( हे अजुन एक खूप जुनं ललित (सप्टे २००८) ! आजकाल बॉल्गवरचा कचरा आवरायला लागले आहे तेव्हा असं काही जुनं पुराणं सापडतं ... ह्या वर्षी कधी नव्हे ते मुंबापुरीत थंडी पडली आहे.. थंडी म्हणजे चांगलीच थंडी ...बा.भ. बोरकरांची "माघामधली प्रभात सुंदर " ही कविता आठवावी इतकी थंडी .... त्या निमित्ताने हे आठवले )
||काकड आरती ||
आज्जी पहाटे पहाटे उठायची.
कार्तिक स्नान महापुण्यवान अस काही तरी म्हणायची .
आम्ही साखरझोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ करायाची .....
अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्ट से मन्त्र. अजुन ही आठवत आहे ती आजीची गड़बड़....
मग झोपेतून डोळे पुसत पुसत उठलेली आम्ही तिघ-चौघ नातवंड .....ती आज्जीच्या हातातली फुलांची परडी ,त्यातल्या २-४ उदबत्या अन् पारिजातकाच्या फुलाचा तो मंद मंद सुगंध ......
मग
काल्या रामाच्या मदिरातल्या त्या तीन मूर्ती.... दही दूध तुपाने माखलेल्या ......टाळ मृदुन्गाचे स्वर.... एक सुंदरशी काकड़ आरती .......आणि इतर ५-६ आजज्या ... भाव मग्न होउन ,तल्लीन होवून गानारया
" काकड आरती परमात्मया रघुपती , राजाराम रघुपति
जीवी जीवा प्रकाशली कैची निजात्मज्योती |
त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबिला ,द्वैत घृते तिंबिला,|
उजळली निजात्मज्योती तेणें जळोनिया गेला |
काजळी ना मैस नाही जळमळ डळमळ ना जळमळ डळमळ |
अवनि ना अंबर , प्रकाश निघोट निश्चळ |
उदयो ना अस्तु तया बोध प्रातःकाळी , तया बोध प्रातःकाळी |
रामी रामदास सहजी सहज ओवाळीं || "
"ए आज्जी ,
दही दूध खायचं सोडून वाया का घालवत आहेत???
रामाचं अंग दहि दुधान चिकट होत असेल ना? त्याला आवडत का तसं??
इथला राम काला? ..अन् तिथला गोरा अस का??
राम नक्की काला की गोरा ???
सांग ना"
असले हे आमचे बालिश प्रश्न ......
अन् सगळ्याना पुरून उरणार तिचं साध सोप्पसं उत्तर
....
...
...
'एक स्मित हास्य '....
....
....
एक समाधानाचा
धन्यतेचा भाव
उभे राहिलेले रोमांच ....आज्जीच्या डोळ्यात तरळणारे ते दोन अश्रुंचे मोती
मग
॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥
.................................ते स्मित हास्य तेव्हा काही उलगडलं नाही आम्ही तिन चार भावंड शुन्यात हरवलेली एकामेकाकडं " तुला तरी कळालं का रे" ह्या नजरेने पाहणारी..............
...
...
आत्ता आज्जी नाही...त्या ५-६ आज्या ही नाहीत
पण
तो कार्तिक तसाच...त्यातलं ते थंड पाणी तसच ...
आजी म्हणायची तेच मन्त्र
आमचा जागेवर मात्र दुसरं कोणी तरी साखरझोपेत...
ती काकड़ आरती ........ते स्वर ..........तो पारिजातकाचा सुगंध मात्र तसाच... अगदी तसाच्या तसा !
काला राम ही तसाच ...इतकी वर्ष दुधातुपात नाहुनही अजुन ही तितकाच काला
पण
त्याच्या चेहर्यावर ही एक तसंच स्मित हास्य
अगदी तसाच तो धन्यतेचा समाधानाचा भाव... आज्जी आठवण करुन देणारा
...
...
...
हे स्मित हास्य कधी उलगडनार आहे की नाही रामच जाणे !!!
॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥
प्रतिक्रिया
10 Feb 2013 - 9:36 pm | पैसा
आम्हीही कंदील घेऊन ४ वाजता काकड आरतीला जात होतो त्याची आठवण झाली. फारच सुरेख लिहिलं आहे.
10 Feb 2013 - 10:28 pm | मितान
माझीही आज्जी नि पणजी काकडाआरतीला जायच्या हे आठवलं ! गोदाकाठचं माझं सगळं गाव पहाटे गंगेवर असायचं. उठून त्या दोघींसोबत जाणं खूप जिवावर यायचं. पण पहाटे गंगेच्या कोमट पाण्यात एक डुबकी मारून घाटावर पायरीवर बसून तो सोहळा बघताना ७-८ वर्षाची मी स्तब्ध होऊन जायचे. पहाटेचा अंधार, त्यात गंगेवर लोकांनी लावलेले दिवे, स्तोत्रांचा आवाज, लखलखणार्या कळश्या,ऊद धूप यांचा संमिश्र गंध, कण्हेर पारिजातक यांची नदीत वाहणारी फुले, आणि घाटावरून वर गेल्यावर नामस्मरण करीत जाणार्या, खांद्यावर पडलेले धुतलेल्या लुगड्याचे पिळे नि हातात कळशी घेतलेल्या माझ्या सगळ्या आज्या नि पणज्या....
गिरिजा, तुमच्या लेखनानं मला पुन्हा एकदा लहानपणात फिरवून आणलं. धन्यवाद ! :)
11 Feb 2013 - 12:58 am | किसन शिंदे
अहाहा!!
सगळं चित्र नेमकं डोळ्यासमोर उभं राहीलंय.
11 Feb 2013 - 1:29 am | अग्निकोल्हा
.
11 Feb 2013 - 6:46 pm | शुचि
सुंदर प्रतिसाद.
10 Feb 2013 - 10:47 pm | jaypal
धन्यवाद गिरीजा. छान लिहील आहेस
11 Feb 2013 - 12:44 am | कवितानागेश
सुंदर वर्णन.
फार वर्षं झाली काकड आरतीला जाउन... :(
11 Feb 2013 - 12:55 am | किसन शिंदे
काकड आरतीचं अगदी सुंदर वर्णन केलंय.
आत्ताच्या पिढीतली बहूतांशी लोकं हि अजाणत्या वयात म्हणजे १०/१२ वर्षाच्या आत आपल्या बाबा/आज्जी/आजोबांसोबत गेली असतील, त्यानंतर कधीच गेली नसावीत.
11 Feb 2013 - 2:01 am | रेवती
अगदी आठवण आली आज्जीची! लेखन आवडले.
11 Feb 2013 - 5:05 am | स्पंदना
सुरेख!
11 Feb 2013 - 4:35 pm | मूकवाचक
+१
11 Feb 2013 - 9:06 am | अधिराज
छान लिहिले आहे.
11 Feb 2013 - 11:15 am | श्रिया
सुंदर, लेखन आवडले. जिव्हाळ्याने लिहिले आहे हे जाणवलं.
11 Feb 2013 - 2:20 pm | प्रसाद गोडबोले
बा.भ. बोरकरांची "माघामधली प्रभात सुंदर " ही कविता आठवावी
>>> चुकीबद्दल दिलगीर आहोत . सदर कविता "पितात सारे गोड हिवाळा" ह्या नाव्ने प्रसिध्द आहे अन तिचे कवी बा.सी.मर्ढेकरांची आहेत !
11 Feb 2013 - 4:19 pm | ५० फक्त
आजी आजोबांचं सुख लाभणार नाही,असा शाप घेउन आलेले असतात काही जण,माझ्यासारखे.
11 Feb 2013 - 5:18 pm | तर्री
काकडआरतीच्या रम्य आठवांनी मुग्ध होण्यात आले आहे ....गप्प !
11 Feb 2013 - 6:47 pm | शुचि
आवडले.
11 Feb 2013 - 6:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नशिबवान आहात.
सुंदर लिखाण.