अवतार शंकरमहाराज
दर्शन देवूनीया
धन्य केले आम्हा आज
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
किती तुमचे गुण गावू
तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ
किती तुमचे गुण गावू
तुमचे नाव मुखी घेता
सोपे होई कामकाज ||१||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
अजाणबाहू दोन्ही कर
अष्टवक्र लाभले शरीर
अजाणबाहू दोन्ही कर
मस्तक झुकवूनीया
शरण आलो तुम्हा आज ||२||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
देशोदेशी दिल्या भेटी
तुम्ही दीनांचे जगजेठी
देशोदेशी दिल्या भेटी
लीला केल्या अनंत
भक्तीचे उलगडूनी गुज ||३||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
तुम्ही सारे धर्म भजती
सार्या भाषा तुम्हा येती
तुम्ही सारे धर्म भजती
अनंत तुमची नावे
स्मरण्या कसली आली लाज? ||४||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
कपाळी भस्म गंध टिळा
मिस्कील तेज नजर डोळा
कपाळी भस्म गंध टिळा
प्रेमळ दृष्टी ठेवा
कृपा करा आम्हांवर रोज ||५||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
उद्धरला जन्माचा पाषाण
तुमच्या भक्तीला लागून
उद्धरला जन्माचा पाषाण
पाप भंगले सारे
मुद्दलासहीत फिटे व्याज ||६||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
प्रतिक्रिया
23 Apr 2012 - 7:19 pm | चैतन्य दीक्षित
पाषाणभेदजी,
छान.
काही सुचवू का?
>किती तुमचे गुण गावू
तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ
किती तुमचे गुण गावू
तुमचे नाव मुखी घेता
सोपे होई कामकाज ||१||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||
प्रत्येक कडव्यातली पहिली ओळ पुन्हा एकदा लिहिलेली दिसते आहे, ते अनावश्यक वाटते.
(उदा. वरील कडव्यातली 'किती तुमचे गुण गावू' ही ओळ.
'तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ' या ओळीनंतर लिहिणे अनावश्यक वाटते)
अहो-जाहो करताना 'सखा' हा शब्द 'सखे' असा होईल असे वाटते.
>कपाळी भस्म गंध टिळा
हे छान लयीत वाचता यावे यासाठी कपाळी ऐवजी 'भाळी' हा शब्द वापरला तर?
धन्यवाद,
चैतन्य.
24 Apr 2012 - 1:05 am | पाषाणभेद
धन्यवाद!
>>>प्रत्येक कडव्यातली पहिली ओळ पुन्हा एकदा लिहिलेली दिसते ....
येथे चाल लिहीता येत नाही म्हणून वाचतांना दुसर्यांदा ती ओळ आल्यानंतर वाचकाच्या मनात आपोआप चाल तयार होईल हा हेतू होता. जमल्यास मी चालीत गावून दाखवतो.
>> अहो जाहो....
आधी एकेरी संबोधन वापरूनच लिहीले होते पण तो माझा उद्धटपणा झाला असता, म्हणून परिष्कृत केले. सखे होणार नाही.
23 Apr 2012 - 11:14 pm | अविनाशकुलकर्णी
ब्रह्म चैतन्य शंकरमहाराज यांचा जय जय कार असो..
स्वामी लेकरावर लक्ष असु द्या..
24 Apr 2012 - 10:06 am | सार्थबोध
एक सुचना :
"अजाणबाहू" हा शब्द "अजानुबाहू: असा आहे, क्रुपया नोन्द घ्यावि
24 Apr 2012 - 12:50 pm | गणामास्तर
या निमित्ताने कुणी शंकर महाराजांबद्दल अधिक माहिती सांगितल्यास जाणून घ्यायला आवडेल.
24 Apr 2012 - 12:57 pm | प्यारे१
+१
24 Apr 2012 - 1:19 pm | गवि
नको.. व्यक्तिगत श्रद्धेतून हे काव्य पाभेंनी इथे दिलेलं आहे. कोणीही या शंकर महाराजांविषयी किंवा कोणाही गुरु व्यक्तीविषयी अधिक माहिती मांडू गेल्यास अन्य ठिकाणी या विषयाचे जे उलटसुलट झालेलं दिसतंय तसंच इथे होऊ शकेल.
बाकी सर्वांची इच्छा..
24 Apr 2012 - 1:35 pm | चैतन्य दीक्षित
अनुमोदन
25 Apr 2012 - 12:20 am | पाषाणभेद
गवि फारच संतूलीत विचाराचे सभ्यग्रहस्थ आहेत हे पटले. तसे शंकरमहाराज मला नविनच आहेत. त्यांच्यावर काहीतरी रचना करणे ह्या हेतूने प्रस्तूत काव्य लिहीले गेले. असेच काव्य अन्य साधूसंतांची माझ्याकडून काव्य लिहून घेण्याची इच्छा असेल तर ते कार्य माझ्याकडून होईलच.
बाकी अंधश्रद्धेच्या मीही विरोधात आहेच.
30 Apr 2012 - 3:04 pm | धन्या
पाभे,एक काय ते ठरवा. दोन्ही वाक्ये परस्परविरोधी आहेत. :)
24 Apr 2012 - 1:45 pm | गणामास्तर
ठीक आहे..काही वर्षांपूर्वी मी एकदा सातारा रोड वरील शंकर महाराजांच्या मठात गेलो होतो, पण तिथे त्यांच्या बद्दल काही जास्त माहिती मिळाली नाही, म्हणून फक्त उत्सुकता म्हणून विचारले. इथे माहिती देणे सयुक्तिक वाटत नसेल तर व्यनि केला तरी चालेल.
24 Apr 2012 - 3:24 pm | सार्थबोध
http://www.shankarmaharaj.org/sm.shtml
30 Apr 2012 - 3:22 pm | अमोल केळकर
खुप छान
अमोल केळकर
6 May 2012 - 10:24 pm | अविनाशकुलकर्णी
सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे र्शी. नारायण अंतापूरकर पती-पत्नीस बालक सापडले. र्शी. व सौ. नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतारकार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्याबाबा म्हणून मानू लागले, तर खान्देशात कुँवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत.
अक्कलकोट निवासी स्वामी सर्मथ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ ऊर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉ. धनेश्वर, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद केशव अत्रे, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दांत- माझी जात, धर्म, पंथ कोणता? हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्क-वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले. परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये, असेही स्पष्ट केले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे र्शी शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव 29 एप्रिल रोजी होत आहे. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे र्शद्धा स्थान आहे.
7 May 2012 - 10:06 am | प्रचेतस
:)