अनंतमुखी मुशर्रफ
आपण ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत असे आपण मानतो व म्हणून त्याला ‘चतुरानन’ म्हणतो. तसेच लंकापती रावणाला दहा तोंडे होती म्हणून त्याचा उल्लेख ‘दशानन’ असा केला जातो. पण मुशर्रफ इतक्यांदा आपली निवेदने बदलतात कीं त्यांना किती तोंडे आहेत हा एकाद्या संशोधनाचाच विषय व्हावा! "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे" त्यांचे चातुर्य पहाता त्यांना एका वेगळ्याच अर्थाने "चतुरानन ("चतुर+आनन)" म्हटले पाहिजे. एका पाठोपाठ परस्परविरोधी निवेदने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाहीं. कसलाही विधिनिषेध न ठेवता ते असे करतात. खरं तर हे गृहस्थ इतके वारंवार रंग बदलतात कीं त्यांना मी तर‘सरडा (Chameleon )’च म्हणतो!
तसे पहाता जवळ-जवळ सगळेच पाकिस्तानी नेते दुतोंडी आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी कीं त्यांचा दुतोंडीपणा अमेरिकेचे राष्ट्रपती, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळातील नेते यांच्यासारख्या-म्हणजे ज्यांना माहीत असायला हवे त्यांना-सोडून सार्या जगाला माहीत आहे. अमेरिकेच्या त्यावेळच्या राष्ट्रपतींना (धाकल्या बुशना) त्यांनी आपल्या संभाषण चातुर्याने मस्त ‘पटविले’ होते. पण याचे कौतुक करायचे कीं असला शत्रू आपल्यापुढे उभा आहे म्हणून दुःख करायचे? धाकल्या बुशसाहेबांवर त्यांनी इतकी मोहिनी घातली होती कीं मुशर्रफना वाचविण्यासाठी त्यांनी आर्मिटेजसारख्या माणसाकडून षड्यंत्र रचवून दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखाकडून नीशान-ई-इम्तियाज हा मुलकी किताब दोनदा मिळविणार्या पाकिस्तानच्या एकुलत्या एक सुपुत्राचा-डॉ. अब्दुल कादिर खान यांचा-बकरा बनवला होता! त्यांच्या विविध वक्तव्यांचा अभ्यास केल्यावर त्यांचे प्रत्येक तोंड वेगळी-वेगळी निवेदने देत असते हे स्पष्ट दिसते! त्यामुळे आज ते सत्तेवर नसले तरी आपल्या पित्त्यांतर्फे ते आपल्यावर संकट आणू शकतात म्हणून आपण त्याला बरोबर ओळखून आपले धोरण आखले पाहिजे!
मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्नावरच्या
आंतरराष्ट्रीय उदासीनतेवर टीका केली
_______________________________________________________________
मुशर्रफ यांच्या पातळयंत्री कारवायांची आणि त्यांच्या असत्यवचनांची "न्यूक्लियर डिसेप्शन" या सुंदर पुस्तकात खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या संदर्भात माहिती आलेली आहे आणि ही मालिका ई-सकाळवर वाचणार्या वाचकांना याची माहिती आहेच.
बेनझीरबाईंनी त्यांना लष्करी मोहिमांचे डायरेक्टर-जनरल (Director-General Army Operations) म्हणून नेमले तेंव्हांपासून त्यांनी काश्मीरमध्ये लुडबूड करायला सुरुवात केली. १९९२ साली त्यांनी बेनझीरबाईंच्याकडे त्यांना न विचारता काश्मीरमध्ये हल्ले करायची परवानगी मुशर्रफनी बेनझीरबाईंकडे मागितली पण ती त्यांनी नाकारली! पण (कदाचित् त्या बदली) त्यांनी मुशर्रफना हजारो घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसवून आतंक माजवायला मात्र परवानगी दिली होती! पण हा ‘चतुर आनन’ आग्र्याला शांतीचा जप करत आला आणि त्या भेटीत शेवटी आपलेच राज्यकर्ते किती उथळ विचाराचे आहेत हेच दिसून आले. दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी पत्रकारपरिषद बोलावली पण भारतीय पत्रकारांना व भारतीय सरकारला न सांगता त्या परिषदेचे थेट प्रक्षेपण केले! त्यात काश्मीर द्यायला मी आलेलो नाहीं. तसे मी केल्यास “मला माझी नेहरवाली कोठी परत विकत घ्यावी लागेल” असा विनोद करून पाकिस्तानी जनतेवर एक त्यांनी केला होता.
पाकिस्तानच्याच सक्रीय सहकार्याने तालीबान अफगाणिस्तानात सत्तेवर आले. त्यांच्या राजवटीला सर्वात आधी मान्यता दिली ती पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अमिराती (UAE) या तीनच देशांनी. ९/११ नंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अमिराती या देशांनी आपली मान्यता काढून घेतली. मुशर्रफ यांच्या सत्तेखाली असलेले पाकिस्तान हे एकच असे राष्ट्र उरले ज्याने अद्यापही तालीबानला मान्यता दिली होती. पाकिस्तानने तालीबान राजवटीला मान्यता द्यायच्या आधीपासून त्यांना हत्यारे दिली होती व काश्मीरमध्ये घुसून आतंक माजविणार्या सुन्नी अतिरेक्यांची शस्त्रसज्ज टोळकी त्यांना देऊन मनुष्यबळही पुरविले होते. ९/११ आले आणि गेले पण मुशर्रफ कुंपणावरच बसून होते.
मग अफगाणिस्तानवर अमेरिका, नाटो आणि इतर राष्ट्रांनी आक्रमण केले तरीही मुशर्रफ यांनी चुप्पीच चालू ठेवली होती. या युद्धाच्या काळात CNN वर रोज तालीबानच्या पाकिस्तानातील दूतावासातील अधिकारी रोजच्या युद्धाच्या वार्ता (थापा) जगाला देतानाचे दृष्य अद्यापही माझ्या डोळ्यासमोर आहे.
पण युद्ध संपता-संपता मुशर्रफना Ground realities बदलल्याचा अचानक व नव्याने साक्षात्कार झाला व त्यांनी कोलांटी उडी मारली व तालीबानची मान्यताच काढून घेतली असे नव्हे तर त्यांचा निःपात करण्याची (तोंडदेखली) प्रतिज्ञा करून तसे वचनही धाकल्या बुशना दिले. त्यामुळे असेल पण इराण, उत्तर कोरिया, लिबिया आणि इराक या अमेरिकेचे कट्टर शत्रू असलेल्या राष्ट्रांना अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरविल्याची मुशर्रफ यांची पापेही नजरेआड करण्यात आली.
पाकिस्तानचे लष्करी मोहिमांचे डायरेक्टर-जनरल असल्यापासून ते सत्तेवरून फेकले जाईपर्यंत त्यांचा दुटप्पी व्यवहार चालूच होता. अलीकडेच ‘विकीलीक्स’मुळे यातल्या बर्याच गोष्टींवर अधिकृतपणाचा शिक्काही बसला. पण आता तर मुशर्रफनी ‘डेर स्पीगेल’ या लोकप्रिय जर्मन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत या त्यांच्या पापांची स्वतःच कबूली दिली आहे. त्यांनी सांगितले कीं पाकिस्तानी लष्कराने आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये शिरून आतंक व हाहाकार माजविण्याचे प्रशिक्षण नक्कीच दिले. त्यापुढे जाऊन ते हेही म्हणाले कीं काश्मिरात शिरून लढण्यासाठी भूमिगत तुकड्याही पाकिस्तानी लष्कराने उभ्या केल्या. याकडे पाकिस्तानी सरकारने जाणून बुजून काणाडोळा केला कारण त्यांना भारताला काश्मीरबद्दल वाटाघाटी करण्यासाठी भाग पाडायचे होते. नाक दाबून भारताचे तोंड उघडायचाच हा प्रयत्न होता.
खालील दुवे उघडून याबद्दल सविस्तर वाचा!
1) http://www.bbc.co.uk/news/world-south-asia-11474618
2) http://www.spiegel.de/international/world/0,1518,721110,00.html
3) http://www.spiegel.de/international/world/0,1518,721110-2,00.html
पण ही कबूली त्यांनी आधीही दिली होती, पण कां कुणास ठाउक, पण त्या कबूलीला एवढी प्रसिद्धी मात्र मिळाली नाहीं. याचे कारण कदाचित् त्या बातमीचा उगम भारतात होता. फेब्रूवारी २०१०मध्ये पाकिस्तानी वंशाच्या इंग्लिश खासदारांपुढे House of Lordsच्या एका छोट्या खोलीत दिलेल्या भाषणात मुशर्रफ यांनी सांगितले होते कीं काश्मीरमधील आतंकवादाचा जन्म पाकिस्तानातच झाला होता. Kashmiri militancy fathered in Pakistan: Musharraf, (http://www.zeenews.com/news607311.html) हा दुवा उघडल्यास ही बातमी व त्यावर माझ्यासह अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील.
मुशर्रफ यांचा नाटकीपणा चाललाच होता. लंडनच्या मेट्रो व बसेसवर झालेल्या बाँबहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांबद्दल त्यांना केवढा कळवळा! 'मृदुहृदयी मुशर्रफ'नी आढ्यतेखोरपणे टोनी ब्लेअरना त्यांना दुःख झाल्याचा शोकसंदेश पाठविला, पण मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये मृत्यू पावलेल्यांबद्दल त्यांना माया नव्हती. गंमत अशी कीं दोन्ही हल्ले आतंकवादाच्या पाकिस्तानी कारखान्यात प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनेच घडवून आणले होते!
आता या तळ नसलेल्या खड्ड्यात (Bottomless pit) अमेरिका आणखी २०० कोटी डॉलर्स ओतणार आहे. त्या आधी येत्या पाच वर्षांत ओतायला मंजूरी मिळालेले ७५० कोटी डॉलर्स आहेतच. हे सारे डॉलर्स ओरपत असताना अमेरिकेने नाकारलेल्या मुलकी परमाणू तंत्रज्ञानाच्या करारासाठी पाकिस्तानची चीनबरोबरची शय्यासोबतही चालूच आहे!
‘डेर स्पीगेल’च्या मुलाखतीदरम्यान पत्रकारांनी त्यांना पाकिस्तानी अणूबाँबच्या पिताश्रीनी “इराण आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रांबद्दलचे तंत्रज्ञान विकण्याच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यात व त्यामागच्या व्यवस्थापनात पाकिस्तानी लष्कर पूर्णपणे गुंतले होते” या आरोपांबद्दल छेडले असता दोन वेळा दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांकडून ‘नीशान-ई-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च मुलकी किताब मिळविलेले खानसाहेब खोटे आरोप करत असून ते एक चारित्र्यहीन गृहस्थ आहेत असे मुशर्रफ संतापात सांगून मोकळे झाले. आता चारित्र्यहीन कोण याचा निर्णय वाचकांनीच करावा. सत्य परिस्थिती अशी होती स्वतःची चामडी बचावण्यासाठी मुशर्रफनी खानसाहेबांचा ‘बकरा’ बनविला!
मुशर्रफ यांच्या मते रशियाविरुसद्धच्या लढाईत पाकिस्तानी जनतेवर जणू विषप्रयोगच झाला.
_______________________________________________________________
सध्या मुशर्रफ आपल्या स्वतःच्या राजकारणातील पुनर्प्रवेशासाठी अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. ओबामांनी लोकसभेतील आपल्या भाषणात भारताच्या अफगाणिस्तानातील रस्तेबांधणी, विद्युतीकरण आणि त्यांच्या नव्या प्रतिनिधीगृहाच्या इमारतीची निर्मिती अशा मुलकी प्रकल्पातील १३० कोटी डॉलरच्या भरघोस सहकार्याबद्दल नुकतेच आभार मानले ते झोंबल्यामुळे असेल कदाचित्, पण भारत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानबद्दल शत्रुत्वाची भावना जागृत करीत आहे नवे तारे त्यांनी न्यूयॉर्कच्या Council on Foreign Relations येथील त्यांच्या भाषणात तोडले. बलुचिस्तानातील विभक्तवाद्यांच्या संदर्भात असेल पण त्यांनी काबूल येथील "पाकिस्तानी अतिरेकी" ही संघटनेचे कार्यकर्ते भारताच्या गुप्तहेरांना भेटल्याचा आरोप केला व त्या प्रसंगाची छायाचित्रेही पाहिल्याचे सांगितले. भारताचे कंदाहार-जलालाबादचे उपदूतावास (Consulate) पाकिस्तानविरुद्ध कारस्थाने करण्यासाठीच आहेत असा आरोप करत त्यांनी विचारले कीं हे उपदूतावास दक्षिणेलाच कां आहेत, उत्तरेला कां नाहींत असाही प्रश्न त्यांनी केला! पण महाशय हे विसरले कीं भारताचे उपदूतावास मझार-ए-शरीफ (उझबेकिस्तान-ताजिकिस्तानच्या बाजूला) व हेरत (इराणच्या बाजूला) उत्तरेकडील भागातही आहेत हे ते ‘विसरले’!! ते कदाचित् हेही विसरले कीं काबूल येथील आपल्या दूतावासावर गेल्या वर्षी तालीबान्यांनी अतिरेकी हल्लाही केला होता!
तालीबान आणि अल कायदाचे नेत्यांना (कदाचित् ओसामासुद्धा) अमेरिकेच्या लष्करापासून पळत असतांना त्यांना पाकिस्तानातील सरक्षित जागी आश्रय दिल्याबद्दल दोष दिल्याचे आरोप त्यांना झोंबले असावेत.
मुशर्रफनी जी कबूली दिली त्यात नवे कांहींच नाहीं. पण आता त्यांच्याच तोंडून असा कबूलीजबाब आल्यावर अमेरिकेचा आणि सार्या जगाचा पाकिस्तानकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे कीं नाहीं? त्या चारित्र्यहीन देशाला आर्थिक आणि लष्करी मलिदा चारणे चालूच रहाणार आहे कां? पाकिस्तानातील पूरग्रस्तांच्या व्यथा आणि हाल पहावत नाहींत, पण अशा आणीबाणीच्यावेळीही एरवी उदार असलेली पाश्चात्य राष्ट्रे उदासीन आहेत त्या मागचे कारण हेच आहे कीं त्यांच्यासाठी दिलेला पैसा त्यांच्यापर्यंत पोचणारच नाहीं व बराचसा पैसा नेत्यांच्या खिशात किंवा भारताविरुद्ध (आता तर अमेरिकेविरुद्ध व पाश्चात्य राष्ट्रांविरुद्धही) वापरण्यासाठी खरीदल्या जाणार्या शस्त्रास्त्रांतच खर्च होईल अशी शंका सगळ्यांनाच आहे.
अलीकडेच तीस लाख शस्त्रास्त्रे पकिस्तानच्या शस्त्रागारातून ’चोरी’ला गेल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रात वाचले. (http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp...) त्यात ग्रेनेड व AK-47 सारख्या स्वयंचलित बंदूकीही होत्या. हे सारे अतिरेक्यांना विकले तरी गेले असावे किंवा त्यांना उदारपणे दान दिले गेले असावे अशी शंका आहे. भारतातूनही स्फोटकांनी भरलेले १५०पेक्षा जास्त ट्रक नाहींसे झाल्याची बातमीही वाचनात आली. राजस्थानातून मध्यप्रदेशाकडे पूर्वेला चाललेले हे ट्रक दिशा बदलून पश्चिमेला तर नाहीं ना नेले गेले? या हरविलेल्या ट्रकचा अद्यापही कसलाही पत्ता लागल्याचे वृत्त वाचनात आलेले नाहीं!
हा लेख लिहून प्रकाशित करायचा विचार करत असतानाच बुश-४३ यांच्या "Decision Points" या पुस्तकात मुशर्रफ यांच्या आणखी कांहीं कोलांटीउड्यांबद्दल माहिती वाचायला मिळाली. त्यात कुठे तरी बुश यांना गंडविले गेल्याचे लक्षात आल्याचा उल्लेख आहे. तसेच ते पाकिस्तानात सैन्यही पाठवि णार होते असाही उल्लेख आहे. मी ते पुस्तक अद्याप घेतले नाहींय्! नंतर त्या पुस्तकावर एक वेगळाच लेख लिहिला पाहिजे असे वाटते.
अशा परिस्थितीत पाकिस्तानी अण्वस्त्रेंही त्यांच्या शस्त्रागारांतून चोरीला जाऊन चुकीच्या हातात पडली तर ती अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांवर आणि भारतावर डागली गेली तर एकच हाहाकार माजेल. अमेरिका स्वतःला अजून किती दिवस फसू देणार आहे?
प्रतिक्रिया
14 Nov 2010 - 4:54 pm | चिरोटा
अतिशय माहितीपूर्ण लेख.
हे असे सांगण्यामागे त्यांचा काय हेतु आहे? आणि हे सांगूनही ओबामा/अमेरिका आपले धोरण (उघडपणे) तरी बदलत नाहीत.
काळेसाहेब, पाकिस्तानपेक्षा अमेरिका मोठा शत्रु नाही वाटत का?
16 Nov 2010 - 7:38 am | सुधीर काळे
चीन आणि पाकिस्तान हेच आपले खरे शत्रू आहेत असे माझे मत आहे. पाकिस्तानची तर निर्मितीच आपल्या द्वेषापोटी झालेली आहे. अमेरिकेने आपल्याला मदत केली असती पण आपण त्यावेळी वेगळ्याच कळपात वावरत होतो.
गुन्हेगारीच्या विश्वात शिरणे सोपे पण तिथून बाहेर पडणे महाकठीण असे मानले जाते! अमेरिकेची परिस्थिती कदाचित् अशीच झाली असावी! पाकिस्तानबरोबर सोयीची (किंवा गरजेपोटीची) मैत्री तर केली पण गरज सरली तरी आता वैद्य हटत नाहींय्! म्हणून अमेरिकेला "शुगरडॅडी"च्या भूमिकेत पाकिस्तान या 'द्वाड' बाळावर 'पॉकेटमनी'चा वर्षाव अद्यापही करावाच लागतोय्. अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान ही एक "धरले तर चावते व सोडले तर पळते" या जातीची समस्या झाली आहे.
अमेरिका अगतिकपणे पाकिस्तानशी मैत्री चालू ठेवत आहे, पण हळू-हळू ती पाकिस्तानबरोबरचे अंतर वाढवून आपल्या जवळ येत आहे.
16 Nov 2010 - 9:46 am | श्रावण मोडक
भारतासाठी इशारा? ;)
16 Nov 2010 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण वेगळ्या कळपात वावरत होतो का आपल्याला वेगळ्या कळपात जावं लागलं?
16 Nov 2010 - 1:20 pm | सुधीर काळे
अदिती,
मला १०० टक्के आठवत नाहीं पण माझ्या आठवणीनुसार आपण स्वतंत्र झाल्यापासून अलिप्ततावादाचा पाठपुरावा करत होतो! नेहरू, नासर आणि मार्शल टीटो अशी ती त्रिमूर्ती होती! त्यात आपण लोकशाहीचा वसा घेतलेला! अमेरिकेला स्वत:च्या देशात लोकशाही प्रिय असली तरी इतरांच्या देशातील लोकशाहीचे तिला वावडेच होते. फ्रान्समधील लोकशाहीमुळे ज. द गोल यांच्याशी अमेरिकेचे फाटले. इटलीत कम्युनिस्ट निवडून आल्यावर नाटोतील सर्व रहस्ये त्यांना कशी सांगायची हाही त्यांना प्रश्न पडला होता असे TIME मध्ये वाचल्याचे स्मरते! पण 'डावे' मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तोवर अमेरिका निवळली होती.
पाकिस्तानमध्ये नाटो आणि सेंटो या संघटनांत पाकिस्तान सामिल झाला त्यावेळी अयूबखान अजून राज्यावर यायचे होते पण लगेच नंतर आले.
रशियाच्या कळपात आपण गेलो कारण रशिया काश्मीर प्रश्नावर व्हेटो वापरून आपल्य्याला
पाश्चात्यांच्या आणि पाकिस्तानच्या तिढ्यातून सोदवायचा.
या सर्व घटनांवरून आपणच कळप निवडला असावा असे वाटते, कारण अमेरिका आपल्याला तिच्या कळपात घ्यायला फारशी राजी नसावी. मी जरा वाचन करून सांगेन. सध्या लिहिले ते माझ्या आठवणीनुसार!
इतरांनीही यात भार घालावी!
16 Nov 2010 - 1:34 pm | नगरीनिरंजन
आपण रशियाच्या कळपात ओढलो गेलो कारण रशियाने व्हेटो वापरून आपल्याला पाकिस्तान आणि काश्मीर प्रश्नी मदत केली होती असे ऐकले आहे (तपशील उपलब्ध नाही) .
शिवाय आज अमेरिका भारताशी संबंध जोडायला उत्सुक असली तरी १९७१ च्या युद्धात बंग्लादेश स्वतंत्र झाल्यास तिथे असलेल्या गरीबीमुळे कम्युनिस्टांचा शिरकाव सहज होईल या भीतीने भारत ते युद्ध हारावा म्हणून अमेरिकेने आकाशपाताळ एक केले होते. अगदी चीनचे पाय धरून डिसेंबर १९७१ मध्ये चीनने भारतावर हल्ला करावा म्हणून उघडपणे चीनला आवाहन केले होते. चीनने ते नाकारले. :-)
निक्सनचे इंदिरा गांधींबद्दलचे उद्गार आपल्याला माहितीच आहेत.
16 Nov 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार
काळे काकांची हरकत नसल्यास ह्याविषयी अजुन विस्ताराने लिहाल काय ?
16 Nov 2010 - 2:19 pm | नगरीनिरंजन
विस्ताराने लिहायला हरकत नाही पण चीनने हल्ला करायचे नाकारले याचे कारण त्यांचे भारताबद्दलचे प्रेम हे नसून सोविएत युनियनचा दबाव हे आहे. भारत-पाकिस्तान युद्ध असले तरी पाकिस्तानच्या बाजूने अमेरिका आणि भारताच्या बाजूने सोविएत युनियन हेच अप्रत्यक्ष युद्ध होते. जरी चीन तेव्हा अमेरिकेचा मित्र असला तरी सोविएत युनियनचा प्रभाव आणि दबाव त्याना झुगारून चालण्यासारखे नव्हते. चीनने हल्ला केला असता तर सोविएत युनियन ही उतरले असते. अमेरिकन नौदल तर निघालेच होते. भयंकर पेटापेटी झाली असती म्हणूनच इंदिरा गांधी आणि त्यांच्या सेनापतींचे कौतुक की कोणी काही करायच्या आत युद्ध संपवून टाकले.
विशेष म्हणजे आज इराणच्या जीवावर उठलेल्या अमेरिकेने त्यावेळी इराणकडेही त्यांची लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्याची विनंती केली होती म्हणे.यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो हेच फक्त पुन्हा सिद्ध होते.
16 Nov 2010 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यु हो ननि :)
17 Nov 2010 - 11:28 am | सुधीर काळे
माझी अजीबात हरकत नाहीं. उलट स्वागतच आहे. कारण या विषयावर मला खूपच रस आहे व या वियवावर 'योग्य-अयोग्य' वाचनही केले आहे. पण तरीही याबाबत खूप कुतुहल आहेच!
खरं तर असे प्रतिसाद वाचल्यावर या विषयाचा कंटाळा न आलेलेही बरेच 'मिपा'कर आहेत याची जाणीव होते. ('व्यनि'मुळेही होतेच!)
16 Nov 2010 - 6:40 pm | प्रदीप
ह्याविषयी काही संदर्भ द्याल का?
16 Nov 2010 - 8:05 pm | नगरीनिरंजन
१० डिसेंबर १९७१ ला हेन्री किसिंजर आणि चायनीज डेलिगेशनच्या मीटींगचा वृत्तांत आणि अमेरिकेने तयार केलेल्या पॉसिबल कोर्स ऑफ अॅक्शन मध्ये चीन ला हल्ला करण्याचे आवाहन करणे या संबंधीची कागदपत्रे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह्ज मध्ये आहेत. त्याचा दुवा.
शिवाय यावर बरेच लेख लिहिले गेले आहेत.
http://www.infowars.com/articles/world/nixon_plotted_war_against_india_1971.htm
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/4633263.stm
17 Nov 2010 - 11:22 am | सुधीर काळे
धन्यवाद, नगरीनिरंजन-जी.
निक्सन-रेगन यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत पाकप्रेम आणि भारतद्वेष अगदी पराकोटीला पोचला होता. अयूब खानांच्या वेळेपासून पाक-अमेरिका प्रेम जोरात होतेच. मध्यंतरी कार्टर यांच्या काळात जरा बदल होईल असे वाटत होते पण ते राष्ट्रपती या नात्याने अगदीच निष्प्रभ ठरले.
बांगलादेश युद्धात निक्सन यांनी अमेरिकेच्या सातव्या आरमाराला बंगालच्या उपसागरात जायचा हुकूम दिला होता. पण 'न्यूक्लियर डिसेप्शन'मध्ये जरा वेगळी माहिती आहे ती म्हणजे भारताने चीनच्या अण्वस्त्रांच्या शस्त्रागारावर प्रक्षेपणांचा उपयोग करून हल्ला करण्याची धमकी दिल्याने चीन 'गुमान' बसला! खरे-खोटे माहीत नाहीं.
ही माहिती लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी कुठून मिळविली ते त्यांच्या 'संदर्भ-सूची'त (References) पाहून तुम्हाला लिहीन. (सध्या ते पुस्तक एका मित्राने वाचायला नेले आहे.)
तुम्ही दिलेले इतर दुवे वाचून वाटले तर नंतर प्रतिक्रिया देईन.
16 Nov 2010 - 6:44 pm | प्रदीप
म्हणतो. अमेरिका आपल्या जवळ येत असेल तर ती आपल्या दृष्टिने काळजी करण्याची बाब आहे.
17 Nov 2010 - 4:19 pm | सुधीर काळे
मोडकसाहेब, एक म्हण आहे कीं कांहींच्या बरोबर न दोस्ती करावी न दुष्मनी! परराष्ट्रीय धोरणात आपल्या देशाला जे चांगले ते करावे. पण आपले राजकारणी इतके भ्रष्ट आहेत कीं वैयक्तिक स्वार्थासाठी आईला विकायला मागे-पुढे पहाणार नाहींत. त्यामुळे कधी यशाच्या जबड्यातून पराभवाला खेचून काढतील (Pulling defeat from the jaws of success) हे सांगता येत नाहीं.
पण माझे वैयक्तिक मत असे आहे कीं अमेरिकेबरोबर दोस्ती करण्यात-खास करून चीनकडून यणारे संकट पहाता-आपला नक्कीच फायदा आहे. पण डोळे उघडे हवेत. आज अमरिकेलाही आपली गरज आहे व आपल्यालाही वेळ आल्यास चीनशी टक्कर देऊ शकेल असा शक्तिवान मित्र हवाच!
चीनशी मैत्री आज तरी अशक्य वाटते.
17 Nov 2010 - 8:06 pm | प्रदीप
दोघांशीही नको. त्या दोघांनाही दूर ठेऊन आपण आपला कार्यभाग साधत राहिले पाहिजे. सध्या इंडोनेशिया हे फारच चांगल्या तर्हेने करीत आहे.
बाकी भारतीय राजकारण्यांवरील आपली टिपण्णी पटते. त्यापुढे जाऊन मी म्हणतो की आपले राजकारणी एकवेळ परवडले (कारण काहीही म्हटले तरी त्यांना अकांउटेबलिटी आहे), पण आपल्या नोकरशहांनी आपले जे नुकसान आतापर्यंत केले आहे व ह्यापुढेही ते करत रहातील, त्याचे काय? त्यांना कसलीही अकाउंटेबलिटी नाही, कसलाही धरबंध नाही.
17 Nov 2010 - 8:46 pm | सुधीर काळे
अगदी सहमत. आपली नोकरशाही हा एक वेगळा आणि लिहिण्याजोगा विषय आहे.
14 Nov 2010 - 6:13 pm | सहज
मुशर्रफ सैनिक कमी, राजकीय नेता जास्त वाटतात. भारतात असते तर मोठ्ठे राष्ट्रीय नेते असते.
अमेरिकेची पाकला मदत ही नक्की किती मदत व किती पुढच्या विमान, शस्त्रे विक्रीतुन परत येणारी रक्कम आहे त्याचा हिशेब कुठेतरी मिळला पाहीजे बॉ.
16 Nov 2010 - 7:37 am | सुनील
अमेरिकेची पाकला मदत ही नक्की किती मदत व किती पुढच्या विमान, शस्त्रे विक्रीतुन परत येणारी रक्कम आहे त्याचा हिशेब कुठेतरी मिळला पाहीजे बॉ.
एक १०१% भांडवलशाही देश दानधर्मापोटी लाखो डॉलर खर्ची घालतोय हे पट्त नाही बॉ!
काका, बाकी तुमचे चालू द्या ... आम्हाला कंटाळा आलाय आता!
16 Nov 2010 - 8:56 am | सुधीर काळे
Doing what one like is freedom.
16 Nov 2010 - 10:48 am | llपुण्याचे पेशवेll
+१ लिहीत रहा.
प्रतिक्रिया आल्या नाहीत तरी वाचणारे लोक आहेत.
16 Nov 2010 - 12:04 pm | सुधीर काळे
कल्पना आहे, कारण 'व्यनि'वर बरेच प्रतिसाद येत असतात. नाहीं तरी आम्ही आता 'गॉन' केस आहोत ना?
16 Nov 2010 - 12:29 pm | अवलिया
छे छे "गॉन" वगैरे काही नाही.
एखाद्या विषयाचा असा पाठपुरावा करण्याची अनेकांना सवय नसते त्यामुळे तुमच्याबद्दल वेगवेगळी मते तयार होतात. तुम्ही तुमचे कार्य जोमाने चालु ठेवा. :)
मध्यंतरी वेगळे विषय हाताळले होते तसे रुचीपालट म्हणुन करुन बघा !
16 Nov 2010 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
पुप्याशी सहमत.
माहितीपुर्ण लेखन असेच चालु ठेवावे.
15 Nov 2010 - 11:42 pm | शाहरुख
लेख वाचला..
बाकी प्रतिसाद देण्याइतकी माझी समज नाही :-)
16 Nov 2010 - 6:54 am | गांधीवादी
वाचले, गंभीर आहे सारे. पुढच्या पिढीस काळ सुखावह नाही.
आजची पिढी 'लोकल' मधून बॉम्ब फुटेल ह्या भीतीने वावरते, तर उद्याची पिढी 'शहरावरच' बॉम्ब पडेल ह्या भीतीने वावरणार. अवघड आहे.
16 Nov 2010 - 6:02 pm | कापूसकोन्ड्या
चला क्रमशः चालू तेच तेच ते तेच ते आता या विषयाचा कंटाळा आला. आता बास की !!
16 Nov 2010 - 1:53 pm | यशोधरा
मला वाटते, असे नसावे. अमेरिकेला व तेथील थिंक टॅंकला निश्चित माहीत असावे, पण ते स्वतःचे हित पाहणार, त्यामुळे जर पाकिस्तानच्या कारवाया व दुतोंडीपणा त्यांच्या पथ्यावर पडत असेल तर ते दुर्ल़क्ष करत असावेत. रशियन राजवट आणि आक्रमण ह्याला तोंड देण्यासाठी बिन लादेनचे पिल्लू ह्यांनीच सोडले होते की एके काळी, आता तोच ह्यांच्या डोक्यावर मिरे वाटत आहे, हे अलाहिदा. तसेच पाकिस्तानला अमेरिका वापरत आहे, आणि थोडाफार स्वतःचा वापर करवून ( पाकिस्ताने नेत्यांकडून) घेत आहे.
वाचत आहे लेख...
17 Nov 2010 - 1:07 pm | सुधीर काळे
"कळते आहे पण वळत नाहीं" असे मला तरी वाटते.
न्यूक्लियर डिसेप्शनमध्ये "गाभा" या प्रकरणात "पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ’अल-कायदा’ या संघटनेला नष्ट करण्याचे, त्यांच्या नेत्यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्याचे व अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील दुर्गम व अवघड भागातील लपण्याच्या जागा उखडून टाकण्याचे टाकण्याचे वचन अमेरिकेला दिले होते. बुश-४३च्या सरकारने एक संभाव्य मित्रराष्ट्र असल्याचा फायदा एका बाजूला तर अण्वस्त्रांच्या निर्मितीच्या कार्यक्रमापासून उद्भवणारा धोका दुसर्या बाजूला अशा तर्हेने पाकिस्तानच्या (व मुशर्रफच्या) उपयुक्ततेचे मूल्यमापन केले. असेच मूल्यमापन कार्टर व रेगन यांनीही केले होते. पाकिस्तानच्या विरुद्ध एका बाजूने अतिरेक्यांना लपवून ठेवून अमेरिकेपासून वाचवणारे व दुसर्या बाजूला याच अतिरेक्यांना अण्वस्त्रनिर्मितीची माहिती गुप्तपणे देणारे असे दुटप्पी धोरण राबविणारे राष्ट्र असल्याचा भरपूर पुरावा असूनही अमेरिकेने याबाबत कांहींच केले नाहीं. कारण अमेरिकेच्या विमानांना मुक्त संचार देऊन, अतिरेक्यांबद्दलच्या गुप्त बातम्या अमेरिकेला पुरवून व जिथे पाश्चात्य सैन्य जाऊही शकणार नाहीं अशा दुर्गम डोंगराळ विभागात स्वत:चे सैन्य पाठवून मुशर्रफ (व पाकिस्तान) अमेरिकेच्या सुरक्षानीतीतील एक अव्वल मोहराच बनला होता. " असा कुत्सिततापूर्ण उल्लेख आलेला आहे.
पण परिणाम आज जो दिसत आहे तो हा कीं पाकिस्तान आजही अल-कायदा/तालीबानच्या संदर्भात अमेरिकेशी "तळ्यात कीं मळ्यात" खेळतोय् आणि दरम्यान 'अल-कायदा'चे नेते पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना ताब्यात घेऊन ती अमेरिकेवरच डागायची तयारी करताहेत! (अल्-कायदा या संघटनेचे ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचे तिसर्या क्रमांकाचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले होते कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढे पहाणार नाहींत (http://www.misalpav.com/node/8315).
कांहीं महिन्यांपूर्वी मुस्ताफा अबुल-याझीद द्रोणाचार्यांच्या शरसंधानात (Drone missile attack) मृत्युमुखी पडले.)
पहिली चूक कुणीही करतो, पण तीच चूक १९८० ते २०१० अशी तब्बल तीस वर्षे दरम्यान Ground realities आता बदलेल्या असल्या तरी करावी?
17 Nov 2010 - 1:19 pm | सहज
>पहिली चूक कुणीही करतो, पण तीच चूक १९८० ते २०१० अशी तब्बल तीस वर्षे दरम्यान Ground realities आता बदलेल्या असल्या तरी करावी?
म्हणजे अमेरिकेने नक्की काय करायचे?
17 Nov 2010 - 3:18 pm | नितिन थत्ते
सोप्पं आहे....
काही निर्णय घेण्यापूर्वी जकार्ताला conference Call करायचा.
17 Nov 2010 - 3:53 pm | सुधीर काळे
सोप्पं आहे! पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अमेरिकेने लत्ताप्रहार करणे! यासाठी जकार्ताला फोन करून पैसे खर्चायची गरज नाहीं.
17 Nov 2010 - 7:51 pm | सहज
>सोप्पं आहे! पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अमेरिकेने लत्ताप्रहार करणे!
लत्ताप्रहार म्हणजे? सिनेमा, कथा, कादंबर्यात समजु शकतो पण अशी 'सोपी कृती' अमेरिका सरकारने कशी करावी?
17 Nov 2010 - 8:59 pm | सुधीर काळे
खरं तर अमेरिका इमानदारी विकत घेण्यासाठी पाकिस्तानात पैसे ओतत आहे आणि पाकिस्तान ओरपत गद्दारी करीत आहे इकडे अमेरिकेनेच पाहिले पाहिजे. आणि अशा 'अवलक्षणी बाळा'ला पॉकेटमनी देणे बंद केले पाहिजे. आणखी काय? अमेरिकेचे पैसे थांबले कीं पाकिस्तान आधीच दिवाळखोरीला आलाय तो रस्त्यावर येईल.
आपल्याला एरवी त्याच्याशी काहींच देणे-घेणे नाहीं, पण हे ओतलेले पैसे तो आपल्याविरुद्ध वापरतो म्हणून अमेरिकेने ते दान बंद करायचा आग्रह आपल्या सरकारने देशहितासाठी धरला पाहिजे.
'मिपा' कुणी संत्री-मंत्री वाचत असतील असे नाहीं, पण लोकमत असेच संघटित होत असते, व्हायलाही पाहिजे!
18 Nov 2010 - 6:11 am | सहज
अफगणीस्तान मधले काम संपल्यावर अमेरिका निघून गेली होती तेव्हा तिथे काय झाले? आज अमेरिकेला तिथे अफगाणमधे, इराकमधे कायमस्वरुपी वास्तव्य करुन रहायला लागत आहे. खर्च केवढा होतो आहे? पैसे, मनुष्यबळ? परत लोकशाही आहे अमेरिकेत बुशच्या युद्धाला कंटाळून जनतेने निवडणूकीत धडा शिकवला रिपब्लीकन पक्षाला. उद्या आख्खा पाकीस्तान रस्त्यावर आला व तालीबान तत्वाच्या हातात गेल्यावर पुन्हा युद्ध, त्यात अण्वस्त्रांचा धोका. भारताच्या सुरक्षेला धोका. हॅलीबर्टन व तत्सम कंपन्यांची महीन्याची बिले, अमेरिकन सैनिक अनेक वर्षे पाकीस्तानमधे रहाणे इ खर्च ही पाकीस्तानमधे सध्या ओताव्या लागणार्या पैशापेक्षा कमी नाहीत का?
जाउ द्या ना अमेरिकेचे २०० बिलीयन भारताच्या दृष्टीने अमेरिका पाकीस्तानमधे गुंतलेली असणे बरे आहे.
आज पाकीस्तानशी मैत्रीपूर्ण संबध नसते तर ओसामा व गॅंग पाकीस्तानभर असती. वर तुम्ही उल्लेख केलेला नं ३ अधिकारी द्रोणचा शिकार झाला असता का?
अमेरिकेने लत्ताप्रहार करावा असे म्हणणे अतिशय सोप्पं आहे पण त्याला खरचं काही अर्थ आहे का?
18 Nov 2010 - 10:31 am | सुधीर काळे
तुम्ही म्हणताय् तीही एक बाजू आहेच, पण पैसे संपल्यावर पाकिस्तान किती गमजा करू शकेल?
गेल्या वेळी त्याने अण्वस्त्रांचा बाजार मांडला आणि अमेरिकेने "आपलेच दात, आपलेच ओठ" या कारणाने गुपचिळी साधली होती! पण आता असे होणार नाहीं.
आणखी एक मुद्दा असा कीं अमेरिका पैसे देवो अथवा न देवो, तालीबानचे राज्य तिथे आज ना उद्या येणारच! झियांनी स्वार्थासाठी लावलेल्या या विषवृक्षाला तिथल्या जवळ-जवळ सगळ्याच लष्करशहांनी आणि कांहीं मुलकी सरकारांनी खतपाणीच घातले आहे. बेनझीरबाईंनी याच मुशर्रफना पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी संघटना उभारायला व त्यांच्या प्रशिक्षणाचे तळ चालवायला अनुमोदन दिले व नवाझ शरीफ हे तर ISI चे पुरस्कृत उमेदवार होते ही माहिती आपण माझ्या न्यूक्लियर डिसेप्शनमधून वाचलीच असेल. तसेच मुशर्रफ यांनी सत्ता बळकावल्यावर ज्या कांहीं Top level नेमणुका केल्या त्या सार्या 'अल कायदा'बद्दल सहानुभूती असणार्यांच्याच होत्या!
अमेरिकेचे मदतीपैकी मोठा वाटा आजही या संघटनांना सुदृढ करण्यात खर्च होत आहे. त्यामुळे आहे ती परिस्थिती चालू ठेवणे म्हणजे slow poisoning चा प्रकार नाहीं कां?
असो. इथे आता थांबतो.
21 Nov 2010 - 3:01 pm | सहज
अमेरीकेलाच हा घोळ निस्तरायला लावणे महत्वाचे आहे. तुम्ही अमेरिकेला दूर व्हायला कशाला सांगत आहात.
21 Nov 2010 - 3:06 pm | सुधीर काळे
छे, छे! मी उलट अमेरिकेला पाकिस्तानच्या पृष्ठभागावर अगदी जवळून जोरदार लत्ताप्रहार करायला सांगतोय्.
17 Nov 2010 - 4:01 pm | सुधीर काळे
प्रकाटाआ (Duplicated)
16 Nov 2010 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार
ओबामा का ओसामा?
संपादनासाठी प्रतिसाद पाचर मारलेले नाही.
16 Nov 2010 - 1:50 pm | अवलिया
तसेही ओबामा हे पण पिल्लूच आहे वेगळ्या हेतुसाठी वेगळ्या लोकांनी सोडलेले...
विठ्ठल ! विठ्ठल !!
16 Nov 2010 - 1:55 pm | यशोधरा
पटेश.
16 Nov 2010 - 1:54 pm | यशोधरा
पाचर न मारल्याबद्दल धन्यवाद. लिहिण्याच्या नादात टंकले. चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे.
17 Nov 2010 - 4:36 am | आंसमा शख्स
हा माणूस खरा नाहीच! याला वेळीच ठेचले पाहिजे.
17 Nov 2010 - 10:54 pm | chipatakhdumdum
प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी जे उपदव्याप करतो, त्यात त्याला फायदा झाला आणि आपल्याला तोटा झाला, तर त्याला शिव्या किंवा दोष का द्यायचा ? मी माझ्या कुटंबाच्या उदरनिर्वाहा करता जो व्यवसाय करतो, त्यात दोन पक्ष असतात आणि मला एका पक्षाची बाजू घ्यावी लागते. अनुभव असा आहे की, जेंव्हा आमची बाजू जिंकते तेंव्हा विरुध्द पक्ष माझी **** काढतो आणि आम्ही हरतो तेंव्हा माझा माणूस माझ्या counterpart ची **** काढतो. आम्हाला तोंडावर कोणी दोष देत नाही. पाठीमागे आमची ****मोजतात ते माझ्या व्यवसायातल्या सगळ्याना माहीत असत. Musharraf is not an indian, he is pakee, then he is bound to do everything against india and if he suceceedes , then whats's game in blaming him here on Misalpav. अगदी खर सांगा, कसाब आणि त्याचे साथी ज्याकरता आले होते त्यात ते यशस्वी झाले की नाही ? ( फक्त एकच गोष्ट सोडून , ती म्हणजे हाताला भगवा दोरा गुंडाळून त्याना ही हिंदूनी केलेली कृती आहे, अस दाखवायच होत). समजा कसाब सुध्दा मेला असता, तर आणखी किती साध्वी सडल्या असत्या?
पाकीस्तानी द्रुष्टीकोनातून कसाब बरोबर आहे आणि माझ्या द्रुष्टीकोनातून तो क्रूरकर्मा आहे. हलकट आहे, ***** आहे, माझ्या घरातली माणस त्या ####### ने मारली आहेत. पण जेंव्हा तो मादरचोद पाकीस्तानी आहे ही गोष्ट मी विचारात घेतो तेंव्हां मी त्याच कौतुकच केल पाहीजे. का असे चार पाच कसाब हा देश निर्माण करू शकत नाही ?
Human Management & planning of human resourses बध्दल आपण सगळे बोलतो, दाउद इब्राहीम पेक्षा भारी कोण तुम्हाला माहीत आहे का?
मिसळपाववर आपण ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रीया देतो, त्याच एकच वर्णन...
Intelectual masturbation.
18 Nov 2010 - 10:13 am | सुधीर काळे
पूर्णपणे सहमत! अशा लबाड मुशर्रफना त्यांच्या बेगमसह २१ तोफांची सलामी देत आग्रा परिषदेला बोलावून वाजपेयींनी त्यांना भाव कां दिला हे मला कधीच समजले नाहीं. त्यांच्याकडे जर वाजपेयींनी दुर्लक्ष केले असते तर तो इतका 'मोठा' झालाच नसता असे मला फार वाटते. तसे पहाता पाकिस्तानी हुकुमशहांना दैवाची साथ नेहमीच लाभली आहे. झियांना रशियन स्वारीने हात दिला तर मुशर्रफना ९/११ ने आणि वाजपेयींनी.
हे लबाड मुशर्रफ काश्मीरमधल्या अतिरेक्यांना 'स्वातंत्र्यवीर' म्हणतात व त्यांची गाडी बाँबने उडवू पहाणार्यांना अतिरेकी! काश्मीरमध्ये आपल्या पोलीसांच्या गोळ्यांना बळी पडतात ते निरपराधी, निष्पाप लोक पण त्यांचे सैन्य (आणि अमेरिकेचे द्रोणाचार्य) मारते ते फक्त अतिरेकी! पण यात कांहीं नवीन आणि आश्चर्य करण्यासारखे नाहीं. वासुदेव बळवंतांसारख्या आपल्या आद्य क्रांतिवीरांना 'काळ्या पाण्या'वर आणि लोकमान्यांनाही गुन्हेगार म्हणून 'मंडाले'ला पाठवलेच ब्रिटिशांनी!
एक गोष्ट लक्षात येते ती ही कीं काश्मीरबाबत सर्व पाकिस्तानी जितके एकसंधपणे बोलतात तितके आपण भारतीय बोलत नाहीं.
का असे चार पाच कसाब हा देश निर्माण करू शकत नाही? अगदी खरे आहे! मला आशा आहे कीं असे 'कसाब' आपणही निर्माण करत असूच!
बाकी 'मिसळपाव'वरील या व अशा चर्चांच्या आणि या प्रतिसादांच्या तुम्ही केलेल्या 'वर्णना'चे समर्थन करण्याइतके धैर्य माझ्यात दुर्दैवाने नाहीं! पण अशा तर्हेच्या चर्चा उपयुक्त आहेत याबाबत मात्र माझे मत पक्के अनुकूल आहे.
7 Dec 2010 - 7:36 am | निनाद मुक्काम प...
क्या बात हे लेख मस्तच झालाय .
पण त्यांचे गुरु हमीद गुल हे खरे तर भारताचे खरे दुश्मन आहेत .
मूष सत्तेसाठी तडजोडी करतील तरवेळप्रसंगी त्यांच्या धोरणापासून यु टर्न सुद्धा घेतील .पण हा ७५ वर्षाचा थेरडा अजूनही जोमाने तालिबान ला सहकार्य व भारतविरोधी कारवाया काश्मिर व अफगाण मध्ये करत आहे .
7 Dec 2010 - 10:00 am | चिंतामणी
वेगळे सांगायलाच नको.
बाकी मोठी प्रतिक्रीया लिहीण्याएव्हढी माझी योग्यता नाही.
7 Dec 2010 - 10:00 am | चिंतामणी
वेगळे सांगायलाच नको.
बाकी मोठी प्रतिक्रीया लिहीण्याएव्हढी माझी योग्यता नाही.
7 Dec 2010 - 10:05 am | टारझन
कोणी जात्यावरची गाणी देण्यास मदत करेल काय ? काय पण च्यायला एकेक चर्चा चालु असतात अलिकडे :) घेतला किबोर्ड की बडव .. घेतला किबोर्ड की बडव :) जणु काही भारताचे परराष्ट्र आणि अंतरराष्ट्रीय धोरण मिपावरील चर्चांवरुन ठरते :) बोळा निघण्याच्या हार्दिक शुभेच्छा :) यातुन काही एंटरटेनमेंट पण होत नाही हो आता :(
-(वैतागग्रस्त) दळण दळे