स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे? असे त्या म्हणतात.पण नारायण टिळक आहेतच अगदी विलक्षण आणि हे लक्ष्मी नारायणाचे जोडपं दुधात साखर विरघळावी अगदी तसच अविरत गोडीचे ,हे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात पानोपानी समजते.
या पुस्तकाचे लिखाण त्यांनी टिळकांच्या हयातीनंतर त्यांच्या आठवणी मांडण्यासाठी तत्कालीन पाक्षिकात तीन भागात केले आहे.सासर माहेर दोन्ही अगदी धार्मिक कुटुंब आहेत.इतके की लक्ष्मीबाई लहानपणी त्यांच्या वडिलांना सोवळे कसे होत,व ती खोड भावंड कशी मोडत ते वाचतांना कमाल वाटते.सासरी सासू नाही पण सासरेही देशवार सुनेची नेहमी परीक्षा घेत.हे सगळ वाचताना सासू –सून मालिका प्लॉट वाचतोय अस वाटत .पण त्यातच नारायण टिळकांची चंचल वृत्ती सतत दिसून येते.ते खूप ज्ञानी,वेद जाणणारे पंडित पण ‘दामाजी’ त्यांना कधीच प्रसन्न नसे.तेव्हा ते सतत नोकरी निमित्त स्थलांतर करीत राहत.यात लक्ष्मी बाईंना कधी सासरी,माहेरी,आत्याकडे,बहिणीकडे अनेकदा मदत मिळत पण कडक बोलणेही मंडळीची ऐकावी लागत.टिळक कवीही थोर ,कीर्तनही करत .अशा प्रसंगाची कविता ते सहज रचत आणि कीर्तनातूनही सादर करत .असेच काव्य त्यांनी भिकुताई,’मंबाजीबाई’इतर अनेकांवर रचलेली लक्ष्मीबाईंनी सांगितले आहेत.पहिल्या अपत्य निधनानंतर टिळकानी रचलेले बापाचे अश्रू हे काव्य आणि घारू ताईला शब्दांचे घातलेले दागिने हे काव्य खूपच सुंदर आहे.
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.”
टिळकाना रेल्वेत एक ख्रिस्ती भेटतात वादविवाद आणि व्याख्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या टिळकांनी ख्रिस्ती धर्माविषयी अनेक प्रश्न केले,तेव्हा त्यांच्या हाती पडला ख्रिस्ती धर्मग्रंथ ,आणि प्रभू ‘येशू’यांचे ते हळू हळू अनुयायी होऊ लागले.टिळक धर्मांतर करणार तेव्हा लक्ष्मीबाई बहिणीकडे होत्या.उच्च धर्मियाने धर्मांतर करणे त्या काळात गहजबच होता.लक्ष्मी बाईंचे त्या व नंतर पाच वर्षेचे दुसऱ्याकडील जीवन जीव आहे पण आत्मा नाही असेच होते.आजारांनी त्यांना बेजार केलेच आपण टिळकांवरचे त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या.व्याख्याने ,ख्रिस्ती कीर्तनेही करायच्या.
आणि नगरमधील त्यांचे वास्तव्य सुरु झाले नगर हे माझेच गाव तेव्हा तिथल्या स्टेशन ,चांदबीबी,डोंगरगण,फर्ग्युसन गेट,हिवाळे,रोबर्ट ह्यूम,राहुरी इत्यादी विषयी त्या सांगताना कोणी शेजारीणच माझ्याशी गप्पा मारत आहे असे वाटले.
लक्ष्मीबाईंकडे माणस जोडण्याची टिळकांप्रमाणे कला होती.अनेक मुले त्यांनी सांभाळली काही अनाथ,गरीब,आई नसलेली त्यात मराठीचे थोर कवी बालकवी हेही होते.तसेच अतरंगी लोकही भेटले.हे सगळे प्रसंग- काही प्लेगच्या कारुण्याचे त्यातही दांपत्याचा सेवाभाव दाखवणारे,ठोंबरे (बालकवी)बरोबरच्या आंबट गोड तरीही आई मुलांच्या नात्याच्या हळव्या आठवणी आहेत.नगरला असतांना टिळकांनी अभंगांजली,ख्रिस्ती दरबार रचला.टिळक अनेकदा अडलेल्या मदत करत तेव्हा या कुटुंबाची काळजी रोबर्ट ह्यूम यांना असत व ते विविध योजनांद्वारे मदत करत हे जागोजागी त्यानी लिहिले आहेच.लोणावळा,सातारा येथले दिवस त्या उबदार आठवणी लिहिल्या आहेत.
दत्तूचे लग्न, बेबीचे शिक्षण ,शेवटच्या दिवसांत टिळकांची संन्यस्त वृत्ती या बाबतचे एक कौटुंबिक सौख्य शब्दोतीत होते.टिळकांनंतर मुंबईत एक मुलींच्या वसतिगृहावर मेट्रन ही नोकरी स्वीकारली तेव्हा कुटुंबाला स्थिरत्व देतांनाही त्यांना आनंदच होतो,मी अशिक्षित मला नोकरी मिळाली हेही खूप महत्वाचे असे त्यांना वाटत.त्यांनी इंग्रजी शिकण्याचा,अगदी नर्सही होण्याचा प्रयत्न केला पण नशीब साथ देईना.मराठी वाचता ,लिहिता येत पण जोडाक्षरे त्यांना लिहायला अवघड जात त्याचा बालकवीबरोबरच ‘मनुष्य’ शोधतेय हा आणि बालकवी यांनी त्यांच्या पुस्तकासाठी लिहिलेली खोटी खोटी प्रस्तावना खूप गमतीशीर आहे.
बेबी ,सून रुथ आणि नातवंड नाना ,अशोक बरोबरचे कराचीचे पारप्रांतातले घराचा अनुभव अखेरच्या पानांवर आहेत.
नारायण टिळक नावच शब्दांचे,लोकसेवेचे ,असामान्य वादळात लक्ष्मीबाई यांनी अनेक उतार चढाव करत परिपूर्णपणे अनुभवलं.त्या याच वर्णन करताना लिहितात , “आमच्यात जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा सवेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा.डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटार्याची जी आदळआपट होईल ती माझी होत असे.त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येये पटवून घेण्यास अवसर मिळाला ,की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चाले”
लक्ष्मी बाईचा कविता प्रवासही या स्मृतिचित्रांतून उलगडतो.टिळक धर्मांतरासाठी दूर जातात तेव्हा-नवरा,करंज्यातील मोदक,पतीपत्नी,श्रीमती,नातवावरची कविता यात वाचायला मिळतात.
टिळक लिहित असलेल्या अपूर्ण ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय लिहून लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ पूर्ण केले. १९३३च्या साहित्य संमेलनात त्या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.
या आत्मचरित्रात अनेक प्रसंग कालानुसारच पण आठवतील असे गप्पांसारखे लिहिले आहेत.सहजच आनंद,दुखा:ची रेशमी झालर,माणसांची ऊब,ईश्वाराची असीम कृपा पानोपानी वाहत आहे.म्हणूनच एका शतकानंतरही लक्ष्मीबाईन्चे ही स्मृति चित्रे अजरामर आहेत.
नारायण वामन टिळक यांची ही नगरमधील सिद्धार्थ नगर येथील ख्रिस्ती दफनभूमितले स्मृतीस्मारक(त्यांचे दहन करून त्यांच्या अस्थी येथे ठेवण्यात आल्या आहेत).टिळकांच्या शेवटच्या इच्छेनुसार इथे पांढऱ्या दगडात “पुष्कळ अजुनी उणा प्रभू,मी पुष्कळ अजुनी उणा रे !” ह्या ओळी कोरला आहेत.स्मृतीचित्रे पुस्तकातील ८० व्या “छाया” भागात त्याच्या मृत्युपत्र सविस्तर सांगितले आहे.त्यामुळे हे स्थळ आज पाहताना काळ मागे गेला व समोर उभा राहिला असे वाटले.
सह्याद्री वाहिनीवर स्मृतिचित्रे आधारित दोन भागांची एक मालिका होती तिचा दुवा
स्मृतिचित्रे भाग -१
स्मृतिचित्रे भाग-२
करंज्यातील मोदक ही कविता
करंज्यातील मोदक
-भक्ती
प्रतिक्रिया
8 Jan 2024 - 10:19 am | कंजूस
चांगलं लिहिलं आहे. हे आणि रेव. टिळक यांचेही पुस्तक वाचलं आहे. नगरमध्ये कथोलिक रोमन तसेच अमेरिकन प्रोटेस्टंट दोन्हींचा धर्मप्रसार होता. टिळक बहुतेक अमेरिकन मिशनरींबरोबर होते. त्यामुळे वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो (कथोलिक) टिळकांचं नावही घेत नाहीत.
8 Jan 2024 - 11:14 am | Bhakti
चांगली माहिती दिली कंकाका.
नगरच्या ह्युम चर्चला जायचं होतं काल बंद ह़ोतं दुपारी.तिथे टिळक आणि ह्युम यांचा मोठा फोटो आहे असं कळलं.तसेच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात नारायण टिळकांच्या काही वस्तू,ग्रंथ,केस(त्यांच्या सुनेने ते आठवण म्हणून शेवटच्या वेळेस दाढीतून कापून ठेवले होते)पण अजून ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत.फर्ग्युसन गेट अजून अस्तित्वात नाही.माळीवाड्यात ते राहायचे ते घर पडीक अवस्थेत आहे असे समजले.
8 Jan 2024 - 10:34 am | कुमार१
चांगलं लिहिलं आहे.
8 Jan 2024 - 4:09 pm | Bhakti
_/\_
कुमारजी.
8 Jan 2024 - 11:12 am | कर्नलतपस्वी
लहानपणी मराठीच्या पुस्तकात काही धडे होते. विजया मेहता यांनी स्मृतीचित्रे मधे खुपच सुंदर काम केले आहे. दोन्ही भाग बघीतले. फार दिवस झाले. उजळणी करायला हवी.
लेख आणी लिंक साठी आभार.
8 Jan 2024 - 3:08 pm | Bhakti
विजया मेहता आणि सुहास जोशी यांचेही काम सुंदर आहे.
8 Jan 2024 - 12:07 pm | गवि
स्मृतिचित्रे म्हणजे मोठाच खजिना.
त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात.
टिळकांची समाधी आणि इतर फोटोही लेखाशी सुसंगत.
हे पुस्तक प्रत्येकाने खरोखर वाचावे. ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांच्यासाठी अत्यंत स्वच्छ आवाजात वाचन करून ऑडियो बुक करण्याचे सत्कर्म कोणीतरी आंतरजालावर केले आहे. विद्या हर्डीकर सप्रे असे नाव दिसले. डाऊनलोड करून कारमधे गेल्या दहा वर्षांत अनेकदा ऐकले.
8 Jan 2024 - 3:07 pm | Bhakti
हो, अगदी आता परत लिहिल्यावर वाटतं,त्याकाळच्या पत्र,तार यांचा त्याकाळी किती प्रामुख्याने वापर व्हायचा असे अगणित प्रसंग यात आहेत तेही लिहिणार होते पण विसरले.प्रचंड आवाका आहे या पुस्तकाचा.
8 Jan 2024 - 3:55 pm | गवि
शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले. अनेक अशा जबाबदाऱ्या हौसेने म्हणा किंवा समाजाची रीत म्हणून म्हणा, घेतलेल्या दिसतात. हे केवळ टिळकांच्या बाबतीत नव्हे तर इतर सर्व कुटुंबात. पेंडसे असोत, खांबेटे असोत, बुटी असोत, ह्युम असोत. कोणाची बायको मेली की त्या पुरुषाने तिची मुले थेट माहेरी / मामाकडे स्वाधीन करून जबाबदारीतून मोकळे होणे हेही रूटीन असावे असे भासले.
बायकांना अतिशय नगण्य किंमत हेही सर्वत्र जाणवते. लहान पोरे, ती काहीतरी आजार होऊन मरणे, आणि एकूण व्यक्तीचे मरण हेही फारसे मोठे काही मानले जात नसावे. मनकर्णिका गोखले यांच्या वडिलांना झालेला "सोवळे" असा उल्लेख केलेला मंत्रचळ म्हणजे ओसीडीचा तीव्र नमुना, हे आता वाचताना भेदकपणे जाणवते. पण तेव्हा ते डायग्नोसिस झाले असणे शक्य नाही. ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे. पण त्या ओसीडीमुळे त्या सर्व कुटुंबाने आयुष्यभर किती सोसले ते जाणवते.
8 Jan 2024 - 4:07 pm | Bhakti
मी तेच सहकार्यांशी डिस्कस केलं, काही दिवस कुरबुरी पण एखाद्यावर प्रसंग आलं की जवळचे दुरचे नातेवाईक,ओळखीचे सगळे बरोबर उभे राहत.
विचार करण्यासारखे आहे.
8 Jan 2024 - 12:50 pm | रंगीला रतन
अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या.
नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)
8 Jan 2024 - 2:26 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
8 Jan 2024 - 3:22 pm | कंजूस
तुम्ही पुस्तक वाचलेत का?
मी हे पुस्तक आणि रेव.टिळकांचंही पुस्तक अशासाठी वाचले की जाणून घ्यायचे होते की त्या काळी काही जणांनी क्रिस्ती धर्म का स्विकारला. मुख्य कारण म्हणजे प्लेग,आणि इतर साथींमध्ये गरीबांचे कुणीच वाली नव्हते. ते काम या मिशनऱ्यांनी उचलले. साहजिकच ते गरीब लोक मिशनऱ्यांना सोडून नाही गेले. आमच्या इथल्या धनाढ्य लोकांनी अधुनमधून गावजेवणे. घालण्यापलीकडे काही केले नाही.
8 Jan 2024 - 4:12 pm | Bhakti
+१
हो प्लेग व इतर साथीचे रोग उद्रेक दर तीस चाळीस पानांतर परत परत येतात.
8 Jan 2024 - 4:04 pm | Bhakti
कृपया लक्षात घ्या ही वाक्य पुस्तकातील नाही,हे माझ़ं आकलन आहे, पुस्तक वाचून आपलं मतं नक्की द्या.
8 Jan 2024 - 2:43 pm | धर्मराजमुटके
आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !
8 Jan 2024 - 2:53 pm | अमरेंद्र बाहुबली
आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !
युपीच्या एका तहसीलदाराने बायकोच्या सांगण्यावरून इस्लाम स्विकारला. ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव.
8 Jan 2024 - 4:08 pm | Bhakti
अबा भावा, संपूर्ण पुस्तक वाच पाहू आणि मत सांग :)
8 Jan 2024 - 4:15 pm | अमरेंद्र बाहुबली
वाचतो.
8 Jan 2024 - 9:32 pm | रंगीला रतन
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.”
+१
हायेत आपलेच काही बावळट ज्यांना असल्या लोकांचे कौतुक आहे :=)
8 Jan 2024 - 3:09 pm | Bhakti
१००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !
+१
8 Jan 2024 - 9:26 pm | रंगीला रतन
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.”
या बद्दल काय बोलता?
8 Jan 2024 - 9:38 pm | रंगीला रतन
वरचा प्रतिसाद गांडला :=)
ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव.
+१
8 Jan 2024 - 9:41 pm | Bhakti
माझं लिहून, पुस्तक साहित्याचा आस्वाद घेऊन झालाय.
8 Jan 2024 - 9:50 pm | रंगीला रतन
आस्वाद घ्या पण फालतू लोकांची प्रसिद्धी करू नका :=)
9 Jan 2024 - 3:27 am | नठ्यारा
अवांतर :
स्मृतिचित्रे उत्तम साहित्य आहे यांत शंका नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता काही प्रश्न उत्पन्न होतात.
०१. येशूची भक्ती करायला धर्म बदलून ख्रिश्चन का व्हायला पाहिजे? पाण्यांत डुबकी मारायची गरज काय मुळातून?
०२. येशूचा/ची भक्त झाल्यावर मुडदा पुरायला हवाच का? जाळून नाही का टाकता येणार? मुडदे पुरायला सतत जागा कुठून मिळणार?
०३. येशूची भक्ती करण्यासाठी पोपची चमचेगिरी आवश्यक आहे का? असल्यास का बरं? नसल्यास का नाही?
०४. रशियन स्वत:स ख्रिश्चन म्हणवून घेतात पण ते पोपचे विरोधक आहेत. ते खरे ख्रिश्चन मानावेत का?
०५. ख्रिस्ती ( इंग्रजीत ख्रिश्चन ) म्हणजे नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे ख्रिस्तावर ज्यांचा विश्वास आहे ते सारे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्त म्हणजे मराठीत तारणहार. येशू हाच आमचा तारणहार अशी सक्ती आहे का? माझा तारणहार कल्की असेल तर मी स्वत:स ख्रिस्ती म्हणून घोषित करू शकतो का? पोपला कदाचित आवडणार नाही. पण त्याला विचारतोय कोण !
०६. समजा मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो. ही फार मोठी प्रगती आहे. माझं कोणी माझं अभिनंदन व सत्कार वगैरे करेल का? त्यातनं मला पैसे मिळतील का? मिळाले तर ते घ्यावेत का? की इतर कोणास दान वगैरे करावेत?
०७. 'तू तर माझ्याही पुढे गेलीस' असं रेव्हरंट टिळक लक्ष्मीबाईंना म्हणाले होते. मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो, तर मी कुणास मागे टाकून पुढे गेलो? माझ्या प्रगतीची दिशा काय? पोपची चमचेगिरी झुगारून दिली म्हणून माझा आदरसत्कार कोणी करेल काय?
०८. पोप पैसे कशाला मागतो? मी ख्रिस्ती झालो तर मला पैसे भरावे लागतील काय? ते न भरले तर मी परत अख्रिस्ती होईन काय? मला सुलभ हप्त्यांवर ख्रिश्चन होता येईल काय? हल्ली Subscription Based Model बरंच लोकप्रिय आहे. तशा धर्तीवर ख्रिस्तीपणाचं सदस्यत्व मिळेल काय? कंटाळा आल्यास बंद करता येईल. लक्ष्मीबाई व रेव्हरंट टिळकांनी उगीच इतका खटाटोप केला.
०९. जर सुलभ हप्त्यांवर ख्रिस्ती होता आलं आणि मी ती योजना बंद केली तर पूर्वी भरलेले पैसे पोप मला परत करेल काय? आयुर्विम्याची पॉलिसी मध्येच रद्द केल्यास एलायसी परत करते म्हणे. पोप माझ्या पैशांचं काय करेल? हडप करेल काय? काही वर्षांपूर्वी व्हाटिकन आपल्या पैशांचा हिशोब जाहीर करणार म्हणून राट्झिंगर पोपने घोषणा केली होती. पण इथे https://www.vatican.va तर तसं काही दिसंत नाही. पोप माझ्या पैशाचं काय करेल? इतरांना बाटवण्यासाठी तर वापरणार नाही?
१०. इतरांना बाटवण्यासाठी जर माझा पैसा वापरला जाणार असेल, तर मी निषेध कुठे नोंदवायचा? की मलाही या अफरातफरीत सामील व्हावं लागेल? तसं झाल्यास पोपची ख्रिश्चानिटी ही खरंतर एक अॅमवे पिरामिड सारखी पॉन्झी स्कीम म्हणायची.
असो.
असे बरेच प्रश्न आहेत. पण तूर्तास इतकं पुरे. यथावकाश बायबल व पोपवरील प्रश्न बाहेर काढेन.
-नाठाळ नठ्या
टीप :
एक रोचक इंग्रजी लेख सापडला : https://www.catholicnewsagency.com/news/33788/suspended-audit-reveals-po...
मला या मारामारीत भाग घेता येईल काय?
9 Jan 2024 - 8:35 am | प्रचेतस
पुस्तक संग्रही आहेच पण अजून वाचलेले नाहीये, आपल्या दिलेल्या परिचयामुळे लवकरच वाचेन.
9 Jan 2024 - 12:04 pm | Bhakti
नक्की वाचा.
9 Jan 2024 - 12:16 pm | प्रसाद प्रसाद
खूप छान लिहिलंय भक्तीताई तुम्ही. स्मृतिचित्रांचा पट किती मोठा आहे आणि तुम्ही तुमच्या लेखात तो खूप छान मांडला आहे. स्मृतिचित्रात लक्ष्मीबाईनी राहुरीत जो काळ घालवला तो त्यांच्या दृष्टीने सर्वात सुखाचा असेल असे मला वाटते. शिर्डीला जाताना नगर आणि राहुरी लागले की लक्ष्मीबाईंची आठवण येतेच. टिळक ख्रिस्ती का झाले हा प्रश्न खूप जणांना पडतो, स्मृतिचित्रे वाचून जे मला समजले ते असे की टिळक आणि त्यांचा लहान भाऊ ह्यांचे स्वभावच वेगळे होते. टिळकांना प्रत्येक वर्गातील गरजू लोकांचा कळवळा होता, त्यांना त्यांची मदत करायची इच्छा असायची पण त्या काळातील एकूणच जातिभेदाचा विचार करता त्यांना ते प्राप्त परिस्थितीत शक्य होत नव्हते त्यामुळे ते ख्रिस्ती झाले. टिळकांचे ख्रिस्ती होणे आणि इतर लोकांचे ख्रिस्ती होणे यात कायमच फरक दिसत राहतो. लक्ष्मीबाई तरी कुठे जातिभेदाच्या विचारापासून एकदम सुटल्या? आणि त्याची साद्यंत वर्णनेही त्या सांगतात. सोवळा झालेल्या बापाची मुलगी मनू ते प्लेगच्या रुग्णांची स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मीबाई हा प्रवास थक्क करणारा आहे. स्मृतिचित्रात नागपूरचे बुटी भेटतात, बालकवी येतात आणि नाव उघड न होता (बहुधा) दासगणू महाराज ही येतात. मराठी आत्मचरित्रातील सर्वात प्रांजळ आणि उत्तम लिहिलेले असे हे संग्राह्य पुस्तक आहे.
9 Jan 2024 - 1:08 pm | Bhakti
छान प्रतिसाद!