मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच.
आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.
आमच्या गावातील आमच्या वाडीत घरे १२. बारा घरांसाठी ५ विहीरी. या विहीरी पावसात हाताने पाणी काढता येइल एवढ्या भरलेल्या असतात. पण पावसाचे दीवस संपले की दीवाळी नंतर या विहीरी कोरड्या पडतात. त्यात आजकाल सर्वांनी घरात संडास बांधले आहेत. त्यामुळे मग टाक्या बांधल्या आहेत. एका घरात जेवढ्या चुली तेवढ्या टाक्या. गरज असो नसो सकाळ झाली की पंप लावुन टाक्या भरुन घ्यायच्या. त्यामुळे रात्रभर जे काही पाणी विहीरीमधे जमा झाले असेल त्याचा सकाळी उपसा होतो. यात सर्वात जास्त पाणी लागते ते संडाससाठी. गावात पाण्याचा स्त्रोत एकच - विहीरी. त्यामुळे सर्व कामांसाठी पीण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे गावात गेल्यावर पाण्यासाठी धावपळ करावी लागायची.
पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी विचारमंथन चालू झाले. बर्याच लोकांनी बरेच सल्ले दीले. वाडीतुन एक ओढा जातो. हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो. पण दीवाळीनंतर कोरडा ठणठणीत. गावातील पाच विहीरी याचा ओढ्याचा आजूबाजूला आहेत. योजना ठरली. या ओढ्यातील गाळ काढायचा पात्र खोल करायचे. थोड्या थोड्या अंतरावर चार ते पाच फुटाचे बांध घालायचे. हे काम श्रमदानाने करता येण्यासारखे होते. पण गावात लोक्स कमी. मग मे महीन्यात जे कोणी गावाला जाणार होते त्यांना ही योजना सांगीतली. योजना ऐकल्यावर एक दोघांनी नाके मुरडली तर काही जणांनी मिळून एक बांध घातला सुद्धा !! पावसाळ्यात पाणी जमा झाले. आजुबाजुच्या विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली. हे पाहून सर्वांना हुरुप आला. शेवटी आर्थिक परीस्थीती चांगली असणार्या एका काकांनी सरळ बुलडोझर मागवला व ओढ्यातील गाळ काढण्यास सुरवात केली. नुसता गाळ न काढता ओढ्याचे पात्र देखील चार फुटाने खोल केले.
नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते
प्रतिक्रिया
27 May 2016 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे
+१,०००,०००
दहा लाखाची बात ! तुम्ही आणि तुमच्या सहकारी गावकर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
जो दुसर्यावरी (यात सरकारही आले) विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
किंबहुना जर राजकारण्यांना असे वाटू लागले की जनतेला त्यांची गरजच नाही, तर त्यांच्या पाचावर धारण बसून ते जनतेच्या मागे मागे लागून "तुम्हाला काय हवे ते सांगा ?" अशी मनधरणी करू लागतील !
27 May 2016 - 12:23 am | रेवती
क्या बात है! मस्त मस्त.........
27 May 2016 - 12:45 am | खटपट्या
डॉक आणि रेवाक्का धन्यवाद.
27 May 2016 - 1:16 am | राघवेंद्र
एकदम मस्तच !!!
27 May 2016 - 1:48 am | रुपी
अरे वा! मस्तच!
27 May 2016 - 2:29 am | ओसु
आत्ता पर्यन्त बरयाच योजना वाचल्या पण हे तर पुराव्यानिशि शाबित करुन दाखविले. ज्यानि ह्यात भाग घेतला त्या सर्वान्चे अभिनंदन
27 May 2016 - 6:33 am | चाणक्य
भारी काम केलंय.
27 May 2016 - 6:38 am | प्रचेतस
स्पृहणीय आहे हे.
छान काम केलंत.
27 May 2016 - 6:57 am | प्रीत-मोहर
भारीच की
27 May 2016 - 7:00 am | मुक्त विहारि
पण फोटो दिसत नाहीत.
माझा गणेशा झाला.
27 May 2016 - 10:09 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
27 May 2016 - 7:33 am | चतुरंग
आपली पाणी समस्या ही बहुतांश पडणारे पाणी वाहून जाते यामुळे आलेली आहे. योग्य साठवणूक आणि जमिनीतले पाणी पुन्हा भरणे या दोनच गोष्टींनी सुटण्यासारखी आहे. तुम्ही प्रत्यक्ष प्रयोगाने पुरावाच दिलाय.
वाडीतले सगळेच खूष असतील! त्या डुंबणार्या मुलाचा चेहराच सगळं बोलतोय! :)
27 May 2016 - 8:08 am | शाम भागवत
मस्त.
अस काही वाचल की छान वाटते. हे वाचून आणखी काही लोकांना स्फूर्ती मिळो. काकांना शुभेच्छा. त्यांचे पर्यंत त्या जरूर पोहोचवा.
अवांतर
शेवटचा फोटो कुठल्या महिन्यातला आहे ?
27 May 2016 - 10:22 pm | खटपट्या
शेवटचा फोटो गेल्या पावसाळ्यातला आहे. या पावसाळ्यातील रीजल्टस अजून छान असतील.
27 May 2016 - 8:26 am | अत्रुप्त आत्मा
अरे व्वा व्वा व्वा! अनुकरणीय .
27 May 2016 - 8:32 am | नाखु
लवून मानाचा मुजरा
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे.
आनंदी मिपाकर नाखु
अवांतर मलाच छायाचित्रे का दिसेनात ती?
27 May 2016 - 10:23 pm | खटपट्या
चेपूला लॉगइन व्हा. फोटो दीसतील.
27 May 2016 - 8:44 am | स्वामी संकेतानंद
वाहवा! मस्त! शेवटचा फ़ोटो लै आवडला.. कुठल्या महिन्यात घेतला होता?
27 May 2016 - 10:23 pm | खटपट्या
शेवटचा फोटो गेल्या गणपतीतला आहे. अजुन फोटो येतील त्याप्रमाणे डकवतो..
27 May 2016 - 8:48 am | स्पा
एक नंबर काम, नावाप्रमाणेच खटपट्या आहात
27 May 2016 - 8:53 am | जयंत कुलकर्णी
शेवटचा फोटो म्हणजे कमाल आहे. गंगाच अवतरली जणू स्वर्गातून !....
27 May 2016 - 11:07 am | सस्नेह
शेवटच्या फोटोवरून सगळी मेहनत भरून पावली हे समजलं. स्तुत्य उद्योग !
27 May 2016 - 9:00 am | दिगोचि
लेखकाचे कोणावरहि अवलम्बुन न राहता स्वतःची पाण्याची समस्या स्वतःच कष्ट करून सोडवल्याबद्दल अभिनन्दन. प्रत्येक नागरीकाला वाटते की सरकारने त्यान्च्याच गरजाकडे प्रथम लक्ष द्यावे. परन्तु देशभरत अशा व याही पेक्षा गम्भीर समस्या आहेत. त्यामुळे स्वावलम्बन हा एक उत्तम उपाय आहे. हेच जर जेथे पाण्याची टन्चाई आहे त्या गावकर्यानी केले तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे हे लेखकाने सिद्ध केले आहे. ही त्यान्ची मोठी समाजसेवा आहे.
27 May 2016 - 9:10 am | नाईकांचा बहिर्जी
वा!!! फारच उत्तम कार्य केलेले ग्रामस्थांनी !! शेवटचा फोटो त्या मेहनतीचं चीज़ करणारा म्हणून बघितला गेला, कसले मस्त मस्ती करतायत ते छोटे
27 May 2016 - 9:22 am | एस
फारच छान खटपट्याजी. अभिनंदन!
27 May 2016 - 10:28 am | जगप्रवासी
खूप मस्त, शेवटचा फोटो तर एखाद्या रिसोर्ट मधील "लेझी रिवर" चा वाटावा इतका छान आहे.
चांगल काम केलात, आमच्या गावात बारमाही पाणी वाहणारा ओढा आहे पण गावकरी त्यावर बांध घालून अडवू देत नाहीत. कितीतरी वेळा बोललोय गावकऱ्यांशी, एकदा तर आम्ही मित्रांनी बांध घातला होता पण गावकऱ्यांनी तोडून टाकला म्हणतात देवाचं पाणी आहे त्याला अडवलं म्हणजे देवाला अडवल्या सारख आहे. बघू तुमच्या सारख आमच्या गावातल्यांना कधी कळणार ते, तोपर्यंत त्यांच्या मागे लागलेलोच आहे बांध घालण्यासाठी.
27 May 2016 - 10:39 am | चतुरंग
वाचून चित्रं बघूदेत प्रत्यक्ष घडलेले दिसले की कदाचित बदल होईल...:)
27 May 2016 - 10:36 am | इरसाल
खटपट केलीय हं ! छान आणी आवडले.
27 May 2016 - 10:49 am | वेल्लाभट
अतिशय क्रेडिबल काम आहे हे....
प्रचंड स्तुत्य ! ! ! ! ! ! !
जबरदस्त आहात तुम्ही खरंच. आणि याला योगदान देणारे सगळेच. इच्छाशक्तीचा विजय आहे हा.
7 Jun 2016 - 7:50 am | अजया
+१०००००
अभिनंदन आणि सलाम खटपट्याभाऊ.
27 May 2016 - 11:21 am | बापू नारू
भारी काम , अभिनंदन .
27 May 2016 - 11:26 am | अभिजित - १
भारत कधीच महासत्ता बनू शकणार नाही. इथले बहुसंख्य लोक ( ७० टक्के / ८० टक्के ?? ) हे हरामखोर आणि नालायक आहेत. त्यांना काहीही चांगले बघवत नाही. आता हा शेतकरी स्वताच्या खिशातून काहीतरी करू बघतोय तर त्याला सरकार ने कसा त्रास दिला ते बघा ..
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/...
मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी संजय तिडके यांची वाघजवी शिवारात ४० एकर शेती होती. या शेतातून नाला वाहत होता. त्यामुळे पाच एकराचे सतत नुकसान व्हायचे. २०१३मध्ये या नाल्यावर त्यांनी मातीचा बांध टाकला. नाला वळता केला. त्याचा फायदा झाला. पुढच्या वर्षी पावसाने मातीचा बंधारा वाहून गेला. अखेरीस गेल्या वर्षी त्यांनी या नाल्याचा कायमचा बंदोबस्त करायचा निर्णय घेतला. शिरपुरी बंधारा बांधण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. यासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. बंधारा झाल्यास दोनशे ते अडीचशे एकराला लाभ होणार होता. त्यामुळे त्यांनी या कल्पनेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सामील केले. साथ मिळाली. कामही सुरू झाले.
मंडळ अधिकाऱ्यांना हे काम दिसले. बांधकामासाठीच्या रेतीच्या रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित करीत मंडळ अधिकाऱ्यांकडून त्रास सुरू झाला. प्रकरण तहसीलदारांपर्यंत गेले. तहसीलदारांनी काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली. दरम्यान, नव्या तहसीलदार रुजू झाल्या. त्यांनी रॉयल्टीपोटी १ लाख दहा हजार रुपयांची नोटीस बजावली. सरकारी नोटीस येताच सोबत आलेल्या शेतकऱ्यांनी साथ सोडली. त्यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला. दहा एकर शेत विकले. अर्ध्या रकमेतून पाच एकर जमीन घेतली तर अर्धे पैसे बंधाऱ्याला लावले. एका महिन्यात २०७ फूट रुंद व १८ फूट उंच सिमेंट कॉन्क्रिटची भिंत उभी केली. बांधकामादरम्यान शेतकऱ्यांनी माघार घेतली. मात्र, तिडके यांनी त्या शेतकऱ्यांची साथ सोडली नाही. पाण्यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे, या भूमिकेवर ते ठाम राहिले. आता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
27 May 2016 - 11:39 am | शाम भागवत
हे तर विरळाच.
_/\_
अशा प्रकारचे अनुभव वारंवार जरी वाचायला मिळाले तरी सर्वांची नकारात्मक भूमिका सकारात्मक होऊ शकेल.
27 May 2016 - 2:07 pm | कलंत्री
सरकारचा रॉयल्टीचा मुद्दा योग्य असला तरी शेत विकावे लागणे हे मात्र योग्य नव्हे.
3 Jun 2016 - 8:42 am | डॉ सुहास म्हात्रे
सरकारी अधिकार्यांच्या असमंजसपणाचा उत्तम नमुना ! "यात माझा काय फायदा ?" अशी अधिकार्याची भावना असण्याचा संभव आहे, कारण कायद्याबाहेरील काम असते तर अगोदरच्या अधिकार्याने ते त्याच्या अधिकारात मान्य केले नसते.
या बाबतीत नुसती दखल घेणे पुरेसे नाही. या प्रकरणाची मंत्रीपातळीवर चौकशी होऊन चुकार अधिकार्याला योग्य ते शासन झाले तरच हे नवीन सरकार योग्य दिशेने काम करत आहे असे होईल. शिवाय, जमीन विकावी लागल्याने शेतकर्याच्या झालेल्या नुकसानाची सरकारतर्फे भरपाई करणे जरूरीचे आहे आणि त्याची तोशीस काही प्रमाणात तरी चुकार अधिकार्याला उचलायला लावली पाहिजे. तरच असा अधिकारांचा बेजबाबदार उपयोग करण्याला आळा बसण्यास मदत होईल.
27 May 2016 - 11:57 am | खटपट्या
सर्व प्रतिसादकांचे आभार. शेवटचा फोटो गेल्या पावसाळ्यातला आहे. पहीला बान्ध बांधला तेव्हाचा आहे. या पावसाळ्यातले टाकतो.
27 May 2016 - 6:51 pm | रुस्तम
मान्सून कट्टा करा की गावाला. मज्जा येईल ओढ्यात डुंबायला...
27 May 2016 - 1:44 pm | mahesh d
mr.khatpatya, many many congratulations on the project done by yourself, what the world needs is people like you to make the world more liveable.
27 May 2016 - 2:13 pm | यशोधरा
खटपट्याभाऊ, अभिनंदन!
27 May 2016 - 2:16 pm | नि३सोलपुरकर
अभिनंदन भाऊ ....
27 May 2016 - 2:16 pm | अनुप ढेरे
छान!
27 May 2016 - 7:22 pm | रमेश आठवले
गावात ५ विहरी आहेत . त्यांच्या जवळील घरांच्या छतावर येत्या पावसात पडणारे पाणी जर पाइप ने विहिरीत नेउन सोडले तर विहिरीतून वर्षभर पाणी मिळू श्केल. या उपायाला Roof Water Harvesting असे नाव आहे.
मी पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठीच्या या आणि इतर उपायांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्याची माहिती खाली देत आहे.
"Water Harvesting and Sustainable supply of water" by R.N.Athavale.
published by Centre for Environment Education and Rawat publications,2003.
ISBN No. 81-7033-752-6
27 May 2016 - 9:25 pm | खटपट्या
ओके...
3 Jun 2016 - 3:05 pm | कलंत्री
कृपया कळवावे.
3 Jun 2016 - 8:18 pm | रमेश आठवले
http://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Developm...
http://rawatbooks.com/book_more_detail.aspx?id=531
3 Jun 2016 - 8:18 pm | रमेश आठवले
http://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Developm...
http://rawatbooks.com/book_more_detail.aspx?id=531
27 May 2016 - 8:24 pm | नमकिन
उल्लेखनीय योगदान व कामगिरी.
जिथे पाऊस पडत नाहीं तिथे सरकार शिवाय पर्याय नाहीं.
27 May 2016 - 9:12 pm | अभ्या..
भारीच काम कि खटपट्या राव.
मेहनत रंग लाई बरंका.
27 May 2016 - 10:26 pm | खटपट्या
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे पुन्हा एकदा आभार.
28 May 2016 - 12:12 am | शाम भागवत
ट्रॅक्टरवर नाद खुळा असे लिहिले आहे.
नवरात्र जल जागर धागाकर्ते "नादखुळा" यांचा तो ट्रॅक्टर आहे का?
:-))
3 Jun 2016 - 8:50 am | नाखु
हं शाम !!
बिना ट्रॅक्टरचा नाखु
28 May 2016 - 10:34 am | मार्गी
महत्त्वाचं काम आहे हे अतिशय! अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
3 Jun 2016 - 8:06 am | अभिजीत अवलिया
फार विधायक काम केलेत तुम्ही.
3 Jun 2016 - 12:10 pm | पैसा
मनःपूर्वक अभिनंदन! खूप मोठे काम तुम्ही लोकांनी केले आहे. गावातल्या लोकांचे वाईट अनुभव असतानाही हा उपक्रम यशस्वी करून दाखवल्याबद्दल खास अभिनंदन! अशी समज इतर सगळीकडे कधी येईल देवजाणे!
4 Jun 2016 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खटपट्यासेठ, लैच भारी काम. अभिमान वाटला. जियो.
-दिलीप बिरुटे
4 Jun 2016 - 11:31 pm | खटपट्या
सर्व प्रतिसादकांचे परत एकदा धन्यवाद. आपल्या प्रतिसादामुळे अशा कामांसाठी हुरुप येतो..
5 Jun 2016 - 1:04 am | खटपट्या
साठलेल्या पाण्यात मस्ती करतानाचे आणखी काही फोटो. (संपादक मंडळाने हे मुळ लेखात अॅडडवावे ही विनंती)
6 Jun 2016 - 4:51 pm | मोहनराव
उत्तम काम केले आहे. छान वाटले वाचुन!!
30 Mar 2017 - 2:58 pm | मोदक
धागा मुद्दाम वर काढत आहे.
खटपट्या शेठ, फोटो दिसतील असे कांहीतरी प्लीज करा. बाकीचे व्यनीमध्ये बोलूया..
1 Jul 2017 - 12:30 am | मोदक
खटपट्या शेठ, फोटो दिसतील असे कांहीतरी प्लीज करा
21 Jan 2022 - 1:48 pm | खटपट्या
मी फोटो फेसबुकावर अपलोड करुन मग त्याची लिन्क इथे दिली होती.
आता मलाही फोटो दिसत नाहीत.
संपादक मंड्ळापैकी कोणी मदत करु शकतो का?
मी फोटो व्हाट्सप्प वर पाठवायला तयार आहे
24 Jan 2022 - 8:47 am | निनाद
आता परिस्थिती काय आहे? बंधारे किती घातले गेले शेवटी?
31 Jan 2022 - 8:47 am | खटपट्या
तात्पुरते बंधारे घातले जातात आणि तोडले जातात असे चालु आहे. सर्वांनी मिळून जर निर्णय घेतले तर अजून सुधारणा होइल.
आता ज्याला वाटले तर तो बंधारा बांधतो आणि पाडून टाकतो. जे चुकीचे आहे