बिनधास्त
"सरदारी बेगम" हा चित्रपट श्री.श्याम बेनेगल यांनी १९९६ साली काढला.एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट छान होताच पण तो आजही लक्षात रहातो त्यातील अतीव सुंदर गाण्यांनी. जावेद अक्तर यांची गीते, भाटिया यांचे संगीत व आशा भोसले, आरती अंकलीकर, शुभा जोशी या तीन मराठी गायिकांच्या सुरेल आवाजांचा असा काही घाट जमून आला आहे की "क्या कहिये". कोठीवर गायली जाणारी ठुंबरी. होरी, टप्पा यांचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. सिनेमा दुर्लक्षून आज आपण त्यातील दोन गाणी बघू. पहिले आहे "चाहे मार डालो राजा".
एक बिनधास्त प्रेयसी आपल्या प्रियकाराला आळवीत आहे.पहिल्यांदीच ती स्वच्छपणे सांगून टाकते " तू काय करावयाचे ते कर, मी मैत्री, प्रेम करणारच." आपण काय करावयाचे ते तिने ठरवून ठेवलेच आहे. ती म्हणते " मी नटून थटून तुला रिझवायची सगळी तयारी करणार." नटणार म्हणजे काय काय करणार तेही उघड उघडपणे सांगते. असेही म्हणते "या करता, तू जेव्हा माझ्या गल्लीत येशील तेव्हा गच्चीवर जाऊन , तेथून मी तुला खाणाखुणा करून घरात बोलावणार, पान देणार, आठवणीकरिता तुझा रुमाल मागून घेणार, थोडक्यात प्रेमालापात जे जे करावयाचे सर्व करणार".
बयेला आपण यशस्वी होणार याची इतकी खात्री आहे की ती आव्हानच देते "चाहे मार डालो राजा". आशा भोसले यांचा आवाज व समर्पक ठेका, चाल, संगीत हे सर्व इतके जुळून आले आहे की बस !
दुसरे गाणे आहे एक होरी. यमुनाकाठी रास रंगला असतांना म्हणावयाचे गाणे. म्हणणारी गोपी जरा, जरा काय चांगलीच, चालू दिसते. या वेळी कृष्ण काय काय खोड्या काढतो हे ती जाणून आहे. त्यामुळे येताना ती सर्व तयारी करूनच आली आहे. ती म्हणते, " आता तो कृष्ण रासाला येईल ना, तेव्हा मीही ठामपणे होरी खेळणार. त्याच्या चाळ्यांनी काही पळ काढणार नाही. मी त्याच्या मागे लपून छपून जाईन, स्वत:च्या अंगालाच गुलाल लावून घेईन व मग त्याला आलिंगन दिल्यावर त्याला रंग लागेलच की नाही ? कसा रंग चुकवतो ते बघतेच! " काय भन्नाट कल्पना आहे. आता कृष्ण गप्प बसणार नाही हेही ती जाणून आहे. "येऊन जाऊन काय करणार तो ? पिचकारी काढून घेईल ? हात दाबावयाचा प्रयत्न करेल ? मीही तयार आहे. ज्या शिव्या हासडावयाच्या त्या तर घोकूनच ठेवल्या आहेत !" हे सर्व असले तरी ही भांडकुदळ गोपी आपले हक्काचे काही सोडावयास तयार दिसत नाही. हा नटखट कान्हा, "मोरा कान्हा" बर का !बोला. स्त्री-मुक्तीवाल्यांची येथे गरजच दिसत नाही. काय?
चाहे मार डालो राजा
चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा
हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे !!
बालोंमे कजरा बांधेंगे और पैरोंमे पायल
होटोंपे लाली दमकेगी और ऑखोंमे काजल
चमकेंगे कानोंमे झुमके और माथेपर झुमर
तुम्हे रिझानेकी पूरी तैयारी करेंगे !!
तुम आये कभी हमारे गली तो हम छतपर आ जायेंगे
इशारे करेंगे हम तुमको तुम्हे हम घरमें बुलायेंगे
पान कभी हम पेश करेंगे तुमको राजाजानी
और कभी मांगेंगे तुमसे हम रुमाल निशानी
प्यारमे जो होती है बातें सारी करेंगे !!
मोरे कान्हा
मोरे कान्हा जो आये पलटके
अब तो होरी मै खेलुंगी डटके !!
उनके पिछे मै छुपकेसे जाके
ये गुलाल अपने तनपे लगाके
रंग दुंगी उन्हे मै लिपटके,
मोरे कान्हा....
की उन्होने अगर जोराजोरी
छिनी पिचकारी, बैयॉ मरोरी
गालीया मैने रख्खी है रटके,
मोरे कान्हा.....
ही दोन्ही गाणी खालील दुव्यांवर ऐकू शकता.
आपल्या महाराष्ट्र संस्कृतीत नसलेल्या दोन गोष्टीची नोंद करावयास पाहिजे. उत्तरेत हातरुमाल ही मिरवावयाची वस्तु दिसते. एका चित्रपटगीतात "सरपे टोपी लाल, हातमे रेशमका रुमाल, उफ़ तेरा क्या कहना" असे कौतुक नायिका करते तेव्हा थोडेसे घोटाळ्यातच पडावयाला होते. इथेही प्रेयसी आठवण म्हणून रुमाल मागून घेते. काय भानगड आहे, कोणास ठाऊक. तेच "बैया मरोरी" बद्दल. हा गोकुळातला कृष्ण गोपींचे हात कसले "मोडतो" ? गम्मतच आहे. पण उत्तरेकडचे अतिक्रमण जबरदस्तच. नंतर नंतर मराठीतला कृष्णही असले चाळे शिकला, पहा, "ऐन दुपारी, यमुनाकाठी, खोडी माझी काढली ! बाई, माझी करंगळी मोडली " थोडक्यात व्रात्य सवयी लवकर उचलल्या जातात !
शरद
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 9:15 am | शरद
लिंक देण्यात काही तरी गोची झालेली दिसते. जरा मदत करा.
शरद
8 Aug 2010 - 10:27 am | चित्रा
यूट्यूबचे दुवे दिले आहेत. गाण्याचे दुवे अडचण येत असल्याने सध्या वेगळ्या प्रकारे दिले आहेत.
8 Aug 2010 - 9:51 am | अर्धवट
लेख आवडला, पण संगीतात आम्ही ढ..
8 Aug 2010 - 9:56 am | वेताळ
खुपच छान माहिती दिलीत.
8 Aug 2010 - 10:23 am | नीधप
रूमाल हे प्रकरण उत्तरेतच नव्हे तर आपल्याकडेही महत्वाचे होते.
छोट्या पंचाच्या आकारापासून डोक्याला गुंडाळण्याच्या पगडीपर्यंत याच्या वेगळ्या लांब्या असायच्या. (पेशवाईत पुणेरी पगडीचा मान नसलेले ब्राह्मण लोक डोक्याला बांधत त्याला ब्राह्मणी रूमाल असेच नाव आहे.)
रूमाल म्हणजे आपल्याला आता माहितीये तसा १० * १० इंचाचा तुकडा नव्हे.
असो बाकी गाणी फारच आवडती असल्याने वाचायला छान वाटले. आजचा दिवस सरदारी बेगम ची गाणी ऐकली जाणार... :)
8 Aug 2010 - 10:48 am | मस्त कलंदर
व्वा:.. सकाळी सकाळी एक छान लेख वाचायला मिळाला... "चाहे मार डालो राजा" तर सुंदर आहेच.. आणि त्याची मीमांसाही छानच!!!!
8 Aug 2010 - 11:29 am | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ. शरदराव कृष्णानी केल्या तर त्या लीला बर का? इतरांनी केले तर मात्र ते चाळे. अगदी विनयभंग देखील.
नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा दे रे चोळी अन लुगडी|
8 Aug 2010 - 1:59 pm | वाहीदा
पण उत्तरेकडचे अतिक्रमण जबरदस्तच. नंतर नंतर मराठीतला कृष्णही असले चाळे शिकला, पहा, "ऐन दुपारी, यमुनाकाठी, खोडी माझी काढली ! बाई, माझी करंगळी मोडली " थोडक्यात व्रात्य सवयी लवकर उचलल्या जातात !
:-) अजून हे उत्तरेचे अतिक्रमण मुंबईत लागू झालेले नाही, नाहीतर मुंबईच्या मुली गालच रंगवतील :-)
8 Aug 2010 - 4:21 pm | स्वाती२
धन्यवाद!
8 Aug 2010 - 5:17 pm | बिपिन कार्यकर्ते
शरदराव, धन्यवाद. सुंदर ओळख. हा चित्रपट बघायचा राहूनच गेलाय.