देवव्रत रेखेच्या यशाची चेताशास्त्रीय (जीव॒शास्त्रीय) चिकीत्सा
- राजीव उपाध्ये ३.१२.२०२५

१९ वर्षाच्या एका युवकाने एक नवा इतिहास रचला आहे. बरेच डावे-पुरोगामी त्याच्यावर तुटून पडले आहेत. देवव्रत रेखेने जे मिळवले आहे, त्याचे महत्त्व कमी करण्याचा आटापिटा करताना ते आपला अडाणीपणा आणि ब्राह्मण-द्वेष उघडा पाडत आहेत. उजव्यांच्या अंधप्रेमाबद्दल तर बोलायलाच नको.
’ब्राह्मणांच्या बौद्धिक वर्चस्वाची जीवशास्त्रीय कारणे’ असा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहीला. तो वाचून अनेकांनी नाके मुरडली होती. पण हे तथाकथित पुरोगामी त्यामागचे जीवशास्त्र पचवू शकले नाहीत, हा त्यांच्या पुरोगामीत्वाचा पराभव आहे.
बौद्धिक क्षमतेला आह्वान देऊन तिला जगासमोर आणायचा प्रयत्न जगभर अनेक रिॲलिटी शो मधून केला जातो. काही सेकंदात रुबिक क्यूब सोडविणारी चिनी/कोरीयन मुले, अत्यंत वेगाने आकडेमोड , उलटेसुलटे स्प्लेलिंगवरचे प्रावीण्य, दोन्ही हातांनी किंवा पायाने चित्रे काढणे आणि रंगवणे इ० क्षमतांना जर प्रतिष्ठा आहे तर अत्यंत अवघड अशा वेदपठणामध्ये (त्यातील गुंतागुंतीचे खुल्या मनाने आणि दिलाने आकलन न करून घेता) जर कुणी प्रावीण्य मिळवले तर त्याची पाठ थोपटायची की कुचेष्टा करायची?
मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून याकडे बघितले तर ही उच्च दर्जाची बौद्धिक क्षमता मिळवताना डि०एन०ए० मध्ये कोणते बदल घडले असतील? देवव्रत रेखे १९ वर्षाचा आहे म्ह० लग्न आणि मुले व्हायची आहेत. त्याने जर लग्न करून मुले जन्माला घातली तर उच्च ग्रहणक्षमतेचे डि०एन०ए० पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होईल.
माझा वर उल्लेख केलेला लेख इथे परत उद्धृत करत आहे-
*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*
-राजीव उपाध्ये (१४.०२.२०२४)
पर्यावरणातील आह्वानांनुसार मानसिक जडणघडणीत, शरीररचनेत अथवा अवयवात बदल घडून येणे हे जीवसृष्टीमध्ये सर्रास घडून येते. त्याची असंख्य उदा० आजूबाजूला माणसांमध्ये पण बघायला मिळतात. भारतात गुजराती समाजात उद्योग रक्तात भिनलेला आहे असे म्हटले जाते. भारतात पश्चिम किनार्यावर सिद्दींचे वंशज धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत [१]. दक्षिण आशियातील बजाऊ ही जमात प्राणवायुशिवाय पाण्यात बुड्या मारून मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध आहे [२]. अशी असंख्य उदा० देता येतात.
भारतीय समाजात ब्राह्मण दीर्घकाल समाजाच्या शीर्षस्थानी राहीले, हे आज कुणीही नाकारणार नाही. फार काय, याचमुळे ब्राह्मण इतर समाजबांधवांच्या तिरस्कारास पात्र ठरले. पण ब्राह्मणांचा तिरस्कार हा मला वर्गात अभ्यास करून १ल्या येणार्या मुलांचा तिरस्कार वाटतो. वर्गात अभ्यासात पुढे असणारी मुले त्यांचे स्थान टिकविण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबतातच. ब्राह्मणांनी पण तेच केले. पण इतरांना वाटणार्या तिरस्काराचे उदासिनीकरण (न्युट्रलायझेशन) करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळेच आजचे ब्राह्मण मोठ्या सामाजिक नामुष्कीला तोंड देत आहेत.
ब्राह्मणांच्या वर्चस्वाची समाजशास्त्रीय़ मीमांसा भरपूर झाली आहे. त्यात मला पडायचे नाही कारण तो चावून चोथा झालेला विषय आहे, त्यात नवे असे काही हाती लागणे मुष्कील आहे. पण त्या पलिकडे काही कारणे असू शकतात.
*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का? याचे कोडे कोणत्याही चौकस व्यक्तीला सतावत राहते.
*आपल्याकडे जे नाही ते जर दुसर्या कुणाकडे असेल तर वैषम्याची भावना निर्माण होते. उदा० पैसा, ताकद, आरोग्य/स्वास्थ, रुप इ० इ० ब्राह्मणांचा तिरस्कार माझ्यामते मुख्यत: त्यांच्या बुद्धीमुळे होतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.* ब्राह्मणांना त्यांची बुद्धी निसर्गत: मिळाली की काळाच्या ओघात विकसित झाली? या प्रश्नावर थोडा उजेड टाकायचा हा एक छोटा प्रयत्न...
ज्यू, जपानी लोकांत आढळून येणार्या दीर्घायुष्याची करणे शोधायचा प्रयत्न बराच झाला आहे. पण माझ्या आतापर्यंतच्या वाचनात/अभ्यासात ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे शोधायचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळले नाही आणि तसा शिस्तबद्ध अभ्यास कुणी करेल असे ही वाटत नाही. कारण अशा अभ्यासाला निधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. कारण चुकुनमाकुन अशा संशोधनाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलेच तर त्यासारखे अप्रिय (पोलिटिकली इन्करेक्ट) सध्याच्या काळात दुसरे काहीही नाही.
त्यामुळेच मला ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाविषयी जे जीवशास्त्रीय विचार मांडायचे आहेत, त्यांच्याकडे काही तर्कनिष्ठ अटकळी/अंदाज या कोनातूनच बघितले जावे. त्याची प्रेरणा मला आधुनिक चेता/मस्तिष्क विज्ञान, ध्यानावर झालेले संशोधन[३] यातून मिळाली आहे. *बुद्धी फक्त ब्राह्मणांकडे असते असा ही दावा मला करायचा नाही.* कारण बुद्धीचे अनेक पैलू असतात आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विकसित होतात. त्यामुळे असा कुणी तर्क किंवा आरोप केलाच तर तो मात्र एक निर्बुद्धपणा ठरेल.* महत्वाचे म्हणजे माझ्या मर्यादांचे मला पूर्ण भान आहे.*
भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान इ० नावाने ओळखल्या गेलेल्या भूप्रदेशात मानवी संस्कृतीला स्थिरावायला बरेच पोषक वातावरण मिळाले. या संस्कृतीमध्ये जो अग्निपूजक समाज होता, त्याने केलेल्या वाङमय निर्मितीचे जतन करण्यासाठी, लेखनकला विकसित न झाल्यामुळे, फक्त मौखिक परंपरेचा पर्याय उपलब्ध होता. मौखिक परंपरेने कोणत्याही माहितीचे जतन करणे किती अवघड आहे, हे समजून घेणे इथे अतिशय आवश्यक आहे.
रस्त्यावरील कोणत्याही १०० माणसांना त्यांनी शालेय जीवनांत पाठ केलेल्या कविता म्हणून दाखवायला सांगा. १ली ते १०वी या प्रत्येक इयत्तेमधील एक अशा दहा कविता म्हणून दाखविणारी १० माणसे तरी सापडतील का, याची मला शंका आहे. आणि समजा सापडली तर कर्तव्य म्हणून पाठांतर केलेली आणि आवड म्हणून पाठ केलेली माणसे वेगळी आहेत असे लक्षात येईल. कवितेचा अर्थ, चाल, लय आवडली तर पाठांतर सोपे होते.
आधुनिक चेताविज्ञान असे सांगते की एकाग्रतेने मेंदूच्या उपाग्रखण्डाचा (prefrontal lobe) वेगाने विकास होतो. ज्या संवेदनांवर एकाग्रता जास्त होते त्यासंबंधी मेंदुच्या भागाशी उपाग्रखण्डाच्या जोडण्या वाढतात आणि मेंदूचा विकास होतो. जसे खेळात स्नायविक हालचाली नियंत्रित करणारा गतिबाह्यक आणि उपाग्रखण्डाबरोबर विकसित होतो [४]. संगीतात श्रवणशक्ती आणि काही भाषासदृश कौशल्यांचा विकास होतो. नृत्यकलेत अवकाश, संगीत, लय-ताल यांच्याशी संबंधित जाणीवा आणि स्मृती इ० केंद्रे जोडण्या निर्माण होऊन विकसित होतात[५]. गमतीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की सध्याच्या काळात स्मृतीभ्रंश आणि तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी जे व्यायाम तयार केले गेले आहेत, त्यात याच कल्पना केंद्रस्थांनी आहेत.
वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले प्रचंड वाङमय जतन करण्यासाठी ब्राह्मणांना मेंदूचा मोठ्या प्रमाणावर वापर अतिशय एकाग्रतेने आणि कर्तव्यबुद्धीने करावा लागला. शतकानुशतके वेदसंहितांचे रक्षण करण्यासाठी जटा/घनपाठादी तंत्रे वापरली गेली. ही तंत्रे समजून घेतली [६] तर असे लक्षात येईल की संहितांमधला एकही शब्द हरवू नये हा या मागचा महत्त्वाचा उद्देश. वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गायत्री मंत्राच्या घनपाठाचे सादरीकरण या दुव्यावर पहाता येईल. हे सर्व पाठ करताना मेंदूला जो व्यायाम होतो, त्यामुळे ब्राह्मणांमध्ये उपाग्रखण्डाचा वेगाने विकास झाला. वैदिक शिक्षण गुरुगृही आठव्या वर्षी चालू होई. बरेचसे वैदिक शिक्षण प्रजननपूर्व काळात होत असल्याने विकसित मेंदूशी संबंधित काही जनुकीय बद्दल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फायदा झाला. परिणामी ब्राह्मण अधिकाधिक बुद्धिमान होत राहिले.
जेव्हा ब्राह्मणांचे पारंपरिक व्यवसाय मागे पडले तेव्हा या उत्क्रांतीला काही कारणांनी खीळ बसली. पण या जनुकीय बदलांचा फायदा मात्र पुढल्या पिढ्यांना बर्याच प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण हा फायदा अनंतकाळपर्यंत ब्राह्मणांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण आता जनुकीय विद्राव्यता (genetic dilution) सांस्कृतिक अभिसरणामुळे खुप वाढली आहे. एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावून हे परत साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर पण नाही असे द्यावे लागेल. पिढ्या न पिढ्या सतत काही वर्षे काही संहितांची पारायणे करायची आणि एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावायची यात संख्यात्मक आणि गुणात्मक फरक नक्कीच आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे बलस्थान (*वैदिकपठणाने विकसित पावलेला उपाग्रखण्ड*) काळाच्या ओघात सहज नाहीसा होईल. जनुककोषावर बाहेरून होणारे आघात (ताण, प्रदूषण, कुपोषण) देखिल यांस कारणीभूत ठरणार आहेत, हे विसरता कामा नये.
मी इथे मांडलेल्या या कल्पना conjecture स्वरूपाच्या असल्यामुळे बर्याच लोकांना (ब्राह्मणत्वाचा न्यूनगंड असलेल्यांना आणि ब्राह्मणांचा द्वेष करणार्यांना) हास्यास्पद वाटतील, पण त्यांनी एखादे अपरिचित काव्य "घनपाठाचे तंत्र" वापरून पाठ करायचा प्रयत्न करावा आणि मग मला सांगावे.
संदर्भ:
[१] https://www.youtube.com/watch?v=ped-uIlw_24
[२] https://www.scientificamerican.com/article/human-sea-nomads-may-have-evo...
[३] https://www.youtube.com/watch?v=7CBfCW67xT8&rco=1
[४] https://www.apa.org/monitor/2019/03/athletic-brain
[५] https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnhum.2017.00566/full
प्रतिक्रिया
3 Dec 2025 - 7:58 pm | हणमंतअण्णा शंकर...
कांबळे आडनावाच्या एखाद्या २ वर्षाच्या बाळाला (हे बाळ त्यातल्या त्यात जास्त मेंटल क्षमतेचे निवडून) त्या वयापासून हे घनपाठाचे (किंवा तत्सम) ट्रेनिंग देऊन (म्हणजे फक्त इतकेच नित्यनेमाने आणि शिस्तीने), त्याचे नीट भरणपोषण करून त्याच्या मेंदूच्या वळ्या तशा घडवून करायला लावला तर?
मी जितके वाचले त्यानुसार हा मेंदूने पर्म्यूटेशन आणि कॉम्बिनेशन प्रोब्लेम सोडवणे या धरतीवरचा प्रोब्लेम वाटला. शिवाय संपूर्ण प्रयोग मेंटली किती चॅलेंजिंग होता यावर कुठेही कसलेही तांत्रिक स्पष्टिकरण दिसले नाही.
अजून एक, समजा या तरुणाचा मेंदू असा पूर्ण न भुतो न भविष्यती असा आहे असे मला मान्य करायला काहीही अडचण नाही.
पुरोगाम्यांचा (आणि माझा देखील) हा आक्षेप आहे, की या चॅलेंजच्या सोडवणुकीमुळे कोणत्या विज्ञानात भर पडेल का? या तरुणाचे आयुष्य आता असेच जाणार आहे की तो त्याच्या बुद्धिचा उपयोग करून नवं काहीतरी मांडू शकणार आहे किंवा अगदी जे लोक याचा शास्त्रीय अभ्यास करणार आहेत त्यांचा तो स्पेसिमन तरी व्ह्ययला तयार आहे का जेणेकरुन न्युरोसायन्स मधे काहीतरी महत्त्वाची भर घालता येईल?
हे केवळ या तरूणावरच नाही परंतु इतर अशा सर्व मेंदूंना मानवी संस्कृतिचा ठेवा म्हणून जपणे त्यांचा अजून विकास करणे आणि त्यांच्याकडून मुलभूत संशोधने करून घेणे हे तरी सरकार ने करायला हवे. परंतु, (सध्याचे) सरकार या तरुणाला फॉर ऑल दि रॉंग रिझन्स डोक्यावर घेईल.
3 Dec 2025 - 8:03 pm | हणमंतअण्णा शंकर...
नाही त्यामुळे यातल्या ब्राह्मण एज ए वांशिक एथिनिसिटी च्या तुमच्या मुद्द्यांवर आणि निष्कर्षांवर काहीही महत्त्वाचे मांडता येणार नाही मात्र तुमचे निष्कर्ष मी झिडकारत नाही आणि त्यांची सत्यासत्यता पडताळण्याला माझा काडीचाही आक्षेप नाही. ते बिनचूक निघाले तर त्याचा ही उपयोग आपल्याला नक्की होईल.
10 Dec 2025 - 11:27 pm | खटपट्या
मी सुध्दा मानववंशशास्त्राचा अभ्यासक नाही. पण महाराष्ट्रातील ब्राम्हणांचे रंग रुप पाहता (विशेषतः कोकणातील) ते या भुभागातील असावेत असे वाटत नाही. कारण महाराष्ट्रातील जो बहुसंख्य समुदाय आहे त्यांचे आणि कोकणातील ब्राम्हणांचे रंगरुप यात खूप फरक आहे. त्यामुळे ते भारताच्या अन्य भागातून आले असावेत असे वाटते.
मी चूक असूच शकतो.
10 Dec 2025 - 11:58 pm | रामचंद्र
काही वर्षांपूर्वी सोबत साप्ताहिकात बहुधा जोगळेकर किंवा करंदीकर यांच्या एका लेखात अशीच भूमिका मांडली होती. त्यांनी चित्पावन ज्ञातीतली आडनावे आणि इराणमधील प्राचीन गावांची नावे यातील साम्य आणि अन्य काही साधर्म्यसंदर्भ दिले होते असे वाचल्याचे आठवते.
4 Dec 2025 - 7:37 am | युयुत्सु
श्री० हणमंत अण्णा,
अवश्य! ज्याला कुणाला वेदांचे रक्षण आणि अभ्यास करायचा आहे त्याला तो करता यायला हवा. काही दिवसांपुर्वी बहुधा नाशिकमधील ’काकडे’ आडनावाचा एक बालक संथा घेऊन वेदपठण करत रिल असल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे कांबळे आडनावाच्या व्यक्तीला वेदपठण करायचे असल्यास अवश्य करता यावे. ते जर करायला मिळाले तर आजच्या अनेक प्रश्नांची धार कमी होईल. पण मला ’उपाध्ये’ आडनाव असून वेद शिक्षण - केवळ मुंज केली नाही - म्हणून नाकारले होते. पात्र ब्राह्मणेतरांना जानवी वाटणे ही सततची प्रक्रिया होऊ शकली तर समाजाचे जास्त कल्याण होईल.
हे लेखनकला अस्तितत्वात नसताना एकही अक्षर हरवू नये या साठी निर्माण केले गेलेले डेटा प्रिझर्व्हेशन तंत्र आहे. हे तंत्र म्हणजे एक अत्यंत अवघड ’मेंटल जिमनॅस्टिक’ असते. त्यामुळे त्याचे कौतुक जास्त ... मी तुम्हाला एक उदा० म्हणून मनातल्या मनात एक त्यातल्या सोपा प्रयोग सांगतो.
एक ३ आकडी मोठी संख्या मनात पकडा (उदा० ५००) आणि डोळे मिटून त्यातून ९ वजा करा॒. आलेल्या प्रत्येक उत्तरातून संख्या संपेपर्यंत ९ वजा करत राहायचे. तुम्हाला आपली एकाग्रता किती हास्यास्पद आहे ते लक्षात येईल.
या तरूणाच्या मेंदूचा स्कॅन केला तर विज्ञानात भर नक्की पडेल. पण माणसे असंख्य आह्वाने स्वत:ची मस्ती जिरविण्यासाठी स्वीकारतात. रुबिक क्युब कमीतकमी वेळेत सोडविण्याने, एखादा अवघड सुळका पादाक्रांत करण्याने विज्ञानात कोणती भर पडते?
https://www.youtube.com/shorts/bSA-TYvUKN8
https://youtube.com/shorts/1cu-nCt1X2k?si=PCsEINs1v5w1ze33
वर दिलेल्या आह्वानांनी विज्ञानात नक्की काय भर घातली.
आपल्या शंकांचे समाधान झाले असेल अशी आशा करतो.
4 Dec 2025 - 9:18 am | विवेकपटाईत
निरंतर एकाग्रतेने अभ्यास केल्याने कुणीही करू शकतो. त्यात विशिष्ट कुळात जन्म घेण्याची गरज नाही.
लेखन क्रिया आल्यानंतर रामायण महाभारत ते समस्त ग्रंथात मोठ्या प्रमाणावर भेसळ झाली आहे पण वेद त्यापासून वाचले. हेच महत्व या विद्येचे आहे.
4 Dec 2025 - 10:30 am | सोत्रि
हा मुद्दा रोचक आहे, आणि त्याचा आढावा घेणार्या लेखातले मुद्दे विचारप्रवर्रतक नक्कीच आहेत.
- (चिकीत्सक) सोकाजी
4 Dec 2025 - 2:49 pm | मूकवाचक
https://en.wikipedia.org/wiki/Ashkenazi_Jewish_intelligence
6 Dec 2025 - 8:19 pm | भीमराव
काही पण म्हणा पण लहानपणी श्लोक पाठांतर केलं तर बुद्धी तल्लख होते.
मी लहान असताना वारंवार घोकंपट्टी केलेली रामरक्षा, गीतेचा पहिला आणि बारावा अध्याय, खुप सारे श्लोक आणि अष्टके अजून पाठ आहेत.
म्हातारी लोकं पाढे पाठ करत असत त्यांना अगदी पावकी दिडकी अडिचकी, निमकी सवायकी हे असले कालबाह्य गोष्टी अजून पाठ आहेत. ते लोकं आजही हिशोब त्याप्रमाणे च करून आपल्या ला तोंडांत बोटं घालायला लावतात.
राहता राहिला प्रश्न बामनांचा, तर बामनांनी शेकडो वर्षे स्वतः चा मेंदू स्टोरेज डिव्हाईस (याला म्हराठीत काय म्हणायचं ब्वा) म्हणून वापरला आहे. त्यामुळे सहाजिकच बामनांची घोकंपट्टी आणि पाठांतराची क्षमता निर्विवाद पणे वरचढ आहे.
सुतारांच्या आजच्या पिढ्या सुद्धा दुरुस्ती, हस्तकला, इत्यादी मध्ये इतरांच्या तुलनेत लवकर गती घेतात, गुजराती लोकं अंगभूत मार्केटिंग च्या कलेनं धंदे चांगले करतात.
शेवटी- नुसती घोकंपट्टी म्हणजे प्रज्ञेचे शिखर नाही आणि नुसती एक सुरी कारागिरी म्हणजे सुद्धा प्रज्ञेचे शिखर नाही. बामनी ज्ञान पाठ करणारे पाठ करत राहिले आणि तुकाराम महाराज त्याच ज्ञानाची गाथा गाऊन गेले. गवंडी पाथरवट दगड माती करत राहिले आणि हेमाद्री पंत एक बांधकाम शैली विकसित करुन गेले.
7 Dec 2025 - 9:32 am | युयुत्सु
श्री० भीमराव
याचं पण जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देता येते - मानवी मेंदूच्या लवचिकतेला चेताविज्ञानात 'ब्रेन पलास्टीसिटी' असे संबोधले जाते. जनुकीय वारसा, गर्भावस्थेमध्ये होणारे आघात, जन्मानंतर होणारे पोषण, आजुबाजुचे वातावरण या सर्वांचा मेंदूच्या लवचिकतेवर प्रभाव पडत असतो. बेल कर्व्ह च्या नियमानुसार काही घटकांमध्ये मेंदूचा विकास लहानपणी मिळणारे शिक्षण, उत्तेजन आणि संधी यामुळे खुप मोठ्या प्रमाणात होतो, तर काही जणांमध्ये सामान्य प्रमाणात होतो. तर काही जणांमध्ये खुपच कमी प्रमाणात होतो.
ज्यांच्या मध्ये मेंदूचा विकास खुप कमी प्रमाणात होतो ते गुन्हेगारीकडे वळतात.
7 Dec 2025 - 10:08 am | युयुत्सु
वर दिलेल्या उत्तरात एक उल्लेख राहून गेला - मेंदूची लवचिकता जेव्हढी जास्त तेव्हढा मेंदूच्या विकासाची शक्यता जास्त!
जाता जाता अवांतर - कुत्र्यांच्या मानवीकरणातून माणसाला बरेच शिकण्यासारखे आहे. कुत्र्याच्या प्रत्येक चांगल्या कृतीचे माणुस कौतुक करतो, त्याला शाबासकी देऊन खाऊ देतो. माणसाच्या बाबतीत मात्र तसे होताना दिसत नाही. खिशातून काहीही जात नसले तरी फुकटचे कौतुक करायला माणसांना खुप जड जातं. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणायला खुप मोठं मन लागतं. त्यात पण माणसं परत छिद्रान्वेषी असतात. मिसिंग टाईल सिण्ड्रोम ने पछाडलेली असतात. मानवाचा विकास या वळणावर मोठ्या प्रमाणावर गंडला आहे असे माझे ठाम मत आहे.