आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या.
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे. तुम्ही काय मानता हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच (ज्याला आपण नेहमीच्या भाषेत पिंड म्हणू शकतो) आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती यावर अवलंबून आहे.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. ते हो, नाही, काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही यापैकी काहीही असू शकते. शिवाय हे प्रमाणही व्यक्तीगणिक वेगळे असू शकते.
1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...
असं अमेरीकेच्या घटनाकारांचं मानणं आहे. हे एक प्रकारचे तत्वज्ञान आहे. मानवी मन (खरं तर मानवी मेंदू) उत्क्रांत होत असताना ज्या नैतिकतेच्या कल्पना तयार होत गेल्या त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी, समाज गुण्यागोविंदाने नांदावा म्हणून हे असं "मानण्यात" आलं. हेच कुठल्याही लोकशाही देशाच्या घटनेला लागू होईल. किंबहूना हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये नागरीकांसाठी जी काही नियमावली असेल त्यातही असे काही तरी "मानलेले" असेल आणि त्या देशाच्या नागरीकांना ते बंधनकारक असेल.
2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .
"आपण सारे गुलाम आहोत का?" या मुख्य प्रश्नाचे उत्तर इथेही लागू होते.
"नाही" या उत्तराचा विचार करता पैशाची गुलामगिरी झिडकारून जंगलात झोपडी बांधून नैसर्गिक अन्नावर जिवंत राहण्याचा पर्याय आपल्या प्रत्येकाकडे आहे. मात्र ते आदिमानवाचं जगणं होईल. किंबहूना आपला उत्क्रांत मेंदू आपल्याला ते पाऊल उचलूच देणार नाही. तसे नसते तर कुंभमेळ्याला आलेल्या साधूंकडे मोबाईल आणि लॅपटॉप दिसले नसते.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर खुपच कमी लोक "नाही" असे देतील. हो आणि नाही च्या मधले बरेच जण असतील. पुण्यात पाच खोल्याच्या घराच्या कर्जाचे हप्ते भरणारी मंडळी या प्रश्नाचे उत्तर "हो" असे देतील.
3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .
ही काळाच्या ओघात उत्क्रांत झालेल्या मानवी मेंदूची करामत आहे. एका प्रतिसादात डॉ. सुहास म्हात्रे म्हणाले होते की "उत्क्रांत मेंदू" हा माणूस या प्राण्याचा आजार आहे. ते तंतोतंत पटते.
प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला.
१. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्या प्राण्यांचा मेंदू
२. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले.
३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत.
अन्नासाठी दाही दिशा भटकणार्या मानवाला योगायोगाने शेतीचा शोध लागला. मुबलक पीक येऊ लागल्याने अन्नाची ददात मिटली. स्वतःची अन्नाची गरज भागवून झाल्यानंतर धान्य उरू लागल्याने हे धान्य इतरांना देता येऊ लागले. त्यामुळे काही लोक शेती न करता ईतर गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. यातून उद्योगधंदे विकसित झाले. एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आली. पुढे काळाच्या ओघात "श्रमाच्या बदल्यात श्रम" ही संकल्पना नष्ट होऊन "पैसे" नावाच्या गोष्टीचा माणसाने शोध लावला. आणि ओघानेच पैसा असेल तरच माणसाला सेवा "विकत" मिळू लागल्या.
अन्नासाठी दाही दिशा भटकणार्या माणसाला तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आणून सोडले ते त्याच्या मेंदूच्या सर्वात वरच्या थराने. अर्थात निओ कॉर्टेक्सने. इतर प्राण्यांमध्ये ही निओ कॉर्टेक्सची भानगड नाही. नाही म्हणायला कपी वर्गाच्या ईतर प्राण्यांमध्ये अतिशय प्राथमिक स्वरूपाचा निओ कॉर्टेक्स असतो. तो मानवाईतका प्रगत नसल्याने ते माणसांच्या भानगडीतून सुटले.
4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल
5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .
अशी काही उदाहरणे आपल्या पाहण्यात येत असली तरीही हे सरसकट म्हणता येत नाही. प्रेमापोटी आपल्या सधन, उच्च सामाजिक स्तर असलेल्या आई वडीलांच्या विरोधाला न जुमानता आपल्यापेक्षा कनिष्ठ आर्थिक आणि सामाजिक स्तर असलेल्या तरूणाबरोबर लग्न करणार्या मुली आपण आजूबाजूला पाहतो.
सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही.
त्यामुळे पैसा हा एकमेव घटक जोडीदार निवडताना नक्कीच नसतो.
6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .
अध्यात्म कळायला खुप सोपं आहे. आचरणात आणणे महाकठीण. वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत.
काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले.
माणूस आपल्या शरीराबद्दल, त्याच्या अवयवांबद्दल उल्लेख करताना "माझे शरीर, माझे हात, माझे पाय" असा करतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराहून वेगळे आहोत ही जाणिव माणसाला झाली. मी म्हणजे माझे शरीर नाही तर मग मी कोण? शारीरीक वेदनांच्या पलीकडेही दु:ख म्हणून काहीतरी आहे. माझ्या शरीराला वेदना होतात आणि मी दु:खी होतो. म्हणजेच मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व".
दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत माणसाचे एकंदरीत निसर्गनियमांचे आकलन मर्यादीत होते. त्याला कळत नव्हते हा सभोवतालचा निसर्ग, पशू, पक्षी आणि तो स्वतः कसा तयार झाला. दिवसा प्रकाश देणारा सूर्य नामक आगीचा गोळा, रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र, ढगांचा गडगडाट, विजांचे चमकणे, पाऊस पडणे हे सारे त्याच्या डोक्याच्या वर असणार्या "आकाशात" घडत होते. त्यामुळे त्या विशाल आकाशात हे सर्व घडवणारी कुणीतरी शक्ती राहत असावी असा त्याचा ग्रह झाला. आपल्या अस्तित्वाला माणसाने "आत्मा" असे नाव देऊन आकाशातील शक्तीला "परमात्मा" असे नाव दिले. आत्म्याची परमात्म्याशी सांगड घातली.
आता आपण विसाव्या शतकात येऊ या. माणसाने मेंदूत कोणत्याही प्रकारचे उपकरण किंवा हत्यार न खुपसता मेंदूत घडणार्या हालचाली पाहण्याचे तंत्र (noninvasive imaging techniques) विकसित केले. माणसाचे मन हा त्याच्या मेंदूने शरीरांतर्गत तसेच बाह्य उत्तेजक संवेदनांना (stimuli) दिलेला प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले. किंबहूना माणसाची सारी सुख दु:खं हा त्याच्या मेंदूतील चेताप्रक्षेपकांचा कल्लोळ आहे हे कळू लागले. अगदी कालपरवापर्यंत माणूस ज्याला "स्व" किंवा "अस्तित्व" म्हणत होता तीसुद्धा मेंदूचीच करामत असावी असा कयास त्याने बांधला. आजही या जाणीवेचे मेंदूतील स्थान किंवा जाणीव (consciousness) मेंदूत कशी तयार होते यावर संशोधन चालू आहे.
काही वर्षांपूर्वी डॉ. जियुलिओ टोनोनी (Giulio Tononi) यांनी जाणीवेसंदर्भात "एकत्रित माहिती सिद्धांत" (Integrated Information Theory) मांडला. मेंदूच्या विविध भागातून माहिती एकत्र येऊन त्याची सलग अशी जाणिव तयार होते अशा अर्थाचा तो सिद्धांत आहे. यात "स्व" ची जाणीवही आलीच. अर्थात हा सिद्धांत विज्ञान जगताने स्विकारलेला नसून यावर अधिक संशोधन चालू आहे.
ही सारी माहिती घेतल्यानंतर आपण पुन्हा आपल्या "ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे" या मुळ मुद्दयाकडे वळू या.
आज होमो सेपियन्स हा प्राणी काळाच्या अशा टप्प्यावर उभा आहे की जिथे पैसा नसेल तर त्याचे आयुष्य भयावह बनेल. जगण्यासाठी माफक प्रमाणात का होईना, पण पैसा हवाच. पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल.
Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते)
थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
प्रतिक्रिया
22 Feb 2016 - 7:45 am | प्रचेतस
विचारप्रवर्तक उत्तरे.
23 Feb 2016 - 5:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
22 Feb 2016 - 8:17 am | जेपी
लेख आवडला.
22 Feb 2016 - 8:33 am | कंजूस
किती रे जड लेख तो! वाचताना डोक्याला मुंग्या आल्या ना.
भारीच विचार करता शनिवर रविवारी.
22 Feb 2016 - 9:11 am | राही
विचारांशी सहमत. मूळ लेख वाचल्यावर आणखी एक मुद्दा सुचला होता. तो असा की आपण स्वतःला कितीही स्वतंत्र, मोकळे समजत असलो तरी तसे नसतो. आपण सभोवतालाशी, परिसराशी, जडशिळाशी, प्राणी, वनस्पती, मानव, नातेवाईक, या सर्वांशी सूक्ष्म रूपाने जोडलेले असतो. या बंधांचा ताण जेव्हा सर्व बाजूंनी सारखा असतो तेव्हा आपण स्थिर असतो. कुठेही अतिरिक्त झुकलेले किंवा कललेले नसतो, पण मोकळेही नसतो. स्वातंत्र्याची आणि गुलामीची व्याख्या करताना हा घटक विचारात घेतला पाहिजे. आपली गुलामी किंवा स्वातंत्र्य हे आधीच अस्तित्वात असलेल्या या चौकटीच्या संदर्भातच मोजले पाहिजे; मोजावे लागते.
22 Feb 2016 - 9:39 am | नाखु
मला कळलं त्या (घेतलेल्या)जाडजूड पुस्तकांचं पुढ काय होतं ते !!! भुस्काट पाडणारा लेख, अता आम्ही आम्ची कळण्याची पातळी उंच करायला बाकड्यावर उभे रहावे काय?
पण खरं सांगतो असा अभ्यासू प्रतिसाद येण्यासाठी ज्यानी कारणीभूत लेख लिहिला त्या उडन खटोलाम्चे बी आभार.
हा सगळ्यात आवडलेला भाग आणि इथल्या तमाम ईच्छुक्/लाभार्थी/होतकरू वर्गासाठी बोधप्रद !
जियो गावडे मास्तर
22 Feb 2016 - 11:30 pm | सतिश गावडे
काल खरेदी केलेल्या पुस्तकातील एक पुस्तक आहे मलिका अमर शेख यांचं आत्मचरीत्र, "मला उध्वस्त व्हायचंय". मलिका अमर शेख या समाजवादी शाहीर अमर शेख यांची कन्या तर दलित पँथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या पत्नी. पुस्तक छोटेखानी असल्याने अडीच तीन तासांत वाचून संपवलं.
आपण नामदेव ढसाळांच्या प्रेमात कसे पडलो हे सांगताना मलिका लिहितातः
"... जागिरदारकाकांच्या लक्षात आलं होतं आमचं जवळ येणं... अनिल-भैयांच्याही... त्या काव्यमय, हळव्या वातावरणात आम्ही दोघं कविमनाचे जवळ येत चाललो; पण मला त्याची काहीही माहिती नव्हती. त्याचं पूर्वायुष्य किंवा त्याच्या घरी कोण कोण आहे, तेही ठाऊक नव्हतं. फक्त त्याची कविता ठाऊक होती. कवी, संवेदनाशील, शिवाय राजकारणात थोडी (बरीच) डावी विचारसरणी मानणारा. पुन्हा माझ्या प्रतिमेत फिट बसणारा... मर्दानी, कलंदर, तरी हळवा... माझ्यावर प्रेम करणारा कवी..."
23 Feb 2016 - 6:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुप वर्ष झालीत पुस्तक वाचून म्हणजे मी बी. ए.च्या शेवटच्या वर्षाला वाचलेलं. एक आठवण पुस्तकातील अशी की, नामदेव ढसाळाचा मित्र म्हणतो 'मी तुझ्या बायकोबरोबर झोपू का, तेव्हा ती जर हो म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही' असं काही तरी होतं, तेव्हा एक वाचक म्हणून मी हादरून गेलो होतो. जिच्याबरोबर प्रेम विवाह केला तो माणूस व्यक्ती स्वातंत्र्याचा इतका आदर करतो की मला काहीच घेणं नाही अशी ती वृत्ती ? आत्मचरित्रात मी हे वाचून चक्रावून गेलो होतो. आणि माझं त्या पूस्त्कातील अजुन एक वाक्य माझं कायम पाठ आहे. मलिका म्हणते ''माझं तारुण्याचं रेषमी वस्त्र चोचीत घेऊन माझा प्रियकर केव्हाच उडून गेला''
मालक, या पुस्तकावर लिहा अजून.
-दिलीप बिरुटे
23 Feb 2016 - 9:44 am | सतिश गावडे
तो परिच्छेद वाचताना मी हबकून गेलो होतो. मग लक्षात आले की काही माणसं रुढी, चाकोरींच्या पलिकडची असतात. इतरांनी अंगिकारलेली नीती-मुल्य त्यांना गुलामगिरीचे पाश वाटतात. ढसाळही त्यातलेच होते हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं.
आपका हुक्म सर आंखोपर ! :)
23 Feb 2016 - 9:54 am | सुबोध खरे
"ते" आत्मचरित्र पूर्ण वाचून नामदेव ढसाळ मात्र मनातून पार उतरले.
23 Feb 2016 - 10:02 am | यशोधरा
असेच माझे बंध-अनुबंध वाचून झाले होते.
22 Feb 2016 - 9:44 am | यशोधरा
उत्तम लिहिलं आहेस धन्या. आवडलं. तुला माझ्याकडून एक पुस्तक भेट लागू.
22 Feb 2016 - 10:25 am | मन१
विचार करण्यासारखं .
22 Feb 2016 - 10:53 am | डॉ सुहास म्हात्रे
खूप काही वाचलेलं समजलं आणि मगच त्यावर चिंतन केलं की हे असं काही प्रसवतं ! भन्नाट लिहीलं आहे !!
असंच सतत लिहीत रहा.
23 Feb 2016 - 11:23 am | अजया
+१००
लिहित रहा सगा सर.
22 Feb 2016 - 11:09 am | विजय पुरोहित
सगा साहेब लेख आवडला. वाखु साठवली आहे.
सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. हा संपूर्ण पॅरा विशेष आवडला...
22 Feb 2016 - 11:21 am | मुक्त विहारि
सांसारीक जबाबदारी पुर्ण करेपर्यंत वयाची पन्नाशी उलटून जाते आणि "स्व"चा शोध घेण्याची उर्मी पण त्याच सुमारास निवून जाते.
"स्व"च्या शोधाविषयी बरेच बोलता येईल. आम्हाला असल्या विषयांवर लिहिण्यापेक्षा बोलणेच जास्त आवडते.
22 Feb 2016 - 12:10 pm | विवेक ठाकूर
माझे विचाराल तर सध्या मी सर्व जबाबदारी अन बंधांनांतुन मुक्त आहे .... एखाद्या चांगल्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ....दत्तप्रभू , शंकराचार्य अन इतर अनेकांना जे सहजसाध्य होते त्या "आध्यात्मिक वैराग्या"च्या धुंदीत बुडवून घ्यायचे आहे ...पण त्याच वेळेस आपला भार इतरांवर पडणार नाही , आपण इतरांवर अवलंबून असणार नाही , तसेच इतरांकडून फसविले देखील जाणार नाही , याची काळजी घ्यायला हवी. पूर्वायुष्यात आध्यात्माच्या बाजारात मोठा फटका बसलेला - उ.ख.
त्यामुळे प्रश्न एक आणि उत्तर भलतच असं झालं आहे.
22 Feb 2016 - 1:02 pm | विवेक ठाकूर
.
22 Feb 2016 - 2:14 pm | सस्नेह
लेखातल्या ब-याच मुद्द्यांशी सहमत. समूहजीवनात जगताना कोणाचीतरी/कशाचीतरी गुलामगिरी अटळ आहे. जंगलात जाऊन राहिलं तरी पोटाची गुलामगिरी कशी चुकेल ?
22 Feb 2016 - 11:15 pm | सतिश गावडे
पोटाची गुलामगिरी ही तर वेगळीच गंमत आहे.
खायचं कशासाठी तर जिवंत राहण्यासाठी. आणि जिवंत कशासाठी राहायचं तर प्रजननाच्या माध्यमातून आपला वंश पुढे चालू ठेवण्यासाठी. वैज्ञानिक परीभाषेत याला वंशसातत्य (continuation of species) म्हणतात.
मागे "कशावरून हे सारं वंशसातत्यासाठीच होतं?" असा प्रश्न पडला होता. उत्तराचा धांडोळा घेताना एक रोचक चर्चा वाचण्यात आली.
चर्चेत लोकांनी मांडलेले मुद्दे वंशसातत्याच्या संकल्पनेच्याही वरताण निघाले. :)
22 Feb 2016 - 7:13 pm | चौकटराजा
आपण अनेक घटकांच्या आधीन असतो पण गुलाम एकाचेच ...... आपल्या अहंकाराचे !
22 Feb 2016 - 7:19 pm | अभ्या..
बरेचसे पटले गावडे सर. वरील कन्क्लुजन बरेच अंमलात आणायचा प्रयत्न करतो. नाइलाज होतो तेंव्हा चिडचिड होते. हीच चिडचिड म्हणजे आपल्यात थोडे का होइना स्वत्व तेवत असल्याची खात्री पटवितो अन पुढे चलतो.
22 Feb 2016 - 7:39 pm | गौरी लेले
अगदी अगदी ! मनातले बोललास अभ्या ! लिमिटेड चिडचिड अन लिमिटेड कॉम्प्रोमाईज = सफिशियंट आनंद :)
खुपच सुरेख लेखन सतीश !
22 Feb 2016 - 11:58 pm | हेमन्त वाघे
We are all just prisoners here, of our own device Hotel कॅलिफोर्निया - EAGLES
23 Feb 2016 - 3:14 am | अर्धवटराव
जींदगीका नाम येही दुसरा है.
असं काहिसं गाणं ऐकलं होतं.
लेख छान उतरलाय गावडे शेठ.
तुम्ही म्हणतात तसं, माणसाची कुठलिही कृती/विचार दोन घटकांवर अवलंबुन असते. एक, त्याचं जीनपूल जे त्याच्या जन्मदात्यांकडुन त्याला मिळतं. दुसरं, परिस्थिती, जी माणासाच्या अजीबात कंट्रोलमधे नसते. म्हणजे कसं, कि सजीवाची मूलभूत प्रॉपर्टी म्हणजे रिस्पोन्स टु स्तिम्युलस. त्यापैकी ना स्टिम्युलस त्याच्या कंट्रोलमधे आहे ना रिस्पोन्स देणारी सिस्टीम. च्यायला, जर मूळ स्वातंत्र्यच नाहि, तर ही गुलामगिरीची भानगड आलि कुठुन :ड
23 Feb 2016 - 3:43 am | चेक आणि मेट
अप्रतिम
23 Feb 2016 - 3:53 am | श्रीरंग_जोशी
अभ्यासपूर्ण लेखन!! __/\__.
23 Feb 2016 - 9:04 am | स्पा
लग्न कर रे अता
23 Feb 2016 - 10:57 am | चांदणे संदीप
ह्याला दणकून +१ ;)
23 Feb 2016 - 11:15 am | सतिश गावडे
धन्यवाद स्पा सर. तुम्ही इतक्या कळकळीने लिहिलं आहे त्यामुळे आता मनावर घ्यायलाच हवे. :)
23 Feb 2016 - 11:30 am | विवेक ठाकूर
लेखकाला स्व (किंवा सत्य) गवसलेलं नाही त्यामुळे सगळा लेख केवळ वैचारिक आणि त्यामुळे निरुपयोगी झाला आहे.
लेखाचं कन्क्लूजन असं आहे :
मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
आणि तेच चुकीचं आहे. स्व गवसला की सगळी गुलामगिरी संपते ! अर्थात, नोकरदार व्यक्तीला नोकरी टिकवणं हाच एक कलमी कार्यक्रम असतो, ही उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी, इकडचं तिकडचं वाचून, गुगल सर्च वगैरे मारुन स्व गवसणं शक्य नाही आणि एकदा तो गवसला की त्याची जाणीव तेवत वगैरे ठेवायला लागत नाही.
सत्य गवसता क्षणी गुलामगिरी संपते, ती नियंत्रणात ठेवायचा प्रश्नच येत नाही. सगळ्या आयुष्यात `करु किंवा न करु, त्यानं काही फरक पडणार नाही' असा विकल्प उपलब्ध होतो. याचा अर्थ स्व गवसलेला रानात जाऊन कंदमुळं खातो, त्याला पैसा लागत नाही, तो संसारत्याग करुन इतस्ततः भटकायला लागतो.... वगैरे सर्व, स्व न गवसलेल्यांचे भ्रामक कल्पनाविलास आहेत. आणि अश्या भ्रामक कल्पनाच स्व गवसण्यात मोठा अडथळा आहेत.
बेसिक चूक इतर चुकांना कशी प्रसवते याचं एक उदाहरण म्हणून खालचा पॅरा पाहा :
पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल.
Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. (पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते) थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही.
स्व गवसलेल्या व्यक्तीच्या जीवनात स्व प्राथमिक आणि इतर सर्व गोष्टी, त्यात पैसाही आला, दुय्यम होतात. तस्मात, अशी व्यक्ती पैश्याची गुलाम राहात नाही. पैसा असेल तर तो वापरेल, नसेल तर दुसरा पर्याय शोधेल पण पैसा नाही म्हणून जगणं मुश्किल होत नाही. कारण अस्तित्त्व हा जरी परास्परावलंबित्वाचा खेळ असला तरी स्व हा सर्वथा निरालंब आहे. त्याला कोणत्याही सपोर्ट सिस्टमची गरज नाही. तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. म्हणजे संसार असेल तर सत्य गवसलेली व्यक्ती तो सार्थ करेल, त्यापासून पळून जाणार नाही, पण संसारावाचून त्याचं काही अडणार नाही. अर्थात, स्व गवसल्याशिवाय ते स्वच्छंद होणं इतरांच्या दृष्टीनं निव्वळ कल्पनाविलास असतो आणि तो वाचनातून गवसत नाही. त्याला स्वतःचं सर्वस्व पणाला लावावं लागतं. एकीकडे सिक्युरिटी शोधत आणि सांभाळत जगतांना, निरालंब स्व गवसणं असंभव आहे.
23 Feb 2016 - 11:47 am | स्पा
जे बात
23 Feb 2016 - 11:51 am | अभ्या..
त्यातल्या त्यात हिथे मेजॉरीटी नोकरदारांचीच. त्यामुळे काही बोलणे म्हणजे.........................
23 Feb 2016 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे
असं कसं, असं कसं ? स्व सापडणार्या माणसांनाही वित्तवर्षाच्या अखेरीची (फिनानशियल इयर एंडची) गुलामगिरी करायला लागतेच असे स्व सापडलेल्या कोणीतरी फार्फार पूर्वीच स्वतःहून कबूल केले आहे ! ;) :)
23 Feb 2016 - 12:23 pm | विवेक ठाकूर
नोकरदार माणूस कितीही फुशारकी मारत म्हणाला की `मी नोकरीवर केंव्हाही लाथ मारु शकतो' तरी, नोकरी गेल्यावर आपली काय अवस्था होईल ही कल्पनाच त्याला पुरतं अस्वस्थ करुन टाकते. आणि तो झक मारत कामाला जातो. अर्थात, स्वतःचा व्यावसाय असलेलाही, व्यावसायाची गुलामगिरी पत्करत नसतो असं नाही, पण त्याला किमान इतर विकल्प उपलब्ध असतात.
स्व गवसलेला व्यावसाय करत नाही, त्याला सगळं आकाशातून प्राप्त होतं हा पुन्हा अज्ञानमूलक गैरसमज आहे. त्यामुळे स्व गवसला की नाही हे `न करण्याचा विकल्प' प्रामाणिकपणे उपलब्ध आहे किंवा नाही यावरनं ठरतं.
एक मात्र नक्की, स्वच्या शोधातला माणूस, स्वतःला तो गवसला की नाही याच्या मागे असतो. दुसर्याला तो गवसला आहे किंवा नाही याचा उहापोह करुन आपल्याला काहीही मिळणार नाही इतकी किमान समज त्याला असतेच असते.
23 Feb 2016 - 12:33 pm | मोदक
एक मात्र नक्की, स्वच्या शोधातला माणूस, स्वतःला तो गवसला की नाही याच्या मागे असतो. दुसर्याला तो गवसला आहे किंवा नाही याचा उहापोह करुन आपल्याला काहीही मिळणार नाही इतकी किमान समज त्याला असतेच असते.
नक्की का?
23 Feb 2016 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
23 Feb 2016 - 11:55 am | तर्राट जोकर
मिसळपावर तुमच्याशिवाय कोण्णी कोण्णी उपयोगी लिहित नाही सर! कित्त्ती कित्त्त्त्ती उपयोगी प्रतिसाद आहे तुमचा. मी तर तुमचे प्रतिसाद घरभर फ्रेम करुन लावले आहेत. अजून येऊद्या. आता रस्त्यावरही लावीन म्हणतो, आमच्या झोपडपट्टीची पोरं सकाळची कर्म उरकतात तिथे सरकारी भरपूर जागा आहे. बिन्दास लिहा, उपयोगी!
23 Feb 2016 - 11:58 am | चांदणे संदीप
होऊदे खर्च...मिपा है घरचं!
है..हुर्रर्र...हे..हे..है..हुर्र्र्र्रार्राहा धुरळा...धुरळा... निस्ता धुरळा!
23 Feb 2016 - 12:33 pm | मोदक
स्व गवसलेल्या व्यक्तीच्या जीवनात स्व प्राथमिक आणि इतर सर्व गोष्टी, त्यात पैसाही आला, दुय्यम होतात.
सहमत, सध्या येथेच अनुभवतो आहोत.
23 Feb 2016 - 12:36 pm | पैसा
=)) =)) =))
23 Feb 2016 - 11:57 am | पैसा
कशाला एवढं वाचतो रे? तो एकजण दगदधोंड्यात भटकत बसतो. तू दुसरा पुस्तकांच्या जंगलात. हे सगळं करायला अजून वीस वर्षे अवकाश आहे. आधी जगून घ्या.
3 Mar 2016 - 2:18 pm | भाऊंचे भाऊ
तितकं भटकणे जास्त. हां अहंकार झिजुनच संपतो तेंव्हा...
सल्याचा काही उपयोग होइल असे निरीक्सन नाही बगा.
23 Feb 2016 - 12:58 pm | गामा पैलवान
सतिश गावडे,
तुम्हाला पडलेल्या जगण्याच्या प्रश्नापेक्षा दुसरा एक प्रश्न मूलभूत स्वरूपाचा आहे. तो म्हणजे आपण जन्म का घेतो. जन्म आपल्या हातात नसतो असं म्हणतात. ते एका अर्थी बरोबरही आहे. पण या जन्माच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर त्याची मदत जगण्याच्या प्रश्नाचा अन्वयार्थ लावण्यात होईल.
तर, आपण जन्म का घेतो असा प्रश्न आहे. याचाच दुसरा अवतार म्हणजे मिळालेल्या जन्माचं काय करायचं बुवा, हा आहे. अनेकांनी अनेक आपापल्या परीने उत्तरं शोधली आहेत. माझं उत्तर सांगतो.
आपण जन्म घेतो ते अमर होण्यासाठी. अमर होणे म्हणजे काळावर विजय मिळवणे. काळ सर्वभक्षक आहे. त्याच्या पल्याड मी कुठे आहे याचा शोध घ्यायची इच्छा प्रत्येक माणसाला असते. ही भुकेसारखी आहे. भूक सगळ्यांना लागते, पण तिचं शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही.
माणूस जसा अमर होण्यासाठी जन्म घेतो तसं इतर प्राण्यांचं नाही. माणसाकडे क्रियमाण म्हणजे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. ही सुविधा प्राण्यांना उपलब्ध नाही. म्हणून मनुष्यजन्म प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ( अर्थात, माणूस जर हातचं क्रियमाण सोडून प्राण्यासारखा वागू लागला तर ती अधोगती झाली ! )
आता तुमची विचारप्रक्रिया ज्यातून सुरू झाली त्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे आपण गुलाम आहोत का! उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. जर हातचं क्रियमाण सोडलं तर आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम बनतो. अन्यथा नाही.
आ.न.,
-गा.पै.
23 Feb 2016 - 1:50 pm | विवेक ठाकूर
आपण जन्म घेतो ते अमर होण्यासाठी. अमर होणे म्हणजे काळावर विजय मिळवणे. काळ सर्वभक्षक आहे. त्याच्या पल्याड मी कुठे आहे याचा शोध घ्यायची इच्छा प्रत्येक माणसाला असते. ही भुकेसारखी आहे. भूक सगळ्यांना लागते, पण तिचं शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही.
स्व अजन्मा आहे, त्यामुळे त्याला जन्म-मृत्यू नाही. `आपण जन्म घेतो' हा गैरसमजच `मी देह' या अज्ञानमूलक कल्पनेला जन्म देतो. आपण देह नसून आपल्याला देहाची जाणीव आहे. तद्वत, देह कालाधिन आहे, स्व नाही. त्यामुळे स्व कालातीत आहे. कालाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. तो अकाल आहे.
स्व गवसलेल्या व्यक्तीला, इतरां प्रमाणेच भविष्य घडवण्याची शक्ती असते. पण ती तो सृजनात्मकता म्हणून वापरतो. त्यामुळे :
जर हातचं क्रियमाण सोडलं तर आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम बनतो. अन्यथा नाही.
हे देखिल चूक आहे. स्व न गवसलेल्या व्यक्तीला भविष्य घडवण्याची चिंता, ध्येयाचा आणि परिणामी देहाचा, गुलाम बनवते.
23 Feb 2016 - 2:10 pm | गब्रिएल
हे देखिल चूक आहे. स्व न गवसलेल्या व्यक्तीला भविष्य घडवण्याची चिंता, ध्येयाचा आणि परिणामी देहाचा, गुलाम बनवते.
यकदम जंक्शन करेट्ट !
आणि या चिंतेमध्ये "इतर सर्व कसे चूक आहेत आणि मी व केवळ मीच्च कसा बरोबर आहे." हे इतरांच्या डोस्क्यावर थाप्ण्याची आल-टाईम परमनंट चिंता बी सामील असते ना, सर ?
म्हंजे सर्वज्ञ मान्सासंगट जग्भर्ची समदी मान्सं गुलाम झाली की वो ! ;) =))
23 Feb 2016 - 5:45 pm | विवेक ठाकूर
स्व गवसलेला निश्चिंत असतो. इतरेजन, ज्यांना तो गवसलेला नाही त्यांना, तो चूक आहे हे दाखवण्याची चिंता असते. कारण एकदा तो चूक ठरला की त्याचा व्यत्यास म्हणून इतरेजन बरोबर आहेत असा दिलासा आपल्याला मिळेल ही वृथा आकांक्षा ते धरुन असतात.
पण इतरेजनांच्या लेखातून, प्रतिसादातून आणि विचारातून ते आपोआप चूक ठरतात. स्व गवसलेलेल्या त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही.
23 Feb 2016 - 5:52 pm | मोदक
स्व गवसलेला निश्चिंत असतो.
नक्की का?
23 Feb 2016 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा
@नक्की का? >> मग!??? मी सांगतो ना, मग तसं आहेच! तोच पेरामीटर ..
23 Feb 2016 - 7:13 pm | मोदक
तुम्हाला स्व गवसलेला आहे का? :))
23 Feb 2016 - 7:24 pm | होबासराव
Elementary, my dear मोदक ;)
23 Feb 2016 - 10:47 pm | सतिश गावडे
एक वेगळा विचार मांडल्याबद्दल धन्यवाद.
सहमत. "आपण जन्म का घेतो?" या प्रश्नाचं सोपं उत्तर "माहीती नाही" हे आहे. :)
हा विचार समर्थांच्या "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या वचनाच्या जवळ जाणारा वाटतो. आणि असा अमर झालेला कोण तर माझ्या नजरेसमोर ज्ञानियांचा राजा उभा राहतो.
Thanks to neocortex !!
काहीसा असहमत. "हातचं क्रियमाण सोडणं किंवा न सोडणं" हे पुर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही.
23 Feb 2016 - 11:41 pm | विवेक ठाकूर
"आपण जन्म का घेतो?" या प्रश्नाचं सोपं उत्तर "माहीती नाही" हे आहे.
देह जन्म घेतो. स्व नाही.
हा विचार समर्थांच्या "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या वचनाच्या जवळ जाणारा वाटतो.
जो जन्मच घेत नाही त्याला मृत्यू नाही.
हातचं क्रियमाण सोडणं किंवा न सोडणं हे पुर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही
स्व कायम अकर्ता आहे. क्रिया केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर घडतात.
24 Feb 2016 - 12:00 am | तर्राट जोकर
नाही सर, तुम्ही गाईड होऊ नका. मला एकाला अर्जंट मानसिक उपचारासाठी वेड्यांच्या हॉस्पीटलला न्यायचे आहे, तुम्हाला येरवडा जवळ पडेल काय?
24 Feb 2016 - 2:58 am | गामा पैलवान
सतिश गावडे,
अमर होणे म्हणजे आपली स्वची जाणीव देहापल्याड नेणे. त्याकरिता साधना करावी लागते. हातचं क्रियमाण घालवणे म्हणजे साधना न करणे.
आ.न.,
-गा.पै.
24 Feb 2016 - 7:34 am | अत्रुप्त आत्मा
देहा पल्याड काहीच नाही,
आणि यांना अ'मर व्हायची घाई!
-------------------
देहाचा हाची आत्मा!
तेथेचि मुक्ती
लढवा किती युक्ती
टनाटनी पणाची !!!
.....
देहात्मवादीछन्द :- आत्म-बंध!
24 Feb 2016 - 1:46 pm | विवेक ठाकूर
देहा पल्याड काहीच नाही
प्रतिसाद देण्यापूर्वी लेखकानं काय लिहीलंय ते पाहा :
मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व".
देहाचा हाची आत्मा!
तेथेचि मुक्ती
लढवा किती युक्ती
टनाटनी पणाची !!!
बालीश काव्य रचून `देह म्हणजे आत्मा' सांगायचा प्रयत्न ! आत्मा अमर आहे म्हणून तर सूज्ञ अमृताचा शोध घेतो. लेख कळायला इतपत प्राथमिक वाचन तरी करायला हवं.
24 Feb 2016 - 2:06 pm | तर्राट जोकर
तीव्र तीव्र सहमत. तुम्ही सोडुन मिसळपाववर कुणीच काहीच कधीच लिहायला नाय पाय्जेल. फारच लिहायची खाज असेल तर तुमच्याकडून आधी प्रमाणपत्र घ्यायला पायजेल.
रच्याकने, जे लिहिलंय ते वाचायचं असतं, पाहायचं नसतं हे ज्या सर्वज्ञाला कळत नाही त्याला इतरांना होबासक्या शिकवायचा काय अधिकार असा प्रश्न मी निराकार गाढवाला विचारू म्हणतो तर ते बेणं कुठी गायपलं -अस्तित्व- जाणे
24 Feb 2016 - 2:12 pm | होबासराव
त्याला इतरांना होबासक्या शिकवायचा काय अधिकार असा प्रश्न मी निराकार गाढवाला विचारू म्हणतो तर ते बेणं कुठी गायपलं -अस्तित्व- जाणे
खिक्क ;)
24 Feb 2016 - 2:41 pm | नाव आडनाव
काहीच न लिहिता पिवळा प्रतिसाद ("पिवळ्या पुस्तका" सारखा वाटतोय शब्द :) ) देता येतोय का हे चेक करतोय. राग मानू ने. मला कधीतरी ८०-८५ ओळिंचा प्रतिसाद लिहायचाय असं माझं स्वप्न आहे. हम होंगे कामयाब एक दिन ( हे पण पिवळं होइल का ?).
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
...........................................................................
24 Feb 2016 - 4:30 pm | नीलमोहर
आधी वाटलं एवढं 'येल्लो येल्लो डर्र्टी फेल्लो' मलाच दिसतंय की काय ;)
या निमित्ताने पहिल्यांदाच चेक करून बघितलं हायलाईट कसं करतात, थँक्स हं.
वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत.
काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले.
- माझ्याकडे अशा प्रश्नांची मोठी यादी आहे, नक्की कुठल्या रस्त्याने पोहोचायचं या उत्तरांपर्यंत?
24 Feb 2016 - 4:40 pm | तर्राट जोकर
तुम्ही येल्लो हायलाइटपर्यंत पोचले ना? योग्य रस्त्यावर आहात.
26 Feb 2016 - 3:26 pm | अभ्या..
बुवा आता प्लीजच.... आवरा.
टू मच. शब्दाला शब्द वाढवण्यात अर्थ नै.
26 Feb 2016 - 3:29 pm | प्रचेतस
नायतर काय.
दोघांच्या भांडणात मिपाकर फुकट हसू हसू / चिडू चिडू राह्यले.
26 Feb 2016 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा
@फुकट हसू हसू / चिडू चिडू राह्यले. >>
माझ्यावरती हसू हसू,अन त्याच्यावरती चिडू चिडू
अस जर का खरच असेल,तर कशाला मी होऊ कडू
26 Feb 2016 - 4:03 pm | प्रचेतस
अगागागागा
यमक्या वामनानंतर तुम्हीच.
26 Feb 2016 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा
तरी तुमच्यापेक्षा कमीच!
26 Feb 2016 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा
ठीक आहे..मी थांबतो
फक्त उत्तर दे एक तू
जो मला प्रथम छळतो
त्याला का मारत नाही तू!? ;)
26 Feb 2016 - 3:59 pm | प्रचेतस
किती हा यमकांचा सोस =))
26 Feb 2016 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा
2 Mar 2016 - 5:49 pm | गौरी लेले
ते यमकांचे गुलाम असावेत बहुधा !
(पण यमक न वापरता लिहिलेले त्यांचे भावविश्व मात्र खरेच सुरेख आहे ह्यात शंका नाही )
26 Feb 2016 - 4:01 pm | नाखु
शांत व्हा तोपर्यंत हे वाचा
नेम धरून
आणि हो सही वाचायला विसरू नका
सही अगदी सही आहे.
23 Feb 2016 - 2:36 pm | होबासराव
प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला.
१. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्या प्राण्यांचा मेंदू
२. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले.
३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत.
सगा लेख छानच झालाय.
23 Feb 2016 - 6:02 pm | होबासराव
पण इतरेजनांच्या लेखातून, प्रतिसादातून आणि विचारातून ते आपोआप चूक ठरतात. स्व गवसलेलेल्या त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही.
म्हणजे काय ?
23 Feb 2016 - 7:45 pm | सुमीत भातखंडे
उत्तरं आवडली.
23 Feb 2016 - 8:40 pm | उडन खटोला
विठा जी यान्चे अनेक आभार् व धन्यवाद ,,,, मला माझ्या धाग्यात जे म्हणायचे होते ,ते तुम्ही पर्फेक्टली सान्गितलंत
सतीश जी आपणास माझ्या धाग्यावरुन प्रेरणा मिळाली हे पाहुन आनन्द झाला
असो ...
रोचक चर्चा .............चालुद्या
23 Feb 2016 - 9:05 pm | विवेक ठाकूर
बाकीच्या उथळ कमेंटसवर घालवायला वेळ नाही .
23 Feb 2016 - 9:26 pm | सतिश गावडे
धन्यवाद उडन खटोला. विवेक ठाकुर यांच्या उत्तरांनी तुमचे शंका समाधान झाले हे उत्तम झाले.
राहीली गोष्ट या धाग्यावरील चर्चेची. मी तुमच्या प्रश्नांचा धागा पकडून मी माझे या विषयाचे आकलन मांडले. ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ.
23 Feb 2016 - 10:26 pm | विवेक ठाकूर
त्यामुळे ते अंतिम आहे . अर्थात , सत्य काय आहे ह न समजल्याचा, हा पुन्हा एकदा पुरावा दिला गेलायं
23 Feb 2016 - 10:33 pm | तर्राट जोकर
इरीटेट करण्यात मला पीएचडी करायची आहे, माझे गाईड व्हाल का?
26 Feb 2016 - 1:30 pm | गामा पैलवान
तजो, इरिटेट करण्यासाठी पिण्यासाठी हपापलेला दारुड्या व्हायची गरज नाही. ;-)
आ.न.,
-गा.पै.
23 Feb 2016 - 9:58 pm | होबासराव
ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ.
बाडिस सगा सर ;)
23 Feb 2016 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
षोडशोपचार पूजा नीट क्रमवार सांगुन शेवटी आरती मंत्रपुष्पाचे सूर मनाला समाधान देत जावेत तसा काहिसा फील लेख वाचताना येत गेला.. आणि शेवटी
या तीर्थ प्रसादाने
@
@
पूजेची सांगता उत्तम जाहली आहे.. :)
आता हा लेख मी (आपल्या नावासह..) प्रसाद म्हणून इथपर्यंत पोहोचलेल्यांना द्यायला मोकळा. ;)
धन्यवाद.
24 Feb 2016 - 8:39 pm | होबासराव
एकदा कॉलेज ला असतांना एक रामकृष्ण मिशन चा कार्यक्रम अटेंड करावा लागला होता, वक्ता मुंडण केलेला, मिशन चे लोक घालतात तसला भगवा ड्रेस्...वक्त्याने लोकांना प्रश्न केला.
मि म्हणजे काय ?
हा माझा हात आहे, म्हणजे मि नव्हे.
हे माझे डोके आहे म्हणजे मि नव्हे.
असे सगळे मानवि अवयव मोजुन झाले, आत्मा सुद्धा झाला.... माझा आत्मा..म्हणजे मि नव्हे.
नंतर त्यांनि मि म्हणजे काय वर एक छान छोटेखानि प्रवचन दिल, काहि कारणाने पण त्या वेळेस मि तिथे नव्हतो.
मिस्ड दॅट्...पण जेव्हा पुन्हा परतलो तेव्हा वक्ता कॉलेज च्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर अगदि हसतमुखाने ओघवत्या भाषेत आणि तरिहि घास कोंबुन खाउ घातल्यासारखे न करता देत होता. आमच्या ग्रुप मध्ये मुस्लिम मुले-मुलि हि होत्या स्वेच्छेने आलेल्या.
कोंबुन खाउ घालणे:- फोर्सफुली आपले मत पटवुन देणे
2 Mar 2016 - 5:58 pm | बॅटमॅन
गावडे सर, अगदी नेमके लिहिलेत. जड पण प्रॅक्टिकलसुद्धा.
2 Mar 2016 - 6:28 pm | निशांत_खाडे
सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही.
अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट लेख.आपणाकडून असेच दर्जेदार वाचायला मिळावे हि अपेक्षा. लिहित रहा, गावडे सर.
2 Mar 2016 - 9:00 pm | नन्द्या
हे विधान, तसेच निओ कॉर्टेक्स मुळे प्रश्न उद्भवले हे विचार निराशावादी वाटतात. खरे तर उत्क्रान्त मेन्दू वा निओकॉर्टेक्स चा वापर कसा करायचा हे त्या दोन गोष्टीन्मुळेच कळते. शिवाय नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करणे, जंगली, हिम्सक विचारानच्या ऐवजी दया क्षमा शान्ति हे कसे चान्गले हे सगळे उत्क्रान्त मेन्दू मुळेच कळले.
अणुशास्त्र शिकल्यावर त्यापासून बाँब बनवणे वा उर्जा उत्पन्न करणे हे दोन्हीहि त्या उत्क्रान्त मेन्दूमुळेच शक्य आहे.
तर या उत्क्रान्त मेन्दूला शाप, प्रष्नमूलक समजावे की त्यापासून विधायक कार्य कसे करता येईल याचा विचार महत्वाचा. व तो करायलाहि योग्य मार्गाने विचार् करणारा उत्क्रान्त मेन्दूच पाहिजे.
यासाठी उत्क्रान्त मेन्दूचा वापर करून धर्म नावाची कल्पना काढून त्यात निरनिराळ्या विद्वानान्नी जगाला मार्गदर्शन केले. पण त्याचा विपरित अर्थ करून जगणे म्हणजे शाप - अनेक प्रश्न हे सगळे दिसते. म्हणून मग शाप प्रष्न असे निराशावादी विचार. आशा आहे की हेच विचारवन्त पुढे जाऊन त्यातून मार्गहि काढतील नि उत्क्रान्त मेन्दू हा केव्हढा वर आहे हे दाखवून देतील.
4 Mar 2016 - 12:48 am | निशांत_खाडे
जॉर्ज कार्लीन यांचा हा विडीओ जरूर पाहावा..