हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे
का लोकही अमुचे मिंधे होती, स्वत्व विकुनी सारे?
हे गरीबा शोषून फ़िरती मजेने, मिजास दाविती मारे
का खावी आम्ही मीठ भाकरी? हे भरती ह्यांचे डेरे!
तो नंगा फ़कीर झंझावाती, राष्ट्रभक्तीचे वारे
ही ठोका परतुनी परकी सत्ता, सारा देश पुकारे
तो बापु महात्मा म्हणे अहिंसा, शस्त्र अनोखे घ्यारे
ते शरमेने मान झुकवुनी, पळतील घरा बिचारे
ते घराघरातुनी शूरवीर मग, घेउनी जमले झेंडे
ते शस्त्रहीन अहिंसक “सैनीक”, रक्तही त्यांचे सांडे
ते झुकले नाही, देशभक्तीपर गायन करती तांडे
तो सिंहनाद करी भारत प्यारा, संगीनी संगती भांडे
ते ठोकती जाचक करास, घेती गरीबांकडुनी दंड
ते मीठही खाणे अपमानास्पद, हसती गोरे पुंड
ये बापु धावुनी, उपाय घेउनी पुकारले हो बंड
हे मीठ सागरी धन अमुचे, का आम्हास व्हावे बंद?
ते जमले बापुमागे लाखो, मीठ निर्मीती करण्याला
तो मानवसागर घाम गाळतो, मुक्त कराया नमकाला
हो सागरही लज्जीत जेव्हा, मीठ मिळाले मीठाला
हे मुठीतले ते धन अमुचे, जाउनी सांगा गोऱ्याला
(चाल बदलून)
ते संग्रामी सारे मीठ कराया, मुक्त धावले तटी तटी
ते अश्वसैन्य घातले चिरडण्या, गरीबांच्या उघड्या पाठी
ते गर्जती जयजय भारत, मिटुनी मुठी साहुनी लाठी
त्या खाऱ्या जखमा गाती, होती मिठास मिठास मोठी
त्या खाऱ्या जखमा गाती, होती मिठास मिठास मोठी
प्रतिक्रिया
13 Nov 2009 - 8:35 am | प्राजु
प्रत्येक शब्द दाद देण्यासारखा आहे.
सुंदर!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
13 Nov 2009 - 8:58 am | विकास
एकदम आवडली...
13 Nov 2009 - 10:25 am | हर्षद आनंदी
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती?
देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!!
अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!!
जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!
कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते.
गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता
"it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे.
वा काय महात्मा आहे?
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
14 Nov 2009 - 10:45 am | अरुण मनोहर
हर्षद आनंदी, लोकांमधे महात्मा गांधींबद्दल दोन्ही टोकांची मते आहेत. त्यांचा बराच उहापोह वेळोवेळी झालेलाही आहे. विचार स्वातंत्र्याच्या कक्षेत एकमेकांच्या मतांचा मानही राखायला हवा.
माझ्या कवितेचे नायक खरं तर महात्म्याच्या एका हाकेला त्याच्या मागे सर्वस्व झोकून उभी राहीलेले लाखो लोक आहेत.
ते घराघरातुनी शूरवीर मग, घेउनी जमले झेंडे
ते शस्त्रहीन अहिंसक “सैनीक”, रक्तही त्यांचे सांडे
ते झुकले नाही, देशभक्तीपर गायन करती तांडे
तो सिंहनाद करी भारत प्यारा, संगीनी संगती भांडे
ते जमले बापुमागे लाखो, मीठ निर्मीती करण्याला
तो मानवसागर घाम गाळतो, मुक्त कराया नमकाला
हो सागरही लज्जीत जेव्हा, मीठ मिळाले मीठाला
हे मुठीतले ते धन अमुचे, जाउनी सांगा गोऱ्याला
महात्मा गांधीसारखा लाखो लोकांना विधायक कार्याला लावणारा नेता होता म्हणून त्यांचे कौतुक. त्याकाळच्या इतर नेत्यांना अशी आभाळायेवढी लोकप्रियता लाभली होती कां?
15 Nov 2009 - 1:49 am | विसोबा खेचर
अच्छा! म्हणजे 'लोकप्रियता लाभणे' हा निकष धरावा काय??
तात्या.
13 Nov 2009 - 10:18 am | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान
13 Nov 2009 - 10:45 pm | पक्या
कवितेतील सर्वच विचारांशी सहमत नसलो तरी कविता सुरेख आहे.शब्दयोजना आवडली.
अशीच एखादी कणखर कविता सावरकर, टिळक किंवा भगतसिंग्-सुखदेव्-राजगुरू ह्यांच्यावर लिहाल का? आवडेल वाचायला.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
13 Nov 2009 - 10:48 pm | मदनबाण
हेच म्हणतो...
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
14 Nov 2009 - 11:42 am | अरुण मनोहर
क्रांतीकारकांवर कविता लिहायला मला नक्कीच आवडेल. गांधींना चांगले म्ह्टले म्हणजे इतर तेजस्वी नेत्यांना नावे ठेवली असे होत नाही. टिळक, सावरकर, भगतसिंग हे सर्व माझ्यासाठी अत्यंत पूजनीय आहेत. सावरकरांवर मी कविता खूप आधीच लिहीली आहे. पुढे आणखीही कविता लिहून होतील अशी आशा आहे.
15 Nov 2009 - 9:39 am | नंदू
तात्यारावांवर (सावरकर बरं का ;) ) केलेली कविता वाचायची उत्सुकता आहे. लवकर चढवा.
नंदू
15 Nov 2009 - 2:10 pm | अरुण मनोहर
;)
दोन्ही तात्यारावांवर लिहायला आवडेल.
14 Nov 2009 - 1:26 pm | मदनबाण
.
13 Nov 2009 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर कविता. आवडलीच.
बिपिन कार्यकर्ते
13 Nov 2009 - 11:21 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री मनोहर, कविता आवडली.
14 Nov 2009 - 10:27 am | अरुण मनोहर
रसि़कांचे धन्यवाद.
14 Nov 2009 - 11:07 am | अमोल खरे
सशस्त्र क्रांतिकारकांवर कविता न लिहिता गांधीवर लिहिली जाते.....त्रास आहे च्यायला. मुख्य म्हणजे गांधीने स्वतःची लायकी वेळोवेळी प्रुव्ह करुनही लोकांना त्यावर कविता लिहाविशी वाटते.........चाफेकर कुटुंबाचा निर्वंश झाला.त्यावर एक लाईन नाही आणि गांधीवर अख्खी कविता ? काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत एक लेख वाचला होता. लेखकाचे नाव आठवत नाही. त्याने लिहिले होते की एकदा चर्चिल का कोणालातरी विचारले होते की भारताला स्वातंत्र्य मिळण्यात गांधींचे काय योगदान होते..........तो ताडकन म्हणाला की "मिनिमल".
आणखीन काल कोणीतरी म्हणाले होते की सामान्य लोकं सशस्त्र क्रांतीत येऊ शकत नाहीत म्हणुन ते गांधींच्या मागे गेले. कोणी सांगितले.........सावरकर, चाफेकर, भगतसिंग हे सर्व सामान्य घरातुनचं आले होते. ते पुढे त्यांच्या त्यागामुळे असामान्य झाले ती गोष्ट वेगळी. जाता जाता........पुर्वी ब्रिटीश क्रांतिकारकांना सरळ अंदमानात पाठवत असे......गांधीला किंवा नेहरु ला का नाही पाठवलं........आहे उत्तर ?
तुम्ही करत राहा कविता गांधीवर. मतपरिवर्तन होईल कधीतरी तुमचे.
14 Nov 2009 - 11:14 am | अरुण मनोहर
माझे उत्तर हेच आहे.
http://www.misalpav.com/node/10155#comment-163008
14 Nov 2009 - 11:22 am | अमोल खरे
भगतसिंगासाठी काय केले........टाकला शब्द ब्रिटिशांकडे ? सुभाषचंद्र बोसांबद्दल काय बोलला तो माहिती आहे ना....... पाकिस्तानबद्दल काय स्टॅन्ड होता त्याचा.तो तर सर्वांनाच माहितेय...........असो. तुम्हाला आवडतो ना गांधी...करा त्याची पुजा आणि करा त्याच्यावर कविता आणि आरती. मी तर बॉस सावरकर, भगतसिंग, चाफेकर, वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सारख्या न्यात, अन्यात सशस्त्र क्रांतिकारकांनाच मानतो.
14 Nov 2009 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार
अहो तुमचे सावरकर, भगतसिंग, चाफेकर, वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सारखे न्यात, अन्यात सशस्त्र क्रांतिकारक जिथे संपतात तिथे महात्मा गांधी सुरु होतात.
सावरकर, भगतसिंग, चाफेकर, वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सारख्या न्यात, अन्यात सशस्त्र क्रांतिकारकांनी कधी शेळीचे दुध पिले होते का ? ते दोन बायकांच्या (देशसेवीका हो देशसेवीका) खांद्यावर हात टाकुन कधी प्रार्थनेला गेले होते का ?
नाही ना ? मग ते महान कसे ? अहो घरादारावर, संसारावर निखारा ठेवुन भारतमातेच्या मदतीला धावणारे मुर्ख आणी बायकोबरोबर राहुन खुरमांडी घालुन फुकटचे उपदेश करणे म्हणजे देवत्व. कधी कळणार बॉ तुम्हाला ??
दांडी मिठ घातलेलेच अन्न खाणारा
©º°¨¨°º©दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Nov 2009 - 12:15 pm | ऋषिकेश
न राहवून पुन्हा एकदा:
माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला (सकारण/विनाकारण असलेल्या) गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि.
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
14 Nov 2009 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
अवांतर: मलाही गांधीजींची सगळीच मतं पटत नाहीत. त्यांची, किंबहुना कोणाचीच, केली जाणारी आंधळी भक्ती पटत नाही. त्यांच्या चुका झाल्याही आहेत / असतील. पण नक्कीच इथे जो सूर उमटला आहे तितके ते नीच नव्हते. त्यांचे सम्यक मूल्यमापन इथेही भरपूर झाले आहे आणि जालावरही भरपूर उपलब्ध आहे.
हा सध्या तरी शेवटचा प्रतिसाद, अगदी न राहवून दिलेला.
बिपिन कार्यकर्ते
14 Nov 2009 - 3:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋषिकेश आणि बिपिनशी सहमत; आंधळी भक्ती पटत नाही तसंच गांधीजींना नीच किंवा हीन ठरवणंही पटत नाही.
भगतसिंगांनीही विधानभवनात बॉंब टाकला, पण कोणीही मरू नये याची काळजी घेतली होती.
अदिती
14 Nov 2009 - 8:10 pm | सुधीर काळे
बिपिनजीशी सहमत.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
15 Nov 2009 - 1:23 am | हुप्प्या
अन्य महापुरुषांचे कर्तृत्व सांगणे, मांडणे, मिरवणे ह्या गोष्टीपासून काँग्रेस आणि अन्य पक्ष जाणीवपूर्वक दूर असतात. आठवा सावरकरांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट काढायला किती खळखळ केली होती आणि गांधींची तिकिटे काय, तमाम नोटा आणि अनेक नाण्यांवर चित्र काय काय विचारू नका.
तेव्हा असला कुबड्या वगैरे रुपके गैरलागू आहेत. भारतात होऊन गेलेला, स्वराज्य मिळवून देणारा एकमेव नेता म्हणजे मो. क. गांधी ह्या भूमिकेमुळे अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ज्यांनी आपल्या आयुष्याचे होम केले अशा क्रातिकारकांना नावे ठेवणे, दोष देणे, त्यांच्या स्मारकाचा विध्वंस करणे आणि गांधीगुणगान करणे हा दुटप्पीपणा आहे. आणि गांधींचे अनुयायी त्याला जबाबदार आहेत.
बाकीच्या त्यागी लोकांचे अनुल्लेख पिढ्यान पिढ्या कायम ठेवून हळूहळू नव्या पिढ्या ती नावे विसरून जावीत असा हा हलकट प्रयत्न आहे. आणि गांधी विरोधक त्याविरुद्ध मते मांडत आहेत आणि मी तरी त्या विरोधाचे स्वागतच करेन.
15 Nov 2009 - 1:46 am | विसोबा खेचर
करेक्ट!
तात्या.
15 Nov 2009 - 9:53 am | टारझन
आमल्या, तात्या , हुप्प्या, बिपीन आणि हृषिकेश शी १००% समहत !!
- मंदू
15 Nov 2009 - 7:12 am | नंदू
ऋषिकेश, बिपिन आणि आदितीशी सहमत.
नंदू
14 Nov 2009 - 8:08 pm | सुधीर काळे
अमोल,
j+n=ज्ञ
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
15 Nov 2009 - 1:48 am | विसोबा खेचर
सहमत आहे!
तात्या.
14 Nov 2009 - 3:36 pm | सुनील
कविता आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Nov 2009 - 8:15 pm | सुधीर काळे
खरं सांगायचं तर नुसतं शीर्षक वाचून आत एकादा विनोदी लेख असेल असं वाटलं होतं व मनातल्या मनात "नावडतीचं असेल (म्हणून मीठ खारं नाही, अळणी)" असं खोडकर वाक्यही कुठं तरी लिहिलं असेल असंही वाटलं होतं.
उघडल्यावर ही तर एक झकास कविता निघाली.
यावरून अर्थपूर्ण शीर्षक देण्याचे महत्वही लक्षात आले.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
14 Nov 2009 - 11:11 pm | चिरोटा
कविता आवडली.स्वातंत्र्य मिळवण्यात सर्वांचेच योगदान महत्वाचे कारण सर्वांचे उद्दिष्ट समान होते.आपापल्या भूमिकांशी ते अखेर पर्यंत प्रामाणिक होते.
वरील वाक्याशी सहमत पण 'च' वगळून. किंबहुना संपूर्ण भारत(गांधीवादीही) त्यांचे योगदान बिलकूल कमी समजत नाही.
भेंडी
P = NP
15 Nov 2009 - 1:42 am | विसोबा खेचर
साला, आमच्या तात्याराव सावरकरांचा, भगतसिंगाचा, कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, चाफेकरबंधु, यांचा साधा उल्लेखही नाही???
अरूणराव, अहो कविताबिविता लिहिण्याआधी आपला स्वातंत्र्य इतिहास माहीत करून घ्या एकदा!
अश्या कविता लिहून मोहनदास गांधींमुळे स्वातंत्र्य मिळालं असा सपशेल चुकीचा समज पसरवणार्या या कवितेचा तीव्र निषेध!
मग सशस्त्र क्रांतीचं काय? अनेकांचं रक्त सांडलं त्याचं काय?? सशस्त्र क्रांतीचा उल्लेखही नाही? इतका कृतघ्नपणा???? अरे कुठे फेडाल ही पापं? आमच्या तात्याराव सावरकरांच्या घरातल्या स्रियांनी वेळेला स्मशानातले पिंड खाल्ले त्यामुळेच आज तुमच्याआमच्या आयाबहिणी घरात सुखाचा आमटीभात जेवताहेत! अहो काहीतरी जाणीव ठेवा? कविता करायला निघाले आहेत!
आहो मनोहरसाहेब, आमच्या तात्यारावांनी अंदमानात या देशाकरता कोलू पिसलाय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य बघायला मिळालं. तात्यारावांनी अनोळखी समुद्रात बिनधास्त उडी मारली, तुमचे ते सोकॉल्ड महात्मा साध्या ५ फुटी स्विमिंग टँकमध्ये तरी उडी मारू शकले असते काय?
पावनखिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजे तो केले रण..
ह्या कुसुमाग्रजांच्या ओळी माहित्येत का आपल्याला? नाय, 'अहिसेचे शस्त्र' वगैरे फुकाच्या गप्पा मारताय म्हणून विचारतो! साला, अहिंसा वगैरे बघत बसले असते तर अफजलखानाच्या मगरमिठीतून आमचे महाराज वाचले असते काय??
तात्या.
15 Nov 2009 - 5:24 am | पॅपिलॉन
कविता सुंदर. खूप आवडली.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
15 Nov 2009 - 7:58 am | लवंगी
(नाव ठेवण्याइतके नसले तरी एकंदरीत) गांधीजी फारसे आवडत नाही पण कविता मात्र आवडली..
18 Nov 2009 - 9:46 am | अविनाशकुलकर्णी
प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात.....झकास