मरण...
रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...
तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...
कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...
आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...
कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...
झोपली नव्हती ती,
झाली होती क्लांत,
दवाखान्याच्या शय्येवर,
तिला मिळाली होती उसंत..
आकाशात दूर कुठेतरी,
तेजस्वी तारा निखळला,
गाली तिच्या एक,
चुकार अश्रू ओघळला...
डॉक्टरांना येताना पाहून,
मुलगा थोडा घुटमळला,
"किती वेळ राहिला" विचारताना,
नवरा जरासा अडखळला...
अचानक सगळं शांत झालं,
हृदय तिचं थांबलं.......
कोणीतरी कुजबुजलं,
"बरं झालं, मरण नाही लांबलं..."
जयगंधा...
६-२-२०२१.
प्रतिक्रिया
9 Feb 2021 - 7:10 am | राघव
वास्तव आणि चित्रदर्शी.
18 Feb 2021 - 6:04 pm | Jayagandha Bhat...
धन्यवाद..
19 Feb 2021 - 11:31 am | गणेशा
खूपच आर्त लिहिली आहे..
डोळयांसमोर मरण दिसते आहे, आणि मग सगळ्या घटना, चिंता, लेखाझोका समोर येताना शहारा येतो...
तुमची मी पहिलीच कविता वाचली बहुतेक..
लिहीत रहा.. वाचत आहे...
26 Feb 2021 - 9:20 am | Jayagandha Bhat...
मनापासून धन्यवाद
19 Feb 2021 - 12:19 pm | बाप्पू
कविता खूपच छान जमली आहेत. पण इतक्या सिरीयस विषयावर आहे कि छान म्हणवत नाहीये.
20 Feb 2021 - 4:44 pm | तुषार काळभोर
Exactly
26 Feb 2021 - 9:20 am | Jayagandha Bhat...
मनापासून धन्यवाद
26 Feb 2021 - 9:21 am | Jayagandha Bhat...
मनापासून धन्यवाद