दान

Himanshu Dabir's picture
Himanshu Dabir in जनातलं, मनातलं
11 Sep 2009 - 9:24 pm

परवा वर्तमानपत्रांतून बातम्या वाचल्या, मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! दगडफेक, जाळपोळ, मारामार्‍या, दंगल यांसारख्या मग 'सोयीस्कर' आणि नित्यनेमाच्या गोष्टी कशा अगदी निरलसपणे पार पडल्या! शूरवीर पोलिसांनी मग अश्रूधूराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचे काम किरकोळीत केले! आपल्या देशात असे राजरोसपणे चालू असते मग का लक्ष द्या या गोष्टीकडे? पण नाही, हिच प्रवृत्ती घातक ठरत आहे आपल्याला! आपले अलिप्त राहणे हे आजच्या समाजकारण्यांचे आणि राजकारण्यांचे बालेकिल्ले बनले आहेत! त्यांना जाब विचारणे तर दूर, त्यांच्यामागे आपण आंधळ्यासारखे चालत राहतो! आणि काळ सोकावतो!

शिवरायांनी स्वराज्य उभारले ते काही 'हिंदू' राज्य म्हणून नाही, तर एक "हिंदवी स्वराज्य" म्हणून! केवळ "हिंदूंचा" राजा म्हणवून घ्यायला नाहि तर पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायला आणि अन्याया विरुध्द आवाज उठवून प्रसंगी छातीठोकपणे आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्यांनी! आणि यांच प्रयत्नांतून स्वराज्य निर्माण झाले! राजांनी अफजलचा वध केला, हत्या नाही! हत्या आणि वध या दोहोंत फार मोठा फरक आहे! सुरत जेव्हा शिवरायांनी लुटली तेव्हा इनायतखानाने त्यांच्या शिबिरात आपला माणूस पाठवला तो शिवरायांची हत्या करायला, वध करायला नव्हे! अफजल मारला गेला तो उघड उघड भेटीत! त्याच्या कपटाला राजांनी "जशास तसे" उत्तर दिले! पण राजांनी अफजलचा वध केला तो काही तो मुसलमान होता म्हणून नाही तर तो त्यावेळी समाजाला घातक होता म्हणून! त्याने देवळे तोडली, माणसे बाटवली, स्त्री नासवली, त्या नरधमास रोखणे आणि पर्यायाने त्याचा वध करणे अनिवार्य होते म्हणून!

कुठला धर्म शिकवतो कि दुसर्‍या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून!

तरी आजहि आपल्या देशात त्या अफजलच्या थडग्याची नित्यनेमाने पूजा होते! आपल्या देशाचा पंतप्रधान बेंबीच्या देठापासून कोकलून सांगतो, कि या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे म्हणून! का हा देश हिंदुचा नाही??? सर्वांना समान अधिकार असायलाच हवा ना! हिंदु म्हणून जन्मलो हा काय गुन्हा झाला का?

आणि एवढे सगळे असूनही माझा मुसलमान बांधव ओरडतोच आहे अजुन सुविधा द्या म्हणून! आणि आपले राजकारणीसुद्धा त्यांचे लांगुलचालन करत आहेत! दिले होते ना ५५ कोटी, मग का नाहि गेलात त्या देशात? आता राहिला आहात ना भारतात तर भारतीय म्हणून जगा! जरा काही खुट्ट झाले कि लगेच उठले हे मारायला, का तर म्हणे यांचा इस्लाम खतर्‍यात आहे! अरे माझ्या बांधवांनो, तुमचा इस्लाम का एवढा कमकुवत आहे का? तुमच्या धर्मात सहिष्णूता नाही का? तुमच्याच एका महान संताने १९व्या शतकाच्या सुरवातीला सांगितले होते ते विसरलात का? त्या महान संताचे नाव होते "मेहताबशा"! काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, "सामान देउळ, मशिदिचे| एकची आहे साचे| आकाराने भिन्नत्व त्याचे| मानून भांडू नये हो!" पुढे ते काय म्हणतात, "खुळे देउळ मशिदीची| तुम्ही नका वाढवू साची| ती वाढता दोघांची| आहे हानि होणार|" पुढे ते काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, "यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा? पोक्त विचार करा याचा| मनुष्यपण टिकवावया!"

माझ्या बांधवांनो, जरा विचार करा, जोपर्यंत आपण असे जाती-धर्मावरून आपसांतच लढत राहू तोवर आपल्याला मुंबई १९९३, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट मालिका, मुंबई २६/११, दिल्ली बॉम्बस्फोट, आणि या सगळ्यांत शरमेची बाब म्हणजे आपल्या संसदेवर झालेला हल्ला, हे होतच राहाणार! संसद हल्ल्याच्या आरोपीला आपण अजूनही पोसतो आहोत! कसाब ज्याने सगळ्या जगा समोर आपल्या देशबांधवांना मारले त्याच्यावर आपण इमाने-इतबारे खटला चालवून त्याच्यावर पैसा नाहक खर्च करतच आहोत! आधी आपण सगळे भारतीय आहोत, नंतर आपल्या धर्माचे! हे आपल्याला कधी कळणार!

आज कोणी एक काही तरी बोलतो आणि आपण लगेच लागतो भांडायला! अक्कल गहाण ठेवली आहे का आपण? माणसे आहोत कि जनावरांच्या झुंडी आहोत आपण? निवडणूकांच्या तोंडावर या गोष्टी घडतात, तेव्हा दंगलीमधे दगडफेक करायच्या आधी तुमच्या डोक्यात हा विचारही येत नाहि का, कि आपण हे का करतोय? काही दुसरे विधायक उद्योग नाहीत का आपल्याला? जाळपोळ करायची, देशाची हानी करायची हि कसली रानटीवृत्ती? यापेक्षा देशासाठी तुम्ही काय करणार, आणि नाही केले तर काय हे प्रश्न विचाराना त्या निवडणुकीत मत मागयला आलेल्या उमेदवारांना! ते नाही जमणार!

विचार करा जरा, लोकसभा मतदान झाले त्यात किती मतदान झाले? ५०% पेक्षा कमी! म्हणजे ५०% अधिक जनतेला असे वाटते कि आजचे राजकारणी राज्य चालवायच्या लायकीचे नाही! पण ज्यांनी मतदान केले त्यातून हे आले निवडून! साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो, तर मग ज्याच्या हाती आपण आपल्या देशाची सत्ता सोपवतो त्यांची पारख आपण काय एक दारूची बाटली आणि एका १०० रुपयांच्या नोटेवर करणार? कधी येणार अक्कल?

मत न देण्याचा अधिकार आहे आपल्याला! बजवावा कि तो! त्याला सुध्दा मोठि किंमत आहे! पण ते नाही जमणार तुम्हाला, कारण मत न देण्याचा अधिकार बजावलात तुम्ही तर तुम्हाला कोणी बाटली नाही देणार, ना कोणी नोट देणार! मग काय तुम्ही नेहेमीप्रमाणे आंधळ्यासारखे मत"दान" करणार! पण मित्रहो, "दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान"! पण तुम्ही तर या पवित्र शब्दाचा अर्थच बाटवला आहे!

जास्त काय लिहू! सुज्ञांस सांगणे न लगे! या मतदानावेळी जर परत नेहेमी प्रमाणे घडले तर एक गोष्ट नक्की म्हणावीशी वाटेल "जनतेला अक्कल नसते!"

राजकारणविचार

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

11 Sep 2009 - 9:57 pm | योगी९००

अगदी सहमत..

खादाडमाऊ

पक्या's picture

12 Sep 2009 - 7:51 am | पक्या

छान लेख. विचार छान मांडले आहेत.

मदनबाण's picture

12 Sep 2009 - 8:49 am | मदनबाण

छान लेख...

(हिंदु)
मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

12 Sep 2009 - 10:19 am | अमित बेधुन्द मन...

"यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा?
"दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान"
सुन्दर लेख, सहमत आहे

हिन्दवि स्वराज्य व्हावे हि श्रीन्चि इछा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2009 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले!
यू सेड इट!

विचार व्यवस्थित मांडले आहेत.

अदिती

दशानन's picture

12 Sep 2009 - 10:27 am | दशानन

१००%

विचारांशी सहमत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 Sep 2009 - 2:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चांगला लेख.

Himanshu Dabir's picture

12 Sep 2009 - 8:39 pm | Himanshu Dabir

मनापासून धन्यवाद!

हिमांशु डबीर
http://manaswita.blogspot.com
http://sahyakada.blogspot.com

प्राजु's picture

12 Sep 2009 - 9:17 pm | प्राजु

मिपावर स्वागत हिमांशु!!!
उत्तम लेख!! प्रत्येक ओळ न् ओळ पटली.
पु ले शु.

(ते तुझं नाव तेवढं देवनागरीत कर)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

12 Sep 2009 - 9:27 pm | क्रान्ति

लेख.
कुठला धर्म शिकवतो कि दुसर्‍या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून!

सगळेच विचार पटले.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

Himanshu Dabir's picture

12 Sep 2009 - 9:55 pm | Himanshu Dabir

प्राजक्ता, क्रान्ति,
तुम्हा दोघींचे मनापासून आभार!
नाव मराठीत करायचा प्रयत्न करतो!
~हिमांशु

हिमांशु डबीर
http://manaswita.blogspot.com
http://sahyakada.blogspot.com

भोचक's picture

13 Sep 2009 - 8:04 am | भोचक

छान हिमांशू. मस्त लेख. पटेश.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

विसोबा खेचर's picture

13 Sep 2009 - 11:40 am | विसोबा खेचर

सुंदर लेख...

तात्या.

सुबक ठेंगणी's picture

13 Sep 2009 - 11:45 am | सुबक ठेंगणी

पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी सहमत.

"जनतेला अक्कल नसते!"

इथे जनतेच्या ऐवजी "जमावाला अक्कल नसते" असं म्हणावंसं वाटतं.

सहज's picture

13 Sep 2009 - 3:56 pm | सहज

निवडणूक गांभिर्याने घ्या. आपले मत वाया घालवू नका हा फार महत्वाचा सल्ला.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय!!!

अवांतर: 'मेहताबशां' बद्दल अजून नाहिती मिळू शकेल का?

बिपिन कार्यकर्ते

अजिंक्य's picture

13 Sep 2009 - 6:34 pm | अजिंक्य

लेख. मौलिक विचार.
(असे मुसलमान संत आहेत हे वाचून आनंद झाला.)
पुढील लेखनास शुभेच्छा.
-अजिंक्य.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 7:19 pm | बिपिन कार्यकर्ते

सहसा बोललो नसतो... पण राहवलं नाही म्हणुन...

(असे मुसलमान संत आहेत हे वाचून आनंद झाला.)

तुमचे हे वाक्य वाचून एकदम स्पीचलेस झालो ब्वॉ!!! ~X(

हेही बघून घ्या एकदा...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3229956.cms

असेही बरेच आहेत. आणि महाराष्ट्राबाहेर जायचीही गरज नाही.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2009 - 3:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भले अनेक संतांकडे दुर्लक्ष झालंही असेल, पण (परप्रांतीय) कबीरही आपणांस माहित नाहीत का?

असो, संतांनाही धर्माची लेबलं लावायची? आधीच एक विषवल्ली आहेच, हल्ली संतानांही जातींची लेबलं लावतात, "'ग्यानबा-तुकाराम' नाही 'एकनाथ-तुकाराम' म्हणा", आता धर्मांची लावा!

अदिती

बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलेया कोय।
जो दिल खोजा आपना सा मुझ सा बुरा न कोय॥
-- संत कबीर

Himanshu Dabir's picture

16 Sep 2009 - 12:32 am | Himanshu Dabir

मिपावरील हा माझा पहिलाच लेख! आपणा सर्वांचा प्रतिसाद पाहून खरतर भारावून गेल्यासारखे झाले आहे! माझे "आभारप्रदर्शन" करण्यास विलंब झाला म्हणून मी आपली माफी मागतो! ;-)

"मेहताबशा" यांच्या बद्द्ल माझ्याकडे फार माहिती नाहि. जी काहि माहिती आहे ती श्री संत गजानन महाराज यांच्या पोथीतून मला प्राप्त झालेली आहे!

मी पत्रकार "सध्या" नाही पण काही सांगता येत नाही "मुक्त पत्रकारीता" यावर माझा विश्वास आहे! :) हा हा हा!

इतर धर्मांच्या संतांबद्द्ल बोलायची निदान माझी तरी लायकी नाही!

हिमांशु डबीर
http://manaswita.blogspot.com
http://sahyakada.blogspot.com