स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य!
देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स! मग अशा विकतच्या खुर्चीवरचे नेते साधा सरळ पारदर्शी व्यवहार करतील? मुळीच नाही. कोणत्याही क्षुल्लक कामाला रेटून पैसा मागितला जातो. नेत्याच्या कारकिर्दीची पहिली दोन वर्षे झालेला खर्च वसूल करण्यात जातात, त्यानंतरची दोन वर्षे आगामी खर्चाची तजवीज करण्यात जातात आणि राहिलेले एक वर्ष मंजूर निधीतून लोकोपयोगी (दिखाऊ) कामे अर्धवट ठेवण्यात जाते. पुन्हा नव्या दमाने मते मागायला, पैसे वाटायला हा मोकळा. एकंदर काय तर ज्यांच्याकडे पोत्यांनी पैसा साठलेला आहे त्यांनीच निवडणूक लढवावी. आपल्या सारख्या गोरगरिबांचं ते काम नव्हे...
त्याची तरी काय चूक आहे म्हणा. त्याला पक्षाच्या उमेद्वारीचे तिकीटही 'पेटी' सरकावूनच मिळवावे लागते. त्यानंतरही मतांच्या राजकारणासाठी लाखोँची रास पालथी घालावी लागते. तेव्हाच खुर्ची आवाक्यात येते. म्हणूनच त्याला त्या पाच वर्षाँत पाहिजे तसे यथेच्छ वागायला मिळते. अशाप्रकारे लोकशाहीच्या रक्षकांनीच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावलाय...
डोनेशन भरल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. लाचेचे पुडके फेकल्याशिवाय नोकरी लागत नाही. एकूणच सगळीकडे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनलाय.
स्वतंत्र भारताचा नागरिक खरोखर स्वतंत्र आहे? पक्षाचा कितीही सच्चा कार्यकर्ता असला तरी हायकमांडच्या परवानगी शिवाय किँवा पक्षश्रेष्ठीच्या चमच्यांची मर्जी सांभाळल्याशिवाय कोणतेच काम होत नसते. लाचखोरीची ही कीड सर्वच क्षेत्रात फोफावलीय. स्वतंत्र भारताची हीच एक मोठी शोकांतिका आहे.
समाजजीवन तरी कोठे स्वतंत्रपणे जगता येतेय? गल्लीतल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी
सहन करून ते म्हणतील ती वर्गणी द्यावी लागतेच ना? गावगुंडांच्या तावडीतून प्रत्येकजण एकदा तरी गेला आहेच ना? बॉसची बॉसगिरी कर्मचाऱ्यांना सोसावी लागतेच ना? कोणीतरी मुक्त आहे का? हरेकाला कशा ना कशाचा जाच असतोच. जाताजाता हळूच जात जाणून घेतली जातेच ना? मतांच्या राजकारणात जातीचा पाश नरडीभोवती आवळला जातोच ना? आणि यातील एकाही कस्टडीची हवा खाल्ली नसली तरी घरातले साखळदंड कोणाला चुकलेत? कोणती स्त्री पुरुषाच्या कचाट्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेतांना दिसते? किँवा कोणता नवरा बायकोची नजरकैद भेदून स्वच्छंदपणे शीळ घालतोय? कोणीच नाही! म्हणजे प्रत्येकजण पारतंत्र्यात आहे...
आणि तरीसुद्धा पंधरा ऑगस्टची ऑफिशीयल सुट्टी मौजमजेत जावी यासाठी चौकातल्या तिरंग्याला सलाम ठोकून तुम्ही आम्ही स्वतंत्र असलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडून घेतो-
'स्वातंत्र्यदिनाचा विजय असो.'
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 5:44 am | इंटरनेटस्नेही
सुंदर! शब्दा-शब्दाशी सहमत!
15 Aug 2010 - 5:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखातल्या आशयाशी सहमत असलो तरी म्हणतो-
स्वातंत्र्यदिनाचा विजय असो.....!
-दिलीप बिरुटे
15 Aug 2010 - 6:28 pm | गांधीवादी
असले हजार लेख वाचायचे, काही क्षण विचार करायचा, आणि थंड बसून राहायचे.
कोणीही काहीही करणार नाही. हि काळ्या दगडावरची रेघ.
(करणार तरी कसे म्हणा, करायचे तर काय करायचे आणि कोण विरुद्ध करायचे ?
हा प्रश्न कोण भेदणार ? कोणच नाही.
त्यांच्या विरुद्ध कोणी तोंड जरी उघडले तरी तो देशद्रोह ठरतो. आणि गुपचूप कुठेतरी त्याचा कट काढला जातो.)
प्रत्येकाला शिवाजी हवाय, पण दुसर्याच्या घरात.
स्वताच्या घरात मात्र सुख समृद्धी, शांती, लक्ष्मी नांदावी असंच प्रत्येकाला वाटत.
आपली आहुती द्यायला कोण पुढे येत नाही.
जिजाऊ होऊन आपल्या मुलाला ह्या लढ्यात अर्पण करायला एक सुद्धा माता आज अस्तित्वात नाही.
सगळ्या माता आपल्या मुलाला डॉक्टर , इंजिनियर वा बक्कळ पैसा कमाविणारे मशीन बनवायचा विचार करतात.
महान इतिहास असलेल्या देशाला गेली ६० वर्षे जी कीड लागली आहे ती इतकी वाढली आहे कि सगळी खोड , फांद्या, मुळे अक्षरशः सडून गेलेली आहेत.
कोणताही एक माणूस, एक रात्रीत काहीही करू शकणार नाही.
आणि कोणी काही करायचे जरी विचार केला तरी त्याला साथ कोण देणार ?
इथे जालावरचा अनुभव असा आहे कि जिथे कुठे थोडेतरी क्रांतीचा विचार मांडला कि इतका भयानक विरोध होतो कि मनामध्ये आपण जसे काही कोणी देशद्रोही आहोत असे वाटायला लागते.
खरतर जीव सुद्धा द्यायला तयार आहेत बरेचसे ह्या देशासाठी, पण दिशा कोणालाच माहित नाही.
पांढरपेशी लोकं हि असली लेख लिहून लिहून फक्त आपली प्रतिष्ट सांभाळतात.
कोणी खरच काही करायला गेला कि त्याला नावे ठेवायला हेच लोकं पुढे असतात.
शब्दांचा इतका कीस काढतात कि समोरच्याला हैराण करून टाकतात.
(कधी कधी असं वाटत, कि भगतसिंग जरी ह्यांच्या पुढे आला असता तर त्याने सुद्धा क्रांतीच विचार सोडून दिला असता.)
भारताचे एकूण तीन प्रकारची लोक राहतात.
एक त्या माजलेल्या राजकार्ण्यानाचा.
दुसरा, कितीही काहीही झाले तरी त्यांचाच पुळका येणारा आणि देश हा कितीहि सडला तरी त्यातून सुगंधी वास येत आहे असे छाती ठोक पण सांगणारा.
तिसरा प्रसंगी काहीतरी कुठतरी प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणून तडफडणारा, आणि जीव गमावून बसणारा. हि लोकं गट क्र. दोन कडून शिव्या खातात आणि गट क्र. एक कडून मारले जातात.
बाकी लेख चांगला आहे.
पण असले शेकडो लेख वाचले आहेत,
हजारो उपलब्ध आहेत.
गेली २५ वर्षे तरी हेच ऐकत आहे.
पण पुढे काय ?
15 Aug 2010 - 6:20 pm | शानबा५१२
ताई,माई ,अक्का.विचार करा पक्का.
स्वतंत्रदीनावर मारा शिक्का!
15 Aug 2010 - 11:11 pm | अर्धवटराव
लेख पूर्णपणे नकारत्मक गोष्टींनी भरलेला आहे... पण हेच वास्तव आहे.
एकेका वाक्याशि सहमत !! हे सर्व ठीक होइल अशी आशा आहे... पण कसे हे माहित नाहि :(
(हिंदुस्तानी) अर्धवटराव
16 Aug 2010 - 12:00 am | शानबा५१२
तुम्हाला डोनेशन न भरता प्रवेश मिळत असतो,but you want english school,right?
हे प्रत्येकाच्या समजण्यावर आहे.आज मुंबईत रात्री बारा वाजता घरी यायला महीलेलाही भीती नाही वाटणार असे वातावरण आहे.
असे होते पण ही नेहमीची गोष्ट नाही.उगाच हीशोब कशाला मागत बसायचं!!
हो आहे ना.............पुरुषमुक्ती झाली म्हणुन फटाके वाजवणारे!
जवळजवळ सर्वच! (आणि शब्दशा: बघितल तरी कचाक्यातुन सुटल्यानंतर स्त्री मुक्त श्वास घेणारच)
जवळजवळ सर्वच!!........(अहो पण तुमच म्हणने काय की नव-याने 'स्वातंत्र' मिळाल की शिट्या मारत फीरायचं?)
ना ईथे चौक आहे ना तिरंगा कुठल्या शहरात बघितलाय का?
आपण कुठे राहता हो?
I bet ईतर कोणी काय तुम्ही स्व:ताही त्यादीवशी अस ओरडला नाहीत!
(खरच वेळ जात नाहीये माझा......)