शाळा- मंतरलेले दिवस
स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार
शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं. दहावीचा शेवटचा पेपर दिल्यावर मला अचानक भरून आलं शाळा संपली या जाणीवेनेच मी बैचैन झालो व ४ तास रानात वडाच्या झाडाखाली बसून गेल्या ५ वर्षात डोकावून पाहिलं.
एप्रिल महिना कडाक्याचा उन्हाळा चालूय, सर्वत्र भकास वातावरण, उन्हाच्या झळांनी दुपार अगदी न्हाऊन निघालीय, शाळू व खपली गव्हा ची शेते उरलेल्या पालापाचोळ्यासह निपचित पडून आहेत, दूर कुठेतरी कडबा भरून जाणाऱ्या बैलगाडीच्या चाकाचा लयबद्ध आवाज कानी पडतोय, बाजूलाच गव्हाचं भुस्काट चघळत २ म्हशी संथपणे रवंथ करण्यात मग्न आहेत. सावलीला जमलेल्या पाखरांची हलकीशी किलबिल सुरु असतेय मी मात्र स्वतःतच मग्न. !!आता आपले मित्र दुरावणार, सर्वजण वेगवेगळीकडे जाणार या विवंचनेत हायस्कुल ला प्रवेश घेतल्यापासून च्या एक एक घटना डोळ्यासमोरून सरकू लागल्या,, डोळे घट्ट मिटून मनाला अगदी खोलवर घेऊन जात आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागलो -
____________________ -पाचवी ते सातवी - __________________
दिनांक १६ जून १९९९ इ पाचवी मध्ये गावापासून ३किमी दूर पंचक्रोशीत एकमेव असणाऱ्या श्री मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथे प्रवेश घेतला,गावापासून दूर माळरानावर २०-२५ एकरात पसरलेली ती भव्यदिव्य शाळा पाहून जॅम हरकून गेलो. २ भलीमोठी लाल मातीची मैदाने, सभोवताली निलगिरी व पिंपर्णीच्या झाडांची गर्दी व मधोमध १४ खोल्यांची कौलारू टुमदार इमारत.
करांडेवाडीतून ४ मुले व ७ मुली पाचवीत प्रवेशती झाली, सर्व अनोळखी मुले आपापले गट करून , त्यामुळे न्यूनगंडात भरच. पण हळू हळू वातावरण निवळलं नवे मित्र झाले, विषयांत गोडी लागली, पाहता पाहता सत्र संपले द्वितीय सत्र सुरु झालं प्रगतिपुस्तकावर मार्कांच्या राशी पडू लागल्या त्यामुळे एकूणच मी त्या वातावरणात मिसळून गेलो, त्यातच सहलीच पत्रक आले. जाऊन हि आलो. द्वितीय सत्र हि उत्तम मार्कानी पास झालो पुढच्या वर्गात नव्या गमतीजमती सुरुपुन्हा तो पावसाळा, ते सायकल वरून रपेटी मारलेल्या, चिखलात ब्रेक दाबून सायकल फरफडत नेत केलेले स्टंट, तो सुरपाट्यांचा डाव, शाळेच्या कित्येक हेक्टर वर पसरलेल्या मैदानात पावसात खेळलेले फुटबॉल अशी मनात आठवणींची रेलचेल सुरु झाली.
एव्हाना वेगवेगळे विषय व त्यांचे सर यांची समीकरणे मनात पक्की होत गेली. मराठीसाठी मराठीची बोलीभाषेपासून वाङमयपर्यंत भाषेची उत्तम जाण असणाऱ्या सौं. घाडगे मॅडम, विज्ञान म्हंटलं हलक्या फुलक्या भाषेत सजीव उदाहरणासह पण शेजारचे ४ वर्ग शिकून निघतील अशा खड्या आवाजात शिकवणाऱ्या सौ शिंदे मॅडम. हिंदीला अभंग सर, इंग्रजीला हेरवाडे सर हे जरा जास्तच कडक व्यक्तिमत्व, शाश्त्र च्या विषयात मात्र बऱ्याच सरानी प्रयत्न करूनही विषयाला योग्य हाताळतील असे शिक्षक नव्हते मिळाले ती कसर मात्र नवखेच पोरसवदा असलेले कदम NV यांनी भरून काढली,इतिहास भूगोल शिकविण्याची त्यांची पद्धत खूपच रंजक-परिणामी इतिहासातील मगध साम्राज्याचा उदय, मौर्य, सातवाहन, बिदूंसार, कनिष्क, कलिंग ची लढाई इ. प्रकरणे कायमची कोरली गेली. त्याचबरोबर भूगोलात कांगो नदीचे खोरे, टुंड्रा प्रदेश, नाईल चे खोरे इ शब्द त्यांच्याच आवाजात अजूनही कानात गुंजतत्.
तत्कालीन आमच्या दृष्ट्या मुख्याध्यापकांच्या दूरदृष्टीने शाळेत आलेल्या संगणकासाठी तसे पूर्णवेळ तद्न शिक्षक न लाभल्याने व नाविन्याची गोडी आधीपासूनचीच असलयाने स्वतःच विविध पुस्तके आणून अभ्यास परिणामी मी, धनंजय, जयवंत आमचं वजन आपसूकच वाढल व पुढे तद्न शिक्षक आल्यानंतर आम्ही बऱ्या पैकी टेकसवी झालो ते कायमचेच. विविध कारामतीत हेही वर्ष गेले आणि हो सहल !! पुणे देहू आळंदी भन्नाट झालेली हि पण अविस्मरणीय सहल !
________________________________________________________
सर्व कसे मजेत होते पण एक गोष्ट जरा विदारकच! तत्कालीन सामाजिक परिस्थीचा परिणाम म्हणा हवं तर पण शाळेत मुला -मुलींच्यात कमालीचं भेदभावाच वातावरण होतं. वर्गात मुलींशी बोलणे म्हणजे मोठा गुन्हाच तो . त्यातच वर च्या वर्गातील पोरांनी आधीच घाबरवून सोडलेलं मुलींशी बोलायचं नाही सरानी पाहिलं तर बेदम मार मिळतो इ. सरांनीही कधी या आमच्या गैरसमजला दूर नाही केलं उलटपक्षी तो दृढ कसा होईल अशीच काहीशी धोरणं असायची अर्थात त्यामागे त्यांची कदाचित मुलींच्या सामाजिक सुरक्षेची भावनाही असेल पण मार्ग मात्र चुकीचा होता. आमच्या सारखा निरागस, खट्याळ पोरांवर दाखवेल अविश्वास वाटतो तो मला. परिणामी मुलांच्या दोन ओळी व मुलींच्या २ ओळी यामद्धे प्रचंड खुनशी वातावरणाने जागा घेतली. जिथं खेळी मेळीच वातावरण असावं तिथंच विरोधीपणाची भावना वाढीस लागलेली. एक एक प्रसंग आठवतोय मला तुम्ही चकित व्हाल- एकदा एक मित्र धावत धावत एक बातमी घेऊन आला, क्षणाचाही विलंब न करता आम्ही बातमीची खातरजमा करायला १० अ या वर्गाकडे धावलो. बातमी अशी होती कि १० वि तील एक आमच्या गावातील विद्यार्थी वर्गातील एका मुलीशी वर्गात खुलेआम गप्पा मारतोय! कदाचित मुलं कळती झाल्यामुळे वा एखाद्या सरांच्या विषयप्रगल्भतेमूळे थोडंसं तिकडील वातावरण निवळलं असेलहि पण आमच्या साठी मात्र तो प्रसंग दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंगातील एक होता. अक्षरशः काहीतरी बेकायदेशीर कृत्य शाळेत चालू आहे या अविर्भावात अचंबित होऊन आम्ही त्या घटनेचे साक्षीदार झालो . असो अशी विषमता होती त्यावेळी पण मी मात्र माझ्या वयक्तिक पातळीवर हि विषमता दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवलेलं. त्याच्याच एक भाग म्ह्णून मी इ. ७ वि पर्यंत वार्षिक एक प्रयत्न असे ३ प्रपोज पाठवलेले पण या प्रयत्नांना सपाटून अपयश आले. (नंतरच्या काळात संबंधित व्यक्तीना बालपणीच्या नाकारघंटेचा पश्चाताप झालंही असेल म्हणा ;) ) मुलींचा किल्लेकोट अगदीच भक्कम असल्याने मला ती तटबंदी भेदता आली नाही आणि दरी आणखी वाढत गेली.
असो याच वर्षात गणिताला तिवले सर नवीन रुजू झालेले सडपातळ बांधा, सदैव उत्साही मनुष्य, हासरा चेहरा, आपल्या वेगळ्या शैलीत अगदी सोप्पे करून शिकवणारी गणिताची पद्धत यामुळे अचानक माझा गणिताचा ग्राफ उंचावला. दरम्यानच्या काळात जाधव AD सर चित्रकलेला आले, माझ्या काही चित्रांचा आखिवरेखीवपणा पाहून जरा प्रोत्साहन देताच लहान गटात मला प्रथम पारितोषिक मिळाले ते सालाबादप्रमाणे इ.९वी पर्यन्त सोडले नाही (१० वित असले चांगले उद्योग करणे बंद केलेले मी )आणि मला सूर गवसला.
याच काळात गांगुली च्या संघाने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पडसाद आमच्याही भागात उमटले परिणामी आम्ही सदैव कुठेतरी माळावर बॅट बॉल घेऊन दिसू लागलं. तेव्हा जर IPL असते ना तर आमचा MSB अर्थात Mukundraj Super Blasters नावाचा एखादा तरी संघ आमचा असताच :D
_______________________-आठवी ते नववी- __________________
हेही वर्ष संपले मोठे होऊ लागलो.
२००४ चा उत्तरार्ध दुष्काळ घेऊनच आला. किरकोळ परीक्षा शुल्क भरतानेही पालकांची चाललेली घालमेल अनुभवली, १०/२० रुपये सुद्धा संकट वाटू लागलेले... नोकरदारांना पगार फिक्स असतोच त्यांचं जगणं सुसह्य होते मात्र शेतकऱ्यांचे हाल पाहवत नव्हते. अचानक समज आली.पैशाची किंमत कळली. जबाबदारी अंगावर आली. सर्वत्र रान कोरडे पडलेलं, पाऊसकाळ कमी, गुरांसाठी शाळेच्या माळावर चारा छावणी लागल्या. दुपारच्या सुट्टीत गुरांसाठी शासनाकडून येणारा ऊस खाणे हा आमचा टायम पास! टँकर आला की रंगलेला क्रिकेट चा डाव सोडून जमेल तितका ४ दिवस पुरेल एवढे पाणीसाठा करून घेण्यासाठी धावाधाव करायला लागायची.
८वी साठी दुष्काळ हीच एक आठवण
इ. ९वी teenagers मधील एका महत्वाच्या टप्प्यावर होतो अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती, विविध उपक्रमात सहभाग चालूच होता (अप्रत्यक्षरीत्या पोरींना प्रभावित करण्याची कोणतीच संधी सोडली जायची नाही ;) )
सेप्टेंबर महिना आला कि वेध लागायचे ते विविध स्पर्धांचे निमित्त कर्मवीर जयंती रयत च्या सर्व संस्थामधील मानाचा उत्सव. यावर्षी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन काही मुली खूपच हवेत गेल्या होत्या साहजिकच त्यांना खाली आणण्याची जबाबदारी उरावर घेऊन रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. गालिचा, मोर, ठिपक्यांची कासवं-बिसवं याना फाटा देत कृष्णाला प्रेम पत्र लिहणारी राधिका चितारली व रांगोळीचे रंग भरले. चित्रकलेच्या राज्यस्तरीय स्पर्धा केलेल्या असल्याने बारकाव्याचा भारी अभ्यास! सोबत अचूक रंगसंगती, शृगांरिक भाव व घट्ट असे मापकच कपडे यामुळे खूपच आकर्षक रांगोळी झाली होती. नंबर पक्काच !पण आमच्या परीक्षकांना या रांगोळीतील किंवा चित्रातील आखीव रेखीवपणा, गोलाई (curves ) हे माझे वय लक्षात घेता रुचला नाही व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चालायचे !
यावर्षीची सहल जरा खास च ठरली कारणेही तशीच, महत्वाचे म्हणजे आम्ही जाणते(???) झालेलो. मुक्कामी सहल, खट्याळ बुद्धी. आणि अतिमहत्वाचं म्हणजे स्वतःचा कॅमेरा घेऊन त्या काळी सहलीला जाणारा पहिला विद्यार्थी.नशीबवान होतो सहलीसाठी कपडे खरेदीला गेलो असता एके ठिकाणी सेल होता विविध सरप्राईझ गिफ्ट होते माझं लक्ष कॅमेरावर होत आणि 'मेरी सून ली ' कॅमेरा लागला रोल वाला.(आत्ताच्या हवा करणाऱ्या पोरांना कोण सांगणार कि मोबाइलपण नव्हते तेव्हा योगेश आलेकरी कॅमेरा वापरत होता ) (मनोमन म्हटलं या या कॅमेराच्या भांडवलावर ३-४ तरी लायनी क्लिअर होणार ;) )पुढे त्या कॅमेराने मोठं रामायण रचलंच.
सहलीवरून आल्यावर एक रोल बाकी होता कोडॅक चा होता वाया नव्हता घालवयचा म्हणून मग आम्ही NCC च्या ड्रेस वर आमच्या ग्रुप चे फोटो काढायचे संमत झाले. एव्हाना माझ्या प्रयत्नांना थोडंफार यश येऊन दरी कमी झालेलीच त्यामुळे काही मुलींनी पण फोटोसेशन साठी विचारणा केली आणि आम्हीही निर्णयाचं स्वागत करत सामील करून घेतलं (आम्हालाही तेच हवं होत म्हणा ).
झालं तारीख ठरली २६जानेवारी २००५ प्रजासत्ताक दिन आटोपून आम्ही, आम्ही संगोपन केलेल्या पेरूच्या बागेत आमचं छायाचित्रण चालू असतानाच जाधव सर व भोसले सर यांनी धाड टाकली आणि एकेकाला चोप दिला अचानक झालेल्या हमल्याने गांगरून गेलो. कर्णधार या नात्याने मलाच पाहिलं धरला आणि तुडवून काढलं आणि माझ्यातील एका उभारी घेणाऱ्या फोटोग्राफेरला अक्षरशः तुडवून मारला रे !
नंतर स्टाफ रूम मध्ये उलगडा झाला कि का मारला एवढं, कारण कि, मुलींचे फोटो काढणे गुन्हा आहे.फोटो एडीट करून काहीही करता येऊ शकत असे बेबुनियाद आरोप लावले गेले पण आमच्या मुख्याध्यापकांच्या सहिष्णू वृत्त्तीमुळे त्यांनी आमची बाजू घेतल्याने दिलासा मिळाला.... !!!
वर्ष संपलं पुन्हा तेच दुपारचे पेपर, विहिरीवर येथेच्छ डुंबणे, कैऱ्या, पेरू, काकड्या चोरणे आणि क्रिकेट.
__________________ -दहावी -___________________
आता अभ्यासाच ओझं वाढलं बघता बघता दहावीत आलो, समज वाढली सकाळी ८ वाजता अभ्यासिकेला शाळेत सर्वजण जमू लागलो. गप्पांच्या फडात अभ्यास पेक्षा लैगिक विषय जास्त या चर्चा होऊ लागल्या. हाच काय तो आमचा माहितीचा स्रोत.
काळ शारीरिक संक्रमणाचा होता. भिन्नलिंगबद्दल आकर्षण, मानसिक शारीरिक बदल जाणवू लागलेले एका बाजूला अभ्यास तर एका बाजूला हे मानसिक हलकल्लोळ सांभाळणे कठीण जात होते. प्रश्न होते उत्तर मिळत नसत. स्वतःची सतसतविवेकबुद्धी वापरून बऱ्याच प्रश्नाची उकल हि व्हायची पण खात्रीशीर उत्तर नसायचे. भावना नुसत्याच चाळवल्या जायच्या. आजच्या सारखं गूगल नव्हते त्यावेळी कि लगेच हातात सर्व. संगत चांगली राहिल्याने तसल्या फिल्म हि खूप च उशिरा पाहण्याचा योग्य आला. 'जेवढे दूर तेवढी उत्कंठा जास्त' या नैसर्गिक नियमानुसार या साऱ्याच गोष्टींची उत्कंठा जास्त होती, होणारच कारण आमच्याकडे मुलींशी बोलणेही वर्ज्य होते. अशा फावल्या वेळात गाप्पान्चे फड रंगायच पोरं स्वतःच जोड्या लावायचे 'हि' माझी 'ती' ह्याची वगैरे वगैरे. कधी एखादा मनोराजा उगीचच एखादी सोबतच्या घालवलेल्या वेळेच्या सुरस कथा सांगायचा. आम्हीही आपले कान देऊन ऐकायचो कधीतरी एखाद्याची सत्य घटना असली तरी बाकी ९९% थापाच असायच्या त्याही आम्ही मजा घेत ऐकायचो... मग प्रत्येकाला वाटायचं आपली पण एक मस्त लव्हस्टोरी असावी यातून मग एकेक काल्पनिक कथा स्वताची म्हणून घोळक्यात मारली जायची, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर कथेचा दर्जा ठरला जायचा काहींची कथा फारच सुमार असायची सुरवात होता क्षणीच आम्ही त्याला वेड्यात काढायचो. पण काहींनी मात्र जान ओतलेले असायची आह्ह काय ती कल्पना .... काय ते वर्णन ... काय ते टाईमिंग जुळलेलं ..देखावाच डोळ्यासमोर उभा राहायचा ... !
तिकडे मात्र ती स्वप्नसुंदरी धुनी-भांडी केरकचरा काढण्यात एवढी गर्क असायची कि आपण कुणाचे आणि आपला कोण राजकुमार? व आपल्यासोबतच्या शृगांरिक कथांच्या रंगलेल्या महफिलीचा तिला तिळमात्र गंध नसायचा.अभ्यासाच्या सोबतीला हा सिल्याबस बाहेरचा अभ्यासहि आला होता. खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा लैंगिक शिक्षण द्यायला बाहेरचे शिक्षक आले व ज्यादाचे तास घेतले गेले. मुला-मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवून दहावीच्या वर्गाला लैगिक शिक्षण देण्याचा घाट घातलेला आणि त्याची गरज हि होतीच. समोर मानवी शरीर त्याची रचना, गुप्तांग, त्यामधील बदल, समस्या, काळजी वगैरे समोर दाखवले जात होत पण आम्हला चिंता कशाची ? हेच तिकडे मुलींच्या रूम मध्ये पण दाखवला गेले असेल तर मुलींची काय रिअक्शन असेल ? पुढे वाढलेलं राहिलं बाजूला आम्ही या विवंचनेत कि तिकडे अमकी अमकी फारच निरागस आणि लहान तिच्या बाल मनावर काय विपरीत परिणाम होईल हि चित्रे पाहून, तिची काय अवस्था होईल हे पाहून या नुसत्या विचारानेच आमच्या काळजात चर्रर्र व्हायचं !का न व्हावं ? काळजीच तेवढी होती.
"मुलांना आपण जेवढे लहान समजतो किंवा ठेवतो तेवढी ती लहान नसतात"
दहावी 'ब' २००६ बॅच (मागिल रांगेत उजव्या बाजूला डावीकडे खाली पाहणारा मी आहे )
आम्ही कितीही विनोदात ते घेतले असले तरी माहिती खूप मिळाली होती खुप उत्तरे मिळाली होती बदल झाला होता नंतर कंडोम कसे असतात कसे वापरतात याची प्रात्यक्षिके दिली, सेक्स म्हणजे काय प्रेम, सेक्स, आकर्षण यातील फरक हळू हळू स्पष्ट झाला. एव्हाना बरेच कळते झालेलो एक बाजूने दहावीचा अभ्यास होताच यावर परिणाम नाही पण काहींच्या अभ्यासावर मात्र खुप परिणाम दिसून आला. एका अवलियाने त्या बाहेरच्या शिक्षकांचे कंडोम चे बॉक्स पळवले मग नंतर ४ दिवस फुल्ल टाईमपास नुसता प्रात्यक्षिके घेण्यातच ! त्यात एक बकरा सापडला एकाने गुपचूप कंडोम लावून पहिला व कौतुकाने आम्हाला सांगितलं म्हटलं याची गम्मत करावी - त्याला बोललो 'चूक केलीस मोठी असं नसतं करायच. लग्नाआधी कन्डोम लावलास तर नंतर हे हे त्रास होतात "हे' होणार नाही "ते" होणार नाही . घाबरला तो . त्याला बोलो उपाय एकाच गोमुत्राने धुवून पवित्र करून घे मी ऐकलंय कुठंतरी खरं असतंय. बिचारा २ तास रानोमाळ हिंडून गाई शोधून पवित्र होऊन आला. असो अशा गंमती होत राहायच्या. लिहण्यासारखं खूप आहे. ;) पण लेखन सीमा.
दहावी 'अ' २००६ बॅच
असो. रात्र अभ्यासिका झाली.सराव झाली. मुख्य परीक्षा आली, हिंगणगाव जे कि ५किमी दूर होत तिकडे परीक्षा केंद्र. मुलींनी टमटम ठरवलेली प्रवासाला तर आम्ही सायकल फ्रीफेर केली. येडे फाट्यावर वडापावच्या गाड्यावर झालेली गर्दी पाहून फुकट वडापाव खाऊन गुपचूप पळ काढताना भारी मजा यायची .. !
पेपर काहींना अवघड तर काहींना सोपे गेले. माझी बेरीज ७१% वर जात होती तेव्हाच जाणवले या सर्व वातावरणाचा नकळत आपल्याला फटका बसलाय. दुर्दैवाने फक्त ६८% मिळाले जे खूपच कमी होते.
निकालानंतर ज्याचे काका, मामा, दादा बाहेर होते त्यांनी पोरांना बाहेर नेले शिकायला, काही कडेगाव, काही कराड, आहि विट्याला रवाना झाले. पोरीचं हक्काच भरती विदयापीठ कडेगाव होतंच.. ! मी दूरवर चांदोली अभयारण्यायतील एका निवासी कॉलेज मध्ये भविष्य शोधायला जाणार होतो.
त्या चार तासात असा सर्व पट डोळ्यासमोरून सरकून गेला. बालपण सोडून मी आता एका जबाबदार जगात प्रवेश करता झालो.. आणि आयुष्यातील एक सुवर्णकाळ मनाच्या कुपीत बंद झाला तो फक्त आयुष्याच्या एखाद्या वळणावर आठवणी उगाळून चेहऱ्यावर हास्य उमटवायला.. !
आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा एक सुंदर अभंग ...
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।
- संत तुकाराम
_____________________________________________________________________
प्रतिक्रिया
12 May 2017 - 4:55 pm | चिनार
छान लिहिलाय !!
12 May 2017 - 10:49 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद
12 May 2017 - 5:34 pm | टवाळ कार्टा
भारी लिव्लय
12 May 2017 - 10:50 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद
12 May 2017 - 5:58 pm | हेमंत८२
"मुलांना आपण जेवढे लहान समजतो किंवा ठेवतो तेवढी ती लहान नसतात">>>>> मागिल रांगेत उजव्या बाजूला डावीकडे खाली पाहणारा मी आहे>>>>> पण ते कुठे बघत होतात हे लिहले नाही...
12 May 2017 - 10:51 pm | योगेश आलेकरी
हाहाहा ते सांगितलं तर वादळ पुन्हा उठेल :D :D
12 May 2017 - 6:40 pm | उपेक्षित
मस्त लिहिले आहे
12 May 2017 - 10:51 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद
12 May 2017 - 7:01 pm | Ranapratap
सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील हा भाग. दुष्काळाचे दाहक चटके सोसलेला. कॉलेज मद्ये या भागातील मुलं असायची. आता मात्र टेम्भू योजनेचे पाणी आले आहे, शंगाव जवळ साखर कारखानेही उभा राहिला आहे. रयत संस्था माझा विक पॉईंट. माझे हि शिक्षण रयत मध्ये झाले आहे. तुमचा लेख आवडला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
12 May 2017 - 11:02 pm | योगेश आलेकरी
हो सीमे मुळे उपेक्षित राहिलेला पण आता चित्र बदललंय..
रयत चे वातावरण छान असतं. सहिष्णू, जडण घडण योग्य होते.
12 May 2017 - 7:32 pm | सिरुसेरि
छान आठवणी .
--पेपर काहींना अवघड तर काहींना सोपे गेले. माझी बेरीज ७१% वर जात होती तेव्हाच जाणवले या सर्व वातावरणाचा नकळत आपल्याला फटका बसलाय. --
पण या वातावरणात तुम्हीही सामिल होता ना ?
12 May 2017 - 11:03 pm | योगेश आलेकरी
माझा समज की मी अभ्यासपन करतोय या सर्वासोबत...
नंतर कळलं ना कमी पडला अभ्यास टीवल्या बवल्या जास्त च झाल्या ..
12 May 2017 - 7:59 pm | मोदक
मी दूरवर चांदोली अभयारण्यायतील एका निवासी कॉलेज मध्ये भविष्य शोधायला जाणार होतो.
"हुतात्मा नानकसिंग विद्यालय, हुतात्मानगर, सोनवडे" इथेच का..?
12 May 2017 - 11:07 pm | योगेश आलेकरी
अगदी बरोबर...
कमी गुणांमुळे YC ला न मिळाल्याने कुठून तरी माहिती ऐकून होते घरचे.. कराड पेक्षा छान म्हणून तिकडे धाडलं ;) :D
13 May 2017 - 12:19 am | मोदक
प्राचार्य काळे सर, केमिस्ट्रीचे शेख सर, सायन्सला एक मॅडम होत्या आणि बहुदा जगताप सर असा शिक्षक वृंद होता का?
किती साली होता वरच्या शाळेत?
13 May 2017 - 2:19 am | योगेश आलेकरी
शेख सर होते केमिस्ट्री ला आवडते सर माझे.. bio ला साळुंखे मॅडम जगताप सर बहुदा आर्ट ला होते..
वर्ष जून २००६ ते एप्रिल २००७
आपण ...?
12 May 2017 - 8:22 pm | एस
मनमोकळेपणाने लिहिले आहे.
12 May 2017 - 11:08 pm | योगेश आलेकरी
हो :)
12 May 2017 - 8:26 pm | खेडूत
क्या बात है योगेश..
अन रयतच्या शाळा म्हणजे काय बोलायचं?
बीस साल पेहले की बात है! तिथेच कडेगांवच्या रयतच्या शाळेत अस्मादिक शिकले.. आठवणी डोंगराईच्या टेकडीइतक्या मोठ्ठ्या आहेत! त्याबद्दल पुन्हा कधी..!
नकळत जुन्या काळाशी तुलना होतेच, पण वीस वर्षांत एकूण परिस्थितीत झालेला बदल जाणवला..मजा आली.
१९४८ मधे कर्मवीरांनी गांधीजींच्या नावाने १०० शाळा काढायचा संकल्प केला होता त्यातली १९४९ ची आमची शाळा. गांधीजींचं नाव नाही म्हणजे त्याकाळी तुमची शाळा बहुधा सुरू झाली नसावी, (भारतीचा विस्तार झाला नव्हता) त्यामुळे परिसरातली मुले कडेगांवला सायकल चालवत येत. अन्य कांही दूरच्या ठिकाणची मुले परीक्षा केंद्र असल्याने फक्त परीक्षेलाच येत.
12 May 2017 - 11:14 pm | योगेश आलेकरी
प्रथमतः आभार..
भागातील अस्मादिक आहेत कळल्याने आनंद झाला :)
अस्मादिकांनी डोंगराई टेकडी रीती करून आणखी भूतकाळ दाखवावा ही विंनती..
आमची शाळा १९५९ ची त्यामुळे गांधीजी ऐवजी ग्रामदैवतचे नाव दिले गेले असावे..
भारती त्यामानाने खूप च अलिकडली ..
आम्ही एलिमेंटरी एंटरमिजीएट स्कॉलरशिप साठी MG विद्यालयात यायचो.(पण सायकल वर नव्हे)
13 May 2017 - 5:00 am | इडली डोसा
प्रामणिक लेखन आवडलं.
13 May 2017 - 7:42 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद
13 May 2017 - 1:07 pm | पद्मावति
+१. असेच म्हणते.
13 May 2017 - 7:42 pm | योगेश आलेकरी
:) :)
13 May 2017 - 1:51 pm | कंजूस
+1111111
13 May 2017 - 3:49 pm | पैसा
छान लिहिलंय.
13 May 2017 - 5:29 pm | माम्लेदारचा पन्खा
अजूनही बरेच लक्षात आहे तुमच्या . . . . . . आम्ही सगळं केव्हाच विसरलो . . . . . ठराविक गोष्टीच राहिल्या आठवणीत !
13 May 2017 - 7:41 pm | योगेश आलेकरी
देवाची करणी नारळात पाणी ;)
13 May 2017 - 7:41 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद