास्त परिणाम करत असतील तर तो नवरा बायको या नात्यावर. अशावेळी एकाने आपली वाट निवडल्यानंतर दुसर्याने तसेच ताटकळत राहावे, की आनंदी होण्याचा अधिकार स्वतःलाही बहाल करावा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळ येते, तेव्हा सगळे मुखवटे बाजूला ठेवावे लागतात. आदर्श वागण्याचे, त्यागाचे, पडतं घेण्याचे.. सगळेच.
एका मोडकळीला आलेल्या लग्नाला दुसरं लग्न हाच पर्याय असावा का? सुदृढ अशी मैत्रीदेखील हवी ती ऊर्जा पुरवायला पुरेशी ठरू शकते? विवाहित व्यक्तीच्या आयुष्यात अशा मैत्रीचं काय स्थान असू शकतं? किंबहुना अशी भिन्नलिंगी व्यक्ती, जी आयुष्याला संपूर्ण करते, तिच्यासोबतच्या नात्याला नाव द्यायला हवंच का? असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ही त्या प्रश्नांची घेतलेली दखल आहे.
प्रतिक्रिया
15 May 2013 - 6:12 pm | सूड
धागा काढ की मिपावर!! असे प्रतिसाद येतील की त्यापुढे सर्कार किस झाड की पत्ती/ किस खेत की मुली इ.इ.
15 May 2013 - 6:13 pm | बॅटमॅन
खीक्क :D :D
15 May 2013 - 6:15 pm | सूड
मेल्यान् सोयीचं तेवढंच वाचलंन् !!
15 May 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
सोयीचं तसंच लिवलंन् ते कुठं गेलंन् ;)
15 May 2013 - 6:38 pm | सूड
असं नसतं !! :))
15 May 2013 - 6:10 pm | स्पंदना
उपभोग उपभोग!!
15 May 2013 - 5:48 pm | बॅटमॅन
प्रेमासारख्या सुरेख विषयाला साखरपुड्यात बांधण्याची मानसिकता आपली संकुचित मनोवृत्ती दर्शवते. ओशोंनी असं काही सांगितलं नाही कधीच. माझा या विषयाचा इतका खोलवर अभ्यास झाला आहे की हा विषय मुळातून किती सोपा आणि सुंदर आहे ते मी सांगू शकतो, पण इथे लोकांना खर्या ज्ञानाची आणि ज्ञानवंताची चाडच नाही त्याला काय करणार म्हणा. असो, तोपर्यंत दुसरे संस्थळ बघतो आणि तिकडे प्रबोधन करतो.
जे खातो *****.
15 May 2013 - 5:55 pm | पैसा
स्थळे बघा! प्रेम करण्यासाठी तुम्हाला एक मुलगी पटवणे आवश्यक आहे. संस्थळे फिरत राहिलात तर असेच वटवाघुळासारखे लटकत रहाल. तेव्हा म्हणा "आधी लगीन माझे" आणि व्हा पुढे.
15 May 2013 - 6:01 pm | बॅटमॅन
अरेरेरेरे, माझी दिव्यदृष्टी तुम्हाला कळ्ळी नाही असेच म्हटले पाहिजे. थांबा अजून जिलब्या पाडतो. ;)
(पराजय थापसागर).
15 May 2013 - 6:09 pm | पैसा
प्रतिसाद आवर!
-काऊ
15 May 2013 - 6:01 pm | आजानुकर्ण
संस्थळावर एवढी धुळवड उडालेली असताना तुम्ही इतक्या स्वस्थ चित्ताने हा अत्यंत तरल मूडमधील प्रतिसाद कसा काय लिहू शकता?
15 May 2013 - 6:06 pm | पैसा
ते पोचलेले आहेत!
15 May 2013 - 6:06 pm | बॅटमॅन
"मी आहे" याची जाणीव झाली की बाकी सर्व भ्रम आहेत हे आपोआप कळते आणि असा प्रतिसाद लिहिला जातो. माझ्या अशास्त्रीय प्रतिसादांचा निषेध करणे यानंतर तरी थांबेल अशी आशा आहे ;)
17 May 2013 - 6:10 pm | जेनी...
=))
15 May 2013 - 5:14 pm | सूड
तरुण मंडळींमध्ये काऊंट केलेलं बघून उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटलं. तुला एक आंबा-केशर मस्तानी माझ्याकडून. ;)
15 May 2013 - 6:47 pm | मोदक
आंबा केशर मस्तानी बद्दल मी आपला जल्मोजल्मी ऋणी राहीन! :-D
15 May 2013 - 5:29 pm | इनिगोय
आॅफकोर्स, 'मी' 'माझ्या' बोलण्याबद्दल शुअरच असणार!!!
15 May 2013 - 5:37 pm | यशोधरा
मी ची सहज अवस्था म्हणतात ती हीच काय वो?
15 May 2013 - 5:43 pm | इनिगोय
असेलही.. आय्यॅम नाॅट शुअर..!
15 May 2013 - 7:19 pm | यशोधरा
तुम्ही "मी" असतानाही नॉ शुअर? मी सुद्धा मिथ्याच की कॉय?
15 May 2013 - 5:39 pm | आजानुकर्ण
'मी'चे प्रतिसाद वाचूनच पुरेसे मनोरंजन होते. आणखी पैसे देऊन, तिकीट काढून, विकतचे चित्रपट मनोरंजन सध्या तरी अनावश्यक आहे. त्या प्रतिसादांचेही कुणीतरी परीक्षण लिहा रे.
15 May 2013 - 6:03 pm | ढालगज भवानी
छान दिसतो आहे सिनेमा. नक्की पहाणार.
15 May 2013 - 6:17 pm | ५० फक्त
अवांतर बरंच झालं, आता मुळ धाग्याबद्दल,
छान लिहिलंय, पल्लवी जोशी,अर्चना जोगळेकर आणि मालविका तिवारी या जाणतेपण येणाच्या वयात जी बायकोबद्दलची स्वप्नं पडायची त्यातल्या बायकोच्या फ्रेममधल्या हिरॉईनी. त्यामुळं अजुनही टिव्हिवर दिसल्या तरी पहाव्या वाटतात, (गाण्याच्या कार्यक्रमात आताची प्रत्यक्षातली बायको त्यांच्या साड्या पाहात असते, तोपर्यंत त्यांच्याकडं पाहता येतं.)
बाकी प्रेम,लग्न आणि संसार या गोष्टी एकत्र आणणं हाच मोठा उपद्याप आहे, ज्यांना हे एकत्र जमत नाही ते खोट्या सुखाचा मोठा मुखवटा घालुन आनंदात जगतात तर ज्यांना हे जमतं त्यांचा ख-या जगण्यातला आनंद किंवा जगण्यातला खरा आनंद काहीतरी एक निघुन जातो, उरतं ती एक खरंतर रटाळ पण बाकी आलम दुनियेला आदर्श वाटावं अश्या आयुष्याचं चित्र त्याच्या चकाकि आणि फ्रेमसह टिकवण्याची निरर्थक धडपड.
या फ्रेमचा एक खिळा निघुन गेला तिथं मोकळ्या झालेल्या जागेतुन आतल्या चित्रातले चिमुकले पक्षी उडुन जायला निघालेत असं वाटायला लागतं,आणि मग त्या पक्षांना आवरता आवरता मुळात विस्कळीत झालेलं आयुष्य अजुन दोन ठिकाणी फाटतं.
असो, पिक्चर जमलं तर पाहेन, हल्ली कोणताच पिक्चर पाहावा असं वाटत नाही किंवा त्यात काय पाहायचं हे कळत नाही.
15 May 2013 - 6:30 pm | इनिगोय
इतक्या मनापासून आणि विषयाला धरून लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच मनापासून आभार.. :-)
15 May 2013 - 6:53 pm | गवि
पन्नास .. आपले काय ठरलेले होते ? तू अर्चनाला विसरायचेस. तरीही तू का नाव घेतलेस परत ? या कारणाने आपल्यात वितुष्ट . वैर कशाला या वयात ?
17 May 2013 - 2:43 pm | ५० फक्त
लव लव करी पातं
डोळं नाही था-याला
एकटक पाहु कसं
लुकलुक ता-याला ,
अन
ना मानोगो तो दोंगी तोहे गारी रे,
हे विसरणं शक्य आहे का हो गवि, आणि समदुखी: लोकांत कसलं वैर अन वितुष्ट.
पाहिजेच तर एकदा बसु समजणारी अर्चना पाहात अन न समजणारे ग्रेस (वा-यानं हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले, गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले) ऐकत.
17 May 2013 - 2:48 pm | गवि
समदु:खी लोकांत कसलं वैर आता..
सही बोल्या रे..
या न विसरण्याच्या यादीत आणखी एकः
शादी और तुमसे .. कब्बी नही..
17 May 2013 - 10:05 pm | ५० फक्त
गेली आजची झोप गेली.........तो गाल फुगवुन काढलेला कब्बी नह्ही....
17 May 2013 - 3:15 pm | प्रचेतस
>>>ना मानोगो तो दोंगी तोहे गारी रे,
म्हणजे काय हो?
17 May 2013 - 10:00 pm | ५० फक्त
निवडुंग चित्रपटातलं एक गाणं आहे, वर लिहिलंय तसं, अर्चना जोगळेकर, कवि ग्रेसांच्या कविता आणि त्यांना हृदयनाथांनी लावलेल्या चाली.
ऐका आणि पहा, लई भारी आहे.
16 May 2013 - 9:33 am | स्पंदना
कशी झाली हिमालय यात्रा?
17 May 2013 - 2:47 pm | ५० फक्त
सध्या मैथिली ते अयोध्या प्रवास चालु आहे, सुक्ष्मदेहानं.
हिमालय हल्ली उशी करुन झोपायला दिलाय भाड्यानं, नानु सरंजामेला.
15 May 2013 - 7:31 pm | पैसा
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या चित्रपटपरीक्षणात्मक लेखाचा दुवा श्रीमति मृणाल देव यांच्या फेसबुक पानावर प्रसिद्ध केला आहे. त्याबद्दल इनिगोय यांचे अभिनंदन!
15 May 2013 - 7:41 pm | आजानुकर्ण
स्त्रियांच्या बाबतीत श्रीमती हे संबोधन केव्हा वापरावे याचे संकेत मला अजून स्पष्टपणे कळलेले नाहीत. मात्र सौ. हे संबोधन येथे योग्य वाटावे. किंवा केवळ मृणाल देव असे लिहिले तरी चालेल.
15 May 2013 - 7:53 pm | पैसा
श्रीमति हे कोणाही स्त्रीला उद्देशून वापरता येते. पूर्वी विवाहित सधवा स्त्रियांसाठी "सौभाग्यवती" तर विधवा स्त्रियांसाठी "गंगाभागिरथी" अशी संबोधने वापरायची पद्धत होती. घटस्फोटित स्त्रियांना यातले कोणतेच संबोधन वापरता येणार नाही. आता सौ. (सौभाग्यवती) हे संबोधन पुरुषी वर्चस्वाचे द्योतक किंवा वैवाहिक स्थितीवरून फरक करणारे वाटल्याने काही स्त्रिया मुद्दाम वापरत नाहीत. श्रीयुत सारखेच श्रीमती हे अगदी सर्वसामान्य संबोधन आहे.
15 May 2013 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी
याच प्रकारे इंग्रजीमध्ये 'Ms' चा वापर होत असावा Mrs किंवा Miss च्या ऐवजी.
15 May 2013 - 8:03 pm | आजानुकर्ण
माहितीबद्दल आभारी आहे.
15 May 2013 - 7:44 pm | श्रीरंग_जोशी
मृणाल कुलकर्णी यांचे चेपूपान. बहुधा पब्लिक पान आहे.
15 May 2013 - 7:51 pm | इनिगोय
पैसाताई, आभार! :-)
मृणाल कुलकर्णी यांच्या प्रोफाईलवर ही पोस्ट बघता येईल.
15 May 2013 - 7:57 pm | यशोधरा
इनि, अभिनंदन!
15 May 2013 - 7:54 pm | सौंदाळा
अभिनन्दन!!
त्याप्रमाणेच चेपुवर परिक्षणाशेजारी चिकन रोगनजोश दिसत असल्यामुळे खादाड अमिता यांचेही अभिनंदन :):)
15 May 2013 - 9:41 pm | निनाद मुक्काम प...
लग्नानंतर त्या कुलकर्णी हे आडनाव वापरत असल्याने त्यांना देव म्हणून केलेला उल्लेख खटकला.
हलके घ्या
16 May 2013 - 9:43 am | अक्षया
+ १
16 May 2013 - 9:54 am | अक्षया
हा प्रतिसाद पैसाताईचा अभिनंदनाचा प्रतिसादा साठी आहे.. :)
15 May 2013 - 8:00 pm | प्यारे१
मिपावर अवांतराला मरण नाही. :)
16 May 2013 - 9:29 am | garava
उत्तम झालंय परीक्षण...
16 May 2013 - 9:48 am | जेनी...
जबरदस्त लिहिलयस ..... !!!
अभिनंदन .....
आपलीमराठीवर आला कि लगेच पाहिन ....
16 May 2013 - 10:13 am | मी कस्तुरी
इनि, मस्तच झालंय परीक्षण :)
खूप छान लिहिलयस…अभिनंदन आणि पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा :)
16 May 2013 - 11:14 am | तुमचा अभिषेक
सुंदर परीक्षण, प्रसंगवर्णन फारसे नसूनही ते डोळ्यासमोर उभे राहिले..
आशा करतो चित्रपट बघण्याचाही योग येईल.
16 May 2013 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर परिक्षण. आवडलं. चित्रपट पाहीन.
बाकी, मृणाल कुलकर्णी यांनी लेखनाचं कौतुक केलं आहे. तेव्हा आता आम्ही वाचकांकडे कौतुक करण्यासारखं काही शिल्लकर राहीलं नाही. अभिनंदन....आणि आनंद वाटला.
-दिलीप बिरुटे
16 May 2013 - 1:43 pm | संजय क्षीरसागर
असणारंच! कारण काय?... तर हे:
किती प्रामाणिकपणा. आणि अगदी हेच तर सांगितलं होतं :
प्रत्यक्षातली पत्नी जवळ आहे आणि आपण काय बघतोय तर टीवीवरच्या तरूणी!
एकदम बरोब्बर! सिनेमातल्या व्यक्तींचे वरचे फोटो पाहा.
इथे कमालीचा वैचारिक गोंधळ आहे. आनंद दोन नाहीत, एकच आहे. एकदम साधी गोष्ट आहे, एकतर तुम्ही आनंदात आहात किंवा नाही.
आणि ज्याला जमलं तोच तर आनंदात असतो. `ख-या जगण्यातला आनंद किंवा जगण्यातला खरा आनंद' अशी त्याच्या मनाची संभ्रमित स्थिती कधीच नसते.
हे ज्याला जमत नाही त्याचं यथार्थ वर्णन पण (खरं तर ती चिडचिड) जमलंय त्याच्यावर काढण्याचा प्रयत्न.
आहे त्या पत्नीशी अनुबंध नाही त्यामुळेच तर `आयुष्य अजुन दोन ठिकाणी फाटतं'. कल्पना तर आधीच निरूपयोगी आणि वास्तवात पण अपयश.
एकदम सही! जर खरा प्रणय सार्थ असेल तर पिक्चर (आणि त्यातनं असला पिक्चर) कोण बघतोय? आणि ज्याला ते जमलं त्याला स्वतःच्या पत्नीबरोबर सगळंच एंजॉय करता येईल मग तो पिक्चर असो की सहल.
पुढे उपप्रतिसादात अपर्णानं विचारलांय
ओ माय गॉड! कुणाकडेही रोख नसलेला आणि कुणाचीही व्यक्तिगत माहिती नसतांना दिलेला माझा पहिला निर्वैयक्ति प्रतिसाद किती सार्थ होता!
16 May 2013 - 6:31 pm | अनिरुद्ध प
परि़क्षण उत्तम होते पण चित्रपटाची जाहिरात करण्यासाठि लिहिले असे वाट्ले.प्रत्यक्षात चित्रपट रटाळ वाटला.शिर्शकगीत शेवटी टाकल्याने असे वाटले असेल.
17 May 2013 - 12:30 am | संजय क्षीरसागर
आंखो देखा हाल.
17 May 2013 - 10:35 am | Dhananjay Borgaonkar
चित्रपट न पाहताच हलाहल ओकण्यापेक्षा हे बरे.
17 May 2013 - 12:12 pm | अनिरुद्ध प
चित्रपट बघुनच नन्तर हा प्रतिसाद दिला होता,दिग्दर्शन जमले नाहि असे वाटले,सर्व कलकारन्चा अभिनय उत्क्रुष्ठ होता,सर्वच कलाकार अनुभवी आणि कस असलेले असल्याने,दिग्दर्शनात प्रचन्ड त्रुटी वाट्ल्या,बहुतेक भागा नन्तर आलेले Pause ही Editing मधिल चूक अथवा दिग्दर्शकाचि सम्भ्रम अवस्था हे कळुन येत होते,बाकि Dolby व एकन्दरित आधुनिक्तेचा उपयोग उत्तम.
17 May 2013 - 6:17 pm | जेनी...
ओ अनिरुद्ध काका तुमच्यासाठी नव्हता वो तो हलाहल चा प्रतिसाद ......:-/
म्हणजे ... असं मलाच वाटतय बर्का ......
17 May 2013 - 10:36 am | Dhananjay Borgaonkar
एक तर लैंगिकता नाहीतर शांतता यात अडकलेले विचारवंत बघून कीव येते. हे दोन्ही बोळे काढून प्रवाह वाहता करतील, मोठे होतील तर बरे. बाकी चालू द्या.
17 May 2013 - 6:26 pm | प्यारे१
बोळा तुंबणे हे विचारवंत बनण्यासाठी आवश्यक व्य्ववच्छेदक (द्विरुक्ती) लक्षण आहे असे णम्रपणे णमूद करतो.
17 May 2013 - 6:40 pm | बॅटमॅन
सहमत आहे. बोळा तुंबला की विचारांची गर्दी होते. आणि ऐकणारी माणसे दर्दी असली तर त्यांना त्या विचारांची सर्दी होते. व्हेरिली, धिस इस हाउ अ विचारवंत इज बॉर्न ;)
17 May 2013 - 6:26 pm | बॅटमॅन
अहो हे दोन्ही बोळे निघतील एकवेळ, पण "माझे सगळे बोळे निघून खर्या ज्ञानाचा अविरत प्रवाह वाहत आहे" हा अल्टिमेट बोळा कसा निघणार??
17 May 2013 - 10:07 pm | इनिगोय
ही दीडशेवी काडी.
किर्पा त्या महाराजांची.. _/\_