मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात.
अगदी कालचीच घटना घ्या.पुण्यात हेल्मेट सक्ती करून वसुली सुरु झाली अन वादविवादांना अस तोंड फुटले कि पुणेकरांनी ऑफिसला जाण्याऐवजी ट्राफिक पोलिसाबरोबर वादविवाद करून पोलिसांनाच टोपी घातली.एकतर पुणेकरांना (दुस्र्यास )टोपी घालण्याची सवय.आज दुसरा कोणीतरी आपणास टोपी घालतोय या विचाराने पुणेकरांच्या डोक्याला मुंग्या आल्या.
पुणेकरांच्या म्हणण्यानुसार हेल्मेट घातल्यामुळे सूर्यकिरण मेंदूपर्यंत पोहचत नाहीत आणि त्यामुळे मेंदूची वाढ खुंटून वादविवाद करण्यात अडचणी येतात.एकतर आम्हा पुणेकरांकडे एकच चातुर्यआहे आणि ते म्हणजे वाक्चातुर्य.सरकारने हेल्मेट घाला अस सांगून सूड बुद्धीने आमच्या चातुर्यावरच घाला घातला आहे असा त्यांचा मुद्दा.काही जन तर म्हणत होते कि खरेतर गुडघ्याला सुरक्षित ठेवण्याची जास्त गरज आहे पण पुणे करांचा हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला नाही.काहींनी पोलिसांनाच कडेला घेउन यामुळे होणारे आर्थिक नुकसान समजून सांगितले.
दिवसभर एवढी चर्चा झडली कि पोलिसच हेल्मेट वापरल्याने गुडघ्या पासून मेंदुदुखीपर्यंत काय काय त्रास होतात हे लोकांना सांगू लागले.संध्याकाळपर्यंत कुठे पुणेकरांच्या डोक्याला - हेल्मेट लावता असं म्हणून पोलिसांनी पावतीपुस्तकाची पुंगळी करून खिशात घातली आणि पुणेकरांना वादविवादात जिंकल्याबद्दल गुलाबाच्या फुलांची सोय करून चौकाचौकात वाटायला सुरुवात केली.पुन्हा एकदा पुणेकर आपलं रिकाम डोकं घेउन आनंदाने विहार करू लागले.मित्रांनो हे सर्व पाहून मला मात्र "गड्या आपुला गाव बरा" असं म्हणण्याची वेळ आली.
प्रतिक्रिया
16 Feb 2016 - 8:18 pm | होबासराव
दुसरा कोणीतरी आपणास टोपी घालतोय या विचाराने पुणेकरांच्या डोक्याला मुंग्या आल्या.
पुणे म्हंट्ल्यावर धाग्यात पोटेंशिअल ते असणारच्...पण हा धागा विषयाला धरुन चालल्यास हा आपला पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.
16 Feb 2016 - 9:41 pm | मुक्त विहारि
तुर्तास इतकेच...
16 Feb 2016 - 10:07 pm | मम्बाजी सर्वज्ञ
पुणेकरांची सहनशीलताच आता त्यांच्या अंगाशी यायला लागली आहे.
आधी आजू बाजूचे गुंठामंत्री फक्त गाड्या घालायचे अंगावर, आता येतो जातो तो शाब्दिक मार पण देऊन जातो.
अजून किती काळ 'सहन' करणार?
तसाही भारत 'असहिष्णू' झाला आहेच, कशाला राहायचं मागे पुणेकरांनी?
16 Feb 2016 - 9:55 pm | कपिलमुनी
पुण्याचा नाव आला आणि १०० नाही तर कसा चालायचा म्हणून प्रतिसाद !
बाकी
वाघोलीच्या पुढचे नगरवाले पण आम्हा पुणेकरांना म्हणायला लागले .
पुणे फारच वाढला ओ !
16 Feb 2016 - 10:04 pm | मम्बाजी सर्वज्ञ
अगदी हेच म्हणणार होतो.
आज काल अगदी ७० ८० मैल गेल्यावर पण 'आमच्या वेळचं पुणं असं नव्हतं' अशी वाक्य ऐकू येतात. गम्मतच आहे. आणि देशाबाहेर गेल्यावरही पुणेकरांना दगड मारतात. फ्याड झालंय. दिसला पुणेकर करा शिमगा!