क्रांतीच हवी,मात्र

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
17 Aug 2011 - 7:41 pm

(दै. कृषीवल मध्ये साप्ताहिक स्तंभ लिहितोय ..त्यातलाच हा या आठवड्याचा लेख ..स्वातंत्र्यदिवस, आण्णा आणि सारे वातावरण या सार्‍याच्या निमित्ताने .. )

६४ वा स्वातंत्र्यदिन... जवळपास दिवसाला एक याप्रमाणे भ्रष्टाचाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. गोळीबाराच्या बातम्या, राजकीय धुळवड, अतिप्रचंड महागाई, तुम्हा-आम्हा सामान्यांचे जीणेच हराम झालेले. दुर्दैवाने आज अशीच परिस्थिती आहे. अशात कोणीतरी झटकन म्हणून जातो, ‘आता क्रांतीच व्हायला हवी राव...’ बरोबर आहे ते. पातळी एवढी खालावली आहे सार्याचीच की, आता हे सगळं उलथवायला हवंच. खरंच गरज आहे क्रांतीची; पण कसल्या?

अब्जावधी लोकांचा देश आपला. त्यात एक नेता आणि बाकीचे ऐकणारे असे होणे कधीच शक्य नाही. क्रांतीला सहसा त्याची गरज असते आणि अशा क्रांतीचा शेवट कशात होईल याचीही खात्री नाही. मग, आपणच आपला मार्ग बदलूया का? आपण स्वतःमध्ये, आपल्या स्वतःत क्रांती घडवून आणू.. आपले जीवन अधिक चांगलं, सुंदर बनवायचा प्रयत्न करु. शेवटी आपल्याला तेच हवंय हां... आणि, देश बनतो तो तुम्हा-आम्हाला मिळून. आपलं भाग्य बदललं की त्याचं भाग्य बदलणारच. दरवेळी न चुकता मतदान करतो का आपण? विचारुया ना आपल्यालाच. प्रायमरी गोष्ट आहे ती. सत्ताधार्यांना तर रोजच नावं ठेवतो आपण. पण, खरोखर आपणच निवडलंय का त्यांना? का, आपण सुट्टी घेतली म्हणून ते निवडून आलेत आणि त्यांनी आपल्यालाच सुट्टी दिलीय? फारच छोटी गोष्ट आहे ही; पण खूप बदल घडवणारी. माझ्या एका मतानं कदाचित फरक पडणारही नाही. पण, ‘मी मतदान करतो.’ ही भावनाच मोठी आणि महत्त्वाची आहे.

परवा बॉम्बस्फोट झाल्यावर कसाबच्या वाढदिवसाचा मेसेज मीही झटकन फॉर्वर्ड केला. नंतर कळलं, हे करणं खरंच गरजेचं होतं का? प्रतिक्रियावादी झालो का मी? यानं तर त्यांचं अजूनच फावेल. मित्रा, विचार करायला हवा रे. आपण, झटकन रिऍक्शन देऊन जातो. पण, आजकाल ‘दिसतं तसं नसतं म्हणून जगं फसतं’ चा प्रत्यय पुन:पुन्हा येतोय. मीडिया काय सांगतेय, नेता काय म्हणतोय, यापेक्षा आपणच गोष्ट नीट जाणून घेतली तर? खूप वेगळं होईल. कोणाच्या हातातलं बाहुलं बनणार नाही आपण.

मध्यंतरी एक चित्रपट आला होता, ‘शहाणपणा देगा देवा.’ त्यातल्या गाण्यात शब्द होते ‘सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवलीयका आपण?’ खराखुरा वाटला तो प्रश्न. आपण शिकलो, इंटरनेटने जग जवळ आलं; पण आजही आपण इतरांसाठी दगड का उचलतो. जग जवळ येत असताना भाषा, प्रांत, जात करुन आपण स्वत:लाच संकुचित करत नाही का? एखाद्या विषयावर भावनाप्रधान असणं, ठाम मत असणं चांगलंच. पण, आपल्या भावनांचा वापर तर केला जात नाहीत ना? बाजार मांडलेला नाही ना? आज असंच वाटतंय की, त्याचा वापर केला जातोय थांबवायला हवा तो.

‘भ्रष्टाचार करुच नका’ असं म्हणणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आज, जवळपास सगळेच भ्रष्टाचाराने वागतात (अपवाद वगळून) त्यामुळे, आपण भ्रष्टाचाराने वागणे थांबवले, तर आपल्यालाच त्रास होणार ही फॅक्ट आहे. पण, मुद्दा आहे तो ऍटिट्यूडचा... आपल्या मनात असं फिट्ट बसलंय की, भ्रष्टाचारानेच काम होतं? खरंच आहे का तसं? परवा मी माझ्या लायसन्सचे काम एक पैसाही न देता केले. अर्धा तास जास्त लागला एवढंच. सरळ मार्गाने काम होतं हेच आपण विसरलो. त्यासाठी प्रयत्न न करताच दलालाला पकडतो मध्ये. सरळ मार्गाने काम करण्याचा प्रयत्न तरी करु. मग, एक दिवस नक्की होईल देश भ्रष्टाचारमुक्त... अगदी.

मला काय त्याचं? नवा ऍटिट्यूड... माझ्या जगण्याशी संबंध नाही ना मग झालं तर... मान्य आहे की, जगणं फार बीझी आहे, तुमचे माझे सार्यांचेच. पण, पिक्चरवर गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्या गोष्टींवर बोललो तर? आजकाल, भारुन, पेट्रोऍटिक होऊन बोलणं ही पण हास्यास्पद गोष्ट झालीय.

आपण खूप लकी आहोत. केवढी सारी माध्यमं आहेत हातात. पण, ती नीट वापरली तर, म्हणजे पूर्वी एखाद्याने आव्हान केले, तर १०० लोक ती टोकायची, १० जण त्यावर विचार करायची आणि एखादा खरोखर कृती करायचा. आजही १० जण विचार करतात; पण ते दहाही जण फेसबुकवर ‘लाईक’ करुन गप्प बसतील, प्रत्यक्ष काम कोण करणारच नाही. गंमत झालीय राव... ही हत्यारं नक्की कशी वापरायची ते ठरवूया आपण सारे. जादू करता येईल मग. हुश्श, हे आणि असं बरंच काही करता येईल. ही तर सर्वात मोठी क्रांती. आणि, याला ना नेत्याची गरज, ना जमावाची, ना उपोषणाची. सिंपल गोष्टी, मोठा परिणाम. आणि फक्त सुरुवात करायची अवकाश आहे. प्रत्येक जण उत्सुक आहे. आणि तरीही आजकाल ‘मला काय मिळणार’ ते आधी बसून कामाला सुरुवात करतात. तर कोणी विचारेल ‘हे सारे का करायचे?’ हा आपला देश आहे म्हणून. आणि त्याहून बेसिक, आपलं जगणं सोपं करायचंय म्हणून. ७० रुपये लिटरने पेट्रोल भरताना खिसा आपलाच रिकामा होतो ना. सो. जस्ट स्टार्ट. बदल तर घडणारंच. कारण, भविष्य आपलं आहे.

जाता जाता, एवढं सगळं होऊनही, असंख्य संकटांना तोंड देऊन गेली ६४ वर्षे. हा तिरंगा, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा तिरंगा अभिमानाने फडकतोय, आणि फडकत राहील. त्याला एक कडक सॅल्युट...
जय हिंद!

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2011 - 9:41 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम लेख रे विनायका... असेच लिहित रहा! तुझ्यासारखे १० विनायक असतील तर भारत एका वर्षात महासत्ता होईल. :)

पल्लवी's picture

17 Aug 2011 - 7:56 pm | पल्लवी

>>>मीडिया काय सांगतेय, नेता काय म्हणतोय, यापेक्षा आपणच गोष्ट नीट जाणून घेतली तर?
कशी जाणून घ्यायची ?

>>>पिक्चरवर गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्या गोष्टींवर बोललो तर?

पिक्चरवर गप्पा का मारू नयेत ? पिक्चरवर गप्पा मारणारे उथळच असावेत का ??
आरक्षण, अर्थकारण ह्या गोष्टींवर बोललो तर फरक नक्की काय पडेल ?

असो. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या एवढेच म्हणेन, की खरच पुढे उतरून काम करणारी मंडळी आजही आहेत आणि अशी मंडळी कुठल्याही जाहीरातबाजी शिवाय काम करत राहतात आणि कामातूनच समविचारी मंडळी जोडत, काम हळूहळू का होईना वाढवत नेतात. सद्सद्विवेकबुद्धी, वैचारिक चर्चा, पेट्रोऍटिक होऊन बोलणं, धडाडीचे लेख हे त्यांच्या खिजगणतीतही नसतं !

विनायक पाचलग's picture

17 Aug 2011 - 9:42 pm | विनायक पाचलग

सगळेच असे करतात वा कायमच असे करतात असे नाही आहे ... जे करतात त्याना लिहिलय ....
आणि अशा शांतपणे काम करणार्‍या लोकाना काम सोपे जावे हीच तर इच्छा आहे

धनंजय's picture

17 Aug 2011 - 8:02 pm | धनंजय

वा. चांगले स्तंभलेखन आहे.

धन्या's picture

17 Aug 2011 - 11:50 pm | धन्या

येस वी आर...

विनायका, तुझा लेख काळजाला भिडला. तू आता दै. कृषिवल सारख्या वृत्तपत्रांमधूनही साप्ताहिक स्तंभ म्हणून का होईना लेखन करु लागला आहेस हे खुप उत्तम झाले. याआधी तू फक्त साधनामध्ये लिहायचास. थोडं स्पष्टच बोलायचं तर साधना हे जनसामान्यांमध्ये खुप क्वचितच वाचले जाते. साधनाचा वाचकवर्ग आहे तो मुख्यत्वाने विचारमंथन करणारा उच्चभ्रू वर्ग.

त्यामुळे आता तुझ्यासारखा साधनामध्ये लिहिणारा सिद्धहस्त लेखक जनसामान्यांच्या नेहमीच्या वाचनातील वृत्तपत्रांमध्ये लिहू लागल्यामुळे आता सर्वसामान्यांमध्येही विचारमंथन होईल. तुझ्या पिक्चरवर गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्या गोष्टींवर बोललो तर? आजकाल, भारुन, पेट्रोऍटिक होऊन बोलणं ही पण हास्यास्पद गोष्ट झालीय. या वाक्यातून तुला किती उंचीवरील विचारमंथन अपेक्षित आहे हे दिसून येतेच. अर्थात लोक आता याक्षणी पिक्चरवर गप्पा मारणं बंद करुन आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्‍या गोष्टींवर बोलतीलच असं नाही. परंतू एक ना एक दिवस असा बदल होईलच. नव्हे तुझ्या लेखणीला इतकी धार आहे की असा बदल व्हावाच लागेल. असो.

तू असाच लिहित राहा. तुझे विचार हे नेहमीच भारावलेले आणि स्फुर्तिदायक असतात. तुझ्या या लेखापासून मी आता स्फूर्ती घेउन ठरवलंय की मी आता फेसबुकवर केवळ "लाईक" करुन गप्प बसणार नाही. मी तिथे कमेंटही टाकेन.

होय, आता मीही क्रांती करेन !!!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2011 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

अर्थात लोक आता याक्षणी पिक्चरवर गप्पा मारणं बंद करुन आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्‍या गोष्टींवर बोलतीलच असं नाही. परंतू एक ना एक दिवस असा बदल होईलच. नव्हे तुझ्या लेखणीला इतकी धार आहे की असा बदल व्हावाच लागेल. असो.

प्रचंड सहमत आहे.

कोणी ना कोणी असा पुढाकार घेऊन जनतेचे डोळे उघडायलाच हवे होते. ते काम विनायकनी केले ह्याचा खरच अभिमान वाटतोय. साप्ताहिक स्तंभाच्या रूपाने का होईना पण विनायक सारखा तरुण पिढीचा प्रतिनिधी असा आवाज उठवताना बघून खरेच बरे वाटले. नुसते मेसेज फॉरवर्ड करुन आणि फेसबुकावर अण्णांचे फोटो लावुन स्वतःला क्रांतिवीर समजणार्‍या आजच्या काही मुर्ख तरुणाई मध्ये विनायक सारख्या तरुणाईने स्वतःचे वेगळे वैशिष्ठ्य जपले आहे.

सगळे करतात म्हणून आपण करायचे किंवा इजिप्त / कैरोची फॅशन आल्यासारखे मुर्खासारखे रस्त्यावर धावायचे ह्यापेक्षा निट विचार करुन कुठल्याही कृतीच्या आधी आपली सारासार विवेक बुद्धी जागृत करणे महत्वाचे. विनायक सारखे तरूण ते करत आहेत हे खरेच अभिमानास्पद आहे.

विनायक आम्हाला तुझा अभिमान वाटतो.

इंटरनेटस्नेही's picture

18 Aug 2011 - 1:22 pm | इंटरनेटस्नेही

विनायक आम्हाला तुझा अभिमान वाटतो.

हेच म्हणतो.

हेच म्हणतो.

नुसते म्हणत बसू नका हो. उठा, जागे व्हा. रान पेटवा, फेसबुकवर नुसतं लाईक करुन शांत बसू नका. तर क्रांतीचा वणवा धडधडून पेटेल अशा कॉमेंटही लिहा...

विनायक पाचलग's picture

18 Aug 2011 - 10:39 pm | विनायक पाचलग

सर्वांचे आभार...
@धनाजीराव - मी पुर्वी फक्त साधनात लिहायचो.असे आपल्याला जे वाटते तो निखळ गैरसमज आहे ..
असो...
यानिमित्ताने ,गेले काही दिवस डोक्यात असलेले काही मुद्दे मांडावे वाटतात .
१. मी नेहमी सीरीयस ,वैचारीकच बोलतो ,लिहितो असे सगळ्याना वाटु लागले आहे .किंवा मी तरुणपण एंजॉय करत नाही ,विचारवंताचा मुखवटा लाऊन फिरतो अशा टाईपमध्ये ...
-- ही फॅक्ट नव्हे ..तरुणाई जे काही करते ,ज्याप्रकारे एंजॉय करते ,तितकेच कदाचित त्याहुन जास्त मी एंजॉय करतो ..फक्त ,ही खुप नेहमीची आणि रुटीन गोष्ट आहे असे मला वाटते ,त्यामुळे त्यावर कधी लिहावेसे वाटले नाही ... लिहिन कधीतरी ...
२.चित्रपटावर मीही बोलतो खुप , सगळीच बोलतात ..पण फक्त त्यावरच बोलत राहु नये एवढेच माझे म्हणणे होते आणि आहे .त्याचा याहुन वेगळा अर्थ लागत असेल तर ती माझ्या लिहिण्यातली उणीव आहे .,आय होप ती मी भरुन काढु शकेन ...
असो ..
धन्यवाद

तुमचाच ,
विनायक

मला वाटलं क्रांतीताईबद्दल काही लिहिलय....
लेखकाला शुभेच्छा!

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 12:42 pm | श्रावण मोडक

आमची दृष्टीच तिरकी. प्रतिसाद तिरकाच वाचला. ;)

भल्याचा जमाना नाही र्‍हायला हे मी का सांगयाला पायजे?
भारतात चळवळ चालूये ती उगीच नै!

स्पंदना's picture

18 Aug 2011 - 5:59 am | स्पंदना

विनायक, ठिक!

आणि थो डा विचार करुन लिही.लेखा मागचा विचार अतिशय योग्य, फक्त बांधणी वर लक्ष दे, शेवटी कुठल्यातरी प्रसारमाध्यमात स्तंभ लेखन आहे हे, त्याला थोडीशी आणखी उंच पातळी हवी.

बद्दु's picture

18 Aug 2011 - 12:11 pm | बद्दु

अगदी मनातले बोललात राव. खर तर, या लढ्यात सगळ्यांनी उतरले पाहीजे ( अगदी रस्त्यावरच ! असे नव्हे; ) . "मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही" एव्हढी एकच गोष्ट नेटाने पाळलीत तरी खुप आहे. ही चळवळ म्हणजे आपल्या सर्वांना आपले सार्वजनिक जीवन सुधरविण्यासाठी मिळालेली एक संधी आहे. जे नितिमान आहेत, व स्वत:च्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्याचं काटेकोरपणे पालन करतात ( जसे अण्णा हजारे, किरण बेदी, प्रभ्रुती ) त्यांना आदर्श ठेवुन आपण स्वतः चे आयुष्य ऊंचावु शकतो. "आता नाही तर कधीच नाही" त्यामुळे जे काही ठरवायचे ते विचारपुर्वक निवडा; स्वतःवर विश्वास ठेवा; आपल्या निर्णयावर ठाम रहा; भ्रष्टाचाराला नाही म्हणातांना सुद्धा नम्रता/संयम पाळा. तुमचा निर्णय तुमच्या क्रुतीतुन लोकांपर्यंत पोहोचु द्या............क्रांती, क्रांती म्हणतात ती अशी समोर दिसेल्..अर्थात ती होतांना ज्याला बघायची आहे त्यालाच दिसेल....

मी या दिशेने एक पाउल टाकले आहे.

विसुनाना's picture

18 Aug 2011 - 1:12 pm | विसुनाना

भावना उच्च आहेत. पण त्यांचे योग्य असे प्रकटन करण्यासाठी सर्वच बाबतीत अजून बरेच प्रयास घेणे गरजेचे आहे असे वाटले.

गेले तीन वर्ष आम्हीही हेच कोकलतोय ;)

प्रभो's picture

18 Aug 2011 - 6:41 pm | प्रभो

>>सदस्यंता कालावधी
16 आठवडे 21 तास

16 आठवडे = ३ वर्ष??? ;)

चतुरंग's picture

18 Aug 2011 - 6:51 pm | चतुरंग

आयडीमागील विचार हे ३ वर्षांपासून अस्तित्वात आहेत असं म्हणायचंय धवांना.
तुला लेका नाना उचापतीच फार! ;)

-रंगा

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 6:59 pm | श्रावण मोडक

भेटला की मेल्याचे कान उपटाच नीटपणे. ;)

चतुरंग's picture

18 Aug 2011 - 7:06 pm | चतुरंग

अजिबात चेंगटपणा न करता उपटीन म्हणतो कान! ;)

-रंगा

तुम्ही काय करायचे ते करा हो... पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो... मी कधीही नाना रुपांनी बेरकेपणा करुन चौपाटीला गेलो नाही... त्यामुळे चेंगटपणा करायचा प्रश्नच नाही...

तुम्ही अवलिया समजून संन्याशाला फाशी देताय हे इथे नम्रपणे नमूद करु ईच्छितो ;)

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 6:06 pm | श्रावण मोडक

काय नाना तुम्हीही... अहो, धडपडणारी मुलं आहेत ही. ;)
आता, यांचे सानेगुरूजी कोण असं कोणी विचारू नका. ते नानांना बरोबर कळतं. ;)
'डणारी'च. त्यांच्या या प्रयत्नांतून फडफड असा आवाज येत असेल तर तो ऐकणाऱ्याचा दोष आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2011 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण शिकलो, इंटरनेटने जग जवळ आलं; पण आजही आपण इतरांसाठी दगड का उचलतो. जग जवळ येत असताना भाषा, प्रांत, जात करुन आपण स्वत:लाच संकुचित करत नाही का? एखाद्या विषयावर भावनाप्रधान असणं, ठाम मत असणं चांगलंच. पण, आपल्या भावनांचा वापर तर केला जात नाहीत ना? बाजार मांडलेला नाही ना? आज असंच वाटतंय की, त्याचा वापर केला जातोय थांबवायला हवा तो.

विनायका लिहित राहा.

बाकी, रंगकर्मीवर आणि इथेही मराठी नाटकाचा विषय घेऊन एखादा मस्त लेख डकव बरं....!

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

18 Aug 2011 - 8:27 pm | धन्या

काय हे डॉक्टरसाहेब... इथे क्रांतीची भाषा चालू आहे आणि तुम्हाला नाटकांची पडली आहे... हां आता नाटकांनी क्रांती होणार असेल तर हरकत नाही परंतू नाटकांनी क्रांती होते अस ईतिहास वाचनात नाही आला :)

चतुरंग's picture

18 Aug 2011 - 7:22 pm | चतुरंग

(क्रांतिसिंव्ह) रंगा पाटील

उगाचच काही ओळी आठवल्या.

त्या टिळकांचे काही ऐकू नको.
टाक पंचांगासकट टरफले
बापू म्हणाले.
बहुराष्ट्रीय कचराकुंडीत.
* * *
चार जीव ठाण मांडून
पिपात पडले.म्हणले,
येऊ द्या टरफले
बरी पडतात चघळायला
रंग दे ...च्या मध्यंतरात.
अहो असे कसे ,बाहेर या.
आसेतु हिमाचल भारतवर्षाचा
एकसष्ठावा..
राहू द्या हो कारभारी,
काय खाजगी
काय सरकारी.
एकसष्ठ बासष्ठ करायला.
साठी झाली पुरेशी.
* * *
निर्देशांक आधारीत नैतीकतेचे
नेसू सैल झाले
बापू या पंच्याचे.
सुटायला आला
सब प्राईम राष्ट्रीयतेचा काष्टा.
* * *
एकविस दिवस
चित्तशुद्धी उपोषण
करून या मेळघाटात.
बाविसाव्या दिवशी
काश्मीरी कॅक्ट्सचा काढा.
* * *

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 8:59 pm | श्रावण मोडक

मेलो...
जय जय रघुवीर समर्थ!!!

गणपा's picture

18 Aug 2011 - 9:04 pm | गणपा

एकदम खंग्री हो रामदासकाका. :)

पल्लवी's picture

18 Aug 2011 - 11:11 pm | पल्लवी

_/\_