त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
8 May 2012 - 8:57 pm

त्यांच्या चश्म्यातून

माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. असे करताना लेखकाने लिहिलेल्या शेकडो पानातून त्याचा द्रुष्टीकोन समजून थोडक्यात मांडणे आणी मूळ लेखकाच्या / विचारवंताच्या खुसखुशीत शैलीला धक्का लागू न देणे; ह्या दोन्ही जवाबदार्‍या पार पाडण्याचा आमचा मानस आहे.
**********************************************************************************************************


त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर

(संदर्भ : आकलन, जागर, शिवरात्र)

धर्मवेडा तुर्की बाबर पनिपताची पहिली लढाई जिंकला. संग्रामसिंग विरुद्धच्या या लढाईला तो जिहाद म्हणत असे. आपला इस्लाम धर्म इतरांच्यावर लादणे हा त्याला आपला हक्क वाटत असे. हिदुस्थानचा हा पहिला तुर्की राजा. त्यामागे त्याचे बावळट पोर हुमायुन गादीवर बसले. राज्य संभाळता न आल्याने ते आपला जिव वाचवत पळत होते. त्या धवपळीच्या कालखंडात १५४२ साली त्याला मुलगा झाला. अबुल मुताह जलालुद्दीन महमद अकबर.

या परदेशी रक्ताच्या अकबराचे अनघा नावाच्या भारतीय दाईने संगोपन केल्याची नोंद आहे. १३ व्या वर्षी तो राजा झाला. पण राजधानीच न्हवती. दिल्लीचा ताबा त्यावेळी हिमू या पराक्रमी हिंदू राजाकडे होता. तो स्वत:ला विक्रमादित्य म्हणवून घेत असे. त्याने स्वतःचे हिंदू राज्य निर्माण केले होते. अकबराचा आणि त्याचा संघर्ष अटळ होता. पनिपतचे दुसरे युद्ध झाले. केवळ दैवयोगाने अकबराने ही लढाई जिंकली. हीमू काफराचे स्वतःच्या हाताने मुंडके उडवले. काफिरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणून - गाझी - ही इस्लामी धर्मशास्त्रातली पदवी स्वतःला लावून घेतली. त्यावेळी अकबराचा मार्गदर्शक होता. - बहरामखान.

अकबर हा काही दयाळू संत न्हवे. सदगुणांचा पुतळा ही न्हवे. तो मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. पुढे मार्गदर्शक बहरामखानाशी अकबराचे वाजले. मग बहरामखानाची हकालपट्टी झाली. १५६२ सालपासून - वीस वर्षांच्या अकबराच्या स्वतंत्र कार्यकर्तुत्वाला आरंभ होतो. त्यावेळी तो पुत्रप्राप्तीसाठी आतुर होता. दरसाल अजमेरची यात्रा करत होता. पुत्रप्राप्तीसाठी यात्रा - जत्रा हा काही मोठा पुरोगामी द्रुष्टीकोन न्हवे ; पण अशा प्रकारची तर्कातीत धर्मश्रद्धा त्यावेळी सार्वत्रिक होती. अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबर लग्न करतो. त्याआधी तिला मुसलमान करून घेतो. हेही पुरोगामीपणाचे द्योतक न्हवे. तुर्की रक्ताचा अभिमान गळून पडलेला आहे पण विशीतला अकबर अजूनही धर्मनिष्ठ मुसलमान आहे. उदारमतवादी मुसलमान व्हायचे की धर्मपिसाट मुसलमान व्हायचे हे दोनच पर्याय अकबरापाशी आहेत. जोधाबाईशी झालेल्या लग्नानंतर अकबर पहिला पर्याय निवडतो.

राजपूत विषयक अकबराच्या धोरणातला बदल इथपासून सुरू होतो. राजपूतांना सन्मानाने वागवणे. त्यांना मुसलमानांपेक्षा वरच्या हुद्द्यावरच्या जागा देणे वगैरे गोष्टी सुरू होतात. त्यावेळच्या काळाचा विचार करता ह्याला थोडाबहुत पुरोगामीपणाच म्हणावे लागते. त्याकाळात गोव्यातले पोर्तुगीज रक्तरंजित इन्विझिशन मधे मग्न आहेत. राणी एलिझाबेथ च्या इंग्लंडमधे - चर्चमधे उपस्थित राहण्यासाठी आयरिशांना कर द्यावा लागतो आहे. हिंदू धर्मपंडितात एकाहून एक कर्मठ भूमिका घेण्याची चढाओढ आहे. त्या काळातला अकबराचा हा मर्यादित उदारमतवाद आहे.

नंतर अकबर पुढचे पाउल टाकतो; आणि मुल्लामौलवी बिथरतात. "युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश अकबर काढतो. या आज्ञेने मौलवी चिडणे स्वाभाविक होते. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार मुसलमान फक्त दोन कारणांसाठी लढतो. एकतर काफिरांनी त्रास दिल्यास करायचा जिहाद किंवा भविष्यात त्यांचा त्रास होउ नये म्हणून आधीच केलेला जिहादी हल्ला. हा हल्ला करताना; एकमेव सत्यधर्माचा - इस्लामचा प्रचार जगभर करण्याचे ध्येय ह्रुदयात बाळगायचे असते. बिगर मुस्लिमांशी होणारे प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध - जिहाद मानले जावे असा मौलवींचा कायम आग्रह असतो. दोन मुसलमान राजे आपापसात भांडले तरच ते खाजगी भांडण मानले जाते. अकबर म्हणतो - की माझ्या हिंदूंशी झालेल्या लढायांचा आणी इस्लाम धर्माचा काही संबंध नाही. लढाई ही खाजगी गोष्ट आहे.

हा इस्लामी धर्मशास्त्रात उघड हस्तक्षेप आहे. १५६२ साली त्याने अजून एक सरकारी आदेश काढून सदर उल सदरचे - इस्लामी धर्मपीठाचे अधिकार कमी केले. पण अकबर इतके करून थांबला नाही १५६३ साली त्यानी हिंदूंवर असलेला धार्मिक यात्राकर रद्द केला. त्यापुढे जाउन १५६४ साली झिजिया कर रद्द केला. हिंदूंच्यावर झिजिया कर लावावा का ? हा इस्लामी पंडितातला एक विवादास्पद मुद्दा होता.

जो इस्लामी देश आहे तो दार उल इस्लाम (शांतताभूमी) आहे. जो देश मुस्लीमांचा नाही तो दार उल हर्ब (युद्धभूमी) आहे. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्याने त्याचा प्रचार आवश्यकच. त्यासाठी दार उल हर्ब ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी लेखणी; वाणी आणी तलवारीने जिहाद करणे हे प्रत्येक इमानदार मुस्लिमाचे कर्तव्य आहे. दार उल हर्ब मधले लोक ज्यू किंवा ख्रिस्ती असतील तर ते अहले किताबी होत. एकेश्वरवादी होत. त्यांना जमल्यास मुसलमान करावे किंवा सूट म्हणून त्यांवर झिजिया कर लावला पाहिजे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. प्रश्न हिंदूंचा होता. मुहम्मदाला हे लोक माहित नसल्याने त्यांबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही. पण हे लोक मूर्तिपूजक असल्याने त्यांना मारावे किंवा अल्लाच्या एकमेव सत्यधर्मात आणावे असे एक गट म्हणत असे. मौलवींचा दुसरा गट हिंदूंची मूर्तीपूजा वरवरची असून ते मूलतः एकेश्ववरवादी असल्याने त्यांना झिजियाची सवलत दिली पाहिजे असे प्रतिपादित करे. अकबराने दोघांचा गाशा गूंडाळला. इस्लाम धर्माची मूळची भूमिका शांतीचीच आहे असे तो म्हणू लागला. झिजिया सरळ माफ केला. अजून अकबर स्वतःला धर्मनिष्ठ मुस्लिम समजत असे.

तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या. १५६६ साली त्याने दुर्गावती राणीला युद्धात मारले. तिच्या सुनेला आणि बहिणीला पकडून स्वतःच्या जनानखान्यात टाकले. अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रीया असल्याची नोंद आहे. तत्कालीन हिंदू राजांतही बहुपत्नित्व होतेच. महाराणा प्रतापाला ११ बायका होत्या. जितांच्या स्त्रिया जनानखान्यात घालण्याची प्रथा हिंदूतही होती. अकबर त्याच्या आज्या प्रमाणे विपुल प्रमाणात दारू पित असे. बापाप्रमाणे अफू घेत असे. आणी स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून "सबरस" नावाचे पेय बनवून पीत असे. अकबराचा मोठेपणा सांगत असताना त्याची चैन, भोग, अतिरिक्त विलास नाकारण्याचे काहिच कारण नाही. १५६८ ला अकबराने चितोड जिंकले. हा आनंद साजरा करण्यासाठी पकडलेले ८००० राजपूत सैनिक मारले. त्यानंतर ३०,००० निरपराध नागरिकांची कत्तल केली. पण युद्धाला धार्मिक रंग येवू दिला नाही.

१५६३ ते १५६७ ह्या काळात अकबराच्या सन्निध्यात वेगवेगळे विद्वान आलेले दिसतात. प्रथम विरवर जो बिरबल या नावाने विख्यात आहे. राजा तोरडमल, राजा मानसिंग आणी वीरवर ह्या हिंदू मित्रांच्या सानिद्ध्यात एक वेगळाच अकबर आकारू लागला. अकबर स्वतः सुन्नी मुस्लिम असला तरी त्याचा लहानपण पासूनचा शिक्षक लतीफ कझवानी हा शिया मुस्लिम होता - त्याची धार्मिक भूमिका "सुलह ई कुल" या नावाने ओळखली जाते. साधारणपणे सर्वधर्म समभावाच्या जवळ जाणारी ही भूमिका आहे. अकबराच्या अंतःपुरातील हिंदू स्त्रियांचाही त्यावर प्रभाव पडत होता. मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची.... स्वतःची मते बदलण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती.

१५७३ साली तो गुजराथला गेला. त्यावेळी एका पारशी धर्मपंडिताशी त्याची भेट झाली. मूळचे इराणचे पारशी अग्निपूजक असतात. सैतान हा अग्नीपासून बनलेला आहे असे कुराणात लिहिलेले आहे. अरबांनी इराण जिंक्ल्यानंतर सर्व देश मुसलमान करण्यात आला. धर्मासाठी जिव घेवून भारतात पळालेले लोक म्हणजे पारशी. दस्तूर मेहराजी राणा या पारशी धर्मपंडिताशी चर्चा केल्यानंतर अकबराने म्हटले - पारशी हा देखील एक इश्वरी धर्म आहे !

शीख धर्माकडेही अकबराचे लक्ष होते. गुरू अर्जुनसिंग यांच्याशी अकबराने अनेकदा चर्चा केली. गुरु ग्रंथसाहेब हाही एक दैवी धर्मग्रंथ आहे असे अकबर मानू लागला. धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि इबादतखान्याचा जन्म झाला. शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला.

सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम अकबराने याच काळात काढला. पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार अकबराने काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला.

राजा मानसिंग हा श्रद्धाळू वैष्णव होता. त्याने अकबराची वल्लभ संप्रदायाच्या संतांशी भेट घडवून आणली. भेटीनंतर अकबराने वृंदावनाच्या परिसरातले सर्व कर माफ करून टाकले. त्या परिसरात गोहत्याबंदीचा कायदा केला. १५८० साली अकबराने कायदा केला की - आजपर्यंत ज्याना जबरदस्तीने मुस्लिम करण्यात आले आहे - ते सर्व त्यांच्या मूळच्या धर्मात परत जाउ शकतात.

सुनी धर्ममतावर अकबराची फारशी श्रद्धा नाही असे शिया मुस्लिमांना वाटले. त्यांनी अकबराला शिया करण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. १५८० सालीच अकबराने ज्येसुईट मिशनर्यांना चर्चेसाठी बोलावले होते. अकबराला त्यांची स्वेच्छेने दरिद्री राहून आयुश्यभर जनसेवा करण्याची मिशनरी व्रुत्ती आवडली. पण मिशनर्यांचा प्रयत्न अकबराला ख्रिश्चन करण्याचा होता. त्याला मात्र अकबर बधेना. मिशनरी लिहितात - " अकबर हिंदूसारखा मिश्या ठेवतो. दाढी ठेवत नाही. तो सूर्याची पूजा करतो. तो नास्तिक आणी पाखंडी आहे. फाजील जिज्ञासा हे त्याचे वैशिष्ट्य आहे."

अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय.

अकबराला सुन्नी रहाण्यात रस राहिला न्हवता. त्याला शिया व्हायचे न्हवते. त्याला ख्रिश्चन बनवण्याचे मिशनर्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. हिंदूत धर्मप्रसाराची सोयच न्हवती ! अकबराच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. त्याने सगळ्या धर्मचर्चा ऐकल्या होत्या. बर्या वाइट गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागले. वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर ? दीने इलाही चा जन्म होत होता.

(या इलाही इलिल्लाही; मुहम्मद रसूलिल्लाहि.) अल्लाह एकच आहे. आणी मुहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषीत आहे हा इस्लामचा मूलभूत नियम आहे. अकबराने हा नियम मोडला आणी स्वतःलाच पुढचा प्रेषीत जाहीर केले. वेद; रामायण महाभारत यांची फारसीत भाषांतरे करून तो अभ्यासू लागला. त्याला आता एक परिपूर्ण आणी नवा असा धर्म - दीने इलाही बनवायचा होता.

मुस्लिमांच्या शाळातून, मदरशातून त्यावेळी प्रथम अरबी भाषा आणी नंतर धर्मशास्त्रांचा अभ्यास होत असे. अकबराने अशी भूमिका घेतली की या फालतू अभ्यासात काय अर्थ आहे ? शाळातून इतिहास, तत्त्वज्ञान, गणीत, वैद्यक, ज्योतिष याचा अभ्यास झाला पाहिजे. एका अर्थाने आधुनिक अभ्यासक्रमाची भूमिका आहे.

१५८४ नंतर अकबर अश्रद्ध बनत चालला. कुराणात लिहिलेले सर्व चमत्कार खोटे आहेत असे म्हणू लागला. एका स्त्री चा चेहरा आणी मोराचे पंख असलेल्या घोड्यावर बसून प्रेषीत मुहम्मद स्वर्गात जावून अल्लाहशी बोलले असा उल्लेख कुराणात आहे. अकबराला हा चमत्कार अमान्य होता. ख्रिस्ती मिशनर्यांसमोरच्या चर्चेत अकबराने ही भाकडकथा आहे असे म्हटले. पण हेच नियम अकबर बायबल मधल्या चम्त्काराना लावू लागला तेंव्हा मिशनर्यांनी त्याला पाखंडी ठरवले. त्यापुढे जावून त्याने सर्वच धर्मातले सर्वच चमत्कार खोटे आहेत अशी भुमिका घेतली. पुढे जावून तो म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. त्याने नियम केला की पती पत्नीत १२ वर्षापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. हा नियम खुद्द प्रेषितांच्या लग्नांच्या विरोधात होता. त्यांची एक पत्नी पंचेचाळीस वर्षानी लहान होती.अनेक लग्ने केलेल्या अकबराला आता एकपत्नित्व हवे होते. १५८२ नंतर त्याने आणखी लग्ने केली नाहीत. हिंदू आणी मुसलमान अशा दोघांनाही समान नागरी कायदा - एकपत्नित्वाचा कायदा लागू केला. हा तत्कालीन हिंदू आणी मुसलमान अशा दोन्ही धर्मातला हस्तक्षेप होता. त्याने स्क्तीने सती जाण्यावर बंदी घातली. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी असावी असे त्याला वाटत होते. मुलगा १२ व्या वर्षी सज्ञान होतो; तेंव्हा त्याच्या परवानगीनेच त्याची सुंता १२ वर्षी करावी असा कायदा तो आणू पहात होता.

दिने इलाहीच्या स्थापने बरोबरच अकबराने जाहिर केले - समाजाच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधिकार आहे.

त्याने जनतेचे भले करणारे कायदे त्याने धर्मात हस्त्क्षेप करून लादले. अकबराच्या दिने इलाही या नव्या धर्माला पंचवीस हून कमी अनुयायी मिळाले. त्याने त्याचा नवा धर्म कोणावरही लादला नाही. मुल्ला मौलवींना कंदाहरच्या बाजारात विकणार्‍या अकबराला ते अवघड न्हवते. . हा एकप्रकारचा चमत्कार होता. सेक्युलर हा शब्द जन्मण्या आधी हे घडत होते. फ्रेंच राज्यक्रांती घडायला अजून २०० वर्षांचा अवकाश होता.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

8 May 2012 - 9:03 pm | बॅटमॅन

"Mad man. You're a mad man. This is blasphemy, this is madness."

"Madness?....THIS IZZ AKBAR!!!!!!!!!"

कुरुंदकरांचा अकबर मांडलात, छान केलेत :) त्यांचे इंग्रजीत भाषांतर होणे लै गरजेचे आहे हे नक्की.

नितिन थत्ते's picture

8 May 2012 - 9:06 pm | नितिन थत्ते

चांगला लेख आहे.

निशदे's picture

8 May 2012 - 9:11 pm | निशदे

उत्तम........ अगदी छान ओळख करून दिलीत...... मतमतांतर होणारच....... ;)
अजून लेखमाला वाढवत रहा.

चित्रेचा तारा's picture

8 May 2012 - 9:15 pm | चित्रेचा तारा

छान माहिती दिलेली आहे.

गणामास्तर's picture

8 May 2012 - 9:24 pm | गणामास्तर

>>>>अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबर लग्न करतो. त्याआधी तिला मुसलमान करून घेतो.

माझ्या माहिती प्रमाणे लग्नाच्या वेळी जोधाबाई ने धर्म बदलायला नकार दिला होता.
बाकी छान लेख. बरीच नवीन माहिती कळाली अकबराबद्दल.
पु.भा.प्र.

मदनबाण's picture

8 May 2012 - 9:46 pm | मदनबाण

माझ्या माहिती प्रमाणे लग्नाच्या वेळी जोधाबाई ने धर्म बदलायला नकार दिला होता.
जोधा अकबर या चित्रपटात देखील जोधाला मुसलमान केल्याचे दाखवले गेले नाहीये ! नक्की खरं काय ?

अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रीया असल्याची नोंद आहे
.
बापरे !

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

डॉक्टर लै बेस केलत हो...ही लेखमाला सुरू करुन...

अकबर आजही निर्माण होऊ शकतात ,फक्त ते ज्या लोकसमुहांमधून निर्माण होतील,त्या लोकसमुहांना धार्मिक बाबींकडे सबूरीनी पहाण्याचा दृष्टिकोन अंगी बाणवता आला पाहिजे... कारण आजही बेड्यांनाच फुलं समजणारा समाज अस्तित्वात आहे, त्यांना नीट जागं करायला बेधुंद धर्मगुरूंची वाजवणारा अकबर हवाच...!

जाता जाता--- आकलन मधला कुरुंदकरांनी लिहिलेला अकबरावरचा लेख तर प्रत्येकानी अवश्य वाचावा..असा आहे... :-)

अर्धवटराव's picture

8 May 2012 - 11:23 pm | अर्धवटराव

छान लेख.
एक शंका आहे...
"श्रीमान योगी " च्या प्रस्तावनेत कुरुंदकर अकबराचे सेक्युलॅरीझम ही त्याची राजनैतीक गरज होती असं म्हणतात , आणि त्याविरुद्ध शिवाजीचे सेक्युलॅरीझम हा त्याचा अंगीभूत चांगुलपणा होता असं स्पष्ट करतात.
मग कुरुंदकरांचे नक्की मत काय असावे? कि कुरुंदकरांचे मत परिवर्तन झाले असावे?

अर्धवटराव

मन१'s picture

8 May 2012 - 11:25 pm | मन१

लेख छानच.
अकबराबद्दलची माझीच एक जुनी प्रतिक्रिया देतोय.

बाकी अकबर ह्या व्यक्तिमत्वाविषयी बर्‍याचदा दोन टोकाची मतं सापडतात.
एक आहे ते सामान्य समजुतीप्रमाणे सहिष्णू ,दुसर्‍यांच्या धर्मात ढवळाढवळ न करणारा वगैरे, (सेक्युलर्,गांधी भक्त अकबर ? ;-) ).

आणि दुसरं म्हणजे "सनातन" च्या गोटात असलेली मतं.(१००% स्त्री लंपट,परकीय,खुनशी,विकृत वगैरे आणि फक्त वाइट्,सैतानी गुणच असणारा व्यक्ती)
त्याबद्दल माहिती देताना डॉ रायकरांनी कुरुंदकरांच्या हवाल्यानं दोन्ही बाजूंबद्दल खूपच छान् माहिती एका लेखात (लोकप्रभा दिवाळी अंक ) दिलिये.
http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp03.htm हा तो लेख.

अकबर्,सती ह्याबद्दलची एक माहितीपूर्ण चर्चा http://mr.upakram.org/node/3192 इथे पाहता येइल.

--मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 May 2012 - 2:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला. आणि पुढच्या लेखांकांच्या प्रतीक्षेत आहे.

मनोबा, लोकप्रभेच्या लेखाबद्दल आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2012 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकप्रभाच्या दुव्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

इष्टुर फाकडा's picture

22 Jan 2016 - 4:36 am | इष्टुर फाकडा

लोकप्रभा दिवाळी अंक वाला लेख आहे का कोणाकडे? तो सध्या गायब झालेला दिसतोय.

सुधीर's picture

9 May 2012 - 12:06 am | सुधीर

पुढील लेखाविषयी उत्सुकता लागून आहे.

रामपुरी's picture

9 May 2012 - 3:12 am | रामपुरी

चांगला लेख!
पु.ले.प्र.

५० फक्त's picture

9 May 2012 - 8:13 am | ५० फक्त

लेख आवडला,

राजेश घासकडवी's picture

9 May 2012 - 8:34 am | राजेश घासकडवी

त्या काळात एकंदरीतच धर्मसत्ता व राजसत्ता या एकमेकांना टक्कर देत होत्या. स्पेनमधल्या इन्क्विझिशनचा उल्लेख आलेला आहेच. धर्मसत्ता ही समांतर सत्ता असल्याने राजाला पूर्ण अधिकार नसत. राजसत्ता पुरेशी प्रबळ झाली तरच ती धर्मसत्तेला उलथून देऊ शके. तसा प्रयत्न अकबराने केला असावा असं सुरूवातीच्या काही 'सुधारणां'विषयी वाचून वाटलं.

"युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश...
सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम

वगैरे गोष्टी अमुस्लीम बहुसंख्य असलेल्या जनतेवर राज्य करण्यासाठी योग्य तडजोडी आहेतच. पण त्याचबरोबर मुस्लीम धर्मगुरुंच्या सत्तेला आव्हानही आहे. असं आव्हान देणारा राजा जनतेत प्रिय होणं साहजिकच आहे. त्यामुळे सुरूवातीला 'हा, कदाचित उत्तम राजकारण म्हणून या सुधारणा राबवल्या असाव्यात' असं वाटलं.

मात्र त्याने जो मार्ग अवलंबला - हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्मांधिकाऱ्यांना नापसंत असलेल्या सुधारणा राबवण्याचा, तो पाहून अचंबित व्हायला झालं. अकबराच्या काळाच्या मानाने आत्यंतिक सेक्युलर भूमिका वाटतात.

मन१'s picture

9 May 2012 - 6:25 pm | मन१


"युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश...
सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम
वगैरे गोष्टी अमुस्लीम बहुसंख्य असलेल्या जनतेवर राज्य करण्यासाठी योग्य तडजोडी आहेतच.

ह्या निमित्ताने मला सतत पडणारे प्रश्नही विचारतो. अल्लाउद्दीन खिल्जी हा ज्ञानेश्वरांना समांतर. अकबराच्या आधी सुमारे तीनेक शतके होउन गेलेला भला माणूस. ह्याचे वारशात मिळालेले राज्य दिल्ली व उत्तर भारतातल्या काही प्रांतांपर्यंत सीमित होते. नंतर त्याने थेट आजचा मध्यप्रदेश्,गुजरात, महाराष्ट्र वगैरे मधील बहुतांश सर्व भूभाग झपाट्याने काबीज केले. महाराष्ट्रातील तेव्हाची सर्वात मोठी सत्ता यादवांची त्याने एका रपाट्यात संपवली. तिथून थेट दक्षिणेत आक्रमण करत तेलंगणाचे(प्रामुख्याने आंध्र) आख्खे राज्य जिंकले. मग भारताच्या तिदक्षिणेकडील मदुरैच्या राज्यावर हल्ला करून तेही जिंकले. तेही कधी, तर आजपासून आठेकशे वर्षापूर्वी. कसलीही दळणवळणाची साधने नसताना, व जिंकलेला सर्वच भूभाग नव्याने जोडला जात असताना. म्हणजेच आजच्या भारतातील बहुतांश भूभाग खिल्जीने घशात घातला होता.(निदान उत्तर ते दक्षिण असा तरी नक्कीच, पूर्वेकडचा पट्टा सोडून.)
त्याच्यानंतर दोन्-चार दशकातच सत्तधीरी बनलेल्या महम्मद बिन तुघलक ह्याचेही राज्य असेच अफाट विस्तारलेले होते.
ह्यापैकी कुनालाही जिझिया वगैरे माफ करायची, भेकड, पशुवत हिंदुंची मने जिंकण्याची वगैरे गरज का भासली नाही?
"अमुक एक गोष्ट करणे अकबराला भागच होते हिंदुबहुल राज्यात राहताना" असे जे म्हटले जाते, ते नक्की कशामुळे?
त्याच्याआधीचे लोकही त्याच हिंदुबहुल भूभागात रहात होते की. उलट त्यांच्याकाळात तर मुस्लिमांचे प्रमाण अत्यल्पच होते. अकबराच्या राज्यात होते, त्याच्यापेक्षा फार म्हणजे फारच कमी. मग असे का म्हणतात बुवा?

पण त्याचबरोबर मुस्लीम धर्मगुरुंच्या सत्तेला आव्हानही आहे. असं आव्हान देणारा राजा जनतेत प्रिय होणं साहजिकच आहे. त्यामुळे सुरूवातीला 'हा, कदाचित उत्तम राजकारण म्हणून या सुधारणा राबवल्या असाव्यात' असं वाटलं.

मात्र त्याने जो मार्ग अवलंबला - हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्मांधिकाऱ्यांना नापसंत असलेल्या सुधारणा राबवण्याचा, तो पाहून अचंबित व्हायला झालं. अकबराच्या काळाच्या मानाने आत्यंतिक सेक्युलर भूमिका वाटतात.
अजून एक शंका ही की हे सगळे शासक बाहेरून येउन इतक्या सहजतेने दूर दूरपर्यंत मोहिमा काढून त्या फत्ते करून कसे येत? असे काय घडत होते त्या काळात? पण ते धाग्यास अवांतर होइल, त्यामुळे तो प्रश्न बाजूस ठेवला तरी चालेल.

धाग्यास पूरक अशी एक गोष्ट. अकबराच्या पाचेक दशके आधी उत्तर बहरताच्या भूमीतच संत कबीर होउन गेलेत.
त्यांनी जो जनमानस उभा केला, विविध धर्मांच्या सह अस्तित्वाची जी भूमिका घेतली व त्यामुळे जे एक जनमानस तयार होत होते, एक school of thoughts बनत होती, त्याचाही अकबरावर प्रभाव पडला असू शकतो. कारण काहीएक प्रमाणात ते एकाच लायनीवर जातात. शिवाय दोघांचे कर्मक्षेत्रही, वास्तव्य असलेला भूभागही बरेचसे ओव्हरलॅपिंग आहे.

रणजित चितळे's picture

9 May 2012 - 9:24 am | रणजित चितळे

पुढे वाचायला आवडेल. वाट बघत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2012 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.
पु.भा.लवकर टाका.

-दिलीप बिरुटे

कौन्तेय's picture

9 May 2012 - 10:19 am | कौन्तेय

उत्तम लेख. पण माझ्या मनात 'आपला - परका' संकल्पना घट्ट असल्याने या अशा अकबरालाही मनोमन अर्धी माफ़ी देता येत नाही. त्यामुळेच हे वाक्य खटकते -
"राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय".
त्याऐवजी फारतर '... आणि शेवटचा शासक' म्हणणे उचित ठरेल.

इस्पिक राजा's picture

9 May 2012 - 10:23 am | इस्पिक राजा

लेख आवडला. अकबराबद्दल मनात आत्तापावेतो जी तेढ होती ती एकाएकी कमी झालेसे वाटत आहे.

पैसा's picture

9 May 2012 - 10:34 am | पैसा

असेच आणखी लेख येऊ द्या. या निमित्ताने कुरुंदकरांच्या विचारांची छान ओळख करून देता आहात! धन्यवाद.

उदय के'सागर's picture

9 May 2012 - 12:03 pm | उदय के'सागर

खुपच छान -साध्या शब्दात लेख मांडला आहे. खुप धन्यवाद इथे शेअर केल्या बद्दल.
पुढील भाग लवकर येऊ द्या, शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

9 May 2012 - 1:00 pm | मुक्त विहारि

अजून येवू द्यात...

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2012 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार

अकबराची नवी ओळख समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.

इष्टुर फाकडा's picture

9 May 2012 - 1:36 pm | इष्टुर फाकडा

या दुव्यावर कुरुंदकरांची दुर्मिळ व्याख्याने ऐकण्यास मिळतील. लाभ घ्यावा. विषय- शिवाजी.

http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391

राजघराणं's picture

9 May 2012 - 2:18 pm | राजघराणं

धन्यवाद सागर

दीपक साळुंके's picture

10 May 2012 - 2:54 pm | दीपक साळुंके

मागे एका धाग्यावर तुम्ही लिंक दिली होतीत, तेव्हा धन्यवाद द्यायचे राहून गेले होते !!!

अनंत धन्यवाद !!! जबरदस्त भाषणे आहेत ... खूप दिवसांपासून यांच्या शोधात होतो ! :)

स्मिता.'s picture

9 May 2012 - 2:51 pm | स्मिता.

आतापर्यंत अकबराबद्दल शाळेच्या इतिहासच्या पुस्तकातून आणि जोधा-अकबर चित्रपटातूनच काय ती माहिती होती. हा लेख वाचून त्याच्याबद्दलच्या बर्‍याच गोष्टी कळल्या.
असेच आणखी लेख येवू द्या.

विकास's picture

9 May 2012 - 8:10 pm | विकास

कुरंदकरांच्या विचारांचे आणि त्यानिमित्ताने इतिहासाचे संकलन खूपच छान झाले आहे. अजून येउंदेत.

तो मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे.

हे यातील एक महत्वाचे वाक्य आहे. आणि ते म्हणताना अकबराला कमी करण्याचा हेतू देखील दिसत नाही, तसे ते करू देखील नाही..

सत्ता, संपत्ती आणि धर्मबदल या तिन्ही गोष्टींसाठी झालेले भारतावरील पहीले आक्रमण हे इस्लामिक होते. पण ते झाल्यापासून काही शतके प्रयत्न करूनही ते इस्लामिक राष्ट्र करता आले नाही आणि किंबहूना जितका इथल्या लोकांच्या श्रद्धांवर हल्ला झाला तितके ते चवताळून आले हा इतिहास अकबरासारख्या तत्कालीन "नवीन पिढीतील" राज्यकर्त्यास आणि त्याच्या सल्लागारांना समजला नसेल असे नव्हे. एकूणच भारतीय इतिहास पाहीला तर लक्षात येते की एक अशोकाच्या काळी आलेली धर्मसत्ता सोडली, तर हिंदू राज्यकर्ते हे धर्मसत्तेने राज्य करत नव्हते. म्हणूनच २००० वर्षांपुर्वीपासून शनीवार तेली (अर्थात ज्यू) आणि नंतरच्या काळात फार्सी येऊन राहू शकले. थोडक्यात हिंदूंना सत्ताधार्‍याचा धर्म काय हा प्रश्न नव्हता. मग त्यांच्या याच भुमिकेचा सत्तेसाठी आणि मोघल साम्राज्यवृद्धीसाठी योग्य पद्धतीने फायदा अकबराने घेतला असेल असे वाटते. ते करत असताना ह्याच हिंदू परंपरेचा, इस्लाम पंथातील सुफीसंतांचा तसेच त्याच्या आधीच्या पिढीतील संत कबीराचा त्यावर प्रभाव पडला असण्याची शक्यता देखील वाटते.

----------------------

"स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून "सबरस" नावाचे पेय बनवून पीत असे."

वरील वाक्य आधी वाचले आणि नंतर "वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर ? दीने इलाही चा जन्म होत होता." वाचल्यावर, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" असे अकबरावरूनच म्हणू लागले की काय असे वाटले. ;)

धनंजय's picture

9 May 2012 - 11:03 pm | धनंजय

चांगली माहिती

साती's picture

10 May 2012 - 12:20 am | साती

बाकी जोधाबाई खरीखुरी होती का कथा?

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2012 - 2:17 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम परिचय डॉक्टर! कुरुंदकरांसारख्या वास्तव विद्वानाच्या चष्म्यातून पहाताना अनेक पैलू डोळ्यासमोर ठेवण्याचा आग्रह नक्कीच विवेकवादी आहे. मतभिन्नतेचा आदर करुन आपले मुद्दे ठसवण्यात कुरुंदकर अग्रणीच.

विसुनाना's picture

10 May 2012 - 6:37 pm | विसुनाना

उत्तम माहिती. आणखी लेख यावेत.

प्रचेतस's picture

10 May 2012 - 8:56 pm | प्रचेतस

उत्तम आणि संतुलित लिखाण डॉक्टरसाहेब.
मनोबांचे प्रतिसादही आवडले.

मेघवेडा's picture

23 May 2012 - 3:43 pm | मेघवेडा

उत्तम संकलन. लेख आवडला.

भंकस बाबा's picture

11 Jan 2016 - 1:58 am | भंकस बाबा

नवीन माहिती मिळाली.