शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला. मग कन्सेशनपास मिळायला लागल्यापासून फर्स्टक्लासने यायला लागलो.
सकाळी-सकाळी गोरेगाव-जोगेश्वरीला लागून जलद ट्रेन दौडु लागली, की पूर्वेकडे उगवणारा भलामोठा तांबडा सूर्य बघून आपण दहिसरला का बरं राहतो, असं राहून राहून वाटतं. वांद्रे जवळ आलं की तिथल्या खाडीत प्रत्येक ट्रेनच्या या-ना त्या डब्यातून कचऱ्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पडायला लागतात, तेव्हा त्यांना फेकणाऱ्या लोकांनाच फेकून द्यावंसं वाटतं. पुढे माहिम-माटुंगा हा प्रवास जीव (म्हणजे नाक) मुठीत धरून करावा लागतो, निदान सकाळच्या वेळीतरी. माहिम-माटुंगा दरम्यानच्या सर्व रेल्वेपट्ट्या म्हणजे मुंबईतील सर्वात मोठं सार्वजनिक मलनिस्सारण केंद्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. केवळ मोठं असल्यानेच तिथे रांगा लागत नसाव्यात, इतकाच काय तो त्यातला आणि बाकी "सुलभ' मधील फरक. दादरला ट्रेन लागली, की अतिशय चिंचोळ्या जिन्यांवर मुंबईकरांच्या फौजा चढाव करायला सुरुवात करतात, ते बघणं म्हणजे एक डिफरंटच अनुभव असतो. सेकंडक्लासात मराठमोळ्या, तर फर्स्ट क्लासात प्रामुख्याने गुर्जरगप्पा कानी पडतात. कधीकधी हिंदी आणि इंग्रजीत गप्पा झाडणारी माझ्यासारखी कॉलेजवयीन मुलं सुद्धा येतात. बारावीत भल्या पहाटे उठून क्लासला जायचो, म्हणून वसई-विरार वरून येणाऱ्या गाडीत चढायचो. तिथे तर भलताच प्रकार. वसईच्या लोकांची भाषा काही निराळीच आहे. त्यातलं ओ-का-ठो मला कळलं नाही कधी. या गाड्यांमध्ये एखाद-दुसरे नायजेरियन नागरिक सुद्धा दिसून येतात. विरारवरून येणारी बहुतेक मंडळी, ही अंगापिंडाने चांगली मजबूत असतात. त्यामुळे "अपना पैर हटाओ, हात निकालो, बाजू हटो ना, उतरो जल्दी जल्दी' अशा तुसड्या स्वरातील सुचना त्यांना द्यायला माझं मन (आणि तोंड) कधीही धजत नाही.
ट्रेनमध्ये सगळ्यांत मजेशीर आणि कधीकधी(म्हणजे तशी नेहमीच) किचकट वाटणारी एक गोष्ट म्हणजे लेडीज डब्याबाहेरचा आणि आतला गोंधळ, धक्काबुक्की आणि कलकलाट. त्या डब्यात आधी कोण चढतो (ते), यावरून ( अक्षरश: ) मारामारी होते. एकमेकींच्या वेण्या, ओढण्या, पदर ओढत या बायका ना धड स्वत: नीट चढतात, ना दुसऱ्याला चढू देतात. बरं गाडी ज्या दिशेनं चालली आहे, त्यादिशेकडे तोंड करून कधीही चढणार किंवा उतरणार नाहीत. वसई-विरार ट्रेनमध्ये, परतीच्या वेळी, गोरेगाव-मालाड(आजकाल काही ठरावीक गाड्या थांबतात), दहिसर इथे हमखास बाया प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल जाऊन आदळताना आढळतात. काही स्त्रिया माझ्या या सगळ्या निरीक्षणावर आक्षेप घेतील बहुतेक, पण माझ्या कित्येक मैत्रिणींनी स्वत:च या गोष्टीची "लेडीज कंपार्टमेंट? बापरे! डोंट आस्क!' अशा काहीशा शब्दांत कबुली दिली आहे, की "जेंट्स खूपच को-ऑपरेटिव्ह असतात.' सकाळी सकाळी विरारहून येणाऱ्या गाड्या आमच्या बोरीवलीहून निघालेल्या संथ गतीच्या ट्रेन्सच्या बाजूने भरधाव वेगाने जातात. त्यांच्या कोणत्यातरी डब्यामध्ये झांजांचा आवाज नेहमी येत असतो. लोक भजन म्हणत असतात. मला एकदातरी त्या भजन गाणाऱ्या लोकांच्या डब्यातून प्रवास करायचा आहे, पण आजपर्यंत तरी तो योग आलेला नाही. दहिसरला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिंटानी येणाऱ्या गाडीमध्ये पुढच्या फर्स्टक्लासमध्ये काही अयोध्येकरांनी रामाच्या रटाळ आरती-स्तोत्रांचा सपाटा लावलेला असतो. खरं तर, त्या आरत्या रटाळ नसाव्यात, पण त्या गाणाऱ्या लोकांचचं स्वरज्ञान बेताचं असतं, त्यामुळे त्या डब्यात चढलं, की डोकं फिरतं. पण एक वेगळीच गोष्ट आहे, जी या सगळ्यापेक्षा हटके आहे, आणि भारतीय रेल्वेची ती एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्टेशनावरील चित्रविचित्र पोशाखातील विविध रंगाढंगाच्या मुलींपेक्षाही हीगोष्ट माझ्या जास्त नजरेत भरत आलीय. ती म्हणजे - पिचकारी - थुंकी !
रेल्वेने रोज हजारो लोक प्रवास करत असतात. त्यातले शेकडो लोक येता-जाता थुंकत असतात. कोणी दरवाज्यात लटकत असताना अधून-मधून थुंकतं, कुणी त्या लटकणाऱ्यांना बाजुला व्हायला सांगून स्वत:ची पिंक टाकून घेतं, तर कुणी खिडकीच्या गजांमधून थुंकतं. कुणी पचा-पचा थुंकत राहतात, कुणी घसा खरवडून "खर्राक्... थू' करतात. कुणी जीभेनं आणि प्रसंगी बोटाने तोंडात उरलेला सगळा चोथा ओठांशी आणून मग थुंकतात. कुणी थुंकतंय की ओकतंय तेच कधी कधी कळत नाही. काही जण हनुवटी गळ्याजवळ आणून, मग ती पुढे नेताना थुंकतात, जेणेकरून थुंकी लांबवर उडावी. काहीजण नुसतेच जुन्या नळातून सरळ पाणी खाली गळावं तसे थुंकतात. कुणी लाल थुंकतात, कुणी नुसताच पांढरा फेस थुंकतात, कुणी थुंकायला मजा येते म्हणून सुद्धा थुंकत असावेत - काही सांगता येत नाही. अहो, ढुंगणातून काढायचा, तो धूर नळकांडी वापरून तोंडातून काढणारे आणि त्याला "कूल' म्हणणारे का थोडे आहेत? त्यांच्या तुलनेत थुंकणं हे कूल असतं, असं कुणी मानलं तर त्यात विकृती ती कसली? असो.
लहानपणी मला या थुंकणाऱ्यांकडे बघून मोठी मजा वाटायची. रस्त्यातून येता-जाता मला जागोजागी थुंकलेलं दिसून यायचं. एकेकाची थुंकी भरपूर मोठ्ठी असायची. मी एकदा थुंकुन पाहिलं, तर माझी थुंकी त्यामानाने खूपच छोटी वाटली मला. मी नाराज झालो. पण त्यावेळी आपण सलमान खानला फायटिंग शिकऊ शकतो, असे मानणारे काडी-पेहेलवान आम्ही! थुंकी मोठी दिसावी, म्हणून लोक ती आधी तोंडात साठवून घेत असावेत, आणि पुरेशी साठली, की मग थुंकत असावेत, असं मला वाटलं. कारण असं केल्याशिवाय माझी थुंकी मोठी येत नाही, आणि जर माझी येत नाही, तर इतर कुणाची कशी बरं येईल? या गोष्टीला इगो-सेंट्रलिझम असं म्हणतात म्हणे - लहान मुलांमध्ये नेहमी आढळून येतो. काही जण म्हणतात, की तो माझ्यात अजूनही आहे. ते जाऊ दे. तर आईबरोबर एकदा फिरत असताना, माझ्या बाजूने एक माणूस गेला आणि जाताना थुंकला, त्याची थुंकी छानपैकी नाण्याच्या आकाराएवढी मोठी होती. मी लगेच प्रयोग करून बघितला. चांगली तीन-चार मिनिटं मी तोंडात जमेल तेवढी थुंकी गोळा करण्यात घालवला. मग मी ती थुंकलो. लगेच आईने मला फटका मारला, तिथल्या तिथेच. "सगळे थुंकतात म्हणून मी सुद्धा थुंकतो, मला मोठी थुंकी हवीये सगळ्यांसारखी', असं मी म्हटल्यावर मला अजून एक फटका बसला. "ते थुंकणारे लोक घाण्णेड्डे असतात, आपण थुंकायचं नाही त्यांच्यासारखं' अशी समज मला देण्यात आली. तेव्हापासून मी रस्त्यात थुंकणं जे बंद केलं(त्यापूर्वी तरी असा कितींदा थुंकलो होतो म्हणा), ते आजतागायत मी कधी थुंकलेलो नाही, आणि थुंकणारही नाही. लहान असताना सुट्टीत ठाकूरद्वारला आजीकडे जायचो, तेव्हा तिथल्या चौथ्या मजल्यावरून जिन्यामधून वाकून बघायचो, आणि थेट तळमजल्यावर नेम लाऊन थुंकायचो. एवढ्या वरून स्वत:ची थुंकी खाली जाताना बघताना मजा यायची. तो खेळच होता माझा. कंटाळा येईपर्यंत खेळत बसायचो रोज संध्याकाळी. एकदा कुणा बाईच्या अंगावर माझी थुंकी पडली. तिने मान वर करून बघायच्या आतच मी मान मागे केली आणि घरात धूम ठोकली. तेव्हापासून तो खेळ बंद झाला. आता मी ना रस्त्यात थुंकायचो, ना जिन्यात. पण उल्हासनगरला जात असताना, ट्रेनमध्ये माझ्या समोर बसलेल्या आजीबाईंनी थुंकण्याची एक वेगळीच स्टाईल मला दाखवली. म्हणजे, त्या थुंकत होत्या, मी बघितली. दात एकमेकांवर ठेऊन त्यांच्या फटींमधून त्या खिडकीबाहेर थुंकत होत्या. मला ते बघून सापाच्या फुत्काराची आठवण झाली. लगेच मलाही त्याचं प्रात्यक्षिक करायची हुक्की आली होती, पण सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मी बंद केलं असल्याने, मला आमच्या बाथरूमात त्याचा प्रयोग करावा लागला - अर्थात तो अयशस्वी ठरला. कितीही केल्या माझ्या दातांमधून पुरेशी थुंकी बाहेर येईना. शेवटी मी नाद सोडला.
आज मी अजिबात थुंकत नाही. कुठेही नाही. जेव्हा लोक थुंकतात, तेव्हा ते बघायला किळस वाटते. असं वाटतं की जाऊन एक थोतरीत ठेऊन द्यावी त्या थुंकणाऱ्याच्या. बोरिवली स्टेशनात पहिल्या आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे रूळ आहेत, त्यांच्यावरचे दगड, आणि मधलं लोखंडी कुंपण, हे सदैव लाल असतं. इतर सुचनांप्रमाणेच रेल्वेची बाई फाटक्या लाऊडस्पिकर मधून "यात्रियोंसे निवेदन है, की वे कृपया रेल्वे प्लॅटफॉर्मपर मत थुके. थुकनेसे बिमारी फैलती है' असं काहीतरी बरळत असते. तिच्याकडे कोण लक्ष देतं कुणास ठाऊक. तरी प्लॅटफॉर्मवर आजकाल नाही कोणी थुंकत जास्त. बहुधा दंड आकारत असावेत. रेल्वेने नव्या लोकल्स आणल्या, तर त्यावरही लाल रंगाची होळी खेळली जाऊ लागली. कोणाला म्हटलं, की बाबा रे, कशाला थुंकतोस, उगाच कशाला मुंबई खराब करतोस, तर "मुंबई? कचरपट्टी तो है, सब कचरा करते है. उसमे मैने जरासा थुक दिया तो इतना क्या बिघडने वाला है?' असंच काहीसं उत्तर ऐकायला मिळणारच. जिथे आपण राहतो, जी आपली कर्मभूमी आहे, तिचा जरासा तरी आदर उरी बाळगायला नको का? मला तर लहानपणीच समज आली नशीबाने, आता बाकीच्यांना कधी येईल ते बघूया. खरं तर शहाण्यास शब्दाचा मार... या नियमाने अश्या थुकाड्यांना बडवूनच काढायला हवं. सार्वजनिक मालमत्तेविषयी अनादराची प्रवृत्ती इतकी बोकाळली आहे, की कुल्यावर चार छड्या बसल्याशिवाय अशा लोकांना समज यायची नाही. चार-पाच वर्षं जरी थुंकणाऱ्यांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर जरब ठेवली, की भितीपोटी का होईना, या वाईट सवयी सुटतील. आणि एकदा त्या सुटल्या, मनोवृत्ती बदलली, की आपोआप स्वच्छतेची आवड निर्माण होऊन लोकच या नियमांचं पालन करतील. एवढंच नाही, तर त्यांची मानसिकता एवढी बदलेल, की प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवणाऱ्यांची गरजही लागणार नाही; एखाद्या थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमधल्या डब्यातील एकजात सगळ्यांनी झापताना, सुनावताना मला बघायचंय. लाजेनं थिजुन जाऊन ती व्यक्ती नरमली तर ठीक, नाहीतर अशा माणसाला थोडा चोप मिळाला तरी हरकत नाही. आणि एकदा का अशा प्रसंगांना सुरुवात झाली, की आपोआपच अमेरिका आणि लंडनसारख्या प्रदेशांना पॉश मानणाऱ्यांना सध्या कचऱ्याखाली गाडला गेलेला आपला "पॉश' देश दिसू लागेल.
प्रतिक्रिया
7 Oct 2012 - 12:26 am | दादा कोंडके
बस-ट्रेन मधला घाणेरडा वास नको म्हणून महामुष्कीलीनं खिडकीशेजारील सीट मिळावी आणि शेजारचा थुंकसंप्रदायी दर दोन मिनिटानी आपल्या मांडीवर ओणवा होउन खिडकीबाहेर पाव किलो पत्तकन थुंकावा, असा अनुभव अनेकदा घेतला आहे. :)
बंगळुरहून पुण्याला येताना वोल्वो बस मध्ये गुटखा खाणारी मंडळी पायाशी रिकामी बाटाली घेउन बसली की किळस येते.
परवा इथं (जर्मनीत) ऑफीससमोरच रस्त्यावर एक भारतीय कर्मचारी निव्वळ चाळा म्हणून दातांच्या फटीतून चक-चक करत थुंकत असलेला पाहिला.
7 Oct 2012 - 2:21 am | रेवती
एकंदरीतच घाणेरडा प्रकार आहे हा. तुमची कळकळ लेखनातून समजली. मीही लहानपणी कोणा नातेवाईकांच्या बिल्डींगमध्ये जाऊन (दुसरे कोणी खेळण्यास नसल्याने) थुंकण्याचा खेळ सुरु केला पण आईच्या लगेच लक्षात आले व प्रसाद मिळाला. ;)
7 Oct 2012 - 4:03 am | शिल्पा ब
लेख थोडासाच वाचला पण साधारणपणे रस्त्यावर कुठेही पचापचा थुंकणे ही खास भारतीय संस्कृती आहे हे नमुद करुन इच्छिते.
7 Oct 2012 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> रस्त्यावर कुठेही पचापचा थुंकणे ही खास भारतीय संस्कृती आहे हे नमुद करुन इच्छिते.
बरं......! भावना पोहचल्या. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2012 - 9:13 am | जेनी...
अइसा नही बोलते हय शिल्पा बहन .अपनेही लोगोंको इस तरह से बदनाम नहि करते हय शिल्पा बहन .
( अवांतर : लेख अजुन वाचायचा बाकि आहे ,पण शिल्पिची हि प्रतिक्रिया मनाला भिडली )
7 Oct 2012 - 8:23 am | हुप्प्या
थुंकणे ही भारतीय संस्कृतीचा भाग बनलेली किळसवाणी, अनारोग्यकारक सवय. इतक्या लोकांना इतक्या वरचेवर का थुंकावे लागते हे एक अगम्य कोडे आहे आणि मूत्र वा मलविसर्जन करताना थोडातरी आडोसा बघितला जातो पण त्याच तोडीचे थुंकणे मात्र बिनदिक्कत कुठेही केले जाते हे संतापजनक आहे.
ह्याविरुद्ध एक संघटना बनवायला हवी. जे परिस्थिती बघून सामदामभेददंड जे शक्य आहे ते वापरुन थुंकणार्याला समज देतील. दुसरा कुठलाही अजेंडा नाही केवळ थुंकण्याचे निर्मूलन करणे हाच. मग विविध जाहिराती, लेख वा अन्य मार्गाने लोकांना ह्या सवयीपासून परावृत्त करायचे.
अशी कुठली संघटना असल्यास सांगा.
नुकतेच लोकलने सीएस्टी ते वाशी प्रवास करायचा प्रसंग आला. जवळजवळ सगळा रेल्वेमार्ग हा एक प्रचंड कचराकुंडी बनलेला आहे. जेथे नजर टाकावी तिथे गलिच्छ कचरा पडलेला जोडीला अफाट दुर्गंधी. बापरे! आणि सकाळी सार्वजनिक संडास. असल्या जागा म्हणजे रोगजंतूंचा बुजबुजाट असणार. ह्या मार्गावरून येणार्या जाणार्या प्रवाशांना वरचेवर आजाराचा सामना करायला लागत असणार. सार्वजनिक ठिकाणी इतकी घाण करणे हे लोकांच्या आरोग्याशी खेळणे आहे हे कधीतरी लोकांच्या लक्षात यावे ही इच्छा.
7 Oct 2012 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किळसवाणे वाटणारे पण वास्तव असणारं चित्र रेखाटलं आहे, शेवटचा उतारा आशादायी आहे.
>>>जेव्हा लोक थुंकतात, तेव्हा ते बघायला किळस वाटते. असं वाटतं की जाऊन एक थोतरीत ठेऊन द्यावी
एका किरकोळ देहयष्टी असणार्या आणि तोंडात चबर-चबर करत सारखं बसच्या दारात उभं राहून बाजूच्या खिडकीतून थु़की फेकणार्यास आपली थुंकी प्रवाशांच्या अंगावर-तोंडावर उडत आहेत, याचे भान नसणार्या एका गधड्याला चित्रपटातल्या हिरोसारखं जागेवरुन उठून काहीही न बोलता एक खाडकन ठेवून दिलेली आहे.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2012 - 1:03 pm | दादा कोंडके
त्याचा दोष किरकोळ देहयष्टी होता थुंकणे नव्हे. ;)
7 Oct 2012 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे
काही वेळा थुंक ही उत्सर्जनाची अपरिहार्यता असते.अर्थात हे थुंकीसम्राटांना लागू नाही.
7 Oct 2012 - 1:40 pm | मालोजीराव
पूर्वी इमारतीच्या जिन्यांचा कोपरा (विशेषतः सरकारी) म्हणजे थुन्क्यांचा धबधबा वाटायचा !
आता त्या कोनाड्यात देवांच्या टाइल्स बसवल्यात ठिकठिकाणी, थुंकसम्राटांनी सुद्धा देवतांविषयी आदर व्यक्त करत आणि आपला सर्व थुंकानुभव पणाला लावत देवतांच्या भोवती ज्या फ्रेमसदृश
नक्षी केल्यात ते पासून पाब्लो पिकासोची आठवण आल्याशिवाय राहत नाही
7 Oct 2012 - 3:51 pm | सस्नेह
गांधिगिरीचा काही उपयोग होईल का ?
7 Oct 2012 - 6:48 pm | तिमा
नुसते थुंकणे नव्हे तर, नाकात बोटे घालणे व ते सीटखाली पुसणे, तोंडावर हात न ठेवता खोकणे, पानमसाला वा गुटखा खाऊन त्याचा रिकामा पाऊच, सीटखाली टाकणे हे सर्व प्रकारही आपल्या 'महान' देशातली जनताच करत असते.
8 Oct 2012 - 10:16 am | मदनबाण
ण माझ्या कित्येक मैत्रिणींनी स्वत:च या गोष्टीची "लेडीज कंपार्टमेंट? बापरे! डोंट आस्क!' अशा काहीशा शब्दांत कबुली दिली आहे, की "जेंट्स खूपच को-ऑपरेटिव्ह असतात.'
हॅहॅहॅ... एकमेकींकडे किती "प्रेमळ कटाक्ष" टाकताता नै त्या ! ;)
बाकी थुकण्याच्या सवईचा मला सुद्धा लयं राग हाय बरं का ! च्यामारी... सगळीकडे पान/गुठका/तंबाखु च्या विविध रंगी पिचकार्या मारलेल्या सर्रास दिसतात ! बिल्डींगमधे जिन्यात थुंकु नये म्हणुन देव-देवतांच्या टाईल्स लावल्या जातात्,त्यावर सुद्धा पिचकार्या मारलेल्या सहज दिसतात ! जनाची आणि मनाची लाज या थुकणार्या मंडळीना नसावीच !
रेल्वे ट्रॅक मधली खडी निरखुन पाहिलीत तर ती थुकुन थुकुन लाल-तांबडी झालेली सहजच पहायला मिळेल ! हिंदूस्थानी लोक सार्वजनिक स्वच्छते बाबात इतके उदासिन कसे? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
स्टेशन समोरचा नुसता रेल्वेचा ट्रॅक जरी बघितला तरी त्याची प्रचिती लगेच मिळेल... वेफर्सचे फेकुन दिलेले रॅपर्स,चहा पिउन झाल्यावर रिकामे झालेले प्लॅस्टिकचे कप,गुठक्याची रिकामी पाकिटे,सिगरेटची पाकिटे,तुटलेली एखादी रबरी चप्पल इं अनेक वस्तु रेल्वे ट्रॅकवर विखुरलेल्या सहज दिसुन येतात !
मला नेहमी वाटते,की ज्या पॄथ्वीवर माणुस जन्माला येतो,सारे आयुष्य घालवुन तिच्यातच राख होउन समावला जातो,तिची वाट लावण्यात मनुष्या इतका मोलाचा वाटा इतर कुठल्याही प्राणीमात्रांनी उचलला नसेल !
ज्या पॄथ्वीला आपणा "माता" म्हणतो तिच्यावर थुकणारा कॄतघ्न प्राणी म्हणजे मनुष्य हा होय आणि या बाबतीत आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणारी हिंदूस्थानी मंडळी आघाडीवर आहेत याचे सगळ्यात जास्त वाईट वाटते ! :(
8 Oct 2012 - 10:19 am | जेनी...
थुकणारा कॄतघ्न प्राणी म्हणजे मनुष्य हा होय !
+१
8 Oct 2012 - 11:07 am | ५० फक्त
छान लिहिलं आहेस रे एका घाणेरड्या विषयावर, धन्यवाद.
8 Oct 2012 - 8:04 pm | पैसा
हेच म्हणते! त्या गुटख्याला इतका असह्य घाण वास मारतो की लोक ते कसं खाऊ शकतात म्हणून महदाश्चर्य वाटतं.
8 Oct 2012 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या ऑफिस मधे एक दोन रंगांचे झाड होते. ऑफिसच्या खिडकिच्या बाजुला त्याचा रंग लाल होता आणि दुसर्या बाजुने ते हिरवे दिसायचे. बरेच दिवस निरिक्षण केल्या नंतर मला त्या मागिल रहस्य समजले. ऑफिस कडिल बाजुच्या पहिल्या मजल्यावरिल खिडकीतुन रोज हा रंग त्या झाडाला दिला जायचा.
असेच एक अजोबा रोज आमच्या घरावरुन जाताना आमच्या दारात थुंकुन जायचे. पण मोठ्या शर्थीने प्रयत्न करुन आम्ही ते बंद पाडले होते.
शाळेत असताना आमचे एक सर खिडकीतुन बाहेर प्रसाद टाकत आम्हाला शिकवायचे.
कॉलेज मधे तर तोंडात गुटखा ठेउन बोलणारे अनेक जण पाहिले आहेत. गुटखा खाणार्या आणि रस्त्यावर थुंकणार्या मुली सुध्दा मी कॉलेज मधे पाहिल्या होत्या.
अशा अनेक रम्य आठवणी मनात साठवत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत.
अशाच अनेक रम्य आठवणी नाक शिंकरणार्यांच्या सुध्दा आहेत. त्या बद्दल सविस्तर लेख पुन्हा केव्हातरी.
8 Oct 2012 - 4:17 pm | सस्नेह
दोन रंगांचे झाड >>>>हा हा हा..
8 Oct 2012 - 3:46 pm | गणपा
मस्त लिहिलंयस.
लहान असताना प्रवासात खिडकीत उभे रहाण्यासाठी हट्ट असायचा. (खिडकीची जागा बसायला मिळण्या एवढं थोर भाग्य कसलं आमचं.) तर अनेकदा प्रवासात खिडकीत उभे असताना भर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात (हो मुंबईत असायचा हिवाळा एकेकाळी.) पावसाचे तुषार अंगावर यायचे आणि मग मी ते झेलण्यासाठी मुद्दाम हात बाहेर काढायचो (जाळ्याही नसायच्या तेव्हा.) पुढे हळू हळू त्या वळीवाचा उगम कळला तसा हात बाहेर काढणं थांबल. =))
8 Oct 2012 - 5:01 pm | जेनी...
=))
8 Oct 2012 - 6:55 pm | रेवती
ईऽऽऽ गं बै!
8 Oct 2012 - 9:06 pm | जेनी...
हिहिहि मी एकदा ट्रेनच्या पटरीवरण रंगित दगड उचलुन आणला होता .=))
आईला म्हटलं " आईगं , बघ की कसला नॅच्युरल फिक्कट लाल रंग आहे दगडाला "
पण तीने हातातहि न घेता फेकुन द्यायला लावला :(
8 Oct 2012 - 9:20 pm | मराठे
अगदी किळसवाण्या विषयावरचा चांगल लेख आहे. थुंकणारे लोक बघितले की त्या लोकांना त्यांचीच थुंकी पुन्हा चाटण्याची शिक्षा करावीशी वाटते. गाडीतून कचरा टाकणार्यांचही तेच. पुन्हा पावसाळ्यात पाणी साचून गाड्या बंद पडल्या की म्युन्सिपाल्टीवर चिडणारे लोकही हेच. आणि सकाळी सकाळी बसणार्या लोकांबद्धल तर काय बोलायचं ! माझा मित्र गंमतीत म्हणायचा... 'सकाळी सगळे मोर पिसारा फुलवून बसलेले असतात'!
9 Oct 2012 - 12:42 am | जेनी...
=))
____/\_____
8 Oct 2012 - 9:29 pm | प्रचेतस
अशोक नायगावकरांच्या कवितेची आठवण झाली.
http://www.misalpav.com/node/15877
9 Oct 2012 - 2:25 am | बहुगुणी
वरती हुप्प्या यांनी विचारलं आहे:
ह्याविरुद्ध एक संघटना बनवायला हवी. जे परिस्थिती बघून सामदामभेददंड जे शक्य आहे ते वापरुन थुंकणार्याला समज देतील. दुसरा कुठलाही अजेंडा नाही केवळ थुंकण्याचे निर्मूलन करणे हाच. मग विविध जाहिराती, लेख वा अन्य मार्गाने लोकांना ह्या सवयीपासून परावृत्त करायचे. अशी कुठली संघटना असल्यास सांगा.
स्पिट फ्री इंडिया ही संघटना आणि या हिंमतवान बाईंसारखे अनेक 'इन्स्पेक्टर' या गलिच्छ सवयीच्या विरोधात काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करता येतील.