नमस्कार मंडळी
नुकतेच प्रणव सखदेव या लेखकाचे के कनेक्शन्स वाचुन संपवले. "दिल का हा सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहते रहेगा कहनेवाला" हे गाणे तुम्ही ऐकले असेल तर हे पुस्तक तसेच आहे. सातवी/आठवीत असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या नजरेतुन हे पुस्तक लिहिलेले आहे. पण या पुस्तकाचा मुख्य हीरो हा लेखक नसुन त्या वेळचे कल्याण शहर आहे असेच मला वाटत राहीले. म्हणजे प्रसंग लेखकाच्या जीवनात घडलेलेच असले तरीही त्या प्रत्येकावर ते ज्या परीसरात घडले त्याचा अमीट ठसा असल्याने , आणि त्यातील जवळपास सर्वच ठिकाणे मला अक्षरशः तळहाताच्या रेषांसारखी माहीत असल्याने, मी ते पुस्तक वाचताना मनातुन जवळपास अर्धे कल्याण, आणि टिटवाळा,डोंबिवली वगैरेंचे उल्लेख आल्याने तिथेही फिरत होतो.
लेखकाने बरीच नावे बदलली असली तरीही चपखल वर्णनामुळे ती कोणती ठिकाणे आहेत ते समजतेच. म्हणजे एका प्रकरणात मुलगा मुलीला जिथे प्रपोज करतो तो पोस्ट ऑफिस जवळचा रस्त्याचा "टी", भाजीवाली अक्का बसण्याची जागा आणि तिची आगरी बोली,सुभाष मैदानातील हुसैन गोळेवाला उभा राहण्याची जागा, टिळक चौकातील मन्याचा वाडा(जिथे माझा मित्र सुश्रुत रहायचा, आणि गंमत म्हणजे तोही घार्या डोळ्यांचाच आहे), सोपान सावली बिल्डिंग आणि तिचा परीसर, काळा तलाव, भारताचार्य चौक --जिथे देवी बसायची, लेले आळी आणि सगळ्यात मजा म्हणजे पुस्तकात नाव जरी दिले नसले तरी वर्णनावरुन समजणारी शाळा, माझी ओक हायस्कूल. तिथे घडणारे प्रसंग, शाळेतली एखादी "अॅडव्हान्स " मुलगी आणि बाथरूम लिटरेचर् मुळे तिच्या आयुष्यात आलेले वळण, सायकलची चोरी आणि त्यामुळे कायमची तुटलेली मैत्री, बिल्डींगमधील विविध लोक आणि त्यांच्याशी जमलेला स्नेह, दुर्गाडी किल्ला आणि जिथे कल्याणातील (निदान माझ्या वेळपर्यंत) सगळेजण पोहायला शिकले ती खाडी ,गांधारी गाव, जेलजवळचे तळे असे एक ना अनेक.
आणि सरते शेवटी लेखकाच्या आयुष्यात आलेले पहीले प्रेम "काफ लव्ह" आणि त्या तुटण्याने त्याच्या लहानग्या मनात उडालेली खळबळ. खरेच सांगतो वाचता वाचता मी जणू काय स्वतःचीच गोष्ट वाचतोय असे वाटत राहते. आणि कदाचित तोच या पुस्तकाच यु एस पी असावा. मालगुडी डेज सिरीयल बघताना, किवा प्रकाश संतांची लंपन सीरीज वाचताना कसे आपण हळूहळू त्यात ओढले जातो तसे काहीसे माझे हे पुस्तक वाचताना झाले. म्हणुन पुस्तक मिटले आणि आता मिपाकरांबरोबर शेअर करतोय. बघा, मिळाले तर नक्की वाचा.
प्रतिक्रिया
21 Nov 2025 - 7:00 am | कंजूस
तरंगायचे दिवस ( https://www.maayboli.com/node/42452 )... हेसुद्धा आवडेल तुम्हाला.
21 Nov 2025 - 2:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त मजा आली वाचताना. मी या मुलीला (म्हणजे बाईला म्हणायला पाहीजे खरेतर) आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला तसेच उल्लेख केलेल्या जवळपास सर्वांना ओळखतो. साधारण मी पोहायला लागलो त्याच्या ४-५ वर्षे आधीचे हे किस्से आहेत. आमच्या ग्रुपचीही मुंब्रा खाडीपर्यंत जायची खुमखुमी होती, पण ते झाले नाही. बाकी खाडी क्रॉस करणे, ड्रेजरवरुन आणि पुलावरुन उड्या मारणे, ९ खांब आणि जठार पॉईंट, ईलेक्ट्रिक तारांखाली फ्लोट करत राहणॅ वगैरे सगळे अगदी तस्सेच. लिहिताना खाडीचे खारे पाणी नाकातोंडात गेल्याचा भास होतोय. :)
21 Nov 2025 - 11:02 am | Bhakti
छान परिचय.शाळेतले दिवस म्हणजे खरे निरागस दिवस असतात,पुरून उरणारे!
2 Dec 2025 - 11:24 am | कुमार१
छान परिचय. आवडला