बरेच दिवस काहीच लिखाण झाले नाही. असे झाले कि कसेसेच वाटते. आपण लेखक नाही ह्याची जाणीव मला आहे. पण अधून मधून विचार प्रकट करत राहावे असे वाटते. आपले विचार हि आपल्या जिवंतपणाची खूण आहे असे वाटत राहते. तर झाले असे आहे कि आज सकाळी सकाळी बरे वाटेनासे झाले. येथे सध्या वेग वेगळ्या व्हायरस मंडळींनी बस्तान बसवले असल्याने कधी कोणता व्हायरस ना सांगता भेटीला येईल ह्याचा नेम नाही. त्यातलाच एक व्हायरस माझ्याकडे माहेरपणाला आला आहे असे वाटते. माहेरवाशीण जशी जास्त काळ राहू शकत नाही तसाच हा पण लवकरच जाईल बहुदा.
सकाळी सकाळी उठून थोड्यावेळातच परत मुरगाळून पडलो. अकरा च्या सुमारास बाहेरून घुर्र्र्र घुररर असा लागला. रस्त्यावरची पाने उडवून गोळा करणारे सफाई कामगार आले होतो ते त्यांचा ब्लोअर चालवत होते. थोडा वेळ गेल्यावर तो माणूस थांबला पहिले . कोणी नसल्याची चाहूल घेऊन छान पैकी उन्हात पथारी पसरली. खिशातून एका बाटली काढली. रम्य सकाळीचा आनंद घेत काय असेल ते पेय पान केले. आणि मग जमा केलेल्या पानाचे गाठोडे उपडे ठेऊन, त्यावरच आलिशान पलंग असल्याच्या थाटात पडी टाकली.
तास दोन तास झोपला असावा. थोड्या वेळाने परत आवाज आला तेव्हां मी अजून झोप का येतनाही ह्या चिंतेत होतो. विश्रान्ती घेणे गरजेचे होते कारण उद्या बरे वाटले पाहिजे . हा विचार मनात होता. हे राव बहाद्दर मात्र मस्त ताणून झोपले आणि आता कामाला लागले पण होते. उगाचच ती भोरकरांची कविता आठवली.
पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसावणारी
पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी .
उठून गादी ऐवजी जमिनीवर गोधडी (म्हणजे quilt ) टाकून शांत पणे झोपलो. उद्याचा दिवस नक्की चांगला जाईल असे वाटते.
बाकी ती बाटली आणि पेय ह्या गोष्टी पण साधाव्यात का कसे हा विचार अजून चालू आहे...
प्रतिक्रिया
15 Feb 2018 - 1:14 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलंय !
मोजकं आणि आटोपशीर लेखन !
शेवटी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा एकमेकाना हेवा वाटतो हेच खरे.
भोरकर की बोरकर ? बा. भ. ?
बाकी शेवटची ओळ भारीय. हा विचार पुढं गेला तर चक्क मिपाकट्टाच बोलवा ना ! म्हंजे वि४ जोरकस व्यक्त करता येतील.
|| पुलेशु ||
19 Feb 2018 - 10:22 pm | जव्हेरगंज
कडक!!
:)