बाईने लग्नाचे असतात तेवढे मोठे २ अल्बम कपाटातून काढले आणि त्यातला एक फोटो काढुन आम्हाला दाखवला. "ह्या मुलीने तुमचे स्थळ पसंत केल आहे. ती तुम्हाला ओळखते, तिच आत्ता मी फोन केल्यावर येणार आहे." फोटोच्या मागेच तिची माहिती लिहली होती. ही मुलगी आमच्याच परीसरातली आणि आम्हाला माहित असलेल्या तिच्या स्वभावामुळे आम्ही तिला स्पष्ट सांगितले की ह्या मुलीला बोलवू नका. तिने मावशीला नकाराचे कारण विचारले. का हो ? चांगली तर आहे ही मुलगी, काय प्रॉब्लेम आहे ? आणि तुमच्या अपेक्षा पण सांगा. मावशीने तिच्या मुलिला सांगायला सांगितले. ती म्हणाली "आमच्या आईला तिने निट सांभाळले पाहिजे आणि घरही निट सांभाळले पाहिजे." हे ऐकताच ती जोरानेच ओरडली, " आहो घर आणि आई नंतर सांभाळेल, पहिला मुलाला नको का सांभाळायला, समजून घ्यायला? (माझ्याही मनात तेच आल होत तेंव्हा) तुम्ही मुलाला आणायला पाहिजे होते, म्हणजे त्याच्या आवडी निवडी, त्याच्या अपेक्षा मला समजल्या असत्या."
"ठिक आहे मी तुमच्यावर कसलीच जबरदस्ती करत नाही तुम्हाला मी आता अजुन मुलींचे फोटो दाखवते. त्यातली तुम्हाला कुठल्या आवडतात ते बघा. मी तुमचा त्यांच्याशी परीचय करुन देईन. मी मागच्या वर्षी २५० लग्न जमवली. ह्यावर्षी २३० झाली आहेत. २ वर्षा पुर्वी ४०० लग्न मी जुळवली होती. त्यावर्षी मला शासनाकडून दुसर्या नंबरच बक्षिस मिळाल होत. आहो तुम्हाला वाटत तितक हे काम सोप्प नाही, खुप कटकटी आहेत ह्याच्यात. माझा नवरा कधी कधी वैतागुन बाहेर जातो, बंद कर म्हणतो हे नसते धंदे. मुलगाही कंटाळतो, म्हणतो तुला काय हव ते मिळत ना सगळ, आम्ही देतो ना तुला पैसे ? मग कशाला हे नसते खटाटोप करतेस ? पण मी कोणाचं ऐकेन तर शप्पथ ! सगळ्यांवर टिच्चून मी माझ्या बेडरुम मध्ये आता हे कार्य चालवते. म्हणुन तुम्हाला थेट बेडरुम मध्ये घेऊन आले हॉल मध्ये न नेता. "
"आहो काहितरी उद्योग नको का मेंदूला ? स्वस्थ बसले तर सडेल आणि घरातल्या माणसांची डोकी खाईन आत्ताच्या प्रमाणापेक्षा जास्त. घर काम काय सगळ्याच करतात, पण त्यातुन किती समाधान मिळत ? थकवाच जास्त वाट्याला येतो. नवरा मुलांना काही त्याच महत्व नसत आपण कितीही राबलो तरी. हा उद्योग सुरू करण्या पुर्वी मी ग्राउंडला जी तुम्हाला मोकळी जागा दिसते (बिल्डिंग खाली भरपुर मोकळी जागा होती. त्यात गवत वाढल होतं) त्यात मी भाजी लावली होती. मोठी मोठी वांगी, मिरच्या, टोमॅटॉ येत होते. नवरा पण त्या कामात मला साथ देत होता. ही भाजी काही मी माझ्याच घरात नव्हते आणत. बिल्डींग मध्ये सगळ्यांना वाटत होते. एक दिवस कुणाला तरी किडकी भाजी गेली असेल नाहीतर कमी आली असेल तर लगेच त्यांच्या डोळ्यात माझा मळा खुपला आणि त्यांनी माझी कंप्लेंट करून माझा मळा बंद पाडला. तेंव्हापासून मी बिल्डिंगमध्ये कोणाशी जास्त संबंधच ठेवत नाही.
" माझे गिर्हाईक म्हणतात की तुम्ही बाहेर जागा घेऊन ही संस्था का चालवत नाही ? आहो मी एकटी ही संस्था चालवते, मी पार्टनर कोणी घेत पण नाही, कारण मला माहित आहे माझ्याबरोबर कोणाचे पटणारच नाही, मग मला एकटीला कस परवडेल बाहेर जागा घेऊन ? आणि आहे त्यात मी समाधानी आहे. उलट हाच व्याप सांभाळताना नको होत. मला प्रसिद्धीची पण हाव नाही. तुम्ही दाराची कडी वाजवलीत तेंव्हा पाहील असेल की माझ्या दारावर नवर्याच्या नावाची पाटी आहे. विवाह सुचक मंडळाची नाही. "
" आहो १०-१० मिनीटांनी फोन येतच असतात स्थळांची. हे बघा अल्बम किती स्थळ आहेत, आज ह्याची भेट घालून दे उद्या त्याची. कधी कधी ४-५ जणांचा सामुहीक बघण्याचा कार्यक्रमही घेते. नवरा घरात नसेल तेंव्हा घरात आणि असेल तेंव्हा गार्डन मध्ये. कुणाच्या कुंडल्या जमत नाहीत. आहो कसल्या आल्या कुंडल्या नी छत्तीस गुण ? माझा ह्यावर मुळीच विश्वास नाही, देवावर तर माझा मुळीच विश्वास नाही कारण त्याच्याकडे सगळ्यांना समान न्याय नाही. माझ्या घरात तुम्हाला एकही देवाचा फोटो दिसनार नाही." समोर एक लक्ष्मीचा नारळ तांव्याचा घट होता. त्याची पुजा झालेली दिसत होती. "ही तुम्हाला पुजा दिसते ती माझ्या स्वर्गवासी सासूची इच्छा आहे. ती मी अजुन पुरी करते. ती जाऊन ७ वर्षे झाली. पण तिची इच्छा होती की ही पुजा मी नेहमी करावी म्हणून. सासूला देव मानुन तिला स्मरून ही पुजा मी दर गुरूवारी करते."
"एखाद्या मुलाला मुलगी पसंत असते तर मुलीला मुलगा पसंत नसतो, दोघांना पसंत असेल तर घरच्यांना नसतो. अशा वेळी मी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. कारण माझ वधु किंवा वराशी नेहमीच मैत्रीच नात असत. त्यांना मी एकट्यालाच मला भेटण्यासाठी एक दिवस बोलावते त्यांच्या मनातल खर जाणण्यासाठी, पालकांसमोर ही मुल बोलत नाहीत आपल्या मनातल, पण माझ्या समोर शांत मुल, मुली अगदी जुन्या मैत्रीणी सारखी सगळ मनातल ओकतात. तासन तास माझ्याशी गप्पा मारतात. पुन्हा पुन्हा भेटायला येतात आणि फोन करतात. त्या सगळ्यांना मी लाडाने "कारटा" आणि "कारटी"म्हणुनच हाक मारते. "
" एकदा एक मी लग्न जबरदस्तीने केल होते, म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले होते. एक दोन वेळा भेटवून दिल्यामुळे मुलाची आणि मुलीची आपाआपसात फोनाफोनी होऊन ते जरा प्रेमातच पडले होते. पण मुलाच्या आई वडीलांना मुलगी पसंत नव्हती कारण तिची आर्थिक परीस्थीती चांगली नव्हती. मुलाच घराण नावाजलेल राजकारणी होत. मी समजाउन पाहील पण घरातले ऐकेचनात. शेवटी मी त्यांना आश्वासन दिल की मी तुमच लग्न लाऊन देईन आणि त्यांच कोर्ट मॅरेज मी लाऊन दिल. एवढा तमाशा झाला होता तेंव्हा, आहो माझ्या घरावर दगड मारले होते तेंव्हा. पण मी काय ऐकतेय, मी नाही घाबरत कुणा पुढार्याला. त्याच्या घरी तो. सरळ एक काचेची बाटली घेतली आणि धरला त्याच्या अंगावर नेम बरोब्बर पायाला लागली. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली. त्यांनी त्यांच्या वजनावर ती मिटवली . थोडा काळ गेला आणि त्यांच्यात गोडी झाली. मुलाच्या सुखासाठी त्यांनी त्या मुलील स्विकारल. माझीही माफी मागायला आले होते. धाड्कन दरवाजा लावला मी. काय देण घेण त्यांच आणि माझं ?
एखाद्याचा होकार कळवायला आनंद होतो हो पण नकार कळवताना खुप वाईट वाटत. तुम्ही माझ्या बोलण्यावर जाऊ नका. आहो मला पण आहे ह्रदय. हां माझी वागण्याची पद्धत वेगळी आहे, पण त्यावर मी खुष आहे आणि मी अशीच राहणार".
" जेंव्हा एखाद लग्न जमत त्या दिवशी मी माझ्या घरात उड्या मारून आनंद व्यक्त करते. मी कुणाच्याही लग्नाला जात नाही. लग्न जमल्यावर मला स्वइच्छेने वधू-वराकडून साडी नारळाचा मान येतो. मी तो आनंदाने स्विकारते. त्या साड्या मी आवडीने वापरते, ही नेसलेली पण त्यातलीच आहे. ज्या दिवशी त्यांच लग्न असत त्या दिवशी माझ्या घरी लग्नाच वातावरण असत. सगळा आनंदी आनंद असतो. गोड धोड मी सगळ्यांना करून खायला घालते. माझ्या कुत्र्यांनाही मी शिरा बनवून घालते. ते पण खुप मिजाशी आहेत. रोज त्यांना ताजी मच्छी खायला लागते. त्यासाठी मी सकाळी ६ वाजता धक्यावर जाऊन ताजी टाकाऊ मच्छी गोळा करुन आणते, ती त्यांना दिवसभर पुरते. रोज त्यांची अंघोळ घालते. त्यांच्याशी रोज गप्पा मारते, रागावते, रुसते, जवळ घेते. एवढे लाड करते म्हणून ते माझ सगळ ऐकतात. "
" मी माझे निर्णय माझ्या मुलांवरही लादते. मोठ्या मुलाचे लग्न होऊन तो गावालाच राहतो. मुलीला अमेरीकेतल स्थळ शोधून दिल. तिचा फोटो तिने दाखवला. लहान मुलगा माझ्या जवळ असतो. कस्ट्म मध्ये आहे तो. लग्न करणारच नाही अस मला स्पष्ट बजाऊन सांगत होता, पण मी कसली ऐकतेय त्याला ? तुझ लग्न लावल नाही तर नावाची शारदा नाही म्हणून त्याच्याशी पैज लावली आणि तो पैज हरला. हॉल मध्ये जी तुम्हाला मुलगी दिसते ती माझी सुन आहे. अगदी मुली सारखी आहे. माझ्या भावाचीच मुलगी भावाच्या संमतीने पळवून आणली मी त्याच्यासाठी आणि लावल जबरदस्तीने लग्न. खुप सुखाचा संसार चालू आहे दोघांचा. आम्ही दोघी एकमेकींशी लाडाने भांडतो पण, त्याशिवाय आम्हाला गोडी वाटत नाही."
" खुप बोलले मी आता. बराच वेळ झाला, दुसरी पार्टी येणार आहे १५ मिनिटांत. तुम्हाला मी काही फोटो दाखवते ते बघा आणि सांगा मला. मी त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करून उद्या तुम्हाला फोन करते. तुमच्या मुलाला माझ्याकडे उद्या पाठवून द्या पण त्याच्या मनातल विचारायला. आहो अस करते म्हणूनच मी ठरवलेली लग्न यशस्वी होतात. एकाच लग्नाचा काडीमोड झाला होता सुरुवातीला, त्याला कारण होत त्यांच्यात निर्माण झालेले त्यांच्यातले मतभेद. खुप रडले होते मी तेंव्हा. म्हणून मी मुला मुलीला त्यांचे स्वभाव ओळखायला स्वतंत्र बोलावते, त्याप्रमाणे त्यांच्या जोड्या सुचवते. शेवटी त्यांचे नशीब. "
" अशी आहे मी शारदा, विवाह मंडळ वाली. मघाशी मी तुम्हाला सगळ्यांना आत घेत नव्हते, पण तुम्ही मला खुप आवडलात. खुप आनंद झाला तुमच्याबरोबर गप्पा मारुन. एवढ खाजगी मी कुणाशी बोलत नाही. परत याल तेंव्हा सगळ्याच या. तुमच्या नवर्यांना पण घेऊन या." आम्हा दोघिंकडे बघुन ती बोलली. आणि काही फोटोंची पसंती दाखऊन आम्ही बाहेर पडलो.
*समाप्त*
प्रतिक्रिया
6 Apr 2009 - 4:37 pm | सुधीर कांदळकर
आहो घर आणि आई नंतर सांभाळेल, पहिला मुलाला नको का सांभाळायला
बाईंचा हा परखडपणा आवडला.
स्वस्थ बसले तर सडेल आणि घरातल्या माणसांची डोकी खाईन आत्ताच्या प्रमाणापेक्षा जास्त.
म्हणजे स्वत:ची ओळख त्यांना चांगलीच पटली आहे.
आणि त्यांनी माझी कंप्लेंट करून माझा मळा बंद पाडला. तेंव्हापासून मी बिल्डिंगमध्ये कोणाशी जास्त संबंधच ठेवत नाही.
खरेंच समाज हा असाच आहे. फुक्कट भाजी खाऊनहि निष्कारण मळा बंद पाडला. पण तिथें पहिला हक्क मुलांचा खेळायसाठीं आहे.
आहो कसल्या आल्या कुंडल्या नी छत्तीस गुण ? माझा ह्यावर मुळीच विश्वास नाही, देवावर तर माझा मुळीच विश्वास नाही.
झकास. सडेतोड दावा आहे. तरीहि स्व. सासूसाठीं पूजा करते! मान लिया.
लग्न लावलेल्या जोडप्याचा काडीमोड झाल्यावर रडणार्या मनस्वी बाई आवडल्या. साहाजिकच आहे. आमच्या समोरच्या फ्लॅटमधले जोडपें कधीं भांडलें तरी आम्हांला दोघांनाही डिप्रेशन येतें. माझें निरीक्षण असें आहे कीं इतरांशीं न जमणारीं माणसेंच उपद्रवी कुत्रे पाळतात. छान व्यक्तिरेखा.
सुधीर कांदळकर.
6 Apr 2009 - 6:26 pm | रामदास
वाचले आणि खूप आवडले.
अभिनंदन.
6 Apr 2009 - 7:05 pm | रेवती
बापरे, असं काही परखडपणे बोलणार्या व्यक्ती असल्या तर मला धडकीच भरते.
एक मात्र आहे की त्यांचा स्वभाव चांगला दिसतो आहे.
जागु, वेगळ्या विषयावरची वेगळी गोष्टं आवडली.
रेवती
6 Apr 2009 - 10:04 pm | क्रान्ति
व्यक्तिचित्रण छान जमले आहे. एकंदर वर्णनावरून बाई फणसासारख्या वाटल्या, वरून काटेरी पण आतून रसाळ, गोड.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
6 Apr 2009 - 10:52 pm | प्राजु
आवडलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Apr 2009 - 7:38 am | सँडी
लेखन आवडले.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
7 Apr 2009 - 11:21 am | जागु
सुधिर, रामदास, रेवती, क्रांती, प्राजू, सँडी धन्यवाद.