मंडळी,आज आम्हाला मिपावर येऊन 1 वर्ष 13 आठवडे एव्हडा अवधी झाला.ह्या अवधीत आमचा हा 300 वा लेख आहे. आम्हाला वाटलं आज आपण ह्या तिनशेव्या लेखामधून तात्याचे आभार मानावे.त्याच्याच कृपेने आम्हाला एव्हडं लेखन करता आलं.मिपावर लेखन स्वातंत्र्य,शुद्ध/अशुद्ध लेखन स्वातंत्र्य,लेखनातल्या विचाराचं स्वातंत्र्य, प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, प्रती-प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, एव्हडं स्वातंत्र्य आम्हाला स्वतःच्या ब्लॉग शिवाय कुठेच मिळालं नसतं.नव्हेतर मिपा हा आमचा स्वतःचाच ब्लॉग असं समजून आता पर्यंत आम्ही लिहीत आलो.
तात्या हा विषय घेऊन हा लेख लिहावा असं आमच्या मनात आलं आणि सुचत गेलं ते लिहिलं.त्यात काही आम्ही पाप केलं असं आम्हाला मुळीच वाटत नाही.तात्याला पण आम्हाला वाटतं तसंच वाटो ही अपेक्षा.
तात्या ह्या व्यक्तीचा आम्ही विचार केला.आणि आम्हाला जे सुचलं ते आम्ही खाली लिहीत आहो.
मिपावर तात्या ह्या शब्दात चुंबकत्व आहे.असं मला दिसून आलंय.
"लाईक पोल्स रिपेल ऍन्ड अनलाईक पोल्स ऍट्रॅक"
अशी लोहचुबंकाची थेअरी आहे.
पण तात्याच्या बाबतीत,
मिपावर "लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक" असं काहीसं आहे.
म्हणून म्हणतो तात्या म्हणजेच शब्द्चुंबक म्हटलं पाहिजे.
आता मी काय मिपावर अवलोकन केलं आहे ते सांगतो.
मिपावर तात्या हे नाव दिसलं की वाचकांची हीss झुंबड लागते.वाचायला आणि लिहायला.
कशासाठी बरं?
अशासाठी, की तात्या ह्या शब्दात एक प्रकारचं चुंबकत्व मिपावर निर्माण झालं आहे.
तात्याचा लेख असल्यास वाचण्यासाठी.
तात्याच्या लेखावर एखादा प्रतिसाद असला तर आणखी प्रतिसाद देण्यासाठी.
नसला तर पहिलाच प्रतिसाद देण्यासाठी.
तात्याने वेळ काढून कुणाच्यातरी लेखनावर आपला प्रतिसाद दिला तर लेखकाला खूप धन्य वाटतं.(सहाजीक आहे)
ताबडतोब तात्याला तिथेच आभाराचे प्रती-प्रतीसाद दिले जतात.
मिपावर तात्याने जर काही नियम आणले की,
"तात्या तुमच्याशी मी अगदी सहमत आहे"
हे लिहायला पण चूरस लागते.
तात्यावर दिलेली प्रतीक्रिया वाचून काहींची +१ ची प्रोगरार्म्ड चीप तयार असते.आणि पटकन डाऊन-लोड केली जाते.
तात्याला हाणायला-अर्थात प्रेमाने-काही ठरावीक लोक तात्याशी आपला अगदी गाढा संबंध आहे-कदाचीत असेल ही- अशा अविर्भावात संधी सोडत नाहीत.
तसंच तात्याने यदाकदाचीत कुणाची "**मत" केली तर अळीमिळीगुपचीळी करून बसणारे आहेत.
तात्याबद्दल मी किती किती लिहू? आणि काय काय लिहू? मला दिसलं ते मी लिहीलं.
मी मात्र शपथ घेऊन सांगतो तात्याशी मी असा कधीही वागलो नाही.निदान असं मनात ठेवून वागलो नाही.मग तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊं.पण एक मात्र सांगू इच्छितो की,
"हम गर्वसे कहते हैं के हम तात्याकेसाथ चापलूसी कभी नही किई.!"
म्हणजे इतर तात्याचे चापलूस आहेत् असं मी म्हणतो असं मुळीच गैरसमज करून घेऊ नका बरं का!
जिथे तात्याची स्तुती करायला हवी तिथे मी "अजाबात" काटकसर केली नाही.तात्याचे संगीतावरचे लेख वाचून मी पूरा थक्क झालो.(आम्हाला संगीतातला काही गंध नाही हा विषय वेगळा)पण म्हणून काय झालं?संगीताचा विषय क्लिष्ट न करता सर्व रागांची माहिती करून देणं हे काही सोपं नाही.आणि ते सुद्धा पॉप्युलर गाण्यांची उदाहरण्ं देऊन असं करणं काही खायचं काम नाही.परंतु,कधी कधी मला तात्याचे काही रिमार्क्स पटले नाहीत तर मी तात्याला सरळ सरळ सांगायला कचरलो नाही.आणि कदाचीत माझ्या सारखे काही लोक कचरलेही नसतील.तसंच कधी कधी आडून मी तात्याला बाण मारले आहेत.हे कबूल करतो.आणि माझं आडून बाण मारणं पाहून काहीनी तात्याला चिथवयाला- गमंतीत- कमी केलेलं नाही.
."तात्या ये आपके उपर सीधा हल्लाबोल है"
असंही सांगून पाहिलंय.पण तात्याने ते कधीही सिरयस्ली घेतलं नाही.कारण तात्याच्या मला दोन पर्सन्यालिटी दिसतात.
एक अशी की तात्याने सिरयस्ली-म्हणजे समजलं ना?- लिहायला सुरवात केली-तात्याने बोलायला सुरवात केली तर कसं बोलतो त्याचा मला अनुभव नाही-की मराठी बाराखडीतल्या ठरावीक बाराखड्या,उदा.भ..ची बाराखडी, ग..ची, म..ची, च..ची, र..ची आणि अशाच काही बाराखड्या अनमान न करता वापरायला कमी केलेलं नाही.कोकणीत ज्याला उघडपणे "गाळी" म्हणतात त्याचा वापर अचूक आणि यतार्थ करण्यात आपलं स्कील दाखवलं आहे.यात वाद नाही.कारण तात्या त्यात वाकीब आहे असा माझा (कदाचीत गैर) समज आहे.मी काही वेळां तात्याच्या काही लेखनात वाचलं आहे म्हणून सांगतो.
पण तात्याची दुसरी पर्सन्यालीटी की जेव्हा तात्या "इल्लीशी" टिका होऊन सुद्धा मोठ्या मनाने,
"नाही रे,त्यांचं माझ्यावर प्रेम आहे" किंवा,
"बरं बुवा!" (म्हणजे जाऊं दे ना आता)
अशी रियाक्शन देऊन प्रेमाने का होईना टिकेतली हवाच काढून घेण्याची तात्याची दुसरी पर्सन्यालीटी वाखाण्यासारखी आहे.अगदी कोकणातल्या फणासा सारखं.आतून रसाळ गोड. तात्या, माझ्या कोकणातला आहे हा मला एक तात्याबद्दल "ऍडेड पॉइंट" वाटत असतो.
हे मी सर्व तुम्हाला सांगत आहे ते एव्हड्यासाठीच की तात्या हा शब्द्च मिपावर चुंबकासारखा (लोहचुंबक लोह खेचून घेतो तसा)आहे.आणि तात्याचं शब्द्चुंबकाचं क्षेत्र (जसं लोहचुंबकक्षेत्र असतं तसं) सर्व मिपाभर पसरलं आहे.आणि का पसरूं नये हो?
पदरची कनवट रिकामी करून (इती सकाळ पेपराचा रिपोर्टर) मिपा चालवणं म्हणजे काय खायचं काम आहे काय? आणि ते सुद्धा ऐन चाळीशीत.(हे पण सकाळ वरून).
तात्याला मी माझ्या मुलासारखा समजतो.माझा मुलगाच तात्यापेक्षा दहा वर्षानी मोठा आहे. कोकणात आईला प्रेमाने "म्हातारी" आणि वडलांना किंवा वयस्कराना "म्हातारा" असं त्यांचीच मुलं मोठी झाली की म्हणतात.तात्या मला तसंच संबोधतो.कुणी म्हणेल हा तात्याचा फटकळपणा आहे.मी तसं नाही मानत.तात्या आपल्या आईला "आमची म्हातारी" च म्हणतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल.हे कोकणी संस्कार आहेत बरं का!.
मंडळी,तुम्ही म्हणाल की मला आज तात्याचा एव्हडा पुळका का आला? कुणी म्हणेल सामंतकाकानी आज " घुटूं " घेऊन लिहायचं ठरवलंय का?कुणी कशाला हो? मनात आलं तर तात्या स्वतःही असं म्हणायला सोडणार नाही.पण खरं सांगू,
तसं काही नाही मंडळी.आम्ही फक्त "घुटूं" ह्या शब्दाची मस्करी करण्यात एनजॉय करतो. "घुटूं" ची चव आम्ही कधीच घेतली नाही.एनजॉय करायची गोष्ट अलायदाच म्हणावी लागेल."घुटूं" घेणं म्हणजे काय पाप नाही म्हणा.
आज हा आमचा मिपावरचा तिनशेवा लेखनाचा प्रकार आहे. हा लेख आम्ही तात्याला अर्पण करायचं ठरवलं आहे.मिपाच्या लेखनपट्टीवर आज आमचं तीसरं शतक पूरं झालं.तुम्ही म्हणाल की ही स्वतःची आत्मप्रौढी चालली आहे.पण तशातला काही भाग नाही, मंडळी. आमच्या गतआठवणी कृतकृत्य झाल्याची समाधानी देत आहेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या सुचनेवरून मी मिपाचा सदस्य होऊन १ वर्ष १३ आठवडे झाले.त्यांची आठवण न करून कसं चालेल? आणि त्यानंतर तात्यानी आम्हाला सुवर्ण संधी देऊन आपला मिपा अक्षरशः आम्हाला मोकळा केला जसा इतरांना ही मोकळा केला असेल.म्हणून आम्ही तिनशे लेखनांची निर्मिती करू शकलो.त्यांचे ही आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.आमचा एकही लेख त्यांनी मिपावर प्रसिद्ध करायला मज्जाव केला नाही.आमचा स्वतःचाच ब्लॉग कसा आम्ही मिपाचा वापर केला. खरंच मजा आली.
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची.
आमचं लेखन स्वांतसुखाय असतं असं काहीनां वाटत असेल पण,-तसं ते आम्हाला स्वतःला वाटत नाही. आम्ही म्हटलं जरा हा लेख "हटके" लिहावा.बरेच वेळां आमचे लेख "यथा तथा " असतात पण काय करणार मंडळी,आम्ही पडलो शास्त्रज्ञ. टीआयएफआर मधे दिवस घालवले."साहित्य" शब्दातली मधली "ही" र्हस्व कि दीर्घ ही साधी गोष्ट आम्हाला माहित नाही.किंवा माहिती करून घेण्याची पर्वा केली नाही.मग साहित्य म्हणजे काय हे आमच्या डोक्यावरून नाही का जाणार?
मराठी शुद्धलेखन आणि साहित्य समजण्यात जर अर्ध आयुष्य घालवलं तर मग लिहायला कधी सुरवात करायची.?
मात्र मराठीची प्रगती,शुद्ध/अशुद्ध लेखन वगैरे सारख्या मोठ्या विचारात आम्ही आम्हाला गुरफटून घ्यायला गेलो नाही. अहो,आपली आई नेहमी शुद्धच असते.असं आम्हाला वाटतं.जे सुचतं ते लिहावं,ज्यांना आवडेल ते वाचणार,प्रतीसाद द्यावासा वाटला तर ते देणार.प्रतीसादाच्या संख्येवरून लेखनाची प्रतिभा ओळखली जाते असं आम्ही समजत नाही.लेख पारदर्शक असतील तर वाचून मजा येते असं आम्हाला वाटतं.प्रतिक्रियेची गरज नसावी.रोज रोज,
"लेख फार छान लिहिला आहे" असं काय ते लिहायचं बरं!
कुणी म्हणेल अरे बापरे! असं असताना,
"चालले कथा लिहायला".
यथा तथा वरून दोन ओळी आठवल्या,
"यथा तथाच्या लिहूनी कथा (मिपावर)
का वेळ घालवता व्यथा?
असे
विचारले आम्हा कुणी तरी
मिपाची उठाठेव हा का करी"
("हटा थटाने भटा
रंगवूनी जटा धरीशी का शिरी
मठाची उठाठेव का करी"
ह्या गाण्याचा आधार घेऊन)
पण एक खरं आहे.तात्यानी शुद्धलेखनावर कसलाच अटकाव आणला नाही म्हणून आमच्यासारख्याचं फावलं.अहो दिर्घ चा दि र्हस्वं काय किंवा दीर्घ काय? काय फरक पडतो सांगा.निदान लिहीताना आम्हाला काही फरक वाटत नाही.ज्याना वाटत असेल त्यांना आम्ही काही करू शकत नाही.कवट काय आणि कवठ काय संदर्भाशी संबंध येतो ना?बामण काय आणि ब्राम्हण काय?ज्याला जसं वाटतं तसं तो उच्चार करतो. मिपावर अनेक विद्वान लेखक आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे.
अहो,बहिणाबाई,तुकाराम कुठल्या विद्यापीठात गेले होते.?म्हणजे त्यांची नावं घेऊन आमची आम्ही बरोबरी करतो असा उगाच गैरसमज करून घेऊ नका.आम्ही त्यांच्या पुढे यकःश्चीत आहोत. पण मंडळी,सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की लेखन हा एक निर्मितीचा प्रकार आहे.ते विचार कुणालाही सुचूं शकतात.निसर्गाकडे नेम आहेत नियम नाहित.म्हणूनच निसर्ग फोफावत असतो.माझ्याच दोन ओळी आठवल्या,निसर्गाचंच बघा ना,
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वां उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मनातल्या तुझ्या लेखनाची
जरा गंमत म्हणून आता ही पहा आंकडेमोड.फॅक्टस ऍन्ड फिगर्स.
आमचं मिपावर लेखनाचं पहिलं शतक 15 ऑगस्ट 2008.
दुसरं शतक 25 नोव्हेंबर 2008
आणि
तिसरं शतक 23 सप्टेंबर 2009
आता कृपया हे वाचा
मिपाच्या स्थापनेच्या सुरवाती पासून शंभरावर लेखन्ं लिहिणारे मिपावरचे पहिले अकरा.
(मिपावरच्या जाहिर माहितीवर अधारित. चूकभूल संभाळून घ्यावी)
क्रमांक लेखक लेखनं सदस्यत्वाचा अवधी.
1 श्रीकृष्ण सामंत 300 1 वर्ष 13 आठवडे
2 विसोबा खेचर 220 2 वर्ष 1 आठवडे
3 प्रमोद देव 203 2 वर्ष 1 आठवडा
4 चतुरंग 160 1 वर्ष 39 आठवडे
5 विजूभाऊ 131 1 वर्ष 30 आठवडे
6 केशवसुमार 120 2 वर्ष 2 दिवस
7 प्राजु 122 2 वर्ष 2 आठवडे
8 विनायक प्रभू 121 1 वर्ष 10 आठवडे
9 आपला अभिजीत 113 1 वर्ष 33 आठवडे
10 विशाल कुळकर्णी 110 0 वर्ष 31 आठवडे
11 ऍनॉनीमस 104 म्हायत नाय
वरील माहिती दाखवण्याचा आमचा उद्देश फक्त आम्हाला वाटलेली मनोरंजक माहिती नीट मांडणी करून दाखवणं हाच आहे.
मिपावर अनेक विद्वान लेखक आहेत आणि ज्याला जसं सुचतं तसं तो लिहीत असतो.अशी आमची धारणा आहे.
मिपावर आतापर्यंत सर्व लेखकांची 7861 लेखनं झाली.
मिपावर आतापर्यंत एकूण 785 लेखक आहेत.(एक दोन लेखापासून शेकडो लेख लिहिणारे)
आमच्या तिनशे लेखनाची जवळ जवळ एक लाख वाचनं झाली. 99,155
आम्हाला एकूण 1718 प्रतिसाद मिळाले.(आमचे प्रती-प्रतीसाद धरून)
मंडळी,हे सर्व लिहून एव्हड्यासाठीच प्रपंच केला की जे आमच्याकडून पाहिलं गेलं त्याची नीट मांडणी केली.
कालच्या 14ऑगस्टला आम्ही 76 संपवून 77 वर्षात पदार्पण केलं.
मिपावर आता लेखनाच्या चौथ्या शतकाच्या उद्देशाने आम्ही कूच करीत आहो.अंगात लिहिण्याची अजून खुमखूमी आहे.
"जुने देवूनी नवीन घ्या"ह्या उक्तिनुसार आमचा जुना कंप्युटर काढून, hpGT60-200 हा नवीन 16 इंची HPचा
लॅपटॉप घेतला आहे.आणि हे सांगण्याचं मुख्य कारण योगायोग म्हणजे त्यावरचा हा मिपावरचा पहिलाच लेख आहे.हे बघून बरं वाटतं.
यापुढे स्वांतसुखाय न लिहिता मिपाकारांना आणखी आनंद होईल असे लेख लिहीण्याचा आम्ही प्रयत्न करू. जरा निराळच लिहूं.ते तुम्ही वाचालच.
आता यापुढे तात्याची मर्जी, तुमच्या शुभेच्छा आणि नियतीची आमच्याबद्दलची भविष्यतली योजना हीच आमची आशा.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 11:21 pm | मिसळभोक्ता
सामंतकाका,
वाढ दिवसाच्या शुभेच्छा. आपल्या उत्त्तमोत्तम लेखनाच्या प्रतीक्षेत.
(अॅनॉनिमस....)
-- मिसळभोक्ता
23 Sep 2009 - 11:41 pm | टारझन
सामंतकाका जियो ... भरपूर वेळ खर्चून अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहीला आहात !!
बाकी एक गोष्ट नमुद करावी वाटते ती अशी .. आपल्या मिसळपावा वर केवळ दोन व्यक्ती अशा आहेत .. ज्या केवळ लेखांतुन दिसतात .. बाकीच्यांचे लेख ते वाचतात की वाचत नाहीत हे माहीत नाही .. पण त्यांच्या प्रतिक्रिया फक्त त्यांच्याच लेखांवर आभारप्रदर्शन करताना दिसतात .. त्या व्यक्ति म्हणजे .. कोदा आणि श्रीकृष्ण सामंत :) असं का असेल हो ?
(सामंतकाकांच्या दर्दी लेखणाचा (न फिरणारा) फॅन) आंबेचोख्ता
23 Sep 2009 - 11:52 pm | चतुरंग
टार्याशी सहमत!
चतुरंग
24 Sep 2009 - 8:06 am | पाषाणभेद
सही रे टार्या. टार्या ला टाळ्या.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
24 Sep 2009 - 9:12 am | श्रीकृष्ण सामंत
नमस्कार टारझन,
"असं का असेल हो?
फार सुंदर प्रश्न विचारला आहेस.आणि तुझं ऑब्झरवेशन अचूक आहे.वाखाणणी करण्यासारखं आहे.मला सुचतं ते माझं कारण मी सांगतो.
माझ्याही लेखनावर आभाराची प्रतिक्रिया देण्याचा अलीकडे मी तो शिरस्ता सोडून दिला हे ही तुझ्या लक्षात आलं असेल. मिपावर आल्यापासून मी एक शिरस्ता ठेवला होता की आपल्या लेखनावर जर कुणी प्रतिक्रिया दिली तर त्याचे ताबडतोब आभार मानायचे.पण
"मी मला मिळण्यार्या प्रतिसादाची अशातर्हने संख्या वाढवीत आहे"
अशी माझ्यावर झालेली मी टिका वाचली.आणि माझ्या लेखावर आलेल्या प्रतिसादावर कुणाचेही आभार मानायचं सोडून दिलं.वाईट वाटत होतं पण काय करणार.गैरसमजापेक्षा समज बरी नाही काय?
" बाकीच्यांचे लेख ते वाचतात की वाचत नाहीत हे माहीत नाही "
ह्याचं उत्तर असं की, मी वेळ काढून जमतील तेव्हडे लेख-आणि तात्याचा प्रत्येक लेख आणि प्राजु,क्रान्तीची प्रत्येक कविता आवडीने- वाचत असतो.आणि प्रतिक्रिया देण्यासारखी वाटली तर नक्कीच देतो.तात्या नक्कीच ह्या माझ्या म्हणण्याला साक्षी आहे.त्याच्या अनेक लेखावर माझ्या स्टाईलमधे प्रतिक्रिया देत होतो.प्राजूच्या मातोश्रींच्या सिद्धहस्त लेखिका म्हणून भारताच्या अध्यक्षांकडून सन्मान झाल्याच्या पोस्ट्वर मी माझ्या स्टाईल मधे लिहलं होतं ते मला निक्षून आठवतं,
मी प्राजूला लिहलं होतं,
"अशीच अमुची आई असती
सिद्धहस्त लेखिका
आम्हीच लेखक झालो असतो
वदले सामंत काका"
सांगण्याचा मतितार्थ असा की.वाचकांच्या प्रतिसादाने लेखकाचं मनोबळ वाढतं आणि उत्तेजनक प्रतिसादाने आणखी लेखन करण्यात उत्साह ही वाढतो,तसंच लेखनावर योग्य टिका असलेल्या प्रतिसादाने लेखकाला आपल्या लेखनात सुधारणा करता येते असा माझा समज होता.आणि आहे.
"तुमचे लेख पारदर्शक असल्याने समजण्यासारखे असतात आणि वाचायला आवडतात.त्यामुळे आम्ही दरवेळी "लेख चांगला लिहिला आहे" असा प्रतिसाद देत नाही."
असं माझ्या काही मायबाप वाचकानी मला लिहूनही कळवलं.त्यामुळे माझ्या लेखनाला प्रतिसाद नसले तर मला काही वाटत नाही.
आणि खरं सांगू का,प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाला काही ना काही तरी प्रतिक्रिया देऊन,
"लेख लिहायला जमलं नाही-होत असेल काही ना- तरी प्रतिक्रियेमधून लेखन करण्याच्या त्यांच्या हौसेला"
आनंद मानणार्या लोकांचं मला कौतुक वाटतं.आणि मिपावर असे अलीकडे "प्रोफेशनल प्रतिसाद लेखक" डोळ्यात भरण्यासारखे मला दिसतात.मिपाच्या प्रसिद्धीच्या अनेक कारणापैकी "प्रतिसादाने भरलेलं संस्थळ" हे ही एक कारण असावं असं मला वाटतं.प्रत्येकाच्या लेखावर प्रतिक्रिया देणार्या एका "प्रतिसाद लेखकाच्या" नावावर त्याने किती लेख लिहिले असतील? हे कुतूहल म्हणून पाहायला गेलो तेव्हा मिपाचा सदस्य होऊन एक ही लेख त्यांनी लिहिलेल्याचा उल्लेख दिसला नाही.हे गृहस्थ कुणाच्या ही लेखावर प्रतिसाद देण्याच्या बाबतीत हिरीरीने भाग घेतलेले दिसतात.
पण आपल्याला बुवा हे असे प्रतिसाद द्यायला जमत नाही.मात्र एखादी कविता किंवा लेख वाचून कौतुक करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही.
आता श्री.कोदा हे असं का करतात ते तेच जाणे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
23 Sep 2009 - 11:24 pm | अवलिया
तात्याच्या आणि तुमच्या दोस्तान्याबद्दल आम्हाला डावुट होताच...
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
(७४+६५+१२+९) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:28 pm | मी-सौरभ
सौरभ
23 Sep 2009 - 11:32 pm | सांगलीचा भडंग
अभिनंदन..
23 Sep 2009 - 11:32 pm | चतुरंग
अहो झाली की हो ट्रिपल सेंचुरी! :) मस्तच!!
तुमचा लिहिण्याचा उत्साह दांडगा आहे आणि तो असाच राहो! :)
आणि हो, नवीन ल्यापटॉपाबद्दल अभिनंदन! :)
(अवांतर - आधी मी 'तात्या म्हणजेच शब्दचुंबन' असे वाचले होते! :O )
चतुरंग
24 Sep 2009 - 1:08 pm | विशाल कुलकर्णी
सामंतकाकांच्या भाषेत रेडीली अपलोडेबल चिप ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Sep 2009 - 11:41 pm | मदनबाण
मिपावर आता लेखनाच्या चौथ्या शतकाच्या उद्देशाने आम्ही कूच करीत आहो.
अभिनंदन... :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
23 Sep 2009 - 11:53 pm | अनामिक
अभिनंदन!
-अनामिक
23 Sep 2009 - 11:54 pm | प्राजु
असेच उत्तम लेखन तुमच्या हातून घडो. वाढदिवसानिमित्त उशिरा का होईना शुभेच्छा आणि तिसर्या शतकासाठीही अभिनंदन!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Sep 2009 - 12:02 am | संदीप चित्रे
त्रिशतकाचेही आणि नवीन लॅपटॉप घेऊन अजून उत्साहाने भरलेल्या तुमच्या मनाचेही :)
24 Sep 2009 - 6:20 am | पिवळा डांबिस
सामंतकाका,
३०० लेखांबद्दल हार्दिक अभिनंदन!
असाच उत्साह वाढत राहो...
आपला,
सेंचुरीपूर्वीच आऊट,
पिवळा डांबिस
24 Sep 2009 - 12:08 am | योगी९००
३०० व्या लेखाबद्दल तुमचे अभिनंदन...माझ्या ३०० प्रतिक्रिया सुद्धा झाल्या नसाव्यात...
तुमचा सेहवाग झाला आहेच..लवकरच ब्रायन लारा व्हावा ही इच्छा..
खादाडमाऊ
24 Sep 2009 - 12:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामंत साहेब, आपलं लेखन वाचायला आवडतेच आणि वाचत असतोच. असो, त्रिशतकाबद्दल अभिनंदन...!
आपल्या लेखनातला अनुभव, उपदेशपर लेखन , थोडे चिंतन, थोडेसे असे आणि थोडेसे तसे,... आपल्या लेखनातून प्रत्येक वेळेस नवं काहीतरी वाचायला मिळते हा माझा अनुभव आहे. आपली लेखणी अशीच बहरत राहो..!
-दिलीप बिरुटे
(सामंत साहेबांचा फॅन)
24 Sep 2009 - 12:46 am | शेखर
अभिनंदन काका
शेखर
24 Sep 2009 - 1:21 am | प्रभो
वाढदिवस, लेखांचे त्रिशतक, नवा लॅपटॉप याबद्दल त्रिवार अभिनंदन!!!!
काका, तुम्ही लेख लिहिताही सुंदर...दर वेळेस नवे काहीतरी शिकायला मिळतं..असेच लिहित रहा..
तात्यांचं चित्रणही अगदी सुरेख...
--(श्रीकृष्णाचा गोंद्या) प्रभो
----------------------------------------------------------------------------------
अवांतरः १०० वर लेखाच्या लेखकांत राजेचं नाव कसं नाही.???..त्याचे दिडशे झाले म्हणून एक पेश्शल लेख टकला होता त्याने....(ह. घ्या)
24 Sep 2009 - 1:40 am | धनंजय
तुम्हा-आम्हासारख्या हौशी लेखकांसाठी मराठी लिहायला मिसळपावाची सोय फारच चांगली आहे.
( सामंतकाका, तात्यांना ऊठसूट मूठमूठ मांस चाढवल्यास त्यांची प्रकृती बिघडेल. जरा सबुरीने :-) )
त्रिशतकाबद्दल अभिनंदन.
24 Sep 2009 - 7:42 am | मीनल
आपल्याला वाडदिवसानिमित्त शुभेच्छा.
<:P
खूप खूप लिहा.
मी सर्व लेख वाचते. क्वचित प्रतिसाद देते. ब-याचदा लेखातला मेसेज पार हृदयाला भिडतो.
आपल्या उत्साहाच खरोखर कौतुक वाटत.
मी लेखनाच्या केलेल्या आळसाची लाज वाटते.
मीनल.
24 Sep 2009 - 8:06 am | सहज
हटके लेखाबद्दल अभिनंदन. स्टॅटिस्टीक्स आवडली.
तसे आता प्रतिसादांचे शतक, द्विशतक (इतरांच्या लेखात) होउन जाउ दे. :-)
तात्याला धन्यवाद की त्याने मिपावर, अनेक लोकांना इतर संकेतस्थळाच्या मानाने भरपूर स्वातंत्र्य दिले.
सामंतकाकांना मिपावर आणण्यास उद्युक्त करणार्या प्रा. डॉ. देखील धन्यवाद.
24 Sep 2009 - 8:10 am | पाषाणभेद
अभिनंदन बर का काका. लेख आवडला.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
24 Sep 2009 - 8:19 am | विसोबा खेचर
म्हातार्या, अरे माझ्यासारख्या सामान्य इसमाचं कौतुक तरी किती करशील?! :)
पण तुझ्यासारख्या वडीलधार्याचा कौतुकभरला हात डोक्यावर आहे ही कल्पना मात्र सुखावून जाते..
असो,
मिपा तुझंच आहे.. इथे भरपूर लिवा साहेब..
तुझा,
तात्या.
24 Sep 2009 - 8:29 am | क्रान्ति
सामंतकाका वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन. :)
[आपल्या लेखांच्या चौथ्या शतकाच्या प्रतिक्षेत] क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
24 Sep 2009 - 9:33 am | वेताळ
तसेच सामंत काका,प्रो.देसाई व त्याच्या नातवाचे देखिल हार्दिक आभार,नवीन ल्यापटोप व तिसर्या शतकाबद्दल(लेखाच्या) हार्दिक अभिनंदन.
वेताळ
24 Sep 2009 - 9:46 am | प्रमोद देव
लेखांचे त्रिशतक, ७७वा वाढदिवस आणि नवा उर्ध्वपट.....ल्यापटॉप हो :)...ह्या तिन्हींबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
24 Sep 2009 - 12:58 pm | टारझन
बासंच ... काय अट्टहास हा नको तिथे मराठीपणाचा ? कुठे तरी ऑर्कुटाला आपणंच मेतकुट म्हंटला होतात .. देव काका .. आहो इंग्रजांनी ही "जंगल" हा शब्द आपणवला हो .. असे जड-जड शब्द मेंदूला वात आणतात . ;)
आणि हो .. सामंतकाका ,
तुमचा आदर आहे होता राहिल .. मी फक्त शंका म्हणून विचारलं !! आता तुमच्या लेखणशैलीबद्दल मी कधीही कमेंट केली नाही . एका उदाहरणावरून सांगू का ?
आर्ट मुव्ही (सामंतांचे लेख) ला पब्लिकची (प्रतिसाद) गर्दी जरी झाली नाही तरी मुव्ही फालतु आहे असं म्हणता येणार नाही .. तसेच कमर्शियल (मिभो) किंवा अॅडल्ट रेटेड (टारझन) मिव्हीजचे शो जरी हाऊसफुल्ल (५० प्रतिसाद) झाले तरी ते लेख "लै भारी" असतीलंच असं नाही !! पण डॉक्युमेंट्रीज (कोदाचे निबंध) मात्र निश्चित बोरींग असतात :)
कोदांशी तुमची बरोबरी केलेली नाही. कोदा फक्त स्वतःच कौतुक सांगायला आणि आपली रक्तरंगीत* करायला येतो ... तो कोणाचे लेख वाचत असेल असं बिल्कूल वाटत नाही . वर प्रतिक्रिया द्या म्हणून काव आणतो... व्हेरअॅज तुम्ही स्वतःसाठी लिहीता .. तुम्ही कर्काच्या वाकड्या कमेंट्स देखील अगदी विना हाजमोला खपवल्यात, ह्यातच तुमचा विजय आहे .... बाकी माझ्या सारख्या क्षुद्राच्या कमेंटला महत्व देऊन उत्तर दिल्याबद्दल खरंच सुखावलो आहे .
-(देवांच्या "मराठी शब्द सुचवा" चा फॅन) टारझन
24 Sep 2009 - 1:24 pm | समंजस
त्रिवार अभिनंदन काका! =D> त्रिशतकी खेळी बद्दल!!
तुमचं लिखाण असंच सुरु ठेवा!!
24 Sep 2009 - 1:34 pm | सुधीर काळे
सामंतकाका,
ज्यांना मी काका म्हणू शकेन अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये आपण आहात. चक्क दहा वर्षांनी मला सीनियर!
तरी आपले या (तीन सेकडा) त्रिशतकानिमित्त्य अभिनंदन.
आपल्याला मिपाचे सचिन तेंडुलकरच म्हणायला हवे. पण ज्या वेगाने आपण हे त्रिशतक ठोकलेत ते पहाता "सचिन ब्रॅडमन" हे नाव जास्त शोभेल!
आपल्याला शुभेच्छा.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
24 Sep 2009 - 1:34 pm | फ्रॅक्चर बंड्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन.
24 Sep 2009 - 2:04 pm | घाशीराम कोतवाल १.२
सामंत काका तुम्हाला मिपावरील वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन
असेच लिहित रहा
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
24 Sep 2009 - 2:12 pm | विनायक प्रभू
लेख.
लगे रहो सामंत भाई.
24 Sep 2009 - 10:11 pm | श्रीकृष्ण सामंत
मंडळी,तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार.माझ्या तिनशेव्या लेखाबद्दल,माझ्या जन्म दिनाबद्दल आणि माझ्या नव्या लॅपटॉपबद्दल आपल्याकडून कौतुक झाल्याबद्दल तुमचे पुनःश्च आभार.
एक मात्र कबुल करावं लागेल,आणि मी ते परत रिपीट करतो की तात्याचं चुंबकत्व माझ्या ह्या लेखाला सुद्धा एव्हडे प्रतिसाद मिळायला काही प्रमाणात कारणीभूत झालं आहे.कसं का असेना,
"कोणाचो कोंबडों आरवेना दिवस उजाडलो म्हणजे झालां" काय समजल्यात?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
27 Sep 2009 - 1:02 am | शक्तिमान
हे अगदी खरं....
तात्यांचे नाव पाहुनच हा लेख वाचायला घेतला! असेच काही टारझनने लिहिलेल्या लेखांबाबत होते माझे. लेख छप्परफाड असणार असेच वाटते॓!
बाकी आपली आकडेवारी आवडली... कशी मिळवलीत हो ही माहिती?
मिपा च्या डेटाबेसला अॅक्सेस मिळाला का?